गाडीने ४ तास घेणाऱ्या प्रवासाला रेल्वेने ६ तास घेऊन एकदाचे ताकारी ला येऊन पोहोचलो . बीबी एक तरफ और बीबी का भाई एक तरफ हे वाक्य सार्थ ठरवत गाडी घेऊन जिजाजी वेळेवर घ्यायला आले.
दुसऱ्यादिवशी ०६:३० ला सकाळी आमचा प्रवास सुरु झाला आणि बायको आणि बहिणीने उद्धार केला कि ०५:३० ला निघायचे होते आणि तब्बल एक तास उशिरा निघालो आहोत. आता ह्यावर आम्ही तोंड बंद ठेवायचे सोडून म्हटले अरे आमच टार्गेटच सकाळी ०६:०० वाजता च होत पण तुम्ही लवकर आवरावे म्हणून खोटी वेळ सांगितली . झाले तोंडाचा जो दांडपट्टा सुरु झाला की बापरे बाप. ह्या जर शिवाजी -अफजल खान भेटीच्या वेळी उपस्थित असत्या तर स्वतः सय्यद बंडा त्याचे शीर त्याच्या दांडपट्ट्याने कापून घेऊन समोर उभा राहिला असता आणि म्हणाला असता बाई नाही नाही आई माफ कर. थोडा सावरून आम्ही म्हटलं ठीक आहे पुढे वेळ कव्हर करतो, मै समय हूँ असा म्हणत "वेळ" हसत होता कारण आमच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार होता . मिरजेवरून अथणी कडे जायच्या रस्त्यावर वळलो आणि गाडीचा वेग ८० वरून २० वर आला . समोर रस्त्यावर फूट फूट भर असणारे खड्डे आमच्या कॉन्फिडन्स वर अक्षरशः बोळा फिरवत होते . साधारण २०-२५ किलोमीटर गेल्यावर आणि १ तास घालवल्यावर अक्षरशः घायकुतीला येऊन समोरून येणाऱ्या ट्रक ड्रायवर ला थांबवून विचारले हे सारथ्या ..आम्हास सांग बरे आमची पापे संपली का म्हणजे खराब रास्ता किती अंतर आहे ....त्यावर तो ही हसत तोंडातली पिचकारी नेम धरून फेकत म्हणाला ...काय नाय हो साहेब फक्त १ किलोमीटर आहे ..हे काय समोरचे वळण संपले कि चांगला रस्ता आहे .. आणि खरोखर अक्षरशः लोण्यासारखा रस्ता सुरु झाला आणि समोर पाटी आली "Welcome to Karnataka"..
अथणी ते विजापूर ७५ किलोमीटर चे अंतर केवळ ५० मिनिटांमध्ये कापून आमची वरात पोहोचली ते इब्राहिम रोजा ह्या ठिकाणी पोहोचलो . इस्लामी पर्शियन कलेचा नमुना म्हणजे हे ठिकाण . खालील फोटो मध्ये एक नक्षीकाम दिसेल, ते म्हणजे ह्या इमारतीखाली लेण्या आहेत आणि हि नक्षी म्हणजे तिथे पर्यंत पोहोचण्याचा रस्ता होय .अर्थात सगळे रस्ते आता बंद केले आहेत. ते पाहून आम्ही प्रस्थान केले ते मलिक ए मैदान तोफ बघायला . असे म्हणतात की हि तोफ जेव्हा उडवायचे तेव्हा तिला बत्ती देणारा पाण्यामध्ये उडी घ्यायचा कांन फाटू नये म्हणून. ही तोफ पंचधातू पासून बनवलेली असून ५५ टन वजनाची आहे. अर्थात महत्वाचे ठिकाण म्हणजे गोल घुमट होताच म्हणून तिकडे निघालो .नाताळची सुट्टी असल्याकारणाने प्रचंड गर्दी आणि गोलघुमटामध्ये येणारा आवाज हे आकर्षण असल्याने तिथे प्रत्येकजण ओरडत होता त्यामुळे जास्त वेळ न थांबता उशीर झाल्याने अलमट्टी धरण पुन्हा बघायचे ठरवून आम्ही निघालो. रस्ते अत्यंत चांगले असल्याने सुसाट वेगाने परंतु २०० किलोमीटर च्या अंतरात ५ टोल नाके पास करत आम्ही हंपी मुक्कामी येऊन पोहोचलो .
