✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)

ट
टीम गोवा यांनी
Mon, 05/02/2011 - 14:18  ·  लेख
लेख
*** आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा *** धर्मसमीक्षण सभा (Inquisition) धर्मसमीक्षण सभेचे कर्तृत्व हे युरोपच्या व ख्रिस्तीधर्माच्या इतिहासातील एक लांच्छनास्पद आणि अघोरी कृत्यांनी रक्तरंजित झालेले पृष्ठ. नास्तिक लोकांना, चेटुक करणार्‍या स्त्री-पुरुषांना शिक्षा देणे हे या धार्मिक नायालयाचे काम असे. या शिक्षा अगदी माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही रूप घेत. पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे. अशीच धर्मसमीक्षण सभा, मिशनरी 'संत' फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात स्थापण्यात आली. सन १५६० ते १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित दुष्ट कारभार गोमांतकात बेछूटपणे चालू होता. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. हा 'संत' फ्रांसिस झेवियर गोव्यातील हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचारांची सुरुवात करून चीनमधे गेला होता. तिथे मृत्यू पावला. असं म्हणतात की तो खराच मेला याची खात्री पटविण्यासाठी त्याचं शव परत भारतात आणण्यात आलं, आणि ओल्ड गोवा इथल्या चर्चमधे लोकांना बघायला मिळावं म्हणून ठेवलं गेलं. इन्क्विजिशनने ख्रिस्तीधर्मप्रसारासाठी गोव्यातील सर्व देवळे, मशिदी जमीनदोस्त करण्याचा, 'पाखंडी' मत नष्ट करण्याचा, हिंदुधर्मीय उत्सवास मनाईचा आणि लाकूड, माती किंवा धातू ह्यांच्या मुर्ती बनविणार्‍यास कडक शिक्षा देण्याचा हुकुम प्रसृत केला. हिंदुंना कायद्याने सार्वजनिक अधिकाराच्या जागा वर्ज्य करण्यात आल्या. त्यांना धार्मिक आचार, विधी पालन करण्यास मनाई करण्यात आली. ह्यामध्ये यच्चयावत सगळे विधी समाविष्ट आहेत. अगदी स्त्रियांनी कुंकू लावायला मनाई करण्यात आली, तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. पण स्थानिक लोकांची धर्मनिष्ठा जाज्वल्य होती. पोर्तुगीजांच्या अत्याचाराची जाण असतानाही ते हे कायदे मोडीत असत!!! धर्मांतराचा सपाटा आधी तिसवाडीत सुरु झाला. तिसवाडीनंतर सासष्टीची पाळी व त्यानंतर बारदेशची पाळी आली. चोडण, करमळी यासारखी गावेच्या गावे बाटविली जाऊ लागली. अर्थात यात इन्क्विजिशनचा मुख्य हात असे!! नाहीतर एखादं गावच्या गाव का सहजपणे धर्म बदलेल? विहिरीत पाव टाकून "तुम्ही आता ख्रिश्चन झालात" असे भोळ्या गावकर्‍यांना बजावण्यात आले. गोवा बेट किंवा आत्ताच्या जुने गोवे इथे हातकात्रा खांब नावाचा एक खांब आहे. सुरवातीच्या काळात धर्मांतराला विरोध करणारांचे इथे हात कापले जात. या सगळ्याला तत्कालीन राणी कातारीन हिचे प्रोत्साहन असे. एकामागुन एक फर्माने गोव्यात पोचत, आणि इथल्या व्हाईसरॉय व गव्हर्नर कडुन त्यांचे काटेकोरपणे पालन होई व त्यामुळे मिशनर्‍यांना जोर चढला होता. परिणामस्वरुप गोव्याचा शांत हिंदू समाज क्रोधाविष्ट झाला. पण गोवा राज्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, पोर्तुगीजांच्या बलवत्तर आरमारामुळे कोणीच जनतेच्या मदतीस येउ शकले नाहीत. तिसवाडी, बारदेश आणि सासष्टी वगळता इतर सर्व तालुके मराठ्यांच्या शासनाखाली होते, त्यामुळे ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या अघोरी प्रकारांपासून बचावले. हिंदुंनी आपल्या बायकामुलांना राज्याबाहेर पाठविले, व्यापार-दुकाने बंद ठेविली. शेतकर्‍यांनी भातशेतीतील बांध मोडून टाकले (चोडण बेटावर) जेणेकरुन नदीचे खारे पाणी शेतात शिरुन शेती नष्ट होईल व पोर्तुगीजांना उत्पन्न मिळणार नाही. पोर्तुगीजांनी ह्यावरही नेहमीप्रमाणे बळजबरी, इन्क्विजिशन वापरले व हे पहिले बंड मोडीत काढण्यात यश मिळविले. हळूहळू त्यांनी आपले लक्ष ब्राह्मणांकडे जास्त वळवले, कारण ब्राह्मण हे लोकांस जागृत करीत. त्यांनी ब्राह्मणांचे वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य काढुन घेतले. ब्राह्मणांसाठी एक वेगळा कायदा काढण्यात आला. "कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल." गलबतावर पाठविण्याची शिक्षा कुणालाही नकोच असे. कारण गलबतावर पाठवणे म्हणजे गुलाम बनवुन गलबताच्या तळाशी वल्हविण्यास लावणे. गुलामांना साखळदंडांनी त्यांच्या जागी खिळवुन ठेवण्यात येत असे. कामात ढिलाई झाल्यास चाबकाचा फटकारा मिळत असे. कोणीही मेला अगर कामाला निरुपयोगी झाल्यास त्याला सरळ समुद्रात फेकुन देण्यात येत असे!!! या काळात कित्येक सारस्वत ब्राह्मणकुटुंबानी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता धरला. राजापूर आणि मंगलोरच्या आसपास अजूनही यांची गावे आहेत. त्यांच्या मूळ गावांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीत गेली तरी, आपले कुलदैत कोण याची स्मृती त्यांनी एवढ्या शतकांनंतरही कायम ठेवली आहे. असंही म्हटलं जातं, की केंपे तालुक्यातून ब्राह्मण नामशेष झाले, त्यामुळे पर्तगाळी मठाच्या स्वामींनी काही क्षत्रियांना ब्राह्मण्याची दीक्षा देउन देवांची पूजा अर्चा चालू ठेवली. दिवाडी बेट मूळचं दीपावती. इथे सप्तकोटेश्वराच देऊळ होतं, सुंदर तळी होती, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण वस्ती होती. पोर्तुगीजांनी हे देऊळ उद्ध्वस्त केले. त्याआधी एकदा आदिलशाहीतही हे देऊळ उध्वस्त झाले होते. पण ते परत बांधण्यात हिंदूंना यश आले होते. जसे सोमनाथच्या सोमेश्वराचे हाल झाले तसेच दिवाडीच्या या सप्तकोटेश्वराचेही अनन्वित हाल झाले. मूळात हे देउळ कदंबांच्या राजघराण्याचे कुलदैवत. प्रथम कदंबांनी त्यांच्या गोवापुरी या राजधानीत अंदाजे बाराव्या शतकात सप्तकोटेश्वराची स्थापना केली. इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर गोवा लवकरच विजयनगर साम्राज्याचा मंत्री माधव याच्या आधिपत्याखाली आला. त्याने दिवाडी बेटावर नव्याने हे देऊळ बांधले. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला. त्यात या देवळाचा अग्रक्रम होता. मग देवळातील लिंग एका विहिरीची पायरी म्हणून लावण्यात आले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजानी या महादेवाचे दुर्दैवाचे दशावतार संपवले आणि इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल. एवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले. साष्टी गोवेकर हिंदू, मिशनर्‍यांबद्दल द्वेषभावना बाळगीत. आणि त्याचा उद्रेक रायतुरच्या मिशनर्‍यांवर दगडफेक करण्यात झाला. पेरु माश्करेन्यस (मास्कारेन्हास) हा सासष्टीत गेलेला पहिला पाद्री (मिशनरी). गावकर्‍यांना त्याच्यापेक्षा त्याच्याबरोबर आलेल्या एका नवख्रिश्चनाचा जास्त राग होता. कुर्हा डीचा दांडा गोतास काळ ठरला होता तो. लोकांनी त्याचे तलवारीने तुकडे केले. हे पाहून तो मिशनरी त्याची मदत करणे वगैरे विसरुन पळून गेला. कुठ्ठाळलाही पेरु कुलासो नावाच्या मिशनर्‍यावर दगडाचा वर्षाव झाला पण त्याला त्याच्यासोबत असलेल्या नवख्रिश्चनांनी वाचविले. इ. स. १५६६ साली मिशनर्‍यांना पराभव स्वीकारावा लागतोय हे पाहून व्हाईसरॉयने नवा हुकूम प्रसृत केला. "नवीन देऊळ बांधता कामा नये. जुन्या देवळांची डागडुजी व्हाईसरॉयच्या परवानगीशिवाय करु नये." डागडुजीच्या परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच लोक आपल्या दैवतांच्या मूर्ती बैलगाडीत बसवून शेजारच्या राज्यात नेऊ लागले. देव गावात नसेल पण किमान बाटणार तरी नाही हीच भावना यामागे होती. इ. स. १५६७ मधे लोटलीचा रामनाथ आणि आसपासच्या शेकडो देवळांचा विध्वंस करण्यात आला. वेर्णेची, म्हाडदोळ वाड्यावरच्या म्हाळसादेवीची देवराई नष्ट झाली, तिची तळी भ्रष्ट करण्यात आली, मूर्तीची अक्षरशः राख केली गेली. आणि देवळाचाही