✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 12/30/2016 - 23:50  ·  लेख
लेख
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

१९९१ ची कारवाई

१९९१ च्या कारवाईची पार्श्वभूमी १. सन १९८५ पासून भारताला परकीय चलनाची चणचण जाणवू लागली होती. १९९१ मध्ये भारताकडे केवळ तीनेक आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन होते. आयएमएफने केवळ $२.२ बिलियन इतके कर्जही (आज भारताकडे $३५० बिलियन पेक्षा जास्त परकीय चलनाची गंगाजळी आहे) ६७ टन सोने तारण ठेवल्याशिवाय देण्याला नकार दिला. आरबीआयने विमानाने ४७ टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये आणि २० टन सोने युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचवल्यावरच $६०० मिलियनचा पहिला हप्ता मिळाला. २. त्यानंतर, पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग या जोडगोळीने, भारताची अर्थव्यवस्था इन्स्पेक्टरराज मधून मुक्त करून उदार बनविण्याचा एक धाडसी प्रकल्प अमलात आणला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची जी भरभराट झाली तो नजिकचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. १९९१ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. भारताची अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. नाहीतर देशाला अत्यावश्यक वस्तूंची (उदा. खनिज तेल, उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल, जीवनावश्यक औषधे, इ) आयात करणे तर सोडाच पण आपल्या कर्जांवरचे व्याजही देणे शक्य नव्हते. २. सोने गहाण ठेवून पैसे जुळवणे ही केवळ काही महिन्यांपुरते तगून राहण्यासाठीची तरतूद होती. ती आणीबाणीची परिस्थिती ताब्यात आल्यावर, देशाची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी क्रांतिकारी बदल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते न केल्यास देशाचे दिवाळे वाजणे अपरिहार्य होते. ३. अश्या परिस्थितीत, "राव यांची राजकीय इच्छाशक्ती व प्रशाकिय निर्णय घेण्याची धमक" आणि "सिंग यांचा अर्थशास्त्रातील अनुभव व कसब" यांच्या संगमाने बनविलेल्या कारवायांमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणून तिची वाटचाल योग्य दिशेने चालू केली. ती इतकी की, काँग्रेस पुढची निवडणूक हरल्यानंतर सत्तेत आलेल्या नवीन सरकारला त्या वाटचालीचा वेग आणि दिशा चालू ठेवणेच भाग पडले. ३. तेव्हाचे पंतप्रधान त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या शेवटच्या पायरीवर होते. वयोमानामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे त्यांना पुढच्या निवडणूकीतल्या विजय/पराजयाची तितकीशी फिकीर ठेवण्याची गरज नव्हती. त्याविरुद्ध, क्रांतीकारी कारवाई करून देशाची अर्थव्यवस्था सुधारल्यास इतिहासात आपले नाव कोरण्याची त्यांना संधी होती. ४. तेव्हाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांची पार्श्वभूमी सरकारी बाबू व अर्थतज्ज्ञ म्हणून होती, म्हणजेच राजकारणी नव्हती. त्यामुळे, त्यांना तर पुढच्या निवडणूकीची चिंता करण्याचे कारणच नव्हते. कारवाई यशस्वी झाले तर जगात नाव होईल, नाही झाली तर आपले अर्थशास्त्रातले सल्लागाराचे अथवा शिक्षणाचे काम चालू करता येईल, अशी त्यांची स्थिती होती. ५. थोडक्यात, क्रांतीकारी पावले उचलणे भारताला खूप फायद्याचे ठरले हे नि:संशय. मात्र, ते करण्यापेक्षा इतर काही चांगला पर्याय तेव्हा आस्तित्वात नव्हता. तसेच, भविष्याची काळजी करण्याची गरज नसल्याने, कारवाईच्या परिणामाला सामोरे जाणे राव व सिंग यांना सोपे होते. ६. असे असले तरी, या कारवाईच्या वेळेसही सरकारवर अनेक अर्थतज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली होती ! ७. राव यांच्याप्रमाणे स्वतःच्या भविष्याची फिकीर नसलेल्या पंतप्रधानांऐवजी वय वा आरोग्य स्वतःच्या बाजूला असलेले आणि भविष्यात सत्तेची थोडीशी तरी आशा ठेवणारे पंतप्रधान असते; तर क्रांतीकारक कारवाई न करता वेळ तरून नेणार्‍या निर्धोक कारवाया करत राहण्याकडे त्यांचा कल असता. एखाद्या वेळी जमून आलेल्या अनेक वस्तूंस्थितींच्या सामुहीक परिणामाने कलाटणी घेत अनेक आश्चर्यकारक क्रांतीकारी व अनपेक्षित बदल घडून येतात, हे इतिहासात अनेकदा दिसून येते.

