भाग १ - http://www.misalpav.com/node/22190
भाग २ - http://www.misalpav.com/node/22459
पहाटे पहाटे चालायला सुरु करायचे असं ठरले पण झोप थोडीशी जादा झाली अन पहाटेऎवजी सकाळी चालायला सुरुवात केली. फक्त गरजेचं साहित्य बरोबर घेतलेले होते. बाकीच्या गोष्टी हॉटेलमध्येच ठेवल्या होत्या. थंडी जबरदस्त होती म्हणून उबदार कपडे घालुनच निघालो पण पहिलाच चढ थंडीला पळवून लावणारा निघाला. आम्ही टी शर्ट वर आलो. प्रवासात चालताना फोटो काढायचे नाहीत अस ठरले होते पण कॅमेरा बाहेर निघाला...
आमच्याबरोबर बरेच शीख लोक पायी, डोली किंवा घोडयावर बसून घांघरिया कडे निघाले होते. रस्ता व्यवस्थीत बांधला होता.रस्त्याला लागून असणाया दरीमधून पुष्पावती नदी तुफान वेगाने कोसळत होती. चालणारे डोलीवले अन घोडयांना जायला बर्यापैकी जागा होती. डोलीवाले अक्षरश: धावत होते. आम्हाला पहिल्याच चढाला दम लागला. पण जसे जसे वातावरणाला जुळवले गेलो, दम लागणे कमी झाले अन निवांत चालू लागलो. प्रत्येक किमीला बोर्ड होते. पण चालणे साधारणता ताशी २ कि मी होते.
गोविंदघाट ते घांघरिया-
मध्येच रस्त्याजवळ नदीत उतरण्यासाठी वाट होती. आम्ही फोटोसाठी उतरलो पण तेथे आधीच एक शीख सरदार आपल्या मुलासह पाण्यात पाय सोडुन बसले होते. तो सरदार आम्हाला म्हणाला, पाण्यात पाय सोडुन बसा, पाय दुखायचे थांबतील. सुजीत अन सागरने शूज काढले अन पाय पाण्यात टाकताच मला पाण्यात पाय टाकु नको म्हणाले. मी त्यांच्या चेहर्यावरूनच समजलो. पाणी इतके थंड होते की पाय बधीर झाले अन सरदाराला वाटले की पाय दुखायचे थांबले.या छोटया विश्रांती नंतर परत चालायला सुरुवात केली. आता परत येणारे बरेच लोक भेटत होते. बरेच लोक रस्त्यात उभे राहून शिल्लक राहिलेली ग्लुकोन डी, प्रसादासारखी वाटत होते, तेवढीच चालायला शक्ती.
जवळपास निम्मे अंतर चालून झाले होते. रस्ता खडा चढ होता. गोविंदघाट समुद्रसपाटी पासुन उंची आहे ६००० फुट, घांघरिया १०००० फुट, फूलदरी आहे ११००० ते २०३५७ फुट, हेमकुंड साहिब आहे १५५०० फुट. एका दिवसत १४ किमी मध्ये ४००० फुट पार करायचे होते. फुलदरीची चाहूल लागली होती, रस्त्याकडेला छोटी छोटी लाल, सफेद अन जांभळी फुले दिसू लागले होते. एव्हाना घोडे, डोली यांची वर्दळ कमी झाली होती. हवामानाशी जुळल्यामुळे चालताना बराच कमी दम लागत होता.
गोविंदघाट ते घांघरिया-
शेवटचा टप्पा मात्र जबरदस्त खडा चढ होता. पावसाने गैरहजेरी नोंद करून चांगलीच मदत केली होती. रस्ता अरुंद होता. पुष्पावती नदीने मात्र साथ सोडली नव्हती. जास्तच अल्ल्डपणे ती उतरत होती अन आम्ही दमून वर चढत होतो. येथे जरा जास्त वर्दळ जाणवत होती, घोडे अन डोलीवाले पहिले भाविक उतरुन परत जे दमलेले होते त्यांना आफर करत होते. चढ, चालल्यामुळे दमलेले भाविक कमी किंमतीत आता घोडयावर बसुन जात होते.
