मेट्रीक्स चित्रपट पाहताना पौर्वात्य मनाला ओळखिचे काहीतरी जाणवत असते. त्यातही आपण भारतीय मंडळी तर पटकन आपल्या अध्यात्मातील दाखले देऊन चित्रपटाशी असलेले भारतीय तत्वज्ञानाचे साम्य दाखवु लागतो. साम्य पाहायला गेले तर आहेच यात शंका नाही. मात्र ते पाहताना विरोध कुठे आहे याकडे लक्ष दिले पाहिजे तरच या विषयाचा नीट मागोवा घेतल्यासारखे होईल. साम्य पाहण्याच्या नादात विरोधाकडे बहुतेकांचे संपुर्ण दुर्लक्ष झालेले दिसते. या लेखात साम्य व विरोध या दोन्हींचा परामर्ष घेण्याचा विचार आहे.
निओ हा एक सर्वसाधारण घोळक्यापेक्षा वेगळा तरुण ज्याला या जगात कुठेतरी काहीतरी चुकते आहे याची जाणीव आहे. आणि त्यासाठी या जगाचे मुळ काय याच्या शोधात तो आहे. त्याला मॉर्फियस भेटतो. तो त्याचा गुरु बनुन त्याला जगाचे जे मूळ “मेट्रीक्स” त्याचे दर्शन घडवतो. हे करतानाच मॉर्फियसची अशी श्रद्धा आहे की निओ हाच जगाचा भविष्यातील तारणहार आहे. मॉर्फियसच्या मार्गदर्शनाखाली निओचे शिक्षण सुरु होते. पुढे प्रसंगवशात निओला आपल्यातील ताकदीची जाणीव होते. तो यंत्रांशी, ज्यांच्या ताब्यात आजचे जग आहे, युद्ध करतो आणि जगाचा सर्वनाश टाळतो. हे करत असतानाच मॉर्फियसकडे असलेल्या ट्रीनिटी या त्याच्या स्त्री सहकारीचे निओवर प्रेम जडते. दोघे मिळुन यंत्राशी शेवटचे युद्ध खेळतात आणि जिंकतात. मी सांगितलेला कथेचा गोषवारा त्रोटक आहे. तो पुरेसा नाही याची मला जाणीव आहे. तरीही ज्या विषयाचे विवेचन करायचे आहे त्यासाठी इतपत उल्लेख पुरे आहे असे मला वाटते.
आपले अध्यात्म यावर काय म्हणेल? निओ हा मोक्षेच्छु तरुण आहे. जगाचे कारण काय या आदिम प्रश्नाच्या शोधात आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही. जोपर्यंत निओची तयारी होत नाही मॉर्फियस त्याला भेटतच नाही. शिष्याची पुरेशी तयारी झाल्यावर गुरु आपोआप भेटावा त्याप्रमाणे निओची मॉर्फियसशी भेट घडते आणि त्याला मोक्षाचे दार खुले होते. गुरुगृही शिक्षण व्हावं त्याप्रमाणे मॉर्फियस त्याला तयार करायला घेतो. गुरुला शिष्याचे भूत, भविष्य, वर्तमान सारेकाही माहीत असते त्यामुळे निओकडुन जगाचा सर्वनाश टाळ्ला जाणार आहे याची माहिती मॉर्फियसला अगोदरच असते. प्रकृती आणि पुरुष या सांख्य तत्वज्ञानातील निराकार पुरुष म्हणजे निओ आणि साकार प्रकृती किंवा माया म्हणजे मेट्रीक्स याची जाणीव मॉर्फियस निओला करुन देतो. तो क्षण समाधीचा, ज्ञानाचा, स्वतःला ओळखण्याचा, मोक्षाचा, मुक्तीचा असा असतो. मी कोण या आदिम प्रश्नाचा उलगडा निओला होतो आणि तो आपल्या सामर्थ्याद्वारे जगाचा नाश टाळतो.
