आजकाल सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये जवळपास रोजच विविध देशांमधील पाहणीचे आणि सर्वेक्षणाचे निकाल छापलेले असतात.
उदा. चहा, सिगारेट पिणाऱ्यांपेक्षा, ते न पिणारे लोक दिर्घायुषी असतात वगैरे वगैरे.
दहा- पंधरा वगैरे वर्षे ते लोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून मग शेवटी एक निष्कर्ष काढला जातो. तो आपण वाचतो. बरेचदा आपल्याला तो मान्यही असतो. मान्य करण्याइतपत तो मुद्दा पटवून सांगितलेला असतो. बरोबर आहे. पण त्यालाही काही अपवाद मात्र सापडतात. म्हणजे ते सर्वेक्षण १०० टक्के कधीही लागू होत नाही. कारण, प्रत्येक नियमाला अपवाद असू शकतो. ( उदा. अगदी कसलेच व्यसन नसलेले लोकही बरेचदा काहीही कारण नसतांना आजारी पडतात व इतरांपेक्षा लवकर मृत्यू ला सामोरे जातात. )
तसेच बरेचदा आपण पूर्वीच्या लोकांनी अनुभवातून तयार केलेल्या म्हणींनुसार घडलेले बघतो. पण अगदी शंभर टक्के तसेच घडते आणि तेच प्रत्येक ठिकाणी लागू पडतेच असे नाही. पण म्हणून आपण त्या म्हणी आणि सुविचार लगेच खोट्या ठरवत नाही.... (उदा : अडला हरी गाढवाचे पाय धरी... पण याचा अर्थ असा नाही ही, शंभर टक्के प्रसंगांत अडलेला, अडचणीतला माणूस फक्त मुर्ख व्यक्तीचेच पाय फक्त धरेल? खरोखर चांगला माणुससुद्धा त्याला मदत करू शकतोच की!)
(उदाः सत्यमेव जयते, नेहेमी खरे बोलावे ... हे आपण शंभर टक्के पाळतो का? नाही. तसे शक्यही नाही. पण म्हणून खरे बोलून उपयोगच नसतो, असेही नाही, म्हणजे सुविचार, "म्हण" ही निरुपयोगी नक्कीच नाही! पण १०० टक्के उपयोगीही नाही!!)
मग, ज्योतिषी जेव्हा आपल्याला कुंडलीतील विशिष्ट ग्रहयोगावरून काही भविष्यातील किंवा घडून गेलेल्या घटना सांगतात तेव्हा मात्र आपण त्यांना अगदी काटेकोर विज्ञानाच्या नियमांत बसवून का पडताळत बसतो? सर्वेक्षनाप्रमाणेच, ज्योतिषशास्त्रात, समजा एक विशिष्ट ग्रहयोग असलेल्या ७० टक्के व्यक्तींच्या जीवनात एक ठरावीक घटना घडलीच आहे. मग ते खरे मानायला काय हरकत आहे? की विज्ञानवादी त्याला एक योगायोगच मानतील? की मुद्दाम असेच म्हणणार की, उरलेल्या ३० टक्के लोकांच्या बाबतीत तशी घटना का घडली नाही? मग सर्वेक्षणाच्या निष्कर्षाला सुद्धा ते योगायोग म्हणतील का?
अगदी बारीक सारीक तपशीलांसह जो ज्योतिषी अभ्यास करतो त्याचे निकाल शंभर टक्के सुद्धा खरे ठरले आहेतच की! ज्योतिषशास्त्राच्या पूर्ण आहारी जावे असे मी म्हणत नाही, पण त्याचा मार्गदर्शक म्हणून नक्की उपयोग होईल.
प्रतिक्रिया
10 Jun 2009 - 1:48 pm | अमोल केळकर
ज्योतिषशास्त्राच्या पूर्ण आहारी जावे असे मी म्हणत नाही, पण त्याचा मार्गदर्शक म्हणून नक्की उपयोग होईल.
१०० % सहमत
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
10 Jun 2009 - 2:33 pm | अविनाशकुलकर्णी
सारे पत्रिकेवर अवलंबुन आहे..योग असेल तसेच होते..तश्याच घटना घडतात..पराधिन आहे जगति पुत्र वानराचा......प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते व ति यावि लागते..हतबल पणे बघणे हेच मानवाच्या हातात आहे
10 Jun 2009 - 3:36 pm | चिरोटा
सहमत्.पत्रिका बघुन लोकांचा ईतिहास अचुक तपशिलात सांगणारे ज्योतिषी मी बघितले आहेत.अर्थात शंभरातले ५/१० चुकतीलही पण पत्रिका बघुन अचुक ईतिहास सांगणे हा योगायोग/थोतांड निश्चितच नाही.