१४ किमी चालुन आल्यानंतर पहिल्यांदा घांघरिया गावाचे दर्शन झाले. सुरुवातीला हेलीपॆड अन नंतर टेंट, बाजुच्या पर्वतातून कोसळणारा धबधबा, ह्या सगळ्याभोवती पाईन वृक्षांची दाटी, चित्रकाराने काढलेलं चित्रच जणु. आम्हाला मात्र वेळ नव्हता धावत पळत जावुन आम्हाला होटेल मध्ये खोल्या बुक करायच्या होत्या. गढवाल टुरिझमच्या खोल्या सुंदर होत्या पण आरक्षित होत्या. मग एका छोटया होटेल मध्ये खोल्या मिळाल्या. थोडयावेळाने आवरून वगैरे आम्ही खायला म्हणून त्या होटेलच्या उपहारगृहामध्ये आलो. सुजीतने झोपण्याचा त्याचा बेत जाहीर केला अन आम्ही घांघरिया फिरुन येण्याचा. अन आम्ही मार्गदर्शक ठरवायला निघालो.
घांघरिया...
घांघरिया हे गाव फक्त हॉटेल, अन खानावळींनी भरलेले आहे. मार्च ते आगस्ट इतकेच दिवस तेथे लोक राहतात. बर्फ पडू लागला की लोक गांव रिकामे करून जातात. रात्री ५ ते ९ इतकाच वेळ वीज असते ती पण डिझेल जनरेटरने मिळालेली. खाण्याचे साहित्य, डिझेल अन इतर लागणार्या सर्व वस्तु गोविंदघाटहून घोडयावरून येतात. सहाजीकच प्रत्येक वस्तुचा दर वाढत जातो. गढवाल टुरिझमचे एक कार्यालय आहे. तिथे मार्गदर्शक मिळतो कि काय पहायला गेलो.
तेथील मार्गदर्शक आधीच एका शीख सरदाराबरोबर बोलत होता. त्या कार्यालयात बरीच फुलदरीबद्द्ल पुस्तके होती. पुस्तके चाळता चाळता कळाले की तो त्या सरदाराला बरोबर घेऊन चालला आहे अन तो आम्हाला त्याच्याबरोबर घेऊन जावु शकेल. पण तो काही पैसे कमी करायला तयार नव्हता. मग त्याला म्हणालो थोडेसे गांव फिरुन येतो अन मग सांगतो. अन फिरता फिरता चौकशी करता कळाले कि गावात दोनच मार्गदर्शक आहेत. मग दुसर्या मार्गदर्शकाकडे गेलो. रजनीश चौहान नाव त्याचे. त्याचे घांघरीया मध्ये छोटेसे दुकान आहे, शोभेच्या वस्तु विकण्याचे. आम्ही जावुन निवांत गप्पा मारत बसलो. तो त्याच्या हिमालयातील ट्रेकचे फोटो दाखवत राहीला. परदेशी लोकांबरोबर औलीला केलेल्या स्किईंगचे फोटो दाखविले. त्याचा जवळचा DSLR कॅमेरा दाखवत होता, पण पैसे काही केल्या कमी करेना. मग तो त्याच्या कॅमेर्याने आमचे फोटो काढणार अन आम्हाला देणार असे ठरले. त्याच्या दुकानात जवळपास २-३ तास आम्ही बसलो होतो. कोणताही शीख दुकानात आला कि तो सांगायचा दुकान बंद करुन चाललोय, नंतर या. किंवा मालक बाहेर गेलाय, परत थोडया वेळाने या. रजनीश अस का करतोय आमच्या लक्षात येत नव्हते, एव्हाना त्याची अन आमची चांगलीच ओळख झाली. रजनीशला त्याबद्द्ल छेडले तर तो म्हणाला त्याला शीख आवडत नाहीत. का आवडत नाहीत त्याचा अनुभव आम्हाला आला. दोन शीख मुले त्याच्या दुकानात आली. त्यांनी रजनीशचा दरवाज्यावरचा बर्फाच्या कडयावर ट्रेक करतानाचा फोटो पाहिला होता. आत येत शीख तरुणांनी त्याला विचारले की तो फोटो मध्ये फक्त त्या मुलांचा चेहरा बसवुन देशील का म्हणून. रजनीश म्हणाला ते काही शक्य नाही. ते म्हणाले मग फक्त फोटो दे... हमारे यहा सबकुछ होता है, हम कर लेंगे. यावर रजनीशने त्यांना अक्षरशः हाकलले. तो फोटो एका विदेशी मुलीने एका ट्रेकींगवेळी काढला होता. दुसर्या दिवशी सकाळी येतो म्हणून आम्ही तेथुन निघालो.