विध्वंस झाला (आज ह्या देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या गावी आहे). हे देऊळ सासष्टीतील सर्वात भव्य देऊळ होते. वेर्णेकरांची धर्मनिष्ठा इतकी जाज्वल्य की ते देवळाचे अवशेष जतन करुन त्यांना भजु लागले. देऊळ पाडल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार देऊळ असलेली जमीन सरकारच्या मालकीची होत असे. मूळ देवळाची ती जागा परत मिळविण्याचा प्रयत्न वेर्णेच्या गावकर्‍यांनी केला. एका युरोपियनाशी त्यांनी संधान बांधले. त्याने ती जागा सरकारकडुन विकत घ्यावी व दुप्पट किमतीत एक वेर्णेकराला विकावी. मिशनरी व पोर्तुगीज सरकार यांच्या अमानुष छळाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद होता. पण व्हाईसरॉयला ह्याचा सुगावा लागला व ती जमीन हिंदूंना परत मिळू नये म्हणुन देवळाच्या ठिकाणी त्याने एक भव्य चर्च बांधुन घेतले व दोन क्रॉस उभारले. त्यातला एक क्रॉस चर्चच्या प्रवेशद्वारात व दुसरा तुळशीवृंदावनाच्या ठिकाणी बांधण्यात आला. हे तुळशीवृंदावन पुरुषभर उंचीचे होते. आजच्या ओल्ड गोवा इथल्या जगप्रसिद्ध चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते, अशी लोकांची समजूत आहे. चर्चच्या भिंतींवर काही ठिकाणी हिंदू पद्धतीची नक्षी आहे. तर चर्चच्या आतमध्ये एक विहीरही होती, ती आता बुजविण्यात आली आहे. चर्चच्या सर्व भागात लोकांना प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे या गोष्टींची सत्यता पडताळणे शक्य नाही. पण इथून अगदी जवळच, साधारण अर्धा कि.मी. अंतरावर, वायंगिणी इथे रस्त्याच्या कडेला एक अत्यंत सुबक असा नंदी आपल्या महादेवापासून दुरावून बसलेला आहे. लोकानी त्याच्या शिरावर एक घुमटी बांधून त्याला ऊन पावसापासून वाचवला आहे. बारदेशातही असाच हैदोस घालण्यात येत होता. बारदेश हा तालुका एवढा मोट्ठा आहे की तिथल्या देवळांच्या संख्येचा फक्त अंदाजच लावू शकतो आपण. अश्या ह्या पावन बारदेशातल्या सर्व देवळांतील मूर्ती जुने गोवे येथे बिशपसमोर नेऊन त्यांचे हजार तुकडे करण्यात आले. देवळाच्या ठिकाणी चर्च बांधण्यात आले आणि देवळांचे उत्पन्न चर्चला देण्यात आले. धर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला. कुंकळ्ळीचा उठाव आपला धार्मिक जाच कमी होण्यासाठी सासष्टीच्या हिंदूंनी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले होते. पहिल्या धर्मसभेने लादलेली बंधने दुसर्‍या धर्मसभेने शिथिल करावी म्हणुन खूप खटपट केली. पण त्यांनी उलट जुनी बंधने अजून जाचक केलीच पण अजुन नवे कायदे आणले जसे की लग्नाच्या आधीचे विधी करु नये, नवरीला हळद लावू नये इत्यादी. सासष्टीचे लोक तसे मानी. कुंकळ्ळीच्या गावकर्‍यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी सरकारी खंड भरायला बराच विलंब केला. रायतुरच्या किल्ल्यात जाणे बंद केले. गव्हर्नरने साष्टी प्रदेशातील वसुलीसाठी इश्तेव्हाव रुद्रीगीश (रॉड्रीगीज) या क्रूर अधिकार्‍याला पाठवले. तो खंडवसुलीसाठी कुंकळ्ळीत गेला व लोकांना त्रास देण्यास सुरवात केली. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले. कुंकळ्ळीची जनता सत्तेविरुद्ध उभी राहिली. त्यांनी आसपासच्या गावातील लोकांना आपल्या बाजूस वळविले व पोर्तुगीज ठाण्यांवर हल्ल्याचा सपाटा सुरु केला. सासष्टीतील सर्व भागात ख्रिश्चन लोक असुरक्षित झाले. सैनिकांच्या मदतीसाठी मिशनर्‍यांनाही सैनिकांचे काम करावे लागले. हे बंड मोडुन काढण्यासाठी गव्हर्नरने एक पलटण पाठवली. या सैन्याने हिंदुंची नवीन बांधलेली देवळे मोडली, गावंच्या गावं जाळून भस्मसात केली आणि पुढार्‍यांना ठार केले. एवढे झाल्यानंतर त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित झाली. लोकांनी राजाशी एकनिष्ठ राहण्याचे व सरकारला खंड भरण्याचे कबूल केले. पण धार्मिक आक्रमणाला विरोध करण्याचे त्यांनी मनाशी पक्के ठरविले होते. म्हणुन त्यांनी आपली देवळे पुन्हा उभारली व देवळातील सर्व धार्मिक उत्सव थाटामाटात साजरे करु लागले. जमिनीचे उत्पन्न जे पूर्वी देवळांस मिळत असे व गेल्या काही वर्षांत चर्चना देण्यात येई ते गावकर्‍यांनी पुन्हा देवळांना देण्यास सुरु केले. वसुलीस चर्चची माणसे आली तर त्यांस उत्तर मिळे "जशी तुम्हास चर्चेस तशी आम्हास देवळे. आम्ही त्यांस खंड देऊ." अशा तर्हेसने त्यांनी सरकारी नियम धाब्यावर बसविले. हा उठाव सैन्याच्या वापराने काबूत आणण्यात आला हे लोक जागरुक व लढवय्ये होते. त्यांनी मिशनर्‍यांस आपल्या गावात स्थिर होऊ दिले नाही. अनेकदा जाळपोळ होऊनही पोर्तुगीजांची पाठ फिरताच ते पुन्हा आपल्या गावात येऊन घरे व देवळांची पुनर्बांधणी करत. एक अशीच घटना सांगावीशी वाटते. कुंकळ्ळीत चर्च बांधण्याचा मिशनर्‍यांचा मानस होता. १५ जुलै १५८३ रोजी सकाळी पाद्रींनी मास म्हटला व कुंकळ्ळीकडे कूच केले. आसपासच्या नवख्रिस्तींनी त्यांच्यासाठी मंडप उभारला होता. हिंदूंनी तातडीने ग्रामसभा बोलावुन पाद्री आले तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणुन त्यांच्यावर सूड उगवावा असे ठरले. पाद्रींच्या जथ्याला गावचा १ प्रतिष्ठित हिंदू सामोरा गेला. अभिवादन करुन स्वागत केले व गावकरी जेवून भेटायला येतील व गावात आलेल्या 'संतांचा' यथोचित सत्कार करतील असे सांगितले. त्याच्या पाठोपाठ स्त्री-पुरुषांचा मोठा घोळका तिथे गेला. त्यात एक घाडी होता व तो वेड्यासारखे मोठमोठ्याने ओरडत होता. इतर लोक टेहळणी केल्यासारखे फिरत होते. घाडी एवढ्या जलद बोलत असे की ऐकणार्‍याला अर्थबोध होत नसे. पाद्रींनी गावकर्‍यांची बरीच प्रतिक्षा केली पण कुणीच फिरकले नाही. मग त्यांनी आपले काम सुरु केले. एक चर्च बांधावे, एक क्रॉस उभारावा असे ते आपापसात बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रींचे स्वागत केले होते तो ऊठला व दोन काठ्या घेउन , एक उभी व दुसरी त्याच्यावर आडवी धरुन एका माडाच्या बुंध्याजवळ गेला व त्यावर धरुन म्हणाला इथे क्रॉस छान दिसेल नाही का? ही खूण दिसताच घोळक्यातील लोक गायब झाले व घाडी मोठमोठ्याने ओरडून लोकांना जागवु लागला. जसजसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला तसतसा त्याच्या ओरडण्याचा आशय पाद्रींना समजू लागला आणि त्यांच्या ऊरात धडकी भरली. त्यांनी पळून जायचे ठरवले पण त्यांना जाता येईना. कारण त्यांच्या जथ्यातील काही माणसे खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. ती येईपर्यंत थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते. ते लोक येईपर्यंत देवळाच्या बाजूने आरोळ्या उठल्या. लोकांचा जमाव भाले, तलवारी, धनुष्यबाण, दगड असं मिळेल ते शस्त्र हाती घेउन त्यांच्या दिशेने येत होता. "आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्‍यांना, देवळे उद्ध्वस्त करणार्‍यांना मारून टाका, ठार करा" अशा आरोळ्या उठत होत्या. आणि त्या पाद्रींचे देह जखमांनी विद्ध झाले. त्यांना ठार करण्यापुर्वी गावकर्‍यांनी त्यांना देवालयाभोवती दोनदा फरफटत फिरविले, नंतर देवासमोर उभे करुन नमस्कार करविला आणि मग आबालवृद्ध त्यांच्यावर तुटून पडले. मेल्यानंतर त्यांच्या रक्ताने देवाला अभिषेक घालण्यात आला. सैन्याच्या जोरावर पोर्तुगीजांनी हे बंड मोडून काढले आणि मिळतील तेवढे लोक ख्रिश्चन करून टाकले. काही हिंदू जीव वाचवून पळाले आणि आदिलशाही मुलुखात आपापली दैवतं बरोबर घेऊन गेले. यानंतर गोव्यात स्थानिक लोकांकडून म्हणावा असा उठाव झाला नाही तो इ. स. १८५२ पर्य़ंत. याला कारण म्हणजे गोव्यात तिसवाडी, बारदेश आणि साष्टीवगळून उरलेल्या भागात आलेली मराठी सत्ता. क्रमशः ** विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग. - टीम गोवा (पैसा, प्रीत-मोहर, बिपिन कार्यकर्ते )

