लालबागच्या राजाचे सेवक मुजोर झाले आहेत का ?

निश's picture
निश in काथ्याकूट
18 Sep 2013 - 4:28 pm
गाभा: 

सध्या टिव्ही वर लालबागच्या राजाच्या सेवकांच्या मुजोरपणाचे चे चित्र दाखवताहेत ते खरच माणुसकीला काळिमा फासणारे आहे. ज्या पध्दतीने महिलांशी ते वागत आहेत ते अतिशय चीड आण्णारे आहे. इतका मुजोरपणा त्यांच्यात आला आहे की पोलिसानांही ते वाईट रीतीने वागवत आहेत. ह्या बाबत सरकार फारच बोटचेपे धोरण अवलंबित आहे. हे अजुनच चीड आणणारे आहे. १७ १८ तास देवासाठी रांगे उभे राहुन जर भक्तांच्या वाटेला अवहेलना येणार असेल तर खरच जगात पाप वाढत आहे हेच खर. महिलांना ज्या प्रकारे वाईट वागणुक देण्यात आली ते अतिशय खेदजनक व मनाला क्लेश देणार आहे. लालबागच्या राजाच्या सेवकांचा ज्यांनी हे प्रकार केले आहेत त्यांचा निषेध असो व त्याना जास्तीत जास्त क्षिक्षा मिळो ही लालबागच्या राजा चरणी विनंती. त्याला का विनंती तर सरकार झोपल आहे म्हणुन.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Sep 2013 - 4:35 pm | प्रचेतस

हम्म.
म्हणूनच मी गणेशोत्सवात केवळ घर-हापिस-घर करत असतो. देखावे बघायला जात नै.

विटेकर's picture

18 Sep 2013 - 4:38 pm | विटेकर

पन यात केवळ मंडळाचा दोष आहे का ?
ही अरेरावी करण्याची संधी त्यांना कोणी दिली?
नवस बोलून आणि नंतर फेडायला जणार्या जन्तेचं काय ? आणि किती बेशिस्त ?

अनिरुद्ध प's picture

19 Sep 2013 - 11:42 am | अनिरुद्ध प

लालबागच्या राजाची नवस फेडणार्याची रान्ग नेहमीच वेगळी असते,हा प्रश्ण VIP आणि ओळखीने मध्ये घुसणार्या मुळे होतो,तसेच लोकान्ची मानसिकता सुद्धा याला कारणीभुत आहे,कारण लालबागच्या राजाचे सतत LIVE दर्शन रान्गेत उभे अस्णार्याना होत असते.

गेली कित्येक वर्षे हे असेच चालू असेल.. आता एकदम सगळ्या वाहिन्यांना अचानक हा शोध कसा काय लागला?

