आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ४ (अंतिम)

सतीश कुडतरकर's picture
सतीश कुडतरकर in भटकंती
17 Apr 2015 - 5:53 pm

आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ४ (अंतिम)

http://www.misalpav.com/node/31021 - भाग १
http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३

दरम्यान किरण परत घरी आल्याचे कळल्यावर सुभाष त्याला भेटायला आला आणि परत मोहिमेवर निघण्याच्या तयारीला लागला...............................

रात्री ठीक १२ वाजता डोंबिवलीहून अशोकच्या जीपने अशोक, किरण, अनिल, संजय रेडकर, बालाजी, व सुभाष निघालो. साधारण साडेतीनच्या सुमारास आजोबाच्या पायथ्याशी अर्थात बेसकॅंपवर पोचलो.

सकाळी सामानाची बांधाबांध करून जीपमध्ये चढवले व किरण, अनिल दगडे व अशोक दुपारी दोन वाजता आजोबा पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे कुमशेतच्या दिशेने निघाले. तर शिल्लक राहिलेलं सामान पाठीवर घेऊन पुंडलिक, नरेंद्र, सुभाष, नंदू, शैलेश, शेखर, कुट्टी, अनिल इमारते, संजय वगैरे मंडळी वाट दाखवण्यासाठी गावातील एका ग्रामस्थांना बरोबर घेऊन कात्राबाई आणि आजोबा यांच्यामधील खिंडीतून (गुहेरीचे दार) कुमशेतच्या दिशेने निघाले.

From Aajoba 1991

इकडे शहापूर बस स्थानकावर रस्त्याची व्यवस्थित चौकशी करून किरण व मंडळी जीपने भंडारदऱ्याच्या दिशेने निघाले. संध्याकाळी साडेसात वाजता राजुरला पोचले. या वेळेस रस्त्यावर चीटपाखरूही नव्हते. तशातच वाटेत धामणगावला राहणारा एक ग्रामस्थ अचानक भेटला, त्यालाही आमच्याबरोबर घेऊन कुमशेतच्या दिशेने निघालो. त्याच्या सल्ल्याप्रमाणे धामणगावापर्यंत तर बिनदिक्कतपणे पोचलो. आता पुढे मात्र त्याने सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरु झाला. धामणगाव सुटल्यावर रस्ता पूर्ण सुनसान होता. विचारपूस करण्यासाठी सुद्धा कोणी नव्हत. त्यामुळे रात्रीच्या या प्रहरात रस्ता चुकलो कि काय असे वाटून गेले. पुढे जातो तर आणखी एक संकट उभे राहिले, आता समोर एकाचे दोन रस्ते झाले होते. त्यामुळे कुठे जावे हेच कळेनासे झाले. कुणी दिसतंय का हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरून पुढे चालत गेलो. खूप चालल्यावर सुद्धा कुणीही सापडले नाही, म्हणून परत फिरलो. इतक्यात अशोकला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात मातीवर एका वाहनाच्या पुसटशा खुणा दिसत होत्या बहुतेक रात्री मुक्कामाची बस कुमशेतला गेली असावी असा अंदाज केला आणि आम्ही त्याच वाटेला लागलो.

आमचा अंदाज बरोबर ठरला होता. २ किलोमीटर पुढे गेल्यावर एक आश्रमशाळा लागली. त्यांच्यापाशी चौकशी केल्यावर कुमशेतची वाट बरोबर असल्याचे कळले व हायसे वाटले. नऊ वाजले तरी कुमशेत गावाची काहीच चिन्हे दिसत नव्हती. अशोक तर दिवसभर धुळीच्या रस्त्याने गाडी चालवून थकला होता. याच दरम्यान अचानक गाडीच्या प्रकाशात एक मोठे रानमांजर दर्शन देऊन गेले. भूक सुद्धा लागलेली होती बरोबर आणलेली केळी कधीच संपली होती. साडे दहाच्या सुमारास त्या निर्मनुष्य रत्यावर दूर एका विजेरीचा (Torch) उजेड दिसला आणि जिवात जिव आला. एकदाचे कुमशेतला पोचलो होतो. पण इथेही आमचे नशीब आड आले. आम्ही पोहोचत नाही अशी कल्पना करून सर्वांनी भांडी घासून पुसून ठेवली होती.

दरम्यान सकाळी किरण व मंडळी जीपने कुमशेतच्या दिशेने निघून गेल्यावर दुपारी २ वाजता उपाशीपोटीच पुंडलिक, नरेंद्र, शैलेश, शेखर, नंदू, सुभाष, संजय, अनिल इमारते इत्यादी उरलेलं भरपूर सामान पाठीवर घेऊन वाटाड्यासोबत कुमशेतला येण्यासाठी कात्राबाई व आजोबा डोंगराच्यामध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेने निघाले (गुहेरीचे दार). वाटाड्याही त्यांना खिंडीपर्यंतच दिशादर्शन करणार होता आणि नंतर परत फिरणार होता, त्या पुढचा सगळा प्रवास अंदाजानेच करायचा होता. भुकेची चिंता करीत बसले असते तर वेळेवर कुमशेतला पोहोचणे अशक्य होते. वाटेत रानकोंबड्या, भेकरांचे भेसूर आवाज रानाची भयानकता वाढवत होते. खिंडीत पोहोचल्यावर वाटाडे सुकऱ्या यांना सुद्धा अंधार पडायच्या आत परत फिरणे आवश्यक असल्याने ते खिंडीतूनच निघून गेले. कधी सरळ चालत तर कधी प्रस्तरारोहण करीत एक एक गडी खिंडीतून वर सरकत होता. वाटेत बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्याच्या खुणा दिसत होत्या. काळोख पडता पडता सर्वजण खिंडीच्यावर पोहोचले. खिंडीच्यावर पोहोचल्यावर पुंडलिक व किरणने काही दिवसांपूर्वी शोधलेल्या पाणवठ्यावर जाउन आपली तृष्णा भागवली. पुंडलिक सोबतच असल्याने शोधाशोध करावी लागली नाही. इथून कुमशेत गाव फक्त १५ मिनिटांवर आहे अशी माहिती मिलिंदने पुरविली होती, जी चुकीची होती हे त्यांना लवकरच कळणार होते. अंधार वाढू लागला आणि पायाखालची वाट अनोळखी झाली. सुमारे अर्धा तास चालूनही गावाच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. उपाशीपोटीच पाच-सहा तास चालल्याने सगळेच थकलेले होते, पावले झिंगल्यासारखी पडत होती. अशाच अवस्थेत समोर दोन वाटा फुटलेल्या आढळल्या. कपाळावर हात मारून स्वतःच्याच नशीबाला दोष देत पुंडलिकने डाव्या वाटेने जाण्याचे सुचवले, कारण तो आणी किरण जेंव्हा पाण्याच्या शोधात आले होते तेंव्हा वरच्या टेकाडावरून गाव डावीकडे असल्याचे पाहिलेले त्याला आठवले.