हा दृष्टीकोण पाहिल्यावर जेव्हा पारंपरिक भारतीय अध्यात्माशी आपण याचा सांधा जोडु लागतो तेव्हा अनेक अडचणी उद्भवतात. जर आपल्याला भारतीय अध्यात्माचा याचित्रपटाशी संबंध दर्शवायचा असेल तर चित्रपटातील दोन प्रमुख पात्रं वगळावी लागतील याची जाणीव फार थोड्यांना असेल. आपल्याकडे मोक्ष मिळवणार्यांचे सारे विकार, वासना शमलेल्या असतात. त्यानंतर त्यावाटेवर साधना सुरु होते. त्यामुळे सर्वप्रथम ट्रीनिटीला वगळावे लागेल. आपल्या अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य. त्यातही मुक्त झालेल्या पुरुषाला स्त्रीची मदत घ्यावी लागणे म्हणजे फारच झाले. आणि त्यानंतर मोक्ष मिळालेल्या पुरुषाने स्त्रीसंग किंवा प्रणय करणे ही सर्वथैव अशक्य गोष्ट. त्यामुळे मोक्षाच्या वाटेवर असलेल्या निओला भारतीय अध्यात्माप्रमाणे स्त्रीसंग वर्ज असल्याने ट्रीनिटीचे अस्तीत्व येथे शक्य नाही.
दुसरे वगळावे लागेल असे पात्र म्हणजे खुद्द मॉर्फियस. हे वाचुन काहींना धक्का बसेल पण नाईलाज आहे. शिष्यापेक्षा दुर्बळ गुरुची कल्पना भारतीय अध्यात्मात नाही. आपल्या अध्यात्माची कुठलीही शाखा अशी मांडणी मंजुर करणार नाही. आपल्याकडे गुरु हा नेहेमी वरचढच असतो. कदाचित वर्ण व्यवस्थेमुळे तो स्वतः युद्ध करत नसेल पण शिष्याला सारी विद्या शिकवतो. शिष्य विद्येचा गर्व वाहु लागल्यास त्याचा मद झटक्यात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्याकडल्या गुरुंत असते. चित्रपटात मॉर्फियस दुबळा दाखवला आहे. मग तो निओला ज्ञान कसे काय देणार? एका आंधळ्याने दुसर्या आंधळ्याला वाट दाखवण्याचाच हा प्रकार. त्यामुळे आहे त्या स्वरुपात मॉर्फियस आपल्या परंपरेत मंजुर होणार नाही. विरोधाची स्थळे आणखि अनेक आहेत पण तुर्तास इतकेच पुरे.
साम्य स्थळ शोधायचं म्हटलं तर मुळात जे तंत्र मेट्रीक्स चित्रपटात दाखवलं आहे ज्यात मनाच्या सामर्थ्याने सार्या गोष्टी घडताना दाखलेल्या आहेत, ते माझ्या समजुतीप्रमाणे योगवशिष्ठाच्या जवळ जाणारे आहे. ही सर्व माणसं मनाच्या सामर्थ्याने पृथ्वीवर जातात. तेथे अचाट कामे करतात. आकाशात उडतात, एका इमारतीवरुन दुसर्या इमारतीवर उडी मारतात. फार काय हवं ते शस्त्र काही सेकंदात मिळवतात. त्याचवेळी त्यांचे देह मात्र दुरवर कुठेतरी यानात विशिष्ट यंत्राला जोडुन पहुडलेले असतात. शरीर आणि मनाचा संबंध अतीव निकटतेचा आहे. पृथ्वीवरील त्यांची प्रतिमा ठार मारली गेली तर ते प्रत्यक्षातदेखिल मारले जातात कारण मनाशिवाय शरीराचं अस्तित्व नाही. याउलट यानातल्या यंत्राशी संबंध तोडल्यासही ते मॄत्यु पावतात कारण शरिराशिवाय मनाचेही अस्तित्व नाही. गुहेत ध्यानाला बसलेला योग्याने मनाच्या सामर्थ्याने वस्तु निर्माण करावी तशातलाच हा प्रकार आहे. याबाबत योगवशिष्ठ काय म्हणते ते पाहु. त्यासाठी योगवशिष्ठातली इंदु ब्राह्मणाची गोष्ट सांगायला हवी.
