सुधागड (पाली)
येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हा वेधशाळेचा अंदाज ऐकून शंकेची पाल चुकचुकलीच, म्हटलं आपण नेमक पावसाळी ट्रेक ठरवतोय, त्यात आठवडाभर पावसाने मारलेली (दडी), भरीत भर म्हणून कि काय हा हवामान खात्याचा अंदाज, म्हणजे पाऊस पडायची शक्यताच नाही. तरीही ट्रेक महिनाभर आधीच ठरलेला होता आणि एकदा का आमचा श्रावण (हो हो श्रावण आमचाच हो, गुरुजीना श्रावण प्रिय असतो त्यापेक्षा अधिक कोणाला असेल काय? ) सुरु झाला कि पार अनंत चतुर्दशी पर्यंत खा_वायला देखील वेळ नाही अशी परिस्थिती. (मध्यंतरी एका समवयस्क गुरुजींकडून त्याचे आवडते गाणे ऐकले होते "श्रावण मासी हर्ष मानसी हिरव्या नोटा चहू कडे, क्षणात इकडे सत्यनारायण, क्षणात तिकडे होम घडे..... ई.ई.") असो. पण काही झाले तरी ट्रेकला जाणे आवश्यक होत, सुधागडला भेट देऊन देखील बरीच वर्ष झाली होती. मी, सुजित, भूषण आणि वरुण उर्फ मन्यामामा शनिवारी सकाळी जाणार होतो तर निलेश आणि समीर हे रविवारी सकाळी बाईक वरुन येणार होते.
सुधागडाचा थोडक्यात ईतिहास पाहायचा झाला तर "भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा एक अतिप्राचीन किल्ला. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व ते सिद्ध करते. सुधागडला आधीचे नाव भोरपगड असेही आहे. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. गडावरील श्री भोराई देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली, म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशीही नावे आहेत. पुराण काळात भृगु ऋषींचा आश्रम या किल्ल्यावर होता असे सांगितले जाते. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी सुधागडावरील भोराई देवी मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. गुरव, खंडागळे, खोडागळे व सरनाईक ही घराणी भोराई देवस्थानाशी संबंधित आहेत." (साभार ट्रेकक्षितीज)
शनिवारी सकाळी ११.३० वा. आम्ही भूषणच्या गाडीतून निघालो. वाटेत पनवेल-खोपोली दरम्यान प्रबळ, इर्शाल, माथेरान यांना ढगांचा वेढा पडला होता.
पाली गावातून देवळाच्या मागेच असलेला सरसगड.
पनवेल, खोपोली, पाली, पात्छापूर असे मजल दरमजल करीत ठाकूरवाडी या सुधागडच्या पायथ्याशी असलेल्या गावात येईपर्यंत ३.०० वाजले. पाली ते पात्छापूर अंतर साधारण ८-१० कि.मी. पात्छापूर गावात रस्त्याच्या बाजूलाच हिरव्या झाडीत एक टुमदार कौलारू घर छान दिसत होत. हे घर पाहून हिरवी श्यामल भवती शेती, पाउल वाटा अंगणी मिळती, लव फुलवंती जुई, शेवंती, शेंदरी आंबा सजे मोहरू, खेड्यामधले घर कौलारू ... या ग.दि.मांच्या ओळी न आठवल्या तर नवलच.
पात्छापूर पासून २ कि.मी. वर असलेल्या ठाकूरवाडी गावात आलो. शाळेजवळ गाडी पार्क केली, आणि निघालो. ठाकूरवाडीतील लोक मुख्यतः महादेव कोळी किवा कातकरी वर्गापैकी. वाडीतील घर काही पक्की, काही कुडाच्या भिंतीची तर काही शेणाने सारवून ठेवलेली. बहुतेक सर्वच घरांच्या बाहेर जळाऊ लाकडांची बेगमी केलेली दिसत होती.