Book traversal links for आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)

  • ‹ आमचे गोंय - भाग ३ - पोर्तुगिज (राजकिय आक्रमण)
  • Up
  • आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
31170 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

ओके

नितिन थत्ते
Mon, 05/02/2011 - 15:18 नवीन
या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. तसेच घेतले आहे. (आम्हीही असेच एक "ललित लेखनाच्या अंगाने जाणारे" लेखन (विडंबन) केले होते ते आठवले).
  • Log in or register to post comments

उत्तम मालिका

सविता००१
Mon, 05/02/2011 - 15:26 नवीन
पुढचा लेख कधि येतोय याची वाट पहात असते मी. एक अत्यन्त माहितीपूर्ण मालिका अनेक धन्यवाद
  • Log in or register to post comments

उत्तम मालिका

सविता००१
Mon, 05/02/2011 - 15:26 नवीन
पुढचा लेख कधि येतोय याची वाट पहात असते मी. एक अत्यन्त माहितीपूर्ण मालिका अनेक धन्यवाद
  • Log in or register to post comments

वाचते आहे

प्रियाली
Mon, 05/02/2011 - 17:50 नवीन
वाचते आहे. माहितीपूर्ण भाग.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण भाग

सूड
Mon, 05/02/2011 - 18:09 नवीन
माहितीपूर्ण भाग, मला अजूनही कळत नाही या मिशनरीज हिंदूंना बाटवून काय आसूरी आनंद मिळत असावा देव जाणे. असो. एक प्रश्न 'घाडी' म्हणजे कोण ??
  • Log in or register to post comments

माहिती खुप छान दिली आहे

गणेशा
Mon, 05/02/2011 - 18:26 नवीन
माहिती खुप छान दिली आहे ... आवेश .. जोश .. प्रतिकार या सगळ्या भावना मनात जाग्रुत झाल्या... हा इतिहास नकोसा वाटला इतका वाईट वाटला असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments

खूपच छान

प्रचेतस
Tue, 05/03/2011 - 10:36 नवीन
टीम गोवा, तुमचे धन्यवाद. सुरेख लेखमाला लिहीत आहात. अगदी तपशीलवार सर्व माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments

हा इतिहास तटस्थपणे वाचवत नाही..

योगप्रभू
Wed, 05/04/2011 - 15:45 नवीन
इतिहासातील अनेक घटना कितीही तटस्थपणे वाचायच्या ठरवल्या तरी मनातील खळबळ काही थांबत नाही. गोवा, वसई-साष्टी, दीव-दमण इथे आलेले पोर्तुगीज संख्येने असे कितीसे होते? विचित्र कायदे करुन आणि सक्तीने लोक बाटवून धर्मांतर कायम राखणे त्यांना कसे काय जमले? पेशवाई नष्ट झाली तेव्हा हिंदुस्थानात केवळ १८०० इंग्रज होते आणि सर्व संस्थानिकांच्या एकूण सैन्याची संख्या ५ लाखांच्या तरी पुढे असावी. तरीही त्यांनी सगळ्यांना पराभूत केले. नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरकडे मदत मागायला गेले होते तेव्हा त्याने तुच्छतेने विचारले होते, की काही हजार इंग्रज ३० कोटी भारतीयांवर राज्य करतात, हे विचित्र नाही का? तुम्ही एकत्र येऊन त्यांना हाकलून देत नाही आणि आमची मदत मागताय, हेच हास्यास्पद आहे. गोव्यातले पोर्तुगीज मराठ्यांपेक्षा आधुनिक हत्यारे बाळगणारे असले तरी संख्याबळाच्या युद्धात त्यांचा टिकाव लागला नसता. एक संभाजीराजे गोव्यातून पोर्तुगीजांना हाकलून देतील, या भीतीने पोर्तुगीजांनी सेंट झेव्हियरचे प्रेत पेटीतून काढून त्याला नवस बोलणे सुरु केले होते. फार कशाला सत्तरीच्या जंगलात लपून दिपाजीराव राण्यांच्या वंशातील कुष्टोजीराव राणे या कर्दनकाळाने पोर्तुगीजांना घाईला आणले होते. कान्होजी आंग्रे यांना तर इंग्रज आणि पोर्तुगीज एवढे वचकून असत की त्यांचे दस्तक घेतल्याखेरीज कोणतेही जहाज मुंबई ते कारवार या किनारपट्टीवर सुखाने संचार करु शकत नसे. धर्मांतर ब्राह्मणांचे असो, की इतर जातींचे, मला नेहमीच प्रश्न पडतो, की हिंदू धर्मातून बाहेर जाणे सोपे, पण पुन्हा धर्मात परतणे कठीण का असावे? पाव टाकल्याची अफवा उठवून एका क्षणात धर्मांतर होते, पण पुन्हा हिंदू व्हायला चार-चार दिवसांचे होमहवन आणि प्रायश्चित्त विधी कशासाठी? भारतीयांनी आपल्यावर आक्रमण करणार्‍या शत्रूंशी व्यूहात्मक आणि ध्येयवादी लढा देण्याची गरज होती.
  • Log in or register to post comments

घाडी म्हंजे भगत. मांत्रिक

प्रीत-मोहर
Wed, 05/04/2011 - 16:38 नवीन
घाडी म्हंजे भगत. मांत्रिक टाईप असतो तो
  • Log in or register to post comments

काही निरीक्षणे, आणि एक प्रश्न

पंगा
Wed, 05/04/2011 - 18:25 नवीन
एवढे सगळे होऊनही ब्राह्मण धर्म बदलत नाहीत म्हणुन त्यांच्या मुलांना पळवून नेऊन त्यांचे हालहाल करु लागले. शेवटी तेही आई-बाप होते. मुलांचे हाल होऊ नये म्हणुन ख्रिस्तीधर्म स्वीकारणे त्यांच्या नशिबी आले. मग त्या पूर्ण कुटुंबाचे ख्रिस्तीकरण. अश्या १५०५ ब्राह्मणांचे ख्रिस्तीकरण झाले.
लेखमालेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ठिकठिकाणी ब्राह्मणांच्या (वॉटेवर बी द डेफिनिशन ऑफ द टर्म) धर्मांतरांची तपशीलवार वर्णने आहेत, आणि ब्राह्मणांच्या (पुन्हा, वॉ. बी द डे. ऑ. द ट.) ख्रिस्तीकरणाची माहिती वारंवार देण्याकडे कल दिसतो. इतर धर्मांतरांचा फारसा उल्लेख नाही, किंवा असलाच, तर वरवरचा आहे. यावरून एक प्रश्न पडतो: गोव्यात ब्राह्मण (वॉ. बी इ. इ.) वगळता इतरांची धर्मांतरे झाली नाहीत काय? की प्रकर्षाने ब्राह्मणांची धर्मांतरे झाली, असे काही होते?
धर्मांतरे तर इतक्या प्रमाणात झाली की सोय नाही . गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला.
हम्म्म्म्... 'ताजमहाला'बद्दल असेच काहीसे ऐकलेले आहे. 'यशोदेच्या कृष्णा'चा 'येशू ख्रिस्त' झाला, असेही सांगतात.
  • Log in or register to post comments

