नमस्कार मित्र/मैत्रिणींनो,
कंपनी म्हणजे आपण जिथे/ज्यासाठी काम करतो ती हा अर्थ अभिप्रेत आहे इथे. असो.
*****************************************************************************
साधारण ३०/४० वर्षांपुर्वी नोकरी लागणे आणि ती "परमनंट" असणे हा एक अतिशय महत्वाचा विषय होता. नोकर्या कमी होत्या आणि "आयटी" नावाची गोष्ट नव्हती. मुलाला कायम नोकरी असली की त्याला हजार उत्तमोत्तम मुलींची स्थळे येत. गेल्या दहा-पंधरा वर्षात काळ थोडा बदलला. आयटीमधील मुलाला अशी स्थळे येत राहिली. अजुनही परिस्थिती काहीशी तशीच आहे. हे सांगायचं कारण म्हणजे एखाद्याचा यशस्वीपणा मोजायचा म्हंटला की परीमाणे काळानुसार बदलत गेली. आता तर फारच बदल झपाट्याने घडतोय.
अजुनही आयटी मधे पगार तुलनात्मक रित्या जास्त असले तरी फार काळ ही परिस्थिती राहणार नाही असे दिसते.
मग आपण कोणत्या कंपनीमधे काम करतो?, ती चांगली कशी, किंवा का नाही, वेळीच स्वतःमधे बदल कसे करावेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. मी स्वतः याबद्दल साशंक आहे. असो.
बहुतांश वेळा 'कंपनी गेली खड्ड्यात, माझा पगार चालू आहे ना?" ही मानसिकता दिसते. पण ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे हे माझे मत आहे. ही मानसिकता नवख्या लोकांसाठी ठिक आहे, पण जे लोक वर सरकले आहेत, ज्यांचा पगार बराच जास्त आहे त्यांच्यासाठी बिलकुल चांगली नाही. तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत असतानाच, "मुल्य" हा फार महत्वाचा मुद्दा आजकाल ग्राह्य धरला जातो. त्यामुळे ज्याचा पगार जास्त त्याचा नोकरी जाण्याचा धोकाही जास्तच. (भारत असो वा अमेरिका, हे सर्वांनाच लागू आहे)
मग आपण काय करावे? माझ्या मते (मी आयटी/बँक्/ईंशुरंस/ऑटोमेशन अशा कंपन्यांमधे काम केले आहे म्हणून) खालील काही निकषे ध्यान्यात घ्यावीत.
१. माझी कंपनीला कितपत गरज आहे?
२. माझ्यामुळे कंपनीचे किती अडते?
३. माझी गुणवत्ता आजच्या काळात कितपत ग्राह्य आहे?
४. माझ्याकडे सध्याची नोकरी गेली तर इतर काय पर्याय उपलब्ध आहेत?
५. कंपनीने दिलेल्या सुविधांचा मी योग्य वापर केल्यास काही फायदा करु शकतो का?
६. (वाईट पर्याय पण जीवावर बेतली तर) माझ्या "काँटॅक्ट्स"/ओळखी वापरून मी तरेन असं काहीसं.
७. ईतर..
तर मित्रांनो,
इथे जाणकार मंडळी आहेतच, एक चर्चामंथन व्हावे, त्यातून एखाद्याचे भले व्हावे अशी आशा आहे.
(मागे एका आज नसलेल्या आयडीमुळे माझे विचार थांबले होते.. पण असो. तुमचे विचार नक्की मांडा)
आपला,
मराठमोळा.
प्रतिक्रिया
24 Apr 2013 - 1:40 am | श्रीरंग_जोशी
कंपनी एक हस्ती होती हैं जो सिर्फ अपना फायदा देखती हैं...
मंगल पांडे - द रायझिंग या चित्रपटातला हे एक वाक्य जे त्रिकालबाधित सत्य आहे.
अन
डोन्ट लव्ह युअर कंपनी, लव्ह युअर जॉब, बिकॉज यू नेव्हर नो, व्हेन द कंपनी स्टॉप्स लव्हिंग यू...