ठाकूरवाडीतूनच एका सोप्या पायवाटेने गडाच्या दिशेने निघालो,
मधूनच सुधागड ढगातून आपले डोके वर काढत होता.
हिरव्या गच्च झाडीतून दिसणारी पाऊलवाट
साधारण अर्धा तासात एका शिडीपाशी आलो. शिडी कसली रेल्वेचा ब्रिजच तो. तेथून ठाकूरवाडीतील घर आणि शाळेजवळच्या गाड्या स्पष्ट दिसत होत्या.
शिडी
शिडीपाशी क्षणभर विश्रांती
क्षणभर विश्रांती घेऊन, पावसाचा अंदाज घेत निघालो, या नवीन शिडीच्या मागेच जुनी पण आता वापरात नसलेली शिडी आहे, ती पाहून सुजीतचा अघोचरपणा एकदम जागृत झाला आणि आम्ही नवीन शिडीवरून गेलो तर तो जुन्या शिडीवरून आला.
शिडी मागे टाकून निघालो आणि साधारण १५-२० मिनिटात सुधागडाच्या मुख्य पाय-यांपाशी आलो.
पाय-या
बुरुजाच्या बाजूलाच असलेला चोरदरवाजा
बुरुजावरच टाइमर लावून एक फोटो काढून टाकला.
आमच्या दिशने चालून येत असलेला पाऊस आम्हाला हुलकावणी देवून भलतीकडेच निघून गेला.
तिथून अर्ध्या तासात सुधागडच्या पठारावर पोहोचलो. पठारावर पुण्याहून आलेला आणखी एक ग्रुप भेटला. त्यांच्या सोबत गप्पा-टप्पा करण्यात आणखी १५-२० मि. गेली.
पुन्हा एकदा टाइमर लावून एक फोटो काढून टाकला
ठाकूरवाडीत आमच्या गाडीच्या बाजूला दुसरी गाडी पार्क केली होती ते पुण्यातील राजदेरकर आणि मंडळी
दहाच मिनिटात पंत-सचिव यांच्या चौसोपी वाडयापाशी पोहोचलो.
पंत-सचिव यांचा चौसोपी वाडा (बाहेरच्या बाजूने)
ब-याच दिवसांनी निवासी ट्रेक करीत होतो. त्यामुळे जरा निवांतपणा होता हे विशेष. शिवाय निवासी ट्रेकला गैस, पातेल्या, शिधा, ई. सामानामुळे माझ्या आणि सुजितच्या पाठ-पिशव्या भारी वजनदार झाल्या होत्या. त्यामुळे म्हटलं जरा १५-२० मिनिट आराम करू मग चहाच्या आणि कांदा-भजीच्या तयारीला लागू, गड फिरायला काय उद्याचा आख्खा दिवस आहेच कि. वेधशाळेचा अंदाज खोटा ठरवत (नेहमीप्रमाणेच) पावसाचा मागमूस नव्हताच. सगळा खटारखाना काढून ठेवला. तोपर्यंत मन्यामामा आणि भूषण पाणी घेऊन आले होतेच.
चहा आणि कांदाभजिच्या तयारीला लागलो.