ही खरी ग्यानबाची मेख आहे.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2013 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाणाने मला व्हिडिओ आणि एक चांगला संदेश फॉरवर्ड केलाय. सवडीने डकवतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2013 - 6:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या लालबागच्या राजाचा एक व्हिडीओ फेसबुक वर फिरतोय ...
तिथे येणाऱ्या भाविकांना म्हणे मंडळाच्या लोकांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळतेय ... व्हिडीओ मध्ये जे दिसतंय ते निश्चितच त्रासदायक आहे .. चुकीचं आहे .. पण यात नवीन काहीच नाही ..
वर्षानुवर्ष शिर्डीला ... पंढरपूरला .. हरिद्वारला हेच होतंय की ... साईबाबांच्या समाधीवर डोकं आपटणारे सो कॉल्ड सेवेकरी असू देत ... विठ्ठलाच्या गळ्यातल्या तुळशीमाळा भक्तांच्या गळ्यात घालून जबरदस्तीने हजारो रुपये उकळणारे बडवे असू देत ... नाहीतर हरिद्वारला भक्तांच्या डोक्यावर बसून गंगा पूजन करून घेणारे आणि ब्राम्हण भोजनाच्या नावाखाली पैसे कमावणारे भट असू देत ... हे सगळे या लालबागच्या कार्यकर्त्यांचेच 'कर्मबंधु' आहेत ... आणि तसं ही श्रद्धेचा बाजार भरवणाऱ्या या माणसांकडून तुम्हाला याहून वेगळं काय अपेक्षित आहे ... ? मुळात ही लोकं चेकाळलीयत याला आपणच कारणीभूत आहोत ... आपण देवाला मखरातून काढून शो केस मध्ये बसवलंय ... लालबागच्या राजाच्या रांगेत दोन दिवस उभं राहिलो ... असं सांगणं हे आजकाल स्टेटस सिम्बॉल बनलंय. का ... ? घरी बसून लालबागच्या राजाच्या फोटोला चांगल्या मनानं नमस्कार केला तर तो पावत नाही का ... ? त्याच्या रांगेत दोन दिवस वाया घालवण्यापेक्षा ते एखाद्या विधायक कार्यात खर्च केले तर राजा नाही म्हणतो का ? राजाच्या पायावर लाखोंचं सोनं वाहण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या एनजीओला दिले तर राजाला जास्त आवडणार नाही का ? नक्कीच आवडेल ... ! पण आम्हाला ते करायचं नाहीय ... ज्याने चंद्र सूर्य घडवले त्याला अगरबत्तीने ओवाळण्यात धन्यता मानणारे क्षुद्र जीव आपण .. आपल्याला अजूनही सोन्या चांदीच्या नैवेद्याने देव प्रसन्न होतो असं वाटतं, हा निव्वळ मूर्खपणा आहे .. अहो .. आपला राजा इतका दयाळू आहे की त्याने टीव्ही ... इंटरनेट अशा कितीतरी माध्यमातून तुम्हारा दर्शन द्यायची सोय केलीय, तुमचा वेळ ... तुमचे श्रम वाचवलेयत .. आणि तरीही आमची तिथे जाऊन गर्दी करण्याची हौस जात नाही ... ! आता कुणी तरी मला नक्की 'स्थान महात्म्या'च्या गोष्टी सांगेल ... पण ज्या स्थानी भक्तीच्या नावाखाली पैशाचं स्तोम माजलंय ... त्या ठिकाणी देव राहील का हो ... ? माझा दर्शनाला जाण्याला आक्षेप नाही .. पण तिथे गर्दी करून आपण देवाचं नाही ... त्याच्या आजूबाजूंच्या अध्यात्मिक व्यापाऱ्यांचं महत्व वाढवतोय .. ही साधी गोष्ट आपल्याला कळायला हवी ... आम्ही मारे एकीकडे 'मन चंगा तो कटौती में गंगा' आणि 'कांदा मुळा भाजी ... अवघी विठाई माझी' म्हणत कणाकणांत परमेश्वर पाहायच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे ही अशी आंधळी भक्ती जतन करतो ... आपल्याला अधिकारच नाही तक्रार करण्याचा ... कारण ही सगळी आपणच लावलेली विषवल्ली आहे ... एक वर्ष देशामधल्या प्रत्येक लालबागच्या राजाच्या भक्ताने राजाचा फोटो घरात लावा आणि दर्शनाला जाणं टाळा ... नाही अख्खं मंडळ सुतासारखं सरळ आलं तर मी नाव बदलेन ... पण असं होणार नाही ... कारण भक्तीच्या नावाखाली माती खायची आपल्याला सवय झालीय ... आणि यात आपण देवाला बदनाम करतोय ... त्याला आपल्यापासून लांब करतोय .. याची आम्हाला जाणीव ही नाहीय ..

-by Shirish Latkar (दुवा फेसबूकच्या पानावर जातो)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2013 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2013 - 9:28 pm | प्रकाश घाटपांडे

आयबीएन लोकमत वर राजीव खांडेकर यांनी अतिशय योग्य भुमिका मांडली होती. लोकांनाही धक्काबुक्की सहन करत दर्शन घेतल कि कृतकृत्य झाल्यासारख वाटत. लोकांनी जाउ नये ना त्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला. घरच्या गणपतीचे दर्शन घेतले तरी बास झाले. विठ्ठलाचे वारकरी तर कळसाकडे पाहून नमस्कार करतात व दर्शन झाल्याचे मानतात. शेवटी भाव तोचि देव!

वेल्लाभट's picture

19 Sep 2013 - 9:12 am | वेल्लाभट

+१ भाव तोचि देव!

रॉजरमूर's picture

19 Sep 2013 - 2:49 am | रॉजरमूर

पंढरपूरच्या बडव्या सारखाच माज आलेला दिसतोय या कार्यकर्त्यांना

पोलिसांना मारण्या पर्यंत मजल गेलीय यांची .

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 2:52 am | प्रभाकर पेठकर

हिन्दू धर्मात, देव चराचरात भरलेला आहे, प्रत्येक माणसात देवाचा अंश असतो असे मानतात. मग मुद्दामहून लालबागच्या किंवा गणेश आळीच्या कींवा जीएसबी गणपतीला जाण्याचे प्रयोजन काय? जे जे तिथे जातात गर्दी करतात ते ते त्यात्या मंडळाच्या गणेश मुर्तीचे महत्व अवास्तव वाढवतात आणि कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाला खतपाणी घालत असतात. मग त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे का? त्यांनी तिथे जाणे बंद करावे. मंडळांची कमाई कमी झाली की सर्वजणं (कार्यकर्ते, राजकारणी, विश्वस्त) आपसूक दूर जातील आणि गणपती मोकळा श्वास घेऊ शकेल.