भविष्य वर्तवणे हे कठीण काम आहे.काही ज्योतिषी थोड्याफार प्रमाणात तेही सांगतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
10 Jun 2009 - 8:01 pm | मराठमोळा
प्रकाश घाटपांडे साहेबांनी हा विषय हाताळल्याचे आठवते आहे. लिंक सापडत नाहिये..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
10 Jun 2009 - 8:27 pm | लिखाळ
अनुभवशास्त्र किंवा म्हणीशास्त्र असे म्हणून कुणी सल्ले द्यायला लागले तर या दोन गोष्टी सुद्धा ज्योतिषशास्त्रासारख्या विवाद्य होतील असे मला वाटते.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
10 Jun 2009 - 9:51 pm | आनंद घारे
अगदी बारीक सारीक तपशीलांसह जो ज्योतिषी अभ्यास करतो त्याचे निकाल शंभर टक्के सुद्धा खरे ठरले आहेतच की!
याचे एकादे तरी उदाहरण कोणाला माहीत आहे?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
10 Jun 2009 - 10:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्योतिषावर ज्याला विश्वास ठेवायचाय त्याने ठेवावा, ज्याला नसेल ठेवायचा त्याने ठेवू नये; विज्ञानवाद्यांनी ज्योतिष 'एंडॉर्स' केलं नाही म्हणून काय बिघडतं फलज्योतिषवाल्यांचं?
उगाच का विज्ञानवाद्यांना झोडायचा प्रयत्न करत आहात??
अनेक कोटी किलोमीटर्स लांब असणार्या ग्रहांचा आपल्यावर परिणाम होतो (?) यापेक्षा आपल्या हातात, तोंडात असणार्या सिगरेट, कॉफी, व्हिक्स, मोबाईल इत्यादींचा आपल्यावर परिणाम होतो हे सामान्य ज्ञानातून लगेच पटतं.
उद्या काय घडणार हे आजच कळलं तर उद्याचा दिवस फुकटच म्हणायचा की!!
(प्रयत्नवादी आणि विचारनिष्ठ) अदिती
10 Jun 2009 - 10:12 pm | लिखाळ
उद्या काय होणार हे आज कळाले तर त्या प्रमाणे आजच्या विश्रांतीचे, झोपेचे, मनोरंजनात कारणी लावण्याच्या वेळेचे नियोजन करता येईल.
उगीच आज भरपूर श्रम करायचे आणि उद्या भलतेच काही वेगळे नशीबात असेल तर आज श्रम करण्यापेक्षा झोप काढणे बरे...
--(धोरणी) लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
11 Jun 2009 - 8:08 am | आनंद घारे
उगीच आज भरपूर श्रम करायचे आणि उद्या भलतेच काही वेगळे नशीबात असेल तर आज श्रम करण्यापेक्षा झोप काढणे बरे...
ज्यांना झोप काढणे हेच जास्त चांगले असे वाटते त्यांनी ती काढून घ्यावी. उत्तम सल्ला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
11 Jun 2009 - 1:55 am | Nile
ज्यांना गोष्टींमागील विज्ञान कळत नाहीत ते मग अशा नशीब, ललाटरेषा, भविष्य वगैरे संकल्पनांचा आधार घेउन आपले अपयश लपवायचा आणि/वा दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करतात.
यामध्ये विज्ञान मॄत्यु कशाने झाला याचा शोध लावण्याचा प्रयत्न करेल कारण मृत्यु ची कीती कारणं असु शकतात हे विज्ञानाला माहीती आहे. उगाच नशीबातच होतं म्हणुन रडत बसणं विज्ञानाला माहीत नाही, तर या मृत्युचा शोध करुन यापुढे त्यावर काही उपाय करता येईल का हे बघणे हे विज्ञानाचे काम.
आमचा भविष्य वगैरे "संकल्पनांना" विरोध नाही, कारण कमकुवत मनाच्या लोकांना त्याची गरज आहे.
