" ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तर पत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिचा नवरा तिथेच पडून मोबाइल बघत होता. त्याने रडण्याच कारण विचारल. ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते. एका मुलाने इच्छा व्यक्त केली आहे की, देवा मला मोबाईल बनव...
हे ऐकून नवरा हसू लागला.
शिक्षिका म्हणाली पुढे तर ऐका, मुलाने लिहिलय, जर मी मोबाइल बनलो तर...
घरात माझी एक खास जागा असेल आणि सगळेजण माझ्या आजूबाजूला असतील.
जेव्हा मी बोलेन तेव्हा सगळे जण मला लक्ष देऊन ऐकतील, मला कोणी उलट बोलणार नाही, प्रश्न विचारणार नाही. जेव्हा मी मोबाइल बनेल तेव्हा पप्पा ऑफिस मधून आल्यावर थकले असले तरी माझ्यासोबत बसतील, आई चिडली असली तरी मला रागवणार नाही, उलट माझ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मोठ्या भावात आणि बहिणी मध्ये माझ्या जवळ राह्ण्यावरून भांडण होईल. एवढच काय मी (मोबाइल) बंद असलो तरी माझी काळजी घेतली जाईल. आणि हो, मोबाइलच्या रूपात मी सगळ्यांना आनंद सुद्धा देऊ शकेल."
असाच काहीसा मेसेज दोन तीन दिवसांपूर्वी वॉटस् अप वर येऊन धडकला, आणि मी विचार करू लागले, खरच आपण असच काहीस वागत नाहीयेत ना..??
मोबाइल आपल्यासाठी आहे की आपण मोबाइल साठी..??
हा मेसेज वाचल्यानंतर मी सहज सभोवताली एक नजर टाकली, माझी रोजची घराबाहेर निघायची वेळ 7.30-8.00 ची आहे, आणि याच वेळेत बहुतेक शाळकरी मुलांची शाळेत जायची वेळ, त्यांना शाळेच्या बस मध्ये सोडण्यासाठी भरपूर पालक मोठ्या उत्साहाने बस स्टॉप पर्यंत येतात, पण बस येई पर्यंत ते काय करतात..?? तर त्यांंच्या मोबाइल मध्ये डोक खुपसून काहीतरी करत बसतात. निदान मला तरी तसच दिसल. बहुतांश पालक हे आपापल्या मोबाइल मध्ये इतके गुंग असतात की मला तरी वाटते बस आल्यानंतर सुद्धा त्यांचे मूलच सांगत असतील त्यांना "जाग" करून सांगत असतील पप्पा/मम्मा माझी बस आली, अन् मग ते आपल्या मुलांना बस मध्ये बसवून पुन्हा "आपल्या कामाला" लागत असतील
पण खरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एक तर आधीच आपल्याला आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांसाठी वेळ मिळत नाही, आणि जो मिळतो तो सुद्धा आपण टी.व्ही. पहाणे किंवा मोबाइल वर घालवणार असु तर नात्यांचे महत्व आणि त्या पासून मिळणारे प्रेम आपण समजू शकू.. ?? हा आपला नात्यांचा समृद्ध वारसा आपण पुढच्या पिढीला देऊ शकू.. ?? आपल्याला फक्त एकच ठरवायच, कोण कोणासाठी आहे ? आपण मोबाइल साठी आहोत की मोबाइल आपल्यासाठी ???
प्रतिक्रिया
14 Mar 2015 - 1:00 pm | ग्रेटथिंकर
खरय तूमचं.मोबाईलचा अतीवापर टाळला पाहीजे.
14 Mar 2015 - 1:48 pm | सांगलीचा भडंग
मोबाईल नक्कीच आपल्या साठी आहे .आणि चांगला पण आहे .
वरील जो विचार मांडला आहे पण असा विचार साधारण सगळीच लोक आपल्या वयाला अनुसरून करत असतील असे वाटते .
म्हणजे फार जुनी पिढी म्हणत असेल - लेंडलाईन आल्यामुळे हल्ली दुरावा वाढला आहे नात्यांचे महत्व टिकणार कसे .......थोडी कमी जुनी पिढी म्हणत असेल-हल्ली मोबाईल आल्यामुळे हल्ली दुरावा वाढला आहे नात्यांचे महत्व टिकणार कसे.लोक एकमेकांना भेटत पण नाहीत.....जी पिढी फक्त जुने मोबाइल फोन वापरते ते म्हणतील:हल्ली व्होट्स अेप आणि मोबाइल इन्टरनेट मुळे पूर्ण संवाद कमी झाला आहे.कशी टिकणार नाती .
त्यामुळे "आमच्या वेळी असे नव्हते कसे होणार पुढच्या पिढी चे" हा सूर कोणत्याही वयोगटातले लोक लावू शकतात. आणि त्याच वयोगटामध्ये चर्चा करून मनोरंजन करून घेत असतात.
14 Mar 2015 - 2:32 pm | कंजूस
सांगलीचा भडंग +१ .
(आपण =३५ ते ५०वयोगट ?)
टिव्ही ९०पर्यंत स्थिरावला. कार्यक्रम वाढले अन नावं ठेवणारी जुनी पिढीच आता त्याला चिकटून बसते. त्यांच्या लग्नाची {एकाच }चार दशकं उलटली तरी एक नवरा- तीन बायका छाप मालिका एकपण सोडत नाहीत. नातवाचा अभ्यास चालला असला तरी टिव्हीचा आवाज जराही कमी करत नाहीत.
हेच मोबाईल आणि आताची मधल्या वयातली (आपण?) पिढी करतेय. चसकाच लागतो त्या एड्या डबीचा. घोषवाक्य बदलतंय एक दागिना करायचाय -एक साडी- एक नवा मोबाइल घ्यायचाय.
14 Mar 2015 - 4:32 pm | रिम झिम
फार फार पुर्वी हा लेख फेसबुक वर बर्याच वेळा वाचलाय...
16 Mar 2015 - 9:03 am | थॉर माणूस
मागे एकदा व्हॉट्सअॅप वर पण आलेला आहे.
16 Mar 2015 - 9:18 am | श्रीरंग_जोशी
प्रथम त्यांनी जालावर वाचलेला संदेश च्योप्य पस्ते केला आहे त्यानंतर स्वतःचे विचार मांडले आहेत. खालील वाक्यामुळे तसे कळते.
परंतु लेखाच्या सुरुवातीलाच स्पष्टपणे लिहिणे की खालील संदेश जालावरून मिळालेला आहे हे कधीही उत्तम. कारण अजाणतेपणी इतर कुणाचे लेखन स्वतःच्या नावावर प्रकाशित होऊन जाते.