इन्फोसिसच्या श्री नारायणमूर्ती यांनी मांडलेला विचार खूपच मोलाचा आहे.
वरील प्रश्नांची उत्तरे
१. माझी कंपनीला कितपत गरज आहे? - बरीच गरज आहे
२. माझ्यामुळे कंपनीचे किती अडते? - थोडेफार अडते
३. माझी गुणवत्ता आजच्या काळात कितपत ग्राह्य आहे? - आजच्या काळात नक्कीच ग्राह्य आहे, उद्याचे सांगता येणार नाही
४. माझ्याकडे सध्याची नोकरी गेली तर इतर काय पर्याय उपलब्ध आहेत? - अशीच नोकरी दुसर्या कंपनीत शोधणे. अख्ख्या क्षेत्राचीच वाट लागली असेल तर मग फारच कमी आहेत, कदाचित खाजगी शिकवणी वर्ग वाले शिक्षक म्हणून निवडतील.
५. कंपनीने दिलेल्या सुविधांचा मी योग्य वापर केल्यास काही फायदा करु शकतो का? - नक्की, पण कंटाळा येतो कामापलिकडे काही करण्याचा.
६. (वाईट पर्याय पण जीवावर बेतली तर) माझ्या "काँटॅक्ट्स"/ओळखी वापरून मी तरेन असं काहीसं - नेमकं सांगता येणार नाही...
७. ईतर.. - कंपनी आज यशस्वी आहे की अयशस्वी यापेक्षा बाजारात तगून राहण्यासाठी धोरणांत बदल करण्याची वृत्ती त्या कंपनीत असेल तर आपण कारण न बनवल्यास नोकरी जायचा धोका बराच कमी होतो.
नोकरीवरून कमी केले जाणे भारतात खूपच अपमानास्पद समजले जाते. पण अमेरिकेत हे अगदी सहजपणे घेतले जाते.
यावर अधिक विचार करून लिहिन...
24 Apr 2013 - 11:09 am | मैत्र
डोन्ट लव्ह युअर कंपनी, लव्ह युअर जॉब, बिकॉज यू नेव्हर नो, व्हेन द कंपनी स्टॉप्स लव्हिंग यू...
इन्फोसिसच्या श्री नारायणमूर्ती यांनी मांडलेला विचार खूपच मोलाचा आहे.
हे नारायणमूर्ती यांनी म्हटलं आहे असा कुठलाही पुरावा नसावा. ढकलपत्रातून अनेकदा वाचलं आहे.
प्रत्यक्ष मूर्ती यांना अशा स्वरुपाचं विधान करताना कधीही ऐकलं नाहीये. त्यांचे विचार थोडे वेगळे आहेत.
24 Apr 2013 - 7:16 pm | श्रीरंग_जोशी
खूपदा वाचल्याने माझा तसा समज होता. जालावर शोधले असता स्टीव जॉब्सने तसे म्हंटल्याचा उल्लेख (पुरावा नाही) मिळाला.
अवांतर - यावरून जुलिओ रिबेरो यांचे बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक आठवले. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की त्यांच्या सहकार्याचा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाल्यावर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना पोलिस महासंचालक म्हणून अतिरेक्यांना कडक उत्तर दिले जाईल असे काहीसे म्हंटले होते पण एका पेपरने 'सॅलुट फॉर सॅलुट, बुलेट फॉर बुलेट' हे सैन्यदलाच्या बाबतीत म्हंटले जाणारे वचन त्यांनी म्हंटले असे छापले.
यावर एवढा गदारोळ झाला की रिबेरोंचे मी तसे काही म्हंटलेच नाही हे स्पष्टीकरण वाळक्या पानासारखे उडून गेले. शेवटी त्यांनी त्यावर बोलणेच सोडून दिले अन ते वाक्य त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर कायमचे जोडले गेले.