२०१६ ची कारवाई

२०१६ ची कारवाईची पार्श्वभूमी १. कारवाईच्या अगोदरच्या १० ते १२ वर्षांपासून रु १००० (३९%) आणि रु ५०० च्या (४५%) नोटांमधील चलनाचे प्रमाण वाढत राहून एकूण चलनाच्या ८४% इतके धोकादायक स्तरापर्यंत वाढले होते. ही परिस्थिती तशीच चिघळत राहिली असती तर भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेत घसरण (क्रॅश) झाली असती. २. "भ्रष्टाचारमुक्त भारत" या घोषणेवर विश्वास ठेवून २०१४ मध्ये जनतेने भाजपा आणि विशेषतः मोदींना बहुमत मिळवून दिले होते. विरोधी पक्ष त्यासंबंधात मोदींना सतत टोमणे मारत होते. अर्थातच, विरोधी पक्षांचे टोमणे हे क्रांतीकारी कारवाईचे कारण होऊ शकत नाही. तरीही, पत कायम ठेवण्यासाठी आपली घोषणा खरी करणारी काहीतरी कारवाई करणे मोदींना भाग होते. ३. १२८ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात केवळ १% लोक कर भरतात. करचुकवेगिरी अभिमानाची गोष्ट समजणार्‍या ग्रीक लोकांनाही शरम वाटायला लावेल अशीच ही वस्तुस्थिती आहे. २०१६ च्या कारवाईच्या वेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण १. विरोधी पक्षांच्या मोदीविरोधी कारवाया चालू असूनही व बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतरही, मोदींच्या व्यक्तीगत राजकीय भांडवलाला फारसा धक्का लागलेला नव्हता. किंबहुना, पाकिस्तानविरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सनंतर त्यात लक्षणीय वाढच झाली होती. २. भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहता, कोणतेही क्रांतीकारी पाऊल न उचलता एखादी सावध लोकाभिमुख कारवाई केली तरीही चालण्यासारखे होते. त्यामुळे, कोणताही मोठा धोका पत्करण्याची मोदींना तत्वतः आवश्यकता नव्हती. ३. या कारवाईमुळे जनक्षोभ होऊन जनता रस्त्यावर आली असती तर मोदी आणि भाजपला मोठा राजकीय धोका झाला असता. हा धोका, मोदींचे पंतप्रधानपद जाण्यात आणि/किंवा पुढच्या स्थानिक संस्थास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकांत भाजपाचा धुव्वा उडण्यात झाला असता. म्हणजेच, निश्चलनीकरण्याच्या कारवाईमागे मोदींचा स्वतःचा किंवा त्यांच्या पक्षाचा, भाजपाचा, स्वार्थ साधणार नव्हता. किंबहुना, तसा धोका घ्यावा अशी जबरदस्तीही त्यांच्यावर नव्हती. ४. आपले हितसंबंध राखण्यासाठी विरोधक काही म्हणत/म्हणणार असले तरी, वरची परिस्थिती पाहता, देशाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी केलेली निश्चलनीकरणाची धाडसी कारवाई करताना मोदींनी देशहित समोर ठेवून स्वतःसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी पत्करलेला धोका आहे. थोडक्यात, हा निर्णय राजकीय नसून देशहितासाठी उचललेले पाऊल होते. ५. जनतेने या कारवाईचे स्वागत करून, त्यामुळे होणार्‍या त्रासाला कोणतेही अकांडतांडव न करता सहन केले आहे. त्यासंबंधातले विरोधकांचे अंदाज आणि चिथावण्या त्यांच्या पुरत्याच सीमित राहिलेल्या आहेत. ही गोष्ट कारवाईच्या समर्थकांएवढीच तिच्या विरोधकांनाही गोंधळून टाकणारी होती ! याबाबतीत, भारतीय जनतेने सुजाणतेचे जे प्रदर्शन केले आहे ते वादातीतरीत्या स्पृहणीय ठरले आहे.