मुनी वशिष्ठ रामाला उपदेश करताना म्हणतात.” मन हेच जगत आहे. हे जे काही समोर दिसत आहे त्याला खरोखर काहीच अस्तित्व नाही. मनानेच या वस्तु निर्माण केल्या आहेत. तुला आता मी जी गोष्ट सांगेन त्यामुळे तुला मनाच्या अचाट सामर्थ्याचा अंदाज येईल. तुला लक्षात येईल कि मनाने एखादी गोष्ट ठामपणे ठरवली कि ती प्रत्यक्षात येते. प्राचिन काळी ब्रह्मदेवाला सकाळी झोपेतुन उठल्यावर पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. परंतु त्याने अगोदरच निर्मिती झालेली पाहिली आणि नवलाने त्यानिर्माण झालेल्या जगतातील एका सुर्याला यानिर्मितीचे मूळ विचारले. तेव्हा तो सूर्य म्हणाला….जंबुद्विपात राहणार्या इंदु नावाच्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने पुत्रप्राप्तिसाठी शिवाची उपासना केली. त्यांच्या कठोर तपस्येने संतुष्ट होऊन शिवाने त्यंना दहा श्रेष्ठ पुत्र होतील असा वर दिला. हे पुत्र पुढे महाज्ञानी झाले. आईवडील निवर्तल्यावर आपल्या आयुष्याचे ध्येय्य काय याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. संपूर्ण जगाचा राजा जरी झालो तरी ते प्रत्यक्ष भगवंतापेक्षा श्रेष्ठ नसणारच तेव्हा ज्याने विश्व निर्माण केले तो प्रत्यक्ष ब्रम्हदेवच बनणे इष्ट म्हणजे म्हणजे सर्व प्रकारच्या अमर्याद निर्मितीचा आनंद घेता येइल. हे ध्येय्य निश्चीत करुन हे दहा पुत्र पद्मासनात ध्यानाला बसले.आम्ही स्वतःच ब्रह्मदेव आहोत आणि हे विश्व ही आमचीच निर्मिती आहे असा विचार त्यांच्या मनात अखंड, अविरत होता.अशा तर्हेने अनेक कल्पे गेली आणि हे दहा जगत प्रत्यक्ष त्यांच्या मनातुन निर्माण झाले.या दहा जगतांचे दहा सूर्य आहेत आणि मी त्यातला एक सूर्य आहे.” जाणकारांना, ज्यांनी मेट्रीक्स बारकाईने पाहिला आहे त्यांना ही कथा वाचुन चित्रपटाशी तिचे साम्य काय हे मुद्दाम फोड करुन सांगण्याची आवश्यकता नाही. मनाद्वारे जगताची निर्मिती ही भारतीय अध्यात्मातील योग दर्शनात वारंवार येणारी संकल्पना आहे. मेट्रीक्स पाहताना मला जाणवलेले हे सर्वात महत्वाचे साम्य आहे.
अतुल ठाकुर
प्रतिक्रिया
26 Jan 2014 - 9:12 pm | आयुर्हित
अतुलजी, लेख तर आवडलाच, पण त्यापेक्षाही तुमचे मार्गदर्शन फारच अतुलनीय आहे.
खूप दिवसांपासून हि गोष्ट मी शोधात होतो, आज प्रत्यक्ष प्रमाणच दिले आपण.
उत्कृष्ट अविष्कार ! युरेका!!!!
लक्ष लक्ष धन्यवाद.
