पहिली ते सातवी सकाळची शाळा असायची. दप्तर सांभाळत शाळेच्या रस्त्यावरून जाताना घरोघरी सिलोन रेडिओवर ‘पुरानी फिल्मोंके गीत’ वाजत असायचे. लतादीदी आशा यांच्या सुरेल गीतांच्या मध्येच एक वेगळाच खडा सूर ठेक्यात कानाची पकड घेई अन नकळत पाय त्या स्वरांच्या तालावर झूम उठत. ..’बूझ मेरा क्या नाव रे नदी किनारे गाव रे..
पिपल झुमे मोरे आंगना ठंडी ठंडी छाव रे ...’
..सुरुवाती-सुरुवातीला बाई गातेय का पुरुष असा प्रश्न पडायचा. पण जेव्हा लक्षात आले की हिंदी चित्रपटगीतांच्या बालवाडीत सगळ्या पुरुषांनी बायकी आवाजात अन स्त्रियांनी खड्या पुरुषी आवाजात गाण्याची प्रथा होती, तेव्हा या तलवारी सारख्या धारदार आवाजाचा मालक नसून मालकीण आहे, हेही लक्षात आले.
लता आणि आशाच्या मंजुळ सुरांना सोकावलेल्या कानांच्या कोपऱ्यात हा जरासा हटके असा देवळातल्या घंटेसारखा खणखणीत सूर एक बंडखोर घर करून राही. हा सूर इच्छा नसतानासुद्धा जणू तलवारीच्या धारेवर धरल्यासारखा आपल्या तालावर नाचवत राहायचा. दिवसभर वेळ असेल तेव्हा अन नसेल तेव्हा त्या बंडखोर सुरावटी त्या घरातून बाहेर पडून कानात धुमाकूळ घालत. जेव्हा जेव्हा विविध भारती किंवा ऑल इंडिया रेडिओवर पुराने गीत लागत तेव्हा इतर गायक-गायिकांच्या स्वरांमधून हा खडा स्वर आपल्या हटके अस्तित्वाचा, ‘कभी आर कभी पार लागा तीर-ए-नजर’ अशी तिरंदाजी कानावर करून जाई.
...त्या हुकुमतबाज सुराचे नाव ‘शमशाद बेगम’ हे जरासे उशीरच कळाले. म्हणजे साधारण दहावी-अकरावीत गेल्यावर. तोपर्यंत मी नूरजहां, सुरैय्या, अन गीता दत्त यांच्या स्वरात तरतम भेद भाव करू शकत नसे. पण शमशाद बेगमचा आवाज कुठेही ऐकला की कान बरोब्बर prompt देत.
वयाच्या दहा बाराच्या रेंजमध्ये बेगमजींनी ‘लेके पहला पहला प्यार भरके आंखोमे खुमार’ माझ्या स्वर-जीवनात प्रवेश केला. अन सोळाव्या वर्षानंतर दीदींच्या ‘मोरे कानका बाला’च्या बरोबरीने हा ‘कजरा मुहब्बतवाला’ अखियोमे ऐसा फिट्ट झाला की शमशाद बेगमची गाणी लता आशा यांच्या बरोबरीने ‘तेरी महफिलमें किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ म्हणत माझ्या स्वर साम्राज्यात मिरवू लागली.
‘होली आई रे कन्हाई रंग छलके’ म्हणत शमशादजींनी आमच्या तारुण्यात स्वररंग भरले. त्यांची खड्या सुरातली गीते कधी ‘रेशमी सलवार कुर्ता जालीका, रूप सहा नाही जाये नखरेवालीका ,,,’असा नखरा दाखवू लागली, तर कधी ‘सैंय्या दिलमे आना रे , आके फिर ना जाना रे ...’ असे म्हणून तमतमा तम तम करू लागली. कधी ‘कहींपे निगाहे, कहींपे निशाना’ किंवा ‘उडनखटोलेपे उड जाउं, तेरे हाथ ना आउं’ असा खट्याळपणा करू लागली, तर कधी ‘छोड बाबुलका घर, मोहे पीके नगर आज जाना पडा’ असे म्हणून डोळ्यात पाणी भरवू लागली.
‘एक दो तीन आजा मौसम है रंगीन ‘ असे म्हणत शमशादजीनी आमच्या होस्टेलमधल्या रात्री रंगीन करून टाकल्या. तर त्यांच्या ’चांदनी आई बनके प्यार’ने आमची उत्तररात्र चांदणेमय केली.