निष्कर्ष

मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही. "हमाम मे सांब नंगे है" अशीच सर्व पक्षांची अवस्था आहे. लोकशाहीतही खंबीर नेतृत्वाचा सिंहाचा वाटा असतो हे सत्य बर्‍याचदा विसरले जाते. म्हणूनच, लोकशाही देशाच्या मोठ्या यशासाठी एखाद्या नेत्याचेच नाव घेतले जाते आणि एखाद्या मोठ्या निर्णयामुळे मिळालेल्या अपयशाचा स्वीकार करून त्या नेत्याला राजिनामा द्यावा लागतो. अमुक देशाच्या शंभर-दोनशे निर्वाचित नेत्यांनी एकत्रितपणे अमुक एक क्रांतीकारी गोष्ट केली असे होत नाही; पण त्यांची मोट बांधून, त्यांना देशाच्या फायद्याच्या दिशेने यशस्वीपणे ओढून नेणार्‍या नेत्यालाच ते श्रेय सकारणरीत्या दिले जाते. तसे श्रेय मोदींना द्यायला हरकत नाही असे मला वाटते. तसे नसते तर, भारताचा पूर्वानुभव पाहता, मोदींच्या खंबीर नेतृत्वाविना, "इतना साल उन्होने खाया, अब हम खायेंगे तो क्या बुरा है।" या मानसिकतेने भाजप वागला नसताच, असे म्हणणे कठीण आहे. सद्याची खुर्ची राखणे आणि पुढच्या निवडणूकीत विजय मिळवणे हे जगभरच्या राजकारण्यांच्या दृष्टीने सर्वोच्च मुद्दे असतात. त्यामुळे, स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीर नेता मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यातही, कोणत्याही प्रकारचा दबाव नसताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता मिळणे ही तर एक अशक्यरित्या दुर्मिळ गोष्ट आहे. मोदीच्या रूपात ही अशक्य दुर्मिळ गोष्ट भारताला लाभली आहे. त्यात अजून भर म्हणून, आपला तत्कालिक स्वार्थ बाजूला करून, किंबहुना तोशीस सोसूनही, अश्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याचे सुजाणपण भारतीय जनतेने दाखविले आहे. ०८ नोव्हेंबरपूर्वी भारतीय जनता अशी वागेल असे कोणी सांगितले असते तर त्याबाबत माझ्या मनात संशय असता. निश्चलनीकरणाच्या कारवाईमुळे उघड झालेली ही भारतीय जनतेची प्रगल्भ मानसिकता एक भारतीय म्हणून मला नक्कीच अभिमानास्पद वाटते. तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत. याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
तंत्र
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
32397 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

७० वर्षान्नी जन्ता जागी झालि

गब्रिएल
Sun, 01/01/2017 - 15:03 नवीन
७० वर्षान्नी जन्ता जागी झालि तरि झोपून आस्लेल्या मान्साना काय म्हनाय्चे ? त्येचाबी करा हिशोब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरोबर! जनता आपल्याबाजूने असली

संदीप डांगे
Sun, 01/01/2017 - 17:04 नवीन
बरोबर! जनता आपल्याबाजूने असली तेव्हा "जागी झाली' असं म्हणायची ष्टाईलही नवीन नाही! अवांतर: डू आयडीने उत्तर द्यायची गरज का पडत असावी निष्पक्ष माणसांना कुणास ठाऊक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

उद्या हे सगळं फेल गेलं तरी

मराठी_माणूस
Mon, 01/02/2017 - 16:47 नवीन
उद्या हे सगळं फेल गेलं तरी "हेतू तर प्रामाणिक होता ना?" असे म्हणायला मोकळे.
मग, हेतु नक्की काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

म्हात्रे सर ,

डँबिस००७
Sat, 12/31/2016 - 13:48 नवीन
म्हात्रे सर , आवडला, जबरदस्त लेख !!
  • Log in or register to post comments

