तुमच्या प्रतिभेची लखलखती आभा .
मान्यय माझी .. सांजावाती प्रभा :)
तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका
उध्वस्त राहु द्या माझी ही लंका :(
सोन्याने सजावा हा तुमचा महाल
सोडा हो चिंता, मी नाही बेहाल :cool:
उजळावे दिव्यांनी तुमचे शिवार
नकोय ते मला, चांदणे उधार :tired:
तुमच्या दयेचा ना करते स्विकार
उसन्या प्रतिमांचा त्रिवार धिक्कार
,
,
सृजनआंगण फुलेल जेव्हां
क्षितिजाला देईन धडका मी तेव्हां
आकाशगंगेची फिरविन भिंगरी
भिरकावून देईन गोवर्धन गिरी
कशास करता हो तुलना कुणाशी
संवाद करते मी विश्वेश्वराशी ..! :innocent:
- संध्या
प्रतिक्रिया
3 Mar 2012 - 2:36 pm | चौकटराजा
लंका ही स्वर्गाहूनही रम्य होती पण तिचा स्वामी 'दुरात्मा' होता . आपण स्वत: ला दुरात्मा का म्हणवून घेता लंकेशी आपला संबंध जोडून !
यमकाची इतकी हौस बरी नव्हे !
3 Mar 2012 - 2:42 pm | चौकटराजा
खरे तर कविता हा साहित्य प्रकार उर्मीतून येणारा असल्याने तो दुसर्याने दुरूस्त करूच नये तरीही
तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका
अपयशाचा असू दे या भालावर शिक्का
अगोचर पणा बद्द्ल क्षमायाचना !
3 Mar 2012 - 4:21 pm | सांजसंध्या
चौकटराजा
कविता मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद. लंका ही वैभवाची प्रतिक आहे. पण उद्ध्वस्त लंका हे रया गेलेल्या साम्राज्याचं प्रतिक म्हणून वापरलंय. :)
3 Mar 2012 - 7:33 pm | चौकटराजा
यश आणि उध्वस्तता या कल्पनाच वेगळ्या क्षेत्रातील . यशाचा विरोधी बिंदू अपयश , उध्वस्त हा शब्द वरच्या ओळीत रचना, बांधणी , निर्मिती या संकल्पना आल्या असत्या तर बरोबर ठरला असता ! याबाबत गदिमा यानी लिहिलेले एक उदाहरण
मी भीक मागणारी दातार तू उदार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार ?
यात पहा एक भिकारी- एक देणारा, विरोध व पुन्हा दातार ( हा कधी नकार देतो का?) त्याला खालील
ओळीत विरोध नकार !
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार
हेच असे लिहिले असते तर
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी माती लहरी शेती अजब तुझा हुंकार !
वर सरकार ही कल्पना आल्यानंतर खाली शेती माती म्हणजे केंद्रातील शेती मंत्र्याचे सरकार काय ? असे कुणी विचारेल .
3 Mar 2012 - 9:31 pm | सांजसंध्या
चौकटराजा
तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. आपण मनापासून सांगत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कविता उलगडून सांगणं हे थोडं कष्टाचं काम आहे पण तुम्ही या कवितेत दाखवलेला रस पाहून ते करताना आनंदच होतोय. .
कवितेतल्या नायिकेचं वैभव म्हणजे तिची प्रतिभा. सृजनशीलता. तिच्यापेक्षा प्रतिभावान, सृजनशील व्यक्तीं या जगात आहेत हे वास्तव तिला मान्य आहे. या वास्तवाचा ती नम्रतेने स्विकार करते. या सर्वांच्या वैभवाचा तिला आनंदच आहे. असूयेचा प्रश्नच नाही. कारण तिच्याकडे दुर्दम्य आत्मविश्वास आहे. एक ना एक दिवस तिच्या अंगणातही सृजन फुलेल. या आत्मविश्वासाचं कारण नायिका सांगते कि तिचा संवाद थेट विश्वेश्वराशी आहे... अशी कल्पना !
आपल्याला मनापासून धन्यवाद.
4 Mar 2012 - 9:17 am | चौकटराजा
तारूण्यात कविता करायची उर्मी महान असते .