चहा आणि कांदाभजिवर यथेच्छ ताव मारून होताच, सुजित पुलावाच्या तयारीला लागला. तोपर्यंत मन्यामामा गडावर रहाणा-या आजींकडून दुध आणि दही घेऊन आला. मग काय विचारता पुलाव-पापड-दही जोडीला लोणचं-चटणी असा झकास बेत असल्यावर पोटभर न जेवलो तर नवलच. जेऊन सामानाची आवराआवर करुन गुलाबजाम करायच्या तयारीला लागलो. चितळे गुलाबजाम मिक्स होतचं कि. मेणबत्ती आणि बॅटरीच्या प्रकाशात गुलाबजाम पीठ मळून, गोळे तयार करुन ते तळुन घेतले आणि पाकात घातले. पुन्हा एकदा आवराआवरी करुन गुलाबजामच्या पातेल्यावर वजन ठेऊन शतपावली करण्यासाठी चांदण्या रात्री भोराईदेवीच्या मंदिरात जायला निघालो. १०-१५ मिनिटात मंदिरात पोहोचलो. आमच्यातला मन्यामामा ताडोबाला बरेच वेळा जाउन आला असल्याने त्याने वाघांचे किस्से सांगायला सुरुवात केली. मग काय तास दिड्तास सहज निघुन गेला आणि पुन्हा वाड्यात यायला १२-१२.३० झाले. वाड्यात आल्यावर आजीबाईंकडून आणलेल्या दुधाची कॉफि केली आणि पुन्हा एकदा गप्पा मारत बसलो. १-१.३० च्या सुमारास पावसाची जरा ब्-यापैकी झड आली, त्यानंतर केव्हातरी झोपलो.
ट्रेक आरामाचा असल्याने थोडं ऊशिरा उठलो हे सांगायला नकोच. बैठा खो-खो खेळुन प्रेशरचं निवारण करुन आलो आणि चहा आणि पोह्यांच्या तयारीला लागलो. प्रेशरचं निवारण करता करता समोरच दिसत असलेल्या तैल-बैला आणि घनगडाचे फोटो काढुन टाकले.
तैल-बैला झुम्म्म्म
चहा पोहे तयार होईपर्यंत समीर कदम आणि निलेश हे आमचे मित्रदेखिल आम्हाला येऊन मिळाले. भल्या पहाटे ५ वा. निघुन बाईक हाकत ९.३० ला ते गडावर पोहोचले देखिल. धन्य त्यांची. त्यांच्या बरोबर गप्पा मारत चहा-पोह्यांचा कार्यक्रम ऊरकुन घेतला म्हणजे चहा-पोहे खाण्याचा कार्यक्रम हो.
कांदे-पोहे
तेव्ह्ढ्यात अस्मादिकांना गुलाबजाम कसे झालेत ते पहायची लहर आली आणि पाहतो तो काय ट्म्म फुगलेले ४०-५० गुलाबजाम आरपार पाकात मुरलेले हो.
गुलाबजाम झुम्म्म्म
दोन-दोन, चार्-चार गुलाबजाम ऊडवून पुन्हा एकदा आवराआवर करुन गडदर्शनासाठी बाहेर पडलो. सुरुवात करायची होती ती १०-१५ मिनिटावर असलेल्या भोराईदेवी मंदिरापासुन.
भोराईदेवी मंदिर
भोर संस्थानाची कुलदैवत भोराईदेवी
चिमाजीआप्पा यांनी पोर्तुगीजांशी झालेल्या युद्धातून आणलेली घंटा
मंदिरातील पुजारी श्री. खंडागळे
इतस्ततः विखुरलेल्या काही भग्न मूर्ती
पाषाणातील हनुमान मूर्ती
देवीचे दर्शन घेऊन गड फिरायला निघालो. समोरच दृश्य अवर्णनीयच. आजुबाजुच्या हिरव्या निसर्गाशि एकरुप होण्यासाठी जणु काही ढग खाली ऊतरुन आले होते.
नभं उतरू आलं
नुकत्याच झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने हिरवं गवत भूई फोडून वरती आलं होत आणि आसमंत न्याहाळत होत. विविध प्रकारची फुल, पानं आपापले वेगळपणं जोपासत सृष्टीची सुंदरता वाढवत होती. काही ठिकाणी अगदी लहान आकारात असलेली अळंबी झूम्म्म्म केल्यावर खासच दिसत होती.
फुलं
फुलं3
हिरवी पानं ३
अळंबी
ही सगळी सृष्टीची किमया पहात एकीकडे गड भटकंती चालू होतीच. सुधागड म्हणजे भोर संस्थानची राजधानीच जणू त्यामुळे गडावर ब-याच पडक्या इमारती, बांधकामं, तलाव, बुरुज, तट्बंदी, चोरवाटा, पाण्याची टाकी शिल्लक आहेत.