जातात ते गर्दी करतात त्यांना असे बोलण्याचा हक्क काय आहे हा प्रश्न हुकलेला आहे. म्हणजे लालबागच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काहीच नाही? हे म्हंजे बलात्कार होऊ नये म्हणून घराबाहेर पडू नये म्हणण्यापैकीच झाले.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2013 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

अशा गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकाला सौजन्याने वागवणे प्रॅक्टिकली शक्य नसते. भक्तांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी जर काही कठोर उपाययोजना करावी लागली तर त्याला अरेरावी मुजोरपणा म्हणणे हे मला माध्यम चलाखीचे वाटते. बलात्कार होतात म्हणुन बाहेरच पडू नये हे टोकाचे उदाहरण झाले. गुन्हे होतात म्हणुन काळजी घेणे हे तारतम्याने वागणे आहे. गुन्हेच होणार नाहीत अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे असे कुणालाच शक्य झाले नाही. तो आदर्शवाद आहे.
भक्ताने कुठलीही शिस्त बाळगायची नाही आन त्याला काबूत आणणार्‍याला मात्र आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे. भक्तांच्या बेशिस्तीविषयी माध्यमांनी मौन बाळगले आहे.भक्तांनीही गर्दी केली नाही तर व्यवस्थापन सोपे जाईल. प्रत्येक भक्ताच्या दर्शनाला ५ सेकंद द्यायचे जरी ठरवेल तरी हजारोंच्या/ लाखोंच्या गर्दीसाठी करा हिशोब.
खर तर हे असले प्रकार म्हणजे सामूहिक वेडाचार आहेत पण त्या बद्द्दल न बोललेल बर उगाच लोकांच्या भावना दुखावायच्या. श्रद्धेच्या बाजाराची गणित काही वेगळीच असतात. असो

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 9:54 am | प्रभाकर पेठकर

घाटपांडे साहेब,

भक्ताने कुठलीही शिस्त बाळगायची नाही आन त्याला काबूत आणणार्‍याला मात्र आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे.

भक्तांच्या बेशिस्तीवरही ताशेरे ओढावेत. त्यांनाही शिस्त लावण्याचे प्रयत्न करावेत.

प्रत्येकाला ५ सेकंद दिले तर जे आज लोकांना १५-२० तास रांगेत उभे राहून दर्शन मिळते आहे त्याला ३ दिवस लागतील. त्यामुळे हळू हळू गर्दी कमी होईल आणि सर्व आटोक्यात येईल. पण मंडळाला गर्दी कमी होऊन चालणार नसतं. उलट गर्दी वाढती राहीली पाहिजे. आपल्या दुकानांत सर्वात जास्त गिर्‍हाईकं आली पाहिजेत. ही भावना आहे. श्रद्धाळूंच्या श्रद्धेविषयी त्यांना कांही घेणे देणे नाही. आपल्या मंडळाची जाहिरात जोरात झाली पाहीजे. ह्या वर्षी किती भक्तांनी भेट दिली? किती रोकड, किती सोनं देणगी स्वरुपात आलं वगैरे वगैरेची दूरचित्रवाणीवर 'बातमी' देण्याची गरज काय? लोकांची छाती त्या आकड्यांनीच दडपून जावी. आपल्या मंडळाचा गणपती किती 'फेमस' आहे हे दाखविणं हा उद्देश असतो. त्यामुळे हा 'नवसाला पावणारा' आहे हे सिद्ध करणं सोपं जातं. ज्यायोगे अजून कांही लाख मूर्ख पुढच्या वर्षी रांगा लावतील आणि अजून जास्त कोटी माया जमा होईल इतका साधा सरळ हिशोब असतो. भक्ताच्या डोळ्यांवर श्रद्धेचं झापड असल्याने त्याला हे कांही दिसत नाही, सांगितले तर पटत नाही, पटलं तरी मी 'लालबागच्या राजाच्या दरबारातील वारी एकही वर्ष चुकविलेली नाही' शेखी मिरवता यावी म्हणूनही जाणारे कांही महाभाग असतातच.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2013 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे

अगदी सहमत आहे
हा श्रद्धेचा बाजार पाहिला कि हताश व्हायला होत. तीर्थे धोंडा पाणी| देव रोकडा सज्जनी असे म्हणणारे तुकाराम महाराजांना एकदा संतत्व देउन टाकले की आपण तीर्थक्षेत्री घाण करायला मोकळे.
बघा बघा कार्यकर्ते कसे जनशेवा करतात. कारण जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे त्यांना पटलेले आहे ;-)
श्रद्धा अंधश्रद्धेच्या बाजारात विवेकाचा विचार रुजायला अजून शेकडो वर्षे लागतील. प्रबोधनाचे हत्यार तोकडे असले तरी त्याला पर्याय नाही