26 Jan 2014 - 10:09 pm | आतिवास
या दोन गोष्टींमध्ये साम्य का शोधावं वाटलं तुम्हाला - याचा विचार करतेय. :-)
'योग' दर्शन हे नऊ भारतीय दर्शनांपैकी फक्त एक आहे.
अध्यात्मात स्त्रियांचे स्थान - हा फारच वेगळा विषय आहे.
मुळात भारतीय विचार विकसित होत राहिल्याने त्यात अनेक परस्परविसंवादी विचार सापडतात हे ध्यानात घेतले तर वादाचे पुष्कळ मुद्दे नाहीसे होतात!
आणि काळाच्या ओघात आपण कुणीच एका (फक्त एकाच!) विचाराचे 'प्रॉडक्ट' रहात नाही हेही एक वास्तव आहे.
26 Jan 2014 - 11:42 pm | प्रसाद गोडबोले
नऊ कोणती ?
आम्हाला ६ च माहीत आहेत...
27 Jan 2014 - 1:02 am | बॅटमॅन
जैन, बौद्ध आणि नास्तिक ही बिगरवैदिक दर्शने घेतली की नौ होतात.
27 Jan 2014 - 6:20 am | Atul Thakur
या दोन गोष्टींमध्ये साम्य का शोधावं वाटलं तुम्हाला - याचा विचार करतेय.
अनेकांनी हे साम्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मीही केला. गंमत म्हणुन :)
26 Jan 2014 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा
ठीक आहे. :)
26 Jan 2014 - 11:31 pm | कवितानागेश
काही पटतय. काही नाही.
मला तरी तिन्ही भाग बघताना काही विरोधी विचार आहेत, किंवा भारतीय तत्वाज्ञानाशिवाय अजून काही आहे असं बिलकुल वाटलं नाही. we all live in matrix. matrix is an illusion. still our existence depend on our image at matrix. and we have to work though matrix. the one who is awake, will try to come out of matrix.
मेट्रिक्स च्या जागी 'माया' घातले, की तिच सगळी थिअरी सापडेल.
असो.
तुम्ही म्हणताय तसे मॉर्फियसला 'गुरु' म्हणून डीफाईन केलय असं मला वाटलं नाही.
'गुरु' या जागी फक्त ओरॅकल बसू शकेल. सगळेच तिच्याकडे सल्ल्यासाठी जातात. ती फक्त त्या त्या व्यक्तीला बरोबर कळेल असे संकेत वापरून टिप्स देते.
या तिनही चित्रपटात वेळोवेळी 'मार्शल आर्टस' चा वापही विषेश कारणानी केला आहे. ती फक्त 'मारामारी' नाही. तर मार्शल आर्त्स ही शरीरावर आणि मनावरही पूर्ण ताबा मिळ्वून देणारी कला आहे. (याचा साईड इफेक्ट असा आहे, की पायरेटेड सीडीवाल्यांकडे हे ३मूव्ही 'देमार चित्रपटांच्या' गठ्ठ्यात सापडतात) ही कन्सेप्ट योगशास्त्राच्या अंतर्भूत वाटते.
27 Jan 2014 - 2:48 pm | प्यारे१
परवाच तिन्ही बघितले.
ते फिलॉसॉफी वगैरे कळत नाय.
पहिला आवडला.
नंतरचे बोअर झाले. हजारो टन गोळ्या नि बमबारी असलेली हाणामारी आहे.
26 Jan 2014 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले
जाऊनद्याहो कशाला सीरीयसली घेताय ...
