सातारा -कास पठार

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
16 Sep 2024 - 11:26 pm

छ
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.
अ
शिलाहार राजा भोज(दुसरा) याने ११९० मध्ये बांधला.पुढे तो यादव-बहामनी-आदिलशाही-मराठा साम्राज्य (१६७३)-मोगल-ताराराणी-मोगल-शाहू-इंग्रज अशा क्रमानुसाऊ विविध राजवटींत समाविष्ट झाला.यातल्या ठळक गोष्टी म्हणजे पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती.
सातारा शहर
A
गडावर शेवटी मंगळादेवीचे मंदिर आहे मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.येथून सातारा शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते.समोरच हिरवाईने नटलेल्या ढगांचा पदर आणि सूर्य बिंबाची चमचमती टिकली लावलेल्या अनेक डोंगररांगा मोहक भासतात.किल्ल्याच्या पायवाटा,भिंती सोनकी फुलांच्या निसर्ग भाषेत बोलक्या झाल्या आहेत.
*सोनकी
1आ
रात्रीचे जेवण पितळी थाळीतसह पितळी गडू पाहून मजा वाटली.जेवणही रूचकर होतं, आमच्याकडे हाॅटेलमधलं व्हेज जेवण म्हणजे सगळ्या भाज्यांची ग्रेव्ही सारखी चवही सारखीच लागते.इथे सगळ्या भाज्या वेगळ्या लागत होत्या.यावरून सातऱ्याचे मांसाहारी जेवण का प्रसिद्ध आहे याचा अंदाज आला,काटा किर्रच असणार ;)
इ

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो.पावसाची मस्त भुरभुर सुरु होती.कासचे बुकिंग ११ वाजताचे होते.त्यामुळे आधी ठोसेघर धबधबा पाहायला निघालो.रस्त्याने फुललेली कारवी डोळे भरून पाहिली.धुक्यात हरवलेला डोंगर मध्येच पावसाच्या सरी मधेच कोवळ ऊन अगदी सुंदर वातावरण होतं.ठोसेघरला पण तिकीट काढल्यावर आत निघालो.दूरपर्यंत येणारा धबधब्याच्या प्रवाहाचा आवाज रोमांचित करीत होता.इथे पेबल लावलेली पायवट होतीच.इथेही बऱ्यापैकी कारवीची फुलं होती, यथेच्छ कारवी पाहिली.काही मशरूम ही झाडांवर वाढलेली होती,त्यांचे निरीक्षण केले.ठोसेघर धबधबा ६६० फूट उंचीवरून कोसळतो.ठिकाणी ३ धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा ,तिसरा धबधबा या दोघांपेक्षा पासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे.
*ठोसेघर धबधबा
ई
*कारवी
उ

उ

ए
पण भारतातील सर्वात जास्त उंचीचा १८४० फूट वजराई धबधबा जवळच होता तो आम्ही पाहिला नाही ही छोट्या ट्रिपमधली मोठी चूक -१ ;)

ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे . तिथल्या प्रचंड उंच पवनचक्की पाहिल्या ज्या इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या?

*चावळेवाडी पवनचक्की प्रकल्प
क
पुढे सज्जनगडावर पोहचलो.शाळेत असतांना इथे आले होते,तेव्हाचा प्रसंग जशास तसा डोळ्यासमोर उभा राहिला.रामदास स्वामींचे शेजघर ,पाणी भरायच्या मोठमोठ्या हंडे पाहून हरखून गेले होते ते परत आठवले.सज्जनगड आधी परळी किल्ला (गड ) म्हणून होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना हा किल्ला सज्जनगड विस्तारासाठी दिला होता.
*सज्जनगड
घ
गडाच्या टोकावर धान्या मारूतीचे मंदिर पाहायला जातांना दूरवरच्या तलावाचे दृश्य पाहायला छान वाटत होते.रामभक्तीचा वसा मला माझ्या आजी आजोबांकडून मिळाला.त्या रामाचे परम भक्त रामदास स्वामी यांच्या कार्याने पवित्र सज्जनगडावर माझं मन भरून येतं होतं.श्रीराम जयराम जय जय राम या सामूहिक नामस्मरणाच्या वेळी रामभक्तीतमुळे माझ्या डोळ्यांना अश्रू अनावर झाले.ते का हे मला ठाऊक आहे पण हे मी शब्दात मांडू शकत नाही,जय जय रघुवीर समर्थ! ही छोट्याशा ट्रिप मधली मोठी बरोबर गोष्ट-१;)
च