मुर्तीसमोर भक्त दर्शन घ्यायला येतात तिकडे कन्व्हेअर बेल्ट (सरकता पट्टा) व्यवस्थित टायमिंग/स्पीड सेट करुन ठेवावा अशी आमची सुचना.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 9:34 am | प्रभाकर पेठकर

कार्यकर्त्यांचं महत्त्व हे होणार्‍या गर्दीमुळे त्या अनुषंगे मिळणार्‍या संपत्तीमुळे वाढते आहे. सत्ता आणि संपत्तीतून 'माज' जन्माला आला आहे.

कार्यकर्त्यांची मुजोरी हे निमित्त आहे. पण मुळात 'देव भावाचा भुकेला आहे' आणि हा भाव घरबसल्याही व्यक्त होतो. त्यासाठी लालबागला, शिर्डीला, तिरुपतीला, पंढरपूरला जाण्याची गरज नाही. तिथे जाऊन फक्त ह्या देवांच्या दलालांचे महत्त्व आपणच वाढवत आहोत (त्याचे दु:षपरिणाम दिसत असून). हा विचार समाजमनात रुजविणे हा प्रयत्न आहे.
भक्ती भावनेला माझा विरोध नाही. कुठल्याही देवळात जा पण अमुक एक 'राजा', तमूक 'नवसाला पावणारा' वगैरे बिरुदं (जी तिथल्या कार्यकर्त्यांनी व्यापाराचा एक भाग म्हणून दिली आहेत) मिरविणारे देव टाळा. सगळेच देव नवसाला पावतात किंवा कुठलाच पावत नाही. पण अमुक एक नवसाला पावतो आणि इतर देवांकडे ती 'पावर' नाही हा वेडेपणाचा विचार सोडून दिला पाहिजे.

तुमच्या भावनांचा गैरफायदा इतरांना घेऊ देऊ नका. बलात्कार होतो म्हणून घराबाहेर पडू नका असा वेडाविचार कोणी पसरविणार नाही परंतु, 'असुरक्षित ठिकाणी जाऊ नका', 'एकट्याने जाऊ नका', 'प्रक्षोभना वाढविणारे अंग प्रदर्शन करू नका' वगैरे उपदेश गैर नसावा. बलात्कार करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. अगदी मृत्यूदंडाची कारवाई व्हावी ह्या मताचा मी आहे पण त्याच बरोबर आपणही आपली जबाबदारी विसरून चालणार नाही.

घराबाहेर चालताना आपण पायात चपला घालतो. रस्त्यात कुठे काटा पायात शिरु नये म्हणून. त्याही पुढे कुठे विंचू, साप नाही नं ह्याची दक्षता घेतो. कारण त्यांच्या दंशाने आपल्यालाच वेदना होणार असतात.
हे बलात्कार करणारे किंवा आजच्या विषयातील मुजोर कार्यकर्ते हे समाजातील साप, विंचू अशी श्वापदं आहेत त्यांच्या पासून आपण काळजी घेतली नाही तर आपल्यासारखे मूर्ख कोणी नाही.

मुजोर कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे पण कार्यकर्ते मुजोर होणार नाहीत ह्याचीच काळजी घेतली तर न रहेगा बांस न रहेगी बांसुरी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2013 - 8:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'प्रक्षोभना वाढविणारे अंग प्रदर्शन करू नका' वगैरे उपदेश गैर नसावा.

खरंय. बलात्कार होतात, बायकांवर इतर अनेक अन्याय, अत्याचार होतात ही त्या/आम्हां बायकांचीच चूक आहे. हे समजून सांगितल्याबद्दल मी कल्की कोचलीन आणि तिच्या सहकलाकाराच्या आणि क्लिपच्या दिग्दर्शकाची आजन्म ऋणी असेन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Sep 2013 - 3:53 am | निनाद मुक्काम प...

