body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
देंव बरें करूं
गोव्याची भूमी. उफाड्याची कांती असलेली तांबडी लाल माती. आपलं अंग हिरव्या गर्भरेशमी वस्त्रात नेटकेपणे चापून नेसून, मोठ्या अंबाड्यात मावळतीच्या रंगाचा अबोलीचा ‘वळेसर’ माळून, पायातील नूपुरांच्या निनादात निळ्याशार फेसाळणाऱ्या समिंदरात आपलं देखण रूप न्याहाळत डौलदार चालणारी रूपगर्विता म्हणजेच गोव्याची भूमी.
निसर्गाने गोव्याला भरभरून दिलं. सुंदर स्वच्छ समुद्र, भरपूर हिरवीगार वनश्री, सर्वात महत्त्वाची कलेला आपल्या हृदयात स्थान दिलेली देवभोळी माणसं. हिरव्या माडांच्या गर्दीतून निळ्या आकाशाच्या दिशेने डोकावणारे गोव्यातल्या देवळांचे कळस, दीपमाळा, चर्चेसचे मनोरे हे गोव्याचं वैभव आजही दिसतं.
कुण्या एका काळी आकाशमार्गे जात असता, गोव्याच्या या सुंदर भूमीच्या प्रेमात पडून आपला पुढचा आकाशपंथ विसरून या भूमीवर उतरलेला स्वर्गस्थ रमण-रमणींचा मेळा आपल्या स्वर्गीय सुरांनी गात गात या भूमीवरून चालत जात असता, त्यांचा तो दिव्य सूर गोंयकरांच्या कानावर पडला असला पाहिजे. त्या स्वराने लुब्ध होऊन गोव्यातल्या माणसांनी मोठ्या भक्तिभावाने तो सूर आपल्या कंठात धारण केला असला पाहिजे आणि त्या अप्सरांना विनवलं असलं पाहिजे की, ‘बायांनो जाता तर जा. पण तुमच्या कंठातल्या या सुराचा मागमूस असू द्या आम्हां गोंयकरांच्या गळ्यात अन कानात’. त्या स्वर्गस्थ वाटसरूंनी हसून ‘तस्थास्तु’ म्हटलं असेल. कुणी सांगावं! सुरांबरोबर आपल्या सौंदर्याचं प्रतिबिंबसुद्धा जाता जाता गोव्यातल्या भूमीला, माणसांना बहाल केलं असेल. तेव्हापासून गोव्यातली माणसं, संगीत आणि सौंदर्य यांचं अतूट नातं निर्माण झालं असलं पाहिजे.
सप्तकोटेश्वर सायबा
देवळांच्या सभामंडपांमधून त्याची स्तुती करणाऱ्या ह्या सूर-संगीताने हळूहळू सभामंडप ओलांडला, अवघं विश्व व्यापलं आणि अबोलीच्या ताटव्यांबरोबर गोव्याच्या मातीतून असंख्य गाते गळे फुलत गेले. कलावंतांची मांदियाळी निघाली. आपापल्या उपास्य दैवताच्या साक्षीने नांदली.
केरीच्या सातेरीच्या उत्सवातल्या गाण्याची किर्ती मंगेशीच्या देवळात चर्चिली जाऊ लागली. शांतादुर्गेच्या पालखीचे कान मंगेशीच्या बनातल्या सुरांकडे लागायला लागले, रामनाथीच्या पालखीसमोर पडलेल्या कलावंतिणींच्या पदन्यासाने अवघ्या गोवेकरांच्या माना डोलू लागल्या आणि म्हार्दोळच्या महालसेच्या सभामंडपातल्या मंजुळ गाण्याचा आवाज दशदिशांत गेला. गोयं संगीतमय झालं.
सुर्ल्याचा मंडप
गोव्यातली मंदिरं, त्यामधून गायिली जाणारी स्तुतिस्त्रोत्रं, त्यांचे उत्सव, देवाच्या पालख्या या साऱ्यामधून देवाच्या या गान–नर्तन सेवेला वेगळं काढताच येत नाही. ते त्यांचं अविभाज्य अंग आहे. या परंपरेला टिकवलं ते देवासमोर गाणं म्हणणाऱ्या, प्रसंगी नर्तन करणाऱ्या देवाच्या सेवेकरणींनी - म्हणजेच कलावंतिणींनी. त्यांनीच ही कला वाढवली, जोपासली, गायन-वादन-नर्तनाला शास्त्राची जोड दिली. या कलांचं शास्त्र शिकण्यासाठी त्या शिकवणाऱ्या गुरूंच्या शोधात बाहेर पडल्या, त्यांच्याकडून मोठ्या कष्टाने या कला हस्तगत केल्या. त्यात पारंगत झाल्या. अप्सरांचा आशीर्वाद फळला. यासाठी या कलावंतिणींनी जिवाचं रान केलं. फार हालअपेष्टा सहन केल्या, दारिद्र्य भोगलं, पण कला टिकवली. एकीकडे ‘देवाच्या सेवेकरणी’ म्हणून प्रसंगी अत्यंत मान, तर दुसरीकडे समाजाचा हिणकस दृष्टीकोन अशा दुटप्पी व्यवस्थेला त्यांनी धैर्याने तोंड दिलं.
गोव्याचं घर
उत्तरेतून वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली घेऊन विविध घराण्यांचे गायक आले, त्यांच्याकडे अत्यंत कठीण अशा गुरुशिष्य परंपरेत राहून या कलावतींनी ही अमूल्य कला हस्तगत केली. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर, पतियाळा, भेंडीबजार, रामपूर मेवात अशा अनेक घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्या शिकल्या आणि आपल्या गानकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपलं दारिद्र्य, हालअपेष्टा नाहीशा केल्या. विविध घराण्यांची गायकी टिकवली. पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केली. हे या कलावतींचं हिंदुस्तानी संगीतातलं योगदान निव्वळ अपूर्व असं आहे.
