संमतीवय: १८ -> १६
============
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेच्या निमित्ताने लैंगिक संबंधाचे वय १८ वरून १६ करावे का याबद्दल मोठी चर्चा सध्या चालू आहे. या चर्चेत संरक्षण आणि स्वायत्तता हे दोन प्रमुख गहन मुद्दे आहेत.
२०१३ मध्ये भारतात संमतीचे वय १६ वरून १८ करण्यात आले होते. परत ते १६ वर आणावे यासाठी इंदिरा जयसिंग या या याचिकाकर्तीचे मत आहे.
सरकारची भूमिका अशी आहे की वय कमी केल्याने लहान मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्हेगारी अधिक वाढेल. तसेच हे वय घटनात्मक तरतुदींशी सुसंगत आहे.
याचिकार्त्यांची भूमिका अशी की संमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधाना "गुन्हा" ठरवल्याने त्यांच्या स्वायत्ततेला धोका पोहोचतो. २०१७ नंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये १८० % वाढ झाली. बरेच गुन्हे मुलीच्या आईवडीलांनी मुलीच्या आंतरजातीय/धर्मीय प्रेमसंबंधाना तिच्या इच्छेविरुद्ध अद्दल घडविण्यासाठी दाखल केले आहेत.
माझी भूमिका - दोन्ही बाजू सारख्याच समर्थनीय आहेत. विवेकाचा विकास (विशेषत: समाजाचे नियम स्वीकारण्याची क्षमता निर्माण) होण्या अगोदर लैंगिक विकास होणे किंवा मनुष्यप्राणी प्रजोत्पादनक्षम होणे, यात मानवी उत्क्रांती मोठ्या प्रमाणात गंडली आहे असे वाटते. एकंदर धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे.
मेंदूमध्ये उपाग्रखण्डाचे लिंबिक सिस्टीमवर नियंत्रण निर्माण न होणे किंवा संप्रेरकांच्या प्रभावामुळे उपाग्रखण्ड निष्प्रभ होणे हे या समस्येचे जैविक पातळीवरील कारण आहे.
लैंगिक शिक्षण कितीही प्रभावी पद्धतीने दिले तरी निसर्ग त्याच्या नियमांनी पुढे जातो. लैंगिक उर्जेचा निचरा होणे हा त्यामुळे कळीचा मुद्दा ठरतो.
विषय संवेदनशील असल्याने संयमित प्रतिसादानाच उत्तरे दिली जातील.
प्रतिक्रिया
10 Aug 2025 - 10:17 am | प्रसाद गोडबोले
का ?
असा उगाचच ओढून ताणून काहीतरी रँडम नंबर का ठरवायचा ?
मुलींसाठी संमतीचे वय जेव्हा त्या "वयात येतात " ते असावे आणि मुलांसाठी जेव्हा मुलांना "दाढी करावी लागेल" एवढ्या दाढी मिशा येतात ते असावे.
मुलींचा विवाह वयाच्या 8 व्या वर्षी करावा मात्र त्या वयात येई पर्यंत त्यांना स्वगृही माहेरीच ठेवावे. वयात आल्यानंतर रीतसर मखरात बसवण्याच्या कार्यक्रम करून पती गृही पाठवावे.
मुलांची 8 व्या वर्षी मुंज व्हावी मात्र विवाह 24 व्या वर्षी व्हावा. 24 ते 30 वयात मुलाने स्वकष्टाने गृह चालवण्यास सक्षम व्हावे
साधारण 30 वय असताना कर्ता पुरुष झाल्यावर पत्नीला जी की साधारण 14 वर्षांची असेल , तिला घरी घेऊन यावे व गृहस्थ जीवनाची सुरुवात करावी. ज्या पुरुषांची वडिलोपार्जित आर्थिक सुबत्ता असेल त्यांनी 18 व्या वर्षी लग्न आणि 24 व्या वर्षी गृहस्थाश्रम सुरू करायला हरकत नाही.
विवाहाची पहिली काही वर्षी कामोपभोग आनंद घेऊन झाल्यानंतर मुलींनी अंदाजे 18, 20, 22, 24 व्या वर्षी अशा 4 अपत्य प्राप्ती करावी जेणेकरून वय 30 येई पर्यंत सर्व अपत्य शाळेत जायला लागली असतील.
