माझं कोकणातलं गांव :- भाग - १
झुकझुक झुकझुक अगीन गाडी,धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहुया, मामाला गावाच्या जावूया ||
हे गाणं लागलं की कि मनाला खरं तर काकाच्या गावापेक्षा मामाचं गावं (म्हणजे आजोळ) सगळ्यांना जास्त प्रिय असतो हे पटायला लागतं. पण मला मात्र दोन्ही गावे तेवढीच आवडतात. काकाचे गाव म्हणजे आमचेच घर सगळ्यात जास्त आवडते.
मला एकुण ८ मामा व एक मावशी (रा. दापोली)त्यापैकी चार गावाकडे राहिले, तर चार कळव्याला माझ्या आई बरोबर रहायला आले, जसजसे लग्न जमत गेले तेव्हा स्वःताहाचे बिर्हाड करित गेले. मग त्यांची समवयस्क मुले, मामा, मामी, आणि आम्ही सगळे गावाला कधी जायचे ह्याचे बेत ठरवण्यासाठी आमच्याकडे जमत असत. आम्ही लहान थोर मिळुन सगळेजण १९ जण होतो.(सन १९९५ पर्यंत सगळे उत्सव/ सण आम्ही एकत्र जमुन साजरे करित असु पण आता जमाना बदलला आहे. मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.)
तर लहानपणी मे महिन्याची सुट्टी लागली की सर्व मामा आमच्याकडे येवुन गावाला कधी जायचे याचे बेत आखत असत. मामाच्या गावाला जायच्या ८/१० दिवस आधी आम्ही वडिलांच्या (ता.गुहागर) गावी जावुन तिथली मजा लुटुन मग लाँचने दाभोळ खाडी पार करुन , दापोलीला आजोळी जात असू. (मामाचे गाव तिवरे. दापोली पासुन फक्त ६ किमी अंतर).
या मामाच्या घरात आता कळव्याचे मामा, मामी त्यांची मुले, आम्ही ५ जण आणि गावाकडची मामा मंडळी असे सगळे मिळुन २२ जण जमत असु. धमाल नुसती.
एकदा का एस्टी ने पनवेल सोडलं की गवताच्या हिरवळीचा, भाताच्या पेंडीचा एक वेगळा वास नाकात भरुन राहयचा. गावला गेल्यावर यंव करु तेंव करु याचे मनसुबे महाड येईपर्यंत पेंगुळलेल्या मनाने घेतले जायचे.
मग महाडला कंडक्टर "गाडी जेवणासाठी १५ मि.थांबेल बरंका , फक्त १५ मि.थांबेल " अशी आरोळी द्यायचा की आम्ही गाडीतच पोटपुजा आटपुन घ्यायचो. बाकी लाल डाब्याची गाडीची स्थानके (यस्टी स्टँड) म्हणजे लाऊड स्पीकरवरुन होणारी कर्ण कर्कश्य उदघोषणा, आSलेSपाक, चिक्की, कापुन ठेवलेले कलिंगडाचे, काकडीचे काप ,ऊसाचा रस इत्यादी पदार्थांचे ठणाणा करणारे विक्रेते, पाठीकडल्या बाजुला असलेलं गॅरेज, बाजुलाच उभ्या असलेल्या भंगारातल्या गाड्या, वातावरणात भरुन राहिलेला मुतारीचा वास, त्यात कँटिन मधले कळकटलेलं वातावरण त्यामुळे खाली उतरावेसे वाटायचे नाही. पण ठाण्यापासुन ४/५ तास बसुन पाय आखडलेले असायचे तेव्हा थोडं फिरणं व्हावं म्हणुन वडिलांबरोबर खाली जाणं व्हायचे. (गेली काही वर्षे या लाल डब्यानं जाणं झालंच नाही).