माझी आई आणि मी स्वत: या परंपरेतीलच एक झालो, याचा मला अत्यंत अभिमान आहे. माझ्या आईची आई नार्व्याच्या सप्तकोटेश्वर देवाची परंपरेने सेवेकरीण होती. देवाच्या उत्सवात ती देवासमोर गायन आणि नर्तन करीत असे. प्रत्येक समाजव्यवस्थेला जशा काही जमेच्या बाजू असतात, तशा गडद बाजूही असतातच. आईची आई शास्त्रीय संगीत फार शिकलेली नव्हती, पण जन्मजात कला तिच्या अंगात होती. आईला मात्र गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं अशा ध्येयाने तिने गोव्यातून दक्षिण महाराष्ट्रात स्थलांतर केलं. त्या वेळेस माझी आई अकरा वर्षांची होती. माझ्या आईलाही सुरेलपणाचा आणि सौंदर्याचा जन्मजात वारसा मिळालेला होता.
गुरूंच्या शोधात असताना तिने अनेक मोठ्या मोठ्या गायकांची गाणी ऐकली. माझ्या आईच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यातील काहींकडे याचनाही केली. परंतु त्या काळी संगीतकलेत गुरू मिळणं इतकं सोपं नव्हतं. उत्तरेतून आलेले हे संगीतकार गायक, दिलदार उदार होते खरे, परंतु त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या शिष्य-शिष्यिणींचं त्यांच्यावर बर्याच प्रमाणात वर्चस्व चालत असे. आपल्या गुरूची विद्या आपल्यापेक्षा इतरांकडे जाऊ नये असा त्यांचा प्रयत्न असे. अशा परिस्थितीत आजीच्या वाट्याला प्रारंभी आली ती निराशाच; परंतु तिने आपली चिकाटी सोडली नाही. आईसाठी गुरूंचा शोध घेत असताना भेंडीबाजार घराण्यातील एक स्वतंत्र विचाराचा घराणेदार गायक आपली विद्या आईला देण्यासाठी तयार झाला. आणि खांसाहेबांचा रीतसर गंडा बांधून आईची तालीम सुरू झाली. त्या वेळेस आईचं वय तेरा-चौदा वर्षांचं असेल. खांसाहेबांनी गाण्याच्या निमित्ताने अवघा हिंदुस्तान पालथा घातला व ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्याबरोबर आई आणि आजीदेखील मुंबईत येऊन स्थिरावल्या. खांसाहेबांनी हातचं राखून न ठेवता आईला गाणं शिकवलं. पुढे आईच्या वाढत्या गाण्याला आणखी विविध अंगाची तालीम हवी, हे ओळखून त्यांनीच आईच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, गुरूंवर श्रद्धा याच्या जोरावर आईने विद्या घेतली. निरनिराळ्या घराण्यातल्या उत्तमोत्तम गोष्टी ती कष्टपूर्वक शिकली. हे शिकताना आपल्या घराण्याच्या मूळ गाण्याला कुठेही बाधा येणर नाही हे पाहिलं. लयकारी, सरगम, ताना, अतिजलद किंवा अतिधिमी लय यापैकी कुठल्याही एका अंगाचा अतिरेक टाळणारं भेंडीबजार घराण्याचं समतोल अस्सल गाणं तिने जपलं, म्हणूनच ती एक यशस्वी कारकिर्द करू शकली. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकली. तिने भारतभर आणि विदेशातही आपली कला सादर केली.
आईचे हे अपार कष्ट पाहताना मला नेहमी वाटायचं की आपण गाणं न करता शिक्षण घ्यावं. शिक्षणाच्या आधारावर कुठे चांगलीशी नोकरी करावी. सर्वसामान्य स्थिर जीवन आपल्या वाट्याला यावं. पण तसं व्हायचं नव्हतं. माझा सुरेल गळा आणि गायकीची पार्श्वभूमी यांना मी इतर काही होणं मंजूर नसावं. माझ्या शास्त्रीय गाण्याच्या शिक्षणासाठी आईनेही तिच्या आईप्रमाणे खूप कष्ट घेतले. मला घराणेदार उत्तम गुरूंकडे कशी तालीम मिळेल याकडे तिने लक्ष पुरवलं. सुरुवातीला तिच्याचकडे माझं शिक्षण सुरू झालं, पण त्या वेळेस ती स्वत: मैफली करत होती. त्या व्यग्रतेत मला नियमीत शिस्तीची तालीम देणं काही तिला शक्य नव्हतं. मग आपल्याच घराण्याच्या प्रसिद्ध खांसाहेबांकडे माझं शिक्षण सुरू राहील याची तिने खबरदारी घेतली. हे खांसाहेब तिचे गुरुबंधू होते.
गाण्याच्या शिक्षणासाठी माझ्या आजीने जरी स्थलांतर केलं असलं, तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत तिची प्रकृती साथ देत असेपर्यंत उत्सवप्रसंगी ती गोव्यातील आपल्या परंपरागत दैवताची जमेल तशी सेवा करीत राहिली.