१९९१ मध्ये सोने गहाण ठेवावे

श्रीगुरुजी
Sun, 01/01/2017 - 21:24 नवीन
१९९१ मध्ये सोने गहाण ठेवावे लागले इतपत देशाची अर्थव्यवस्था बिघडलेली होती. त्याचे खापर वि. प्र. सिंगांची ११ महिन्यांची राजवट व नंतर आलेल्या चंद्रशेखरांच्या ४ महिन्यांच्या राजवटीवर फोडले जाते. परंतु कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था केवळ काही महिन्यात सुधारत किंवा बिघडत नसते. त्यासाठी मागील अनेक वर्षांचे निर्णय कारणीभूत असतात. भारताची अर्थव्यवस्था बिघडायला मुख्यतः मागील ४२ वर्षांतील काँगेसची राजवटच कारणीभूत होती. सोने गहाण ठेवले यासाठी यशवंत सिन्हांना दोष दिला जातो. परंतु मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावर सुद्धा नंतर २ वेळा सोने गहाण ठेवले गेले होते. सेवा कर व उद्गम कर कपात या दोन जाचक तरतुदी मनमोहन सिंगांनी सुरू केल्या. सुरवातीला सेवा कराचा दर ६% होता व फारच थोड्या सेवांना तो लागू होता. नंतर वाढतवाढत तो २०१४ पर्यंत १२% पर्यंत गेला व त्यात समावेश नसलेल्या फारच थोड्या सेवा आता शिल्लक आहेत. आता हा दर जवळपास १५% झाला आहे. उद्गम कर कपात हा असाच भयंकर प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी काही बँकांनी माझ्या मुदतठेवीवर उद्गम कर कपात करूनसुद्धा ती माहिती आयकर विभागाकडे न पाठविल्याने २-३ वेळा मला दुप्पट कर भरावा लागला आहे. आता परिस्थिती बरीचशी सुधारली असली तरी उद्गम कर कपात व अग्रीम कर या तरतुदी करदात्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. १९९१ मधील आर्थिक सुधारणांचे बरेचसे श्रेय मी नरसिंह रावांना देईन. या सुधारणांमागील मुख्य कल्पना त्यांच्या होत्या. मनमोहन सिंग हे फक्त अंमलबजावणीकार होते. परंतु श्रेय त्यांनाच दिले जाते. नंतर २००४-२०१४ या काळात देखील मनमोहन सिंग हे अंमलबजावणीकार या स्वरूपातच राहिले. एकंदरीत काँग्रेस राजवटीत लाल बहादुर शास्त्री व नरसिंह राव या दोन पंतप्रधानांची कामगिरी नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या तुलनेत खूपच चांगली होती. मनमोहन सिंग हे तर केवळ नामधारी पंतप्रधान होते.
  • Log in or register to post comments

1991 आणि 2016 च्या दोन निर्णय

निष्पक्ष सदस्य
Sun, 01/01/2017 - 22:23 नवीन
1991 आणि 2016 च्या दोन निर्णय/कारवाई,यांमधील तुलना अस्थानी आहे,विशेषतः अशी तुलना करण्याचे प्रयोजन समजले नाही.तुलना अशासाठी करतात कि एखाद्या व्यक्तीला सरस ठरवता येईल?राईट??
तत्कालिक स्वार्थी हितसंबंधांच्या मागे लागून, या अत्यंत दुर्मिळ घटनांच्या संगमाचा नकार, अव्हेर किंवा विरोध करून, मोदींचे विरोधक आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत.
असं आहे होय!
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही
हे तुम्ही दोन वेळा का टाईपले? खाली परत ठळक फाँटात?
याची समज प्रत्येक भारतीय नागरिकात जेवढी लवकर येईल तेवढे देशाच्या दृष्टीने आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने चांगले होईल
ओके
मी कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा फार मोठा चाहता नाही.
हे का बरे सांगावे लागते सतत? (हो जय जय शिवशंकर काटा लागे ........)
  • Log in or register to post comments

भारतीय जनतेचा मूर्खपणा

गामा पैलवान
Mon, 01/02/2017 - 19:42 नवीन
संदीप डांगे,
आपल्या हालअपेष्टांना कारणीभूत असलेला 'कोणीतरी' आहे, त्याच्याविरुद्ध आपल्याला युद्ध पुकारणे आवश्यक आहे हे जनतेच्या गळी उतरवले की जनता सारासार विचार करण्याच्या भानगडीत न पडता अशा नेत्याच्या मागे उभी राहते.
भारतीय जनता खरंच इतकी मूर्ख वाटते का हो तुम्हाला? तशी वाटंत असल्यास तिला शहाणं करायचं मनावर घ्याच म्हणतो मी. तर मग कुठे सुरुवात करणार आहात? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

70 वर्ष घाण साचत राहिली

संदीप डांगे
Mon, 01/02/2017 - 20:09 नवीन
70 वर्ष घाण साचत राहिली तेव्हा जनतेची हुशारी दिसली नाही ती? काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

दिसत्येय की जनतेची हुशारी.

