मित्रांनो...
प्रजाकसत्ताक दिनावरील एक कविता प्रस्तुत करतो..!..
या वर्षीचा प्रजासत्ताक दिन जसा जवळ आला,
डोक्यात आमच्या एक जबरदस्त प्लान चमकला !
चला, या वर्षी सगळा आळस झटकुन टाकुयात,
आपल्याच अंगणात डौलाने मस्त तिरंगा फडकावुयात !
भरपूर उत्साहात २ तास सगळे मॉल पालथे घातले,
शेवटी कोप-यावर छोटेसे १ दुकान नजरेस पडले,
'येथे तिरंगा विकला जातो' पाटीवर लिहिले होते !
दिसते तसे नसते हे आम्हाला नंतर उमगले होते !!
दुकानदाराला म्हटले आम्ही अभिमानाने 'तिरंगा पाहिजे एक'
त्याने न्याहाळुन विचारले 'ओरिजिनल की डुप्लीकेट'
चवताळुन ओरडलो, 'आजादी' नंतर डुप्लीकेट कशाला फडकावणार?
बसा, बसा, त्याने म्हटले, तुमच्या सारखे पुन्हा कधी केव्हा येणार?
ओरिजिनल मधे कुठला दाखवू नवा की जुना घेणार?
चक्रावून आम्ही विचारले त्यात असा काय फरक असणार..?
हसून त्याने मग माळ्यावरचे मोठे बण्डल उघडले !
जुना तिरंगा कुणी किती वेळा फडकावला,
याचे गणित आमच्यासमोर मांडले !!
नविन कालच शिवून आलेत त्याने दिमाखात सांगितले !
जुन्यामधे खुप 'व्हरायटी' आहे पुढे ज्ञान पाजळले !!
मग आमच्या समोर त्याने झेंड्याचा मोट्ठा बण्डल उघडला !
बोलला, हा अमिताभने फडकावलेला, मागच्या वर्षी 'आझाद पार्क' वर !!
हा 'शाहरुख खान' ने फडकावलेला 'होटल ताज' वर !
हा फडकावलेला 'आमिर' ने 'मंगल पाण्डे' च्या सेट वर !!
हा झेंडा स्पेशली पॅरिसच्या फैशन डिजायनर ने शिवलाय !
हात जरा संभाळुन लावा मिस्टर तुमचा हात मळलाय !!
एक मागोमाग एक त्याने खुप झेंडे दाखवले !
राज कपूर ते बिपाशा बसू सगळ्यांचे पाढे वाचले !!
आम्ही म्हटले भारतीय सेनेच्या ख-या शहीद ने !
फडकविलेला खराखुरा तिरंगा दाखवणार?
तो बोलला ठेवला होता ना, पण यापुढे नाही ठेवणार !!
तो झेंडा "कॅप्ट्न मनोज पांडेने" "कारगिल" वर फडकावला होता !
अभिमानाने तेव्हा आमचा ऊर केवढ़ा दाटून आला होता !!
मी ख़ास 'पाच हजार' रुपये मोजून तो मागवला होता !
मोट्ठ्या दिमाखात सगळ्यांसमोर या शोकेशमधे झळकावला होता !!
तीन वर्षे ठेवुनहीं त्याला एकही कस्टमर दिसला नव्हता !
अहो खुप कष्टाने शेवटी अडीच हजारात खपवला होता !!
आम्ही म्हटले ठीकाय, नविन मधला दाखवा !
तो म्हटला कोणत्या ब्रँडचा हवाय ते आधी ठरवा !!
'रीतू बेरीचा' दाखवू की 'मुनमुन सेन' चा ?
पॅरिसच्या डिजायनरचा की 'मनीष मल्होत्रा' चा ?
आम्ही म्हटलो भाऊ महिन्याची १३ तारीख आहे आणि महागाई मस्त आहे !
असाच झेंडा दाखवा जो आमच्या खिशाला स्वस्त आहे !!
एकच शेवटचा पीस उरलाय लगेच तुमच्या नावावर करा !
त्या आधी काउंटरवर एक हजार रुपये जमा करा !!