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता रजनीशच्या दुकानाजवळ पोहोचलो.रजनीश आमचीच वाट पहात होता. त्याच्या भावाच्या दुकानातून दुपारसाठी परोठे घेतले. अन फुलदरीजवळ पोहोचलो. चार पाच पर्यटक फुलदरीच्या गेटजवळ तिथल्या कर्मचार्यांची वाट पहात होते... आम्ही तिथला फुलदरीचा नकाशा पाहू लागलो.
थोडयाच वेळात आम्ही पैसे भरून आत मध्ये प्रवेश मिळवला.फुलदरी किती सुंदर आहे त्याचे वर्णन शब्दात मी तरी करु शकत नाही, म्हणून फोटो....
फुलदरी...
१९३० साली ३ ब्रिटीश गिर्यारोहक रस्ता चुकल्यामुळे भ्युंदार दरी मध्ये आले अन पहातात तर सगळे पुष्पवाती नदीच्या खोर्यात पर्वत उतार फुलांनी भरून गेलेले तेव्हा Valley of Flower चा शोध लागला अन भ्युंदार दरी, Valley of Flower म्हणून नकाशावर आली अन तशीच ओळखली जावु लागली. त्यातील एका गिर्यारोहकाने Valley of Flower असे पुस्तक पण लिहले. १९८२ ला राष्ट्रीय उद्यानाचा अन २००४ ला UNESCO जागतीक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला.
फुलदरी मध्ये मे पासून ऑगस्ट पर्यंत वेगवेगळी फुले उमलत असतात कि जणु पर्वत उतारावर गालिचे. जर थोडया दिवसांनी पर्वत उताराचा रंगच बदलून जात असतो. बर्याचदा विविधरंगी फुलांचे पट्टे दुरवरून दिसतात.
बर्याच वनस्पती संशोधकानी इथे संशोधन करून बरीच हिमालयीन फुलांबददल माहीती जमविली आहे.रजनीश बरोबर आम्ही फिरत फिरत फुलदरीच्या मध्यभागात आलो. तेथे मार्गारेट लेग्गे ह्या वनस्पती संशोधकाची संशोधन करत असताना मरण पावली तिची कबर..
आता पावसाला सुरुवात झाली. येथील वातावरण केव्हा ही बदलू शकते. रजनीश तेथेच थांबला पण आम्ही पुढे चलतच होतो. आम्हाला फुलदरीच्या शेवटी असलेल्या लाल फुलांचा जमिनीवर अंथरलेला गालीचा पहायचा होता. भर पावसात आम्ही शेवटपर्यंत पोहोचलो. तेथे गुलाबाच्या फुलासारखी छोटी छोटी फुलांनी नदीच्या दोन्ही बाजूला अन दोन्ही बाजूच्या पर्वत उतारावर सुंदर गालिचा पांघरला होता.
फुलदरीचा शेवट
एव्हाना पाऊस बराच वाढला होता. अन आम्ही एका छोटया गुहेसारख्या जागेत आडोशाला थांबलो होतो. मग फुलदरीबदद्ल गप्पा चालू झाल्या. रजनीशच्या म्हणण्यानुसार जी फुले कमी ऊंचीवर उगवत होती ती आता जास्त ऊंचीवर उगवत आहेत. कारण सर्व भागातील तापमान वाढत आहे. ब्रह्मकमळ फुल जे फूलदरी मध्ये सहजरित्या मिळायचे त्यासाठी आता पर्वतमाथ्यावर जावे लागते. हेमकुंड साठी जे भाविक प्लॅस्टीक रेनकोट घेऊन येते त्यामुळे इतक्या ऊंचीवर कचरा होत आहे. घोडयांची लीद मुळे सुद्धा कचर्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर जेव्हा फुलदरी राष्ट्रीय उद्यान झाले तेव्हापासून तेथे हिमालयीन शेळ्याना चरायला बंदी आहे. पण ह्याच शेळ्या अन बकर्यामुळे फुलदरीची खताची गरज भागविली जायची अन त्यांच्या विष्ठेतून जाणार्या बियामुळे फुलदरीचा विस्तार होत होता, त्यावर आता मर्यादा आल्या आहेत. गरम हवेमुळे फुलदरी ऊंचीकडे चालली आहे.