सज्जनगडावर रेंगाळल्यावर २ वाजता मुख्य आकर्षण 'कास पठार" याच्याकडे वळालो.आता मात्र गर्दी , ट्रॅफिक भयानक वाढली होती.आमचा वाहक चांगला असल्याने कमी वेळात तिथून बाहेर पडलो.कास पर्यंत पोहचू पर्यंत ३.३० वाजले.बुकिंग ३ पर्यंत होतं.काय होईल याची काळजी होती,पण गर्दीच इतकी प्रचंड होती की तिकिट असणं हीच बाब महत्त्वाची होती.

आता फुलांच्या त्या जादुई जगात शिरल्यावर हा स्वर्ग आहे का ,असाच भास झाला.कास पठार चार एकापेक्षा अधिक भागात पसरले आहे.
फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले उत्तर पश्चिम घाटाच्या शिखरावर एक लॅटरिटिक पठार आहे. आणि मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती जीवन टिकवून ठेवते. विशेष म्हणजे, कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे, जे थेट वातावरणाच्या संपर्कात आहे.(माहिती सौजन्य -आंतरजाल)
गेट क्र.१-४ अशा दोन्ही बाजूंनी हे पठार विविधरंगी फुलांच्या उत्सावासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत आपल्यासाठी डोलत असते.
गेट क्र.१ मध्ये फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे.इथे टोपली कारवी,आभाळी यांची निळसर फुलं तर जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत.गेट क्र.२ आणि. ३ एकाच पठार भागासाठी दूरवर आहेत इथे वेगळ्याच प्रकारची गुलाबी तगर,दीपकाडी,धनगराचा फेटा,पांड,गेंद,चावर,डालजेलियाना ही मला ओळखता आलेली फुलं पाहिली.इतरही अनेक फुलं आहेत जी ओळखता आली नाहीत.

याबद्दची माहिती देणारा एक अल्बम
*जांभळी/आभाळी
ट
*टोपली कारवी
ठ
*जंगली आलं
ढ
ण
*दीपकाडी
त
*निसुरडी
द
*छोटा गेंदफुल किंवा धनगाराचा फेटा असावा
द
*सीतेची आसवं
E
*गुलाबी फ्रेश तगर
न

आता आम्हांला खुप उशीर झाला होता आणि ट्रॅफिक खूप वाढलं होतं तेव्हा लवकर परत फिरणं गरजेचे होते.त्यामुळे गेट क्र.४ कुमुदिनी तलावाकडे जाऊ शकलो नाही ही मोठी चूक -२...
पण पिवळी सोनकी आणि मिकी माऊस नाही दिसली.मी नेटवर खुपदा वाचलं की कास पठार उगाच ओव्हररेटेड ठिकाण आहे.एकदम सफेद झूठ आहे हे अजिबात विश्वास ठेवू नका .कास पठार खरच अद्वितीय आहे !

सकाळी ७ ते रात्री ७ वेळ आहे,१५० रू.तिकिट आहे, ऑनलाईन पण साईटवर जाऊन काढू शकता.सकाळी कास पाहून ‌तपोळा,कास तलाव,वजराई धबधबा पाहुन मग बामणोली, यवतेश्वर वगैरे पाहू शकता.वेळेअभावी आणि नियोजन अभावी आम्ही फक्त कास केला.

धुक्यात हरवलेलं हे पठार कधी जोरदार कधी भुरभुर पाऊस, सर्रकन पडणारे कोवळ ऊन आणि फुलांचे डोळ्याचे पारणे फेडणारे पृथ्वीवरचा स्वर्ग याची डोळा याची देही एकदा-अनेकदा अनुभवावा असाच आहे.

ब

-भक्ती

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Sep 2024 - 5:20 am | कंजूस

सुंदर.

मी फार पूर्वी गेलो होतो. कारवी फुलणारे वर्ष होतं. बहुतेक २००८. तेव्हा संरक्षण वगैरे नव्हतं. पहिली बस साडे पाचची पकडून प्रथम कासला गेलो. नंतर सज्जनगड. फेसबुकच्या प्रसारामुळे पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. मग कुंपण, बुकिंग सुरू झालं. वाहतूक वाढली. प्रदुषणाचा परिणाम हळूहळू दिसू लागेल.

