गरुडाचे घरटे आणि घरट्यातील हत्ती

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in भटकंती
8 Nov 2017 - 7:31 pm

आजपर्यंत वेगवेगळ्या ऋतुंमध्ये, अनेक वेळा तोरणा किल्ला पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ऋतुमध्ये तोरण्याचे वेगळेच रुप बघावयास मिळते. तोरणाच काय, सह्याद्रीतील प्रत्येक किल्ला ऋतुमानानुसार रुप पालटतो. या वर्षी मात्र ह्या रुप पालटण्याच्या प्रक्रियेचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली.

आमच्या या अफलातुन गडकोट दर्शनाची डॉक्युमेंटरी अवश्य पहा येथे क्लिक करुन..

तोरणा किल्ला राजगडावरुन दिसणारा तोरणा किल्ला

निसर्गशाळेच्या विविध सहलींच्या माध्यमातुन, पर्यटकांमध्ये निसर्गाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. निसर्गातुन, मोकळ्यामैदानातुन चालताना, पायवाट सोडुन चालु नये, कारण पायवाट नसेल तर आपण आपल्या पायाखाली पाने, फुले, वेली, गांडुळ, बेडुक आदींना चिरडण्याची भीती असते. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासुन ते अगदी पर्यावरण संरक्षण संवर्धनात आपापल्या पातळीवर, आपापल्या परीने काय योगदान देता येईल इथपर्यंत माहीती साध्या, छोट्या संभाषणातुन पर्यटकांना सुचवली जाते. अनेकदा अमराठी (प्रसंगी परदेशी देखील) पर्यटक देखील अशा विविध सहलींमध्ये सहभागी होतात. अशा पर्यटकांना सह्याद्री, सह्याद्रीतील संस्कृती, भुगोल आणि त्या सोबतच इतिहासाविषयी देखील माहीती आम्ही देण्याचा प्रयत्न करीत असतो.
कालच्या पदभ्रमणाच्या सुरुवातीलाच, निसर्गचक्रातील एक बदल, अगदी गाड्या पार्क केल्यावर लगेचच जाणवला. तो म्हणजे बदललेले वारे. शिवकाळात एका इंग्रज वकीलाने तोरण्याविषयी माहीती लिहीताना त्यास गरुडाचे घरटे असे संबोधले आहे. तर मग ह्या गरुडाच्या घरट्यात घोंघावणारा वारा असणारच. हे घरटे समुद्रसपाटीपासुन अंदाजे चार हजार सहाशे फुट उंचीवर आहे. एवढ्या उंचावर वाहणारा वारा देखील तितकाच खमक्या आहे. पावसाळ्यात हा वारा पश्चिमेकडुन पुर्वेकडे वाहताना आम्ही अनुभवलाय. ह्या वा-याचा अनुभव घ्यायचा असेल तर किल्ल्यावर चढताना रेडे पट्ट्यावर थोडे थांबावे. तसा वारा सगळीकडेच असतो.पण रेडे पट्ट्यावर हा वारा किल्ल्याच्या सोंडेला धडकुन अजुन वर उभारी घेतो. व नेमके पायवाटेवरच आपल्याला ह्या वा-याचा आनंद घेता येतो.
रेडे पट्ट्यापासुन पुढे उभी चढण सुरु होते. कडा अंगावर येतो. ही वाट आपणास कोठी दरवाज्यातुन गडावर घेऊन जाते. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, मुरुमाच्या रेती मुळे व मातीतुन मोकळ्या झालेल्या लहान मोठ्या खड्यांमुळे नवख्या माणसास जरा अवघड जाते. आमच्या ग्रुपमध्ये देखील काही नवखे होतेच. त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. रेडे पट्टा सोडल्यावर घोंघावणारा वारा देखील मागे, खालीच राहतो. गुरुत्वाकर्षाच्या विरुध्द दिशेने, पुणे परीसरातील सर्वात उंच पर्वत चढताना दमायला होते. प्रत्येक श्वास-प्रश्वासागणिक शरीरातुन अशुध्दी बाहेर पडत असते. पायवाटेच्या उजवीकडे, भट्टी वागद-या कडील दरीची भीती केव्हाच संपलेली असते. श्वासाची गती वाढलेली असते. आकाशातुन सुर्याची भट्टी डोंगर द-यांसहीत आपल्या अंगा-प्रत्यंगास भाजुन काढीत असते. अंग घामाघुम झालेले असताना , अचानक एखादी वा-याची हलकी झुळुक आलीतर जणु सह्याद्रीनेच पुढे येऊन मला मिठित घेतले की काय असे वाटते. सह्याद्रीला त्याच्या लेकराची काळजी आहे. व त्याला थोडा दिलासा देतो. ही वा-याची झुळुक तापलेल्या, घामाघुम झालेल्या अंगावर हलकेच थंडावा आणते.
आता आम्ही डोंगर मातीची चढाई संपवुन, कातळ कड्याच्या पायथ्याशी आलो. आता गड अगदी टप्प्यात आला होता. कातळकड्याची चढण सुरु होण्यापुर्वी, डावी हाताला, कातळातुन झिरपणारे पाणी वेगवेगळ्या कड्या कपारीतुन खाली ठिबकते. तेथे, कुणीतरी, वरुन खाली येणारे सर्व पाणी, एका लोखंडीपाईप मध्ये जमा करुन एक पाण्याची धार तयार केली होती. सर्वांनी पाणी प्यायले. कातळातुन झिरपत येणारे पाणी अतिशय थंड व मधुर होते.