आणखी अर्धा तास त्याच वाटेवर चालल्यावर दूरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला व सर्वांची मरगळलेली शरीर ताठ झाली. थोड्याच वेळात माणसांचा आवाज कानी पडला आणि त्या आवाजाच्या रोखाने गेल्यावर त्यांना काही गावकरी त्या रानात आपल्या गायीच्या मोडलेल्या पायावर उपचार करताना दिसले. त्या गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेवर गेल्यावर एका गावात पोचले पण ते कुमशेत गाव नसून ठाकूरवाडी गाव होते. मग त्या गावातीलच काही मुलांना घेऊन कुमशेतकडे निघाले. अखेर दुपारी २ वाजता आजोबाच्या पायथ्याकडून निघालेली मंडळी पाठीवर वजन असल्यामुळे रात्री ९ वाजता कुमशेत गावात दाखल झाली होती. एका घरासमोर मुक्कामाची बस उभी होती. रात्री भयानक थंडी असल्याने त्याच घरात रात्रीचा मुक्काम करण्यास घरातल्या मंडळींनी परवानगी दिली. कुमशेत गावात पोहोचल्यावर त्यांनी एखादी जीप आली आहे का याची विचारणा केली, अर्थात नकार आला कारण किरण व अशोक अद्याप जीप घेऊन आलेच नव्हते. त्या मंडळीनी यांना ताजे जेवणसुद्धा बनवून दिले. किरण व मंडळी रात्र वाढू लागली तरी येण्याची काही चिन्हे दिसेनात म्हणून भांडी वगैरे घासून झोपण्याच्या तयारीला लागले. त्याच वेळेला साधारण साडे दहा वाजता किरण व मंडळी जीपने गावात दाखल झाले. एकदाचे सर्वजण कुमशेतला पोहोचले होते.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

सकाळी जाग आली ती दातखिळी बसवणाऱ्या थंडीनेच. चहा पिऊन थंडी घालवण्याचा निरर्थक उपाय करून पाहिला. त्यात कुट्टी व शैलेशला थंडी भरून आली होती व तापही होता, तरी थांबून चालणार नव्हते. पटापट जीप मध्ये भरलेले सामान बाहेर काढले गेले. आम्ही एकूण अकरा सहकारी होतो पैकी अशोक जीप घेऊन त्वरित परतणार होता. त्याच्या सोबत शैलेशही जाणार होता. त्यात कुट्टी आजारी पण तरीही त्या अवस्थेत कुट्टी आमच्या बरोबर यायला तयार झाला.
प्रत्येकाने स्वतःच्या खांद्यावर / पाठीवर जास्तीत जास्त सामान घेतले तरीही भरमसाठ सामान शिल्लक राहिले. त्यामुळे एक-एक करता तब्बल दहा माणसे गावातून घेतली, तरीही सामान संपेना. गावातली गडीमाणसे शिल्लकच न राहिल्याने अशोक व शैलेशही शिल्लक सामान घेऊन आमच्या बरोबर निघाले, आजोबाच्या दिशेने. आम्ही एकूण २१ जण सामान घेऊन पुन्हा परतीच्या वाटेने आजोबाच्या माथ्यावर असलेल्या पाण्याच्या कुंडापाशी निघालो. काल रात्री कोकणातून वर येताना आमची मंडळी पाणी पिण्यासाठी याच कुंडावर थांबली होती. आजोबाचा पायथा ठाणे जिल्ह्यात तर माथा नगर जिल्ह्यात येतो. पुढे ठाकूरवाडीतून २ गडी माणसे घेऊन त्यांच्या खांद्यावर सामान देऊन त्यांना इतरांबरोबर पुढे पाठवले. तर किरण , नरेंद्र, व शेखर परत कुमशेतला आले कारण अद्यापही थोडे सामान जीपमध्ये शिल्लक होते. परत येताना वाटेत त्यांना कुट्टी एका झाडाखाली बसलेला दिसला, त्याला थकव्यामुळे चक्कर आली होती. त्याच्याकडील सामान या तिघांनी घेतले व वाटेला लागले. कुंडावर पोहोचल्यावर अशोक व शैलेश परत घरी जाण्यास कुमशेतला उभी केलेल्या जीपच्या दिशेने निघून गेले. वाटेत त्यांना झाडाखाली बसलेला कुट्टी भेटला त्यालाही त्यांनी बरोबर घेतले.

इकडे कुंडाजवळ बसून किरण व मंडळी आपल्या इतर सहकाऱ्यांना (जे यांच्या पुढे निघाले होते) आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर मुंगीच्या पावलाने चढताना पाहत होते. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर सर्वानीच माना टाकलेल्या होत्या. एका धबधब्यातून हळूहळू वर चढत गेल्यावर कड्याच्या पायथ्याला लागुनच वाट आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश करत होती. मध्येच एके ठिकाणी काळ्या कातळात निसर्गनिर्मित पाण्याची कुंडे दिसली, त्यांच्या बाजूलाच आम्ही बेसकॅंप लावायचा विचार केला व तेथेच सर्व सामान उतरवून गावकऱ्याना त्यांचा मेहनताना देऊन परत पाठवले. त्यांच्या सोबत संजय रेडकरही मुंबईस गेला. एव्हाना काळोख व्हायला लागला होता त्यामुळे तंबू ठोकणे आवश्यक होते. गवत उपटून निघण्यासारखे नव्हते म्हणून ते मर्यादित पेटवले व तंबू पुरती जागा साफ करून घेतली.
आता सुभाष, पुंडलिक, नरेंद्र, शेखर, अनिल दगडे, किरण, नंदू आणि अनिल इमारते असे फक्त आठ जण शिल्लक होतो. दरीच्या कडेलाच तंबू असल्याने दरीतून धावत येणारा वारा त्याचा चांगलाच समाचार घेत होता. गेल्या १०-१२ दिवसातील एकेक प्रसंग आठवताना कधीतरी झोप लागली.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

दरम्यान कुमशेतला परत गेलेले अशोक, कुट्टी व शैलेश जीपने परत डोंबिवलीला जाण्यास निघाले. आजारी असल्याने कुट्टी व शैलेश गाडीतच झोपले, बिचाऱ्या अशोकला एकट्यालाच जागे राहून गाडी चालवावी लागली. अशोकही थकलेला असल्याने इगतपुरीजवळ गाडी थांबवून रस्त्याच्या कडेलाच रात्र काढली व सकाळी सुखरूपपणे डोंबिवलीला पोहोचले. त्यांच्या नंतर निघालेला संजय परत कुमशेतला पोहोचला पण एव्हाना अशोक जीप घेऊन निघून गेल्यामुळे तसेच बसही उपलब्ध नसल्याने रात्री तिथेच मुकाम करून सकाळी मुंबईस रवाना झाला.

From Aajoba 1991

सकाळी जाग आली ती तंबूच्या सेंटर पोलच्या थडथड आवाजानेच. पण उठण्याचे त्राण कुणातच नव्हते. २-३ दिवसात धावपळच एव्हढी झाली होती कि प्रत्येक जण आज आराम करण्याच्या इराद्यात होता. त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळीच नंदूला ताप आला होता, त्याला गोळ्या देऊन त्याची सोय करण्यात आली. आज फक्त दुपारची जेवण आटोपल्यावर गडाच्या माथ्यावरून आम्ही चढाई अर्धवट ठेवलेल्या कड्याची तपासणी करण्याचे ठरवले होते. दुपारी जेवायला बसलो असताना सुभाष पाणी आणायला कुंडावर गेला होता. तो परत आल्यावर एक गंमत दाखवतो म्हणून सगळ्यांना परत कुंडावर घेऊन गेला. गेले दोन दिवस ज्या कुंडातले पाणी आम्ही पीत होतो त्या कुंडातून सुभाषने एक मेलेला उंदीर बाहेर काढला. ते पाहून आमच्या पोटात मळमळायला लागले. शेखर तर उलटी करयाचाच शिल्लक होता. किरणने खबरदारी म्हणून सर्वांना फ्लूच्या गोळ्या दिल्या. असे प्रसंग पाहण्याची कि काही पहिलीच वेळ नव्हती. १९८८ मध्ये ढाकभैरी चढाईच्या वेळी तर पठारावर रात्री मुक्काम करावा लागला व पाणी कुठेच न मिळाल्याने एका चिखलाच्या डबक्यात बसलेल्या म्हशींना उठवून नंतर तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरले होते.

नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दुपारी ३ वाजता कड्याच्या तपासणीकरिता निघालो. आजोबाच्या माथ्यावर सगळीकडे पुरुषभर उंचीचे गवत पसरले होते. त्यामुळे अंदाजानेच वाट काढत जाताना खड्ड्यात पडायला होत होते. पुढे काय वाढून ठेवलय या भीतीने हळूहळू पुढे चालत होतो. दीड-एक किलोमीटर विस्तार असलेल्या त्या परिसरात आम्ही कुठे चाललोय आणि दरीचे तोंड कुठे आहे त्याचा पत्ताच लागत नव्हता.

चालता चालता अचानक आम्ही एका उंचवट्यावर येउन दाखल झालो होतो. इथून परिसर बऱ्यापैकी दिसत होता. अंदाज लावून दरीच्या तोंडाशी आलो, पण इथून खाली आमचा चढाईचा मार्ग दिसत नव्हता. आता खाली उतरूनच पाहणी करणे आवश्यक होते.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

कड्याच्या उतारावरून बरेच पुढे गेल्यावर तिथून एक वाट खाली उतरली होती म्हणजे एका लेजवर पोहोचली होती आणि अचानक आम्हाला हव ते गवसलं होत! कड्याच्या माथ्यापासून जवळपास ५०० फुट खाली असलेली हि लेज पुढे खूपच अरुंद होत (अर्धा फुटांपर्यंत) गेली होती व याच लेजच्या सुमारे १०० फुट उंचीवर आम्ही ५-६ दिवसांपूर्वी कॅंप २ वरून पाहिलेलं छत दिसत होत. याच छताच्या खाली सरळ रेषेत आमच्या पायाखाली आमचा अर्धवट राहिलेला चढाई मार्ग होता. चढाईचा मार्ग सापडल्याने खुशीतच अंधार पडू लागल्याने परत माथ्यावरील बेसकॅंपच्या दिशेने निघालो. आमचे आनंदित चेहरे पाहून नंदू, व दोन्ही अनिलना कामगिरी फत्ते झाल्याची खात्री पटली. फावल्या वेळेत इतर सहकाऱ्यांनी जळणाचा साठा करून ठेवला होता.

ज्या गोष्टीसाठी परत आजोबाच्या माथ्यावर आम्ही जमा झालो होतो त्या चढाईचे नियोजन करण्यासाठी रात्री एकत्र बसून विचार सुरु झाला. आम्ही आजोबाच्या पायथ्यापासून सुरुवात करून जवळपास २५०० फुटांची गाठली होती आणि चढाई अर्धवट अवस्थेत सोडली होती. ताशीव कड्यावर जवळजवळ १००० फुट चढाई अद्यापही शिल्लक होती. म्हणजे अद्यापही १० ते १२ दिवस लागणार होते. मोहीम सुरु करून १५ दिवस उलटून गेले होते. सर्वांच्या सुट्ट्या पण संपत आल्या होत्या, आता उशीर करून चालण्यासारखे नव्हते.

कारण बहुतेक मंडळी लघु उद्योगात काम करीत असल्यामुळे वाढीव सुट्ट्या मिळणार नव्हत्या. आता आम्हा आठ जणांमध्ये पाच जण चढाई करणारे होते त्यामुळे दोन टीम बनवायचे ठरविण्यात आले. पैकी एक टीम आज संध्याकाळी शोधलेल्या लेजवरून खाली म्हणजे कॅंप-२ वरच्या भागात उतरेल व तेथेच कड्यावर रात्रंदिवस राहून चढाई करीत वर येईल. त्याच वेळी दुसरी टीम लेजच्या वरील छत व सुमारे ५०० फुटी भिंतीचे आव्हान पेलतील. खालील टीमला लागणारे जेवण/पाणी इत्यादी आवश्यक सुविधा लेजच्या वरील टीम पुरवेल. वरील टीम रोज बेसकॅंपवर येउन जाऊन राहील. या योजनेमुळे आम्ही अर्ध्या काळातच मोहीम पूर्ण करू शकणार होतो. याचे पूर्ण श्रेय आम्ही संध्याकाळी शोधलेल्या लेजला द्यावे लागेल त्यामुळे आमचे काम खूपच सोपे झाले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने आपला इंगा दाखवला होता. दोन दिवस वाऱ्याशी सामना करून थकलेला आमचा तंबू साफ झोपला होता. तंबू तुटल्याने तो पुन्हा तेथेच लावणे शक्यच नव्हते, म्हणून मोहिमेवर जाण्याचे थांबवून आम्ही तंबू लावायला सुरक्षित जागा शोधण्यास निघालो. शेवटी एके ठिकाणी आम्हाला ती जागा मिळाली. कारवीच्या झाडोऱ्यामध्ये एक मोकळी जागा होती. थोडासा उतार होता तो व्यवस्थित केला. वारा कारवीच्या रानात घुसल्यावर त्याचा जोर कमी होत होता. जुन्या ठिकाणी असलेला तंबूमधील सामान उचलताना नंदूला दोन साप आरामात पहुडलेले दिसले. बापरे! गेले दोन दिवस आमच्यासोबत त्यांनीसुद्धा तंबूमध्ये मुक्काम ठोकला होता. अजून किती संकटाना तोंड द्यावे लागणार होते देव जाणे! या सर्व उपद्द्व्यापात चार वाजले. दिवस जवळपास संपत आला होता.

From Aajoba 1991

पण तरीही सुभाष, किरण, पुंडलिक व शेखर असे चौघेजण उद्याचे काम थोडेतरी हलके होईल म्हणून लेजच्या दिशेने निघाले. त्यांना आता मेन लाईन फॉर्म करायची होती. त्यासाठी त्याना काल पाहिलेल्या छताच्या सरळ रेषेत येणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना अरुंद लेज वरून जवळपास २०० फुटांचा ट्रेवर्स मारून त्या छताच्या बरोबर खाली जाणे भाग होते. मोहीम संपेपर्यंत या अरुंद लेजवर वावर असल्याने तो मार्ग दोर लावून सुरक्षित करणे जरुरी होते. मग किरणने कंबरेला दोर बांधला व रांगत तर कधी सरपटत लेजवर पुढे सरकायला सुरुवात केली. वाटेत त्याला मध्येच एके ठिकाणी माकडांच्या विष्ठेने भरलेली एक गुहा लागली. इथे पोहोचल्यावर त्याने एक बोल्ट ठोकला व नंतर शेखर, सुभाष व पुंडलिक यांना गुहेत घेतले. इतर मंडळी तिथे पोहोचल्यावर किरण छताच्या सरळ रेषेत येण्यासाठी आणखी पुढे सरकला. माथ्यावरून खाली लेजवर उतरल्यावरचे ठिकाण व चढाईचा मार्ग यातील अंतर जवळपास २०० फुट होत आणि आता इथे सारखी धावपळ करावी लागणार होती म्हणून सुरक्षेसाठी एक दोर बांधून टाकला.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

उद्यापासून काही सहकारी एकदाचे खालच्या कॅंप-२ वर उतरल्यावर मोहीम संपेपर्यंत भेटणार नव्हते. त्यामुळे रात्री कॅंप फायर करून खूप धमाल करून उद्यापासून परत सुरु होणाऱ्या मोहिमेसाठी नवीन मानसिक उर्जा साठवून घेतली.
सकाळी जाग आली ती थंडीमुळेच, तंबूच्या तीन बाजूस असलेल्या कारवीच्या झाडोऱ्यामुळे वारा थेट मारा करत नव्हता, पण रात्री दव पडल्याने तंबूवरून पाणी वाहत होते. आता मोहीम काहीही करून पुढील चार ते पाच दिवसात आटोपायचीच हा निर्धार करूनच लेजच्या दिशेने प्रयाण केले. लेजवर कालच बांधून ठेवलेल्या दोरामध्ये स्वतःला अडकवून सर्वजण त्या अरुंद लेजवरून छताच्या खाली जाण्यासाठी सरकू लागले. काल वाटेत मिळालेल्या गुहेमधील माकडांची विष्ठा साफ करून तिथे तात्पुरता कॅंप लावला. त्यावेळेत किरण व पुंडलिकने पुढे जाऊन वाटेमध्ये दोर दरीमध्ये झुलत असल्याने आणखी दोन बोल्ट ठोकून येण्याजाण्यासाठी मार्ग सुरक्षित केला. गुहेच्या एका खबदाडीतून थेंब थेंब पाणी ठिबकत होते, तिथे एक कॅन लाऊन पाणी जमा करायची सोय केली, म्हणजे बेसकॅंप वरून उद्या पाणी आणायची निकड नव्हती.