विषय संवेदनशील असल्याने संयमित प्रतिसादानाच उत्तरे दिली जातील.
11 Aug 2025 - 12:26 pm | कपिलमुनी
बाप रे !
३० वर्षाचा माणूस १४ वर्षाच्या मुलीच्या सेक्शुअली जवळ येतो आहे .. यात मुलीचा काही विचार केला आहे का ?
त्याने समजा तिच्यावर मातृत्व लादले तर १५ वर्षाच्या मुलीची मानसिकता असेल का ?
उचलला कीबोर्ड आणि लागले टंकायला!!
11 Aug 2025 - 1:12 pm | प्रसाद गोडबोले
२
13 Aug 2025 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले
अन्यत्र झालेल्या विषयांतरावरून गाडी परत इथे आणत आहे.
वरील स्वल्प प्रतिसादामुळे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करत आहे.
1. मी कोठेही "सक्तीने" मुलींचे लग्नाचे वय 14 करावे असे म्हणालो नाहीये. मी फक्त इतकेच म्हणालो आहे की निसर्गाच्या हिशेबाने जे प्रजोत्पादनासाठी तयार झाले आहेत त्यांना कृत्रिम अडथळे करू नयेत.
2. उलट पुरुषांच्या साठी मात्र लग्नाचे वय 24- 30 असावे असे मत मांडले आहे कारण , निसर्गाच्या हिशोबाने पुरुष तेव्हाच संसाराचा गाडा हाकायला सक्षम झालेला असतो. त्या आधी नसतो.
3. प्रेगंसी साठी मुलीच्या वयाचा 18-24 हा काळ ideal आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. ह्यातही "केलेच पाहिजे" अशी कोठेही सक्ती मी दाखवून दिलेली नाही.
4. 4 अपत्ये निर्माण करणे हे देशाच्या , देवाच्या आणि धर्माच्या हिताचे आहे हे देखील माझे वैयक्तिक मत आहे. परत एकदा कोणावरही सक्ती नाही.
5. ज्यांना ह्यात आपत्ती आहे, हरकत आहे , त्यांचा मी काडीमात्र निषेध करत नाही, उलट मी त्यांना प्रोत्साहनच देतो. लग्नच न करणे, किंवा अत्यंत उशिरा करणे, अपत्यांना जन्मच न देणे असे अवघड निर्णय घेणाऱ्या स्त्रियां विषयी मला आदरच आहे. समाजात नितांत आवश्यकता आहे अशा स्त्रियांची ! बंधनातून मुक्त अशा स्त्रियाच समाजाचा बॅलन्स साधण्यात प्रचंड मोठ्ठा हातभार लावत असतात.
6. तात्पर्य इतकेच की संमती वय हे कोणत्याही randam number वर आधारित न ठेवता , निसर्गाला अनुसरून असावे इतके साधे आणि प्रांजळ मत मी मांडत आहे. आणि पुढे जाऊन ज्यांना हे मत पटत नाही त्यांचा निषेध न करता पुरस्कार च मी करतो !
मुद्द्याला प्रत्युत्तर दिल्यास संवाद करता येईल, पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून उगाचच काहीही लिहिल्यास २ असे प्रत्युत्तर देऊन विषय संपवण्यात येईल.
10 Aug 2025 - 10:28 am | प्रसाद गोडबोले
आणि
हे विधान अतिशय धाडसाचे वाटते.
लक्षावधी वर्षांची अत्यंत संथगतीने चालणारी प्रक्रिया करून उत्क्रांती झालेला मानव समाज अन् तो घडवणारा निसर्ग आणि एक बाजूला थातूरमातूर 50 - 60 आयुष्य असलेले आपण. आपल्या अल्पमती , अल्प अनुभव ह्यांच्या आधारावर निसर्गाला "गंडलेले" ठरवणे हे एकतर धाडसाचे विधान आहे किंवा पराकोटीच्या अहंकाराचे.