मग पुढे कशेडीच्या घाटात दुरवर दिसणारा रस्ता आणि गाड्यांचा माग काढत मन पुन्हा ताजंतवानं व्हायचं. पुन्हा गावाकडे धांव घ्यायचं. आता मात्र ही लहानपणीची मजाच गेली. कारण लहान होतो तेव्हा आईवडिलांबरोबर आम्ही फक्त मे महिन्यात जात असु तेही वर्षातुन एकदा जायचो म्हणुन असेल कदाचित पण आता तर काय बारा महिने केव्हाही ये जा चालु असते , ती सुद्धा दोन्ही बाजुंनी. त्यातुन दर आठवड्याला मोबाईलवर होणारे संभाषण होय.
दोन गाड्या बदलुन स.५ वा. घर सोडलेला माणुस संध्या. ७ वा. गावात पोहचायचा. पण स्टॉपवर उतरलं की दिवसभरचा शिणवटा पळायचा. लाल धुराळा उडवित गाडी पुढिल गावा कडे निघायाची, मग तो धुराळा खाली बसला की निसर्गाचे पहिले दर्शन तिथेच व्ह्यायचे. मागील गावाहुंन आलेला नी पुढल्या गावाला नागमोडी जाणारा लालभडक रस्ता, दुतर्फा असलेली लाल धुळवडीने माखलेली करवंदाची जाळी, खाली १०० फूट खोल असलेली दाभोळची खाडी, खाडी किनारी वसलेली मच्छीमार लोकांची वस्ती, खाडीत असलेलेया मच्छीमार लोकांच्या झेंडा फडकवणार्या नौका, ट्रॉलर, पडाव आणि त्यांच्या इंजिनाची लयबद्ध घरघर, समोर पलिकडच्या तीरावरचे हिरवे, पिवळे गवत असलेले डोंगर, त्यांची खाडीतली पुढे आलेली पक्ती(लाँच धक्क्यला लागावी म्हणुन केलेली जेटी); तर विरुद्ध बाजुला गावाची शेती आणि त्या पुढे गावची ७ वी पर्यंतची कौलारु शाळा, आणि पुढे नागमोडी वळणाने गावच्या विठ्ठलाच्या देवळाला वळसा मारत गावात जाणारा चढता रस्ता.
हाश हुश करत बॅगा सांभाळत पुढल्या अंगणात पोहचलो की हाताहली कामं टाकुन सगळेजण धावत स्वागताला यायचे सामान उचलुन घरात न्यायचे, लगेच गुळाचा खडा आणि पितळेचा पाण्याचा तांब्या पुढे यायचा (हे पाणी दगडाच्या द्रोणीतले म्हणुन ठंडगार असायचे ), पायला वाकुन नमस्कार, दोन्हीकडची ख्याली कुशाली, मधेच पाठीवर धपाटे सगळं कसं क्षणार्धात अकृत्रीमपणे घडुन यायचं.
आजोबा, आजी, काकू (हिला मी मात्र "कुका" म्हणतो कारण माझं "पम्या" असे बारसं तिनेच केलंय म्हणुन), आत्या, काकुची मुले, (काका बहुतेक करुन सुपारीच्या बागेत शिंपणं करायला गेलेले असायचे) एवढ्या सगळ्यात आता आमची भर पडलेली असायची.
नव्याचे जुने होवुन गेलो की हात पाय धुवुन आम्ही घरभर हुंदडायला मोकळे. गोठातल्या म्हशीला चारा घालणे, पाणी पाजणे हे पहिलं कांम. पण ते सगळं लांबुन पण आत्या, चुलत बहिण यापैकी कोणी जवळ असलं तर जनावराच्यां पाठीवरुन हात फिरवायची हौस भागवुन घ्यायची. कळत नसुनही तिथल्या गड्याला ही तानी आहे की पाडसी असे प्रश्न विचारायचे.