24 Apr 2013 - 1:52 am | उपास
१. नोकरीशिवाय इतर काय पर्याय समोर आहेत? जसे की उद्योग धंदा, त्यासाठीचे भांडवल, धोका घ्यायची आणि मेहनत घ्यायची तयारी/ मानसिकता ह्याचा ही उहापोह करावा कारण लव्हिंग व्हॉट यु डू मॅटर्स! रोजगार निर्मिती करुन रिकाम्या हातांना काम आणि संधी देण्याची अनुभवातून आलेले क्षमता आणि इच्छाशक्ती आहे का ते ही महत्त्वाचं!
२. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही आहात, तुमची गुंतवणूक कशी संतुलित आहे हा ही मह्त्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल.
नोकरी संदर्भात बरेच मुद्दे मांडता येईल, वेळ मिळत जाईल तसं लिहिन, तूर्तास वरील प्रश्न थोडेसे अवांतर असले तरी चर्चेच्या विषयाच्ञा कारणाशी जवळचे आहेत म्हणून मांडले.
24 Apr 2013 - 1:54 am | शुचि
माझ्यामुळे कंपनीचे किती अडते हा विचार करता करता हसूच कोसळले :(
24 Apr 2013 - 1:59 am | श्रीरंग_जोशी
माझ्यामुळे कंपनीचे किती अडते हा विचार करता करता रडूच कोसळले:-(
:-( अशा स्मायलीमुळे वरील वाक्यासारखा अर्थ निघाला... :-)
24 Apr 2013 - 10:21 am | वामन देशमुख
ज्याक्षणी माझी गरज संपेल त्याक्षणी मी नोकरीवरून काढला जाईल.
ज्याक्षणी माझ्यामुळे अडणे संपेल त्याक्षणी मी नोकरीवरून काढला जाईल.
ज्याक्षणी माझी गुणवत्ता ग्राह्य असणे संपेल त्याक्षणी मी नोकरीवरून काढला जाईल.
पर्याय हवेत, नसतील तर निर्माण करायला हवेत. (बेंचवरील भरतीद्वारे कंपनीही तेच करते- तुम्हाला पर्याय तयार ठेवते)
प्रश्नाचा रोख कळला नाही; तथापि, सुविधांचा योग्य वापर केल्यास फायदा होतोच.
नोकरी-व्यवसायात ओळखी असण्याचा मुख्य उपयोग हाच तर आहे!
अवांतर: ज्याप्रमाणे तुम्हाला कधीही कंपनीची नोकरी सोडण्याचा हक्क आहे, तसाच कंपनीलाही तुम्हाला कधीही नोकरीवरून कमी करण्याचा हक्क आहे… या जगात एकतर्फी प्रेम करून काही उपयोग होत नाही.
24 Apr 2013 - 11:13 am | मैत्र
शक्यतो, आपले कौशल्य हाच आपल्या कंपनीचा मुख्य व्यवसाय असावा. म्हणजे, आइटीमधील तज्ज्ञ व्यक्तीने, इतर क्षेत्रातल्या कंपनीच्या आइटी विभागात (EDP) मध्ये काम करण्यापेक्षा आइटी कंपनीमध्येच काम करावे. (हे योग्य आहे का याची खात्री नाही, किंबहुना ते मिपाकरांनी ठरवावे अशी विनंती!)
हा मुद्दा अनेक जण मांडताना दिसतात. विचार असा की सपोर्ट फंक्शन मध्ये काम करू नये. कंपनीच्या मुख्य व्यवसायाचा भाग असला की तुमची गरज आणि त्याहून जास्त महत्त्व जास्त असते.
मग कोणीच मॅन्युफॅक्चरिंग अथवा आयटी कंपनीच्या अकाउंटिंग वा फायनान्स मध्ये कामच करू नये का?
अनेक मोठ्या कंपन्यांच्या आयटी विभागात महत्त्वाची पदे असतात. तिथे जबाबदार्या, कामाचे स्वरुप हे भारतीय आयटीच्या पाट्या कामापेक्षा काही वेळा चांगले असू शकते.