विजापूर येथील इब्राहिम रोजा दर्गा
ह्या परिसरात असे म्हणतात कि गुप्त रस्ते आहेत आणि ते शोधायला खालील कोडे दिलेले आहे जे दरवाज्याच्या बाजूला कोरलेले आहे
कोडे :
मलिक ए मैदान तोफ :असे म्हणतात की हि तोफ जेव्हा उडवायचे तेव्हा तिला बत्ती देणारा पाण्यामध्ये उडी घ्यायचा कांन फाटू नये म्हणून. ही तोफ पंचधातू पासून बनवलेली असून ५५ टन वजनाची आहे
दरमजल करीत २०० किलोमीटरच्या अंतराला ५ टोल देऊन शेवटी हंपी येथे येऊन पोहोचलो
होम स्टे मस्त होता. एक फ्लॅट आम्हाला दिला होता . व्होल वावर इस आवर अश्या प्रकारे होता. सकाळी लवकर उठून नाश्ता केला . रात्री जेवण जरा गडबडीत केल्यामुळे , सकाळी मस्त डोसा , रस्सम आणि चटणी चा नाश्ता होता. मस्त पैकी डोश्याला कधी चटणी मध्ये घुसळून तर कधी रस्सम चा अभिषेक घालून आम्ही जिभेला अभिषेक करत होतो. शेवटी दुपारी पण जेवायचे आहे असा दम मिळाल्यावर जनाची नाही तर मनाची लाज वाटून स्थळ दर्शनाला बाहेर पडलो. पहिल्यांदा पोहोचलो ते गणेश मंदिरामध्ये. आम्हाला गराडा घातला तो टुरिस्ट गाईड्स ने पण त्यांना बाजूला सारून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली आणि किती फोटो काढू असे झाले. अर्थात काही ठिकाणी गाईड जरुरी आहेच. सर्व ठिकाणी घेतला तर उत्तम.
प्रथम आला तो सिवासलेसु गणेश आणि नंतर फोटोचा क्लिकक्लिकाट थांबेनाच
खाली हम्पी येथील सिवासलेसु गणेश मंदिर
सिवासलेसु गणेश मंदिर परिसरातील इतर शिल्पे
विरुपाक्ष मंदिर : हे सर्वात प्रसिद्ध आणि एकमेव मंदिर आहे जिथे देवाची मूर्ती आहे . इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे भर दुपारी आम्ही अनवाणी पायाने चालून देखील खालील दगड गरम नव्हता झाला त्यामुळे चालताना वरून तळपते ऊन पण खाली खडक अगदी कोमट अशी परिस्थिती होती.
विरुपाक्ष मंदिर अंतर्गत भाग.
नरसिह मंदिर : ह्या मूर्तीचा हात तुटला असून ह्या मूर्तीचे रूप खाली दिले आहे जिथे लक्ष्मी नरसिहाच्या बाजूला बसली आहे
हजारीराम मंदिर : असे म्हणतात की रामायणामधील हजारो शिल्पे कोरली आहेत म्हणून ह्याचे नाव हजारीराम . अशी मान्यता आहे कि इथे राजघराण्यामधील लोक पूजा कारण्यासाठि येत असत
भूमिगत शिव मंदिर : हे मंदिराचा वरील फक्त कला भाग दिसत होता परंतु १९८४ साली खोदकामामध्ये हे सुंदर मंदिर मिळाले
विठ्ठल मंदिर: १५ व्या शतकात बांधलेले हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर असून असे म्हणतात कि येथील विठ्ठल मूर्ती सध्या पंढरपूर येथे आहे :
इथेच रंगमहाल असून त्याच्या प्रत्येक खांबाभोवती छोटे छोटे भरीव खांब असून त्या खांबामधून ५६ प्रकारचे वाद्य ऐकू येतात विशेष म्हणजे हे सर्व खांब भरीव आहेत.