10 Jun 2009 - 10:30 pm | टिउ
तुमचा लेख वाचुन 'सफरचंदाची संत्र्याशी तुलना' (comparing apples to oranges) या वाक्प्रचाराची आठवण झाली...
10 Jun 2009 - 11:03 pm | धनंजय
अनेक लोक सर्वेक्षणाचे निष्कर्ष कुठल्या प्रकारे वाचतात, त्याबद्दल या लेखातून वाचकांना माहिती मिळते. म्हणून लेख माहितीपूर्ण आहे.
सर्वेक्षणाचा अहवाल योग्य तर्हेने द्यायचा असेल, तर त्यातील निष्कर्ष चूक असण्याची शक्यता काय आहे, हे सांगणे जरुरीचे असते. नाहीतर हे सर्वेक्षण ग्राह्यच नसते.
म्हणजे असा काही निष्कर्ष असतो (एक कपोलकल्पित सर्वेक्षण उदाहरणासाठी दिले आहे) :
शीर्षक : आडला नारायण गाढवाचे पाय धरी
निरीक्षण : विपत्तीत आडलेल्या १०० सज्जनांना विचारता ७५ सज्जनांनी आपल्याला नाठाळ व्यक्तीपुढे नमते घ्यावे लागल्याचे सांगितले. २५ सज्जनांच्या म्हणण्यानुसार विपत्तीत त्यांना असे करावे लागले नाही.
विश्लेषण : (हे विश्लेषण गणिताच्या दृष्टीने बरोबर आहे, कपोलकल्पित नाही.) हे सर्वेक्षित सज्जन जगातील विपत्तीत आडकलेल्या सज्जनांचे सुयोग्य प्रतिनिधी असतील, तर ७५% प्रसंगांत नाठाळ लोकांपुढे नमावे लागते. ही सर्वेक्षणातील टक्केवारी आहे, पण जगातील टक्केवारीची ९५% विश्वासार्ह मर्यादा ६५%-८३% आहे. (म्हणजे या मर्यादेबद्दलही ५% अविश्वास आहे.)
निष्कर्ष : बहुतेक प्रसंगात (६५%-८३%, यावर ९५% विश्वास) आडलेल्या सज्जनांना नाठाळ व्यक्तीपुढे नमते घ्यावे लागते.
म्हणूनच सर्वेक्षणांच्या अहवालामध्ये आपण "मार्जिन ऑफ एरर" (प्रमादाच्या मर्यादा) वगैरे आकडे आवर्जून बघतो. तो वरीलच प्रकार, वेगळ्या शब्दांत. हे सर्व तपशील नसलेले सर्वेक्षण-विश्लेषण आपण खुशाल कचराकुंडीत टाकावे.
सिगारेट पिणार्या/न-पिणार्या लोकांच्या सरासरी आयुष्यमानाबद्दल मर्यादा आपल्याला माहीत आहेत, आणि त्या आकड्यामधील प्रमादाच्या विश्वासार्ह मर्यादा आपल्याला सर्वेक्षणातून माहीत आहेत. म्हणून अशा निष्कर्षांचा वापर आपण करू शकतो.
ज्योतिषातील भाकितांचा वापरही "प्रमादाच्या विश्वासार्ह मर्यादा" जोखून करावा, असे जर या लेखाचे सूत्र असते तर ते पटण्यासारखे असते. (पण तसे लेखकाने स्पष्ट म्हटले नाही. शिवाय वर्तमानपत्रात येणार्या बहुतेक भविष्य-सदरांत या विश्वासार्ह मर्यादांचा उल्लेखही नसतो.)
11 Jun 2009 - 8:17 am | आनंद घारे
आडला नारायण गाढवाचे पाय धरी
या म्हणीची सत्यासत्यता पाहण्यासाठी आधी नारायण, गाढव, अडणे आणि पाय धरणे यांच्या व्याख्या कराव्या लागतील. अशा सर्वमान्य व्याख्या करणे अशक्य आहे. त्यानंतर पुरेशी उदाहरणे घ्यावी लागतील, ती मिळ्णार नाहीत. एवढे करून ही म्हण चुकीची आहे असे जरी सिद्ध झालेच तरी त्यामुळे अंधश्रद्धा ही डोळस असते असे कुठल्याही तर्काने सिद्ध होत नाही. फारफार तर ही म्हण प्रचारातून काढून टाकावी असे म्हणता येईल.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
11 Jun 2009 - 9:57 am | Nile
11 Jun 2009 - 9:59 am | निमिष सोनार
येथे मला असा वाद करायचा नाही आहे की:
दूर असलेल्या ग्रहांचा परीणाम खरेच होतो की नाही?