मग हा मुद्दा कितपत ग्राह्य आहे.
24 Apr 2013 - 12:36 pm | निखिल देशपांडे
मैत्र यांचा मुद्दा पटतो..
त्यात एक उदाहरण देउन बघतो.
आताशा बर्याच मॅन्युफॅक्चरिंग/रिटेल व ईतर नॉन आय टी कंपन्यांनी ERP सिस्टम घेतलेली असते. या कंपन्या या प्रकारच्या सिस्टिम्स वर बर्यापैकी अवलंबुन असतात. आहे ती पद्धत बदलणे हे काही सोपे काम नाहि. त्यामुळे समजा मंदी चालु आहे मार्केट मधे मंदी चालु आहे तर अशा कंपन्या त्यांची सिस्टम तर बंद करु शकत नाहीत. या कंपन्यांकडे आय टी साठी भली मोठी टिम नसते. त्यामुले तुमच्यावर असणारी डिपेंडस्नी जास्त असणार. त्यात वेळेस मंदी च्या काळात समजा तेच ERP चे काम करणारे १०० लोक असु शकतात आणि मंदीच्या काळात जर तेव्हढ्या लोकांना द्यायला काम नसेल तर काही लोक कमी केले जाउ शकतात.
त्यामूळे तुम्ही जिथे असाल तिथे जर तुम्ही तुमच्या कामाचे महत्व राखुन असाल तर फरक पडायला नको.
24 Apr 2013 - 12:43 pm | मैत्र
अगदी नेमके उदाहरण!
24 Apr 2013 - 12:55 pm | गणपा
निखीलभैय्याशी बाडिस. :)
25 Apr 2013 - 10:34 am | मराठमोळा
निखिल आणि मैत्र,
मुद्दा मान्य आहे, परंतु तुम्ही जे म्हणत आहात त्याला कॅप्टीव सेंटर असेही म्हणतात. (नॉन आयटी कंपन्यांनी स्वतःचे आयटी डिपार्टमेंट संभाळणे) अशा कंपन्यांमधे बहुतांश वेळा नविन शिकायला वाव कमी असतो, किंवा तेच तेच काम रोज करण्याचा कंटाळा येऊ शकतो. या प्रकारात संपुर्ण आयटी डिपार्टमेंट हे दुसर्या आयटी कंपनीला आऊटसोर्स केले जाते कारण this is not their core competence. ताजे उदाहरण म्हणजे उसातल्या एका मोठ्या सुपरवॅल्यु नावाच्या कंपनीने स्वतःचे कॅप्टीव सेंटर बंगलोरात उघ्डले होते. एकाच वर्षात ते टीसीएस कंपनीला विकले गेले आणि खुप सार्या लोकांच्या नोकर्या गेल्या. मग कमी पगारावर जिथे मिळेल तिथे त्यांना जावे लागले. हाच प्रकार बर्याच ठिकणी पाहिला जातो, ईतर देशातही. कॅप्टीव सेंटर मधे काम करण्याचे दोन मुख्य तोटे म्हणजे १. हवी तशी Growth न मिळणे. २. नविन काही करण्याचा/शिकण्याचा मार्ग नसल्याने मार्केट मधून आऊटडेट होणे.
हा धागा काढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण नोकरीच्या भरोशावर भरमसाट कर्ज घेतो किंवा खर्च करतो. ते न करता संभाव्य धोक्यांचा आणि नियोजनाचा अभ्यास करणे फार महत्वाचे झाले आहे. नोकरी टिकवणे आणि पर्याय उपलब्ध करुन ठेवणे हेही फार महत्वाचे आहे. बाहेरच्या देशांप्रमाणे नोकरी गेली तर जसे त्यांचे सरकार त्यांना पैसे देते तसे आपले सरकार काही आपल्याला पोसणार नाही. कॉग्निझंट ची आजचीच बातमी पहा. खुप सार्या लोकांना अचानक नोकरीवरुन कमी केले गेले आहे.
