शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
17 Jun 2014 - 3:33 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी!
जमिनीचा नकाशा
जमिनीचा नकाशा

मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

जमिनीसंबंधित तथ्ये:

  1. जमिनीचा आकार सुमारे १२ एकर आहे. (नकाशात दाखविल्याप्रमाणे निळ्या रेषेची चतुःसीमा)
  2. गावापासून ही जमीन एक- दीड किमी अंतरावर आहे.
  3. मुख्य रस्त्यापासून जमीन २५० फूट अंतरावर आहे. (लाल रेषा) सध्या या शेतात जाण्याचा तोच मार्ग आहे.
  4. या भागातील जमिनीचा उपयोग सध्या शेतीसाठी होत असून नजीकच्या भविष्यात (५-१० वर्षांत) येथे घरबांधणी सुरु होईल कारण गावात दुसरीकडे फारशी जमीन उपलब्ध नाही.
  5. इतके दिवस आजूबाजूचे जुने शेतमालक इ.शी असलेल्या पूर्वापार संबंधांमुळे शेतात जाण्यासाठी अटकाव नव्हता. पण आता शेताच्या दोन बाजूच्या जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. नवीन शेतमालकांपैकी एकाने (डाव्या बाजूचा शेजारी) आपल्या शेताभोवती काटेरी कुंपण घातले आहे आणि दुसऱ्याने (माझे शेत आणि मुख्य रस्त्यादरम्यानचा) घालण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या शेतात जाण्याचा मार्ग या दोघांच्या सामायिक धुऱ्यावरून जातो; तो बहुधा लवकरच बंद होईल.
  6. सदर जमिनीवरून (नारिंगी रेषा) ३० वर्षांपूर्वी मुख्य रस्ता जात होता, नंतर शासनाने तो रस्ता बदलून (पिवळी रेषा इथे) नेला. रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी ती जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले.

मुख्य प्रश्न:

  1. मला शेतात जाणे-येणे सुरळीत चालू ठेवण्यासाठी तातडीने काय करता येईल?
  2. वाटणी, विक्री इत्यादिंमुळे तुकडे पडलेल्या आणि मुख्य रस्त्यांपासून दूर असलेल्या शेतात; दरम्यानच्या शेतांमधून बैलगाडी, ट्रक्टर, ट्रक, टेम्पो, गुरेढोरे इत्यादींना जाण्यासाठी मार्ग काढून देण्याची शासनाची जबाबदारी आहे का?
  3. या सर्व प्रकरणातील संबंधित कायदेशीर बाबी कोणत्या?

इतर प्रश्न:

  1. रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले. अश्या रीतीने शेतकऱ्यांनी काबीज केलेली जमीन परत ताब्यात घेण्याचा शासनाला अधिकार आहे का?
  2. तो अधिकार शासनाने बजावावा (म्हणजे माझ्या शेतीला जाण्यासाठी हमरस्ताच मिळेल!) यासाठी काय करता येईल?

प्रतिक्रियांसाठी आगाऊ धन्यवाद.

प्रतिक्रिया

बाबा पाटील's picture

17 Jun 2014 - 6:54 pm | बाबा पाटील

समोपचाराने प्रश्न सुटेल असे पहावे अथवा रस्त्याची जागा सदर जागामालकाकडुन खरेदी करावी जर दोन्ही गोष्टी होत नसतील तर त्वरित सर्कल व तहसिलदार यांच्याकडे अपिल करुन लवकारात लवकर मा.प्रांत यांच्याकडे सुनावनीस आणावे.तसेच कोर्टातुन त्यांना कुंपन घालण्यास स्टे ऑर्डर आणावी. व सालोसाल सुनावनीचे चर्‍हाट चालु ठेवावे.

बहिरुपी's picture

18 Jun 2014 - 1:43 pm | बहिरुपी

शक्यतो सदर जागा विकत घेणे हाच सर्वात योग्य उपाय. कोर्ट कचेरीत वेळ आणि पैसा, दोन्हिचा अपव्यय होईल.