गोव्याच्या घरची न विसरलेली वाट
गोव्यात असताना ‘देवाच्या सेवेकरणी’ आणि ‘कलावंताचं घराणं’ या बिरूदांपलीकडे गरिबीशिवाय दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. बिरूदांनी पोट भरण्यासारखं नव्हतं. आई स्वतंत्र मैफली करायला लागेपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. खांसाहेबांनी तालीम देण्याचं मान्य केलं नसतं आणि शेवटपर्यंत ते आपल्या शब्दाला जागले नसते, तर आमचे हाल कुत्रा खाता ना. म्हणूनच मुरादाबादचा सांगीतिक वारसा सांगणाऱ्या या घराण्याचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. उस्ताद छज्जूँ खां, उस्ताद नजिर खां, अमान अली खां, झंडे खां, मम्मन खां, शब्बीर खां, अमीर खां, अंजनीबाई, मुहम्मद हुसेन खां अशी एक एक गानरत्नं या घराण्यात पैदा झाली. हे सर्व गायक घराणेदार गायक तर होतेच, त्याहीपेक्षा ती अतिशय सज्जन अशी माणसं होती. मोठे खांसाहेबसुद्धा अतिशय सज्जन होते. त्यांच्या सज्जनपणाचा वारसा अपरिहार्यपणे आईकडे गाण्याबरोबर आला. दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेणं, वावगं वागणं अशा गोष्टी या मोठ्या माणसांनी कधी केल्या नाहीत.
गोव्याचं घर
‘कलावंतिणी’ म्हणजे लोकांची बघण्याची दृष्टी जी बदलते, त्याला कारण म्हणजे पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर गेल्यावर हाती अमाप पैसा, कीर्ती, आलेल्या काही कलावंतिणी आणि त्यांचं बेछूट वागणं हेच होय. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब या गोष्टी वापरू तशा वापरल्या जातात, हे सर्व मिळूनसुद्धा आपल्या कलेशी इमान राखून, आपल्या जबाबदार व एकनिष्ठ वागण्याने ज्या थोड्या राहिल्या, त्याच खऱ्या कलावंत होत. नपेक्षा काळाच्या ओघात किती जणींची माती झाली. ना धड कला, ना धड गाणं, शेवटी अत्यंत निर्धन अवस्थेत त्या मृत्यू पावल्या.
माझ्या आजीने आणि आईने फार कष्टाने, मेहनत करून आपली गरिबी नाहीशी केली. गोवा सोडलं, तेव्हा त्या मायलेकींजवळ काही म्हणता काही नव्हतं. रिकामे हात. मनात मात्र कला शिकायची भरपूर इच्छा. गाण्याच्या शिक्षणासाठी त्या पै पै वाचवत राहिल्या. मोठ्या खांसाहेबांसारखा गुरू मिळाला नशिबाने. गाणं शिकायचं असेल तर इतरांकडून ते भरपूर गुरुदक्षिणा घेत. त्यांना शिकवायचं नसेल त्याला भरपूर फी सांगत. इतकी की तो ती देऊ शकणार नाही याची खातरीच असे. पण हे अंगात मुळची कला नसणाऱ्या हौशा-नवशा-गवशांसाठीच असे. तळमळ असलेला कलावान कुणी विचारील तर त्याला फी-दक्षिणेची काही अट नसे. भरभरून विद्या देत. मोठ्या खांसाहेबांचा शिष्यपरिवारही बराच मोठा आहे.
आईचे कलागुण पाहून अमुक एक द्या असं न सांगता ते शिकवायला तयार झाले. अटी फक्त दोनच - एक म्हणजे कमीत कमी दहा ते बारा वर्षं तालीम घेतली पाहिजे. दुसरी म्हणजे त्यांनी सांगेपर्यंत जाहीर कार्यक्रम कुठेही करता कामा नयेत. या अटी मान्य करून आईची तालीम सुरू झाली ती थेट खांसाहेब मुंबई सोडून पुण्याला स्थायिक होईपर्यंत अखंड चालू राहिली. ते मुंबईत आले की आमच्याकडेच उतरत. त्या वेळेस मलाही त्यांची तालीम मिळाली.
पुढे छोट्या खांसाहेबांकडे त्यांनीच माझ्या तालमीची तजवीज केली. माझ्या वेळेसही दक्षिणा-फीचा प्रश्न आला नाही, कारण एक म्हणजे त्यांच्या गुरूंनी - म्हणजेच मोठ्या खांसाहेबांनी त्यांच्यावर सोपवलेली मी शिष्या होते. दुसरं म्हणजे तेव्हा खांसाहेब आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसारखेच होते. आमच्याचकडे राहत. खांसाहेब आणि आई गुरुबंधू-भगिनी असल्यामुळे त्यांच्यात बहीणभावाचं नातं होतं. तिसरं कारण म्हणजे त्या वेळेपर्यंत आमची सांपत्तिक स्थिती खूपच सुधारली होती. आम्ही द्यावं आणि त्यांनी मागावं असं काही नव्हतं. जे काही होतं, ते सर्व मोठ्या खांसाहेबांमुळेच असल्याची आम्हा सर्वांना जाणीव होती. जे काही देणं-घेणं होतं ते प्रेमाचं.
काटेकोर, नियमबद्ध शिक्षणातून आईचं गाणं घडलं. गाण्याबरोबर आयुष्यही घडत गेलं. अमाप कष्ट करून, देशभर फिरून मैफली करून तिने दारिद्र्यावर मात केली. आपल्या आईचं स्वप्न पुरं केलं. गाणं शिकत असतानाच घराला आधार हवा म्हणून तिला विवाहाचा पर्याय स्वीकारावा लागला. गाण्याचं शिक्षण पुरं होईपर्यंत विवाह आधारभूत ठरला. पुढे माझ्या जन्मदात्याच्या मृत्यूनंतर तिला फार मानसिक यातनांतून जावं लागलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्या लोकांनी आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. पण आई त्यातून सावरली. त्याच सुमारास खांसाहेबांनी तिला गाण्याच्या स्वतंत्र मैफली करण्याची आज्ञा दिली. उत्तरार्धात परिस्थिती आमूलाग्र बदलली. कलेची सेवा करून त्या काळाच्या मानाने तिने अपार धन मिळवलं. ते राखलं. त्याचे परिणाम म्हणून आम्हा सर्वांच्या आयुष्याला अतिशय स्थैर्य आलं. माझ्या आजीचा व आईचा मला अत्यंत अभिमान वाटतो. केवळ तिच्या चरणाशी नतमस्तक होणं आणि अजन्म माझ्या गुरुजनांच्या ऋणात राहणंच मी पसंत करीन.
