स्पॉयलर साठी मराठी शब्द सुचवा.
लहानपणी काही मुलांना फळांची चोरी करण्याची सवय होती. मग हि पोरें काही चोरायला बागेंत आली कि वडील ओरडत असत मग हि पोरे पळत जात असत. पण मला एक गोष्टीचे नेहमीच कुतूहल वाटत असे के वडिलांनी कधीच ह्या मुलांना पकडायचा प्रयत्न केला आणि किंवा त्यांच्या घरी जाऊन त्यांना दम भरला नाही. एक दिवस मी त्यांना ह्या बद्दल विचारले तेंव्हा त्यांनी हसून उत्तर दिले कि ती गावांतीलच मुले आहेत, काही तरी टाईमपास हवा म्हणून एक दोन फळे चोरून खातात, त्यांनी मागली असती तर मी त्यांना खूप फळे फुकट स्वतः काढून दिली असती. मुले फळे पाहिजेत म्हणून चोरायला येत नाहीत तरी एक थ्रिल पाहिजे म्हणून. मी ओरडलो कि त्यांचे ते थ्रिल वाढते. आणि हि गोष्ट खरी होती. त्या मुलांपैकी कुणीही चोर झाले नाहीत आणि वडिलांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. पण कधी कधी खरे चोर आले कि वडिलांनी एकदा शॉटगनचा बार सुद्दा त्यांच्यावर सोडला होता.
चोरी किती करायची हे चोराला ठाऊक असले पाहिजे आणि खरा चोर कोण ह्याची पारख मालकाला असली पाहिजे. जो पर्यंत ह्या गोष्टी प्रमाणात असतात तो पर्यंत त्याला थ्रिल असते नाहीतर अजीर्ण होते.
मिर्झापूर २ चे असेच आहे. सुदैवाने सेन्सर बोर्डच्या मूर्खांचा काहीही ताबा नसल्याने भारतीय कलाकार मुक्त पणे आपला अविष्कार आमच्या पुढे आणत आहेत. मिर्झापूर सिरीस आम्हाला मिर्जापूर ह्या उत्तर प्रदेशांतील एका बाहुबली नियंत्रित शहरांत नेते. प्रचंड हिंसा, प्रचंड प्रमाणात लैगिक चाळे, नशा आणि प्रत्येक कलाकाराच्या तोंडांत आई बहिणीच्या शिव्या ह्या सिरीस मध्ये आहेत. अर्थांत मी स्वतः ह्या सर्व गोष्टींची चाहती असल्याने R रेटिंग वाली हि सिरीज मला खूप आवडली पण माझ्या टेस्ट साठी सुद्धा ह्यांतील R वाला मसाला गरजेपेक्षा जास्तच वापरला आहे असे वाटते.
पण R रेटिंग वाले प्रकरण जो पर्यंत fringe झोन मध्ये असते तेंव्हाच त्याला शोभा असते. उगाच टाकायची म्हणून शिव्यांची लाखोली वाहिली कि चांगली कथा सुद्धा थोडी बेचव वाटायला लागते. आता गावांतील कुणा अमिराची असेल एखादी "स्टेपनी", पण जो पर्यंत ती दूर असते आणि घरी हळदी कुंकू समारंभ ठेवत नाही तोपर्यंत त्याला गॉसिप value असतो. सगळ्यांनीच स्टेपनी ठेवली तर चालेल काय ? मिर्जापूर मध्ये सगळ्यांच्याच हातांत बंदूक आहे. सगळेच लोक स्वयंपाक घरांत कांदा कापावा तसे गळे कापतात आणि सर्वच पुरुष अगदी कुठल्याही महिलेला मंत्रमुग्ध करतात. जिथे थोडी रंगीत पात्रें मनोरंजन करीत होती तिथे सर्वच पात्रांना रंग देण्यात आला आहे. माझ्या मते कथानक आणि एक्सीक्युशन फार चांगले असले तरी ह्या एकमेव गोष्टीने सर्वच कथा बेचव होते.
मिर्झापूर २ ची कथा सुरु होते मिर्जापूर १ जिथे संपते तिथून. गुडू, गोलू आणि डिम्पी हि वाचली आहेत आणि मुन्ना भय्या जखमी झाला आहे. तिकडे जोनपूर मध्ये रती शंकर शुक्लच्या मुलाने बापाच्या धंद्याचा ताबा घेतला आहे. स्पेशल ऑफिसर मौर्य चीनच्या सर्व सहकार्यांना कलीम भय्यांनी ठोकले आहे आणि मौर्य आता त्यांचे चाकर झाले आहेत. सर्वांत चांगले आणि आवडलेले पात्र म्हणजे गुड्डू ह्यांचे पिता रमाकांत वकील. हे बिचारे कायद्याने जाऊन न्याय मिळवण्याची धडपड करत असतात. रॉबिन हे नवीन पात्र आहे आणि थोडा विनोद आणते. बिहारी गँगस्टर द्द्दा आणि त्यांची दोन जुळी अपत्ये हि नवीन गॅंग आली आहे. मुन्ना नेहमी प्रमाणे मूर्ख आणि भडक माथ्याचा आहे तरी बिना वहिनी ह्या खेपेला खूप प्लेयर झाली आहे. त्याशिवाय एक नवीन स्त्री कलीम भय्या च्या घरांत येणार आहे.