आता मुख्य लढाईसाठी परत सज्ज झालो. कालच ठरवल्याप्रमाणे २ टीम केल्या. पुंडलिक व शेखर खाली रॅपलिंग करत आम्ही शेवटी कॅंप-२ वर जिथे चढाई थांबवली होती तिथे जाऊन चढाईला सुरुवात करणार होते. तर वरच्या बाजूला सुभाष चढाई करणार होता. दोन्ही टीमच्या मध्ये लेजवर किरण व नरेंद्र होते. नरेंद्रला लेजवर ठेवण्याचे एक कारण म्हणजे आमच्या डोक्यावर असलेले दगडी छत. दगडी छत कसे पार करायचे याचा अनुभव फक्त किरण व नरेंद्रलाच होता.

पुंडलिक रॅपलिंग करत खाली कॅंप-२ वर उतरला व पाठोपाठ शेखर ही. इथेच आम्ही दि. १० डिसेंबरला चढाई थांबवली होती व आज म्हणजे दि.१६ डिसेंबर म्हणजे तब्बल ६ दिवसांनी पुन्हा कॅंप-२ वर पोहोचू शकलो होतो. ते दोघेही खाली पोहोचताच नरेंद्र व किरण तंबूच्या दिशेने निघून गेले कारण संध्याकाळी खालील टीमला जेवण पाणी पुरवायचे होते. पुंडलिक व शेखरने कॅंप-२ वरून चढाई सुरु केली आणि त्याच वेळेला सुभाषने लेजच्या वरच्या भागात छताच्या दिशेने चढाई सुरु केली. सुभाषला सुरुवातीला बोल्टिंग करावी लागणार असल्याने त्याला एकट्यालाच आव्हान पेलावे लागणार होते. तंबूच्या दिशेने जाताना किरण व नरेंद्रची चर्चा चालू होती. खाली कॅम्प-२ पासून वर पुंडलिक व शेखर यांना जवळपास ५०० फुट चढाई करायची होती आणि त्यासाठी त्यांना रात्रंदिवस उघड्यावरच मुक्काम करायचा होता. शेवटी त्यांच्या सोबतीला किरणने सुद्धा खाली जाण्याचा निर्णय घेतला.

इथे बेसकॅंपवर नंदू, अनिलने जेवण तयार करून ठेवले होते, ते सर्व घेऊन किरण परत लेजवर एकटाच निघाला. दरम्यान सुभाषने सकाळी ११.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकट्यानेच सोलो क्लाइम्बिंग पद्धतीने एकूण १२ बोल्टच्या साहायाने लेजपासून सुमारे ४० फुटांची उंची गाठली होती. तर लेजच्या खाली शेखर व पुंडलिक यांनी १० डिसेंबरला चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सुरुवात करून ४ बोल्ट, १ पिटोन, १ चोकनट यांचा वापर करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. ते आता एका अरुंद लेज वर पोहोचले होते. इथे त्यांनी कॅंप-३ ची स्थापना केली आणि किरणची वाट पाहत राहिले. किरण लेज वर पोहोचताच आणलेले सामान घेऊन रॅपलिंग करत खाली पुंडलिक व शेखरकडे उतरण्यास सुरुवात केली. पाठीवर वजन असल्यामुळे अतिरक्त भार हातावर पडत होता आणि त्यातच वाटेत ओव्हरहेंग असल्यामुळे कड्यापासून विलग होऊन हवेतच रॅपलिंग कराव लागलं, तरीही दोर हातावर चांगलाच घासला गेला. खाली गेल्यावर किरणला कळल की त्या दोराचे टोक पुंडलिक व शेखरकडे नव्हतेच, ते तर त्यांच्यापासून विसेक फुट दूर हवेतच लटकत होते. मग पुंडलिकने त्याच्याकडे असलेला अतिरिक्त दोर किरणकडे फेकायला सुरुवात केली. किरणने तिसऱ्या प्रयत्नात तो दातांमध्ये पकडला आणि पुंडलिकने किरणला त्या लेजवर (कॅंप-३) वर खेचून घेतले. झाल्याप्रकाराने किरणची बोटे भाजून आतली कातडी सुद्धा दिसायला लागली. आजची रात्र आम्ही तिघे जमिनीपासून ३००० फुट उंचीवर असलेल्या याच अरुंद लेजवर (कॅम्प-३) उघड्यावरच मुक्काम करणार होतो. तर सुभाष व नरेंद्र वरच्या लेजवरून परत बेसकॅंपवर निघून गेले.

रात्री लवकरच मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतले. जेवायला काय जागा पकडली होती आम्ही व्वा! लेज इतकी अरुंद कि आळसावलेले हात पाय लांब केले तर सरळ हवेतच लटकायचे. झोप तर येतच नव्हती. वर आकाशात चांदणे पसरले होते, चंद्र प्रकाशही खाली पायथ्यापर्यंत झाडा-झुडपांवर पसरला होता. वरून झाडे झुडूपांसारखीच भासत होती. संपूर्ण दृश्यच अवर्णनीय होते, आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घ्यावाच! इकडे आम्ही झोपेची वाट पाहत असताना तिकडे बेसकॅंप वरील नंदू आणि अनिल दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करीत होते. कारण सुभाष व नरेंद्र सकाळीच चढाईसाठी निघतांना सोबत तयार जेवण सुद्धा घेऊन येणार होते.

हीच ती लेज
From Aajoba 1991

सुभाष व नरेंद्रने मेन लेजवर येऊन सकाळीच सुरुवात केली. काल सुभाषने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून नरेंद्रने सुरुवात केली. सलग ७ बोल्ट ठोकल्यावर त्याला फ्री मूव्ह करण्याची संधी दिसली. जवळपास ३० फुटांची उंची गाठत तो आता जवळपास त्या दगडी छताखाली आला होता.

इकडे लेजच्या खाली अर्थात कॅंप ३ वर रात्रीच्या भयानक थंडीने किरण, पुंडलिक व शेखर चांगलेच गारठून गेले होते. सुरुवातीलाच ओव्हरहेंग असल्याने चेन बोल्टिंगशिवाय पर्याय नव्हता. शेखरने ५ बोल्टच्या साहाय्याने तो पार केला व पुढची चढाई किरणने आपल्या हाती घेतली. किरणने सुद्धा ५ बोल्ट मारल्यावर फ्री मूव्हची संधी दिसताच बिलेसाठी पुंडलिकला वर घेतले.