एक तर्क

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/05/2011 - 03:20 नवीन
ठिकठिकाणी ब्राह्मणांच्या (वॉटेवर बी द डेफिनिशन ऑफ द टर्म) धर्मांतरांची तपशीलवार वर्णने आहेत.... यावरून एक प्रश्न पडतो: गोव्यात ब्राह्मण (वॉ. बी इ. इ.) वगळता इतरांची धर्मांतरे झाली नाहीत काय? तसं नसावं... धर्मांतरे सरसकट सगळ्यांचीच होत असावी. परंतु त्या काळात ब्राम्हण आणि बामण (सारस्वत) आर्थिकदृष्ट्या जरासे सुस्थितीत होते (वेतन, मानधन, जमीनजुमला वगैरे). त्यांच्यासाठी धर्मांतर करण्यासाठी दिलेली ऐहिक प्रलोभने फारशी परिणामकारक ठरली नसावी. उलट धर्मांतरीत झाल्यास येणार्‍या अडचणी (वाळीत टाकले जाणे, रोटीबेटी संबंध होऊ न शकणे इत्यादि) जास्त भीतीदायक असाव्या. बाकीच्या जनतेत (वॉ. बी. इ. इ.) आर्थिक सुस्थिती नसल्याने त्यांचे गोडीगुलाबीने धर्मांतरण करणे शक्य झाले असावे, जास्त सक्ती करायची गरज पडली नसावी. आणि अशा जनतेतही धर्मांतरीत झाल्यानंतरही बाकीचे पूर्वायुष्यातले सांस्कृतीक आचार सुरूच राहिले होते, अजूनही सुरू आहेत... दुसरे म्हणजे ही धर्मांतराविषयीची माहिती ही जुन्या काळच्या शिक्षित लोकांनी लिहून ठेवली आहे. अशा लोकांमध्ये त्या काळात ब्राम्हण/ बामणांचं प्रमाण खूपच जास्त होतं. त्यामुळे जास्त भर त्या वर्गाच्या धर्मांतरावर देण्यात आला असावा... असो. लहानपणापासून घरातील वडीलधार्‍यांकडून जे काही ऐकलं आहे त्यावरून बांधलेला हा तर्क. चूभूद्याघ्या... बाकी मालिका अगदी गोयंकार परंपरेला अनुसरून मस्त सुशेगाद चाललेली आहे...:) येऊ द्या, वाचतो आहोत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

'यशोदेच्या कृष्णा'चा 'येशू

टवाळ कार्टा
Wed, 04/23/2014 - 18:52 नवीन
'यशोदेच्या कृष्णा'चा 'येशू ख्रिस्त' झाला, असेही सांगतात
हैला....एकदम निशब्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

नसावे

सुनील
Wed, 05/04/2011 - 20:23 नवीन
गोव्यात 'जोस'वाडा नावाचा एक वाडा आहे. हा पूर्वीचा जोशीवाडा होता. असाच 'वझे'चा वाझ झाला. 'लक्षुबा'चा लुकश / लुकास झाला. वझेचे वाझ, रेगेचे रेगो, जोशीचे जोस (मूळ गोवेकरांत जोशी हे आडनाव आहे?) हे रोचक वाटले तरी त्यात फारसे तथ्य नसावे. कारण वाझ, रेगो इत्यादी आडनावे केवळ गोमंतकीय किरिस्तावांतच आढळतात असे नाही तर मूळ पोर्तुगिज्/ब्राझिलियनांतही आढळतात. त्याचे स्पष्टीकरण कसे देता येईल. असे मानले जाते की, ज्या पाद्र्याने बाप्तिस्मा केला त्याचे आडनाव धर्मांतरीताला देण्यात आले. बाकी हा भाग बराचसा ललित लेखनासारखा वाटला.
  • Log in or register to post comments

सुनीलजीगोव्यात जोशी आहेत. व

प्रीत-मोहर
Wed, 05/04/2011 - 22:54 नवीन
सुनीलजी गोव्यात जोशी आहेत. व त्या घराण्याला गोव्यात ४०० वर्षांचा इतिहास आहे. मुख्य म्हणजे ही सगळी माहिती मला जोसवाडा- सुकूर(soccorro) , पर्वरी-गोवा इथल्या एका ख्रिस्ती आजोबांनी (डिसा) सांगीतली होती.ते आजोबा सांगतात त्यांच मूळ आडनाव देसाई होत आणि धर्मांतरानंतर डिसा. >>>ज्या पाद्र्याने बाप्तिस्मा केला त्याचे आडनाव धर्मांतरीताला देण्यात आले. हेसुद्धा बरोबर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

वाचतेय!! छान सुरू आहे

प्राजु
गुरुवार, 05/05/2011 - 00:43 नवीन
वाचतेय!! छान सुरू आहे लेखमालेचा प्रवास! :)
  • Log in or register to post comments

लेखमाला

आनंदयात्री
गुरुवार, 05/05/2011 - 21:39 नवीन
लेखमाला वाचतोय. नवीन भागाची वाट पहात असतो. एकंदरित इतिहास क्लेशदायकच आहे म्हणायचा. सुसुत्र स्वरुपात पुढे आनण्यासाठी अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धर्मांतराचा रक्तरंजित इतिहास

निनाद
Fri, 05/27/2011 - 06:33 नवीन
वाचूनच कसे तरी झाले. गोव्याने फारच धर्मांतराचा रक्तरंजित इतिहास पाहिला आहे. या काळात एकुण ५ धर्मसभा बसल्या. प्रत्येक सभेत आधीचे नियम अधिक जाचक करुन हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जायचे. धर्मसभेची माहिती नव्हती हे नव्यानेच कळले. या सभेचे सर्व कामकाज नोंदवले जात असावे असे दिसते. तर शेंडी ठेवणार्‍या पुरुषांना शेंडीकर लावण्यात आला. शेंडीकर ? हा जिझिया करापेक्षा वेगळा कसा? कोणत्याही ब्राह्मणाने एखाद्या हिंदुला ख्रिश्चन होण्यापासुन परावृत्त केल्यास त्याला कैद करुन राजाच्या गलबतावर पाठविण्यात येईल व इस्टेट जप्त करुन सेंट थॉमसच्या कार्यार्थ वापरण्यात येईल." हे अजूनही वेगवेगळ्या प्रकारे चालत असावे असा मला कधी कधी संशय येतो. कारण भारतात कोणत्याही स्वामींनी ख्रिस्ती धर्मांतर विरोधी कार्य सुरू केले की ते लगेच कोणत्यातरी 'प्रकरणात' सापडलेले दिसतात. इ. स. १५६० साली पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला. दिल्ली आणि हैद्राबादच्या इतर राज्यकर्त्यांनीही असे प्रकार केले आहेतच. इ.स. १६६८ साली नार्वे येथे भक्कम देऊळ बांधून देवाची पुनर्प्रतिष्ठापना केली. सप्तकोटेश्वराची ही हकीकत प्रातिनिधिक म्हणावी लागेल. याची नोंद तरी आहे. इथल्या प्रभुदेसाई फळ वगैरे लोकांनी त्याला व त्याच्या काही सहकार्‍यांना असोळणे येथे ठार केले. हे सर्वत्र झाले असते तर पोर्तुगीज भारतात पाय रोवू शकले नसते इतका क्लेशदायक इतिहासाचे लेखन करून ते सर्वांना सुसूत्रपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल टीमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही फार मोठे काम करत आहात. भारतात सेंट झेवियर नावाने ज्या शाळा कॉलेजे चालतात त्या सर्व याच महान संताच्या नावे आहेत का? या शाळा चालवणारे चर्च कोणते असते? कॉन्व्हेंट शाळा चालवण्याची पद्धती कशी असते? पुढील लेखाची अर्थातच वाट पाहत आहे! वर ' हे ललित लेखन आहे' वगैरे प्रतिसाद आले आहेत ते वाचून मात्र नवल वाटले. कारण एकुण गोवाटीम स्वतः फिरून माहिती गोळा करत आहे. आता पर्यंत दिलेली माहिती मेहेनतीने व प्रामाणिकपणे गोळा केलेली जाणवते आहे. जर ख्रिस्ती लोकांनी अत्याचार केले असतील तर ते मान्य करण्यात गैर काही नसावे. शिवाय टीमने गावांची नावे आणि सनावळ्याही दिल्या आहेत. गोव्याचा ख्रिस्ती इतिहास वाईट असेल तर तो तसा सर्वांसमोर मांडण्यात गैर ते काय?
  • Log in or register to post comments

>>वर ' हे ललित लेखन आहे'