25 Apr 2013 - 11:18 am | निखिल देशपांडे
तु जे कॅप्टिव्ह सेंटर बद्दल बोलत आहेस ते काही टक्के मान्य करतो. जसे कॅप्टिव्ह सेटअप मधे कमी शिकायला मिळु शकते किंवा तेच तेच काम करायचा कंटाळा होउ शकतो ते कुठेही घडु शकते. आता असे समजुयात की सुपरवॅल्यु ने कॅप्टिव्ह सेंटर च्या जागी तो प्रॉजेक्ट टिसिएस ला आउटसोर्स केला असता. तरी करावे लागणारे काम तेच असले असते. आणि मुळात असे मोठे प्रॉजेक्ट आल्या नंतर ह्या कंपन्या एक दोन वर्षाचे प्रॉजेक्ट कमिटमेंट घेतात.आता करीयर Growth कशाला म्हणायचे हा प्रत्येकाचा भाग आहे. पण टिसीएस सारख्या एखाद्या कंपनीत क्लायंटने घेतलेला डिसीजन Implement करणे आणि कॅप्टिव्ह सेटअप मधे आपणच डिसिजन मेकर होणे यातल्या कशात Growth potential जास्त आहे यावर प्रत्येकाचा विचार वेगळा असु शकतो.
आता सध्याचा घडीला इतर देशातल्या कॅप्टिव्ह सेटअप पेक्षा भारतीय कंपन्यांचा CIO ओर्गनायझेशन मधे काम करणे जास्त हितावह असेल असे वाटते. त्याचे कारण तिथे करण्यालायक गोष्टी खुप आहेत. भारतातल्या १०० करोड पेक्षा जास्त टर्नेओव्हर करणार्या कंपन्या आता ICT (Information and Communication Technologies) चा वापर आता इफे़क्टिव्हली करायला सुरवात करत आहेत. त्या कंपन्यांचा कल मुळात काम बाहेरुन करुन घेण्यात असला तरीही काम करुन घेण्यासाठी तरी काही लोकांचा चमु कार्यरत असतो. या कंपन्यांना डायरेक्ट मिळणार्या एखाद्या रिसोर्सची कॉस्ट हि निश्चितच टिसिएस, विप्रो किंवा अगदी स्मॉल स्केल भारतीय कंपन्यांतर्फे दिल्या जाणार्या कॉस्ट पेक्षा कमी असते. आता अशा ठिकाणी छोट्या टिम मधे तुम्हाला इनोव्हेशन आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकायची जास्त चांगली संधी असु शकते.
यात मी जो विचार करत आहे तो माझे असणार्या टेक्नॉलॉजी चे तुट्पुंजे ज्ञान आणि माझा गेल्या काही वर्षातला तुटपंजा अनुभव या वर आधारीत आहे. (This may not be holistic approach). अजुन एक मी कुठे तरी वाचलेले मत, कोणत्याच नोकरीत पुढे जाण्याचा संधी उपलब्ध नसतात त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात.
हे ख्ररेच मह्त्वाचे आहे. नोकरी जाण्याचा धोका अगदी कोणत्याही कंपनीत असु शकतो. त्या कंपनीला आपली गरज सारखी पटवुन देणे हाच यावरचा बेस्ट उपाय आहे आणि तरीही कंपनीने आपल्याला काढले तर काहीही करुन चार पैसे कमवुन कर्ज फेडायची तयारी पाहिजे. यासाठी पाठिशी काही स्किल्स ज्याचा फ्रिलान्सर म्हणुन वापर करता येइल अशा असलेल्या उत्तम.
यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे Start Something Your Own. पण हे सगळ्यांना शक्य आहे असे नाही आणि यात असणार्या रिस्कही खुप जास्त आहेत. त्यातही टिपिकल आय टी सर्व्हिसेस स्टार्टअप पेक्षा जर एखादे Consumer Focused Product मार्केट मधे घेउन येउ शकत असाल तर उत्तम.
1 May 2013 - 12:42 pm | सोत्रि
चियर्स! तंतोतंत सहमत!!