तोरणा किल्ला कोकण दरवाज्याच्या बुरुजावरुन घेतलेला बुधला माचीचा फोटो.

जसे आम्ही कोठी दरवाजातुन गडावर दाखल झालो तसे आणखी बदल जाणवला. तो म्हणजे गडावरील स्वच्छता. आम्ही गडाच्या द्वारातच होतो तितक्यात तेथे आणखी एक ग्रुप गडा खाली उतरण्याच्या तयारीत होता. त्यात वीसेक लहान मुल आणि ३-४ तरुण होते. त्यातील एक तरुण मुलांना पैकी एका कडे पाहुन त्याला विचारीत होता की तुमचे गणशिक्षक कुठे आहेत. एवढ्या वरुन मला समजले की हा नुसत्या पर्यटकांचा जथ्था नसुन हे तर कार्यकर्ते मंडळी आहेत. त्यांची थोडी फीरकी घ्यायचे ठरवले. मी त्यांना विचारले, “तुमचा कचरा कुठय? कचरा नाही ना केला गडावर तुम्ही?” त्यावर त्यातील एक कार्यकर्ता सांगु लागला की ते सगळे मिळुन ५०-६० जण आहेत. व ते कचरा करण्यासाठी आलेले नसुन गडावर साफसफाई करण्यासाठी आलेले आहेत. मी “बर बर”, म्हणुन गुगली टाकली, “तुम्ही ते हाप चड्डी वाले का?”. ह्या प्रश्नावर बाकी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. उत्तर कोण देणार हे त्यांनी एकमेकांशी न बोलताच ठरवले. त्यांच्यातील आणखी एक चुणचुणीत तरुण, थोडा पुढे येऊन “हो” म्हणाला.
मी, “बर बर…असु दे. काही काही हाप चड्डीवाले चांगले असतात, की जे अशी किल्ले साफ सफाईची कामे करतात.”
तो तरुण, “तस नाही काका(हल्ली काकाच म्हणायला लागलेत ब-यापैकी अनोळखी तरुण देखील. लहान मुलांनी काका म्हंटले तर ठिक आहे, पण तरुण देखील…वय व्हायला लागलय आता) . सगळेच हाफ चड्डीवाले चांगले असतात. आता तुम्हीच बघा की हे सगळे कार्यकर्ते, मुले, स्वयंसेवक वेळ, श्रम आणि स्वतचा पैसा खर्च करुन इथपर्यंत येऊन गड साफ करतात. आणि यात कसलाही स्वार्थ नाहीये यांचा ”
माझ्याकडे देखील वेळ कमी असल्याने मी जास्त फिरकी घेण्यच्या फंदात न पडता, त्यांना रामराम करुन आम्ही मेंगाई देवीच्या मंदीराकडे निघालो. तेवढ्यात आणखी एक ग्रुप मला भेटला. तो देखील खाली उतरत होता. ह्या ग्रुप मध्ये सगळे हिंदी भाषिक तरुण मुले होती. मी त्यांना ही हटकले व कच-या विषयी विचारणा केली. त्यांनी तर लगेच पाठीवरची सॅक खाली काढुन त्यातील त्यांचा स्वतःचा कचरा दाखवला व मला आश्वस्त केले की ते लोक कचरा पुण्यापर्यंत नेऊन त्यांच्या घराच्या आसपासच्या कचरा पेटीतच टाकणार.
मेंगाई देवीच्या मंदीरापाशी आम्ही झाडाखाली थोडा आराम आणि खाऊ पिऊ केल. अमराठी पर्यटकांना किल्ला दाखवणे, त्याचा इतिहास सांगणे हे तर चढाईला सुरुवात केल्यापासुन सुरुच झालेले होते. आता वेळ आली होती ती किल्ल्यावरील वेगवेगळी ठिकाण दाखवण्याची. सगळा गड फिरुन त्यांना दाखवला.