10 Aug 2025 - 2:19 pm | कॉमी
उत्क्रांतीच्या टाईमलाईन मध्ये मानवी समाज, आणि खासकरून आधुनिक मानवी समाज अत्यंत झपाट्याने निर्माण झालेला आहे.
in evolutionary terms, modern human society is like a sports car slamming from 0 to 200 km/h in a few seconds.
10 Aug 2025 - 10:39 am | युयुत्सु
मुलींचा विवाह वयाच्या 8 व्या वर्षी करावा मात्र त्या वयात येई पर्यंत त्यांना स्वगृही माहेरीच ठेवावे.
मुलीच्या स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारणार्या समाजव्यवस्थेचा पुरस्कार वरील प्रतिसादात असल्याने फाऊल मानण्यात येत आहे
विवाहाची पहिली काही वर्षी कामोपभोग आनंद घेऊन झाल्यानंतर मुलींनी अंदाजे 18, 20, 22, 24 व्या वर्षी अशा 4 अपत्य प्राप्ती करावी जेणेकरून वय 30 येई पर्यंत सर्व अपत्य शाळेत जायला लागली असतील.
वरील विधानात स्त्रीचे ऑब्जेकटीफिकेशन असल्याने तो फाऊल कायम करण्यात येत आहे. याशिवाय सध्याच्या काळात चार अपत्यांनी देशासमोर कोणत्या समस्या उभ्या राहतील याचा पण विचार केलेला दिसत नाही.
10 Aug 2025 - 11:23 am | प्रसाद गोडबोले
अवतार :
इथं तुम्ही यायच्या आधी एक वयोवृद्ध गृहस्थ होते, ते असेच स्वतःचे मत ठोकून द्यायचे काही नाही अन् त्याला कोणीही प्रत्युत्तर दिले तर फाऊल म्हणायचे. त्यांना मी म्हणालेलो की एकदा तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्स विशिष्ट पद्धतीने ट्रेन झाले की त्यात नवीन , वेगळा विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. आणि ह्याचमुळे वयोवृद्ध माणसे नवीन काहीही शिकू शकत नाहीत.
त्या घटनेचे स्मरण झाले. असो.
इंटरनेट वर पॅरॅडॉक्क्स ऑफ चॉईस असा एक सर्च करा, तुम्हाला अनेक व्हिडिओ सापडतील.
थोडक्यात तात्पर्य इतकेच आहे की लोकांना खूप जास्त पर्याय उपलब्ध असणे हे स्वातंत्र्य वाटते आणि पर्यायाने "आनंदाचे मुळकारण" वाटते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की जास्त चॉईस, जास्त पर्याय उपलब्ध असणे हे संभ्रमावस्था आणि रिग्रेट व्हॅल्यू अर्थात पश्चात्ताप मूल्य वाढवते आणि त्यातून निर्नायकी, निर्णयच न घेण्याची वृत्ती निर्माण होते व ते त्यामुळे "दुःखाचे कारण " ठरते.
माझ्या पाहण्यात कित्येक असे तरुण तरुणी आहेत जे वयाची 30 - 35 - 40 वर्षे उलटून गेली तरी अविवाहित आहेत, निपुत्रिक आहेत. अर्थात त्याला अनेक कारणे आहेत मात्र त्यातही उपलब्ध पर्यायांचा अतिरेक हे प्रमुख कारण आहे.
https://youtu.be/FpGgMdDimKY?si=tIpvznYVHUEh0gge
बाकी ह्यावर तुम्ही फाऊल वगैरे न म्हणता "हम्म, वेगळा दृष्टिकोन. विचार करून पाहतो." असा प्रतिसाद दिल्यास मला धक्का बसेल !
बघुयात तुम्ही काय चॉईस करता ते !
10 Aug 2025 - 5:19 pm | युयुत्सु
श्री० प्रसाद गोडबोले,

गर्ड गायगरेन्झर या जर्मन विद्वान मानसशास्त्रज्ञाने "गट फिलींग्ज" या पुस्तकात "पॅराडॉक्स ऑफ चॉईस" सारख्या संभ्रम निर्माण करणार्या परिस्थितीमध्ये कसे निर्णय घ्यायचे यासाठी एक भक्कम संशोधनावर आधारित निर्णयप्रक्रिया सांगितली आहे. माझ्याकडच्या प्रतीमध्ये पान ११२ वर तो म्हणतो - तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असते तेव्हा अगोदर ब्राण्ड निवडा आणि सर्वात कमी किमतीचे ( किंवा तुम्हाला परवडेल त्या किमतीचे) मॉडेल निवडा. आमच्या घरात अशी प्राधान्याची उतरंड लावून निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे घोळ घातले जात नाहीत किंवा तुम्ही म्हणता त्या समस्या निर्माण होत नाहीत.
