ग्लोबल वॉर्मिंग - त्यामागची मुख्य कारणे

पथिक's picture
पथिक in काथ्याकूट
26 Apr 2016 - 12:57 pm
गाभा: 

आपण नेहमीच ऐकतो/बोलतो कि पृथ्वीचे तापमान वाढते आहे. हवामानात बदल होऊन ऋतुचक्र बिघडले आहे, ई. ई. पण मुळात पृथ्वीचे तापमान का वाढते आहे? बऱ्याच जणांना हे नीट कळत नाही. ते जेवढे मला कळले तेवढे सांगण्याचा हा प्रयत्न:
वातावरणात मिसळणारी उष्णता हि थेट आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. आपली आजची जीवनशैली हि मुख्यतः तंत्रज्ञानावर (technology) अवलंबून आहे. आपले तंत्रज्ञान जी उर्जा वापरते ती मुख्यतः खनिजांपासून येते - म्हणजे कोळसा, तेल, खनिज वायू यांपासून. कुठलेही उत्पादन करायचे, कुठलेही काम करायचे तर उर्जा लागतेच. जसे पंखा चालवायचा तर वीज (उर्जा) लागते आणि पंखा तयार करायचा तरीही उर्जा लागते. कच्चा माल मिळविण्यासाठीही उर्जा लागते, त्याचे पक्क्या मालात (उदा. खनिजापासून लोखंड) रुपांतर करण्यासाठीही उर्जा लागते, पक्क्या मालाला परत हवे तसे स्वरूप देण्यासाठी, जोडण्यासाठी, त्याची वाहतूक करण्यासाठीही उर्जा लागते. आणि भौतिक शास्त्राचा असा नियमच आहे कि आपण जेव्हा जेव्हा उर्जा वापरतो तेव्हा तेव्हा एकूण उर्जेपैकी थोडीच उर्जा आपल्या कामात वापरली जाते आणि बाकीची उर्जा मुख्यतः उष्णतेच्या रुपाने बाहेर पडते. उदा. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तेलातली काही उर्जा प्रकाश देते तर काही उर्जा उष्णता बनून बाहेर पडते. हीच गोष्ट जिथे जिथे आपण उर्जा वापरतो त्या सर्व ठिकाणी लागू पडते. मग ते घर असो कि कारखाना, देऊळ असो कि सिनेमागृह. कोळसा, पेट्रोल, डीझेल, गॅस, विद्युत असे कुठलेही ईंधन/उर्जेचे साधन जेव्हा आपण वापरतो तेव्हा बहुतेक उर्जा उष्णतेच्या रुपात बाहेर पडत असते आणि वातावरणाचे तापमान वाढवत असते.
दुसरे म्हणजे निसर्गाने जमिनीवर निर्माण केलेली वेगवेगळी आच्छादने - दाट वने, खुरटी झुडुपी जंगले, गवताळ प्रदेश, ई. या अच्छादनांना 'कुलिंग स्ट्रक्चर्स' (थंडाव्याची वास्तुशिल्पे) म्हटले गेले आहे. हि आच्छादने उष्णतेच्या निर्मितीला प्रतिबंध करतात आणि परिसर थंड राखतात. आपला कोणताही उपक्रम असो, जसे शेती, घरबांधणी, लोकवस्तीची वाढ, उद्योगांची वाढ, रस्तेबांधणी, कोणताही उपक्रम या 'कुलिंग स्ट्रक्चर्स' ना हटविल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि ज्या प्रमाणात हे 'कुलिंग स्ट्रक्चर्स' नष्ट होतात त्या प्रमाणात उष्णता वाढते.
सौर उर्जा, पवन उर्जा हे सुद्धा आपल्याला वाटतात तितके चांगले नाहीत, कारण सोलर सेल बनवायला किंवा पवन चक्कीचा पंखा व ईतर भाग बनवायलाही खनिज तेल, वीज, ई जाळले जातेच !
तेव्हा आपणच भस्मासुर होऊन आपलाच अंत करायचा नसेल तर वने (forests), कुरणे (grasslands), पाणथळ जागा (wetlands), नद्या, डोंगर, ओढे हे सर्व वाचवले पाहिजे, आपल्या गरजा, "शॉपिंग", इंधनाचा वापर, ई. कमी करून आपले बाबा, आजोबां, आणि शक्य झाल्यास पणजोबा यांची होती तशी 'साधी राहणी' जमेल तेवढी अंगिकारली पाहिजे; 'ये दिल मांगे मोअर' न म्हणता तुकोबांसारखे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' असे म्हटले पाहिजे. नाहीतर आपलं काही खरं नाही पुढे भौ !

