एक खळाळती नदी
तिचे रम्य दोन्ही काठ,
दोन तिरी दोन मन
माना दोघांच्याही ताठ!
ऐलतिरी पैलतिरी
दोन्ही बाजू दोन मन,
एक होकार भरितो
दुजा नकार घोकून...
वाटे निर्मळ वहावे
अडता, मना पुसावे,
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!
प्रत्यक्षात असे नाही
मने धरी भिन्न तान
एक मी, मी, मी म्हणे
दुजा म्हणे मी महान..!
संभ्रमाने गोंधळावे
असा अजब प्रकार,
इथे मत एक नाही
म्हणे जगा निर्विकार!!
मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!!
इथे प्रश्न इवलाले
करी आपणा अर्जुन,
संभ्रमात जग म्हणे-
नाही सुटका ह्यातून!
त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!
मग आपलीच तीरं
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!
-वेणू
प्रतिक्रिया
11 Jun 2012 - 5:48 pm | प्रचेतस
अप्रतिम.
12 Jun 2012 - 9:21 am | स्पंदना
आवडली.
12 Jun 2012 - 10:44 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर!!
12 Jun 2012 - 2:43 pm | योगेश सुदाम शिन्दे
<< मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!! >>
मस्तच !
13 Jun 2012 - 12:38 am | विकास
खरे आहे.
13 Jun 2012 - 8:35 am | ५० फक्त
कवितेमागची प्रेरणा याच नावाचं अन याच अंगानं जाणरं वपुंच पुस्तक आहे का ? ते पुस्तक वाचल्यावर माझ्या वागण्या बोलण्यात खुप फरक झाला आहे.
कधी कधी पांडवांपेक्षा दुर्योधन बरा असं वाटतं, कधी ही कसला ही द्विधा विचार आणि स्थिती नाही, एक ध्येय आणि एक वाटचाल.
कविता छान झाली आहे. धन्यवाद.
13 Jun 2012 - 9:26 am | प्रचेतस
हो तेच ते.
पण पुस्तक लैच रटाळ आहे.
13 Jun 2012 - 9:32 am | चैतन्य दीक्षित
कविता छान लिहिली आहे.
13 Jun 2012 - 11:57 am | वेणू
सगळ्यांची खूप आभारी आहे.
५० फक्त, अगदीच बरोबर ओळखले तुम्ही, मनाचे फार जास्त कंडिशनिंग करण्याची ताकद आहे ह्या पुस्तकात, अगदी संग्रही ठेवावं असं वाटलं मला हे व.पुंच पुस्तक :)
15 Jun 2012 - 10:32 am | अमृत
नेहेमीप्रमाणे आवडली.
अमृत