मी काही तारे ३५ वर्षापूर्ची तोडले होते. त्याचा संबंध दूरान्य्वयाने तुमच्या थीमशी आहे म्हणून लिहित आहे
ती मला काही किंमत देत नाही . मी शेवटाला लाईन मारून थकलो. मग निसर्गात मला हवी असलेली " ती" शोधू लागलो तर काय होईल ?
आज पुसटपणे चार ओळी आठवतात.
आकाशीच्या कडा रूपेरी, कधी निळ्या, कधी कधी का़ळया, लाल
नाही केवळ तुझ्याच नयनी रंगतरंगी मायाजाल !
हास्य खळखळे धवल फेनली निर्झर वाहे झरझरी
नको केवळ तुझ्या स्मिताची फुशारकी अन मात्तब्बरी !
वरची ओळ व खालची ओळ यात काही समान धागा प्रत्येक कडव्यात आढळतो का पहा बरे ?
4 Mar 2012 - 1:01 pm | सांजसंध्या
आकाशीच्या कडा रूपेरी, कधी निळ्या, कधी कधी का़ळया, लाल
नाही केवळ तुझ्याच नयनी रंगतरंगी मायाजाल !
हास्य खळखळे धवल फेनली निर्झर वाहे झरझरी
नको केवळ तुझ्या स्मिताची फुशारकी अन मात्तब्बरी !
काका
हा माझ्यासाठी अवघड पेपर आहे. मी आपली ट ला ट जुळवत खरडत असते काहीतरी :) समजून घ्यायचा प्रयत्न करत्येल !
4 Mar 2012 - 4:52 pm | चौकटराजा
पाडगावकर ही या फेज मधून गेलेले दिसतात . त्यांच्या कवितांमधे पहिल्या पहिल्यांदा मोर हा प्राणी कधीही नाचत असे !
4 Mar 2012 - 8:50 pm | रघु सावंत
छान जमलय, सुधाराल हळूहळू
5 Mar 2012 - 6:02 am | सांजसंध्या
रघु आभार
चौ.रा. काका
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मला नितांत आदर आहे. हा आदर ठेवूनही एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटतेय ती म्हणजे मला जे म्हणायचंय ते स्पष्ट म्हटलंय कवितेत. कविता फसलेली वगैरे मुळीच नाही. प्रतिमांचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. एकदा कविता सादर केली कि ती आपली रहात नाही. अर्थात कविता प्रत्येकाला वेगळी दिसते, आणि ज्याला ती जशी दिसेल त्याच्यापुरता तोच अर्थ खरा असतो. म्हणूनच येणा-या प्रत्येक प्रतिक्रियेचा आदर आहे. आपले मनःपूर्वक आभार.
7 Mar 2012 - 3:51 pm | चौकटराजा
मी इथे विविध विषयांवर प्रतिक्रिया देत आहे. अर्थात स्वता: च्या मनाशी ईमान राखून !
मी तरूण असताना माझ्याकडे एक नवकवि यायचा . एकदा आला कविता घेऊन दाखवायला. वयाने मजपेक्षा मोठा.
लिहिले होते मृदुंगाच्या तुटल्या तारा ....
मी त्याला म्हणालो अहो ,मृदुंग हे आघात वाद्य आहे.त्याला तार कशी असणार ती छेडवाद्याला असते.
तुमच्या कवितेत मृदुंगाला दाव्याला बांधायचे असेल ना तर किमान मृदुंगाच्या तुटल्या वाद्या ( कातडे ताणण्यासाठी असलेल्या ) असे तरी म्हणा
हिरवे आकाश कधीच नसते.
चुकत चुकत शिकणारा हा कवि पुढे महाराष्ट्र पातळीवरील काव्य संमेलनाचा अध्यक्ष झाला.
लगे रहो पुत्री !
मला चौराकाका ही पदवी आवडली. यंका माडगूळकरांच्या " बिटाकाका" ची आठवण करून देणारी१ आभार !
8 Mar 2012 - 8:24 pm | सांजसंध्या
पुढे महाराष्ट्र पातळीवरील काव्य संमेलनाचा अध्यक्ष झाला.
व्वॉव ! नाव कळू शकेल का ?