मला खालीलप्रमाणे म्हणायचे आहे, ते नीट समजून घ्या:
समजा शंभर कुंडल्या घेतल्या आणि त्यातले विशिष्ट ग्रहयोग असलेल्या ७० टक्के लोकांच्या जीवनात ठराविक घटना घडलेल्याच आहेत. याला आपण ज्योतिष न मानता एक सर्वेक्षण मानू. तर मग हे मान्य करू शकतो ना?
एक सिद्ध झालेला योग खालीलप्रमाणे:
प्रथमस्थानी शुक्र असलेले खालील व्यक्ती कलाकार (कवी, व्यंगचित्रकार, चित्रकार, कलाकार) आणि संवेदनशील आहेतः
बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी व बरेच इतर....जाणकार ज्योतिषी यात भर घालू शकतात. अजून नावे आठवली की सांगेनच...
यात संत्र्याची तुलना सफरचंदाशी वगैरे मी करत आहे असे नाही.
म्हणजे, कुंडलीतील ग्रहयोग व त्याचा "घडणार्या घटनांशी संबंध" याची टक्केवारी, (इतर सगळे फॅक्टर धरून - नक्षत्र, राशी, दशा, महादशा) जाहीर करून जर ती नेहेमी ६०, ७० टक्के पेक्षा जास्त होत असेल तर त्याला नियम म्हणून स्विकारायला काय हरकत आहे?
11 Jun 2009 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही जी वैज्ञानिक निष्कर्ष आणि फलज्योतिष यांची तुलना केली आहे ती चुकीची वाटली, बाकी चालू द्या...
पण एक प्रश्न आहे, अगदी अचूक कुंडल्या मांडता येतात का? मुलाच्या जन्माच्या वेळेत पाचेक मिनीटांची एरर तर असतेच. जुळ्यांची आयुष्य कुठे एकसारखी असतात?
असो. ज्योतिष म्हणजे ज्योतींचं शास्त्र असं शिकवलं होतं.
अदिती जो(ति)शी
11 Jun 2009 - 11:03 am | नितिन थत्ते
काही हरकत नाही. पण अशी स्टॅटिस्टिकल चाचणी घ्यायची जेव्हा जेव्हा गोष्ट होते तेव्हा ज्योतिषी त्याला कधीही तयार होत नाहीत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
11 Jun 2009 - 8:14 pm | धनंजय
त्याचा दुवा येथे :
http://www.ias.ac.in/currsci/mar102009/641.pdf
२० मतिमंद मुले (मतिमंद मुलांच्या शाळेतली) आणि २० मतिमंद नसलेली मुले (सामान्य शाळेत वरचा नंबर येणारी), यांच्या (मिसळलेल्या) पत्रिका २७ ज्योतिषांनी बघितल्या (५१ ज्योतिषांनी मागवल्या, पैकी २७ ज्योतिषांनी उत्तरे पाठवलीत).
त्या पत्रिकांपैकी कुठल्या मतिमंद मुलांच्या, कुठल्या नव्हेत, त्याची वर्गवारी या ज्योतिषांनी लावली. केवळ नाणेफेकीने त्यांची वर्गवारी लावायची तर ५०% (म्हणजे सरासरी २० पत्रिकांची) योग्य वर्गवारी आपोआप लागते. जर निकष काही प्रमाणात उपयोगी असता, तर २० पेक्षा पुष्कळ अधिक पत्रिकांची वर्गवारी ठीक लागावी अशी अपेक्षा आहे.
मात्र सरासरी १७.२५ पत्रिकांची वर्गवारी योग्य लावली गेली (म्हणजे मतिमंदांच्या पत्रिका "मतिमंद" म्हणून सांगितल्या गेल्यात, मतिमंद नसलेल्यांच्या "मतिमंद नाही" अशा). सरासरी २२.७५ पत्रिकांमध्ये चुकीची वर्गवारी लावली गेली.
म्हणजे थोडीफार नाणेफेकीइतकीच, म्हटल्यास नाणेफेकीपेक्षा थोडा कमकुवत निकाल.