पडक्या इमारती
आणखी एक तलाव
लाटा
हे सर्व पहात गडाचा मुख्यदरवाजा पहायला गेलो हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृतीच. भोराईमंदिरापासुन २०-२५ मि. खाली ऊतरुन गेलो कि ह्या दरवाज्यापाशी पोहोचतो. या दरवाज्यावरील शिल्प, दरवाजाची रचना, दोन्हि बाजुचे अजस्त्र बुरुज पाहुन रायगडाच्या महादरवाजाची आठवण न झाली तर आश्चर्यच.
रायगडाच्या महादरवाज्याची प्रतिकृती असलेला सुधागडाचा महादरवाजा
दरवाजावरील शिल्प
गोमुखी बांधणीचा महादरवाजा
पाण्याचे टाके
गडाच्या तटबंदीच्या बाहेर उघडणारा चोर दरवाजा
अशात-हेने गड भटकून झाल्यावर १२-१२.३० ला पुन्हा आमच्या "वाड्यावर" आलो. लगेच भात लावला आणि एकीकडे कांदा-बटाटा रस्स्याची तयारी केली. भात, कांदा-बटाटा रस्सा, पापड, लोणचं, लसणाची चट्णी असा बेत हाणल्यावर, आवराआवर करुन २-२.३० च्या सुमारास गडावरुन प्रस्थान ठेवले. निघताना आजीबाईंना दह्या-दुधाचे पैसे द्यायला गेलो तर आजीबाई पैसे घ्यायला काही तयार नाहीत. त्यापेक्षा तुमच्याकड्चा ऊरलेला शिधा द्या म्हणाली मग आम्ही देखील आमचा सगळा शिधा तिला देऊन टाकला. आजी खुश एकदम. आजीला म्हटले तुझा छान फोटो काढतो जरा हस कि तर म्हणाली "दात राहिले नाय बा आता फोटू काढुन काय ऊपीग". तरीही फोटो काढुन तिला दाखवलाच, जाम खुश झाली. "आठवण ठेवा रे बाबांनो" अस काही बाही बोलली आणि आतमध्ये निघुन गेली.
आजीबाईंचा निरोप घेऊन आम्ही देखील परतीच्या प्रवासाला लागलो.
बज्जु
प्रतिक्रिया
12 Jul 2012 - 10:59 pm | भरत कुलकर्णी
पालीला सरसगड आहे. सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड.
पाली गाव जरी तालूक्याचे ठिकाण असले तरी सरकारी तालूका सुधागड आहे. त्यामुळे तुमचा (किंवा माझा) गोंधळ झाला असेल.
(सरसगडावरील स्वार्यांसाठी पाषाणभेदांचे हे धागे पहा:
http://www.misalpav.com/node/20427
http://www.misalpav.com/node/7693
)
फोटोसफर छान घडवली. धन्यवाद.
12 Jul 2012 - 11:16 pm | संजय क्षीरसागर
ट्रेकचा एकेक क्षण टिपला गेलाय, धन्यवाद!
13 Jul 2012 - 1:44 am | मुक्त विहारि
अजून कुठले ट्रेक केले अस्तील अत्र ते पण लिहा..
13 Jul 2012 - 2:08 am | अर्धवटराव
ते गडाचे, निसर्गाचे फोटु, वर्णन वगैरे सगळच झकास.. पण गुलाबजाम आणि आजीबाई जरा जास्तच झकास :) कसली क्युट स्माईल देतेय म्हातारी.
अर्धवटराव
13 Jul 2012 - 2:18 am | मोदक
फोटो आवडले..
13 Jul 2012 - 5:26 am | चौकटराजा
पहिलं सांगायच म्हंजे गुर्जी व ट्रेकर - काय अजब कॉम्बो !!!!! . मॅक्रो फोटो अधिक चांगले यायला हवे होते.