आम्ही म्हटले एक हजार रुपये जरा जास्त नाही वाटत ?
तो ओरडला तुम्हाला आर्ध्या किमतीत देतोय मिस्टर जास्त पैसे नाही लाटत !
मनात विचार आला आजादी पूर्वी झेंडा जर इतका महाग असता !
कुणी कुणी जीवाची बाज़ी लावून तिरंगा फडकावला असता ?
हजार रुपये मोजण्यासाठी आम्ही स्वताला तैयार करत होतो !
डोळ्यांसमोर मात्र मुलांची फी, बायकोचा रागीट चेहरा पहात होतो !!
समस्या मोठी जटिल होती आणि सुटायला जरा कुटिल होती !
इतक्यात दुकानदाराचा चेहरा तोंडभर हास्याने खुलला !!
जेव्हा आमचाच झेंडा एका विदेशी कपलच्या नजरेस पडला !
दूकानदाराचा रंग इतक्या पटापट बदलला होता !!
जणू कुबेराचा खजिनाच त्याच्या नजरेस पडला होता !
आमच्या खालचा स्टूल खसकन ओढून त्याने तिच्या खाली सरकवला !!
मधाळ इंग्रजी त्यांना तुच्छ कटाक्ष आमच्याकड़े भिरकावला !
इतिहासाने पुन्हा एकदा स्वताला सिद्ध केले होते !!
नियतीने आम्हाला पाहुन विकट हास्य केले होते !
आमच्या पसंतीचा तिरंगा विदेशी मेमला आवडला होता !!
दूकान दारानेही तेवढ्याच खुबीने त्याचा भाव बदलला होता !
इंग्रजांच्या हाती आता पैशांचा जोर होता !!
पाहता पाहता तिरंगा आमचा इंग्रजांना विकला जात होता !
आमचा डोळ्यांदेखत आमचा तिरंगा विकला गेला होता !!
दुकानदाराचा चेहरा शंभर डॉलर्स पाहुन कमालीचा खुलला होता !
जाता जाता तिरंगा आम्हाला पुन्हा रडवुन गेला !!
मनावर दुखद गोष्ट कोरुन अंतर्मुख करून गेला !
डॉलर च्या तुलनेत रुपयाचा जगात आज काय भाव आहे !!
कारण सगळीकडे डॉलर वाल्यांनाच मान आणि भाव आहे !
म्हणायला आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला आहे !!
पण आर्थिक दृष्टया आजही रूपया डॉलरचा गुलाम आहे !
एमबीए घ्या, डॉक्टर घ्या, किंवा घ्या सॉफ्टवेर इन्जिनेयर,
सगळ्यांचेच ठरलेले ध्येय आहे ऑनसाईटची मोट्ठी ऑफर !!
आख्या जगात जाउन हेच मग डॉलर ला अजून स्ट्रोंग बनवतात !
कधीतरी कुठेतरी एखाद पारितोषिक मिळवतात !!
भारताला मात्र त्यांचा कधीच काहीच फायदा होत् नसतो !
तरीसुद्धा भारतीय वंशाचे म्हणून आम्ही त्यांचे गोडवे गात असतो !!
-------------
~जमीर इब्राहिम "आझाद"..
beyond.thinking@gmail.com
प्रतिक्रिया
14 Aug 2013 - 6:11 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'
कविता दोनदा कॉपी पेस्ट झाल्यामुळे क्षमस्व..!
~जमीर..
14 Aug 2013 - 6:39 pm | भावना कल्लोळ
मनाला भिडणारी कविता … आताचे कटु सत्य.
14 Aug 2013 - 6:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान कविता.
अवांतरः नशीब दुकानदाराने तुम्हाला "मेड इन चायना" तिरंगा दाखविला नाही !
लेखाच्या वर असलेले "संपादन" हे बटण वापरून तुम्ही अतिरिक्त मजकूर काढून टाकू शकता.
14 Aug 2013 - 7:05 pm | प्रभाकर पेठकर
चांगली आहे कविता.