किरणच्या उजव्या हाताला ५-६ फुट अंतरावर एक मोठा दगड वरून खाली येऊन मध्येच एका कपारीत अडकला होता. अंग ताणून किरणने हळूहळू त्या दगडाला मिठीच मारली, आता त्याच संपूर्ण अंग हवेत लटकत होत. हळूहळू स्वतःचा तोल सावरत किरण त्या दगडावर चढला. तिथेच दोर बांधून पुंडलिकलाही त्याने तिथे खेचून घेतले. वरसुद्धा फ्री मूव्ह करण्याची संधी दिसत होती, पण वरचा होल्ड पकडण्याएव्हढी उंची किरणची नव्हती. त्यामुळे त्याने प्रथम पुंडलिकच्या खांद्यावर पाय ठेवला पण तरीही त्याचा हात पोहोचत नव्हता तेंव्हा त्याने थेट त्याच्या डोक्यावरच पाय देऊन वरचा होल्ड पकडला व वर सरकला. आता परत बोल्ट मारावा लागणार होता. पण त्यासाठी आधी तोल जाऊ नये म्हणून स्वतःला कुठे तरी जखडून घ्यावे लागणार होते. आजूबाजूस पाहिल्यावर कड्यापासून एक छोटा दगड बाहेरच्या बाजूस आला होता. त्याच्या चहुबाजूनी एक स्लिंग बांधून तिच्यातून कंबरेचा दोर पास करून स्वतःला तात्पुरत जखडून घेतलं. पुढे संध्याकाळ होई पर्यंत किरण ने १६ बोल्ट ठोकले. आज कॅंप ३ पासून जवळपास ८० फुटांची उंची गाठली होती.
आज दगडी छताचा निकाल लावायचा होता. जमिनीपासून जवळपास ३६०० फुट उंचीवर असलेल्या छतावर नरेंद्रने सकाळीच बोल्टिंगला सुरुवात केली. हवेत संपूर्ण झोपण्याच्या स्थितीत आडवे होऊन त्याने लागोपाठ अकरा बोल्ट ठोकले आणि ३५ फुट रुंद असलेल्या त्या छताचा निकाल लावला. शाब्बास नरेंद्र!!

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

त्याने कड्यावर ठोकलेल्या शेवटच्या बोल्टला खुणेसाठी एक कॅन अडकवला. कारण उद्या लेजवर न येता थेट माथ्यावरूनच रॅपलिंग करत तो इथे पोहोचणार होता. वेळ वाचवण्यासाठी ते आवश्यक होत. खरतर आज नरेंद्रची अग्नीपरीक्षाच ठरली कारण दीड तासाला एक या हिशोबाने त्याने उलट्या अवस्थेत ११ बोल्ट ठोकले होते (वटवाघळासारखे). अनैसर्गिक अवस्थेत दिवसभर लटकून राहिल्यामुळे अंगावर भयंकर ताण पडलेला, तरीही नरेंद्रने त्याची पर्वा न करता कामगिरी फत्ते केली होती. दिवसभराची चढाई थांबवून नरेंद्र परत खाली लेजवर सुभाषकडे पोहोचला. बेसकॅंपकडे निघणार इतक्यात खालून शेखरची हाक एकू आली……………………

इकडे खाली किरणने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आज पुंडलिकने सुरुवात केली, सोबतीला शेखर होता, तर किरण खाली अरुंद लेजवर (कॅंप ३) होता. तीन वाजेपर्यंत पुंडलिकने चेन बोल्टिंग करत ११ बोल्ट ठोकले. पुढील चढाई शेखरने आपल्या हातात घेतली आणि संध्याकाळपर्यंत ६ बोल्ट ठोकले. आज जवळपास ५५ फुटांची उंची गाठली होती. म्हणजे कॅंप ३ पासून जवळपास २२५ फुट उंचीवर पोहोचलो होतो. आणखी ५०-६० फुट उंचीवर एक छान प्रशस्त गुहा आहे हे शेखर व पुंडलिकने पहिल्याच दिवशी रॅपलिंग करत खाली येताना पाहिली होती. आमची सध्याची कॅंप-३ वरील मुक्कामाची लेज खूपच अरुंद होती, त्यातच बोचऱ्या थंडीमुळे दोन रात्री झोपही येत नव्हती. एकमेकांना खेटून झोपत असल्याने कुसही बदलता येत नव्हती. म्हणून तिघांनीही वरच्या गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी वरच्या लेजवर हजर असलेल्या मंडळीनी खाली दोर सोडावा लागणार होता. शेखरने आवाज देताच वरच्या लेजवरून दोराच्या साहाय्याने जेवण व पाणी खाली सोडले. या खाली सोडलेल्या दोराच्या साहाय्याने शेखर कमांडो पद्धतीने दोर पकडून त्या गुहेत पोहोचला.

शेखर गुहेत पोहोचताच पाठोपाठ पुंडलिक व किरण कॅंप ३ ला कायमचा रामराम करून सर्व साहित्य घेऊन गुहेत पोहोचले. किरणच्या अंगावर सर्व साहित्य आणि त्यातच त्यांच्याकडे झुमार नसल्याने लेजवर उभ्या असलेल्या सुभाष व नरेंद्रने किरणला अक्षरशः खेचून वर घेतले. या खटाटोपात सात वाजले. सुभाष व नरेंद्र काळोखातच लेजवरून बेस कॅंपच्या दिशेने निघून गेले. तिकडे बेसकॅंपवर नंदू, व अनिल त्यांच्याच काळजीत बसले होते. ज्या लेजवरून दिवसा उजेडीदेखील जीव मुठीत धरून चालावे लागे त्याच लेजवरून अंधारात चाचपडत पुढे सरकताना त्यांना खूपच त्रास झाला. कड्याच्या वर आल्यावर मात्र लख्ख चंद्र प्रकाशात परिसर न्हाऊन निघाला होता. बेसकॅंपवर पोहोचताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

From Aajoba 1991

इकडे कड्यावरच्या गुहेतच पुंडलिक, शेखर व किरणने कॅंप-४ स्थापन केला. खालील कॅंप-३ च्या अरुंद लेजपेक्षा हि गुहा थोडी प्रशस्त होती. रात्री मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतलं आणि झोपण्यासाठी जागा थोडीशी ठाकठीक करून घेतली. रात्री कधीतरी काहीतरी चावल्याने पुंडलिक जागा झाला तर एक उंदीर त्याच्यापासून थोडासा दूर अंतरावर उभा राहून याच्याकडेच टकामका पाहत होता. रात्रभर २-३ उंदरांनी अंगावर उड्या मारून भंडावून सोडले. खरतर आम्हीच त्यांच्या घरात घुसखोरी केली होती आणि आता आम्हीच त्याना त्यांच्याच घरातून हुसकावण्याचा प्रयत्न करीत होतो.

सकाळी ठीक ८.३० वाजता शेखरने रॅपलिंग करत खाली जात काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सोलो क्लाईम्ब सुरु केले. तर गुहेच्यावर पुंडलिकने सुरुवात केली. पुंडलिकला मेन लेज पर्यंतच २०० फुट अंतर पार करायचं होत तर शेखरला ८० फुटांचा कातळ टप्पा पार करत गुहेपर्यंत पोहोचायचं होत. दरम्यान किरणला गुहेतील दगड बाजूला सारताना एक काळी इंगळी दिसली, त्याने थोडा विचार करून तिला ठार मारलं. तिला खाली फेकता येत नव्हत कारण शेखर चढाई करीत होता आणि तिला गुहेतच ठेवताही येत नव्हत. म्हणून तिघांच्याही सुरक्षिततेचा विचार करून पहिल्यांदाच जीव हत्या केली होती. दरम्यान बोल्टिंग करताना शेखरच्या हातातून हातोडी सुटून थेट खाली कॅंप ३ वर असलेल्या झाडी मध्ये पडली. दुसरी हातोडी नव्हती आणि त्यातच संपूर्ण बोल्टिंग करायचे असल्याने शेखरला तिथेच ठेऊन सुद्धा काहीच उपयोग नव्हता, म्हणून त्याला परत गुहेत खेचून घेतले. एव्हाना वरच्या बाजूला पुंडलिकने सोलो क्लाइंब करत २ बोल्ट व १ पिटॉन च्या साहाय्याने फ्री मूव्ह करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. शेखर गुहेत पोहोचताच किरण पुंडलिकच्या मदतीला त्याच्यापर्यंत पोहोचला व पुढील चढाई आपल्या हाती घेतली. ३ बोल्ट व १ पिटॉनच्या साहाय्याने दुपारी १.३० वाजेपर्यंत फ्री मूव्ह करत त्याने जवळपास १२० फुटांची उंची गाठत सुभाष व नरेंद्र असलेल्या मेन लेजवर पोहोचला. सकाळ पासून २०० फुटांच्या भिंतीवर फक्त ५ बोल्ट वापरण्यात आले होते. हा संपूर्ण मार्ग भुसभुशीत मातीने अस्थिर खडकांनी भरलेला होता. खाली उभ्या असलेल्या पुंडलिकच्या अंगावर अक्षरशः किलो किलोने माती पडत होती.

