Skip to main content

gazal

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 11/05/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित
काव्यरस

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 09/05/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित
काव्यरस

या गुलाबाच्या फुलाला...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 08/05/2017 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित
काव्यरस

कधी किनारा लिहितो,किंवा...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 05/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो! कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो! तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो! कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो! अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो! तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो! तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो! —सत्यजित
काव्यरस

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 30/04/2017 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 24/04/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

घोर हा घनघोर आहे!

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
चोर तर आहेच वर शिरजोर आहे काळजाचा घोर हा घनघोर आहे! जाळतो आहे जिवाला रोज थोडे पावसाचा जोर हा कमजोर आहे! तू नको जावूस माझ्या शांततेवर वेदने,मी वादळाचा पोर आहे! ऐन दुःखाचा पसारा मांडला मी वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे! जिंदगी एकाच दुःखावर उधळली मी हिशोबी,फार काटेकोर आहे! वाचण्याआधीच हे लक्षात घे तू मी कुणी नाही कवी,चितचोर आहे! —सत्यजित
काव्यरस

गंधभारल्या रात्री होत्या...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित
काव्यरस

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 19/04/2017 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित
काव्यरस

तडा गेलाच आहे तर...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 17/04/2017 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित
काव्यरस