***
एकदा एके ठिकाणी माझ गाणं होतं. सायंकाळच गाणं, मी कुठेशी बाहेर गेले होते ती अगदी वेळेला घरी आले आणि निघालेच लगेच. वेळेत पोहोचायला हवं होतं. नेसलेली साडी तशी काही वाईट नव्हती. त्या वेळी फिक्या रंगाच्या साड्यांची फॅशन होती. गळ्यात नेहमीची चेन, हातात एक एक बांगडी होतीच. केस सारखे करून एक फूल तेवढं माळलं केसात आणि आईला नमस्कार करायला गेले.
मला पाहताच ती चिडून म्हणाली, “तानू, तूं खय वैंता? मैफिलीक की बाजारान गो? फुड्यान असतले ते रसिक आमचे मायबाप. उठोळ नाका पण आमीं साजराँ, गोमटाँ दिसूक जाय इतलें क्ळों ना तुका!. किदें हें दळडीरपणाची लक्षणां? बेगीन वोस. चांगला तयार हो. हांव तुकां जैत मेळूं म्हण आवडता.”
तिने मला साडी बदलायला लावली. कानात, गळ्यात मोजके पण चांगले दागिने घालायला लावले आणि पाहून म्हणाली, "मैफलीला जाताना प्रसन्न असावं, प्रसन्न दिसावं. आपण प्रसन्न असलो, दिसलो तर गाणं प्रसन्न होतं आपलं." ते मी आयुष्यभर लक्षात ठेवलं.
हार - आईची आठवण.
मैफल ठरली की ती पार पडेपर्यंत सगळ्याच प्रकारे मेहनत करायची, अशी शिकवण मला मिळाली. बोलावलं-कशीतरी गेले-काहीतरी गायले- बिदागी मिळाली हे असं आजिबात मी केलं नाही. फार सूक्ष्म विचार करून काय गायचं ते मी ठरवत असे. मैफील कशानिमित्त आहे, ऐकणारे कशा प्रकारचे असतील हे आधी समजून त्याप्रमाणे काय गायचं हे मी ठरवायची. काय गायचं एकदा ठरलं की तशी मेहनत करायची. तयारी असली तरी व्यवस्थित पुन्हा पुन्हा उजळणी करायची. जसं गाण्याचं, तसंच कपडे-दागिने या बाबतीत असे.
मी साडी नेसायला लागले, तेव्हा नऊवार नेसत असे. पुढे मी सहावार साडी नेसू लागले. आई मात्र शेवटपर्यंत नऊवारीच नेसत असे. मैफलींमुळे आमच्याकडे उत्तमोत्तम साड्या, दागिने यांचा बराच संचय झाला. मी त्यात भर घातली. आईच्या उत्तमोत्तम उंची साड्या मी तिच्यानंतर सहावार करून नेसल्या. त्यातील काही अस्सल रेशमी साड्या आजही माझ्याकडे आहेत. जेव्हा मी मुंबई सोडली, तेव्हा ज्या चांगल्या होत्या, त्यातल्या बऱ्याच साड्या कुणाकुणाला आठवण म्हणून दिल्या. उरलेल्या काही सुस्थितीत नसलेल्या, आमच्या नझीरभाई जरीवाल्यांना दिल्या. काही अस्सल साड्या पुण्याच्या केळकर संग्रहालयाला दिल्या.
आईच्या मैफली जेव्हा जोरात सुरू होत्या, तेव्हा वरचेवर साड्या भेट म्हणून मिळत. भेट म्हणून मिळालेली कोणतीही साडी कशीही असली, तरी आई एकदा तरी नेसत असे. ‘किमतीपेक्षा प्रेम असतम त्यात’ असं ती म्हणायची. ते खरंच आहे. एकदा नेसून झाल्यानंतर गोव्याला पाठवायच्या ट्रंकेत त्यांची रवानगी होई. आमच्या घरात ‘गोव्याला पाठवायच्या ट्रंका’ हे एक मोठं प्रकरण होतं. वर्षभर भेट म्हणून मिळालेल्या वरकड साड्या त्यात साठवलेल्या असत. दर वर्षी उत्सवात गोव्यास जाताना अशा चार-पाच मोठ्या ट्रंका बरोबर असत. त्यातील सर्व साड्या गोव्यातील तिच्या मैत्रीणींम्ना, ओळखीच्या स्त्रियांना, गरीब कामकरणींना, जुन्या ओळखीच्या घरात ती देत असे. मीसुद्धा हीच पद्धत पुढे चालू ठेवली.
साड्यांची खरेदी बाराही महिने सुरू असे. काही निवडक दुकानातून ही खरेदी व्हायची. साड्या अर्थातच रेशमी, नैसर्गिक धाग्यांच्या असत. कृत्रिम रेशीम अथवा नायलॉन, पॉलिएस्टर फार नंतरचं. अस्सल रेशीम वजनास हलकं, बारीक घडी घालता येणारं, पण साड्या जरीकिनारी बुट्टेदार असल्यामुळे त्या जड होत. काठाच्या जरीचं आणि बुट्यांचंच खूप वजन पडायचं, कारण ही जर अस्सल, चांदी किंवा क्वचित सोन्याचीही असायची. अर्थात किंमतही बरीच असायची. त्या काळी आजच्याइतकी विविध डिझाइन्स मिळायची नाहीत. ठरावीकच असायची. पण रेशीम, पोत, कारागिरी हे तेव्हासारखं आता कुठेही मिळणार नाही.