या बाबतीत तरी या ज्योतिषांकडून पत्रिकेवरून मतिमंदता ओळखण्याची पद्धत निरुपयोगी आहे (किंवा नाणेफेकी-इतकीच उपयोगी आहे) असे म्हणता येते.
ही चाचणी येथील श्री. प्रकाश घाटपांडे, पुणे विद्यापीठाचे डॉ. सुधाकर कुंटे, आयुका संस्थेचे डॉ. जयंत नारळीकर, आणि अंनिसचे श्री. नरेंद्र दाभोळकर यांनी केली.
11 Jun 2009 - 8:42 pm | चतुरंग
थेट नाणेफेकीशी तुलना तितकीशी पटत नाही. कारण सांगतो -
प्रश्न असा येतो की जे १७.२५ पत्रिकांची वर्गवारी बरोबर लावू शकले त्यांनी त्यांचे फक्त शेवटचे रिझल्ट्स पाठवले आहेत की त्यांनी केलेली गणिते/विश्लेषणही त्यांच्या निकालांसोबत आहे?
असेल तर फारच उत्तम म्हणजे ज्यांचे उत्तर बरोबर आलेले आहे त्यांच्या गणिता/विश्लेषणात काही समान धागा आढळतो आहे का हे पाहिले पाहिजे. तसा असला तर त्याला धरुन उरलेल्या ज्या पत्रिकांचे उत्तर चुकले त्याचेही विश्लेषण करता येऊ शकेल का?
तसे नसेल तर मग ढोबळमानाने उत्तर दिले असे मानून त्यांची तुलना थेट नाणेफेकीशी होईल!
चतुरंग
12 Jun 2009 - 8:27 am | आनंद घारे
एक सिद्ध झालेला योग खालीलप्रमाणे:
प्रथमस्थानी शुक्र असलेले खालील व्यक्ती कलाकार (कवी, व्यंगचित्रकार, चित्रकार, कलाकार) आणि संवेदनशील आहेतः
बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी व बरेच इतर....जाणकार ज्योतिषी यात भर घालू शकतात. अजून नावे आठवली की सांगेनच...
सांगा, पण प्रथमस्थानी शुक्र नसलेले किती लोक महान आहेत तेसुद्धा पाहिलेत तर त्याला थोडा तरी अर्थ आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
12 Jun 2009 - 7:37 pm | निमिष सोनार
मी असे म्हणालो नाही की: प्रथमस्थानी शुक्र असलेले व्यक्ती महान, थोर नेते असतात.
मला असे म्हणायचे आहे: प्रथमस्थानी शुक्र (एकटा शुक्र) असलेले व्यक्ती संवेदनशील, सर्जनशील, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकार वगैरे असे कलाकार असतात.
मी थोर नेत्यांची उदाहरणे यासाठी दिली की त्या व्यक्ती सर्वांना परिचयाच्या आहेत.
माझ्या स्वतःच्या ज्या ज्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या कुंडलीत वरील योग आहे, ते ते सर्जनशील व संवेदनशील कलाकार आहेतच हे मी अनुभवले आहे.
ते उदाहरण दिले असते तर काय उपयोग होता?
माझे नातेवाईक तुम्हाला माहीती आहेत का? नाही.
म्हणून मी थोर नेत्यांची उदाहरणे दिली. आपणही परिचयातील व्यक्तींच्या कुंडलीत असा योग तपासून बघू शकता.
मात्र शुक्रासोबत दुसरा ग्रह असेल तर, त्याचे परीणाम बदलतील.
ते उदाहरण देण्याचे अजून एक कारणः माझ्या स्वतःच्या कुंडलीत प्रथमस्थानी मीन राशीत शुक्र आहे. मी सुद्धा एक व्यंगचित्रकार, कवी, चित्रकार आहे. मला अनेक बक्षीसे मिळाली आहेत.