आपल्याकडे लोकांना भारतात शिक्षण व्यवस्थेत सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे किंवा अश्यावेळी दिल्या गेलेल्या सूचना कितीही शुल्लक वाटल्या तरी त्या पाळणे महत्त्वाचे वाटत नाही. स्वतः पुरता विचार करण्याची वृत्ती असते.
आता लालबाग ज्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक दिवसभर रांगा लावतात तेव्हा त्यांना लवकर दर्शन घ्या ,इतरांना सुद्धा घ्यायचे आहे अशी सूचना नक्कीच कार्यकर्ते देत असतील. तशी सूचना देणे गैर नाही ,मात्र आंधळ्या व डोळस भक्ती ने जेव्हा भक्त मूर्ती पाशी येतो, तेव्हा वातावरणाचा परिणाम म्हणून का होईना त्याला तेथे डोके ठेवून काहीकाळ थांबावेसे वाटते. अश्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे सरकवले नाही तर प्रत्येक डोळे मिटून काही क्षण काही मिनिटे तिथेच थांबला तर बाहेर रांगेतील लोकांचा विचार कोण करणार व अश्यावेळी ती रांग जर आवरेना शी झाली तर गर्दीत चेंगराचेंगरी होऊ शकते ,
तेव्हा मुळात नुसता नमस्कार करून लगेच निग्रहाने निघणे जर प्रत्येक भक्ताने कटाक्षाने केले तर अशी वेळ येणार नाही ,
असे प्रकार तिरुपतीला सुद्धा होतात . तेव्हा भारतीय समाजाला शिस्तीचे धडे लहानपणापासून दिले तर अशी वेळ येणार नाही ,
आज परदेशात अजूनही कधी कधी रस्त्यावर लाल सिग्नल असेल वर तेव्हा वाहन जात नसेल किंवा खूप लांब असेल तरीही गोरे तो हिरवा होण्याची वाट पाहतात व आपली लोक तो बिनदिक्कत आधीच चालू लागतात. आणि ह्यात सुरवतीला मी बरेच वेळा असायचो व अधून सुद्धा कधी कधी असा प्रमाद माझ्या हातून घडतो.
आपली शिक्षण व्यवस्थेत मुल्य शिक्षण लहानपणीच मुलांच्या अंगवळणी पाडले पाहिजे. अर्थात ह्यासाठी सर्व भारतीयांना शिक्षणाचा अधिकार असा कायदा येणे गरजेचे आहे.
ह्याच वेळी ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर ह्या काळात प्रचंड ताण येतो , तेव्हा ताण हाताळण्यासाठी त्यांच्यासाठी मंडळाने प्रशिक्षण वर्ग आयोजित केले पाहिजे. मंडळाकडे तेवढा पैसा नक्कीच असतो. वि आय पि लोकांचे लाड बंद केले पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2013 - 7:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याच्या शिक्षणाऐवजी मंदिराच्या ठिकाणाचं महत्त्व कसं आहे, याचं शिक्षण शाळेत देणं सुरु आहे. उदा. सहावीच्या पाठ्यपुस्तकात एक पाठ आहे, 'माझे आदरस्थान : शिर्डी' आता या पाठात तीर्थक्षेत्र शिर्डी महात्म्य वर्णिले आहे. साईबाबांचे भक्त कसे सर्व धर्माचे आहेत आणि ते शिर्डीला कसे गर्दी करतात, आत्मसाक्षात्कार, उदीचे महत्त्व, वगैरे. याच पाठात जर शेवटी शेवटी अशा तीर्थस्थळी गर्दी, शिस्त, स्वच्छता, याचे महत्त्व पटवून दिले तर एक परिणाम मुलांवर होईल. पण, करेल कोण आणि सांगायचे कोणाला असा प्रश्न आहेच.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

19 Sep 2013 - 8:30 am | कवितानागेश

काल मला कुणीतरी सांगितले की दाखवली जाणारी क्लिप फास्ट फॉरवर्ड केलेली आहे. त्यानी मूळ क्लिप पाहिली. त्यात असं काही नाही......

राही's picture

19 Sep 2013 - 9:01 am | राही

कधी कधी वाटते की आपण एक अश्या अवस्थेला येऊन ठेपलो आहोत की "in which no Ideal either grows or blossoms"? (डेकेडेंट सोसाय्टी़ज)
घराबाहेर पडणारे भारतीय लोक हे मौजमजा आणि दंगामस्तीसाठीच जणू बाहेर पडतात. घर म्हणजे जसा काही एक कोंडवाडाच असतो आणि त्यातून थोडा वेळ जरी सुटका मिळाली तरी मिळेल तितका मोकाटपणा करून घ्यायचा असाच सर्वत्र नियम असतो. देवदर्शन असो, तीर्थयात्रा असो, सहल/ट्रेकिंग असो की अंत्ययात्रा असो, सगळीकडे हीच झुंड-गुंडगिरी, मोकाटपणा, उधळलेपणा,बेशिस्त, घुसाघुशी, भांडणे, हाणामार्‍या, गर्दी, गोंगाट, घाण. आपण डेकेडन्स मधून बाहेर निघणारच नाही काय? मारे 'रीसर्जन्ट इंडिया' म्हणवून घेतो स्वतःला, पण प्रत्यक्षात प्रचंड किडलेली, भणंग, लम्पेन माणसे आहोत आपण.
हतबलता वाटते खरी, पण स्वतः आणि कुटुंबाकरता 'नागरी नियमांनुसारच वागायचे' असा नियम केला आहे. तो पाळण्यात थोडीफार शक्ती खर्च होते पण समाधान मिळते, जे रांगा लावून घेतलेल्या देवदर्शनापेक्षा अधिक असते.
"in which no Ideal either grows or blossoms"?