नितिन थत्ते
Fri, 05/27/2011 - 11:24 नवीन
>>वर ' हे ललित लेखन आहे' वगैरे प्रतिसाद आले आहेत ते वाचून मात्र नवल वाटले. हे कोणा प्रतिसादकांनी लिहिले नसून स्वतः धागालेखक टीमने करड्या अक्षरांत तसे लिहिले आहे. म्हणजे "हो हो !! ख्रिश्चन वैट्टच आहेत" अशा प्रतिसादांचे स्वागत आहे. कोणी हे लिहिलेले सगळेच काही खरे नाही" असे म्हटले तर "हॅ हॅ हॅ !!! अहो हे ललित अंगाने जाणारे लेखन आहे". (अवांतर : बिपिनचे नाव असल्या धाग्याशी जोडलेले पाहून आश्चर्य वाटले).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

:)

निनाद
Fri, 05/27/2011 - 18:59 नवीन
:) (हसण्याशिवाय काही अजून लिहिण्यासारखे नाही.) टीमच्या प्रामाणिक प्रयत्नां विषयी किंचितही शंका मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सांगतो...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/27/2011 - 13:11 नवीन
नितिन, माझे नाव इथे थेट आले म्हणून उत्तर देत आहे. नेहमीप्रमाणे, कोणतीही पार्श्वभूमी माहित नसताना (माझ्या असल्या धाग्यांशी असलेल्या संबंधांबद्दल) मतप्रदर्शन करण्यात आले आहे असे (खेदाने) म्हणावेसे वाटते. इथे नेहमीप्रमाणे हा शब्द वापरायचे कारण म्हणजे यापूर्वीही (आपण फोनवर बोललो होतो तेव्हा) त्यावेळी इथे चाललेल्या काही प्रकरणाची पार्श्वभूमी माहित नसताना तू मत बनवले होतेस. मत बनवण्याआधी चर्चा केली असती तर अधिक आवडले असते. असो. एकंदरीतच हा सगळा गोव्याबद्दल लिहायचा प्रयत्न, म्हणजे माझ्याच डोक्यातला कीडा. मागे प्रीमोने गोव्याच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एक लेख लिहिला होता त्यावरून मला ही कल्पना सुचली. या प्रकल्पात, या दोघींनी जे कष्ट घेतले त्याला खरंच तोड नाही. मी त्यांचा कृतज्ञ आहे. गोव्याच्या इतिहासाबद्दल वाचन करणे, त्यातून मुद्दे काढणे, त्याबद्दल सविस्तर लिहिणे, बहुतेक ठिकाणी योग्य तो पुरावा / संदर्भ इत्यादी आहे की नाही याची काळजी घेणे, शक्य त्या सगळ्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देणे, जमेल तेवढी खातरजमा करणे अशी बरीच कामे त्यांनी हौसेने आणि हौसेखातर केली. गोव्यातील जमतील तेवढी ग्रंथालयं धुंडाळली. अर्थात, आमच्यापैकी कोणीही पेशाने तर सोडाच, हौशीही इतिहासतज्ञ नाही. हे असले (नेहमीच वादग्रस्त असणारे) शिवधनुष्य कधी पेलले तर नाहीच पण त्याची जाणही नाही याची नम्र जाणिव आम्हा तिघांनाही आहे. तरीही, गोव्याबद्दलचे प्रेम हा समान धागा असल्याने आणि म्हणूनच गोव्याची एक घिसीपिटी प्रतिमा तुटून, कमीत कमी आपल्या मराठी वाचकांना तरी गोव्याची अधिक जाण यावी यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आम्ही ही लेखमाला चालू केल्यानंतर बर्‍याच सदस्यांनी यात मदत करायाची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार काही सदस्यांबरोबर विचारविनिमयही चालू आहे. त्या सगळ्यांनीच फक्त कौतुकच केले असेही नाही. आक्षेपही आहेत. पण त्यांनी विधायक सहभागाची तयारी दाखवली हे आवर्जून नमूद करतो. पुढे काय काय होईल ते माहित नाही, पण हात पुढे केला हे महत्वाचे. लेखमाला सुरू करताना तो ललितलेखनाबद्दल उल्लेख करण्याची महत्वाची कारणे : ०१. आम्हाला आमच्या इतिहासतज्ञ असण्याच्या मर्यादांची जाणिव. त्यामुळे आम्ही अगदी प्रमाणभूत लिहू शकणार नाही याची जाणिव होती. चुका होतील. मागे एकदा अवलियाने असेच काही लिहायचा घाट घातला होता आणि तेव्हा इतिहास की ललित लेखन असा वाद उभा करण्यात आला होता. आम्हाला तो वादंग टाळायचा होता. म्हणून, आम्हीच स्वच्छ कबुली दिली होती. ०२. एकंदरीतच, संपूर्ण भारतिय इतिहासात जिथे कुठे धर्म / धार्मिक आक्रमणे / धर्माच्या नावाखाली अत्याचार इत्यादी संदर्भ येतात तेव्हा त्याबद्दल वादंग माजतोच असे दिसते. त्या बाबतीत दोन्ही बाजू अगदी हट्टाने आणि हिरिरीने भांडतात. आणि सगळ्यांचेच सगळे बरोबर असते असेही नाही (तसे ते कधीच नसते) पण तरीही दोन्ही पक्ष आधी स्वतःची भुमिका ठरवून मग त्या भूमिकेनुसार अगदी अभिनिवेशपूर्ण युक्तिवाद शोधून शोधून आणतात. या सगळ्या पासून गोव्याचा इतिहास तरी कसा सुटेल? गोव्याच्या इतिहासात असे खूप काही घडले आहे. तो संदर्भ येताच इथेही वादंग होतील याची कल्पना होती. (इथे स्वतःचीच पाठ थोपटून घेतो. ;) ) ... पण मग परत तेच, आम्ही आमच्या परीने शक्य तेवढे सप्रमाण लिहायचा प्रयत्न केला. शक्य तिथे गावांची नावे, सन इत्यादी तपशील द्यायचा प्रयत्न केला. आता इतके सगळे केल्यावर आमचीही अपेक्षा एकच ... कौतुक करावे ही तर अजिबात नाही... पण इतरांनीही भर घालावी. आम्ही जे लिहिले आहे त्यावर वाद असेल तर आमचे म्हणणे खोडून काढावे, पुरावे / संदर्भ द्यावेत. मला वाटते की या रास्त अपेक्षा आहेत. पण हे सगळे सोडून थेट हेतूंवरच किंवा वर्तनावरच आक्षेप घेणे हे मलातरी प्रगल्भ वाटत नाही. म्हणायचं तर मी पण म्हणू शकलो असतो की, "आधीच्या कोणत्याही भागावर प्रतिक्रिया न देता फक्त याच भागावर कशी काय प्रतिक्रिया दिलीस?" .. पण असेल काही कारण ज्यामुळे तुला जमले नसेल हे समजून घेतल्यामुळे तसे म्हणायला धजत नाही. (या आधीच्या भागावर एक प्रतिक्रिया आहे, पण ती खरं तर उपप्रतिक्रिया आहे, दुसर्‍या एका प्रतिक्रियेवर दिलेली, लेखमालेशी तसा थेट संबंध नसलेली आणि अगदी औपरोधिक म्हणता येईल अशी त्यामुळे ती बाद धरत आहे. क्षमस्व.) अजूनही आवर्जून सांगतो की या भागात काय आक्षेपार्ह वाटले, का वाटले, ते कसे अयोग्य / असत्य वगैरे आहे याबद्दल तुझी मते जरूर मांड. शल्य असल्यास संदभ दे. . पटली तर जाहिर कबुली देऊ आम्ही. तुझ्यासारख्या मुद्देसूद माणसाकडून तरी ही अपेक्षा आहेच आहे. बाकी अधिक काय लिहिणे? (लिहायचे होते पण मुद्दे निसटतात राव लिहिता लिहिता. ;) ) (अवांतर: मागे मिपावरच्या एका प्रकरणात मला 'एक्स्प्लनेशन इज कन्फेशन ऑफ गिल्ट' असे सांगून स्पष्टीकरण दिले म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. तू तसे म्हणणार नाहीस अशी दृढ आशा आहे. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पटले

निनाद
Fri, 05/27/2011 - 19:02 नवीन
अजूनही आवर्जून सांगतो की या भागात काय आक्षेपार्ह वाटले, का वाटले, ते कसे अयोग्य / असत्य वगैरे आहे याबद्दल तुझी मते जरूर मांड. शक्य असल्यास संदर्भ दे. . पटली तर जाहीर कबुली देऊ आम्ही.
पटले! आक्षेप या स्वरूपात असावेत असे मलाही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

;)

श्रावण मोडक
Fri, 05/27/2011 - 19:25 नवीन
'एक्स्प्लनेशन इज कन्फेशन ऑफ गिल्ट' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खुपच सुरेख लेखमाला आहे. जे