एमबीए, डॉक्टर, सॉफ्ट्वेअर इंजिनिअर्सचा मुद्दा टाळूनही चांगली झाली असती. उगीचच, भारताच्या दुर्बल परिस्थितीस, राजकारण्यांना सोडून एमबीए, डॉक्टर, सॉफ्ट्वेअर इंजिनिअर्सना जबाबदार ठरवून कवितेत एक प्रकारचा अनाठायी असमतोल आला आहे असे वाटते.
15 Aug 2013 - 7:49 am | धन्या
कविता चांगली आहे.
परंतू एमबीए, डॉक्टर, सॉफ्ट्वेअर इंजिनिअर्सचा उल्लेख खटकला.
14 Aug 2013 - 7:09 pm | अनन्न्या
चांगली आहे कविता!
14 Aug 2013 - 7:13 pm | मृत्युन्जय
आख्या जगात जाउन हेच मग डॉलर ला अजून स्ट्रोंग बनवतात !
कधीतरी कुठेतरी एखाद पारितोषिक मिळवतात !!
भारताला मात्र त्यांचा कधीच काहीच फायदा होत् नसतो !
तरीसुद्धा भारतीय वंशाचे म्हणून आम्ही त्यांचे गोडवे गात असतो !!मित्राण्नी
लय मज्जा येनार हाय. पॉपकॉर्न घेउनच बसलोय.
15 Aug 2013 - 12:19 am | अर्धवटराव
कवितेतलं सत्य थोडं विदारक वगैरे असलं तरी आपल्याला सवय आहे त्याची. तीरंगा अगदी गरुड झेप, फीनीक्स वगैरे पद्धतीचे उड्डाण घेणार नाहि कधी... पण आपली झुकझुक गाडी कधी पॅसेंजर तर कधी एक्स्प्रेस बनुन सर्व तर्हेच्या जनसामान्यांचा भार वाहुन नेत राहिल... अगदी अथक.
अवांतर - ते स्वातंत्र्यदीन आणि प्रजासत्ताकाचे थोडं क्रॉसकनेक्शन झालय का?
अर्धवटराव
15 Aug 2013 - 7:43 am | स्पंदना
क्रॉस कनेकशन?
अहो २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन म्हणणारे दीनवाणे पाहिलेत मी.
असो कविता छान आहे. म्हणजे छान्च हो. इथे पलिकडे बसुन जरा कडवट वाटली पण छानच.
15 Aug 2013 - 11:38 am | जमीर इब्राहीम 'आझाद'
२६ जानेवारीला(प्रजासत्ताकदिनाला) जर स्वातंत्र्यदिन म्हणणारे लोक आपल्या दे्शात असतील तर आपणच दुर्दैवी.. :-(
15 Aug 2013 - 10:14 am | जेपी
*****
15 Aug 2013 - 10:15 am | मदनबाण
कविता आवडली...
देशाला सध्या वेगवेगळ्या क्रायसिस समोरे जात आहे...मग तो पोलिटिकल्,फायनॅनशियल वा प्रॉक्सीवॉर असो...
असाच एक क्रायसिस आहे डॉक्टरांचा ! देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा आवाका आणि वेग पाहता आपल्याला डॉक्टर कमी पडु लागले आहेत.
सेव्ह द डॉक्टर...
15 Aug 2013 - 10:28 am | प्रभाकर पेठकर
विदारक परिस्थिती.
ह्यावर काय आणि कशी उपाययोजना असावी?
15 Aug 2013 - 11:50 am | जमीर इब्राहीम 'आझाद'
बरोबर आहे तुमचे म्हणणे..
परंतु आपले जे नविन डॉक्टर आहेत ते तरी कुठे तय्यार आहेत ग्रामीण भागात जायला...???
सरकार ला हस्तक्षेप करुन डॉक्टरांना दुर्गम भागात जायला (Compulsory)जर अनिवार्य करावे लागत असेल तर काय फायदा... :-(
15 Aug 2013 - 12:54 pm | प्रभाकर पेठकर
का? सरकारने मिळकत कर नाही का अनिवार्य केलेला?