कर्नलतपस्वी's picture

17 Sep 2024 - 6:14 am | कर्नलतपस्वी

सातार जवळच कृष्णा आणी वेण्या नदीचा संगम आहे. श्री क्षेत्र माहूली आणी संगम माहूली अशी जवळच सात कि मी. वर अतिशय सुंदर जागा आहे. दोन तास पुरे आहेत. सातवाहन/शिलाहार काळातील वीरगळ (नक्की सांगता येत नाही) जागोजागी पडलेले आहेत. विश्वेश्वर आणी सिद्धेश्वर अशी १७३५ मधील दोन सुंदर भव्य मंदिरे आहेत. महाराणी ताराबाई ची समाधी इथेच आहे.

संगमावर विवीध प्रकारचे पक्षी विहारताना दिसतील. पाइड किंगफिशर हा वेगळा पक्षी मला दिसला. संगम अतिशय सुंदर आहे.

काही दुखद घटनेचा साक्षीदार म्हणून गेलो असल्याने लेख डकवला नाही पण फोटो घेण्याचा मोह सुद्धा आवरला नाही.

आपली भटकंती आवडली.

आंद्रे वडापाव's picture

17 Sep 2024 - 8:40 am | आंद्रे वडापाव

सुंदर फोटोज ... . छान ट्रिप !

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Sep 2024 - 11:39 am | अमरेंद्र बाहुबली

खूप छान माहितीपूर्ण लेख ताई. आवडला.
पवनचक्कीचा फोटो पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चाळकेवाडीत सुझलॉन कंपनीचं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथेच माझ २०१४ ला ट्रेनिंग झालं होतं. मी सर्व मुलांना घेऊन रविवारी सज्जनगडावर आलो होतो. रात्री झोपायला जागा मिळाली नाही. खूप शोधाशोध केल्यावर मिळाली.
इतर पवनचक्कीच्या तुलनेत अत्यंत संथ फिरत होत्या? तिथे हवा कमी असावी. तुम्ही ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये.

ज्या पवनचक्कीचा फोटो टाकलाय ती बंद आहे.म्हणजे ब्रेकडाउन मध्ये.
अच्छा!ती सर्वात उंच होती,चालू असतांना पहायला पाहिजे होती.

गोरगावलेकर's picture

17 Sep 2024 - 2:43 pm | गोरगावलेकर

फोटो अप्रतिम. अनेक वर्षांपासून येथे जायचे ठरवते पण काही ना काही कारणाने जमत नाहीच

पवनचक्कीची जागा खूप वारा असतो तिथे असते.

वाऱ्याने पाती वेगात फिरतात पण लोड टाकल्यावर म्हणजे जोडलेल्या डायनामोमधून वीज निर्मिती सुरू केल्यावर पाती हळू फिरतात.

श्वेता२४'s picture

17 Sep 2024 - 10:29 pm | श्वेता२४

वर्णन नेहमीप्रमाणेच सविस्तर व सुंदर. फोटो निव्वळ अप्रतिम....धबधबा व त्यातील इंद्रधनुष्य जबरदस्त....

प्रचेतस's picture

19 Sep 2024 - 6:01 am | प्रचेतस

मस्तच भटकंती झाली की, फुले आताशी बहरायला लागली आहेत. कासला दर पंधरवड्याला नवी नवी फुलं दिसतात.
जवळच असणारे यवतेश्वराचे मंदिरही सुरेख आहे.

झकासराव's picture

19 Sep 2024 - 5:10 pm | झकासराव

वाह
सुंदर फोटो
कासला एकदा गेलोय.
तेव्हा online बुकिंग, कुंपण वै नव्हते.
गर्दी बऱ्यापैकी होती.
गाडी खाली पार्क करून बस ने जाण्याची सोय होती.
तरी लोकं बामणोली निघालो सांगून गाडी रस्त्यातच कुठेतरी दाबून मनसोक्त फिरत होते आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत होते. कुंपण वै नसल्याने भरपूर फिरलो , भरपूर फोटो काढले.
एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या.
लगेचच पुढच्या वर्षी की काय online बुकिंग, कुंपण वै सोय झाली असे वर्तमानपत्रात वाचले होते.
नंतर पठार उतरून खाली येउन कार घेउन बामणोली ला गेलो होतो हे आठवतंय.