राही's picture

19 Sep 2013 - 9:05 am | राही

शेवटचे इंग्लिश वाक्य चुकून कॉपी-पेस्ट झाले आहे, ते मनातल्या मनात पुसून टाकावे.

दादा कोंडके's picture

19 Sep 2013 - 9:16 am | दादा कोंडके

पण प्रत्यक्षात प्रचंड किडलेली, भणंग, लम्पेन माणसे आहोत आपण.

असले शब्द वापरू नका. शिक्षक आणि प्राध्यापक मंडळींना राग येतो. ;)

काळा पहाड's picture

20 Sep 2013 - 12:40 am | काळा पहाड

रत्यक्षात प्रचंड किडलेली, भणंग, लम्पेन माणसे आहोत आपण

+१. बहुतांश भारतीय लोकांची लायकी गुलामी करण्याचीच आहे.

मालोजीराव's picture

20 Sep 2013 - 12:32 pm | मालोजीराव

बहुतांश भारतीय लोकांची लायकी गुलामी करण्याचीच आहे.

छत्रपतींच्या महाराष्ट्रात कायकाय ऐकावं लागतंय

वेल्लाभट's picture

19 Sep 2013 - 9:17 am | वेल्लाभट

आपणच एखाद्या गोष्टीला प्रमाणाबाहेर मोठं करतो, आणि मग ती गोष्ट आपल्याला पेलत नाही.

त्या क्लिप मधील एकही स्त्री त्या दांडगटास चकार शब्द बोलत नव्हती, अगदी लेडी पोलिस बाई सुद्धा काहीही बोलल्या नाहीत. इतकं आंधळं व्हायचं भक्तीच्या पडद्याने? इथे तो व्हिडियो बघून बघणारे तडतड करत होते पण ज्या बायकांना हाताला धरून, डोक्याला/केसाला धरून ओढाओढ चालू होती, त्यांना काहीच न वाटावं; याचं आश्चर्य वाटतं.

वर अनेकांनी म्हटलंय त्यास मी सहमत आहे. मनात भक्ती आहे ना, मग देव्हा-यातलाही नवसाला पावतो. तो कुठला राजा/महाराजा असावा लागत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

वेल्लाभट साहेब,

एक्दा एका वयस्कर (६०+) बाईने, अशा झोंबाझोंबी करणार्‍या, कार्यकर्त्याच्या तिथल्यातिथेच कानाखाली भडकवली होती. उलट त्या कार्यकर्त्याने त्या वयस्कर बाईवरच हात उचलला. हे पाहिलेल्या एका तरूणाने त्या कार्यकर्त्यास कानाखाली भडकवली लगेच इतर कार्यकर्त्यांनी मिळून त्या तरूणाला मरेमरेस्तोवर लाथाबुक्यांनी तुडविले.

ही घटना तिथे आजूबाजूस राहणार्‍या प्रत्यक्षदर्शी दुसर्‍या एका बाईनेच सांगितलेली आहे.

स्तुत्य आहे ना! त्या बाइंचं कृत्य आणि त्या तरुणाचंही. पुढे जे झालं ते कुठे लोपलं? कुणी उचलून धरला का तो मुद्दा? तिथे कार्यकर्ते जास्त होते की बघी लोकं? कुणाची ताकद जास्त होती?

तिथे उपस्थित मंडळींपैकी बहुतेकांनी हाच विचार केला, की जाउदे आपलं दर्शन तरी नीट होऊदे. कशाला नादी लागा. तो नडला, त्याला तोडला.

हे दुर्दैव आहे.

बघा, आणि हा अपवाद आहे, बरोबर की नाही! मला वाईट आणि आश्चर्य याचंच वाटतंय.

स्तुत्य आहे ना! त्या बाइंचं कृत्य आणि त्या तरुणाचंही. पुढे जे झालं ते कुठे लोपलं? कुणी उचलून धरला का तो मुद्दा? तिथे कार्यकर्ते जास्त होते की बघी लोकं? कुणाची ताकद जास्त होती?

तिथे उपस्थित मंडळींपैकी बहुतेकांनी हाच विचार केला, की जाउदे आपलं दर्शन तरी नीट होऊदे. कशाला नादी लागा. तो नडला, त्याला तोडला.

हे दुर्दैव आहे.

बघा, आणि हा अपवाद आहे, बरोबर की नाही! मला वाईट आणि आश्चर्य याचंच वाटतंय.