लँडस्कॅप ओके ! वृतांत भन्नाट बैठा खो-खो खेळुन प्रेशरचं निवारण करुन आलो ही शैली भारी.
( अशा प्रसंगाला आमच्या भावाने राजगड येथे टेपवर सनई लावली होती ! )फोटॄ संबधी जालावरचे काही विचार इथे सर्वांसाठीच देत आहे.
Post-processing is an integral part of landscape photography. I remember once seeing a small photography contest online and one of the rules said to submit only original, untouched photographs. Apparently, the contest organizers thought that post-processing images was an unfair practice and they did not want one person to have an advantage over another, just because of better Photoshop skills. I personally think that such rules are silly. Is it unfair when one photographer can use Photoshop better than another? Ansel Adams, the master of landscape photography was a darkroom magician. He spent countless hours working on his images and I am sure that if he was alive today, he would have loved Photoshop! How are Ansel’s post-processing skills in the darkroom different than someone’s Photoshop skills? Knowing how to post-process images is a big part of every photographer’s life today. And that’s a fact.
At the same time, you hear many photographers say “do everything right in camera”. I mostly agree with this statement – when it comes to landscape photography, it is best to minimize post-processing efforts and do as much as possible in the camera. It is one thing to photograph a scene with a heavily overexposed sky, thinking you can fix it later in Photoshop and another to use filters and other tools to expose the sky at least partially right, so that you could finish it up in Lightroom/Photoshop. Some things like the effect of a polarizing filter cannot be replicated in post-processing. Other things take enormous amounts of time to fix. Just learn to balance your workflow and you should be in good shape.
हे खास करून ट्रेकर साठी महत्वाचे आहे. कारण बरीचशी फोटोग्राफी लँडस्केप असते.
13 Jul 2012 - 8:10 am | ५० फक्त
मस्त रे मस्त आले आहेत फोटो आणि वर्णन पण.
13 Jul 2012 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा
छान आहे सर्व... :-)
13 Jul 2012 - 8:26 am | लीलाधर
लई म्हंजे लईच झाक फोटो आले हैत आणि तुमच्या = १ दिवस का होईना गड सफर करायला आवडेल.... धन्यवाद :)
13 Jul 2012 - 8:54 am | प्रचेतस
फोटो आणि वर्णन अतिशय सुरेख.
हिरव्यागार निसर्गात भटकंती करण्यातली मजा वेगळीच.
बाकी त्या वीरगळाच्या फोटोमध्ये दोन वीरगळ आणि तीन सतीशिळा आहेत.
13 Jul 2012 - 9:42 am | नाखु
जबरा......
13 Jul 2012 - 9:57 am | प्यारे१
मस्त वृत्तांत....
काही फोटोच्या कॅप्शन आवडल्या.
हिरवा निसर्ग, लाटा, कुत्रा इ.इ.
बाकी गडावर चितळ्यांचेच काय तर कुठलेही गुलाबजाम बनवणारे तुम्ही आजवरचे पहिले सद्गृहस्थ असाल नै?????
13 Jul 2012 - 2:01 pm | मी_आहे_ना
फोटो आणि वर्णन अप्रतिम. पण खरंच, गडावर 'गुलाबजाम' बनवायची कल्पना माझ्या / मित्रांच्या सुपीक टाळक्यात कधीच आली नाही.. आम्ही आपले भेळ / खिचडी - पापड पर्यंतच उडी मारणारे :)
13 Jul 2012 - 9:51 am | सुमीत भातखंडे
मस्त रे!
13 Jul 2012 - 11:26 am | बॅटमॅन
आयला मस्त!!! सीनरी अप्रतिम एकदम. फा ऽर देखणा परिसर :) आणि रायगडाचा महादरवाजा आठवावा अश्शीच रचना आहे!!!!!!!