एसमाळी's picture

17 Jun 2014 - 8:25 pm | एसमाळी

कायदे विसरुन जा.कोर्टकचेरीच्या नादी लागलात तर दोन पीढ्या खर्ची पडतील पण हाती काही लागणार नाही.बाहुबल वापरा किंवा समोपचारानें घ्या.

प्रसाद गोडबोले's picture

18 Jun 2014 - 2:01 pm | प्रसाद गोडबोले

अनुमोदन !

बाबा पाटील's picture

18 Jun 2014 - 7:24 pm | बाबा पाटील

आजकाल बाहुबल वापरण इतक सोप्प रहिल नाही.त्यात समोरचा जर उच्च वर्णिय नसेल तर बाहुबलाचा विचारही करु नका.कुठल्या कुठल्या केसेस पडतील याचा नेम नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.शेतजमिनिकरिता वहिवाट देणे कायद्याने बंधनकारक आहे.

हाडक्या's picture

18 Jun 2014 - 9:53 pm | हाडक्या

+१

प्रभाकर पेठकर's picture

19 Jun 2014 - 12:12 pm | प्रभाकर पेठकर

+१ सहमत आहे.

चित्रगुप्त's picture

17 Jun 2014 - 9:14 pm | चित्रगुप्त

वकिलाचा सल्ला घेतला का? नसेल तर शेतजमीनीसंबंधित विशेषज्ञ अश्या एका वकिलाचा (हे वकील इंदौर, म.प्र. मधे आहेत) संपर्क क्र. देऊ शकतो.

आनन्दा's picture

18 Jun 2014 - 12:49 pm | आनन्दा

अप्रोच रोड देणे कायद्याने बंधनकारक आहे. तेव्हा आपण कोर्टात नक्कीच जाऊ शकता. पण सामोपचाराने विषय मिटला तर बरे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jun 2014 - 1:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही स्थानिक असाल तर सामोपचार किंवा बाहुबळ दोहोंनी मार्ग काढता येइल.थोडे दिवस रजा घेउन गावी गेल्याने असले प्रश्न सुटत नाहीत.

शेतजमीन असेल तर सातबार्‍यावर कोणाचे नाव आहे? नाही म्हणजे आजकाल तलाठी महाराज काय करतील नेम नाही...पैसे खाउन जमिनी गायब करणारे(म्हणजे नकाशात)बघितलेत..आणि मयत मालकाच्या जागी दुसर्‍याला उभे करुन विकणारे महान पण पाहीलेत
लढाईला शुभेच्छा

वामन देशमुख's picture

19 Jun 2014 - 12:03 pm | वामन देशमुख

सर्व प्रतीसादकांचे मनापासून आभार. बरीचशी माहिती मिळाली. बहुतेक जणांनी सांगितल्याप्रमाणे तहसीलदाराला अर्ज दिला आहे.

अप्रोच रस्त्याची जागा विकत घेणे हा पर्याय आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तसे, सर्वच शेजाऱ्यांशी माझे चांगलेच संबंध आहेत पण सख्खेशेजारी हे "सहजशत्रू" असतात असं चाणक्याने म्हटलंय!

मी विचारलेल्या इतर प्रश्नांकडेही जाणकारांनी पहावं ही अपेक्षा आहे. "रस्ता बंद पडल्याने शेतकऱ्यांनी जमीन नांगरून काबीज केली आणि आपापले जमिनक्षेत्र वाढवून घेतले" यात आम्हीही आलो आणि अंदाजे पाऊन एकर जमीन वाढवून घेतली.

ही जागा शासनाने परत ताब्यात घ्यावी यासाठी काय करता येईल?

अजूनही माहितीपूर्ण प्रतिसादांच्या प्रतीक्षेत आहे.