तोरणा किल्ला कोकण दरवाजाच्या आतील भाग. इथे तटाचे नवीन बांधकाम दिसत आहे.
आम्ही कोकण दरवाज्या ने उतरुन बुधल्या ला जाऊन आलो. येताना अचानक एक पर्यटकाने आश्चर्याने मला समोरील टेहाळणी बुरुज दाखवीत उत्साहात म्हणाला, “ सर ये तो सही मे हाथी ही है!! वॉव, अनबीलीव्हेबल!!!” असे म्हणत तो ग्रुप मधील सर्वांना त्याला दिसलेला हत्ती दाखवु लागला. आणि ते होते ही खरेच. आमच्या समोर हत्तीच होता. पण हा हत्ती तयार केला होता शिवाजी राजांच्या हरहुन्नरी मावळ्यांनी. एका कातळालाच हत्तीच्या तोंडाचा आकार देण्यात आला आहे. त्या कडे नीट पाहील्यावर समजते की त्या हत्तीच्या तोंडाला कान आणि दात देखील होते. पण आता ते कान आणि दात नीटसे दिसत नव्हते. नीट निरीक्षण केले तरच ते दिसतात. आणखी बारकाईने पाहीले तर समजते की हा दगडाचा डोंगर मुळातच ह्या आकाराचा नव्हता. पण कारागीरांनी आकार पाहुन त्यास हत्तीच्या मुखासारखे केले होते. कातळावर छन्नीचे घाव अजुनही दिसत आहेत. वर ते काही पाच दहा फुट उंचीचे हत्तीचे मुख नव्हते. १०० फुटापेक्षा जास्त उंच असे ते विशाल हत्तीचे मुख. पडलेले कान, दात, कपाळ, डोळे, आणि सोंड अगदी स्पष्ट पणे दिसत आहे. आपण कधी तोरण्यावर गेलाच तर आवर्जुन हे हत्तीमुख पहाच. यास हत्ती माळ असे सध्या म्हणतात. मला असे वाटते की माळ असा नंतरच्या काळात त्या नावाचा अपभ्रंश झाला असेल. ह्या हत्तीमुखाच्या माथ्यावर एक माळा आहे. हत्तीच्या अंबारी च्या समोर, माहुत ज्या ठिकाणी बसतो अगदी त्याच ठिकाणी एक टेहळणी बुरुज आहे. व बाल्कनी/माळा सदृश्य अशा या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील वीसेक फुटाचा भुयारी मार्ग आहे. कित्येक वर्षापुर्वी तोरण्यावर आम्ही आलेलो. तेव्हा असा माळ किंवा माळा, आणि हाअ भुयारी मार्ग दिसला नव्हता. कारण हा मातीने गाडला गेला होता.

