आज काय घडले.... मार्गशीर्ष व. ११ सेनापति द्रोणाचार्यांचा वध !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Jan 2021 - 9:57 am

द्रोणाचार्य वध

शकपूर्व २००९ मार्गशीर्ष व. ११ या दिवशी भारतीय युद्धांत कौरवांकडील प्रसिद्ध सेनापति द्रोणाचार्य यांचा वध झाला.

जयद्रथाचा वध झाल्यावर दुर्योधन द्रोणाचार्यांना टाकून बोलला, “आचार्य, आपण आंतून पांडवांकडील आहांत...." त्यावर द्रोण रागाने बोलले, "दुर्योधना, या वाक्शल्यांनी मला कां टोचतोस ? बाबा, शकुनीने द्यूतांत जे फांसे टाकले ते फांसे नव्हते, अर्जुनाचे बाण होते.... सती द्रौपदीला सभेत खेचून आणून जो अधर्म केलात त्याचे आतां फळ भोगा.... तरी पण कर्तव्य म्हणून मी आज प्रतिज्ञा करतो की, जीवात जीव आहे तोपर्यंत आज मी युद्ध करीन.” आणि या दिवशी रात्रीसुद्धा घनघोर संग्राम सुरू झाला. द्रोणांनी मोठा पराक्रम करून द्रुपद, त्यांचे नातु व विराट यांचा नाश केला.

द्रोणांचा पराभव होण्याचे चिन्ह दिसेना. 'द्रोणपुत्र अश्वत्थामा मेला' अशी बातमी उठल्याखेरीज द्रोणांचा पराभव अशक्य असे श्रीकृष्णांनी हेरले आणि त्याच्याच सूचनेवरून मालवराजा इंद्रवर्मा याचा अश्वत्थामा नांवाचा हत्ती ठार करून 'अश्वत्थामा मेला' अशी बातमी वृद्ध द्रोणाचार्यांना कळविण्यात आली. सत्यनिष्ठ धर्माकडूनहि खात्री झाल्यावर या म्हाताऱ्याच्या मर्मावर वार बसला. लहानपणी पाण्यांत पीठ कालवून ते दूध म्हणून पिणारा आणि आनंदाने बागडणारा एकुलता एक पुत्र अश्वत्थामा-द्रोणांचा प्राण-नाहीसा झाला ! पुत्रशोकाने विह्वल झालेल्या द्रोणांनी शस्त्र खाली टाकले. द्रोणाचा सूड घेण्यासाठी उतावीळ झालेला धृष्टद्युम्न द्रोणांच्या रथावर चढला, व शोकसमाधीत निमग्न होऊन शस्त्रसंन्यास करून बसलेल्या त्या पंचाऐशी वर्षांच्या वृद्ध गुरूची शेंडी धरून त्याने तरवार उपसली, "हा! हा! गुरूंना जिवंत धरा! मारूं नका !" या अर्जुनादि पांडवांच्या ओरडण्याकडे पितृवधामुळे संतप्त झालेला धृष्टद्युम्न कोठून लक्ष देणार ! त्याने आपल्या तलवारीच्या फटक्यासरशी त्या अजिंक्य वृद्ध वीराचे मस्तक छाटून कौरवसेनेपुढे फेंकून दिले.

- १ नोव्हेंबर इ. स. पू. १९३१ कमी पहा

इतिहास