आमचं घर ऐसपैस ११ उंबरं (यांत घरातले दरवाजे पण आले) असलेले, चार दिशेला अंगण घराच्या समोर सुपारीची बाग, घराजवळ मोठा पाण्याचा हौद, त्यात सुपारीच्याच झाडापासुन बनवलेल्या पन्हळीतुन लांबच्या पर्यातुन वाहुन आणलेले पाणी (पर्या म्हणजे खुप मोठे दगड/धोंडे असलेली दोन डोंगराच्या मधल्या बेचक्यांत वाहणारी नदी किंवा ओढा ज्याला मे महिन्यात कमी पाणी असते तर पावसाळ्यात ती दुथडी भरुन वाहत असते), सुपारीच्या बागेला कुंपण म्हणुन उभे केलेले निवडुंगाचे रोपण, हौदाभोवती असलेल्या पाणथळ जागी स्वयंभु उगवलेली लव्हाळी, कासाळु(याचे सांडगे करतात), अळु(काळा दांडा असेल तर अळुवड्या, फदफतं यासाठी), हौदाच्या दोन्ही बाजुंनी उभी असलेली केळीची फोकं, तर मग पुढे हेच पाणी वळचणीला जात मोगरा, अनंत, कणेरी,चाफा, गुलाब, गोकर्ण, जास्वंद अशा अनेक फुलझाडांना फुलवत खळ्यात येत असे.
काका खळ्यात टोमॅटो, भेंडी, पडवळ,घोसाळी,काकडी, वांगी, मिरची, भुईमुगच्या शेंगा, पावटा असे काही बाही लावत असे. घराभोवताली असलेली इतर आंबा, फणस, माड ही झाडे तर मे महिन्याच्या उन्हात घराला सावली देणारी आच्छादनंच होय.
घरात माणसांचा गडी माणसंचा राबता फार असायचा. आम्ही ब्राम्हण, त्यात आजोबा फौजदार होते. शेती संरक्षणासाठी सरकारने एक डबल बारी बंदुक दिलेली होती. दोन काका (वडिलांचे २ लहान भावु, ३ नं. चा भावु पोलियोमुळे एका पायाने अधु होता), एक काकू , ३ आत्या, २ चुलतभावु, २ चुलत बहिणी, आजोबा, आजी सगळे मिळुन १५ जण होतो.
आता रात्रीचे ८ वाजायाला आले की बाहेर चांगलाच अंधार झालेला असायचा, मग बाहेर फिरणं बंद. कारण एकच गुडुप आंधार, काजवे चमकायचे , हौदाच्या खालच्या तळाकडिल दगडां मधुन बेडकांचे डरांव डरांव आरोळ्या, रातकिड्याचे किर्र किर्र आवाज , मध्येच जोराचा वारा आला कि आंबा, फणस, पिंपळ यांच्या झाडांच्या पानांची सळसळ, खुप घाबरायचो तेव्हा. पण आत्ता त्याचे हसु येते.
मग पेट्रोमॅक्सचे दिवे लागायचे(गावात वीज १९८० साली आली).मग सगळी बच्चे कंपनी मिळुन त्या दिव्याभोवती हुल्लडबाजी करत असायची, भिंतीवर आमच्या सावल्या पडलेल्या असायच्या. मग एका सुरात सगळे जण पर्वचं म्हाणायला देव घरात जमायचे रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे झालेली सुरवात करायचो ते शेवट मोरया मोरया मी बाळ तान्हे... ने व्हायचा. कोणाला किती पाठ आहे यामध्ये चढाओढ लागायची. नंतर रात्री ८ वाजता केळीच्या पानावर गरम गरम मऊ भात, वाटी भर दही, भाकरी, बिरडं नाही तर आपल्याच खळ्यातली टोमॅटो, भेंडी, पडवळ (वाल घालुन केलेली) भाजी असायची.