मी सध्या स्टॅन्डर्ड चार्टर्ड बॅन्केच्या कॅप्टीव्ह मध्ये काम करतो आहे. त्यात शिकण्यासारखे खुप असते. इथे तरी, मी आयटीचा असल्याने फक्त आयटी रिलेटेड कामच केले पाहिजे असे काही नाही. इथे कुठलेही काम शिकून कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करता येते. माझा एक कलिग ह्या आठवड्यात रिस्क आणि कंप्लायंन्स ह्या विभागात रिस्क ऑफिसर म्हणून गेला. तो ह्या आधि माझ्या प्रोजेक्टमध्ये टेस्टींग मॅनेजर होता.
त्यामुळे संधीच्या शोधात राहणे आणि ती आली तिचा योग्य तो फायदा उचलणे हे कौशल्य आत्मसात केले की नैया पार होतेच होते.
- (सर्विस-इंडस्ट्री सोडून कॅप्टीव्ह-इंडस्ट्री मध्ये प्लॅन करून गेलेला) सोकाजी
3 May 2013 - 6:16 pm | मराठमोळा
ओके. गॉट ईट. आता मूळ मुद्द्याकडे वळुया.
आणखीन काही मुद्दे मांडतो.
माझ्या मते कोणत्याही नोकरीमधे दोन विकल्प असतात.
१. खुप काम (स्मार्ट + हार्ड वर्क) करुन वेगात प्रगती करणे.
२. लिमिटेड पगार आणी पोझिशनवर समाधानी रहाणे.
पहिल्या केसमधे बहुतांश वेळा असे पहाण्यात येते की पैसा आणि पोझिशन यामागे धावण्याने एका उंचीवर माणूस नक्कीच पोहोचतो पण मग वैयक्तीक आयुष्य किंवा कुटुंबाला पुरेसा वेळ न दिला गेल्याने कुठेतरी मनाला ते सलत रहाते. तसेच एकदा ठराविक उंचीवर गेल्यानंतर तुम्हाला परत मागे फिरण्याचा पर्याय उपलब्ध रहात नाही.
दुसर्या केसमधे मोजका पैसा पण स्थैर्य मिळाल्याने माणूस कुटुंब आणि वैयक्तीक आयुष्यात समाधानी असतो पण मनात कुठेतरी "आपण्ही खुप पैसा कमावून मोठा बंगला, गाडी आणि पोझिशन मिळवू शकलो असतो" असा विचार चालू असतो.
उदाहरण म्हणून पहिल्या केसमधल्या माणसासाठी सर्विस आणि दुसर्यासाठी कॅप्टीव कंपनी चांगली.
24 Apr 2013 - 10:59 am | सुबोध खरे
आपल्या मूळ विषयाकडे वळणे हे सोयीस्कर ठरू शकेल. अभियांत्रिकी पदवीधरांना यापुढे मा त कंपन्यामध्ये मिळणारे वेतन हे तितके आकर्षक राहणार नाही हि वस्तुस्थिती आहे. खालील दुवा पहा
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/jobs/tech-firm...
असाच लेख टाईम्स ऑफ इंडिया मध्ये आला आहे दुवा सापडल्यावर लिहितो
24 Apr 2013 - 11:11 am | सुबोध खरे
http://economictimes.indiatimes.com/news/news-by-industry/jobs/demand-fo...
24 Apr 2013 - 11:55 am | तुमचा अभिषेक
जर आपल्या स्वताला साजेशी अशी चांगली कंपनी कोणती हे सांगायचे असेल तर ते व्यक्तीसापेक्ष ठरावे.
उदाहरणार्थ एखाद्या महत्वाकांक्षी उमेदवाराला त्याचे टॅलेंट दाखवायला अन प्रगती करायला पुर्ण वाव मिळेल अशी कंपनी आवडेल,
तर एखाद्या आरामात अन करीअरचे टेंशन न घेता जगणार्याला सरकारी कार्यालयांसारखा निवांत कारभार असणारी आवडावी..