तोरणा किल्ला हत्ती माळ/ माळा

तोरणा किल्ला हत्ती माळ्याला जाण्यासाठीचा भुयारी मार्ग
या किल्ल्यास शिवाजी महाराजांच्या पुर्वी शैव पंथाच्या कोण्या राजाने १२ व्या शतकाच्या आसपास बांधल्याचा अनुमान आहे. महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन नवीन बांधकामे, बुरुज, तटबंद्या असे बांधले. त्यापुर्वी या किल्ल्यास प्रचंडगड म्हणत. प्रचंडगड नाव देण्यामागे कारण ही तसेच आहे. आकाशाला गवसणी घालणा-या ह्या डोंगरालाच जणु तटबंदी आणि बुरुजांची वेसण घालुण त्यांची वाढणारी उंची थांबवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. दुहेरी तटबंदी ह्या गडाला देखील आहे. विषेशतः बुधल्या कडे जाताना , कोकण दरवाज्याच्या पुढे लगेचच, पुर्व आणि पश्चिमेकडे आणखी दोन दरवाजे आहेत. पैकी एक भट्टीत उतरतो व दुसरा मेट पिलावरे कडे. ह्या किल्याच्या चहुअंगांनी अनेक मेट होते. मेट म्हणजे दौलतीच्या रक्षणासाठी सदैव सिध्द असलेल्या सशस्त्र सैनिकांच्या छावण्या. ह्या सा-या छावण्या सध्या स्वतंत्र गावांमध्ये रुपांतरीत झालेल्या आहेत. मरळ, कोकाटे, जोरकर, गाडे, देवजीरकर आदी मंडळी गड राखायची. संभाजी राजांच्या अमानुष हत्ये नंतर, औरंगजेबाने गड किल्ले ताब्यात घेण्याचे सत्रच सुरु केले. अनेक किल्ले मोगलांनी हस्तगत केले. पण तोरणा त्यांना काही केल्या जिंकता येईना. कोकाटे, मरळ, शिळीमकर, जोरकर, गाडे, धुमाळ इत्यादींनी गड राखता येईल तेवढा राखला. मोगलांच्या दररोज नव्या दमाच्या फौजा येत. गडाला चार ही बाजुंनी वेढा पडलेला होता. तरीही आपले मावळे चार ही बाजुंनी टोळधाड यावी तशी येऊन मोगलांचे लचके तोडायची. गडाला रसद पोहोचणे कठीण झाले. अखेरीस गड पडला. मोगलांना मिळालेल्या ह्या कडव्या प्रतिकारामुळे हा गड घेणे दुरापास्त होऊन बसले होते. म्हणुन औरंगजेबाने ह्या किल्ल्याचे नाव बदलुन फुतुलगेब असे केले होते. पुढे पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला पुन्हा मराठांच्या ताब्यात आला.
गेल्या दोन वर्षात ह्या किल्ल्यावर संवर्धानाचे काम अतिशय जोरदार सुरु आहे. मेंगाई मंदीर, महादेवाचे मंदीर, तट, बुरुज इत्यादींचे बांधकाम झालेले दिसले. आणखी ही बरेच काम सुरु आहे. शेसव्वाशे मजुर किल्ल्यावर काम करीत आहेत. हे काम करताना ते सिमेंट ऐवजी चुनखडीचा वापर करताना दिसले. माहीत नाही की हे केलेले नुतनीकरण, डागडुजी कितपत टिकेल, पण हे ही नसे थोडके.
हा किल्ला पुर्ण नीट पाहण्यासाठी किमान एक पुर्ण दिवस पाहीजे तुमच्या कडे. सोबतीला किल्ल्याची माहीती असलेला कुणी जाणकार असेल तर दुधात साखर समजा.
आम्ही पुर्ण किल्ला फिरुन, पाहुन पुन्हा परतीचा मार्ग पकडला. रेडे पट्ट्याजवळ पोहोचल्यावर काळी मोठमोठी, प्लास्टीक कच-याने भरलेली, ८ पोती पाठीवर लादुन उतरताना उरलेली हाफचड्डी गॅम्ग सुध्दा दिसली. आता पुन्हा पोटात कावळे ओरडायला लागले होते.

तोरणा किल्ला हीच ती हाफचड्डी गॅंग
आम्ही पायथ्याशी येऊन सर्वात आधी भाऊ कदमांच्या तोरणा विहार ह्या प्राचीन उपहार गृहामध्ये मिसळीवर ताव मारला व पुण्याचे दिशेने प्रवास सुरु केला.
 
आमच्या या अफलातुन गडकोट दर्शनाची डॉक्युमेंटरी अवश्य पहा येथे क्लिक करुन..

प्रतिक्रिया

यात काय अफलातून आहे हे समजलं नाही. बादवे, तोरण्याच्या बुधला माचीवर असणाऱ्या कापूरलेण्यावरून हे प्राचीन शैवपंथाचे स्थान असावे आणि त्यावरून हा किल्ला बराच जुना असावा असा अंदाज बांधता येतो. तोरण्याच्या कातळकड्याच्या पायथ्याला खेटून, कडा आणि घसारा यांना जोडणारी झुंजार माची ते बुधल्याच्या विशाळा टोकापर्यंत अगदी निमुळती पाऊलवाट आहे. कधी जमले तर जिज्ञासूंनी या वाटेवरून जरूर चालून पहावे. भगत दरवाजा ते फुटक्या बुरुजाच्या पलिकडे सात आसरांच्या तळ्याच्या खाली कड्यात काही मानवनिर्मित गुहा आहेत. सरपटत जाता येईल इतक्याच रुंद तोंडाच्या. यातल्या काही गुहांमध्ये चोरपाणी म्हणून ओळखले जाणारे पाणी अगदी दुष्काळातही उपलब्ध असते. खालच्या मेट पिलावरे वगैरे भागातल्या मंडळींना माहीत असतात या जागा. बुधला माचीकडे जातानाच उजव्या हाताला वाळंजाई दरवाजाच्या वाटेआधी खाली वाघ दरवाजाची तटबंदी दिसते. तिथपर्यंत जाता येत नाही आता. तो एक भाग पाहण्यासारखा आहे.

