धडाड धुरळा उडतो गगनी
पुन्हा भय जनी दाटते गा
एकमेकां सारे सावरू धावती
निस्तरू पाहती पुन्हा तेच
सुटकेचा कोणी टाकती निःश्वास
कुणाचा प्रवास संपलेला
विव्हळत जागे कोणी वेदनांत
कुठे डोळियांत पाणी साचे
चित्रवाणीवर वृत्त साकळते
जगाला कळते घडले ते
परिस्थिती कोणी सांगे विवरून
काय हो कारण घडे त्याचे
निषेधाचे कुणी पेटवी पलिते
शांत राखा माथे म्हणे कोणी
कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक
शूर नि सोशिक धैर्यवंत
उलटते रात येता येता नीज
पुन्हा नवा आज उजाडतो
भयशंका मनी दाटल्या घेऊन
चालती गा जन तीच वाट
कुजबुज कुठे संताप थोडासा
अगतिकचासा एक एक
पोट शिकविते धैर्य ते अटळ
अन्य काही बळ नाही तेथे
प्रतिक्रिया
15 Jul 2011 - 12:41 pm | गणेशा
कविता खुप छान लिहिली आहे.. मनातील तळमळ स्पष्ट जाणवते आहे.
असेच लिहित रहा... वाचत आहे...