From Aajoba 1991

किरण व पुंडलिक मेन लेजवर पोहोचताच खाली गुहेत बसलेल्या शेखरकडे हातोडी पोचवण्यात आली. कारण सकाळी हातोडी खाली पडल्याने गुहेच्या खालील जवळपास ६० फुटांच्या रॉकपॅचवर चढाई अद्याप शिल्लक होती. त्याला सोलो क्लाइंब करायला सांगून किरण व पुंडलिक मेन लेजवरून जेवण व पाणी आणण्यासाठी बेसकॅंपच्या दिशेने निघून गेले. चार दिवस त्यांनी कड्यावरच मुक्काम केलेला असल्याने त्यांच्या अंगावर आज प्रथमच उन्ह पडत होती. आम्ही चार दिवसानंतर दर्शन दिल्याने बेसकॅंप वरील सहकारी सुद्धा हरखून गेले. विश्रांती घेण्यसाठी सुद्धा वेळ नव्हता, लगेच रात्रीच्या मुक्कामासाठी जेवण व पाणी घेऊन परत कड्यावर येण्यासाठी निघालो. इथे शेखर एकटाच कड्यावर लटकून बोल्टिंग करत होता. त्यातच त्याच्याकडील वेज (बोल्टच्या फटीमध्ये टाकण्यात येणारी पाचर) संपल्याने नाईलाजाने बोल्टिंग थांबवावे लागले.

कॅंप-४ च्या खाली अद्यापही २०-२५ फुट चढाई शिल्लक होती. आता त्याला किरण व पुंडलिक परत येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता, शेवटी कड्यावर लटकून त्यालाही कंटाळा आला म्हणून खाली उतरून सरळ गुहा गाठली आणि मस्तपैकी ताणून दिली. संध्याकाळी ५.३० वाजता किरण व पुंडलिक बेसकॅंपवरून परत लेजवर आले आणि रॅपलिंग करत परत कॅंप ४ वर उतरले. आज कसेही करून कॅंप ४ खालील उरलेली २०-२५ फुटांची चढाई पूर्ण करायचीच होती. शेखरला आणखी विश्रांती देऊन त्याने जिथे चढाई थांबवली होती तिथे किरण व पुंडलिक खाली उतरले. प्रथम किरण ने १० फुटांची फ्री मूव्ह करीत एक बोल्ट ठोकला व त्या बोल्ट च्या आधारे उभे राहून जवळपास ६ फुटांवर दुसरा बोल्ट ठोकला. फ्री मूव्हची संधी होती, पुंडलिकला सावध राहायला सांगून किरणने झटकन मूव्ह करत उरलेलं अंतर पार करून संध्याकाळी ६.४५ वाजता कॅंप-४ वर पोहोचला.

मेन लेजच्या खालील चढाई संपल्याने तिघेही खुश होते. बेस कॅंप वरून अनिल इमारते परत घरी गेल्याने आम्ही आता सात जण उरलो होतो. किरण, पुंडलिक व शेखरने तब्बल पाच रात्री कड्यावरच्या सांदी-कोपऱ्यात घालवल्या होत्या. बेसकॅंप वरील मंडळीना आम्हाला पाहून अक्षरशः गहिवरून आले.

From Aajoba 1991

दरम्यान सुभाष व नरेंद्रने छताच आव्हान मोडीत काढल्यावर आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे लेजच्यावर माथ्याच्या दिशेने आगेकूच चालूच ठेवली होती. आजोबाचा माथा आता अगदीच आवाक्यात आला होता. काही दिवसांपूर्वी जे अशक्य वाटत होत ते अगदी काही फुटांवर दिसत होत. या नंतरची चढाई आता माथ्यावरूनच नियंत्रित करणार होतो. त्यामुळे बेसकॅंपवरून परत लेजवर येण्याजाण्याचा त्रास वाचणार होता. चढाई जवळजवळ पूर्ण होत आली होती. सुभाषने ३ बोल्ट व ३ पिटॉनच्या सहाय्याने बहुतेक चढाई संपवत आणली होती. त्यात नरेंद्रने १ बोल्ट व १ पिटॉनची भर घातली. शेवटची मुव्ह करण्यास पुंडलिक खाली उतरला. शेवटची फ्री मूव्ह करत २० दिवसांच्या परिश्रमाचे कोणतेही परिणाम न जाणवता पुंडलिकने ठीक १.३० वाजता आजोबाचा माथा गाठला आणि एका खडतर मोहिमेची सांगता झाली. फक्त आमच्या ७ जणांच्या आयुष्यातीलच नव्हे तर भारतीय प्रस्तरारोहण क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी मोहीम पूर्ण झाली होती. डेहणे गावापासून १ डिसेंबर १९९१ रोजी सुरुवात करून साथीदारांची कमी, पाण्याचे दुर्भिक्ष, साप, विंचू यांचा त्रास इ. अडचणीवर मात करून एकूण १८३ expanasion बोल्ट, १९ पिटॉन, दोन पेग व एक चोक नट वापरून २० डिसेंबर १९९१ रोजी आजोबावर अगदी मध्य भागातून अत्यंत अवघड मार्गाने चढाई केली होती.

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

From Aajoba 1991

समाप्त!

प्रतिक्रिया

साष्टांग नमस्कार!त्या धाडसाला जिद्दीला चिकाटीला.काय माणसं हो ही!!

यशोधरा's picture

17 Apr 2015 - 9:40 pm | यशोधरा

अफाट!अफाट!

मधुरा देशपांडे's picture

17 Apr 2015 - 10:27 pm | मधुरा देशपांडे

__/\__

प्रचेतस's picture

20 Apr 2015 - 6:37 pm | प्रचेतस

__/\____/\____/\__

खटपट्या's picture

17 Apr 2015 - 10:31 pm | खटपट्या

आधी सर्व भागांचे फोटो पाहुन घेतलेत. जबरद्स्त आहेत. तरुणपणातले कीरणकाका बघायला मिळाले.

आता वाचतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2015 - 12:58 am | अत्रुप्त आत्मा

स्पाय(नो)डर मॅन्स तुम्माला पुन्ना ये दंडवत.

जेपी's picture

18 Apr 2015 - 10:00 am | जेपी

निशब्द

नि३सोलपुरकर's picture

18 Apr 2015 - 2:48 pm | नि३सोलपुरकर

दंडवत साहेबा दंडवत

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Apr 2015 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

साष्टांग दंडवत

पैजारबुवा,

गुनि's picture

20 Apr 2015 - 3:41 pm | गुनि

मस्त मस्त ..... आनि जब्रा

पॉइंट ब्लँक's picture

20 Apr 2015 - 4:03 pm | पॉइंट ब्लँक

शाब्बास. तुमच्या धाडसाचं कौतुक वाटत.