कोकण दरवाजा मध्ये पडला होता. त्याची डागडुजी झाली आहे हे पाहून समाधान वाटले. हनुमान बुरुजाचीही ढासळलेली दरड काढून तेथेही पुन्हा बांधकाम व्हावे अशी सदिच्छा. आता किल्ल्यावर आणि वाटांवर सगळीकडे रेलिंग वगैरे टाकलेले दिसत आहेत. बरे आहे. पण त्या तोरण्यावर फारसे कुणी पूर्वी जात नसत. त्यामुळे पर्यटक नावाच्या प्राण्यांची हुल्लडबाजी आणि गर्दी यापासून हा किल्ला थोडा मुक्त होता. आता बहुतेक इथेही गर्दी वाढली असावी. हे बरे की वाईट, हे माहीत नाही. असो.

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 12:02 pm | हेमंत ववले

माझ्या अशा वाटण्याने काही नुकसान तर होत नाही ना! असो. बादवे त्या गुहा व त्यातील पाण्याची टाकी पाहण्याची टाकी देखील आम्हाला पाहता आली. पुर्वी आनंद पाळंदेंसोबत गडावर बुधल्याच्या पुढे, भट्टी खिंडीकडे उतरणा-या पाय वाटेच्या बाजुला कड्यातील एक खांब टाक्या च्या अभ्यासासाठी (मी अभ्यास केला आहे असा अर्थ घेऊ नये) एकदा जाणे झाले होते. त्यावेळी त्यांनी दाखवल्या ह्या गुहा.
पर्यटकांची संख्या वाढणे चांगलेच आहे, पण पर्यटकांस निसर्गपर्यटन करताना कचरा करु नये किंवा आपण स्वतः (किमान स्वःत) केलेला कचरा सोबत शहरात घेऊन जाणे इतपत प्रबोधन करणे गरजेचे आहे. हे आपले माझे मत झाले, नाहीतर तुम्ही पुन्हा म्हणाल यात चांगले काय म्हणुन?
असो.
त्याच अभ्यास सहलीसाठी किल्ल्यावर जाताना आम्ही त्याच वाघ दरवाजाने , भट्टी गावातुन वर चढलो होतो.
हुल्लडबाज देखील येणारच, पण सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या असण्याने हे हुल्लडबाज थोडी कमी करतात हुल्लडबाजी. हो पण त्यासाठी स्वःत स इको-फ्रेम्डली ट्रेकर म्हणवणारांनी शक्य तितक्या हुल्लडबाजांचे प्रबोधन सहज गप्पांमधुन जर केले तर पर्तटकांची वाढ "वाईट" नाही असे होईल.

चांगली गोष्ट आहे. लगे रहो.

बादवे, आनंद पाळंदे यांना तोरण्याच्या कातळकड्याच्या पायथ्याला अशा गुहा आहेत हे आम्हीच सांगितले होते. या गुहांचा उल्लेख त्याआधी इतर कुठेही अथवा कोणाकडूनही ऐकला किंवा वाचला नव्हता. असो.

खरच लिहा मग तुम्हीच तोरण्याविषयी

दुर्गविहारी's picture

9 Nov 2017 - 8:40 pm | दुर्गविहारी

एस तुम्हीच एकदा तोरण्याविषयी सविस्तर लिहा.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2017 - 5:04 am | शब्दबम्बाळ

भटकंती आणि ग्रुपला किल्ला दाखवणे वगैरे सगळं ठीक आहे पण

ह्या ग्रुप मध्ये सगळे हिंदी भाषिक तरुण मुले होती. मी त्यांना ही हटकले व कच-या विषयी विचारणा केली.

याची काय गरज होती?
खासकरून अनोळखी लोक असताना त्यांना "हटकायला" आपण गडाच्या ASI खात्यामधले आहेत कि इतर कोणत्या सरकारी खात्यामधले? तुम्हाला काय अधिकार इतरांना येता जाता चौकश्या करण्याचा? आता त्या मुलांनी बॅग उघडून दाखवली आणि तुमचं समाधान झालं म्हणून ठीक आहे. पण जर कदाचित त्यांच्याकडे नसता कचरा दाखवायला तर तुम्ही हटकण्याशिवाय अजून काय केले असते ऐकायला आवडेल...
उगीच किल्ल्याचे अधिकार आमच्याच ताब्यात आहेत अशा अविर्भावात फिरणाऱ्या ट्रेकर्सचा सुद्धा अतिरेक झालाय!

कचरा कोणीच करू नये हे आहेच पण मग इतकीच कष्ट करायची इच्छा असेल तर सरकार दरबारी आपला "वचक" दाखवून त्यांना "हटकून " सरकारकडून कचरापेट्या आणि प्रसाधनगृहे बनवून घ्यावीत! म्हणजे ट्रेकला जाणारे अनेक ग्रुप आपल्या मलमूत्राने किल्ल्याला अभिषेक घालायचे कमी होतील...