सकाळी सकाळी ‘गोरे गोरे, ओ बांके छोरे’ कानावर पडलं तर उरलेला दिवस ‘...चाहे रोज बुलाया करोया करो.’ च्या ठेक्यातच जाई.
इतक्या वर्षानंतरसुद्धा ‘ओss बचपनके दिन भुला न देना आज हंसे कल रूला न देना’ ची माधुरी आजही बचपनकी याद विसरू देत नाही अन ‘आना मेर्री जान संडे के संडे’ ची मजा दिलका कब्जा सोडत नाही.
....अन परवा कानावर आले की १४ एप्रिल १९१९ला पहिला घंटानाद घुमलेल्या अन पन्नास साठ ची दोन दशके हिंदी चित्रपट सृष्टीत एक ठणठणीत ठसा उमटवलेल्या या खणखणीत सुराची मालकीण मात्र ‘पीके घर आज प्यारी दुलहनिया चली ‘ म्हणता म्हणता ९४ वर्षांचा दीर्घ प्रवास करून आपणा सर्वाना सोडून गेली आहे.
शमशाद बेगम यांना श्रद्धांजली....!
प्रतिक्रिया
28 Apr 2013 - 2:32 pm | स्पंदना
अगदी सुरेल श्रद्धांजली स्नेहा.
मलाही त्या गोड गोड अन किनर्या तानांपेक्षा (ज्या वर्षागणीत जास्त जास्त वाढत जाउन शेवटी "दीद्द्दी तेरा " च्या वेळी अक्षरशः असह्य झाल्या) शमशाद बेगम, गीता दत्त, सुरय्या यांची गाणी आवडायची.
आजवर कधीही "गीत गाया पत्थरोंने" त्यातल्या टायटल साँग मध्ये हल्क्या आवाजात ज्या ताना आहेत त्या ऐकुन फार कौतुक वाटायच "लताच" पण परवाच कळल त्या किशोरी आमोणकरांनी गायलेल्या आहेत.
शमशाद बेगमना श्रद्धांजली.
28 Apr 2013 - 3:03 pm | गणपा
+१
अगदी असेच म्हणतो.
28 Apr 2013 - 2:47 pm | मुक्त विहारि
आवडला..
28 Apr 2013 - 4:29 pm | इनिगोय
सुरेल लेख :-)
30 Apr 2013 - 10:41 am | चाणक्य
+१
30 Apr 2013 - 10:42 am | चाणक्य
+१
28 Apr 2013 - 6:32 pm | रेवती
जुन्या आठवणी जागवत लिहिलेला लेख आवडला. शमशादजींचे चाहते हळ्हळले असतील. त्यांना श्रद्धांजली.
28 Apr 2013 - 6:34 pm | बहुगुणी
सुरेल श्रद्धांजली.
28 Apr 2013 - 7:51 pm | अन्या दातार
हे गाणे माझ्याकडून
29 Apr 2013 - 8:07 am | शुचि
आहाहा!!!!!
पुण्याच्या उन्हाळ्यात आई-बाबांबरोबर चक्कर मारताना गार झुळूक आल्यासारखे वाट्ले - काहीतरी जादू नॉस्टॅल्जीक आही
28 Apr 2013 - 7:37 pm | जुइ
शमशादजींच्या सुरावटी अजुनही कानात घुमत आहेत.. लेख मस्त जमाला आहे.
28 Apr 2013 - 7:41 pm | विसोबा खेचर
छान लेख..!