मृत्युन्जय
Fri, 05/27/2011 - 11:53 नवीन
खुपच सुरेख लेखमाला आहे. जे काही लिहिले आहे त्यामुळे पोर्तुगीजांचा प्रचंड राग येतो आहे. पण नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments

इन्क्विझिशन

पैसा
Fri, 05/27/2011 - 20:13 नवीन
इन्क्विझिशन अर्थात 'धर्मसभा' या फक्त हिंदूनाच जरब बसवण्यासाठी नव्हत्या तर या धर्मसाभांमध्ये सक्तीने ख्रिश्चन धर्मात ओढले गेले असूनही गुपचुप हिंदू रीतीरिवाज पाळणार्‍या नव ख्रिश्चनांना पण अत्यंत कडक शिक्षा देण्यात येत असे. पणजीतली जुनी सेक्रेटरिएट बिल्डिंग (आदिलशहाचा राजवाडा) आणि फेरीधक्क्यासमोर असलेली पोलीस मुख्यालयाची इमारत ही इन्क्विझिशनवाल्यांची ऑफिसे होती. पोर्तुगीज दप्तरातल्या नोंदींनुसार १५६० ते १७७४ या साधारण २१४ वर्षांच्या काळात एकूण १६१७२ लोकाना लहान मोठ्या शिक्षा देण्यात आल्या. पैकी ५७ लोकाना जिवंत जाळण्यात आलं होतं. तर बहुतेकांच्या मालमता चर्चकडे जमा करून घेण्यात आल्या होत्या. १७२० च्या दरम्यान या तिन्ही तालुक्यात मिळून सुमारे दीड लाख लोक रहात होते ही गोष्ट विचारात घेता किती मोठ्या संख्येने अत्याचार झाले हे ध्यानात यावे. त्यातही मराठ्यांच्या पानिपतच्या पराभवापर्यंत गोव्याच्या फक्त ३ तालुक्यात पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि तिथले बहुसंख्य लोक सक्तीने धर्मांतरित करण्यात आले होते हेही विचारात घेतलं पाहिजे. याचाच अर्थ हा, की नवख्रिश्चनाना सुद्धा हिंदूंइतक्याच छळाला सामोरे जावे लागले होते. इन्क्विझिशनमधे सापडलेल्या दुर्दैवी जीवाना सुळी देणे, चाकावर घालून गोल फिरवणे, तोबरे देणे, हातपाय तोडणे इ शिक्षा दिल्या जात असत. १८१२ साली अधिकृतपणे इन्क्विझिशन संपुष्टात आणले गेले, तेव्हा सविस्तर नोंदी जाळून टाकण्यात आल्या. पण Charles Delone या फ्रेंच प्रवाशाने पाहिलेल्या छळाच्या कहाण्या L'Inquisition de Goa या पुस्तकात १६८७ साली नोंद करून ठेवल्या आहेत. या छळाला कंटाळून गोव्यातले बरेच नवख्रिश्चनसुद्धा कारवार मंगलोरकडे पळून गेले. यातही हिंदूना दहशत बसवण्यासाठी मुख्यत्वे इन्क्विझिशनचं हत्यार वापरण्यात आलं त्यामुळे त्याच्या सविस्तर नोंदी करून पोर्तुगालच्या राजाला कळवण्यात आल्या. इतिहासकार Dr. Teotonio R. de Souza यानीही त्यांच्या पुस्तकांतून हा सगळा इतिहास नोंदला आहे. आपल्याला आज संक्षिप्त स्वरूपात वाचताना हे सगळं इतकं भयानक वाटतं तर प्रत्यक्ष भोगलेल्या हिंदू आणि ख्रिश्चनांबद्दल काय बोलावं? "नाही चिरा नाही पणती" अशा अवस्थेत हे सगळे काळाच्या पडद्याआड गेले. आणि १८१२ नंतर त्यांची नावंसुद्धा इतिहासातून पुसून टाकण्यात आली. राहिल्या त्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे चालत आलेल्या कहाण्या आणि १६१७२ हा आकडा.
  • Log in or register to post comments

फारच

गोगोल
Sat, 05/28/2011 - 06:08 नवीन
माहीतीपूर्ण लेखमाला आहे. आवडतीय.
  • Log in or register to post comments

माहिती

आंसमा शख्स
Sun, 06/19/2011 - 04:50 नवीन
लेखाची भाषा तितकी पटत नाही.
पोर्तुगीजांच्या टोळधाडीने एका दिवसात २८० देवळे पाडण्याचा "महापराक्रम" केला.
या माहितीचा उल्लेख १९६७ साली ३०० देवळे पाडली असा आहे. त्यासाठी खास सैनिकांची कुमक मागवली होती. १५ वर्षांवरील सर्वांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे धर्म विषयक प्रचार ऐकावे लागत असे. अन्यथा त्यास मारून टाकले जात असे. त्यावेळी दिलेला आदेश असा - I hereby order that in any area owned by my master, the king, nobody should construct a Hindu temple and such temples already constructed should not be repaired without my permission. If this order is transgressed, such temples shall be, destroyed and the goods in them shall be used to meet expenses of holy deeds, as punishment of such transgression. संदर्भ: डॉ. टी आर डिसुझा हे पाहा http://www.vgweb.org/unethicalconversion/GoaInquisition.htm
  • Log in or register to post comments

हे प्रकरण थोडेसे रिस्कीच आहे

आळश्यांचा राजा
Sun, 06/19/2011 - 20:47 नवीन
हे प्रकरण थोडेसे रिस्कीच आहे - लिहिण्यासाठी. तटस्थपणे लिहिता येण्यासारखा हा इतिहास नाही. ती ललित लेखनाची विशेष सूचना टाकण्याच्या मुत्सद्दीपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! असो. लेखमाला छान आहे.
  • Log in or register to post comments

भारतातही

निनाद
Tue, 07/19/2011 - 12:07 नवीन
पोर्तुगालमध्ये ह्या न्यायालयाने स्पेनसारख्या देशातुन पळून पोर्तुगालमध्ये आलेल्या ज्यू लोकांवर 'न भूतो न भविष्यति' असे अत्याचार केले. ज्या ज्यूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांनाही हे भोग चुकले नाहीत. त्यांनी भयंकर, अमानुष असे शारिरीक व मानसिक अत्याचार भोगले. छळ करणार्‍यांना हव्या तशा जबान्या घेउन या ज्यूंना जिवंत जाळण्यात येत असे. आणि त्यांची मालमत्ता सरकारजमा केली जात असे.
भारतातही हिंदूंवर अत्याचार करतांना असे अत्याचार ज्युं वर केले गेले होते. यासाठी अर्थातच फ्रांसीस झेवियर प्रणित ख्रिस्ती लोक सहभागी होते. या ज्यु लोकांना बेने इस्रायली असे संबोधन आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा लेख वाचला...

मन१
Tue, 11/08/2011 - 16:49 नवीन
पुन्हा एकदा लेख वाचला. पोर्तुगीजांच्या विचित्र आक्रमकतेचा,धर्मांधतेचा,जुलूम जबरदस्तीचा व थेट लोकसंख्येचा तोलचा निव्वळ बळाच्या आधारावर बदलू पाहण्याच्या वृत्तेचा फटका फक्त इथल्या हिंदू-मुस्लिम ह्यांनाच बसला असे नाही; तर त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर थेट केरळपर्यंत उच्छाद मांडलेला दिसतो. रोचक गोष्ट ही की ह्यातून खुद्द गैर-पोर्तुगिज ख्रिश्चनही सुटले नाहित!! भारतात ख्रिश्चन धर्म हा युरोपच्या कितीतरी आधी आला. अगदि इसवीसनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकात. आज आपण ख्रिश्चन जग बघतो त्या ख्रिश्चन धर्मावर आख्खा युरोपीय, त्यातही पश्चिम युरोपीय संस्कृतीचाच पगडा आहे. नाव ख्रिश्चनांचे, कित्येक प्रथा युरोपच्याच. मग सुरुवातीचा ख्रिश्चन धर्म कसा होता? तो ह्या आजच्या धर्माहून खूपच भिन्न भासणारा होता. जिथे येशू वसला, फिरला व जिथे त्याने देह ठेवला त्या मध्य-पूर्व आशियाच्या संस्कृतीची व काही प्रमाणात ज्यू परंपरेची त्यात झाक होती.(ती युरोपिअनांमध्येही आहे, पण फारच कमी.) तर, मध्यपूर्वेत आजच्या इस्राइलच्या भागात ख्रिस्ताचा वावर. त्या भूभागाच्या असपास आसणार्‍या सिरियामध्येही झटकन ह्या नव्या धर्माचा प्रसार सर्वप्रथम झाअला. तिथून व्यापारी मार्गाने तो थेट केरळात दुसर्‍या शतकात पोचला. आजही केरळात सिरियन ख्रिश्चन आहेत.(त्यापैकीच एक पी सी अलेक्झांडर ). ह्यांच्या परंपरा, पद्धती, समजूती युरोपिअन ख्रिश्चन फ्लेवरहून फारच वेगळ्या होत्या.अशी सिरिय्न्-अरमाइक नि भारतीय प्रभावित एक संस्कृती बनत होती. आणि नेमके सोळाव्या शतकात ह्यांचा पत्ता पोर्तुगीजांना लागला. ह्यांची स्वतःची एक झाले! इथल्या एतद्देशीय हिंदू -मुस्लिम ह्यांच्या बरोबरच सिरिअन ख्रिश्चनांचाही छळ पोर्तुगीजांनी मांडला. ह्यांचे अत्यंत आदराचे आणि समाजशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे, दुर्मिळ ग्रंथच्या ग्रंथ सापडातील तिथे जाळले, शोधून शोधून जाळले.(तेव्हा छपाइ फारशी होत नसे. जाळले, की संपले. पुन्हा कुठली आवऋत्ती असणे असे नव्हतेच.) आणि (पोर्तुगीज) ख्रिश्चनांनी (सिरियन) ख्रिश्चनांना बळाने ख्रिश्चन करणे सुरु केले! बहुमोल ठेवा गेला तो गेलाच. थोडीशी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Syrian_Malabar_Nasrani इथेही मिळेल.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा लेख वाचला...