तोवर हे पहा
http://www.youtube.com/watch?v=4eY4qU80lPM
=))
27 Jan 2014 - 12:26 am | कवितानागेश
कैच्याकै! =))
27 Jan 2014 - 12:47 pm | बाळ सप्रे
बाय द वे .. ईट्स "मॅट्रिक्स" .. matrix
"मेट्रिक्स" म्हणजे metrics .. means measurement
बाकी हा मॅट्रिक्स फारच डोक्यावरुन गेला होता.. अध्यात्म परवडलं ... :-)
27 Jan 2014 - 2:35 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत. आमच्या हापिसात देखील हा घोळ बघायला मिळतो.
27 Jan 2014 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
matrix आणि metric या दोन शब्दांचे उच्चार अनुक्रमे "मेट्रिक्स" आणि मेट्रिक" असे आहेत. खालील ऑक्स्फर्ड अडव्हान्स्ड लर्नर डिक्शनरीच्या दुव्यांवर ते ऐकता येतीलः
matrix चा उच्चार
आणि
metric चा उच्चार
27 Jan 2014 - 1:18 pm | Atul Thakur
बाय द वे .. ईट्स "मॅट्रिक्स" .. matrix
ठीकाय हो शेवटी सगळीच माया :)
27 Jan 2014 - 1:31 pm | मारकुटे
शेंडा न बुडूख लेख लिहिण्याचा हातखंडा चांगला आहे. त्यात अध्यात्म वगैरे मुद्दे मिसळलेले असेल तर विचारायलाच नको.
27 Jan 2014 - 6:36 pm | Atul Thakur
आशिर्वादाबद्दल आभार.
27 Jan 2014 - 2:57 pm | वेल्लाभट
पटणं न पटणं राहुदे... पण लई इंट्रेस्टिंग आहे....
27 Jan 2014 - 3:47 pm | बॅटमॅन
बाकी सोडा पण त्याच्या श्रेयनामावलीत "तमसो मा ज्योतिर्गमय" वाजत राहते.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इ.इ. शी असलेले साम्य तर एकदम नजरेत भरण्यासारखे आहे.
27 Jan 2014 - 8:06 pm | सोत्रि
वाहव्वा, कोणीतरी ह्या आवडीच्या विषयला हात घातलेला बघून अतिशय परमानंद झालेला आहे. अतुलभौ धन्यवाद!
फक्त माझा 'भारतीय' अध्यात्म ह्याला विरोध आहे. फक्त अध्यात्म म्हटले तर बर्याच प्रथांचा समजुतींचा संगम झालेला आढळेल आणि तुम्ही तो जांगडगुत्ता समजून घ्यायचा प्रयत्न केलात हे विषेश.
>> निओ हा मोक्षेच्छु तरुण आहे
मोक्षेच्छु नसावा, पण त्याला कोssह्म हा प्रश्न नक्कीच पडला आहे. प्रकृती आणि पुरुष या सांख्य तत्वज्ञानातील निराकार पुरुष म्हणजे निओ आणि साकार प्रकृती किंवा माया म्हणजे मेट्रीक्स याची जाणीव मॉर्फियस निओला करुन देतो. तो क्षण तुम्ही म्हणता तसे मोक्षाचा नसून कोssह्म ह्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याचा. आता ते उत्तर मिळाल्याने आपले अवतार कार्य काय आहे हे त्याला स्पष्ट होते.
आता त्याला ते स्पष्ट झाल्यावर तो त्याचे कर्म करण्यास तयार होतो. इथून पुढे सगळा प्रवास 'सत' आणि 'असत' ह्यांच्या लढा आहे. त्या मायावी विश्वाची उत्पत्ती ओरॅकलला माहिती असल्याने 'सत' आणि 'असत' ह्या लढ्यात मॅट्रिक्समध्ये अडकवलेल्या मानवजातीच्या मुक्तीसाठी ती मदत करते. पूर्वीच्या जशी आकाशवाणी होऊन पुढे काय होणार ह्याचे दाखले दिले जायचे त्याचप्रमाणे ती वेळोवेळी 'आकाशवाणी' सदृश्य भविष्य वर्तवित असते. त्यामुळे 'ओरॅकल' हे नाव सार्थ ठरते. संपूर्ण मॅट्रिक्समध्ये तिचे अस्तित्व अपरिहार्य आहे आणि तुमच्या लेखात तिचा उल्लेख न आल्यामुळे लेख अपूर्ण ठरतो.