13 Jul 2012 - 11:42 am | पियुशा
सुरेख फोटो :)
अन त्यातल्या त्यात पाकतले गुलाबजाम, रस्साभाजी , पुलाव याचा बेत करणारे पक्के खवय्ये दिसताहेत ;)
13 Jul 2012 - 11:47 am | किसन शिंदे
फोटो आणि वर्णन दोन्ही सुरेखच. :)
13 Jul 2012 - 12:04 pm | वेताळ
फोटो व प्रवास वर्णन खुप आवडले.
13 Jul 2012 - 1:26 pm | गणेशा
सर्व काही अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम
13 Jul 2012 - 2:26 pm | स्मिता.
कसले सुरेख आल्हाददायक फोटो आहेत.
गुलाबजामही मस्तच झालेले दिसत आहेत. पटकन एक तोंडात टाकावासा वाटला. म्हातार्या आजीचा फोटोही खासच.
13 Jul 2012 - 2:58 pm | नि३सोलपुरकर
फोटो व प्रवास वर्णन खुप आवडले.
पु.ट्रे.शु.
13 Jul 2012 - 2:59 pm | जातीवंत भटका
भटकंती आणि खादाडी सुद्धा !
13 Jul 2012 - 3:33 pm | नगरीनिरंजन
फोटो मस्त आणि परिसर तर खूपच सुंदर दिसतोय.
गडावर गुलाबजाम आणि पुलाव वगैरेचे भोजनभाऊ वर्णन वाचून मिशीला पीळ देत प्रतापगडावर ट्रेकिंग ग्रूपला कशी खीर खाऊ घातली याचे वर्णन करणारा शाळासोबती आठवला.
13 Jul 2012 - 8:59 pm | पैसा
वर्णन, फोटो, सगळं झक्कास! आज्जीबै फारच आवडल्या.
14 Jul 2012 - 12:27 pm | अमितसांगली
प्रत्येक क्षण टिपलेला आहे....छान...
14 Jul 2012 - 2:29 pm | शरभ
च्यायला... शेवटला फोटो कशाला टाकला राव ?
सालं उगीचच वाईट वाटतं.
असो. बाकी उत्तम वर्णन.
14 Jul 2012 - 11:20 pm | बज्जु
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
16 Jul 2012 - 4:20 pm | स्वच्छंदी_मनोज
झकास,
वर्णन, गुलाबजाम, फोटो आणी भटकंती सुद्धा..
16 Jul 2012 - 4:38 pm | सूड
मस्त वर्णन !! आता गुलाबजाम खावंसं वाटू लागलंय. ;)
16 Jul 2012 - 4:55 pm | प्यारे१
अभिनंदन सूड्स!
आणखी काही खावंसं वाटतंय? ;)
16 Jul 2012 - 5:47 pm | सुहास झेले
मस्त.. दोन वर्षापूर्वी भर पावसात हा ट्रेक केला होता आणि उतरताना रस्ता चुकलो होतो ;)
बाकी गुलाबजामून बनवण्याची कल्पना अभिनव हाये, कधीतरी ह्याचा विचार केला जाईल :D
आमच्या ट्रेकचे काही फोटो देतो ...
१.

२. बुरुजाच्या बाजूला असलेल्या चोर दरवाज्यात, ही पाल होती. उतरताना आधार घेत असताना मऊ मऊ काही लागलं आणि तिथे फ्लॅश मारला (कारण दचकून टॉर्च खाली पडला होता) ;-)
३.
४.
20 Jul 2012 - 9:59 am | मंदार दिलीप जोशी
मस्त वाटलं फोटो बघून. या गिर्यारोहकांचा हेवाही वाटतो आणि कौतुकही. :)
20 Jul 2012 - 10:45 am | सहज
मस्तच!!
20 Jul 2012 - 3:35 pm | मनराव
झक्कास.......!!! एकदम मस्त .......