सगळ्यांची जेवणे झाली की आम्ही लहान मुलं पत्ते (झब्बु,नॉट अॅट होम, मेंढीकॉट,चॅलेंज, ५ ३ २ काहीही), सारीपाट, असे खेळ खेळायचो, तर मोठी मंडळी ओटीवर गप्पांचा फड जमवत असत. आत्ता पर्यंत आमच्या घरी कामाला असाणारे (बागकांम, म्हशीची देखभाल इ.साठी)कुलवाडी गडी सगळ्या वाडीत "मुंबैस्न भावु (माझ्या वडिलांना भावु म्हणतात)आलाय बरंका बायका, पोरंस्नी घेवुन आलाय!" असा प्रचार केव्हाच केलेला असायचा की त्या घरातेली वडिलांच्या वयाची माणसं आमच्या घरी विचारपुस करायला यायची. त्यातली एक जण तर खुपच म्हातारी होती. आली की बिचारी आम्हा सगळ्यांच्या तोंडावरुन आपले सुरकुतले हात फिरवायची आणि मग बोटं मोडायची. आमच्या सकट आई वडिलांच्या गालाचे हाताने गालगुच्चे घ्यायची. आम्ही गालातल्या गालात खुदुखुदू हसत असू. पण "मुंबैतले चाकरमानी बरा अस्सा ना!" असे म्हणायची. ते कोकणी माणसाचे निर्व्याज प्रेम होतं.
रात्री ९ वजले की काकुची आम्हा मुलांनी झोपावे म्हणुन एक घोषणा व्हायची "सकाळी धराणावरच्या बागेतल्या शिंपणाला कोणाला जायचे आहे ?"
"मीS मीS मीS" आम्ही सगळे एक सुरात ओरडायचो.
"मग चला लवकर झोपा पाहु, नाहीतर काका लवकर ऊठुन जातील हो तुम्हाला न घेताच."
मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.
(बागेत हमखास सगळे पक्षी, कोकिळा, चंडोल, मोर, कौंडर असायचे. एकदा तर काकाला पाणंदीतुन पाट साफ करत जाताना बिबिट्या वाघ आडवा आला होता. वाघ,साप,विंचु गावची रामभोळची गुहा असे अजुन बरेच किस्से आहेत पण त्याविषयी पुढिल लेखात जसं जमेल तसे.)
-- क्रमांश --
तळटीप :- मी आज पासुन "माझं कोकणातलं गांव " या सदरात जसं आठवेल तसं, जसं जमेल तसं माझ्या कोकणतील गुहागर तालुक्यातील वडिलांच्या गावाकडचे व दापोली तालुक्यातील आईच्या गावाकडचे वर्णन,अनुभव,किस्से , छायाचित्रांसहित कथन करणार आहे. या मध्ये कोणताही प्रसंग काल्पनिक नसणार आहे. पण कोणताही प्रसंग स्मरणशक्तीने दाद न दिल्यास मागे पुढे होवु शकतो तेव्हा चु.भु.दे.घे.वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तं. म्हणजे एकूण
सुंदर. कोकणातल्या वाडीत
भावलं .
मस्त सुरुवात....
वाचतोय.
छान!
@ सौंदाळा - मुक्त विहारि -
तब्बेतीत लिहा!
मस्त !
मस्त लिहिलय! पु.ले.प्र.
वाह वाह !!
सॉलिड झाला आहे हा भाग...
सुंदर नॉस्टाल्जिक लिखाण....
मस्त जमलाय लेख
आवडतंय लिहीत राहा. पुभाप्र.
प्रमोदराव, लिहीत रहा!
+१
आमचं कोकण आहेच तसं छान!
भारी लिहिताय.
धन्स
शिद, कुसमावती, अजया, मन्द्या, सानिकास्वप्निल, अदुबाळ, अनन्या, रेवतीतै, प्यारे सगळ्यांना धन्स .
वाटलं नव्हतं एवढं आवडेलसं.
वाचणारे, प्रतिसाद देणारे, आणि वाचुनही प्रतिसाद न देणारे सगळ्यांना धन्यवाद!
वाचुनही प्रतिसाद न देणारे
१ नंबर
मस्त लिहिताय. बालपणीच्या
वा प्रमोदराव, एकदम लहानपणा
सकाळी पाच वाजताची ठाणे चिपळूण
पम्या, भुताच्या गोष्टी
सगळ्यांना धन्स
मला सांगाल तर मी माझ्या गावाला घेवुन जाईन.
आवडलंय !
कोकण खरच प्रेमात पाडत.
छान लेख
मस्तच...
अरे वा !
धन्स
मस्त !
सुरेख कोकण दर्शन . रविन्द्र
सुंदर लेखन, प्रत्यक्ष कोकणात