(काही भाग पक्षी व पर्यावरणतज्ञ स्व. प्रकाश गोळे यांच्या 'वास्तव' या पुस्तकातून घेतला आहे)

प्रतिक्रिया

चंद्रनील मुल्हेरकर's picture

26 Apr 2016 - 1:36 pm | चंद्रनील मुल्हेरकर

आपण दिलेली कारणे फारच त्रोटक आहेत,ग्लोबल वॉर्मिंगचे खरे कारण ग्रीन हाऊस गॅसेस आहेत,यात कार्बन डाय ऑक्साईड ,मिथेन हे प्रमुख गॅस आहेत.औद्योगिकरण ,वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने पृथ्वीच्या वातावरणात या वायुंचे प्रमाण वाढलेले आहे.सुर्याकडून पृथ्वीवर येणारी प्रकाशकीरणे लघु तरंगलांबीची असतात(short wave radiation) ,कार्बन डाय ऑक्साईड ,मिथेन हे प्र्काशतरंग absorb करु शकत नाहीत,परंतू जेव्हा ही किरणे पृथ्वीवरुन परावर्तीत होतात तेव्हा त्यांची तरंगलांबी वाढते(long wave radiation) व कार्बनडाय ऑक्साईड ,मिथेन इत्यादी ग्रीन हाऊस गॅसेस हे तरंग सहज शोषून घेतात व पृथ्वीवरील हीट कंटेन्ट वाढवतात,याचाच परिणाम म्हणून पृथ्वीचे तापमान वाढत आहे ,यावर उपाय एकच या वायुंचे उत्सर्जन कमी करणे.

तुम्ही म्हणता तो बरोबर आहे. पण हे ग्रीनहाउस गॅसेस आपण जे जीवाश्म इंधन जाळतो मुख्यतः त्यातून येतात आणि याचा थेट संबंध आपल्या तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीशी आहे. आपली वीज, वाहतूक, उद्योग, शेती, ई सर्व गोष्टींसाठी लागणारी ऊर्जा हि मुख्यत्तः या जीवाश्म इंधानाना जाळूनच प्राप्त होते.
आपली हि जीवनशैली बदलणे हाच यावर उपाय आहे. या उधळ्या जीवनशैलीला पुरेल ईतकी शाश्वत ऊर्जा आपल्याला पर्यावरणाचे नुकसान केल्याशिवाय मिळत राहणे शक्य नाही.

तर्राट जोकर's picture

26 Apr 2016 - 2:11 pm | तर्राट जोकर

सौर उर्जा, पवन उर्जा हे सुद्धा आपल्याला वाटतात तितके चांगले नाहीत, कारण सोलर सेल बनवायला किंवा पवन चक्कीचा पंखा व ईतर भाग बनवायलाही खनिज तेल, वीज, ई जाळले जातेच !

तुमची थोडी गडबड झालेली दिसतेय. साधन बनवून तिच्याद्वारे वीजनिर्मीती करणे आणि थेट नैसर्गिक संसाधनं वापरुन वीजनिर्मिती करणे ह्यात संख्यात्मक फरक आहे. एक सोलर सेल वा पॅनेल, पंखा बनवायला जीतके नैसर्गिक संसाधन वापरली जातात त्याच्या कैक पटीत ती त्या उत्पादनामुळे वाचवली जातात. इट्स लाइक किलींग वन टू सेव अ हण्ड्रेड.

आपले बाबा, आजोबां, आणि शक्य झाल्यास पणजोबा यांची होती तशी 'साधी राहणी' जमेल तेवढी अंगिकारली पाहिजे

हे आता अशक्य आहे. लोकसंख्यावाढ आणि त्यांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठीची साधनसंपत्तीची मागणी अगदी मध्ययुगीन जीवनपद्धती अंगिकारायची म्हटली तरी पुरवणे शक्य नाही. जगातली गरिब जनता असो वा श्रीमंत त्यांना अन्न, पाणी, निवारा ह्या तीन गोष्टी लागतातच, त्यानंतर इतर आवश्यक गोष्टीही. घरातल्या लग्जरी वस्तूंचे प्रमाण साधारणपणे ५ टक्क्याच्या वर नसते. ९५ टक्के गोष्टींशिवाय आजकाल जगणे शक्य नाही.

साधन बनवून तिच्याद्वारे वीजनिर्मीती करणे आणि थेट नैसर्गिक संसाधनं वापरुन वीजनिर्मिती करणे ह्यात संख्यात्मक फरक आहे. एक सोलर सेल वा पॅनेल, पंखा बनवायला जीतके नैसर्गिक संसाधन वापरली जातात त्याच्या कैक पटीत ती त्या उत्पादनामुळे वाचवली जातात. इट्स लाइक किलींग चन टू सेव अ हण्ड्रेड.