28 Apr 2013 - 8:03 pm | इन्दुसुता
शमशाद बेगम यांना श्रद्धांजली
( तुमचा लेख आवडला )
28 Apr 2013 - 8:03 pm | चौकटराजा
शमशादना सहकलाकार बाई या नावाने ओळखत.संगीत काय कोणत्याही कलेत काहीतरी दैवी वैशिष्ट्य असले की शैली तयार होते व शैली वाला गाजायला लागतो. पण शैली चा एक दुर्गुण असा आहे की ती कलाकाराची कारकीर्द मर्यादित करते. रंगसम्राट रघुवीर मुळगावकार,. दीनानाथ दलाल असे काही अपवाद आहेत की जे शैलीदार असूनही दीर्घ़काळ गाजत राहिले. गीतादत्त, अमीरबाई, काननबाला, शमशाद यांचे अतिविशिष्ट आवाज त्यांच्या प्रगतीला व दुर्गतिला कारणीभूत ठरले.अनिल विश्वास यानी म्हटले की लताबाई आल्या नि संगीतकारांवरची सर्व बंधने निसटून पडली.पण शमशाद बाईंचे मन इतके मोठे की त्यानी हे सगळे फार लवकर जाणले. त्या व्यसनाच्या आहारी गेल्या नाहीत. मजेत जीवन जगत राहिल्या. त्यानी लग्न देखील एका down to earth माणसाबरोबर केले. जो मिल गया उसीमे मुकद्दर समझ लिया हे गीत त्या अक्षरशः जगल्या. माणूस व कलाकार म्हणून अल्लाच्या उतराई राहिल्या. बाईजी, स्वर्ग लोक जर खरंच असेल तर नौशाद अली, नय्यर, आण्ण्णा चितळकर तुमचं स्वागत करतील. गायला लावतील. आपल्या गीतानी आमचे जीवन "ठसकेवाज" झाले त्यातला मलूलपणा गळून गेला. आदाब कूबूल कीजिये !
30 Apr 2013 - 9:58 am | सस्नेह
बरोब्बर ! हाच शब्द शमशादजींच्या आवाजाचे चपखल वर्णन करतो.
30 Apr 2013 - 1:26 pm | अभ्या..
अत्यंत सुरेल लेख स्नेहातै.
या लेखात उल्लेख केलेल्या गाण्यातले एकही अनोळखी वाटले नाही यातच सारे आले.
राजासाबांना पण सुरेख प्रतिसादासाठी धन्यवाद.
29 Apr 2013 - 8:04 am | शुचि
११ वी त पहील्यांदा हे गाणे ऐकले अन वेडी झाले होते.
अजूनही हे गाणे ऐकताना ११ वी चे दिवस आठवतात.
29 Apr 2013 - 10:23 am | चित्रगुप्त
अतिशय सुंदर आणि समर्पक श्रद्धांजली.
'मेरी नींदोमे तुम' हे गाणे किशोर, शमशाद आणि ओपी या तिघांच्याही उत्कृष्टतम गाण्यांपैकी.
अपर्णाताईंनी .... "त्या गोड गोड अन किनर्या तानांपेक्षा (ज्या वर्षागणीत जास्त जास्त वाढत जाउन शेवटी "दीद्द्दी तेरा " च्या वेळी अक्षरशः असह्य झाल्या) शमशाद बेगम, गीता दत्त, सुरय्या यांची गाणी आवडायची".... हे अगदी मनातलेच सांगितले. (यात आणखी मुबारक बेगमची भर टाकायला हवी, आणि 'तुम अपना रंजोगम' वाल्या जगजीत कौर यांची.)
30 Apr 2013 - 12:29 pm | महेश नामजोशि
मला आठवते कि कित्येक वर्षापर्यंत रेडीओ सिलोनवर दर रविवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटे ते रात्रीचे अकरा वाजेपर्यंत "हमेशा जवां गीत" हा सुरेल कार्यक्रम मी ऐकत असे. या कार्यक्रमाआधी मी वही पेन घेऊन तयार बसत असे. या वहीत मी बरेच दिवसांपर्यंत (लग्न होईपर्यंत) तारीखवार हे कार्यक्रम लिहून ठेवले आहेत. गीतकाराचे नांव, गायकाचे नाव, सिनेमाचे नांव, व गाण्याचा मुखडा अशी यादीच बनवत असे. नंतर आम्हा मित्रांमध्ये कार्यक्रमासंबंधी चर्चा होत असे. मला चाली इतक्या पाठ झाल्या होत्या कि आम्हा मित्रांमध्ये गाण्यावरून चर्चा होत असे तेव्हा मला खात्री करून घेण्यासाठी फोन करीत असत. हि अशी चाल आहे हे गाणे कुठच्या चित्रपटात आहे. खूप मज येइ. जुनी गाणी ऐकण्यासाठी मी कुठे कुठे धाव घेत असे. त्या काळात फक्त थोड्या ठिकाणी गाणी क्यासेटमध्ये रेकोर्ड करून मिळत. आम्ही खोपोलीहून चेम्बुरला रेकोर्ड करण्यासाठी येत असु. त्या काळात पन्नास रुपयात TDK ची क्यासेट व रेकोर्ड करायला तीस रुपये पडत. पण हौसेपुढे मोल नाहि. सगळ्या क्यासेट नंतर खराब होईन गेल्या. रेडीओ जर्मनी, रेडीओ ऑस्ट्रेलिया, ऑल इंडिया रेडीओची पुश्तु सर्विस मुंबई अ व विविध भारती याच्यामध्ये लागायची त्यावर सुंदर हिंदी गाणी ऐकू यायचि. पुश्तुमध्ये ते काय बोलायचे कधीच कळायचे नाही तसेच जर्मन भाषे मध्ये पण जुनी गाणी हिंदी खूप छान लागायचि. काय सुंदर काळ होता तो. अजून मी ती वही जपून ठेवली आहे. तशीच सकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत सुंदर जुनी हिंदी गाणी लागायचि.