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Sep 2013 - 9:28 am | पुण्याचे वटवाघूळ

माझा तर सार्वजनिक गणेशोत्सवास प्रचंड विरोध आहे.रात्रीच्या वेळी चार कुत्री भुंकली तर त्यांचा गळा घोटायची भाषा अनेकदा केली जाते.पण ती बिचारी जनावरे निसर्गाने बनविले त्याप्रमाणे आणि निसर्गाने जितकी बुध्दी दिली त्याप्रमाणे वागतात्.तरीही त्यांचा गळा घोटायची भाषा. इथे तर सार्वजनिक गणेशोत्सवात सारासार विचारशक्ती असलेल्या माणसांकडून १० दिवस यथेच्छा धांगडधिंगा चालू असतो आणि ते सगळे भक्तीच्या नावावर खपविले जाते.जर दहा मिनिटे भुंकणार्‍या कुत्र्यांना ठार मारायची भाषा असते तर मग या गणेशभक्तांनाही तोच न्याय लावायला हवा :(

लोकमान्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वजनिक गणपती बंद व्हायला हवा असा क्लॉज घालायला हवा होता.

काळा पहाड's picture

20 Sep 2013 - 12:48 am | काळा पहाड

+१. सरकारने सगळेच सार्वजनिक सण बंद करावेत. गणपती पासून मोहर्रम पर्यंत. गणपती समोर नाचणार्‍या रिकाम्टेकड्या कार्यकर्त्यांना तर गोळ्या घालायला हव्यात असे माझे मत आहे. निदान पोलिसांची शूटिंगची तरी प्रॅक्टीस होईल.

चौकटराजा's picture

19 Sep 2013 - 9:41 am | चौकटराजा

देव कधी येडा नसतो ना देवाचा एजंट ! उतावीळपणे रांगेत ताटकळत उभा राहाणार असतो खरा येडा ! असे येडे पंढरीत गर्दी करतात , कुंभमेळ्यात येतात मध्यपूर्वेत उगवतात,रोममधे येतात , नागपुरातही अन वानखेडे स्टेडियमवर ही ! मग कधी चिरडून मरण्याची शिक्षा झाली तर बेहत्तर असा ठरावच त्यानी केलेला असतो.

प्रभाकर पेठकर's picture

19 Sep 2013 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

एक दिवस, .....फक्त एक दिवस, सर्व प्रसिद्ध ठिकाणच्या मूर्तींमधून देव प्रत्यक्ष प्रकट व्हावा आणि त्यानेच कार्यकर्त्यांना आणि तथाकथित भक्तांना चार खडे बोल सुनवावेत असे फार फार वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2013 - 11:06 am | प्रकाश घाटपांडे

ते देवालाच बाहेर काढतील. चल परत मुर्तीत असे म्हणतील. तुझे स्थान मुर्तीत बंदिस्त. खबरदार बाहेर येशील तर?

दादा कोंडके's picture

19 Sep 2013 - 11:47 am | दादा कोंडके

तसं झालं तर देवाकडून खडे बोल सुनावून घेण्यासाठी गर्दी अजून वाढेल. कुठलेशे स्वामी भक्तांना अर्वाच्य शिविगाळ करत असत. त्याच्यातून नाही नाही ते अध्यात्मिक गर्भितार्थ लोकं काढत आणि त्याला प्रसाद मानत. अगदी आजच्या काळात देखिल स्वतःच्या आया-बहिणीं-पोरींना लैंगिक शोषणाचे अनेक आरोप असलेल्या बुवा-बाबा यांच्याकडून "अनुग्रह" प्राप्तकरून घेण्यासाठी पाठवणारे भक्त ही कमी नाहीत.

काळा पहाड's picture

20 Sep 2013 - 12:49 am | काळा पहाड

अगदी आजच्या काळात देखिल स्वतःच्या आया-बहिणीं-पोरींना लैंगिक शोषणाचे अनेक आरोप असलेल्या बुवा-बाबा यांच्याकडून "अनुग्रह" प्राप्तकरून घेण्यासाठी पाठवणारे भक्त ही कमी नाहीत.

हिटलर अगदीच चुकीचा नव्हता असे माझे मत आहे. अशांना गॅस चेंबर मधे पाठवायला काय हरकत आहे?

दादा कोंडके's picture

20 Sep 2013 - 10:38 am | दादा कोंडके

ज्यु हत्याकांड वंशद्वेशातून झालंय.
पण भापो.

अनिरुद्ध प's picture

20 Sep 2013 - 12:41 pm | अनिरुद्ध प

दादान्ची भाषा एकदम मवाळ झाली? चान्गली गोष्ट आहे.