तुम्हाला मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य असे म्हणातचे आहे. तो मुद्दाही फोल. स्त्री-पुरुष हे एकमेकांना पूरक मानले गेले आहेत. यीन-यांग हे तत्व ह्याला अधोरेखित करते*. पेगन प्रथांमध्ये 'हीरोस गॅमस' हा प्रकार संभोगातून समाधीकडे ह्या अर्थाने बघितला जातो. बर्याच पुरातन पंथांमध्ये स्त्रीला अतिशय मानाचे स्थान असून स्त्री म्हणजे नरकाचे द्वार हा विचार कॅथॉलिक चर्चेने रुजविला*. आपल्याकडेही उपासना केल्या जाणार्या बर्याच देवी असणे हे मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य ह्याच्या विरुध्द असावे असे मला वाटते.
पुढचा मुद्दा, आपल्याकडे गुरु हा नेहेमी वरचढच असतो हे ही तितकेसे खरे नाही. चित्रपटात मॉर्फियस दुबळा दाखवला आहे असे वाटणे त्याच्यावर अन्याय आहे. त्याला त्याचे अवतार कार्य ज्ञात आहे आणि उद्धार करणारा 'द वन' निओ आहे हे ही त्याला माहिती आहे. त्यामुळे तो फक्त वाटाड्या आहे. जसे गुरुने असायला हवे. भले-बुरे, सत-असत ह्यातला फरक गुरुने दाखविणे आणि शिष्याला योग्य मार्गावर वाटचाल करण्यास लावणे हे गुरुचे काम आहे. मोक्षप्राप्ती करून देणे ही गुरुची जबाबदारी नाही. त्यासाठी जे काही करावे लागते ते शिष्याला समजावणे, त्याच्या मनातले किंतू दूर करणे हे गुरुचे कर्तव्य आणि ते मॉर्फियस अतिशय व्यवस्थित पार पाडतो.
"मन हेच जगत आहे. हे जे काही समोर दिसत आहे त्याला खरोखर काहीच अस्तित्व नाही. मनानेच या वस्तु निर्माण केल्या आहेत!" हा चित्रपटामागच्या विचारधारेचा परमोच्च बिंदू. 'To Bend the spoon, first you need to know that there is no spoon' हे जो मुलगा निओला सांगतो तो एका भिक्षूच्या अवतरात दाखवला आहे.
त्यामुळे माझा 'भारतीय' अध्यात्म असे म्हणण्याला विरोध आहे. बाकी ह्या विषयला हात घातलेले भयंकर आवडले गेले आहे. लेख आवडला धन्यवाद!
- (मॅट्रीक्स-प्रेमी) सोकाजी
-----------------------------------------------------------------
* दा विंची कोड - डॅन ब्राऊन
28 Jan 2014 - 12:10 am | कवितानागेश
इथे स्त्री/ पुरुष वगरै व्याख्यांचा संबंध नाही. कारण 'ट्रिनिटी' स्त्री नाही! ती कन्सेप्ट आहे. (या ट्रिनिटीचा 'होली ट्रिनिटी'शी संबंध आहे असं मात्र वाटत नाही.)
निओदेखिल कन्सेप्ट आहे- एक जीव, अचानक 'जागा' झालेला जीव. इतकंच.
त्रिगुणांच्या सहाय्यानी मॅट्रिक्स समजून घेणारा.
पण मूळ 'प्रोग्राम' पर्यंत जाताना त्याला त्या त्रिगुणांना मागे टाकून पुढे जावं लागतं ....
28 Jan 2014 - 9:33 am | सोत्रि
तसे कंसेप्ट म्हणून बघितले तर चित्रपटावर चर्चाच करायला नको. पण तसे नाहीयेय, मँट्रिक्स त्याच्यापलीकडे आहे.