दगडी रथ : हा रथ आपल्या नवीन ५० रुपयांच्या नोटेवर आढळतो . असाच रथ कोणार्क येथे सूर्य मंदिरामध्ये आहे.
इथे आम्हाला जरा उशीर झाला आम्ही पोहोचलो ०५:१५ वाजता कारण ६ वाजता मंदिर बंद होते आणि चालत अथवा बॅटरीवर चालणारी गाडी घेऊन जाणे हा एकाच पर्याय असल्याने आम्हाला पोहोचायला ०५:३० वाजले त्यामुळे अर्ध्या तासामध्ये पटापट बघून मंदिर पाहून बाहेर पडलो अर्थात अतृप्तेची भावना मनामध्ये ठेवूनच.
दुसऱ्या दिवशी मात्र पटापट आवरून प्रस्थान ठेवले ते लोटस महालाकडे
लोटस महाल : इथे सायफन पद्धतीने पाणी आणून ह्या महालाच्या वरील भागामध्ये सोडले जायचे . ते पाणी महालाच्या खंबा मधून वाहत असे त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे थंड वाटते असे. हा महाल राणी व इतर राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधला होता
हत्ती ठेवण्याची जागा :
लोटस महाल येथील काही शिल्पे
शेपटीवर बसलेला हनुमान
गोपुर
वीरभद्र
नंदी
तेथून आम्ही निघालो तो राजवाडा परिसर बघण्यासाठी
महानवमी डिब्बा : राजा इथे त्याचे कार्यक्रम पाहत असे आणि असे म्हणतात की तो इथे दुर्गा पूजा करत असे.
इथेच प्रसिद्ध पुष्करणी आहे. ही १९८४ साली उत्तखनामध्ये मिळाली. इथे दगडी पाईप आहे आणि ती कोठे जाते ह्याचा शोध घेतला असता हि जमिनीमध्ये गेलेली सुंदर पुष्करणी मिळाली
राजवाडा परिसर
पट्टाभिराम मंदिर आणि परिसर
अच्युतराय मंदिर परिसर
दुसऱ्या दिवशी वाटेत एहोळी ह्या ठिकाणचे सुंदर दुर्गा मंदिर बघितले
एका खांबावरील दुर्गा
श्रीकृष्ण कालिया मर्दन करताना
आज आमच्या सहलीचा शेवटचा दिवस. हंपी बघताना शेवटी शेवटी तर अगदी निराश होत होते आणि चीड येत होती कि इतके सामर्थ्यशाली वैभव बहामणी लोकांनी नष्ट केले तसे अजून अजून बघण्याची भूक ही तशीच उफाळून येत होती.
समाप्त
प्रतिक्रिया
30 Dec 2018 - 3:03 pm | कंजूस
सुरेख!!
धावती भेट छान!!
कुडलसंगमा ? पट्टडकलु? बदामि गुंफा? लखुंडीही शक्य होतं.
31 Dec 2018 - 11:19 pm | हर्षद खुस्पे
धन्यवाद . कुडलसंगमा गेलो होतो पण धावती भेट होती कारण हंपी गाठायचे होते. पट्टडकलु? बदामि गुंफा? लखुंडी वेळे अभावी शल्य झाले नाही
30 Dec 2018 - 3:09 pm | पद्मावति
सुंदर.
30 Dec 2018 - 4:39 pm | यशोधरा
वा! अप्रतिम! लेख थोडक्यात आवरता घेतलात का? अजून लिहायचे होते. हम्पीमध्ये बरेच पाहण्यासारखे असेल ना?
31 Dec 2018 - 11:24 pm | हर्षद खुस्पे
धन्यवाद . होय हंपी साठी कमीत कमी ४-५ दिवस पाहिजेत.