फुलदरीचे संवर्धन किंवा ती वाचवणे का गरजेचे आहे तर समजा दोन वनस्पती संशोधकाना हिमालयतील फुलांची नोंद अथवा संशोधन करायला सांगितले तर एक बरीच वर्षे हरिद्वार ते माण फेर्या मारत बसेल तर दुसरा फक्त फूलदरीमध्ये बसुन ३-४ महिन्यात जवळपास सर्व जातींची नोंद घेवु शकेल.
पाऊस कमी होण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. ढग सुद्धा दाटून येत होते. मग आम्ही जड पायाने माघार घेतली. जर वेळी अशा जागेतून निघताना बर्याचदा मी ठरवत असतो कि मी परत येथे येणार पण मला असं वाटत होते कि परत आल्यावर फुलदरी अस्तित्वात असेल कि नाही. असं वाटत असत की ह्या जागा कुणालाही माहीती होऊ नयेत निदान त्या तितक्या सुरक्षित तरी राहतील.
त्या दुपारी भर पावसात आम्ही ३-४ कि मी चालत परत घांघरिया मध्ये आलो. जबरदस्त थंडीने काकडलो होतो. मस्तपैकी अथंरूणामध्ये ताणून दिली. सांयकाळी परत रजनीशच्या दुकानात जाऊन गप्पा टप्पा करत बसलो. त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले.
रजनीश अन त्याचे दुकान
दुसया दिवशी आम्हाला हेमकुंड साहिब पाहून परत गोविंदघाटला जायचे होते. म्हणजे समुद्रसपाटी पासून १०,०००(घांघरिया) फूटावरुन १५०००(हेमकुंड साहिब) पर्यंत जायचे अन ६००० फुटापर्यंत (गोविंदघाट) खाली यायचे.
हेमकुंड साहिब हे शीखांच्या पवित्र जागांपैकी एक जागा आहे. या स्थानाबददल दोन ऐकीव कथा आहेत. गुरु गोविंद सिंगानी त्यांच्या पुर्वीच्या जन्मी तेथे तपस्या केली होती. ते तेथुन देवाला भेटले अन देवानी त्यांना परत जन्म घेऊन लोकांना धर्माची शिकवण अन द्रुष्ट शक्ती विरुद्ध लढा देण्याचा आदेश दिला.त्यांच्या पवित्र ग्रंथामध्ये ह्या जागेचा उल्लेख बर्फाचा तलाव अन सात पर्वत शिखरांच्या मधील जागा असे आहे. दुसर्या कथेत जेव्हा मुघल गुरु गोविंद सिंगाना मारण्यासाठी प्रयत्न करत होते तेव्हा गुरु गोविंद सिंग येथे पळून आले अन त्यांनी तपस्या करत येथे त्यांचा पवित्र ग्रंथाचे लिखाण केले. १९३२ साली भारतीय सेनेतुन निव्रुत्त झालेल्या सैनिकांनी ही जागा शोधुन काढली. तसेच ह्या जागेजवळच लक्ष्मण मंदीर आहे. आख्यायिका अशी आहे की लक्ष्मणाने येथे शेष नाग स्वरूपात तप केले होते.
हेमकुंड (आंतरजालावरून साभार)
हेमकुंड (आंतरजालावरून साभार)
तिसर्या दिवशी सकाळी आम्ही चालायला सुरुवात केली. ७-८ किमी मध्ये ४०००-४५०० फुटाचा चढ, जो जाणवत होता, खडा चढ म्हणु शकता. खडया चढामुळे अन उंचीमुळे दम लागत होता. थंडीमध्ये सुद्धा घाम येत होता म्हणून जॅकेट काढावे तर थंडी वाजत होती. मध्ये रस्त्यात १-२ छोटे छोटे ग्लेशीअर पण होते. त्यावरून जाताना सावधगिरी बाळगावी लागत होती. निम्म्या रस्त्यात परत पाऊस चालू झाला त्यामुळे फार दुरवरचे काही दिसत नव्हते अन कॅमेरा सुदधा बाहेर काढता येत नव्हता. जस वर जात होतो तसा तापमानतील फरक लक्षात येत होता. २-३ तासांच्या सलग चालण्यानंतर आम्ही हेमकुंडला पोहोचलो. तेथे तलाव आहे. अन त्या तलावामध्ये डुबुकी मारणे हा एक अनुभवच होता. जवळपास ३-४ अंश तापमान, गार वारा अन बाणांसारखे थेंब मारणारा पाऊस.. कपडे काढून पाण्यात उतरलो तेच शरीराच्या संवेदना गायब झाल्या तर सागर म्हणाला फोटो चांगला आला नाही आणी एकदा डुबुकी मारा. दुसर्या वेळी शरीराने नकार देण्याचा प्रयत्न केला पण मनापुढे हार मानावी लागली. जवळपास तेथुन ५- १० मिनटे शेजारच्या खोलीत शेकोटी जवळ बसल्यावर शरीराच्या जाणीवा परत आल्या. मुंबईहून नॉन शीख येथे आलेत हे कळाल्यावर वेलकमजी म्हणून स्वागत झाले.