सुरक्षिततेच्या साधनांबद्दल करावी लागलेली तडजोड पाहून वाईट वाटलं. झुमॉरसारखे अत्यंत आवश्यक उपकरण जर व्यवस्थित चालले असते तर इतका त्रास झाला नसता.

सतीश कुडतरकर's picture

21 Apr 2015 - 11:15 am | सतीश कुडतरकर

मी तडजोड नाही म्हणणार. उलट न थांबता ते बनविण्याचा प्रयत्न केला आणि प्रयोगशाळेत त्याची यशस्वी चाचणीसुद्धा घेतली, किरण काकांनी या कौशल्याचा व्यावसायिकरित्या वापर केला असता तर नक्कीच यशस्वी झाले असते आणि आपल्यालाही देशाबाहेर पाहण्याची गरज पडली नसती. पण त्यांच्या नियमाप्रमाणे खेळामध्ये व्यवसाय शोधायचा नसतो, म्हणून ते राहिलं. आत्ताच दिवाळीमध्ये माळशेजला भोजगिरीची ३००० फुटांची कातळभिंत चढाई यशस्वीरीत्या पार पाडली त्यावेळेस सुद्धा आम्ही यातील काही साहित्य वापरलं.

एक झुमार सोडलं तर बाकी सगळंच यशस्वी झाल. २५ वर्षांपूर्वी बनविलेल कॅराबिनर, चोकनट आणि डीसेंडर सारखं साहित्य आम्ही अजूनही वापरतोय, एव्हढी वर्ष वापरल्यावरही याची सुरक्षितता सिध्द करावी लागेल?

सध्याचे Alloy material चे साहित्य एव्हढी वर्षे कोणीही वापरणार नाही कारण त्यांची shelf life तेव्हढी नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2015 - 12:47 am | डॉ सुहास म्हात्रे

अफाट कामं करत आहे तुमचा गृप !

एक एकटा एकटाच's picture

26 Apr 2015 - 1:08 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

पैसा's picture

26 Apr 2015 - 11:40 pm | पैसा

फोटो बघून बोबडी वळलीय!

जिन्क्स's picture

5 May 2015 - 4:46 pm | जिन्क्स

तुमच्या साहसाला सलाम.
पण वाचता वाचता मनात आलेले विचार खाली मांडत आहे. कृपया सकारात्मकपणे घेणे,
१) कोणी कितीही कारणे दिली तरी बीना बुटाचे प्रस्थ-आरोहानं पटत नाही.
२) सुरक्षतेच्या आघाडी वर प्रचंड तडजोड केलेली दिसत आहे.
३) बेस कँप कुठे लावायचा हे मोहीम सुरू होण्या अगोदर रेकी करून ठरवायला हवे होते.
४) रेकी मध्ये पाण्याच्या सोयी पासुचेन "सप्लाय चेन" आधीच ठरवायला पाहिजे होती.
५) एखादा कडा वर जाऊन रॅपलिंग करून उतरणे आणि परत तोच चढणे (वरून बिले देऊन) ही यशस्वी मोहीम कसे बरं होऊ शकते?

कपिलमुनी's picture

5 May 2015 - 5:12 pm | कपिलमुनी

गिर्यारोहकांसाठी ५ वा मुद्दा टेक्निकली बरोबर आहे.

सतीश कुडतरकर's picture

9 May 2015 - 12:54 pm | सतीश कुडतरकर

तुम्ही, तो काळ कोणता याचा विचार करीतच नाही आहात. ते साल १९९१ आहे २०१५ नाही. त्यावेळेस साहित्य सहजसाध्य उपलब्ध होते का???
जरी होते तरी ते खरोखरच प्रत्येकाला परवडणारे होते का???

डोंबिवलीतील त्यावेळच्या एका संस्थेने प्रस्तरारोहण सुरु केल होत आणि किरणकाका आणि मंडळीनी त्या संस्थेकडे आपल्यालाही सामील करून घेण्याची विनंती केली होती. पण उद्दामपणे त्यांना नकार देण्यात आला आणि त्यातूनच स्वयंप्रेरणेने त्यांनी या खेळाची सुरुवात कोणत्याही गुरुविणा केली. (डोंबिवलीतील ती संस्था कधी सुरु झाली आणि कधी बंद झाली ते सुद्धा कोणाला माहित नाही)

उलट साहित्य मिळत नसताना स्वयंप्रेरणेने ते बनविण्याचा घाट घातला आणि यशस्वीरीत्या बनविलेसुद्धा. गेली पंचवीस वर्षे आम्ही तेच साहित्य वापरले आणि तुम्ही अजूनही त्याच्या सुरक्षेविषयी शंका घेताय? कोकणकडा आम्ही त्याच साहित्याच्या सोबतीने सर केला. आणखी कोणत्या पद्धतीने सिद्ध करायचे? कोणती बहुराष्ट्रीय कंपनी तुम्हाला २५ वर्षांची on field guarantee देते, shelf life ची सुद्धा देणार नाही. सध्या नवीन साहित्य घेतले आहे.

(अवांतर- पडझडीमुळे जुना मार्ग बंद झाल्यामुळे आम्ही २००६ मध्ये नवीन मार्गाने (सेंटर रूटनेच) कोकणकडा सर केला. त्यानंतर आम्ही तयार केलेल्या मार्गावरून मुंबईतील एका संस्थेने तो परत सर केला खरा पण त्या मार्गाच्या अवघडपणामुळे काही ठिकाणी त्याना चढाई जमली नाही म्हणून त्यांनी सोयीस्कररीत्या त्या मार्गात आणखी बोल्टची भर घालून त्या मार्गाची वाट लाऊन टाकली. आव्हान स्वीकारायचे सोडून असा shortcut मारून जर माथा गाठण्यास काय हशील?)

मी पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे जेंव्हा कॅराबिनरची प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली, तेंव्हा तो १३०० किलो वजनभार टाकल्यावर फक्त वाकला, तुटला मात्र नाही. या कॅराबिनरवर कितीतरी वेळा fall घेतलेले आहेत.

रिंगबोल्ट विषयी सुद्धा एक भीती मनात असते, त्याचे कारण हा बोल्ट ठोकताना निट ठोकला जात नाही. रिंग बोल्ट ठोकताना जे छिद्र करावे लागते, ते एव्हढे खोल असावे जेणेकरून संपूर्ण बोल्ट आत तर जाईलच पण बोल्टची Collar हि छिद्राच्या तोंडावर थोडीशी आत जाइल. पण हि काळजी लोक घेत नाहीत आणि अपघात होतात. यात त्या बोल्टचा काय दोष, ते ठोकणाऱ्याचा दोष नाही का?

आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी माथेरानला ठोकलेल्या बोल्टवर दोनच वर्षांपूर्वी reclimb करताना संपूर्ण भरवसा ठेऊन प्रस्तरारोहण केल कारण आम्हाला आम्ही केलेल्या कामावर संपूर्ण विश्वास होता.

बिनाबुटाचे प्रस्तरारोहण हा एक विवादित विषय आहे. ज्यांना खेळ खेळायचाच नाही तेच नियम बनविण्यामध्ये पुढे असतात आणि NIM सारख्या संस्था फक्त तांत्रिक गोष्टी शिकवतात, प्रस्तरारोहण आपले आपल्यालाच कुवतीनुसार करायचे असते. काकांच्या पस्तीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये बूट न घातल्यामुळे काहीही त्रास झालेला नाही. अपघात झालाच तर बूट घाला अथवा घालू नका, हाड मोडणार हे नक्की. ज्याना जीवाची इतकी भीती वाटते त्यांनी या खेळ खेळूच नये. मोठेपणा नाही पण आम्ही जो मार्ग निवडतो त्याला कुणीही हात घालण्यास धजावत नाही. सर्वजण तोच सरधोपट पारंपारिक मार्ग वापरून प्रस्तरारोहण करतात, कोणीही जराही वाकडी वाट करण्यास उत्सुक नाहीत. अशाने प्रस्तरारोहकांची फक्त quantity वाढेल quality नाही.