तिमा's picture

20 Sep 2013 - 8:13 pm | तिमा

एक दिवस, .....फक्त एक दिवस, सर्व प्रसिद्ध ठिकाणच्या मूर्तींमधून देव प्रत्यक्ष प्रकट व्हावा आणि त्यानेच कार्यकर्त्यांना आणि तथाकथित भक्तांना चार खडे बोल सुनवावेत असे फार फार वाटते.

एक वर्ष,..... फक्त एकच वर्ष, सर्व गणेशमूर्तींतून देव प्रत्यक्ष प्रकट व्हावा आणि त्यानेच कार्यकर्त्यांचे आणि तथाकथित भक्तांचे विसर्जन करुन स्वतः परत यावे, असे फार फार वाटते.

मूर्तींमधून देव प्रत्यक्ष प्रकट व्हावा

अहो, आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार? मुळात ही सगळी देवदैवते वगैरे निव्वळ कल्पपनेचा पसारा. मग प्रत्यक्षात येण्याचा प्रश्नच कुठे येतो?
वाचा:
http://www.misalpav.com/node/23698

चित्रगुप्त साहेब, मुळात ही सगळी देवदैवते वगैरे निव्वळ कल्पनेचा पसारा असतील, तर ह्याच कल्पनेच्या पसार्‍यावर करोडो, अब्जो लोक आपल रोजगार करताहेत. आप आपल्या कुटुंबांच पालन पोषण करत आहेत. जर हा देव नावाचा पसारा बाद केला तर मग ह्या करोडो लोकांच भवितव्य काय. जर हा पसाराच जर त्याना जगवत आहे तर मग देव नाही आहे असा विचार हा त्या कल्पनेच्या पसार्‍याने केलेल्या उपकाराची पायमल्ली ठरते.

बाळ सप्रे's picture

30 Sep 2013 - 2:10 pm | बाळ सप्रे

तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय, चोरी, दरोडेखोरी यावर देखिल बरीच कुटुंबे चालतात !!!! हे सर्वदेखिल तसेच चालू द्यावे काय??
यात देव कल्पनेची यासगळयाशी तुलना करण्याचा हेतु नसून .. रोजगार आहे म्हणून हे चालू द्यावे या युक्तिवादावर हा प्रश्न आहे..

मुळात ते चालु आहे ही वस्तुस्तिथी आहे. मुळात तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय, चोरी, दरोडेखोरी हे सरकार किंवा राजाला राज्यकारभार करताना आलेल्या अपयशाच प्रतिक आहे.ह्यातल्या प्रत्येकाशी माणसाच्या वासनेचा संबंध आहे व त्यातुन वेश्या चोरी दरोडेखोर हे माणसाने माणसावर केलेल्या अन्यायाचे प्रतिक आहे. देवा बाबतीतही तेच. माणसाने देव ह्या अतिशय चांगल्या संकल्पनेचा स्वताच्या तुंबड्या भरुन घेण्यासाठी केलेला उपयोग आहे. प्रत्येक वाईट गोष्टिच्या मुळाशी माणसाची अप्पल पोटेपणाची भावना आहे.

तंबाखू, दारु, वेश्याव्यवसाय, चोरी, दरोडेखोरी ह्या माणसाने स्वताच्या वासनांधतेतुन माणसांवर लादलेल्या गोष्टी आहे. ह्यांचा देव ह्या कल्पनेशी काहीही संबंध नाही. मुळात देव ही संकल्पना चांगल्या सज्जन लोकांच संरक्षण करण ह्यातुन झाला आहे. पण त्याचाच उपयोग माणसाने त्याची वासना क्षमवण्यासाठी केला व करत असलेल्या गोष्टीत अपयश यायला लागल की देव ह्या कल्पनेवर खापर फोडायला सुरुवात केली. मुळात सगळ्या चागल्या व वाईट गोष्टींच्या मुळाशी माणुसच आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तो सूदीन.

चौकटराजा's picture

30 Sep 2013 - 5:03 pm | चौकटराजा

निश भौ, देवाच्या मूर्तीसाठी माती, दगड, रंग खर्च करणे, फुले वहाणे, उदबत्ती लावणे, निरांजन लावणे यात माणसांच्या वासनांचे शमन होते देवाच्या नव्हे. म्हणून तर अमुक देवाला शमीची पानेच हवीत. हा अट्टाहास माणसांचा असतो.पूजेला
उदबत्तीचा ब्रॅन्ड भक्त ठरवतो देव नव्हे !

चौकटराजा सर , अतिशय योग्य बोललात. माणसाच्या गरजा वासना व चिंता , खापर मात्र देवावर. अतिशय योग्य विवेचन केलत अतिशय मोजक्या वाक्यात पण अतिशय अचुक विवेचन.