14 Jun 2009 - 10:08 am | आनंद घारे
की ज्यांच्या कुंडलीत ते ग्रह त्या स्थानावर नाहीत असे सुद्धा असंख्य लोक संवेदनशील, प्रतिभाशील वगैरे सापडतील. संपूर्ण सर्वेक्षण केले नाही तर या दोन गोष्टींचा एकमेकाशी संबंध आहे असे म्हणणे ही स्वतःची फसवणूक आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
11 Jun 2009 - 9:03 pm | चित्रा
अनेकांनी अनेक गोष्टी लिहून झाल्या आहेत त्यामुळे अधिक बोलण्यासारखे काही नाही. एकच म्हणावेसे वाटते -मी तरी लग्नांच्या बाबतीत पत्रिकांचा अतिशय वाईट वापर झाल्याचे पाहिले आहे. "वाईट" पत्रिका असलेल्या स्त्री-पुरूषांना लग्न ठरायच्या बाबतीत अडचणी येणे हे तर अगदी साधारण. लग्नाच्या वयात येईपर्यंत अगदी आनंदी, निर्भर, हुषार असणारी मुले-मुली या फलज्योतिषाच्या विषयात अडकली की त्यांना आयुष्याचे निर्णय घेताना ज्योतिष्यांच्या निर्णयांवर अवलंबून रहायला भाग पाडले जाते किंवा ती आपण होऊन कोणीतरी केलेल्या ठोकताळ्यांवर विश्वास ठेवून स्वतःची आयुष्ये (उगाचच) दु:खाची करून घेतात. समजा जरी फलज्योतिष खरे असले असे धरून चालले, तरी पुढे काय घडणार आहे हे माहिती करून स्वतःचे आत्ताचे सुखाचे क्षण कशाला व्यर्थ घालवायचे? तोच वेळ स्वतःसाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कारणी का नाही लावायचा? हे कळलेले नाही.
11 Jun 2009 - 9:07 pm | चतुरंग
तरी पुढे काय घडणार आहे हे माहिती करून स्वतःचे आत्ताचे सुखाचे क्षण कशाला व्यर्थ घालवायचे? तोच वेळ स्वतःसाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कारणी का नाही लावायचा? हे कळलेले नाही.
१००% सहमत!
(रमलशास्त्री)चतुरंग
11 Jun 2009 - 10:51 pm | नितिन थत्ते
सर्वेक्षणातील निष्कर्षांना बळकटी आणण्यासाठी.
सर्वेक्षणात दिल्या गेलेल्या पत्रिका बरोबर नव्हत्या असे कोणा ज्योतिष्याने म्हटले होते का?
पत्रिका बनवण्यासाठी वापरलेली जन्मवेळ बरोबर होती याची खात्री केली होती असे दिसते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
11 Jun 2009 - 11:08 pm | नितिन थत्ते
हा जो विदा उपलब्ध होता त्याचा (रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखा) उपयोग करून घेतला जाऊ शकतो. ज्या पत्रिका उपलब्ध आहेत त्यांच्यातील साम्य स्थळे शोधून एक नवे स्टॅटिस्टिकल मॉडेल तयार केले जाऊ शकेल.
म्हणजे असे:
सध्याच्या ज्योतिष्यांच्या आडाख्यांप्रमाणे ५ व्या स्थानात रवि असेल आणि ३र्या स्थानात शनि असेल तर मतिमंद असण्याची शक्यता असते असे असेल (हे मी काहीही लिहिले आहे... असे आडाखे नसतीलही. मला काहीही माहिती नाही) तर हा विदा अभ्यासल्या नंतर ५व्या स्थानात रवि असेल आणि ४थ्या स्थानात शनि असेल आणि २र्या स्थानात मंगळ असेल तर मतिमंद असतो असे नवे आडाखे बनू शकतील. हे नवे आडाखे वापरून नवी भाकिते करता येतील आणि नवे ज्योतिषशास्त्र उदयास येऊ शकेल.
(सध्या हवामानखात्याने बनवलेले मान्सूनचे मॉडेल अशाच स्वरूपाचे आहे. असलेला विदा तपासून बनवलेले)
पण त्यासाठी १०००-२०००-५०००-१०००० वर्षांपूर्वी कुणीतरी लिहून ठेवलेलेच बरोबर आहे हा आग्रह सोडून द्यावा लागेल.
खराटा
(रंग माझा वेगळा)
11 Jun 2009 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काहीही काय बोलता? 'बाबा वाक्यं प्रमाणम्' कसं विसरता? ;-)
शिवाय जन्मवेळेतल्या एररची काळजी कशी घेणार? पाच मिनीटांच्या फरकाने आयडेंटीकल जुळ्यांचीही आयुष्य प्रचंड प्रमाणात बदलतात, तर मग पाच मिनीटांच्या एररमुळे पत्रिका, पक्षी भविष्य नाही का बदलणार?