तुम्ही जी समरी केली आहे त्याच्या कैकपटीने मँट्रिक्सचा आवाका मोठा आहे.
- (मँट्रिक्सप्रेमी) सोकाजी
28 Jan 2014 - 10:47 am | अर्धवटराव
म्याट्रीक्ष्यवर येवढं खंग्री, धासु, जोरकस, भारी प्रवचन दिलत... आता खरं खरं सांगा... तुम्हाला म्याट्रीक्ष्यात नेमकं काय आवडल? ;)
29 Jan 2014 - 12:59 am | कवितानागेश
तुम्ही जी समरी केली आहे त्याच्या कैकपटीने मँट्रिक्सचा आवाका मोठा आहे.>
ती समरी नाहीये! =))
मॅट्रिक्सवर लिहायचे झाले तर सिनेमा बनवायला लागला तितकाच वेळ आणि मेहनत लागेल.
एक एक फ्रेम पुन्हा पुन्हा पहाण्यासारखी आणि समजून घेण्यासारखी आहे.
मी फक्त 'मूळ व्याख्या' आणि त्याची भारतीय(?) तत्वज्ञानाशी संगती सांगत होते.
28 Jan 2014 - 3:21 pm | म्हैस
नाही पटला लेख. हे तर एकदम उलटं, चुकीचं आणि पुर्वग्रिह दुषित मनाने लिहिलंय . पुढचे परिच्छेद हि तसेच
28 Jan 2014 - 5:02 pm | Atul Thakur
मारकुटे झाले, म्हैस झाली आता लांडगा कुठे आहे?
28 Jan 2014 - 5:55 pm | कंजूस
प्रत्येकाने आपले विचार मांडले आहेत तेच या लेखाचा उद्देश आहे .
आपल्याकडे मुख्य अशी ६५ तत्वज्ञान प्रणाली होत्या .मी कोण ? जग असे का सांगण्याचा यत्न केला तरी उत्तर कोणालाच सापडले नाही .
विज्ञानात तरंग आणि कण आणि शक्याशक्यता यांचे सिध्दांत मांडून झाले .
असो .
तुमचे सर्वांचे बरोबर .
1 Feb 2014 - 2:09 pm | निलेश भावसार
आपल्याकडे मोक्ष मिळवणार्यांचे सारे विकार, वासना शमलेल्या असतात. त्यानंतर त्यावाटेवर साधना सुरु होते. त्यामुळे सर्वप्रथम ट्रीनिटीला वगळावे लागेल"
मला वाटतं विकार वासना जिथं शमतात तोच मोक्ष नाही का?तसं नसेल तर साधनेला अर्थच रहात नाही
म्हणून ट्रिनिटी ला काही वगळु बिगळु नका बुवा!
4 Feb 2014 - 4:02 pm | आत्मशून्य
कोणालाच आवरत नाहि. पण आपण याच्या नेमका विरोधि यत्न केल्या बद्दल आपला मनापासुन आदर वाटतो.
माफ करा, पण याला कोणताहि आधार नाहि. म्हणून हा मुद्दा विश्लेशणाला प्रथम घेतला आहे. अजुन उ़जेड टाकाल काय ?
:) हि फार मोठि गंमत आहे. २-३ विस्त्रुत लेखच हवेत या ओळि साठी. म्हणून जमल्यास हा उल्लेख टाळुया अन्यथा धाग्याचे काश्मिर नक्कि.