मन१
Tue, 11/08/2011 - 16:49 नवीन
पुन्हा एकदा लेख वाचला. पोर्तुगीजांच्या विचित्र आक्रमकतेचा,धर्मांधतेचा,जुलूम जबरदस्तीचा व थेट लोकसंख्येचा तोलचा निव्वळ बळाच्या आधारावर बदलू पाहण्याच्या वृत्तेचा फटका फक्त इथल्या हिंदू-मुस्लिम ह्यांनाच बसला असे नाही; तर त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर थेट केरळपर्यंत उच्छाद मांडलेला दिसतो. रोचक गोष्ट ही की ह्यातून खुद्द गैर-पोर्तुगिज ख्रिश्चनही सुटले नाहित!! भारतात ख्रिश्चन धर्म हा युरोपच्या कितीतरी आधी आला. अगदि इसवीसनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकात. आज आपण ख्रिश्चन जग बघतो त्या ख्रिश्चन धर्मावर आख्खा युरोपीय, त्यातही पश्चिम युरोपीय संस्कृतीचाच पगडा आहे. नाव ख्रिश्चनांचे, कित्येक प्रथा युरोपच्याच. मग सुरुवातीचा ख्रिश्चन धर्म कसा होता? तो ह्या आजच्या धर्माहून खूपच भिन्न भासणारा होता. जिथे येशू वसला, फिरला व जिथे त्याने देह ठेवला त्या मध्य-पूर्व आशियाच्या संस्कृतीची व काही प्रमाणात ज्यू परंपरेची त्यात झाक होती.(ती युरोपिअनांमध्येही आहे, पण फारच कमी.) तर, मध्यपूर्वेत आजच्या इस्राइलच्या भागात ख्रिस्ताचा वावर. त्या भूभागाच्या असपास आसणार्‍या सिरियामध्येही झटकन ह्या नव्या धर्माचा प्रसार सर्वप्रथम झाअला. तिथून व्यापारी मार्गाने तो थेट केरळात दुसर्‍या शतकात पोचला. आजही केरळात सिरियन ख्रिश्चन आहेत.(त्यापैकीच एक पी सी अलेक्झांडर ). ह्यांच्या परंपरा, पद्धती, समजूती युरोपिअन ख्रिश्चन फ्लेवरहून फारच वेगळ्या होत्या.अशी सिरिय्न्-अरमाइक नि भारतीय प्रभावित एक संस्कृती बनत होती. आणि नेमके सोळाव्या शतकात ह्यांचा पत्ता पोर्तुगीजांना लागला. ह्यांची स्वतःची एक झाले! इथल्या एतद्देशीय हिंदू -मुस्लिम ह्यांच्या बरोबरच सिरिअन ख्रिश्चनांचाही छळ पोर्तुगीजांनी मांडला. ह्यांचे अत्यंत आदराचे आणि समाजशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे, दुर्मिळ ग्रंथच्या ग्रंथ सापडातील तिथे जाळले, शोधून शोधून जाळले.(तेव्हा छपाइ फारशी होत नसे. जाळले, की संपले. पुन्हा कुठली आवऋत्ती असणे असे नव्हतेच.) आणि (पोर्तुगीज) ख्रिश्चनांनी (सिरियन) ख्रिश्चनांना बळाने ख्रिश्चन करणे सुरु केले! बहुमोल ठेवा गेला तो गेलाच. थोडीशी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Syrian_Malabar_Nasrani इथेही मिळेल.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा लेख वाचला...

मन१
Tue, 11/08/2011 - 16:52 नवीन
पुन्हा एकदा लेख वाचला. पोर्तुगीजांच्या विचित्र आक्रमकतेचा,धर्मांधतेचा,जुलूम जबरदस्तीचा व थेट लोकसंख्येचा तोलचा निव्वळ बळाच्या आधारावर बदलू पाहण्याच्या वृत्तेचा फटका फक्त इथल्या हिंदू-मुस्लिम ह्यांनाच बसला असे नाही; तर त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर थेट केरळपर्यंत उच्छाद मांडलेला दिसतो. रोचक गोष्ट ही की ह्यातून खुद्द गैर-पोर्तुगिज ख्रिश्चनही सुटले नाहित!! भारतात ख्रिश्चन धर्म हा युरोपच्या कितीतरी आधी आला. अगदि इसवीसनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकात. आज आपण ख्रिश्चन जग बघतो त्या ख्रिश्चन धर्मावर आख्खा युरोपीय, त्यातही पश्चिम युरोपीय संस्कृतीचाच पगडा आहे. नाव ख्रिश्चनांचे, कित्येक प्रथा युरोपच्याच. मग सुरुवातीचा ख्रिश्चन धर्म कसा होता? तो ह्या आजच्या धर्माहून खूपच भिन्न भासणारा होता. जिथे येशू वसला, फिरला व जिथे त्याने देह ठेवला त्या मध्य-पूर्व आशियाच्या संस्कृतीची व काही प्रमाणात ज्यू परंपरेची त्यात झाक होती.(ती युरोपिअनांमध्येही आहे, पण फारच कमी.) तर, मध्यपूर्वेत आजच्या इस्राइलच्या भागात ख्रिस्ताचा वावर. त्या भूभागाच्या असपास आसणार्‍या सिरियामध्येही झटकन ह्या नव्या धर्माचा प्रसार सर्वप्रथम झाअला. तिथून व्यापारी मार्गाने तो थेट केरळात दुसर्‍या शतकात पोचला. आजही केरळात सिरियन ख्रिश्चन आहेत.(त्यापैकीच एक पी सी अलेक्झांडर ). ह्यांच्या परंपरा, पद्धती, समजूती युरोपिअन ख्रिश्चन फ्लेवरहून फारच वेगळ्या होत्या.अशी सिरिय्न्-अरमाइक नि भारतीय प्रभावित एक संस्कृती बनत होती. आणि नेमके सोळाव्या शतकात ह्यांचा पत्ता पोर्तुगीजांना लागला. ह्यांची स्वतःची एक झाले! इथल्या एतद्देशीय हिंदू -मुस्लिम ह्यांच्या बरोबरच सिरिअन ख्रिश्चनांचाही छळ पोर्तुगीजांनी मांडला. ह्यांचे अत्यंत आदराचे आणि समाजशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे, दुर्मिळ ग्रंथच्या ग्रंथ सापडातील तिथे जाळले, शोधून शोधून जाळले.(तेव्हा छपाइ फारशी होत नसे. जाळले, की संपले. पुन्हा कुठली आवऋत्ती असणे असे नव्हतेच.) आणि (पोर्तुगीज) ख्रिश्चनांनी (सिरियन) ख्रिश्चनांना बळाने ख्रिश्चन करणे सुरु केले! बहुमोल ठेवा गेला तो गेलाच. थोडीशी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Syrian_Malabar_Nasrani इथेही मिळेल.
  • Log in or register to post comments

हा लेख वाचला गेला नव्हता

मदनबाण
Tue, 11/08/2011 - 17:24 नवीन
हा लेख वाचला गेला नव्हता ! सुंदर लिहला आहे... बाकी ख्रिश्चन धर्मांतर तर आजही हिंदूस्थानात जोमाने चालु आहे. इतके की कट्टर समजले जाणारे मुस्लीम सुद्धा आता ख्रिश्चन होत आहेत ! Kashmiri Muslims conversion to Christianity असे गुगलल्यावर अधिक माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

हो.पण...