16 Aug 2013 - 2:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सरकार ला हस्तक्षेप करुन डॉक्टरांना दुर्गम भागात जायला (Compulsory)जर अनिवार्य करावे लागत असेल तर काय फायदा..."अनिवार्य करणे" म्हणजे एका प्रकारची जबरदस्तीच आहे आणि सुजाण शासनाने ती फक्त आणि फक्त शेवटचा उपाय म्हणून करायची गोष्ट आहे. आणि अशी जबरदस्ती एकप्रकारे शासनाच्या अपयशाचे लक्षण आहे.
डॉक्टरच नव्हे तर सर्व प्रकारचे आणि सर्व स्तरातले व्यावसाईक जेथे त्यांची गरज आहे तेथे स्वतःच्या मर्जीने जातील अशी परिस्थिती निर्माण करणे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे... आणि यालाच विकास असे म्हणतात.
नागरिकांनीच स्वतःहून सर्व स्वार्थत्याग करण्याचा आणि सुजाणपणा दाखवायचा वसा घ्यायचा असला तर शासनाची गरजच काय?
भारतिय लोकशाहीचे खरे दुर्दैव हेच आहे की हा प्रश्न शासनाला विचारण्याचा (आणि त्याप्रमाणे मतदान करण्याचा) सुजाणपणा आणि धमक भारतिय मतदारांमध्ये अजून आलेली नाही. त्यापेक्षा आपल्या आपल्यात भांडण्यात आणि फार प्रतिकार होणार नाही अश्याला (शब्दांनी आणि कधीकधी प्रत्यक्षही) झोडपून काढण्यात त्याला मजा वाटते... हे सगळे बघत राजकारणी दरवाज्याआड प्रचंड हसत असतात आणि असे बावळे मतदार मिळाल्याबद्दल स्वतःच्या नशिबावर प्रचंड खूष होत असतात !
उदाहरणादाखल, लालू सारखे राजकारणी मुंबईत गैरवाजवी हक्कांसाठी दगडफेक करणार्या बिहारींना पाठीबा देउन त्याची मते मिळवतात... कारण त्यांना माहिती आहे की हे बावळे मतदार मागे वळून, "बाबारे, इतके वर्ष सत्तेत असताना तू बिहारचा असा विकास का केला नाहीस की आज आम्हाला पोट भरायला दूर मुंबईला जाण्याऐवजी आमच्या गावात/गावाशेजारीच आनंदाने राहता आले असते? किंबहुना असा का विकास केला नाहीस की इतर राज्याच्या लोकांना बिहारमध्ये यायची ओढ लागली असती?"
हेच प्रश्न परदेशात जाणार्या भारतियांच्या बाबतीत भारतिय सरकारला विचारण्याच सुजाणपणा आपल्यात केव्हा येईल? की फक्त परदेशात जाण्यार्या भारतियाना दुषणे देणार. कारण ते जास्त सोईचे आणि पूर्ण निर्धोक आहे. शिवाय आपल्यासारखे चार मित्र आपल्या दिवाणखान्यात आपल्यासारखाच गळा काढून रडायला सहज तयार होतात... जरा वेळ कसा मजेत जातो... मग आपण सगळे मोकळे झालो आपल्या लोकल दादासाहेब/अण्णासाहेब/रावजींना डोळे मिटून मते द्यायला किंवा जास्तच हुच्चभ्रू असलो तर "मतदान करण्यात काय अर्थ नस्तो राव" असे म्हणत एक दिवसाची सुट्टी मजा करण्यात खर्च करायला... आणि परत दिवाणखान्यात बसून परत गळा काढायला.
15 Aug 2013 - 10:27 am | दत्ता काळे
कल्पकतेने भावना पोचविण्याचे काम कविता करुन गेली.
15 Aug 2013 - 10:59 am | उद्दाम
एका अर्धनग्न म्हातार्याने १९४७ साली जन्मलेल्या दोन्ही देशाना इशारा दिला होता. भांडू नका. मिळाले तेवड्।ए घेऊन सुखात रहा आणि सैन्य बरखास्त करा.
पण दोघानीही सैन्य बरखास्त केलेले नाही. उलट दोघेही राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८ % रक्कम सुरक्षेवरच घालवतात.
त्यातील ३-४ % रक्कम तरीशमेरिकेतून शस्त्रे आणायला खर्च होत असेल ना हो?