साडी पाहायची तर तिचा पोत, रंग, रेशीम, जर, काठ, पदर, नक्षी आणि गत अशा आठ प्रकारे जोखायचं असतं. थोडक्यात, साडी घेताना ‘अष्टावधानी’ असायला हवं. आम्ही ज्यांच्याकडून साड्या विकत घेत होतो, त्या व्यापाऱ्यांकडूनच आम्हाला हे ज्ञान मिळालं. शिवाय माझ्या जन्मदात्याच्या पिढीजात व्यवसायांपैकी एक व्यवसाय कापडगिरणीसंबंधित होता, म्हणून कापड जोखणं रक्तातच.
पोत - आपल्या हाताचं करंगळीच्या बाजूचं बोट आणि अंगठा यांच्या पकडीत साडीची तिन्ही अंगं एक एक करून पकडून हलकेच ओढण्यास पोत पाहणं असं म्हणतात. आपल्या करंगळीजवळच्या बोटाची संवेदना सर्व बोटांमध्ये अधिक असते. प्रथम साडीच्या अंगाचा पोत, नंतर काठाचा पोत, नंतर पदराचा पोत पाहायचा. आपल्या त्या बोटाला जो स्पर्श जाणवतो तो साडीचा पोत. तिन्ही अंगांच्या पोतात फार फरक नसलेली साडी उत्तम. परंतु अशी साडी विणणं म्हणजे कौशल्याचं काम, म्हणून ते दुर्मीळ.
रंग - रंगही ठरावीक असायचे. आपल्या अंगकांतीनुसार कोणता रंग आपल्याला खुलून दिसतो आणि कोणता शोभत नाही, हे भान प्रत्येकाला असतं. आई गोरी. तिची कांती पिकलेल्या आंब्याप्रमाणे तेजस्वी होती मूळचीच. आणि शेवटपर्यंत तशीच. तिच्या मानाने माझा गोरेपणा वेगळा. पण आम्ही दोघीही गोऱ्यातच मोडणाऱ्या. सर्व गडद रंग आंम्हाला खुलून दिसायचे. गुलबक्षी, बैंगणी, तांबड्या रंगाच्या विविध छटा, हुर्मुजी, गुलाबी, सोनसळी, भगवा, आकाशी, पिवळा, हिरवा, मोरपिशी, धानी, सुहानी, चंद्रकला, धूँप, छाँव (राखाडी), अंबुवा, मुनियापंख... अशा अनेक रंगाच्या साड्या होत्या. उत्तम कारागीरांना रंगांची चांगली जाण असते, त्याप्रमाणेच काठ, पदर, अंग अशी रंगसंगती ते करीत असतात.
रेशीम - अस्सल रेशमातदेखील फरक असतो. सलगीचं रेशीम वापरलेल्या साडीचा पोत अतितलम, तर तसरीचं रेशीम वापरलं असेल तर एक प्रकारचा भरभरीतपणा येतो. तरी दोन्हीही अस्सल आणि तलमच. याशिवाय आणखी एक गाठीचं रेशीम असायचं, अशा साड्या वजनाला जड. हे रेशीम मजबूत असायचं. काठाला आणि पदराच्या सीमेला गाठीचं रेशीम. अंगावर सलगीचं अतितलम रेशीम अशा साड्या किमती असतात. अशा साड्यांना बहुतेक अस्सल धातूची जर असते. धातूचा कठीणपणा सहन होण्यासाठी नक्षीच्या आजूबाजूस गाठीचं रेशीम वापरलेलं असे. नाहीतर अशा साड्या नक्षी आणि साडीचं अंग यांच्या सांध्यामध्ये विरतात. तसंच नुसत्या सलगीच्या रेशमात फार जरीकाम करता येत नाही. त्या साड्या बहुतेक प्लेन परंतु निरनिराळ्या रंगांत विणलेल्या असतात.
दखनी (दक्षिणी) साड्यांत बहुतकरून सलगीचं रेशीम, तर बनारसी साड्यात (उत्तरेकडच्या) तसरीचं आणि गाठीचं रेशीम असायचं. आमच्याकडे दोन्ही प्रकारच्या साड्या होत्या. गाठीचं रेशीम म्हणजे गाठ असलेलं, रदडभदड नव्हे. ते एक नाव आहे.
जर - साडीच्या नक्षीकामात वापरलेले सोनेरी किंवा चंदेरी धागे. अशा जरीचा धागा गोल असला पाहिजे. चपट्या धाग्याची जर चांगली नव्हे. धागा जितका चपटा, तितकी ती जर कमी प्रतीची मानतात. अस्सल जर धातूपासूनच काढली जाते. कृत्रिम जर तेव्हा नव्हतीच. साडीचं रेशीम बाद झालं, तरी या जरीपासून पुन्हा अस्सल सोनं अथवा चांदी मिळवता येई. परंपरागत जरीवाले असतात ते हेच काम करतात. आमच्याकडे अस्सल जरीच्या बनारसी, पाटोळा, कांचीपुरी (आम्ही मद्रासी म्हणायचो), इरकली आणि पैठणीच्या अनेक साड्या होत्या.
दख्खनी काठ
काठ - साडीचा काठ हे महत्त्वाचं अंग आहे. काठ-पदर म्हणजे एखाद्या रागातले वादी-संवादी स्वरच म्हणा ना! अंगाच्या रंगाशी संगतवार असले पाहिजेत. काठाची रुंदी हा एक मुख्य घटक. आपल्या उंचीप्रमाणे काठाची रुंदी असावी. मला फार रुंद काठाच्या साड्या शोभत नाहीत. आईची उंची असल्याने मात्र ती अतिरुंद काठही वापरीत असे. तिच्यानंतर जेव्हा मी तिच्या रुंद काठाच्या नऊवार साड्या सहावर केल्या, तेव्हा त्यांच्या अतिरुंद काठांचं काहीच करता येईना. अशा काही साड्या काळजावर दगड ठेवून मी उंच व्यक्तींना दिल्या. काठाच्या नक्षीनुसार साडीचे प्रकारही पडायचे - नारळी, रुईफुली, करवत, कापशी, चौकडी (उत्तरेत चौसर म्हणतात), धारवाडी, टमटम असे काठांचे प्रकार असायचे.
पदर - हा साडीचा प्राण. एखाद्या सुंदर स्त्रीचं नाक. सुंदर साडीचा पदर पाहायची इच्छा होतेच. साडीच्या प्रकारानुसार तिचा पदर असतो त्या त्या प्रकारच्या साडीचे पदर तसेच असायचे. पैठणी, बनारसी, माहेश्वरी, इंदुरी, चंदेरी, धारवाडी, इरकली, पाटोळा अशा साड्यांचे पदर ठरलेले असतात. फक्त रंगसंगती आणि लांबी तेवढी वेगवेगळी. पदरावरची नक्षीसुद्धा त्या त्या प्रकारानुसार ठरलेली. आजही हे असंच असतं. क्वचित एखादी संकरित बेढब साडी दिसतेही. म्हणजे साडी महेश्वरी तर पदर धारवाडी. साडी बनारसी आणि पदर इंदुरी.
नक्षी - म्हणजे काठ पदरावर तसेच अंगावर असलेली कलाकुसर. मोठ्या अंगापिंडाच्या स्त्रीस बटबटीत नक्षी, तर नाजूक अंगाच्या स्त्रीस नाजूक नक्षी खुलून दिसते. नक्षीतही साडीनुसार वेगवेगळे प्रकार असायचे. पैठणी म्हटली की काठावर चौकडा आणि पदरावर बारू, मुनिया, फुलवारी हे असायचेच. अंगावरच्या नक्षीत कुयरी, फुली, चौसर, बुट्टा असायचेच. बनारसी असेल तर झडी, बुंदके, झुमका, जमुना, गंगा अशी नक्षी असायची. एकंदरीत नक्षी म्हणजे कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा आविष्कार. कल्पना जितकी श्रीमंत, तितकी नक्षी सुरेख असायची. नाहीतर मागे भारतात गेल्या वेळी माझ्या सुनेने हौस म्हणून काही साड्या खरेदी केल्या. त्याच्या पदरावर काय असावं? चक्क सुकलेल्या काटक्याकुटक्या, मडकी आणि बैलगाडीचं चाक! मी म्हणाले, “नशीब. बांबू वगैरे नाहीत. नाहीतर मर्तिकाची तयारी असां सगळी.” तर कळलं की बांबूही असतात पदरावर म्हणे! मी कपाळावर हात मारला. जितक्या प्रकृती तितक्या आवडीनिवडी. असो.
गत - गत म्हणजे काय हे शब्दात सांगणं कठीण आहे. त्यासाठी ती साडी नेसायला हवी. नेसल्यावर तिच्या निर्यांचं एकमेकीशी होणारं घर्षण. वजनामुळे पदर रुळण्याची पद्धत म्हणजे गत. एकंदरीत साडीचं अंगावर रुळणं म्हणजे गत असं म्हणता येईल. काही साड्या नेसल्यावर अंगावर सहज रुळतात, तेव्हा त्यांची गत चांगली असते. काही चापून चोपून नेसाव्या लागतात, नेसायला कष्ट पडतात. पदर साडीवर घासताना जाणवतो, तेव्हा त्याची गत चांगली नाही असं समजायचं.
आता आमच्याकडे असलेल्या काही विशेष साड्यांचा उल्लेख करून हे साडीपुराण (मानलं तर विषयांतर) आवरते.
सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आम्ही खाजगी मैफलीसुद्धा केल्या. देशभरातील संस्थानिक, उद्योगपती, कलाकार, पत्रकार, सिनेक्षेत्राशी संबंधित, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, मंत्री असे लोक काहीबाही निमित्ताने आपल्या घरी, बंगल्यावर किंवा एखादं सभागृह घेऊन वा आपल्या मालकीच्या उद्यान गृहात गाणं करीत असत. घरची मंडळी, निवडक इष्टमित्र आपापल्या कुटुंबासमवेत, निमंत्रित असे लोक गाणं ऐकायला असत. ठरलेली बिदागी ते देत. शिवाय वस्त्र-पात्र-आभूषण असं काही देऊन सन्मान करीत. गाणं ऐकण्यासाठी फक्त पुरुषमंडळी आणि स्त्रिया नाहीत असे कार्यक्रम आम्ही घेत नसू. मैफलींबद्दल लिहायचं तर एक पुस्तक लिहून होईल सहज. तर ते एक असो.
बडोद्याच्या सरकार वाड्यावर झालेल्या मैफलीनंतर सरकारांनी आईला चांदीचं तबक, त्यात बिदागी, सोन्याच्या जरीचा शालू, सुकामेवा असं दिलं. किरमिजी रंगाचा, रुंद काठ असलेला तो शालू म्हणजे उंची साडीचा एक नमुना आहे. त्यांचे कारभारी सरदेसाई म्हणून होते, त्यांच्याही घरी मैफल झाली म्हणे. त्यांनी आईला दिलेली जरीची रेशमी पैठणी. या शिवाय तिने स्वत: खरेदी केलेल्या अनेक रेशमी अस्सल जरीच्या दख्खनी कांचीपुरी साड्या आमच्याकडे होत्या, काही आहेत.
आता मला मिळालेल्या काही साड्यांचा उल्लेख करते. रामपूरच्या सरकारांनी मला दिलेली बनारसी साडी, पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतींनी दिलेली अस्सल इरकली साडी, देवासच्या राजेसाहेबांनी दिलेली रेशमी महेश्वरी साडी, मुंबईत दोन पारशी कुटुंबे होती त्यांच्याकडे दरसाल गाणं होत असे, त्यांनी दिलेल्या दोन ‘गारा’ साड्या. (जांभळ्या रंगाच्या, अस्सल सोन्या-चांदीच्या जरीत नाजूक नक्षी भरलेल्या असतात. ही त्यांची खासियत.) गयेच्या एका जमीनदार कुटुंबाने भेट दिलेल्या एक पिवळी आणि दुसरी गुलाबी अशा दोन अस्सल बनारसी साड्या) मुंबईत काही मारवाडी घराण्यातही माझं दरसाल गाणं होत असे. त्यांनीही दिलेल्या अशाच रेशमी दख्खनी आठ-दहा साड्या. याशिवाय मी खरेदी केलेल्या असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या साड्या. यावरून मला साड्यांचं वेड आहे हे वाचकांच्या लक्षात आलं असेलच. अर्थात आता वयामुळे मी साड्या नेसत नाही. आईने जसं गाणं बंद केलं, तसं ती साध्या सुती साड्या नेसू लागली.
जीबाई
जसं साड्यांबद्दल, तसंच दागिन्यांबाबत थोडक्यात सांगते. मला जितका साड्यांचा शौक, तितका दागिन्यांचा नाही. आईला संस्थानिक किंवा तत्सम घराण्यांतून मिळालेल्या काही दागिन्यात वज्रटीक, लक्ष्मीहार, तोडे, मोत्याची कंठी, सोन्याच्या कंठ्या (कमीत कमी आठ-दहा तरी) हिऱ्य़ाच्या कुड्या, हिऱ्याच्या अंगठ्या, मोरण्या, केसातली फुले, कंबरपट्टा असे बरेच दागिने आहेत. आम्ही हे कधीच मोडले नाहीत. आईची आठवण म्हणून मी व आक्काने ते आलटून पालटून वापरले. कंबरपट्टयाचा तेवढा अपवाद. तो आई असतानाच मोडला. आता एक गंमत सांगते. हे सर्व दागिने घरात ठेवायचे तर जोखीमच होती. त्या वेळी बँकेत लॉकर वगैरे नव्हते. आई मैफलीनिमित्त सारखी बाहेर, मग कसं करायचं? अशा वेळी सर्व दागिने जीबाईच्या अंगावर असायचे. सदासर्वकाळ ती ते घरातसुद्धा अंगावर घालून असायची. आई आली की तिच्या स्वाधीन करायची. लखलखीत सोन्याने नखशिखांत मढलेली धिप्पाड अंगाची जीबाई अजूनही डोळ्यासमोर आहे. (जीबाई म्हणजे आमच्याकडे फार पूर्वीपासून असलेल्या गोवेकर बाई.)
याशिवाय आईने मला व आक्काला समसमान दागिने घडवले. त्यापैकी मोजके मी मैफलीत वापरत असे. आक्का तर गात नव्हती. त्यात सर्वसाधारण घरात असतात तसेच आहेत - पाटल्या, बांगड्या, तोडे, गोठ, लक्ष्मीहार, पोहेहार, आठ पदरी साखळ्यांचा हार, हिऱ्याच्या व पाचूच्या कुड्या इत्यादी. आणि हो... मी हट्टाने आईकडे मागितलेल्या रिंगा. कारण त्या वेळी रिंगांची फॅशन होती. त्या अशाच घरात वापरायला. मैफलीच्या व्यवहारात मी कुणाकडूनच दागिने स्वीकारत नसे. साडी इतपत ठीक आहे. ठरलेली बिदागी मात्र घेत असे. लिहायला खूपच आहे. येथे लिहीत असलेल्या लेखांच्या मालिकेत ते हळुहळू येईलच. तूर्त लेखनसीमा. तुम्हा सर्वांना माझी हीच विनंती की खूप कष्ट करा, भरपूर कमवा, उत्तम धनसंचय करा, योग्य ठिकाणी खर्चही करा. वेळ आणि संधी पुन्हा पुन्हा येत नसते. अजाणतेपणी एक पैही वाया जाऊ देऊ नका. माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा.
देंव बरें करूं..
श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रे चारुदत्त गोवेकर ह्यांजकडून.
प्रतिक्रिया
25 Oct 2019 - 3:18 pm | श्वेता२४
सुंदर सविस्तर माहितीपूर्ण लेख. तुमचं लेखन कितीही वाचलं तरी मन भरत नाही. बाकी साडयांचा पोत वगैरे माहिती नवीनच. धन्यवाद
25 Oct 2019 - 3:19 pm | श्वेता२४
तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
21 Nov 2019 - 6:02 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
श्वेता धन्यवाद गं
25 Oct 2019 - 4:11 pm | कंजूस
खरंच. हे आता कुठे वाचायला, बघायला मिळेल?
दिवाळी शुभेच्छा.
देंव बरें करूं..
26 Oct 2019 - 4:27 pm | यशोधरा
अच्च सुंदर बरयलांं! भयंकर सुंदर!
देंव बरें करूं!
21 Nov 2019 - 6:04 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
गो बाय! हांव बरयलें त्येका तूच कारण. धन्यवद.
26 Oct 2019 - 8:19 pm | सुधीर कांदळकर
त्या काळात एवढी दूरदृष्टी दाखवणार्या आपल्या आजींना त्रिवार प्रणाम.
भेंडीबाजार घराण्यातले गायक अतिसंथ लयीत, ठायलयीत गात नाहीत हे पटले. अगदी विलंबित ख्याल देखील जवळजवळ मध्यलयीत असतो. त्यामुळे बंदिशीचा घाट, डौल, त्यामागचा स्वरविचार छान समजतो.
मातोश्रींना देखील प्रणाम आणि मुख्य म्हणजे संपत्ती राखणे. राखणे हे संपादनापेक्षा कठीण असते हे सांगायला नकोच.
साड्यांचे नवे दालनच आपण उघडले आहे. आमची सौ. पण तिच्या आईच्या साड्या अशीच आस्थेने वापरीत असे. साड्यांची माहिती अर्थातच तिला वाचायला देणार. एका छान लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
30 Oct 2019 - 12:51 pm | गौरीबाई गोवेकर
सुधीरजी,
होय. आमच्या घराण्याची मध्यलय पसिद्धच आहे. संपत्ती राखणं हे कमाण्यापे़क्षा कठीण आहे. अगदी खरं.
26 Oct 2019 - 9:17 pm | जॉनविक्क
मिपाच्या दिवाळी अंकाच्या थीमला जगणाऱ्या दोनच गोष्टी आतापर्यंत पाहिल्या एक म्हणजे याची मुखपृष्ठ सजावट आणी दुसरा हा लेख. अतिशय सहज व सुंदर...
_/\_
21 Nov 2019 - 6:06 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
मासों, धन्यवाद बाब!
26 Oct 2019 - 9:21 pm | विजुभाऊ
खूप छान. प्रांजळ लेख
30 Oct 2019 - 12:52 pm | गौरीबाई गोवेकर
लेख आवडला हे पाहून मुठभर मास चढले. सर्वांचे धन्यवाद
30 Oct 2019 - 2:00 pm | पद्मावति
अतिशय सुरेख लेखन.
21 Nov 2019 - 6:06 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
धन्यवाद गों
30 Oct 2019 - 6:32 pm | टर्मीनेटर
नितांत सुंदर लेख! खूपच आवडला.
माहितीपूर्ण लेखासाठी धन्यवाद 🙏
21 Nov 2019 - 6:07 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
बाब धन्यवाद
20 Nov 2019 - 11:27 pm | मुक्त विहारि
साड्यांबद्दल खूप माहिती मिळाली.
धन्यवाद
21 Nov 2019 - 6:08 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
साड्यां! आवडता विषय माझा.
21 Nov 2019 - 1:06 am | दीपा माने
भावनाताई तुमच्या ओघवत्या भाषाशैलीमुळे आठवणींचा हा लेख संपुच नयेसं वाटलं. पुढील लिखाणाची वाट पाहते. अनेक शुभेच्छा.
21 Nov 2019 - 5:14 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
खूप खूप धन्यवाद. पण तुम्हाला गौरीबाई म्हणायचं आहे बहुतेक.
21 Nov 2019 - 7:29 am | प्रमोद देर्देकर
संपूर्ण दिवाळी अंकातला हा लेख सर्वात जास्त आवडला.
अरे ती रंगांची हुर्मुजी , सोनसळी, धानी, सुहानी, चंद्रकला, धूँप, छाँव (राखाडी), अंबुवा, मुनियापंख...
नावं तर पहिल्यांदा ऐकली .
हुर्मुजी म्हणजे कोणता ?
आणि मुनियापंख म्हणजे मुनिया पक्ष्यांचा रंगाचा काय ?
देव तुम्हांस उदंड आयुष्य देवो.
21 Nov 2019 - 5:24 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
ही रंगांची नावे आमच्या वेळची होती आता कदाचित त्यांना नवीन नावे मिळाली असतील पण
हुर्मुजी म्हणजे उगवत्या सूर्याचा तांबडालाल-भगवा
सोनसळी म्हणजे सोन्यासारखा पिवळा किंवा सोनचाफ्याच्या फुलाचा रंग
धानी म्हणजे हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण
सुहानी म्हणजे हलक्या मातीच्या रंग (पिवळट छटा असलेली माती)
चंद्रकळा काळ्या रंगाची आणि जरीची खडी असलेली
धूप म्हणजे उन्हासारखा प्रक्खर पिवळा
छांव म्हणजे सावली सारखा ग्रे, करडा
अंबुवा म्हणजे पिकल्या आंब्याचा
मुनियापंख म्हणजे आपण मराठीत मोरपिशी म्हणतो तसा त्याच्या अनेक छटा असतात
लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
21 Nov 2019 - 11:41 am | विनिता००२
खूप सुरेख लेख! वाचता वाचता गुंतुन गेले :)
21 Nov 2019 - 5:25 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
लेख आवडला हे ऐकून आनंद झाला. पुन्हा धन्यवाद
23 Nov 2019 - 9:55 am | दीपा माने
प्रिय गौरीबाई, मी तुम्हाला ‘भावनाताई’ कां बरे म्हणाली असेन कळत नाही.असो. तुमच्या ‘मिपा’वर येण्याने मिपाच्या भाग्यात वाढच झाली आहे. एवढे समृध्द लेखन आम्हा मिपाकरांच्या नशिबी आले याचा मनापासुन खुप खुप आनंद वाटतो आहे.
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. तुम्हाला मिपावर लिहीण्याची प्रेरणा आम्हा सर्व मिपाकरांच्या आपुलकीच्या आणि आदराच्या अभिप्रायातून सतत मिळत राहील याची खात्री आहे.