ब़जरबट्टू's picture

19 Jun 2014 - 4:36 pm | ब़जरबट्टू

जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

ब़जरबट्टू's picture

19 Jun 2014 - 4:38 pm | ब़जरबट्टू

जर तुमच्या शेतापुढील जागा, व ज्यामधून तुम्हाला रस्ता हवा आहे ती जमीन, ही एकाच मालकाची असेल, तर तुम्ही थोड्या जमीनीची अदलाबदल करु शकत नाही का ? म्हणजे, रस्त्यासाठी लागते, तेव्हढी जमीन तुम्ही पुढच्याला द्या, व रस्ता मिळवा... तसेही वर सांगीतल्याप्रमाणे तुम्हाला रस्ता मिळायलाच हवा, पण हे त्यातल्यात्यात पैसे ने लावता शेतीत थोडी अदलाबदल करुन करता येइल...

प्यारे१'s picture

19 Jun 2014 - 7:18 pm | प्यारे१

>>>>अदलाबदल

यवडं सोप्पंय व्हय त्ये!
मग शेजार्‍याचा काय फायदा? जेव्हा समोरचा असा अडचणीत आलेला दिसतो तेव्हाच तर लोक जास्त अडवणूक करतात.
माझ्या माहितीत, वरच्या केससारखीच अ‍ॅप्रोच रोड साठी ५ गुंठे जागा घ्यायचा विषय झाला. त्यातली रस्तारुंदीकरणात बरीचशी जातेय. जास्तीत जास्त १-१.५ गुंठा उरतेय.
तरीही मालक घ्यायची तर सगळी घ्या नाहीतर सोडा त्यातसुद्धा घ्यायच्या जागेचा दर वाढीव.....

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Jun 2014 - 1:01 pm | माम्लेदारचा पन्खा

कायदेविषयक सल्लागाराकडे ह्या कायद्याविषयी विचारा . तुमच्या शेतापर्यंत पोचण्यासाठी रस्ता मिळवणे ह्या कायद्यामुळे जमेल. तुमच्या स्थानिक दिवाणी कोर्टाकडून दाव्याद्वारे तुम्हाला ही परवानगी मिळवता येईल

bela's picture

22 Jun 2014 - 7:08 pm | bela
143.Right of way over boundaries. (1)The Tahsildar may inquire into and decide claims by persons holding land in a survey number to a right of way over the boundaries of other survey numbers. (2)In deciding such claims, the Tahsildar shall have regard to the needs of cultivators for reasonable access to their field. वर नमुद तरतुदिनुसार तुम्ही तहसिलदारान्कडे अर्ज करु शकता किन्वा कोर्ट्कडे मनाइ हुकुम मागु शकता जाण्यासाठी मार्ग हा जमिनीशी निगडित सुखाधिकर आहे तो ब्न्द करता येनार नाही.त्यामुळे एकतर समोपचाराने केस सोडवा अन्यथा कायदेशिर मार्गाचा वापर करा.हे योग्य ठरेल.
नानासाहेब नेफळे's picture

22 Jun 2014 - 8:08 pm | नानासाहेब नेफळे

प्रांताकडे तक्रार केल्यास सुनावणीनंतर रस्ता मिळेल, तो हक्कच आहे ,पण त्याला किती दिवस लागतील सांगता येणार नाही.
त्याऐवजी सध्याचा वा पर्यायी रस्ता मिळण्यासाठी जागा मालकाशी बोलुन घ्यावे .
तलाठी अनौपचारीक मध्यस्थी करतात ,तलाठ्याचे हात ओले करावेत .
शेजारच्याकडुन रस्ता लिहून घ्यावा व त्याबदल्यात आपली थोडी जमीन त्याला कसण्यास द्यावी लागेल, याचे करारपत्र निबंधक कार्यालयात रजिस्टर करावे लागेल.
जर काहीच होत नसेल तर जमीन बाजुच्या शेतकर्यांना अर्धेलीने द्यावी, उत्पन चालु राहील.