६० वर्षे झाली याला.
हिशोब मांडा किती झाला.
एका डॉलरला ६० रु का? हेच त्याचे उत्तर आहे.
15 Aug 2013 - 10:53 pm | अर्धवटराव
त्या अर्धनग्न म्हातार्याचे असले दिव्य ऐकले असते तर आज जे थोडंफार सुख लाभतय जनतेला ते ही गेलं असतं.
अर्धवटराव
16 Aug 2013 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिळाले तेवड्।ए घेऊन सुखात रहा आणि सैन्य बरखास्त करा.कविता छान आहे. पण भारताने हा सल्ला ऐकला असता (कारण दुसर्याने या सल्ल्याला हसले असती फारच लक्ष दिले असे झाले असते) तर आज एका डॉलरला ६० रु नक्कीच नसता... कारण भारतच आस्तित्वात नसता !
याच कल्पनाविलासामुळे भारत-चीन युद्धात भारताची काय परिस्थिती झाली याची आठवण करून द्यावी लागते आहे.
16 Aug 2013 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
"कविता छान आहे" ऐवजी कृपया "वरची कविकल्पना छान आहे" असे वाचावे. धन्यवाद !
15 Aug 2013 - 11:01 am | उद्दाम
माणूस परदेशात गेला, म्हणून डॉलर वाढत नसतो.
तुम्हीच त्याना तुमचे पैसे देता आणि शस्त्रे विकत आणता.
15 Aug 2013 - 11:11 am | सविता००१
कटू वाटली तरीही खूप आवडली कविता...
15 Aug 2013 - 11:31 am | दिपक.कुवेत
मनाला भीडणारी कविता
15 Aug 2013 - 12:13 pm | पैसा
आजच्या दिवसासाठी फिट्ट कविता. सोबत पाकिस्तान्यांच्या आगळिकी, पाणबुडी बुडणे अशा सुवार्ता येतच आहेत. आमचे पंतप्रधान पाकिस्तानला इशारे देतच आहेत. आणि आम्ही त्या सगळ्यांना शिव्या देत परत त्यानाच निवडून आणतो आहोत.
15 Aug 2013 - 12:13 pm | आतिवास
कविता आवडली.
वर्षातले फक्त दोन दिवस आपल्याला देश आठवतो - हेचं खरं दुखणं आहे.
15 Aug 2013 - 1:11 pm | प्रभाकर पेठकर
नाही हं! आमचं तसं नाहीए. आम्ही 'हवाला' मार्गाने पैसे भारतात पाठवत नाही. भारतात येताना कस्टम ड्यूटी भरतो. लाच देत नाही. गेली जवळ जवळ २५ वर्षे 'एअर इंडियानेच' प्रवास केला आहे (कित्येकदा 'एअर इंडिया' महाग पडूनही). परदेशातील रस्ते, वाहतुकीची शिस्त, भारतिय पदार्थ, नातेसंबंध, भारतिय संस्कृती, सण-वार, भारतिय दूरदर्शन वाहिन्या, बाबा आमटे, पुल देशपांडे, अभय बंग, जयंत नारळीकर, अण्णा हजारे आदी अनेक प्रभृतींमुळे आम्हाला आपण भारतिय असल्याचा अभिमान वाटतो.
भारत बदलावा, सुधरावा वगैरे वगैरे ३६५ दिवस वाटत असते. लोकांच्या शिव्या खात, विशेषतः पुण्याच्या रहदारीत, शिस्तीचा प्रयत्नही करीत असतो. जिथे जिथे शक्य होते तिथे तिथे भारताची आठवण आणि भारतिय मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करीतच असतो. मुलालाही एक चांगला, सुविद्य नागरिक बनविण्याचा प्रयत्न करतो.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीस भारतिय ध्वज फडकविण्यास जातोच असे नाही.
15 Aug 2013 - 1:13 pm | तिमा
कविता आवडली,विशेषतः पूर्वार्ध. उत्तरार्धात फक्त डॉ. इंजिनियरना जबाबदार धरले आहे ते अपूर्ण आहे. आपल्या देशाची ही अवस्था व्हायला आपण सगळेच जबाबदार आहोत. जनतेची अॅटिट्युड, वर्तन,विचारसरणी,हे सर्वच बदलण्याची जरुर आहे.