12 Jun 2009 - 11:36 am | Nile
मला अशाच "अभ्यासाद्वारे" लिहिलेला एक ग्रंथ आहे असे एकुन माहीत आहे. आत्ता नाव आठवत नाही आहे पण तुम्हाला त्यात तुमची पत्रिका सापडते असं ऐकुन आहे.
संपादनः नाव आठवले. त्या ग्रंथाचे नाव भृगुसंहीता आहे असे वाटते. मी ऐकल्याप्रमाणे या ग्रंथात सर्व(?) permitations and comibanitions च्या कुंडल्या आहेत. त्यामुळे तुमची कुंडली त्यात असायलाच पाहीजे व त्यायोगे तुमचे भविष्यही!
12 Jun 2009 - 8:37 pm | नितिन थत्ते
भृगुसंहिता हे अशा अभ्यासाने बनवलेले पुस्तक नाही.
भृगुसंहितेत सर्व शक्य कुंडल्या आहेत हे खरे. पण दिलेल्या कूंडलीवरून सांगितलेले ज्योतिष हे पारंपरिक पद्धतीचेच आहे.
मिळालेला विदा तपासून बनवलेले नाही.
खराटा
(रंग माझा वेगळा)
12 Jun 2009 - 10:50 am | अवलिया
वा! मस्त चर्चा !!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
12 Jun 2009 - 11:57 am | नितिन थत्ते
या चाचणीत (किंवा अशा स्वरूपाच्या इंटरअॅक्शनमध्ये) दोन्ही पक्ष एकमेकाचे शत्रू असल्याप्रमाणे वागतात. त्या ऐवजी यातून ज्या ज्योतिष्याने जास्तीत जास्त बरोबर भाकित वर्तवले त्याची भाकित वर्तवण्याची पद्धत दोघांनाही तपासून पाहता येईल आणि काही निष्कर्ष काढता येऊ शकतील.
('तिकिट लावलेले लिफाफे' या विषयावर वाद झाल्याचे या चाचणीसंबंधीच्या दस्तैवजात वाचले म्हणून हा शत्रुत्वाचा विचार मनात आला)
खराटा
(रंग माझा वेगळा)
12 Jun 2009 - 7:40 pm | निमिष सोनार
मी असे म्हणालो नाही की: प्रथमस्थानी शुक्र असलेले व्यक्ती महान, थोर नेते असतात.
मला असे म्हणायचे आहे: प्रथमस्थानी शुक्र (एकटा शुक्र) असलेले व्यक्ती संवेदनशील, सर्जनशील, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकार वगैरे असे कलाकार असतात.
मी थोर नेत्यांची उदाहरणे यासाठी दिली की त्या व्यक्ती सर्वांना परिचयाच्या आहेत.
माझ्या स्वतःच्या ज्या ज्या नातेवाईकांच्या व मित्रांच्या कुंडलीत वरील योग आहे, ते ते सर्जनशील व संवेदनशील कलाकार आहेतच हे मी अनुभवले आहे.
ते उदाहरण दिले असते तर काय उपयोग होता?
माझे नातेवाईक तुम्हाला माहीती आहेत का? नाही.
म्हणून मी थोर नेत्यांची उदाहरणे दिली. आपणही परिचयातील व्यक्तींच्या कुंडलीत असा योग तपासून बघू शकता.
मात्र शुक्रासोबत दुसरा ग्रह असेल तर, त्याचे परीणाम बदलतील.
ते उदाहरण देण्याचे अजून एक कारणः माझ्या स्वतःच्या कुंडलीत प्रथमस्थानी मीन राशीत शुक्र आहे. मी सुद्धा एक व्यंगचित्रकार, कवी, चित्रकार आहे. मला अनेक बक्षीसे मिळाली आहेत.
12 Jun 2009 - 8:09 pm | चिरोटा
माल्कम ग्लॅडवेल ह्यांचे Outliers हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. यशात केवळ कष्ट आणि बुद्धिमत्ताच नाही तर ईतरही फॅक्टर्स(जन्म वर्ष) असतात हे त्यानी बर्यापैकी डेटा देवून सिध्ध करायचा प्रयत्न केला आहे.
काही ठरावीक क्षेत्रातले ऊत्तुंग यश संपादन करणार्या लोकांचा त्यानी अभ्यास केला आहे.
राशीं वगैरेचा त्यात उल्लेख नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न