30 Dec 2018 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सहल आणि फोटो. मजा आली वाचताना-पाहताना.
31 Dec 2018 - 11:19 pm | हर्षद खुस्पे
धन्यवाद .
31 Dec 2018 - 8:57 am | प्रचेतस
लवकर संपवलंत हो.
विरुपाक्ष मंदिराचे गोपुर नव्यानेच रंगवलेले दिसत आहे.
तुम्ही काढलेल्या छायाचित्रांमध्ये मदन शंकराचा तपोभंग करताना (छतावरील चित्र), विष्णू- लक्ष्मी-भूदेवी, वीरभद्राजवळ हात जोडून उभा असलेला दक्ष अशी शिल्पे सहजच ओळखता आली.
माझ्या हंपी दौर्याची आठवण ताजी झाली. अर्धवटच राहिलीय लेखमाला, संपवायला हवीय.
31 Dec 2018 - 11:21 pm | हर्षद खुस्पे
धन्यवाद प्रचेतस साहेब. होय खूपच लवकर संपवला आहे लेख याचे कारण म्हणजे मूर्तींबद्दल असलेले कमी ज्ञान
1 Jan 2019 - 7:54 pm | यशोधरा
कधीचा मुहूर्त बघितलाय म्हणे?
2 Jan 2019 - 8:45 am | प्रचेतस
मनात येईल तेव्हा. :)
31 Dec 2018 - 4:27 pm | चौकटराजा
हंपी म्हणजे नुसतीच देवळे नाहीत . तुंगभद्रा नदीतून नौकाविहार , आजूबाजूच्या दगड धोंड्यामधून मनसोक्त भटकंती असे ते फुल पँकेज आहे. या बरोबरोबरच तुंगभद्रा डॅम , बेल्लारी किल्ला ,बदामी पट्टडकल करता आले तर सोने पे सुहागा !
31 Dec 2018 - 11:22 pm | हर्षद खुस्पे
खरं आहे तुमचे एकदम . माझे हि मन नाही भरलेले
31 Dec 2018 - 11:29 pm | कंजूस
लहान मुलास घेऊन शिल्पकला ,मंदिरे पाहात हिंडायचे अवघड असते. तरी बरेच पाहिलेत.
अशावेळी होस्पेट शहरात राहाणे फायद्याचे ठरते.
12 Jan 2019 - 10:34 am | ज्योति अळवणी
वर्णन छान केले आहात. खरच आपलं शिल्प वैभव इतकं उत्तुंग आहे. का त्याचा इतका ह्रास केला गेला पूर्वी? माझ्याही मनात हा प्रश्न राहून राहून येतो
12 Jan 2019 - 10:34 am | ज्योति अळवणी
वर्णन छान केले आहात. खरच आपलं शिल्प वैभव इतकं उत्तुंग आहे. का त्याचा इतका ह्रास केला गेला पूर्वी? माझ्याही मनात हा प्रश्न राहून राहून येतो
30 Mar 2019 - 8:50 pm | चौकटराजा
हंपी व ओरछा ही दोन नुसती एका भेटीत जमणारी ठिकाणे नाहीत . दोन्ही ठिकाणाचे वास्तुवैभव वेगवेगळे आहे पण दोन्हीत साम्य म्हणजे निसर्गरम्य परिसर . मिपाकरांनी या दोन्ही जागांना अवश्य भेट द्यावी . ते का ? खाली विडियो पहा

30 Mar 2019 - 8:54 pm | चौकटराजा
30 Mar 2019 - 9:02 pm | चौकटराजा
https://www.youtube.com/watch?v=kMsZ4agFhwE
30 Mar 2019 - 9:09 pm | चौथा कोनाडा
समर्पक माहिती आणि सुंदर फोटोज.
हर्षद खुस्पे , मस्त घडवलीय हंपीची सफर !
30 Mar 2019 - 9:27 pm | गोरगावलेकर
सुंदर. बघायलाच हवे.