अवांतर - कंपनी कुठलीही असो, घराच्या शक्यतो जवळ असावी अन्यथा घर कंपनीच्या जवळ घ्यावे. आयुष्यातील बराच वेळ प्रवासात उगाचच्या उगाच फुकट जात असतो, अन तो ही एकाच रूटवरचा प्रवास.
24 Apr 2013 - 12:50 pm | सुहास..
Untill & Unless, I am comfortable with company and so the company is, are good for each other. !!! ...ईति श्री अजीज प्रेमजी.
मी हेच फॉलो करतो. प्रत्येक कपंनी मध्ये कमी-अधिक प्रमाणात काम करण्याचे फायदे तोटे असतात. म्हणून वरच वाक्य आपल्याला नेहमी खास वाटत आले आहे.
24 Apr 2013 - 1:58 pm | पैसा
एकही उत्तर माहित नाही. मी २५ वर्षे नोकरी करून सोडायची हे आधीच ठरवले होते आणि त्यानुसार आर्थिक प्लॅनिंग करून गेल्याच महिन्यात सोडून दिली. आता परत कोणतीही नोकरी करायची इच्छा नाही. स्वतःसाठी जगणार आहे.
24 Apr 2013 - 7:23 pm | शुचि
२५ ? :ऑ खूप केलीस.
पण मोठा निर्णय आहे ग. मला नसता घेता आला.
25 Apr 2013 - 10:35 am | मराठमोळा
पैसातै,
तुमच्या सारखे भाग्य सर्वांना मिळो. :) तुम्ही खरच भाग्यवान आहात.
25 Apr 2013 - 1:44 pm | पैसा
:) धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा!
1 May 2013 - 9:16 am | चौकटराजा
मी ज्या दिवशी कंपनीत मुकाखतीसाठी गेलो. ( १९८०) त्यावेळेस मुलाखतकर्त्यानेच मला सुचविले मी ही कंपनी जॉईन करू नये. आत्ता बोला. पुढे एकदा अशी वेळ आली की मी एकाला परिचय नसताना बाहेर गाठून सल्ला दिला त्याने ही कंपने जॉईन करू नये. एक दिवस असा आला की त्यानेच माझ्या अप्रेझल वर सही केली आत्ता बोला !!!
मी ती कंपनी नाव मोठं लक्षण खोटं वाली आहे.हे लक्षात घेतले. काही तरतूद करून संधी मिळतात मीच त्या कंपनीला माझ्या आयुष्यातून एक्सपेल ( हाच शब्द बरोबर !! ) केले. व परत नोकरी केली नाही. आज समाधानी आहे. पैसा हा वर आहे व विष ही हे माझे साठाव्या वर्षी ठाम मत आहे. life is a bigger canvass आता मूल धाग्याचे उत्तर.. जी कंपनी पैसा किंवा स्थैर्य दोन्हीही देत नाही. अशी कंपनी जॉईन करू नये. मानसन्मान, जॉबचे समाधान हे दुय्यम निकष मानावेत.
24 Apr 2013 - 7:22 pm | श्रीगुरुजी
>>> १. माझी कंपनीला कितपत गरज आहे?
बहुतेक कंपन्यांना बहुतेक कर्मचार्यांची बहुतेक वेळा गरज नसते.
>>> २. माझ्यामुळे कंपनीचे किती अडते?
फारसे नाही.
>>> ३. माझी गुणवत्ता आजच्या काळात कितपत ग्राह्य आहे?
थोडीशीच
>>> ४. माझ्याकडे सध्याची नोकरी गेली तर इतर काय पर्याय उपलब्ध आहेत?
हे लक्षात घेऊनच इतर पर्याय तयार ठेवायचे असतात.
>>> ५. कंपनीने दिलेल्या सुविधांचा मी योग्य वापर केल्यास काही फायदा करु शकतो का?
कंपनी कर्मचार्यांना ज्या आर्थिक किंवा इतर सुविधा पुरविते त्याचा सर्वाधिक उपयोग करून घ्या.