गोलू आणि गुड्डू ह्यांनी सर्व गमावलेले असल्याने आता दोघेही सुडाने पेटले आहेत. ह्या साठी त्यांना नवीन मित्र निर्माण करावे लागणार आहेत तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशांत निवडणूक असल्याने कलीम भय्यांना थोडे जपून पावले उचलावी लागणार आहे.
प्रत्येक भागांत तुम्हाला धक्के बसतील आणिक अनेक पात्रे मृत्युमुखी पडतील. बाहुबली सोबतच आम्हाला उत्तर प्रदेशचे राजकारण सुद्धा आतून पाहायला मिळेल. एकूण थ्रिल्लर कथा फार जमून आली आहे. फॉर्मुला असला इतका चोख पणे वापरला आहे कि कुठेही `बोर` होत नाही. पुढे काय होईल ह्याची उत्सुकता लागून राहते. धर्म आणि जात ह्यावर विनाकारण नेहमीची सद्गुणविकृती पाहायला मिळेल. पंडित लोकांना आया बहिणीच्या शिव्या, नको तिथे ब्राम्हणवाद, आणि इस्लामिक लोकांना नेहमी प्रमाणे धीरगंभीर, विश्वासू आणि आदर्शवादी दाखवणे हे नेहमीचे फॉर्मुला आहेतच. चाणाक्ष वाचकांना अनेक वेळा पुढे काय होणार ह्याची चाहूल आधीच लागेल.
पंकज त्रिपाठी ह्यांचा अभिनय इतका सुरेख झाला आहे कि त्यांच्यावर ४ ऑस्कर ओवाळून टाकावीत. त्यांच्या तोंडातून शिवी सुद्धा नम्र वाटते आणि त्यांचा दरारा प्रत्येक सिन मध्ये जाणवतो. ठरकी म्हाताऱ्याचा अभिनय कुलभूषण खरबंदा ह्यांना इतका चांगला जमलाय कि निळू फुले ह्यांची आठवण येते. पण माझ्या मते त्यांना ओव्हर यूज केले गेलेय. त्यांचे सिन कमी ठेवले असते तर जास्त प्रभावशाली ठरले असते.
अली फैसल ह्यांचा जन्म गुड्डू भय्या साठीच झाला असावा असे वाटते इतका छान अभिनय झाला आहे. भडक माथ्याचा, अधिक ऍक्शन नंतर विचार करणारा गुड्डू आवडल्याशिवाय राहत नाही. गुड्डूचे वडील रमाकांत पंडित ह्यांची भूमिका राजेश तैलंग ह्यांनी वठवली आहे. आदर्शवादी वकील म्हणून माझ्या मते ते सर्वांत रिलेटेबल पुरुष पात्र आहेत तर त्यांची पत्नी वसुधा ( शिबा चड्ढा) हि सर्वांत चांगली महिला पात्र आहे. है दोन लोकांच्या तोंडात अजिबात शिव्या नाहीत.
टीप : एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे पात्रांच्या तोंडातील शुद्ध हिंदी. शिव्या सुद्धा कधी कधी शुद्ध हिंदीतील आहेत. माझ्या मते इतर सिरीज नि सुद्धा ह्याचेच अनुकरण केले पाहिजे.
प्रतिक्रिया
27 Oct 2020 - 5:00 am | सोत्रि
वेगवान आहेत सगळे भाग.काही काही गोष्टी जरा अतिशयोक्त आहेत पण वेगवान कथानकासमोर चालून जातात. त्यागी बंधूंचा शेवट हे त्याचं उदाहरण. कितीही वाटलं तरी ते काही झेपत नाही.
- (पंकज त्रिपाठीचा फॅन) सोकजी
27 Oct 2020 - 11:53 am | टवाळ कार्टा
3ऱ्या सिझनची स्टोरी आहे ती
27 Oct 2020 - 12:37 pm | सोत्रि
ते दोन्ही जुळे त्यागी बंधू एकमेकांना गोळ्या घालून ठार झाले. ते उपकथानक दुसर्या भागात दुबळं वाटतंय.
त्यांनी एकमेकांना असं गोळ्या घालून का संपवलं ह्यासाठी ३ रा साजन असेल असं म्हणायचं असेल तर माझा पास...