राहता राहीला मुद्दा - "आनंदाचे मुळकारण" आणि " वेगळा विचार करण्याची क्षमता"
याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादातील - "सर्वेषामानन्दानामुस्थमेव निधानं" माहीत असेलच. यात सर्व आनंदाचे मूळ कारण सांगितले आहे.
मी सध्या अॅना अब्राहमचा " द न्युरोसायन्स ऑफ क्रिएटीव्हीटी" हा ग्रंथ वाचत आहे. " वेगळा विचार करण्याची क्षमता" हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. हा विषय खुप मोठा आहे आणि त्याबद्दल लिहीणार आहेच. पण तुम्ही म्हणता ते १/४ सत्य पण नाही. वयोवृद्ध माणसे शिकू शकत नाहीत याची कारणे मेंदूचा होणारा र्हास, जनुकीय भाग्य, पोषणाचा, व्यायामाचा अभाव, स्टीम्युलेशनचा अभाव अशी देता येतात.
10 Aug 2025 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले
हं .
तथास्तु !
तसे असो !
10 Aug 2025 - 2:12 pm | कॉमी
सहमत!
13 Aug 2025 - 7:48 pm | अभ्या..
जस्ट एक कविता आली व्हाटसपावर.
कवयित्री कुणी अपर्णा साठे आहेत. छान वाटली कविता. कमी शब्दात आशय आणि वातावरण सुंदर उभे केलेय.
.
इतके बारिक नीट ऐकून ठेव, मी सांगतेय तूस यमे,
उरकायचीत हो अजून कितीतरी नित्याचीच कामे
अंगणी-पडवी सारवायचे आज तू विसरलीसच कशी?
माहितेय ना उरकायचेय दळण, साठल्यात तांदळाच्या ह्या राशी?
मघाच ना तू म्हणालीस मस, झालेय पाणी केव्हाचे शेंदून?
मग परसावातली द्रोणी का बरें निम्मीच दिसतेय अजून?
अगो, पेजेसाठी मामंजींच्या, जा चुलीवर चढव हंडी
अन् न्हाणीपाशी चटकन ठेव बरें तात्यांचे धोतर नि बंडी
आली उकळी आधणास की यमे, तांदूळ टाक शिजत
अगो, बारसे ना उद्याला घरात, त्याच्या घुगर्या टाक बघू भिजत
फडताळात चरवी ठेवायच्या धांदलीत दूध ना गेले तुझे उतू?
आपली बाईमाणसाची जात यमे, आपण थोडेसुद्धा नये बरें मातू
सरस्वतीची तान्ही निवांत गाढ निजलीय जोवर
नेसूचे लुगडे गोदाक्कांचे, तू उमळून टाक बरें तोवर
अगो, नुकताच पेटलाय चुलीत जाळ, तशी वांगी घे बरें भाजून
अन् टाकणारेय येशा पडवीत नारळ, घेशील ना चोख सारे मोजून?
गर्भार माईस ठेवलेय बसवून, म्हणून गोदेस आलाय कोण राग!
रित्या गेल्या माईच्या चार खेपा, म्हणावे थोडे तरी समजुतीने वाग
नुकतंच आलंय नहाण तुला यमे, सावर तो लुगड्याचा घोळणा
आणि बजावणारेय हो मी नारायणास, आता हलायलाच हवा बरें पाळणा
सांभाळ हो नीटपणें नथ तुझी, नको चाळा करीत राहूस तू सारखी
अगो, दारात ना येऊ घातलीय परवाला ग्रामदेवतेची पालखी!
साग्रसंगीत देवपुजेची यमे, मांडलीयस ना देवघरात नीट तयारी?