>>> ६. (वाईट पर्याय पण जीवावर बेतली तर) माझ्या "काँटॅक्ट्स"/ओळखी वापरून मी तरेन असं काहीसं.
>>> ७. ईतर..
योग्य ते आर्थिक नियोजन करा जेणेकरून वयाच्या चाळीशीनंतर निवृत्त होऊन आरामात जगता येईल किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करता येतील.
24 Apr 2013 - 9:25 pm | मराठे
अशाच संदर्भात वापरलं जाणारं आणखि एक वाक्य म्हणजे 'मोठया तळ्यात छोटा मासा होण्यापेक्षा छोट्या तळ्यातला मोठा मासा व्हा'. करिअरच्या सुरूवातीला एका छोट्याच पण चांगला क्लायंटबेस असलेली कंपनी निवडली तर अशा प्रकारच्या कंपनीत फार चांगला अनुभव मिळतो ज्याचा वापर करून त्यापेक्षा थोडी मोठी आणि चांगल्या जबाबदारीची जागा मिळू शकते. जर नीट डाव पडत गेला तर चाळीशी पर्यंत तीन चार नोकर्या बदलून एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर पोहोचता येऊ शकते.
25 Apr 2013 - 1:00 am | कपिलमुनी
आमच्या डी कंपनीचे नियमच वेगळे आहेत :)
25 Apr 2013 - 10:02 am | ऋषिकेश
मला काय माहित. असेल नाहितर नसेल काय फरक पडतो?
कोणत्याही कर्मचार्यामुळे जगातल्या कोणत्याही कंपनीचे काहिहि अडत नाही. कंपन्याच कशाला जगात कोणाही वाचून कोणाचे काहि अडत नाही. गति-प्रवाह हीच एक शाश्वत 'स्थिती' आहे. (एक दिवसाचं बाळही आईवाचुन व्यवस्थित जगलेलं पाहिलं आहे तेव्हा कोणावाचून काही "अडतं" असं म्हटलं की हसूच येतं)
माझी गुणवत्ता आणि नोकरीचा संबंध काय? नोकरी ही पैशासाठी करतो ज्यामुळे माझ्या आवडीला मी वेळ व पैसा देऊ शकेन. आवडीच्या क्षेत्रात नोकॠ करू नये असे मी समजतो. आवड, गुणवत्ता असणार्या गोष्टींकडे मी काम म्हणून बघु शकत नाही.
दुसरी नोकरी करणे.
कोणतीही कंपनी कोणतीही सुविधा फुकट देत नाही. तुम्ही त्याचा वापर केल्यास फायदा कंपनीलाही होतो.
मी माझ्या स्वतःच्या जीवावर तरायला समर्थ आहे असा माझा समज आहे.
29 Apr 2013 - 11:34 am | अमोल केळकर
उपयुक्त माहिती मिळत आहे
(चाकरमानी ) अमोल केळकर
1 May 2013 - 5:50 pm | चिरोटा
आपण salable आहोत की नाही हे महत्वाचे आहे.salable राहण्यासाठी कंपनीला भविष्यात लागणार्या तंत्रज्ञानाची/व्यापारी ओळख आपल्याला असणे गरजेचे आहे.वर म्हंटल्याप्रमाणे गरज निर्माण करावी लागते.
फ्री लांसिंग वगैरे एका मर्यादेत करता येते पण आपण ज्या सॉफ्ट्वेयरवर काम करता त्यालाच मागणी नसेल तर काय?
दोन्/तीन/अधिक भाषांत(polyglot programming) काम करता येणे हे भविष्यातली गरज असेल असे वाटते.आपण ज्या भाषेत्/सॉफ्टवेयरवर काम करता त्याचे ईतर एक्-दोन पर्यायही शिकून घ्या.
3 May 2013 - 6:02 pm | मराठमोळा
दोन्ही मुद्द्यांशी पुर्णतः सहमत आहे. :)