तुमचा अपमान करायचा हेतू नाही पण तुम्ही ट्रेकला ग्रुप घेऊन जाता म्हणजे येणा-जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपच्या चौकश्या करायचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत नाही, हे ही ध्यानात असू द्यात!

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 12:29 pm | हेमंत ववले

अर्थात, माझे जरा चुकलेच. तुमचेच बरोबर. आपण बरे आणि आपले बरे, मला काय त्याचे, हेच योग्य नाही का?
कुणीही यावे किल्ल्यावर आणि गडावर कचरा करावा, मला काय त्याचे?
कुणीही यावे आणि गडावर धांगडधिंगा करावा, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर नाचगाणे करावे, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर दारु पार्ट्या कराव्यात, मला काय त्याचे?
मला हे शिकावे लागेल,, प्रयत्न करतो...

पण माझी आपली भाबडी समजुत होती की एक सजग नागरीक, पर्यटक म्हणुन आपण करावे असे प्रबोधनाचे काम. कदाचित १०० लोकांना सांगितल्यावर १-२ तरी कचरा करण्याचे टाळतील.

कचरा दाखवला नसता तर काय केले असते? कडेलोट केला असता की मी त्यांचा. आणि असे बरेच केलेत. इथेही चुक माझीच आहे. शब्दबंबाळासारखी शब्द पकडुन धारेवर धरणारी बंबाळी इथे आहेत हे माहीत नव्हते. "हटकले" ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही असा घेतलाय जणू की मी हातात बांबु घेऊन एकएकाची बॅग तपासली. इथे ही धन्यवाद. शब्द जपुन वापरावे हा धडा शिकवला बंबाळ्यांनी.

चौकशी किंवा हटकणे असे माझे बोलणे नव्हते त्यावेळी आणि कधीही नसते. सहज संवादातुन केलेली विचारपुस होती ती. आणि हा अधिकार नसला तरी कर्तव्य आहे सर्वांचे असे मला वाटते.

शब्दबंबाळ महाशय पुन्हा एकदा धन्यवाद.

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 12:32 pm | हेमंत ववले

अर्थात, माझे जरा चुकलेच. तुमचेच बरोबर. आपण बरे आणि आपले बरे, मला काय त्याचे, हेच योग्य नाही का?
कुणीही यावे किल्ल्यावर आणि गडावर कचरा करावा, मला काय त्याचे?
कुणीही यावे आणि गडावर धांगडधिंगा करावा, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर नाचगाणे करावे, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर दारु पार्ट्या कराव्यात, मला काय त्याचे?
मला हे शिकावे लागेल,, प्रयत्न करतो...

पण माझी आपली भाबडी समजुत होती की एक सजग नागरीक, पर्यटक म्हणुन आपण करावे असे प्रबोधनाचे काम. कदाचित १०० लोकांना सांगितल्यावर १-२ तरी कचरा करण्याचे टाळतील.

कचरा दाखवला नसता तर काय केले असते? कडेलोट केला असता की मी त्यांचा. आणि असे बरेच केलेत. इथेही चुक माझीच आहे. शब्दबंबाळासारखी शब्द पकडुन धारेवर धरणारी बंबाळी इथे आहेत हे माहीत नव्हते. "हटकले" ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही असा घेतलाय जणू की मी हातात बांबु घेऊन एकएकाची बॅग तपासली. इथे ही धन्यवाद. शब्द जपुन वापरावे हा धडा शिकवला बंबाळ्यांनी.

चौकशी किंवा हटकणे असे माझे बोलणे नव्हते त्यावेळी आणि कधीही नसते. सहज संवादातुन केलेली विचारपुस होती ती. आणि हा अधिकार नसला तरी कर्तव्य आहे सर्वांचे असे मी पक्के ध्यानात ठेवले आहे.

शब्दबंबाळ महाशय पुन्हा एकदा धन्यवाद.

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2017 - 1:04 pm | शब्दबम्बाळ

अग्गायाया! किती व्हेरिएशन आयडी नावाची! :D
ते लोक तुम्हाला कचरा करताना दिसले होते असे तुम्ही कुठेही लिहिले नाहीये.मग उगाच एखाद्याला "हटकणारे" तुम्ही कोण?
तो शद्ब तुम्हीच लिहिलाय मी नाही!
प्रबोधन करा, लोकांना विनंती करणे करता येऊ शकते. आणि इतकेच करणे अपेक्षित आहे. झालंच तर ती मुलं जसा कचरा गोळा करत होती तसे कार्य! तो कचरा कोणी टाकला, का टाकला हा विचार न करता ते लोक देखील काम करत होते.