येईलच बघ इतक्यात न्हाणीवरून थोरल्या रघुभाऊजींची स्वारी
लहानग्या माझ्या वश्याच्या स्नानाचे काढलेस ना पाणी तू ऊन?
वेंधळेपणा मुळी खपायचा नाही बरें, जर म्हणवतेस या घरची सून!
नजर टाळून त्या विसुभाऊजींची बायो, तू नेहमीच सावध रहा
अन् नारबास पुढ्यात घालून पाठव बरें त्याच्या खोलीत सकाळचा चहा
आज निजानीज झाली दुपारची की बघ सार्या मिळून गव्हले काढू
धाडलायस ना निरोप तू आळीत सांजच्याला वळायचेत म्हणून लाडू?
अगो, मध्यान्हीस, बिर्हाडीचे मास्तर जसे होतील ना गुपचूप हजर
तसे माघारी आलेल्या यशोदेवर तूस ठेवायचीय हो गुपचूप नजर
अगो, रडतेस काय अशी मुसूमुसू, तूस माहेराची का येतेय सय?
ओच्यात चिंचोके वेचायचे, यमे, तुझे राह्यलेय कोठे आता वय?
"यंदा नाही हो जमायचे यमे, धाडू सवडीनं तूस माहेरच्या गावी
थोडी आलेच बघ परसदारी होऊन, कधीचा बघतोय वाट शांतू न्हावी"
——————————
कवयित्रीः अर्पणा साठे
13 Aug 2025 - 8:03 pm | स्वधर्म
.
13 Aug 2025 - 11:00 pm | कॉमी
हार्ड हिटिंग.
14 Aug 2025 - 7:25 am | गवि
जुन्या काळातले संदर्भ आणि भाषा यावर उत्तम पकड आहे हे दिसतेच आहे. आता प्रतीके बदलली असली तरी लहान शहरांत आणि गावांत काही प्रमाणात याचे अवशेष मूळ धरून आहेतच. किंबहुना ही जी कवितेची निवेदिका आहे, जी लाल आलवणातली बोडकी सासू आहे, तिची जागा अनेकदा आसपासचा समाज आणि शेजारीपाजारी पण घेतात.
14 Aug 2025 - 10:29 am | गवि
दुरुस्ती.. सासू नसावी, घरातली मोठी विधवा सून किंवा कदाचित परत आलेली विधवा नणंद किंवा तत्सम.
14 Aug 2025 - 10:45 am | Bhakti
केशवपन..चर्र होतं अशी प्रथा होती हे समजल्यावर!!
सुधारक आगरकर यांनी पत्नीकडे वचन घेतलं होतं की "तू मी मेल्यावर केशवपन करायचे नाही ."
आगरकरांच्या मृत्यूनंतर केशवपन या प्रथेला विरोध करत, स्वतः लक्ष्मीबाई आगरकर यांनी केशवपन नाकारले. यामुळे त्या काळात त्यांना समाजातून खूप विरोधाचा सामना करावा लागला. पण त्यांनी आपले मत बदलले नाही. लक्ष्मीबाईंनी केशवपनाला विरोध करून एक धाडसी पाऊल उचलले आणि समाजाला एक नवीन विचार दिला. काही स्त्रोत सांगतात की, त्यांच्या या निर्णयामुळे इतर स्त्रियादेखील केशवपनासारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरित झाल्या.
14 Aug 2025 - 9:42 am | सुबोध खरे
मागच्या पिढीत बऱ्याच प्रमाणात स्त्रीचे सक्षमीकरण केले गेले
परंतु
अशा सक्षम स्त्रियांबरोबर कसे वागावे हे पुरुषांना शिकवलेच गेले नाही.
यामुळे अजूनही बहुसंख्य पुरुष जुनाट विचारसरणीनेच वागताना आढळतात.
14 Aug 2025 - 10:24 am | युयुत्सु
युवाल रॉबिचेक चे आणखी एक बोलके व्यंगचित्र-
14 Aug 2025 - 10:59 am | चौथा कोनाडा
वाह...
युवाल रॉबिचेक हा माझाही आवडता व्यंगचित्रकार, भाष्य चित्रकार.. मधून मधून मी याची चित्रं शेअर करत असतो.
14 Aug 2025 - 10:39 am | युयुत्सु