हे आपल्याला वाटतं पण ते खरंच तसं आहे कि नाही याबद्दल शंका आहे. हा दुवा बघा: ecologicalsociety.blogspot.com/2009/01/riddle-of-energy.html

घरातल्या लग्जरी वस्तूंचे प्रमाण साधारणपणे ५ टक्क्याच्या वर नसते. ९५ टक्के गोष्टींशिवाय आजकाल जगणे शक्य नाही.

अभ्यासानंतर निघालेले निष्कर्ष असे आहेत कि आपण ज्या प्रकारे संसाधनांचा वापर करतो तो बघितला तर आपल्याला दीड पृथ्वींची गरज आहे. आणि असंच चालू राहिलं तर २०५० पर्यंत आपली गरज अडीच पृथ्वींची असेल ! जर आपण आपल्या वापरातून ५% कमी केले तरी आपण पर्यावरण वाचवू शकत नाही. मग आपणच ठरवायला पाहिजे कि आपल्या needs किती नि आपल्या wants किती आहेत. http://www.footprintnetwork.org/en/index.php/newsletter/det/human_demand...

तर्राट जोकर's picture

26 Apr 2016 - 5:23 pm | तर्राट जोकर

तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला विस्तार इथे मराठीत दिला तर फायदेशीर असेल.

तसेच नीड्स आणि वॉन्ट्स कशा ठर्वायच्या तेही... नुस्तं गरजा कमी करायला हव्या असं म्ह्णून होत नाही. तुमच्याकडे काही व्हिजन आहे काय त्याबद्दल म्हणजे अधिक चर्चा करता येईल. मी वर म्हतल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ह्याचीच मूलभूत गरज भागता भागत नाही आहे. त्यात नीड्स्/वॉन्ट्स कसे ठरवायचे? उपदेशपूर्ण बोलणे भारी वाटतं पण प्रॅक्टीकली सार्वत्रिकरित्या काय शक्य आहे त्याचाही विचार व्हावा.

तुम्हीच जरा दोन्ही दुव्यातला विस्तार इथे मराठीत दिला तर फायदेशीर असेल.

पहिला मुद्दा फारच तांत्रिक आहे, तो मला निट समजावून सांगता येणार नाही. त्यामुळे तो दुवा बघण्याची मी विनंती करतो.

मी वर म्हतल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा ह्याचीच मूलभूत गरज भागता भागत नाही आहे. त्यात नीड्स्/वॉन्ट्स कसे ठरवायचे?

झोपायला अंथरूण असणे हि "need" आहे, पण बेड हवा हि "want" आहे. खायला पोळी भाजी वरण भात मिळणे हि गरज आहे, पण आईस क्रीम, चॉकलेट, ईत्यादी हवेच हा हव्यास आहे, चोचले आहेत. हाच निकष आपण सर्व गोष्टींना लावून बघू शकतो.

दुसऱ्या दुव्याबद्दल दुसऱ्या एका स्थळावरून हि माहिती इथे देतोय:

WWF’s found WWF’s Living Planet Report 2014 found that in 2010, the global ecological footprint was 18.1 billion global hectares (gha) or 2.6 gha per capita. Earth’s total biocapacity was 12 billion gha, or 1.7 gha per capita.
This means that the Earth’s people needed 18 billion hectares of productive land in order to provide each and every person with the resources they required to support their lifestyle and to absorb the wastes they produced.
The bad news is that there were only 12 billion global hectares available.
This means that in 2010 people used about 50% more natural resources than the planet could regenerate.
The message is clear and urgent. We need to consume less if we are to live within the regenerative capacity of the Earth.

http://www.wwf.org.au/our_work/people_and_the_environment/human_footprin...

तर्राट जोकर's picture

27 Apr 2016 - 11:35 am | तर्राट जोकर

नीड वॉन्ट प्रकरण अव्यावहारिक वाटतं झोपायला अंथरुण ही पण लाखो लोकांसाठी आजही वॉन्ट आहे. त्यांना झोपायला जागा मिळणे हीच त्यांची नीड आहे. असं करत आपण झोपायला किती जागा लागते तेवढी बघा फक्त असेही म्हणू शकतो. पारधी मुलांना सांभाळणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे बहुतेक १५ बाय २० ची खोली आहे एकच. तिथे ४०० मुले रोज झोपतात. कारण त्या मुलांची नीड ती आहे. त्यांच्यासाठी आजूबाजूला एक एक फूट मोकळी जागा असणे हे चोचले म्हणू शकले जाते.