नुसतं त्यांना का हटकले हे विचारलं कि इतका तिळपापड झालाय तर एखाद्याने "तुम्ही कोण आम्हाला विचारणारे?" हा सवाल केला तर काय कराल याचा विचार तुम्हीच करा!

पण माझी आपली भाबडी समजुत होती की एक सजग नागरीक, पर्यटक म्हणुन आपण करावे असे प्रबोधनाचे काम. कदाचित १०० लोकांना सांगितल्यावर १-२ तरी कचरा करण्याचे टाळतील.

सांगणे आणि जाणाऱ्याला हटकणे यात फरक असतो. जर तो तुम्हाला माहित नसेल म्हणून तुम्ही ते वाक्य लिहिले असेल तर मग प्रश्नच येत नाही.

कुणीही यावे किल्ल्यावर आणि गडावर कचरा करावा, मला काय त्याचे?
कुणीही यावे आणि गडावर धांगडधिंगा करावा, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर नाचगाणे करावे, मला काय त्याचे?
कुणी ही यावे आणि गडावर दारु पार्ट्या कराव्यात, मला काय त्याचे?

काय करायचा विचार आहे मग अश्या प्रसंगात? त्या लोकांना विनंतीच करता येईल ना नाहीतर सरकारला विनंती करून चौक्या बसवणे किंवा अश्या लोकांची तक्रार करणे इतकेच सामान्य माणसाने करणे अपेक्षित असते.

चौकशी किंवा हटकणे असे माझे बोलणे नव्हते त्यावेळी आणि कधीही नसते. सहज संवादातुन केलेली विचारपुस होती ती. आणि हा अधिकार नसला तरी कर्तव्य आहे सर्वांचे असे मी पक्के ध्यानात ठेवले आहे.

आता बघा! तुमच्या लेखात तो प्रसंग असे लिहिण्याप्रमाणे आला नाही म्हणून गोंधळ झालाय ना! एखादी चुकीची गोष्ट करताना "हटकले" जाते. तुम्ही जे लिहाल तेच आम्ही वाचक वाचणार ना, मी थोडीच तिथे प्रत्यक्ष बघायला आहे.

त्यामुळे चिल्ल माडी! नका रागावू इतके! :)

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 1:33 pm | हेमंत ववले

त्यामुळेच हटकले हा शब्द मी वापरला ही माझी चुक झाली व त्याबद्द्ल मी आभारदेखील मानले तुमचे. माझ्या अर्थी हटकणे म्हणजे कोणत्याही सुरु असलेल्या क्रियाकलापामधुन एखाद्याचे लक्ष स्वःतकडे किंवा दुसरी कडे वळवणे, असा होता.
राग काय यायचाय त्यात. असतात काही लोक तुमच्यासारखे ही. ः)

नक्कीच चांगली कल्पना आहे. असा पाठपुरावा आपण केला पाहीजे. मी प्रयत्न करतो.

आम्ही आपले कधी कधी गड किल्ले साफसफाईच्या मोहीमा राबवतो. सोबत कचराकुंड्या, प्रसाधनगृहा सारख्या सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा केलेला देखील चांगला आहे. त्यातही अशा ठिकाणी इको सॅन प्रकारची प्रसाधन गृहे असतील ती इको फ्रेंडली देखील असतील.

पुन्हा एकदा धन्यवाद. शब्दबंबाळ (रक्त बंबाळ जसे, तसे च शब्दबंबाळ का? )

शब्दबम्बाळ's picture

9 Nov 2017 - 1:06 pm | शब्दबम्बाळ

हा! आत्ता कसे! :)
कायमस्वरूपी सोयी झाल्या तर लोकांना पण गैरसोयीपायी इकडे तिकडे जावं लागणार नाही!

पण कचरा करतो कोण हे शोधा. गोळा करण्राचे काम राहाणारच नाही. तोरणा गडावर कोणी राहायला येत नाही,राजगडावरमात्र हेच लोक प्लेटा टाकतात.

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 12:54 pm | हेमंत ववले

शोधायचा प्रयत्न जरी केला तरी शब्दबंबाळ सारखे लोक आपल्याला रक्तबंबाळ करतील की.
हे शोध घेणे तसे अवघड आहे. आणि शोध काय घ्यायचाय त्यांचा. ती देखील माणसेच आहेत. फक्त कचरा केल्यामुळे काय दुष्परीणाम होतात यांपासुन अनभिज्ञ असतात. त्यामुळे शक्य तितके हसतखेळत, सहज प्रबोधन (हटकणे नव्हे) करणे हाच एक पर्याय आहे. सोबत बंबाळांची कल्पना देखील आहे. पण कचरा कुंड्यां भरल्यावर त्यातील कच-याचे काय होणार? शब्दबंबाळ पुढे म्हणतील शासनाच "वचक" दाखवुन , "हटकुन" दोन चार कर्मचा-यांची नेमणूक करुन घ्या गडावर..
असो.
माझे नेहमी जाणे येणे होते या दोन्ही गडांवर, त्यामुळे मी थोडे प्रयत्न केले तर आणखी काहीतरी चांगले होईल नक्कीच. धन्यवाद.