Bhakti's picture

23 Sep 2024 - 2:25 pm | Bhakti

एक काकू तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून घरच्या कुंडीत लावायला नेताना दिसल्या होत्या.

पुढच्यावेळी बामणोलीला आधी जाईन :)

किल्लेदार's picture

23 Sep 2024 - 2:54 am | किल्लेदार

अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण. वीस-एक वर्षांपूर्वी इथे मुक्त संचार शक्य होता. पण कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक.
माझीही एक आठवण...
DSC_0069

Bhakti's picture

23 Sep 2024 - 2:26 pm | Bhakti

सुंदर फोटो आहे.

जुइ's picture

23 Sep 2024 - 9:20 pm | जुइ

सुंदर फोटो आणि वर्णन तितकेच खास. सातारा येथे काही वर्ष राहिल्यामुळे हा सर्व परिसर चांगला परिचयाचा आहे. सज्जनगड इतक्या काळानंतर तुझ्या मुळे पुन्हा अनुभवता आले आणि मन खरेच व्याकुळ झाले. अजिंक्यतार्याहून शहराचे विहंगम दृष्य दिसत आहे. कास पठाराचे फुलांचे फोटोही अप्रतिम आहेत.

कंजूस's picture

24 Sep 2024 - 9:12 am | कंजूस

लोणावळा कारवी फुलली

याचे बरेच विडिओ यूट्यूबवर येत आहेत. ही जागा मुंबईतल्या लोकांना जवळ आहे.

झकासराव's picture

24 Sep 2024 - 3:03 pm | झकासराव

कधी काळी मीही फोटो धागा काढलेला आहे

http://misalpav.com/node/19743

सर्वसाक्षी यांनी उल्लेख केलेलं निफाडी फूलं कोणतं?(फोटो क्र.?) नफाडी म्हणजेच नभाळी का?(बहूतेक फोटो क्र.७)
फोटो क्र.४ आभाळी आहे वाटतं स्पष्ट दिसत नाही.
आभाळी म्हणजे जांभळ्या पाकळ्या आभाळाकडे तर निभाळी म्हणजे पाकळ्या जमिनीच्या दिशेने असतात.
यासाठी गाईड पाहिजे होता पण खुप गर्दी असल्यामुळे,आणि फ्री बुकिंग असल्यामुळे गाईड नियोजन करता आले नाही.

लेख, फोटोज सर्वच छान! गंमत म्हणजे आमचं मुळ गाव खुद्द सातारा, आणि पिढीजात घरही अजिंक्यतारापासुन बऱ्यापैकी जवळ, परंतु जन्मापासुनच प्रदुषीत हवेची सवय झाल्यामुळे असेल कदाचीत, पण मी सातारला गेलो की हमखास आजारी पडतो 😀
हा अनुभव अनेकदा आल्याने गेल्या किमान १०-१२ वर्षांत मी तिकडे फिरकलो नाहिये. लेखात उल्लेखलेली सर्वच ठिकाणे अनेक वर्षांपुर्वी पाहिली असली तरी ती विस्मृतीत गेली होती, लेख वाचुन आणि फोटोज बघुन त्यांच्या आठवणी काहीश्या ताज्या झाल्या!

मला वाटलं तुम्ही कोकणातले? ;)
आम्ही लहानपणापासून दुष्काळच पाहिला, त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्यांचा हेवा वाटतो.

सातारा आवडलं.अजिंक्यतारा तर रोज भेट द्यावा इतका सुंदर आहे.
लाटकरांचे कंदील पेढे घेतले.लोक सहज दोन तीन पेढे फक्त टेस्ट करून निघून जायचं कसलीच तक्रार मालक करत नव्हते आश्चर्य वाटले हा हा.साताऱ्याला निसर्ग, संस्कृती, माणसं, खाद्यसंस्कृती भरभरून मिळाली आहे.
सज्जनगडावर गेल्यावर तर खूप भरून आलं!
जय जय रघुवीर समर्थ _/\_

श्रीरंग_जोशी's picture

14 Oct 2024 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम सुंदर फोटोज अन वर्णन. या ठिकाणी वीस वर्षांपूर्वी मार्च महिन्यात गेलो आहे :-).
एकदा पावसाळ्यात जायचे आहे.