16 Aug 2013 - 1:41 pm | सुहास..
_/\_
16 Aug 2013 - 3:09 pm | दिप्स
खूप छान!
16 Aug 2013 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी सगळे ठीक आहे पण काही प्रश्न उरतातच...
१. दुकानात तीच एक वस्तू जर जास्त किंमत देवून खरेदी करण्याची तयारी असलेले गिर्हाईक आले तर दुकानदाराने काय वेगळे करावे अशी अपेक्षा आहे?... कवितेत खरं तर त्या दोन गिर्हाईकांपैकी एक परदेशी आहे की नाही हा मुद्दा अत्यंत गौण आणि ओढूनताणून आणलेला आहे. दुकानदारी साधारणपणे (गिर्हाईकाची फसवणुक न करता) फायद्यासाठी करायची असते याला आक्षेप घेणे वास्तववादी आहे का? का त्यानेपण केवळ भारतीय गिर्हाईक बघून बुडीत खात्यात व्यवहार करावा अशी अपेक्षा आहे? लेखकाच्या स्वतःच्या दुकानात असा व्यवहार होणार असेल तर त्यांच्या तत्वांबाद्दल आदर वाटेल पण व्यवहारज्ञानाबद्दल आणि आर्थिक भवितव्याबद्दल मनात प्रश्नचिन्ह असेल. भारतियांच्या अशाच अवास्तव कल्पनाविलासांमुळे भारतिय मतदाराला दर निवडणूकीत उल्लू बनवले जाते आहे.
भावनेच्या आहारी जावून अथवा त्याबद्दल आळवणी करून तुम्हाला जगात कोठेही मान मिळत नसतो, तो मिळण्याची पात्रता मिळवली तरच तो मिळतो.
२.
सगळ्यांचेच ठरलेले ध्येय आहे ऑनसाईटची मोट्ठी ऑफर !!(परदेशातले लोक पात्रतेशिवाय मोठी ऑफर देण्याइतके बुद्दू नाहित हे इथे खास नमूद करावेसे वाटते !)
आता प्रश्न असा आहे की अशी ऑफर आली तर ती न स्विकारणे योग्य आहे काय? जगाचा इतिहास बधितला तर कोणत्याही देशाची भरभराट शहामृगासारखे जमिनीत तोंड खुपसून झालेली नाही तर परदेशातील संपत्ती आपल्या देशात खेचून आणण्यानेच झाली आहे. कोलोनियल काळात ती (आजच्या समजूतीप्रमाणे) तत्वशून्य कृतीने झाली... पण आज जर कोणी हे आजचे देशी/परदेशी कायदे पाळून करू शकत असले तर ते वाईट तर नाहीच पण अभिमानाची गोष्ट आहे. याची अनेक कारणे आहेत, पण विस्तारभयास्तव खालची काही पुरेशी आहेतः
२. अ) जेवढी मोठी ऑफर तेवढे जास्त परकिय चलन भारतात येणार... आज भारताला जगात जो काही मान आहे तो परकीय चलनाची जी मोठी गंगाजळी आहे त्यामुळे आहे आणि त्यांत अनिवासी भारतिय नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे... आणि मुख्य म्हणजे हा वाटा रुपयाचा दर कमी जास्त झाला तर सह़ज पळून जात नाही... म्हणजे पर्यायाने रुपयाची ताकद वाढवायला / स्थिर ठेवायला याचा सिंहाचा वाटा आहे.
सहज पळून जाते ती परदेशी संस्थांची गुंतवणूक (Foreign Institutional Investment किंवा FII) आणि तिला भारतात राखून ठेवण्यासाठी भारतिय सरकारची धोरणे योग्य असावी लागतात... यात अनिवासी भारतियांचा काहिही संबद्ध नाही... आणि याबाबतितील सरकारची चुकीची धोरणे किंवा त्यांचा सपशेल अभाव हे रुपयाच्या घसरगुंडीचे कारण आहे हे गेले काही वर्षे अर्थतज्ञ आणि उद्योगाधंद्यातले धुरिण मोठ्याने ओरडून सांगत आहेत... यालाच सर्वसाधारणपणे "डिसिजन / गव्हर्नन्स पॅरॅलिसिस" असे म्हणतात. अश्या अस्थिर परिस्थितीत कोणीही आपले पैसे गुंतवण्याचा धोका कसा काय घेणार... उलट गुंतवलेला पैसा काढून घेणार नाही काय?