उपेक्षित's picture

9 Nov 2017 - 1:28 pm | उपेक्षित

पहिला फुटू जबरदस्त आलाय हेमंतभाऊ.

हेमंत ववले's picture

9 Nov 2017 - 3:51 pm | हेमंत ववले

पण किल्ला वणवला गेलाय. हे सौंदर्य असच नाही आलेले. वाईट वाटत.

सिरुसेरि's picture

9 Nov 2017 - 7:44 pm | सिरुसेरि

सुरेख गड भ्रमंती आणी फोटो . मधेच "हटकणे" , "हाप चड्डीवाले" , गुगली , "फिरकी घेणे " ( फिरकी कुणी कुणाची घेतली ? ) अशा शब्द प्रयोगांमुळे थोडेसे विषयांतर झाले असावे . माहितीपुर्ण लेख .

दुर्गविहारी's picture

9 Nov 2017 - 8:52 pm | दुर्गविहारी

तोरण्यावर बरीच बांधकामे झालेली दिसत आहेत. सुधारणांचे स्वागतच करायला हवे. त्या हत्ती बुरुजाचा फोटो आणि त्याचा अर्थ तुम्ही छान सांगितला आहे.
बाकी पर्यटकांच्या अनुभवाविषयी सहमत. नुकताच त्रिपुरी पौर्णिमेला राजगडावर चोरदिंडीमार्गे गेलो होतो. गडावर प्रंचड गर्दी होती. मात्र रविवारी उतरताना अक्षरश कपाळावर हात मारायची वेळ आली. कित्येकजण पिकनिक मुडमधे आले होते. जवळ पाण्याची बाटली नाही, खाण्याचे पदार्थ नाहीत, कसली माहिती घेउन आल्यासारखे बरेच जण वाटत नव्हते. पहिल्यांदाच गेल्यानंतर चोरदिंडीसारख्या अवघड वाटेने जाणे योग्य आहे का, याचाही विचार नाही. एकुणच सुट्टीचे दिवस टाळून जाणे हाच मार्ग उरलाय.

अरविंद कोल्हटकर's picture

9 Nov 2017 - 10:00 pm | अरविंद कोल्हटकर

उत्तम वर्णन. ते वाचून कैक वर्षांपूर्वी राजगडावरून मधल्या धारेने जाऊन मागच्या बाजूने तोरण्यावर गेलो होतो ते आठवले.

तोरण्याची अजून एक आठवण. मंगेशकर रुग्णालय बांधले जाण्यापूर्वी लकडी पुलावरून पश्चिम दिशेस सरळ समोर राजगड-तोरणा असा रम्य देखावा दिसत असे. मी तो शेकडो वेळा लकडी पुलावरून येताजाता पाहिलेला आहे. रुग्णालय बांधले गेल्यावर त्यामागे हा देखावा कायमचाच झाकला गेला.

रुग्णालय झाले ही चांगलीच गोष्ट झाली पण इतिहासाचे हे छोटे दर्शन त्यामुळे कायमचे पुसले गेले ही हळ्हळहि आहेच.

सोबत १८०५ साली एका ब्रिटिश चित्रकाराने काढलेले पुण्याचे चित्र चिकटवत आहे. हे चित्र संगमावरून काढले आहे. त्यामध्ये सिंहगडाच्या उजवीकडे अगदी छोटा असा तोरणाहि दिसत आहे. हेच दृश्य लकडी पुलावरूनहि दिसत असे.

Torana

आता दिसत नाही माहीत नव्हते.
आणि चित्र खरच छान आहे.

नाखु's picture

11 Nov 2017 - 9:21 am | नाखु

टंकलेखन करून चांगल्या लेखात माती खाल्ली,असो आपली मतं आपणांस लखलाभ

“तुम्ही ते हाप चड्डी वाले का?”. ह्या प्रश्नावर बाकी सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. उत्तर कोण देणार हे त्यांनी एकमेकांशी न बोलताच ठरवले. त्यांच्यातील आणखी एक चुणचुणीत तरुण, थोडा पुढे येऊन “हो” म्हणाला.

मी, “बर बर…असु दे. काही काही हाप चड्डीवाले चांगले असतात, की जे अशी किल्ले साफ सफाईची कामे करतात.”