- (सीजन १ जास्त आवडलेला) सोकाजी
27 Oct 2020 - 4:34 pm | चिगो
सोत्रि, शेवटच्या एपिसोडची शेवटची पंधरा मिनिटे पुन्हा एकदा पहा.. अगदी पोस्ट-क्रेडीट सहीत.
पुढच्या सीझनची बीजं आहेत ती..
समिक्षणाशी बर्यापैकी सहमत. पण पंकज त्रिपाठींच्या पात्राच्या नावाचा चुकीचा उल्लेख खटकला लेखात. 'कालीन' भैया आहे ते, त्यांचा कालीनचा (सतरंज्यांचा) व्यापार असतो, म्हणून..
28 Oct 2020 - 11:32 am | सोत्रि
हे खरोखर मीस केलं होतं :(
- (धांदरट) सोकाजी
27 Oct 2020 - 9:06 am | बोलघेवडा
Spoiler = विचका
27 Oct 2020 - 9:14 am | शा वि कु
रसभंग.
27 Oct 2020 - 11:43 am | महासंग्राम
दद्गा ची स्टोरी उगाच घुसडली आहे असं वाटते.
27 Oct 2020 - 12:39 pm | सोत्रि
तंतोतंत! अगदी १००% सहमत!!
- (लिलीपूटला बऱयाच दिवसांनी बघून बरं वाटलेला) सोकाजी
27 Oct 2020 - 1:43 pm | प्रसाद_१९८२
हि सिरिज डोऊनलोड करण्यासाठी, एकादी लिंक कोणी देईल का इथे ?
28 Oct 2020 - 10:16 am | महासंग्राम
टेलिग्राम वर आहे
27 Oct 2020 - 3:05 pm | अनिंद्य
भाग २ फार predictable वाटला.
लंगड्या गोलूचे, त्रिपाठीच्या सुनेच्या वागण्याचे, दद्दा हत्याकांडाचे प्रयोजन समजले नाही.
एडिटर्स कडक नाही वागले.
तांत्रिक सफाई जास्तय या भागात.
27 Oct 2020 - 6:31 pm | मदनबाण
भाग २ कडुन बरीच अपेक्षा होती... पण यातील २ एपिसोड पाहताच कथानकात खिळवुन ठेवण्याची क्षमता उरली नाही हे कळले !
खरंतर मी भाग २ हा केवळ कालीन भैया आणि मुन्ना भय्या यांच्या अभिनासाठी पाहिली आणि या दोघांच्या समोर गुड्डु आणि गोलू केविलवाणे वाटले !
अद्धा दद्दा तद्दन घुसडला आहे [ लिलीपूटला पाहुन बरे वाटले ] आणि त्यांचे संपूर्ण कथानक अशक्त वाटले.
असो... आता ही पहायला घेणार आहे :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today
31 Oct 2020 - 8:48 pm | पाषाणभेद
बटबटीत पणाकडे जाणार्या तसेच त्याच प्रमाणे चित्रीत करण्यात आलेल्या असल्या युपी बिहारी सिरीअल्स तसेच चित्रपट अजिबात बघण्याच्या लायक नसतात.
कुणी म्हणेल वास्तव आहे, जे आहे ते दाखवतात; ठिक आहे ते ते तुम्हास लखलाभ.
एक वेगळाच पायंडा ते तयार करतात अन आपण (मराठी) पाळतो आहोत. ते जे जे दाखवत आहेत ती आपली संस्कार नाहीत. ते पाहून आपल्यात नकळत झिरपत जातील.
वेळीच सावध व्हावे.
2 Nov 2020 - 10:42 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत. मिर्झापूर सिरीजचा पहिला भाग आल्यापासून भो*डीके हा शब्द ऊत्तर भारतीय नमस्कार ला पर्याय म्हणून वापरावा ईतका वापरू लागले आहेत. हे तुम्हाला फेसबूक, ट्विटर वर दिसेल.
मागच्याच आठवड्यात शिव्यांविरोधात फेसबूक ने मोहीम काढलीय. ज्या समुह किंवा आकाऊंट वरून शिव्या टाईप केल्या जातील. त्याला बॅन केलं जाणार आहे.
12 Nov 2020 - 4:05 pm | योगी९००
दुसरा सिझन पहिल्यासारखा नाही जमला... पहिले दोन आणि शेवटचा एक हेच भाग जरा बरे वाटले. नाहीतर उगाच स्टोरी ओढली आहे असे वाटले.
सर्वांचा अभिनय मात्र छान. मुन्ना आणि कालिन भय्या तर मस्तच. दद्दा आणि त्याची दोन जुळी मुले यांची कहाणी उगाच टाकलीय असे मात्र वाटली नाही. पुढच्या सिझनसाठी त्यांना ठेवले असावे. त्यांचा अभिनय ही मस्त. जुळ्यापैकी एक मरतो ते पाहून मात्र वाईट वाटले. कोण मरतो नक्की ते गुलदस्त्यात ठेवले आहे.