आता रेडीओ सिलोन लागतो कि नाही काही माहित नाही. मधून मधून फक्त बातम्या ऎकू येतात, मी प्रयत्न केला पण मला काही ते पुन्हा ऐकू आले नाहि. दलबीरसिंग परमार, विजय शेखर, रिपुसुदनकुमर इलाहाबादि अशी निवेदकांची नावे अजून लक्षात आहेत. विशिष्ट गाण्यात खास काय आहे ते निवेदक आवर्जून सांगे. श्री चार्शेवीस तसाच श्रीमती चार्शेवीस सिनेमा होता. त्यातही सुंदर गाणी होति. गाण्याची यादी हवी असल्यास मला mahesh.namjoshi@gmail.com वर मेल करा. मी आनंदाने देइन.
30 Apr 2013 - 12:38 pm | तिमा
लेख आवडला. पण मला तरी कधी, त्यांचा आवाज पुरुषी वाटला नाही.
शमशाद बेगम यांची गाणी मला लहानपणापासूनच आवडतात. त्यांची 'बाबुल' मधली गाणी ताल धरायला लावतात.
'मिलते ही आँखे दिल हुआ
नदीकिनारे
दुनिया बदल गयी
किसीके दिलमें रहना था
ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी अजरामर आहेत. त्यांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्या काधीही बेसूर होत नसत.
30 Apr 2013 - 1:18 pm | सस्नेह
'मिलतेही आंखे दिल हुआ..' Most superliked duet of तलत-शमशाद !
30 Apr 2013 - 2:17 pm | प्रचेतस
लेख आवडला.
30 Apr 2013 - 7:34 pm | उपास
त्या गाण्यांच्या आठवणी जागा झाल्या ह्या लेखाने..!
30 Apr 2013 - 9:58 pm | sagarparadkar
ह्या गाण्यातील ओळीच्या शेवटच्या अक्षरावरील तान म्हणजे शमशाद बेगम यांची खरोखरच कमाल होती ...
1 May 2013 - 12:31 am | प्यारे१
शमशादजींना सुरेल श्रद्धांजलि.
(आपातैची टिप्पणी विशेष 'इथे' भावली नाही. असो.)
1 May 2013 - 3:02 am | बिपिन कार्यकर्ते
वा!
1 May 2013 - 10:16 am | यशोधरा
सुरेख लिहिलं आहे.
2 May 2013 - 7:17 pm | ढालगज भवानी
नक्कीच
2 May 2013 - 7:34 pm | पैसा
सुरील्या "बाईंना" सुरीली श्रद्धांजली!
3 May 2013 - 9:49 am | मूकवाचक
+१
6 May 2013 - 7:04 am | हुप्प्या
शमशाद बेगमच्या गाण्यांचा हा एक संग्रह सापडला.
http://www.dhingana.com/tribute-to-shamshad-begum-playlist-songs-23bdcd9
आणि हा एक उत्कृष्ट लेख
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19716567.cms
हिंदी संगीताच्या सुवर्णयुगाच्या एका सुरेल पर्वाचा अस्त झाला. माझी त्यांना श्रद्धांजली.
6 May 2013 - 1:28 pm | दिपक.कुवेत
वर म्हटल्याप्रमाणेच अतिश्य ठसकेबाज आवाज...त्यांच गाण एकताना प्रत्येक शब्द खणखणीत एकु येत असे.