मन१
Tue, 11/08/2011 - 17:42 नवीन
हो. पण आता बळजबरीची धर्मांतरे दोनेकशे वर्षांपूर्वीपर्यंत ज्या प्रमाणावर राजसत्तेच्या आश्रयाने होत, तेवढी आता होत नाहित. शिवाय ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचीच जबरदस्तीने धर्मांतरे केली,कुठे नरसंहारही केला हे आपल्याकडे फारसे ठाउक नसते, यास्तव विशेष बाब म्हणून इथे प्रतिसाद दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मनोबा धन्यवाद!

पैसा
Tue, 11/08/2011 - 19:04 नवीन
अभ्यासू प्रतिसादासाठी धन्यवाद! ही मालिका काहीशी रेंगाळली आहे याची जाणीव आहे. पुढचे ३ भाग तयार आहेत, पण काही ना काही अडचणी येत गेल्या त्यामुळे मालिका जरा मागे राहिली. आणखी ८/१० दिवसांत नक्की पुढचा भाग देऊ.
  • Log in or register to post comments

इन्क्विझिशनबद्दल सांगायचे

बॅटमॅन
Tue, 01/15/2013 - 23:45 नवीन
इन्क्विझिशनबद्दल सांगायचे म्हंजे गोवा इन्क्विझिशन नामक अ का प्रियोळकरांचे पुस्तक अप्रतिम आहे. रेफरन्सेसनी इतके नटलेले पुस्तक या विषयावर दुसरे नाही. ब्यालन्स्ड वैग्रेंच्या गफ्फा, ते पुस्तक वाचल्यावर नक्कीच थांबतील. सत्य बघा- ते ब्यालन्स्डच असले पाहिजे वैग्रे गफ्फा नकोत. त्या पुस्तकाचा उल्लेख दिसला नाही म्हणून हा धागा मुद्दाम वर काढतो आहे. धागाकर्त्यांनी हे पुस्तक बहुतेक वाचले असावे, पण स्टिल..
  • Log in or register to post comments

इन्क्विझिशनबद्दल सांगायचे

भ ट क्या खे ड वा ला
Mon, 08/26/2013 - 21:37 नवीन
गोमंतकातील एक प्रसिद्ध लेखक" महाबळेश्वर सैल' यांची "तांडव " नावाची एक उत्तम कादंबरी आहे हे पुस्तक मराठी आणि कोंकणी या दोन्ही भाषेत प्रसिद्ध झाल आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा सर्व मालिका वाचली

प्रचेतस
Wed, 04/23/2014 - 16:48 नवीन
पुन्हा एकदा सर्व मालिका वाचली. पुन्हा आवडली. धन्यवाद ह्या अप्रतिम मालिकेबद्दल.
  • Log in or register to post comments

हा लेख वर आणलाच आहे तर एक

प्रीत-मोहर
Wed, 04/23/2014 - 18:18 नवीन
हा लेख वर आणलाच आहे तर एक कमेंट ही टाकुन घेते. वर उल्लेख झालेल्या महालसा देवीचे , तिच्या मुळ ठिकाणी म्हणजे वेर्णा इथे खूप खूप भव्य आणि खूप्च सुंदर मंदिर बांधले जात आहे. तळ्या तर सुंदरच आहेत. इतक मस्त वाटत. कधीही गेलात तर नक्की पहा. श्री क्षेत्र वरेण्यपुर, वेर्णा इंडस्ट्रियल ईस्टेट च्या मागच्या बाजुला
  • Log in or register to post comments

विषवल्ली

पैसा
Wed, 04/23/2014 - 19:21 नवीन
महाराष्ट्रातच गोव्याबद्दल गैरसमज आहेत असं नव्हे, तर गोव्यातही महाराष्ट्राबद्दल ते जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत. कालपरवाच फेसबुकवर एका प्रख्यात इतिहास प्राध्यापकांनी लिहिलेली पोस्ट बघा. HISTORY: Today in History two Historical figures were born one SAVED OUR LITTLE GOA from Maharashtra n the other tried to destroy humanity that is Adolf Hitler. My Hero DR.JACK SEQUEIRA SAVED US GOANS from Mahatashtra Dr. Jack Sequeira was the President of the First Opposition party U .G. Party n the First Opposition leader in the First assembly of liberated Goa Daman n Diu .The MGP led by Bhausaheb Bandodkar wanted to merge Goa vt Maharashtra . Infact MGP under the clout of Maharashtra leaders fought the election vt that agenda. In 1967 the historic Opinion Poll was held on 16th january a very imp date in Goa s History which should b celebrated as the GOA SAVIOUR DAY n Dr Jack Sequeiras birthday should b celebrated all over Goa . He fought tooth n nail to save Goa from merging vt Maharashtra . His only son Erasmo Sequeira too led a campaign to save our Goa from merging . Hats off to both father - son duo .Shri Purushottam Kakodkar n Dr Sequeira lobbied hard in Delhi for the cause of Goa .If the MGP had succeeded in merging vt Maharashtra v would have been annihilated n finished n Goa would have been a small district of maharashtra . Our identity would have been lost . Thank you Dr Jack Sequeira we salute u for SAVING US n I also specifically salute my brothers of Banaulim n Navelim constituencies for turning the tide in favour of a separate entity . Long live Dr Jack Sequeira . त्यावर आलेल्या दोन प्रतिक्रियाही देत आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एकजण हायस्कूल टीचर आहे. Don't try and glorify Bandodkar who was a traitor and never knew who is the mother and father in life. His move to make Marathi as a sole official language of Goa is enough proof where he stood. N those who did not vote n are enjoying the fruits of our state hood should be parcelled to Maharashtra to watch shivajis natak.. मी दोन्हींचा निषेध करून आले, पण अजून प्राध्यापकांकडून काही उत्तर आलं नाही. दुसर्‍या महाशयांनी तू कोण मला शिकवणारी असं विचारलं. त्यावर तू विद्यार्थ्यांना हेच शिकवतोस का असं मी विचारलं. तोही नंतर गप्प आहे. गोव्याचा मराठ्यांशी निगडित असलेला इतिहास पुसायचे पद्धतशीर प्रयत्न पूर्वी पोर्तुगीजांनी केले, ते अजूनही चालू आहेत आणि त्याला मोठेमोठे लोक बळी पडत आहेत हे पाहून विषाद वाटला. :( त्यातही गोव्यातील ज्या जनतेने पोर्तुगीजांचा प्राणपणाने विरोध केला होता, त्यांचेच वंशज आज पोर्तुगीज आपले आणि डॉ सिक्वेरांनी महाराष्ट्रापासून गोव्याला वाचवले अशी भाषा वापरतात. कालाय तस्मै नमः|
  • Log in or register to post comments

भयंकर आहे हे सगळं.

प्रचेतस
Wed, 04/23/2014 - 19:25 नवीन
भयंकर आहे हे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इ. स. १३४६ साली हसन गंगू

प्रचेतस
Wed, 04/23/2014 - 19:40 नवीन
इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनीने कदंबांचा पराभव केला आणि हे देऊळ धुळीला मिळवले. नंतर देवगिरीच्या यादवांनी बहामनी सुलतानाचा पराभव केला आणि दिवाडी बेटावर नव्याने देऊळ बांधले.
इथे थोडीशी चूक झालीय का? देवगिरीच्या यादवांची राजवट १३१८ मध्ये हरपालदेवाच्या क्रूर हत्येनंतर संपुष्टात आली. कुणी स्थानिक पाळेगारांनी बहमनी सुलतानाच्या गोव्यातील सुभेदाराचा पराभव केला असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

इथे चूक झाली आहे

पैसा
Wed, 04/23/2014 - 19:48 नवीन
देवगिरीचे यादव नव्हे तर विजयनगर साम्राज्याचा मंत्री माधव याने हे देऊळ पुन्हा बांधले होते. लेखात दुरुस्ती करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद.

प्रचेतस
Wed, 04/23/2014 - 19:53 नवीन
धन्यवाद. पण १३४६ म्हणजे विजयनगरच्या स्थापनेनंतर अवघ्या १० वर्षात हे लोक गोव्यात पोचले म्हणजे त्यांनी साम्राज्यविस्तार खूपच झपाट्याने केला म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाही

पैसा
Wed, 04/23/2014 - 19:55 नवीन
१३४६ ला कदंबांचा पराभव होऊन देऊळ पाडले आणि १३७८ ला माधवाने परत उभे केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओके.

प्रचेतस
Wed, 04/23/2014 - 20:04 नवीन
ओके. धन्यवाद. पण शेवटी ह्याच विजयनगरवाल्यांनी गोव्याला अगदी नकळत पोर्तुगीजांच्या हवाली केले हा काळाच महिमाच म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो

पैसा
Wed, 04/23/2014 - 20:10 नवीन
इथल्या सुलतानाशी लढण्यासाठी पोर्तुगीजांची मदत घेतली. सगळ्या भारताला हा शाप आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा