दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

लेखनविषय:
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद

कळ्या..

लेखनविषय:
जपल्या होत्या ओंजळ भरून कळ्या परसातील वेलीवर तुला फुले देण्यासाठी दंवाचे माळून मोती लेऊन वसने अंगभर सोनेरी किरणांची सजल्या होत्या कळ्या पाकळ्या पाकळ्यांत भरून गडद रंग करून साठवण सुगंधाची कळ्यांचे फुले झाली भरली ओंजळ रिते अंगण आणि दारावर मोठे कुलूप गाव सोडून गेलेली तू आत्ताच कळले मला हातातली फुले आपसूक सांडली अंगण भर त्यांनी रांगोळी मांडली झेलत मा‍झ्या आसवांचे मोती क्षणात फुल झाली निर्माल्य फुले नव्हतीच ती कोमेजली प्रीतीच माझी...

ती कळ्या देऊन गेली..

लेखनविषय:
ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली... कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली.. शब्द होते, सूर होते भोवताली गीत जुळले अन् अचानक सांज झाली गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली.. क्षण जरी गेले उडोनी कापुराचे दरवळे पण दार अजुनी गोपुराचे कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..

तू गेल्यावर

लेखनविषय:
नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर पाणी नाही रखरख आपले शिवार झाले मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर भात शिजून ना दरवळ आला संध्याकाळी नाही चुलीला त्या पेटवले तू गेल्यावर एकांती मी स्तब्धच बसतो नदी काठावर नाही कुणी मग मला शोधले तू गेल्यावर घरपण घराचे निघून गेले कळा लागली माझ्या सवे छत रडू लागले तू गेल्यावर नाही उमजली किंमत इतकी तू होती तर उणे तुझे ते आई भासले तू गेल्यावर

अस्पर्शिता..

काव्यरस
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे.. रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे.. वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे.. नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे.. वनवास वाटचाल पायातळीं निखारे.. अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे.. होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे... हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..

आमंत्रण

लेखनविषय:
काव्यरस
ओथंबल्या आभाळाला स्वप्न हिरवं पडलं त्याच्या दिठीत मावेना तेव्हा धरतीला दिलं वीज झेलण्या झुरतो माथा बेलाग कड्याचा कुरणांच्या पटावर आज डाव पावसाचा रिमझिमत्या ढगाच्या पैंजणांची रुणझुण सृजनाच्या सोहळ्याचे ओलेचिंब आमंत्रण

पाऊस

लेखनविषय:

! पाऊस !

नभ आलं अंधारुन वाराही झाला बेभान टप टप टपोर्‍यांची झाली भुमीवर पखरण,

जाणुनी भेटी लागी आस भुमी कुशीत घेई त्यास मृदगंध तो दरवळे लागे एकमेका सहवास,

थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,

वीज कडाडुन घेई तान रानी मोरपंखी कमान ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे शेते नांगरु वेगानं,

आणि आत एक पाऊस..

लेखनविषय:
हवा कुंद झालीय. आभाळ गच्च भरून आलंय. आणि तुझ्या विरहात, मी कातर झालोय sss. छ्या! काय फालतूगिरीय ही ! त्यापेक्षा हवा बेफाम झालीय आणि कुत्र्यांना सीझनची चाहूल लागलीय, असं बोला. थेट. मुद्द्याचं. रिमझिम पाऊस आणि ओल्या मातीचा सुवास. छि: छि: छि: हे तर अगदीच टुकार झालं. चावून चोथा... थू: बरं मग पावसाळी गझला, निदान मेघमल्हार तरी?? आता मात्र हद्द झाली..! चला फुटा इथून. बाहेर एक पाऊस. वेड्यासारखा. उभा-आडवा. रपारप. दणादण. आणि आत एक पाऊस स्मूथ. घनदाट. ऊबदार. कनवाळू. मेलॅन्कोलीक. हलका हलका असलं काही असेल तर सांगा..

आयुष्याच्या वाटेवर..

लेखनविषय:
आयुष्याच्या वाटेवर.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात काही विस्मृतीत जातात ; तर काही मनात घर करतात.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. मनात घर करणारे खोलवर रुजतात; त्यांची साथ हवीहवीशी वाटत असताना मात्र साथ सोडुनिया जातात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यांच्या परतण्याची वाट पाहत असताना डोळेही पाणावतात. त्यांच्याही मनात तेच असतं ; सांगताना मात्र कचरतात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यातले काहीजणच मात्र मैत्रीला जागतात.. -दिप्ती भगत (२१जून,२०१९)

पाहता वळून मागे

लेखनविषय:
पाहता वळून मागे दिसते गर्दी चूकांची सोडून मोती ते सारे केली वेचणी फुकांची डोळे भरून हिरवा नाही पाऊस पाहिला आतून सूर लावत नाही मल्हार गायिला जोडून छंद नवखे कुठे स्वानंद शोधला अर्थार्जनात केवळ तो मी आनंद शोधला मी जाऊन मंदिरात ना अहंकार सांडला देऊन दान भक्तीचा कसा बाजार मांडला इवलेच पोट माझे हे उशिराच कळाले क्षण अनमोल सारे ते हतातूनी गळाले
Subscribe to कविता