4 Feb 2014 - 8:47 pm | किसन शिंदे
आँ!!! :O
चक्क आशू???? :O अतूलच्या धाग्याची करामत म्हणायची कि आणखी दुसरं काही. ;)
4 Feb 2014 - 9:14 pm | आत्मशून्य
५०% ५०%
5 Feb 2014 - 12:41 am | कवितानागेश
Welcome to the Matrix! :)

5 Feb 2014 - 2:07 am | आत्मशून्य
5 Feb 2014 - 7:16 pm | Atul Thakur
धाग्याचे मातेरे झाले असे वाटले होते. टिकेचं काहीच वाटत नाही. पण चर्चा भलतीकडे गेली की कंटाळा येतो. खैर माझी भुमिका स्पष्ट करतो.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी मला वाटलं ते लिहिलं. त्याबद्दल लिहेनच पण बाकीच्यांना या बाबत काय वाटतं? ते या चित्रपटाची भारतीय तत्वज्ञानाशी सांगड कशी घालतात? की हा सर्व वेडेपणा आहे म्हणुन उडवुन लावतात हे जाणण्याची इच्छा होती.
आत्मशुन्यजी:
आपल्या अध्यात्मात स्त्रीप्रवेश अशक्य
मी येथे शाक्त पंथ किंवा तांत्रिक मार्ग टाळला आहे. जेथे स्त्रीशिवाय पान देखिल हलत नाही. किंवा मधुराभक्ती देखिल. माझा रोख प्रामुख्याने अध्यात्म आणी त्यापायी केल्या गेलेल्या अपार स्त्रीनिंदेवर आहे. स्त्रीला प्रामुख्याने मोक्षाच्या मार्गावरची धोंड मानले गेले आहे. आता यावर गार्गी, मैत्रेयी आणि पुर्वीचे गृहस्थ ऋषी यांची कुणी उदाहरणे देत असेल तर मी माघारच घेईन. मला काय म्हणायचे आहे आपल्या लक्षात आले असेलच.
5 Feb 2014 - 11:57 pm | आत्मशून्य
आपला लेखातिल रोख बहुतांश पतंजलि योग सुत्रावर आहे. जेथे ब्रम्हचर्य* आवश्यक गणले गेले आहे. ब्रम्हचर्य* म्हणजे स्त्रिगमन न्हवे तर शारिरिक व मानसिक पातळिवर मैथुन भावना लोप करणे.
आता अपार स्त्रिनिंदा हि नेहमीच फक्त पुरुशांनी व एकतर्फि केलेलि आहे, तिला अध्यात्मशास्त्रगर्भ मानणे योग्य नाहि. अन्यथा स्त्रि धोण्ड आहे पण या वाटेवर चालणार्या स्त्रियांसाठि पुरुष मात्र धोण्ड नाहि असा अतिशय अराजक नियम यातुन आकार घेतो, जो वरवर स्त्रियांना (पुरुषगमनाचा) विषेश अधिकार देतो, पण दुर्दैवाने यातुन पुन्हा स्त्रि ही १००% भोगवस्तुच ठरेल अशा तिच्या विटंबनेलाही कारणिभुत होतो, जो जास्त विपत्तिकारक आहे. पण अर्थात हाच एकमेव पायाभुत आधार आपण गृहित धरला असेल तर मेट्रिक्सला अध्यात्मासोबत तोडायचे आपले आक्षेप मान्य होतात पण ते समुळ ठरत नाहित.
मग ट्रिनीटि कोण आहे (अर्धांगीनी)? हे आता आपल्या लक्षात आले असेलच. मुळात निओ हा सत्याचा शोध घेतोय इथ पर्यंत आपला मुद्दा ग्राह्य आहे, पण जेंव्हा त्याची लढाइ हि संपुर्ण मानवजातिची लढाइ बनते तेंव्हाच मला वाटते विश्वरुपदर्शनासोबत गीताध्याय संपतो आणी कुरुक्षेत्रावरिल कर्मयोगाची सुरुवात होते.
* मिपा डाटाबेसमधे सदस्यकाल अमुक तमुक वर्षे अशी नोंद आहे हे कारण आत्मशुन्यच्या मागे जी
लावयला सयुक्तिक नाही याची नोंद घ्यावी.
6 Feb 2014 - 8:25 pm | Atul Thakur
सहमत :) धन्यवाद :)