गुरुद्वारा
लक्ष्मण मंदीर
तेथे गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर बराच वेळ गुरुद्वारामधील ब्लॅकेट मध्ये बसून होतो. तेथे जवळ लंगर चालु होता. गरम दाल खिचडीची चव १५००० फूटावर जास्तच छान लागते म्हणून कि काय २ च्या जागी ४ वाडगी भरून दाल खिचडी संपविली अन २-३ कप चहा तो ही पेल्यातून. मी तर तेथेसुद्धा चुली शेजारची जागा पकडून उभा होतो. बाहेर येउन आम्ही लक्ष्मण मंदीरात दर्शन घेतले. एका शीख सरदारने आम्हाला सात पर्वतावरचे सात निशान दाखविले पण ढगांमुळे ३-४ निशानच दिसु शकले. तेथे जवळच ब्रह्मकमळाच्या फुलांच्या कळ्या होत्या. वार्याबरोबर त्याचा मस्त सुगंध येत होता. म्हणे की ब्रह्मकमळांच्या अतीसुगंधाने कोणीही बेशुद्ध पडू शकतो.
ब्रम्हकमळ...
आता परत जायची वेळ आली होती. घांघरियाहून गोविंदघाट जवळपास २० किमी.. आम्ही उतरून घांघरीया मध्ये आलो. पटकन सॅक पॅक करून आम्ही चालत घांघरियाकडे निघालो. शेवटचे ४-५ किमी फारच त्रासदायक होते. मी तर सुजित अन सागरपेक्षा जास्त दमलो होतो. मी मागे रहात होतो म्हणून सागर माझ्या बरोबर होता. जरी आम्ही शरीराने दमलो होतो, पण आमचे मन मात्र अतिशय उत्साही होते.. बहुतेक फुलदरीचा प्रभाव असावा.
प्रतिक्रिया
13 Jan 2013 - 4:35 pm | शैलेश नरेन्द्र
फोतो छान आले आहेत
13 Jan 2013 - 4:38 pm | पियुशा
मस्त :)
13 Jan 2013 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
फुलोंकी घाटी एकदा जरूर बघायला जाणार. त्यापुर्वी तुमचे प्रवासवर्णन आणि फोटोंनी जरा मनाला बरे वाटले ! ध्न्यवाद !
13 Jan 2013 - 5:32 pm | श्री गावसेना प्रमुख
अतिसुंदर
13 Jan 2013 - 5:32 pm | पैसा
फारच छान!
13 Jan 2013 - 8:46 pm | यशोधरा
हेमकुंडसाहिब आणि व्हॅलीच्या केलेल्या ट्रेकची पुन्हा एकदा आठवण करुन दिलीत! मनापसून आभार.
13 Jan 2013 - 10:01 pm | जेनी...
धुमशान !
13 Jan 2013 - 10:48 pm | सूड
ते ब्रम्हकमळ कुंडीत येणार्या ब्रम्हकमळापेक्षा निराळं दिसतंय !!
13 Jan 2013 - 10:54 pm | ऐक शुन्य शुन्य
त्यावेळी कळालं की हे खर ब्रम्हकमळ, कुंडीतलं एक प्रकारचे निवडुंग आहे म्हणे....
13 Jan 2013 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा
एकदम अप्रतिम :-)
14 Jan 2013 - 12:01 am | रेवती
फूलदरी मालिका आवडली.
14 Jan 2013 - 1:51 am | आनन्दिता
केवळ अप्रतिम!!
