नशीबाने वारंवार पेकाटात लाथ घातली
तरी लाळघोट्या कुत्र्यासारखं पुन्हा पुन्हा
शेपूट कधी पायात घालून
तर कधी हलवत हलवत
त्याच्याच मागे मागे फिरणं..
संपलं एकदाचं ते मरत मरत जगणं !
तसा मी प्रयत्न बऱ्याचदा केला होता
काळाचं लक्ष वेधून घेण्याचा
त्याला जवळ बोलावण्याचा
पण त्यालाही कधी वाटलं नाही
मान वर करून पाहावंसं
मला मुक्त करावंसं..
आणि मी फक्त लाथाच खाल्ल्या...
कधी शेपूट पायात घालून
कधी हलवून... हलवून...
आज मात्र त्याचं कसं कोण जाणे, लक्ष गेलं
(म्हणाला असावा - "अरे! हे कुत्रं अजून कसं नाही मेलं?)
आणि शेवटची लाथ त्यानेच घातली
मला तर आनंदच होता मरण्याचा
सोसच नव्हता मुळी असल्या जगण्याचा
मग उगाचच जमा झाली आप्तेष्टांची टाळकी
प्रथेप्रमाणे "चांगला होता हो!" म्हणायला
आणि कोरडेच डोळे मुद्दामहून पुसायला
कवटी फुटली, तसे सगळे घरी गेले
केव्हाचे उपाशी होते, भरपेट जेवले!
वेळ आली पिंड ठेवायची
कावळ्याला बोलवायची..
पण येईल कसा?
मी तिथे असताना?
बसा ओरडत... "कां...!! कां...!! कां...!! "
मीसुद्धा आयुष्यभर हेच विचारात होतो...
"का? का?.... का?"
हजारो इच्छा माझ्या अपुऱ्या राहिल्या आहेत..
किती जणांना बोलवाल?
माफी मागायला...
वचने द्यायला..
कबुल करायला...
खरं बोलायला.....
जाऊ द्या...
दर्भाचा कावळा करा
अन समाधान करून घ्या स्वत:चं...!
मी बघून घेईन माझ्या मुक्तीचं...........
....रसप....
प्रतिक्रिया
17 May 2012 - 5:13 pm | नाना चेंगट
जाऊ द्या...
दर्भाचा कावळा करा
अन समाधान करून घ्या स्वत:चं...!
मी बघून घेईन माझ्या मुक्तीचं...........
ओके. जेवणाचं ताटं कुठं मांडलं आहे?
17 May 2012 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार
ते त्यांच्या ब्लॉगवरती मांडलेले असते.
इथे ते फक्त पिंड घेऊन कावळ्यांना शोधत येतात.
17 May 2012 - 5:22 pm | प्रभाकर पेठकर
दाहक सत्य. बहुतेकांचा अनुभव असाच असतो.
कारण 'काकस्पर्श' कावळ्यांच्या भूकेवर अवलंबून असतो.
17 May 2012 - 5:50 pm | अमोल केळकर
काकस्पर्श
दहाव्याला तो तूझा स्पर्शच !
कायमची देतो मुक्ती !
हे घडवून आणण्यासाठीही !
माणसे वापरातात अनेक युक्ती !!
17 May 2012 - 8:03 pm | पैसा
बरेच दिवसांनी आलात, पण कविता छान! अगदी दाहक सत्य.
18 May 2012 - 7:43 pm | रसप
गेल्या काही दिवसांत मला खरोखरीच फारसा वेळ नसल्याने ह्या मंचावर फार येता आले नाही. त्यासाठि क्षमस्व आणि प्रतिसादांसाठी आभार.