रुपयाची किंमत कमी झाली याला जाणकार (यात सरकारी जाणकारही आलेत) एकमुखाने सरकारला जबाबदार धरत आहेत... अनिवासी भारतियांना दुरान्वयानेही नाही. लेखकाला जाणकारांपेक्षा काही अधिक अंतर्गत माहिती आहे काय?
२. आ) एखाद्या देशात आपले जेवढे जास्त सुशिक्षित, उच्च व्यावसाईक अथवा आर्थिक गुंतवणूकिची ताकद असणारे नागरिक/स्थाईक आहेत तेवढा त्या देशात आपल्या देशाचा दबदबा असतो... ह्याचा उपयोग आंतरराष्ट्रिय राजकारणात आपल्या देशाला प्रत्यक्ष्/अप्रत्यक्षपणे फायदा होत असतो... ही "सॉफ्ट पॉवर" आंतरराष्ट्रिय राजकारणाचा एक फार महत्वाचा सुप्त घटक आहे.
आज भारतिय माणसाला "गरिबिची शिळी भाकरी श्रिमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते" असली तद्दन भोंदू, खोटी आणि महत्वाकांक्षेचे खच्चीकरण करणारी वचने झुगारून देण्याची फार मोठी गरज आहे. कारण "लाडू केव्हाही शिळ्या भाकरीपेक्षा गोड असतो आणि तो जर नितीमत्तेने व कायदेशिरपणे मिळवलेला असला तर त्याचा आनंद उपभोगण्यात न्युनगंड तर सोडाच पण आनंद आणि अभिमानही असतो".
असो. अजून काही सत्ये पुढे आणता येतील पण अगोदरच हा प्रतिसाद बराच मोठा झाल्याने आवरते घेतो. मात्र वरचे लिखाण खालच्या कल्पनाविलासी ओळी बदलायचा विचार करायला लावण्यास पुरेश्या आहेत असे वाटते...
आख्या जगात जाउन हेच मग डॉलर ला अजून स्ट्रोंग बनवतात !कधीतरी कुठेतरी एखाद पारितोषिक मिळवतात !!
भारताला मात्र त्यांचा कधीच काहीच फायदा होत् नसतो !
तरीसुद्धा भारतीय वंशाचे म्हणून आम्ही त्यांचे गोडवे गात असतो !!
16 Aug 2013 - 11:30 pm | दशानन
+१
(परदेशी गंगाजळीचे महत्व माहिती असलेला) दशानन
18 Aug 2013 - 10:27 am | डॉ सुहास म्हात्रे
Manmohan, Subbarao spar over RBI's policies ही आजच्याच पेपरात आलेली बातमी वाचल्यास मी वर काय म्हटले आहे याचा थोडासा अंदाज येईल. आणि हे सर्व फक्त रोजची वर्तमानपत्रे वाचली तरी कळण्यासारखे आहे, त्याला या विषयातला तज्ञ असण्याची गरज नाही हे कळून येईल.
माझ्या आतापर्यंतच्या वरच्या लेखनाचा हेतू "गैरसमजाने अथवा अज्ञानाने आपण आपली कशी दिशाभूल करून घेऊ नये आणि निदान खरी वस्तुस्थिती जाणून घेऊन मगच काही भडक विधाने करावी." इतकेच सांगण्याचा आहे. कारण उद्या हे दुसरा कोणी आपल्याबद्दलही करू शकतो... आणि मग त्या गोंधळाचा फायदा घ्यायला टपलेल्या लोकांबद्दल सांगायलाच पाहिजे काय?
बाकी चालू द्या.
17 Aug 2013 - 11:21 am | मुक्त विहारि
मस्त आहे..