14 Jan 2013 - 8:02 am | ५० फक्त
लई भारी, मस्त रे एकदम.
14 Jan 2013 - 1:05 pm | मनराव
मस्त रे.........तिनीही भाग एकदम वाचून काढले.... फुलदरी आणि परिसर अनमोल आहे........
14 Jan 2013 - 1:12 pm | दिपक.कुवेत
लेखन आणि फोटो दोन्हि मस्त. लक्ष्मण मंदीरच्या नंतरचा फोटो तर खुपच आवडला...आय मीन मागे असलेल्या डोंगर आणि तळ्याची पार्ष्वभुमि...
14 Jan 2013 - 11:28 pm | ऐक शुन्य शुन्य
प्रतीसादांसाठी अन वाचनासाठी मनापासून आभार!!
15 Jan 2013 - 8:25 pm | बाबा पाटील
अप्रतिम......
16 Jan 2013 - 9:53 am | नितिन काळदेवकर
फोटो बघून एकदा तरी भेट द्यावी असे वाटते.
16 Jan 2013 - 11:19 am | क्श्मा कुल्कर्नि
सुन्दर प्रवास प्रवासवर्णन !! आणि फोटो पण छान !! अगदि लगेच भेट द्यावी असे वाटले.
19 Jan 2013 - 10:34 pm | हुकुमीएक्का
फोटो अतिशय सुंदर आहेत.. गोविंदघाट ते घांघरिया फोटो आवडला . . .
21 Jan 2013 - 4:52 am | स्पंदना
खुप चालाव लागत का? १४ किमी एका दिवसात चालुन माणसं हेमकुंडाला जातात?
वर्णन अन फोटो आवडले.
22 Jan 2013 - 10:51 am | ऐक शुन्य शुन्य
हो बरच चालाव लागते... १४ कीमी एका दिवसात चढून हेमकुंडला जाणे शक्यता कमी आहे...पण एका दिवसात उतरून खाली येता येते....
2 Feb 2013 - 9:58 pm | यशोधरा
गोविंदघाट (१९०० m)ते घांगरिया (3300 m) - १३ -१४ किमी आहे. घांगरिया हा बेस. हे १३ -१४ किमीचालून वर आल्यावर त्याच दिवशी दरी वा हेमकुंड करणं शक्य नाही.
घांगरियापासून एक रस्ता फुलदरीत जातो आणि एक रस्ता हेमकुंडापाशी जातो.
घांगरिया ते फुलदरी एकतर्फा - ४ते ५ किमी बहुतेक, आणि घांगरिया ते हेमकुंड एकतर्फा - ३ ते ४ किमी, परंतु अतिशय चढण आहे. चढताना आणि उतरताना जीव जातो.
21 Jan 2013 - 5:58 pm | kanchanbari
सुरेख वर्णन आणी सुंदर फोटो
21 Jan 2013 - 6:42 pm | कवितानागेश
अतिशय सुंदर फोटो आहेत. लग्गेच उठून जावसं वाटतय..
21 Jan 2013 - 7:15 pm | बॅटमॅन
खल्लास!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
1 Feb 2013 - 12:12 am | कृष्णकळी
Valley Of Flower बद्द्ल जी कल्पना मनात तयार झालेली तसं चित्र फोटोंमधे दिसलं नाही.. फुलांचा गालीचा म्हटल्यावर मला वाटलं, दूर दूर पर्यंत जमिन दिसतचं नसेल. खूप खूप गर्दी करून गळ्यात गळे घातलेली फुलेच फुले पहायला मिळतील. रंगीबेरंगी किंवा एकाच रंगाचे हजार शेड. वरून पाहता एक मोठाली कलर प्यालेटच जणू ....
बाकी, तुमच्या लिखाणामुळे आमच्या माहितीत बरीच भर पडली, त्याबद्दल आभार ..!!
2 Feb 2013 - 10:22 pm | सुजित पवार
फुलांचा गालीचा म्हटल्यावर मला वाटलं, दूर दूर पर्यंत जमिन दिसतचं नसेल - अगदि असेच आहे...फक्त तो फोटो इथे नाहि...
23 Mar 2013 - 9:11 pm | कंजूस
एकावर दहा शून्य वर्णन आणि फोटो .येथे नक्की जाणार आणि चार महिने राहाणार .