भागतंय ना म्हणून आपण क्वालिटी ऑफ लाइफ कडे दुर्लक्ष करणार का हा खरा मुद्दा आहे. गरजा कमी करा म्हणणे सोपे आहे, अंगिकारणे शक्य नाही. कारण तो फार गुंतागुंतीचा मुद्दा आहे. उद्यापासून जगातल्या यच्चयावत लोकांनी असे ठर्वले की पेट्रोल, डिझेल वापरणारे कोनतेच वाहन वापरायचे नाही. घरी सुत कातून खादीचे कपडे शिवायचे, झावळ्यांची घरे बांधायची किंवा झाडांच्या आडोशाला राहायचे. मोबाईल फोन वापरायचे नाही, वीज वापरायची नाही, मनोरंजनासाठी कोणतीच गोष्ट खरेदी करायची नाही, फर्निचर पासून आयुष्य जगायला सोप्पं करणार्‍या कोनत्याच वस्तू विकत घ्यायच्या नाही तर बहुतेक ८० टक्के लोकसंख्या रोजगाराअभावी उपाशी मरेल.

मिनिमलिस्टिक जीवनशैलीचे फ्याड येतंय असं एकुण जाणवतंय. कितीही पटणारी वस्तुस्थिती असली तरी मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करणे आत्मघातकी आहे.

आपण नैसर्गिक साधनसंपत्ती वापरुन खूप नुकसान करतोय वैगरे ठिक आहे. पण तुम्ही म्हणताय तसा वॉन्ट्स चा संकोच करुन सर्व जगात काय व्यवस्था राबवता येईल व त्याचे काय परिणाम होतील ह्यावर कोणी अभ्यास केलेला आहे काय हे मला विचारायचे होते.

ज्यांना जागा नाही त्यांना जागा हि मिळाली पाहिजे आणि अंथरूणसुद्धा मिळाले पहिजे. या दोन्ही नीड्स आहेत. गरजा कुठल्या आणि हव्यास, चोचले कुठले या बाबतीत सद्सद्विवेकबुद्धी वापरली पाहिजे.
आत्ताची जीवनशैली बदलून एकदम गवताच्या झोपडीत जाऊन राहणे, सर्व उपकरणे, वाहने, ई चा त्याग करणे अपेक्षित नाही. तो टप्प्याटप्प्याने होणार बदल आहे. त्यामुळे रोजगार, ई चा प्रश्न पण टप्प्याटप्प्याने सोडविला जाईल, लोकसंख्या पण कमी होत जाईल… पण त्या दिशेने प्रवास होणे गरजेचे आहे हे नक्की. म्हणजे निसर्गाची हानी, त्याचा ऱ्हास कमी करण्याच्या दिशेने. आदर्श जीवनशैली "पेट्रोल, डिझेल वापरणारे कोणतेच वाहन वापरायचे नाही. घरी सुत कातून खादीचे कपडे शिवायचे, झावळ्यांची घरे बांधायची किंवा झाडांच्या आडोशाला राहायचे." अशीच असेल किंवा नसेल ठाऊक नाही. ते काळच ठरवेल. बहुदा तो एक सुवर्णमध्य असेल…

तुम्ही म्हणताय तसा वॉन्ट्स चा संकोच करुन सर्व जगात काय व्यवस्था राबवता येईल व त्याचे काय परिणाम होतील ह्यावर कोणी अभ्यास केलेला आहे काय हे मला विचारायचे होते.

Ecological Society, Pune चे संस्थापक आणि विख्यात पर्यावरणतद्न्य श्री प्रकाश गोळे यांनी या सर्व प्रश्नांचा सर्व अंगांनी विचार करून यावर बरंच लिहिलंय

अप्पा जोगळेकर's picture

26 Apr 2016 - 6:14 pm | अप्पा जोगळेकर

पृथ्वीचे तापमान दर काही हजार वर्षांनी कमी जास्त होत असते. त्याचा प्रदूषणाशी संबंध आहे असे वाटत नाही. बाकी 'प्रदूषण' होताहोईल तो टाळले पाहिजे,वृक्षतोड टाळली पाहिजे याच्याशी सहमत. पण ते 'साधी राहणी' वगैरे अव्यावहारिक वाटले.

आत्ता झालेली वाढ हि हजारो वर्षांनी झालेली नाहीय, ती फक्त गेल्या दोन शतकांमध्ये, औद्योगिक क्रांतीनंतर झालेली आहे. ती पूर्णपणे मानवनिर्मीत आहे. राहणी, जीवनशैली बदलणे अपरिहार्य आहे असे अनेक तज्ञांचे मत आहे.