भारतातील न्यायव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी खटल्यांचे अनावश्यक रेंगाळणे कमी करता आले तर लोकांचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास वाढण्यास मदत होईल. हे कसे करता येईल याचा विचार गेले कित्येक दिवस माझ्या डोक्यात रेगांळत आहेत. भारताबाहेर प्रगत देशांमध्ये हे रेंगाळणे किती प्रमाणात आहे याची मला कल्पना नाही. न्यायव्यवस्था सर्वात संथपणे नव्या पद्धती, तंत्रे यांचा स्वीकार करते असे माझे निरिक्षण आहे. या विषयावर जेव्हा सार्वजनिक चर्चा होते तेव्हा फक्त वकीलांच्या नैतिकतेला आवाहन केले जाते ( जे सर्वार्थाने निरर्थक असते ). जनतेच्या दबावाशिवाय यात कोणतीही सुधारणा होईल असे वाटत नाही. महागाई, कायद्याची अंमलबजावणी, निषेध या विषयांवर मोर्चे निघतात पण न्यायव्यवस्था सुधारावी म्हणुन कधी कुणी मोर्चा काढल्याचे ऐकिवात नाही आणि भविष्यात असे होईल असेही नाही.
दाव्याला विलंब होण्याचे मुख्य कारण दावा सुनावणी साठी आला की तारीख पुढे ढकलण्यासाठी एका पक्षाने अर्ज करणे किंवा दोन्ही पक्षांनी (किंवा त्यांच्या वकिलांनी) अनुपस्थित राहणे. यात कोर्टात खेपा मारणारा पक्ष जर परगावी रहात असेल तर त्याचे हाल कुत्रे खात नाही. दाव्याला होणारा विलंब कधी कधी खुद्द कोर्टाकडूनही होऊ शकतो ( उदा. न्यायाधीशाची बदली झाल्यामुळे). अशा विलंबाचे उत्तरदायित्व न्यायसंस्थेवर कधीच नसते.
प्रत्येक विलंबाला एक विशिष्ट आर्थिक किंमत असते. संबंधितांच्या जाण्या-येण्याचा खर्च (दावा परगावी असेल राहाण्याचा खर्च) हा मुख्य भाग. ज्यापक्षाने दाव्यासाठी विलंब केला आहे त्या पक्षाला प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई देणे अनिवार्य केल्यास खटले वेगाने पुढे सरकतील. मध्यंतरी चेक बाउन्स होण्याचे खटले वाढल्याने येणारा ताण कमी करण्यासाठी खटल्याचा खर्च चेक वरील रकमेशी निगडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे स्मरते.
’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ ही कल्पना सरसकट अमलात आणता येणार नाही, याची मला कल्पना आहे. पण जेव्हा मोठा मासा छोट्या माशाला गिळायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला थोडे काबूत आणता आले तर न्याय मिळवणे हे कमी वेदनादायक कोईल.
’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ ही कल्पना अमलात आणायची झाली तर दाव्यांच्या खाली दिलेल्या शक्यता निर्माण होतात.
१. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ व्यक्ती
२. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ व्यक्ती
३. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ संस्था
४. आर्थिक दूर्बळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक सबळ संस्था
५. आर्थिक सबळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ संस्था
६. आर्थिक दूर्बळ व्यक्ती विरुद्ध आर्थिक दूर्बळ संस्था
तत्त्वत: दाव्यांची वरील प्रमाणे प्रत ठरवता आली तर ’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’ हे तत्त्व अमलात आणण्यासाठी मार्गदर्शक नियम बनवता येणे सहज शक्य आहे. वरील
शक्यता संख्येने जास्त नसल्या मुळे मार्गदर्शक नियम बनविणे फार अवघड आहे असे वाटत नाही.
मी केलेल्या सूचनांची व्यवहार्यता तपासण्यासाठी मी त्या इथे चर्चेसाठी ठेवत आहे.
प्रतिक्रिया
1 Sep 2010 - 3:13 pm | गांधीवादी
लवकर कामे निपटावीत म्हणून सरकारची काही खाती, न्यायव्यवस्था २४ तास चालू राहाव्यात अश्यासाठी सुद्धा काही जणांनी प्रयत्न केल्याचे स्मरते,
पण स्पष्ट मत,
जर राजकारण्यांचे काही भले यातून होत नसेल तर असले काही होणे अशक्य.
1 Sep 2010 - 3:37 pm | युयुत्सु
मी लहान असताना अनेकवेळा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली पत्रे योग्य वाटल्यास न्यायालये अर्ज म्हणून दाखल करून घेत असत. तेव्हा अशक्य काही वाटत नाही.
1 Sep 2010 - 4:12 pm | नितिन थत्ते
आधी कोर्टाने तारीख द्यायच्या ऐवजी वेळ द्यायला सुरुवात केली तर लोकांना खूप सुसह्य होईल.
२१व्या शतकात भेटीची वेळ न देता तारीख देणे म्हणजे कायतरीच.