आता बेसकॅम्प आणि पाण्याची सोय याबाबतीत जरूर गोंधळ झाला. कारण माणसांची कमतरता आणि अतिउत्साह.

आता मुद्दा क्रमांक ५.
इथे तुमची गल्लत झालेली आहे. दिवसभराची चढाई थांबवल्यावर लीड क्लाईम्बर दोर तिथेच बांधतो व रॅपलिंग करत परत खाली लेज वर येतो. दुसऱ्या दिवशी त्याच दोरावर जुमारिंग करीत काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी परत पोहोचतो आणि चढाई सुरु करतो. जसजशी उंची वाढत जाते तसतशी जुमारिंग वाढत जाते. तुम्ही १०० फुटांपेक्षा जास्त उंचीच जुमारिंग केल असल्यास आपल्याला त्यात किती उर्जा आणि वेळ वाया जातो याची कल्पना असेल. आणि खालच्या लेजवरून जर हि उंची ५००-६००-८००-१०००-२००० फुट असेल तर काय कराल? संपूर्ण दिवस फक्त जुमारिंग करण्यातच जाईल. प्रत्येकवेळेस तुम्हाला लेजवर रात्र काढण्यास मिळेलच असे नाही. म्हणून जर तुम्हाला माथ्यावरून त्या लेजवर येण्यास मार्ग उपलब्ध असल्यास रॅपलिंग करून त्या लेजवर पोहोचण्याचा मार्ग अवलंबतात. पण एकदा त्या लेज वर अर्थात आदल्या दिवशी चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर रॅपलिंगचा दोर बाजूला करण्यात येतो आणि चढाईचा दोर कंबरेला बांधण्यात येतो, त्यामुळे वरून बिले देण्याचा प्रश्नच येत नाही. वरून बिले देऊन प्रस्तरारोहण करण्याचा आमचा शिरस्ता नाही अर्थात त्याला प्रस्तरारोहण म्हणताच येणार नाही. या चढाई दरम्यान माथ्यावरून जे रॅपलिंग करण्यात आलेले आहे, ते चढाई मार्गावरून नाही तर चढाई मार्गापासून जवळपास ३०० फुट दूर आहे.

हे असे वरून बिले देऊन प्रस्तरारोहण करणारी जमात सध्याच्या जमान्यात उदयास आलेली आहे, NIM वगैरे प्रशिक्षण संस्थातून येणारी मंडळी यात जमा होतात. ते फक्त वरून बिले देत नाहीत तर वरून रॅपलिंग करत खाली येताना संपूर्ण मार्ग आधीच नजरेखालून घालताना कुठे-कुठे anchor करायचे आहेत तिथे ड्रील मशीनच्या सहाय्याने आधीच बोल्ट ठोकून मोकळे होतात. त्यातच वाटेत overhang आला तर त्याला चुकविण्याचाच प्रयत्न असतो. याला trad climbing असे म्हणतात. आम्हीही trad climbing करतो पण अजूनही बोल्ट मात्र वाटेत चढतांनाच ठोकतो. आम्ही आमचा मार्ग खाली उभे राहूनच ठरवतो. गेल्याच महिन्यात भांबर्डे तेथील वऱ्हाड सुळक्यावर पारंपारिक मार्ग न निवडता गावासमोरील exposure बाजूस सरळसोट (एका सरळ रेषेत) मार्गाने trad climbing पद्धतीने नवीन मार्ग खुला केला. या दीडशे फुटी मार्गावर stations बनवण्यासाठी फक्त ३ बोल्ट वापरले. मागे एकाने ढाकोबाची ४००० फुटी कातळ भिंत चढाई केल्याचा दावा केला, पण तो चढाई मार्ग एव्हढा zigzag होता कि विचारता सोय नाही आणि anchors ही रॅपलिंग करून आधीच ठोकलेले होते. जवळपास हजारभर फुट traverse मारून मार्गही बदललेला होता.

याचीच पुढची पायरी म्हणजे पुण्यातील एक संस्था SCI (Safe Climbing Initiative) प्रत्येक ३-४ फुटांवर बोल्ट ठोकते अगदी जिथे free climbing शक्य आहे तिथेही. म्हणजे हे अस झालं, गाईड समोर ठेऊन परीक्षा द्या.

टिप:-
उत्तरामध्ये उपहास वगैरे नाही. काही ठिकाणी भाषा उद्दाम वाटत असेल पण मी फक्त शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण विचारलेल्या शंका रास्तच आहेत आणि मला आवडल्याही कारण मिपावर एव्हढ्या बारकाईने वाचणारे वाचक आहेत याचा खूप आनंद झाला. आम्ही निवडलेला मार्ग अवघड असतो आणि काही ठिकाणी आम्ही जास्तीची जोखीम सुद्धा घेतो, कारण हा खेळच जोखमीचा आहे. हा आमचा दृष्टीकोन या खेळाकडे पाहण्याचा.

सुधीर कांदळकर's picture

7 May 2015 - 7:02 am | सुधीर कांदळकर

लेखमाला आवडली. मोहिमेतला थरार लेखनात छान उतरला आहे.

वरील प्रतिसादातले १ ते ४ मुद्दे पटले. बूट आणि सुरक्षिततेच्या उपायाबाबत तडजोडी नसाव्यातच. ढिसाळ व्यवस्थापनामुळे अडचणी वाढल्या. २१ दिवसांच्या मोहिमेसाठी सदस्याने फक्त १५ दिवसांची रजा घेणे पटत नाही. आणि तसे होते तर त्याचे जाणे आकस्मिक नव्हते तर पूर्वनियोजितच होते. अशा कठीण मोहिमेसाठी किमान चारपाचजण राखीव खेळाडू म्हणून सामील करून घ्यायला हवे होते.

अर्थात हे बोलणे वा लिहिणे सोपे आहे. सवंगडी गळतात आणि गळपटतात हेही खरे आहे. तरी मोहीमवीरांना सलाम आणि अभिनंदन.

सतीश कुडतरकर's picture

9 May 2015 - 1:14 pm | सतीश कुडतरकर

आमचा चढाई मार्ग हा खालूनच ठरवला जातो, प्रत्यक्षात हात घातल्यावर तिथे काय वाढून ठेवलंय हे चढाई दरम्यानच जाणवते. मार्गाच्या अवघडपणावर दिवसांचे गणित अवलंबून आहे. २०१२ मध्ये सिद्धगडाची कातळ भिंत सर केली, त्यासाठी १५ दिवसांची तजवीज करण्यात आली, पण प्रत्यक्षात ८ दिवसच लागले. २०११ मध्ये माहुली गडावरील फक्त ३५० फुटी रंगभूत सुळक्यावर नवीन मार्गाने चढाई करण्यासाठी १० दिवस लागले. त्याचा वृत्तांत आहेच मिपावर. http://www.misalpav.com/node/30433

एव्हढ्या वर्षांच्या अनुभावावरून सांगतो, एखाद्या मोहिमेला प्रत्यक्षात on filed ८ पेक्षा जास्त सवंगडी गोळा झाले तर आम्ही अक्षरशः दिवाळी साजरी करू. :-) प्रत्येकाची सुट्टी एकाच वेळेस जमून येईल हि शाश्वती नसते.

बाकी आपल्या शंकाचे निरसन वरील प्रतिसादातून होईल अशी अपेक्षा! :-)