1 Sep 2010 - 4:22 pm | JAGOMOHANPYARE
कोर्ट वेळ देखील देते की.. कोणतीही केस कोर्टात डायरेक्ट स्तँड होत नाही.. आधी अॅफिडविटच्या रुपात एकमेकांची मते मागवून ती दुसर्या पक्षाला कळवून त्यांचीही उत्तरे मागवली जातात. २-४ वेळा असे करुन मग तारखा पडतात...
दाव्यांची वरील प्रमाणे प्रत ठरवता आली तर
कशी ठरवणार? कोर्ट अशीलाचे पगार स्लिप, बॅलन्स शीट बघत बसेल काय? त्याशिवाय कसे ठरवणार? शिवाय सरकारची फी ही स्वस्तच असते.. आता इतर खर्चामुळे न्याय महाग वाटत असेल, तर त्याला सरकार काय करणार?
1 Sep 2010 - 4:29 pm | नितिन थत्ते
डोक्यावर हात मारण्याची स्मायली.
वेळ देणे म्हणजे ९ ऑक्टोबर अशी तारीख न देता ९ ऑक्टोबर दुपारी २.३० वाजता बोलावणे.
1 Sep 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर बॉ सियालकोट मध्ये जी न्यायप्रक्रिया आहे ती अतिशय आवडते.
1 Sep 2010 - 4:27 pm | युयुत्सु
काहीच हरकत नाही... जामीन देताना जामीन देणा-याचे उत्पन्न तपासले जाते. हा वन टाईम चेक आहे.
1 Sep 2010 - 4:34 pm | JAGOMOHANPYARE
जामीन देतानाच कशाला , बायकोला पोटगी द्यायची असे प्रकरण असेल तरीही कोर्ट हे बघतेच की... ( तुमच्याकडून हे उदाहरण अपेक्षित होते.. :) )
पण त्यामुळे, हरणारा पक्ष हा गरीब असेल तर तो कोर्टाच्या निर्णयात बायस आहे, असा आरोप करु शकेल, त्यामुळे केसशी संबंध असल्याशिवाय कोर्ट अशी इतर माहिती विचारणार नाही
1 Sep 2010 - 4:39 pm | युयुत्सु
हे कसे काय बुवा? समजले नाही.
1 Sep 2010 - 4:43 pm | JAGOMOHANPYARE
डोक्यावर हात मारण्याची स्मायली.
वेळ देणे म्हणजे ९ ऑक्टोबर अशी तारीख न देता ९ ऑक्टोबर दुपारी २.३० वाजता बोलावणे.
:)
कोर्ट वेळ अशीच तर देते असते की ! समनमध्ये तारीख, वेळ असते... त्यात नसले, तरी कोर्टाबाहेर जो तक्ता असतो, आजच्या केसचा, त्यात वेळ असते. मी केलेल्या पोस्ट मॉर्टेमसाठी मी किती तरी वेळा कोर्टात गेलो आहे. ( किती तरी म्हणजे ३-४ वेळाच बरं का. :) ) तारीख, वेळ सगळी डिटेल्स आधी मिळतात..
आता २ वाजताची केस अर्ध्या तासात संपली नाही तर.. ? तुमची २.३० ची वेळ कोर्ट कसे पाळू शकेल? आणि समजा, तुमच्या पुढच्या केसची वेळ पाळण्यासाठी कोर्टाने तुम्हाला अर्ध्यातून घालवले तर.... ?
1 Sep 2010 - 5:03 pm | नितिन थत्ते
मला सुमारे ६ वर्षापूर्वीची माहिति आहे तेव्हा तरी वेळ देत नव्हते.
सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत आ करून बसून राहण्यापेक्षा थोडी सुनावणी करून अर्द्यातून उठवणे बरे. सध्या अशी परिस्थिती आहे की कोर्ट एका दिवशी किती जणांना तारीख देते याला काही ताळमेळ नसतो. वेळ द्यायला लागले तर त्यांच्याच लक्षात येईल आपण एका दिवशी १५च जणांना वेळ द्यायला पाहिजे.
1 Sep 2010 - 10:29 pm | आळश्यांचा राजा
माझ्या माहितीप्रमाणे वेळ ही नेहेमीच दिली जाते. ती काही अलीकडली सुधारणा वगैरे नाही. ती पाळली जात नाही हा अनुभव सार्वत्रिक आहे.
माझ्या अनुभवाप्रमाणे ''त्यांच्या" बरोबर लक्षात असते, आपण किती जणांना वेळ दिली पाहिजे. (एका दिवसात एका कोर्टाने पंधरा जणांना वेळ देणे पण जरा जास्तच आहे.) काही कारणे असल्याशिवाय तारखांचे गोंधळ, विलंब होत नसतात. आणि ही कारणे नेहेमीच प्रामाणिक असतात असं समजणं बरोबर नाही. असो.
विलंबासाठी आर्थिक दंड करणे दिवाणी न्यायालयांसाठी एकवेळ ठीक आहे. फौजदारी न्यायालयांचे काय?