गामा पैलवान
Tue, 01/03/2017 - 02:55 नवीन
संदीप डांगे, अहो, जनता खरंच हुशार आहे. दुसरा एखादा देश असता तर एव्हाना फुटूनतुटून गेला असता. भारत आहे म्हणून सत्तर वर्षांची घाण पचवून एकसंध राहिलाय. यावरून भारतीय जनता हुशार आहे असंच दिसंत नाही काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एकसंध असणे आणि हुशार असणे

संदीप डांगे
Tue, 01/03/2017 - 09:45 नवीन
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका. सत्तर वर्ष घाण साचत राहिली म्हणणारांना आता अडचणीचं ठरतंय आपलंच नॅरेटीव. मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये. आपण प्रगती नाही करु शकलो ह्याला 'कोणी दुसरे' कारणीभूत आहेत असे मानणे हाच तो मूर्खपणा. काळे विरुद्ध पांढरे असे काही नाही या देशात. ९९ टक्के लोक ग्रे शेडमधे आहेत. आपल्या प्रगतीत आपण स्वतःच अडसर आहोत हे अजून जनतेला कळलेले नाही. ते जेव्हा कळेल तेव्हा खर्‍या अर्थाने जनता जागी झाली असे म्हणेन मी... एवढ्यात तर ती शक्यता दिसत नाही. २०११ ला अण्णा हजारेंनी देश ढवळून काढला, भरपूर जनसमर्थन मिळाले, रॅल्या, मोर्चे निघाले, देश भ्रष्टाचारविरुद्ध जागा झाला हे तेव्हाही म्हटले गेले. पण स्वतःला आधी बदलायला हवे असे जनतेला तेव्हाही वाटले नाही. भ्रष्टाचार सुरु राहिलाच. जितके लोक तेव्हा जागे झाल्याचे दर्शवत होते, काही बदल घडलेला दिसत नाही. जनता अशीच आहे इथली. तुम्ही तिला सुधारणांचे गाजर दाखवा, तिच्या समस्यांचे खापर दुसर्‍या कोणावर फोडा तुम्हाला डोक्यावर घेते. तिच्या डोळ्यात अंजन घाला, सत्य बोला, सुधरायला सांगा, तुम्हालाच कचर्‍याच्या डव्यात टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 01/03/2017 - 12:27 नवीन
डांगेंजी, ते जनता मूर्ख आहे/हुशार आहे, मोदींची आरती वगैरे पोकळ गफ्फा बाजूला ठेवुयात! हि योजना कशी फेल/यशस्वी आहे/होऊ शकते/होणारच नाही आणि हेतू प्रामाणिक नाहीये तर मग हेतू काय आहे यावर चर्चा केली तर आमच्यासारख्या सामान्य वाचकांच्या ज्ञानार्जनात थोडीशी भर पडेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

"हेतु काय आहे?" हेच तर

संदीप डांगे
Tue, 01/03/2017 - 12:53 नवीन
"हेतु काय आहे?" हेच तर विचारतोय पहिल्यापासून. हेतू सांगा व कसे सफल झाले तेही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 01/03/2017 - 14:51 नवीन
म्हणजे अजून गाडी तिथेच आहे तर! मला वाटले एवढ्या ढिगभर धाग्यांवरील ढिगभर प्रतिक्रियांत एवढे तरी नक्की स्पष्ट झाले असेल. बरं ते जाऊदे, मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? बाकी फायद्या तोट्याचं म्हणाल तर म्हात्रेसरांनी त्यांच्या धाग्यावर वेळोवेळी अत्यंत उपयुक्त अशी तथ्यांवर आधारित माहिती टाकली आहेच (म्हणजे वाचली नसेल तर वाचायला हरकत नाही). साधारणपणे अशी माहिती पटली नाही तर अशी तथ्ये खोडून काढावीत असा संकेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्याचं काय आहे ना, आतापावेतो

संदीप डांगे
Tue, 01/03/2017 - 15:50 नवीन
त्याचं काय आहे ना, आतापावेतो एक स्पष्ट झालंय. विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. याला आता नेहमीच्या सवयीने तुम्ही विक्टिमकार्ड बोलणार. ते एक असो. पण जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. मी सुरुवातीला नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले हे आपले म्हणणे बरोबर आहे. याचाच अर्थ असा की मी मोदींचा अंधविरोधक नाही. ८ नोव्हेंबरला मोदींनी जे भाषण केले ते ऐकल्यावर ते बोलले तसे होईल असा मीही विश्वास त्यांच्यावर ठेवला. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. असो. काही सरकारी निवेदने असतील तर बोला, ३० डिसेंबरनंतर इथल्या सगळ्या डोंगरभर प्रतिक्रिया फुसक्या झाल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीमागचे हेतू व त्याचे यश-अपयश याबद्दल सरकारने काही म्हटले असल्यास मांडावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हे विनाकारण सरसकटीकरण होतंय,

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 01/03/2017 - 17:32 नवीन
हे विनाकारण सरसकटीकरण होतंय, बाकी काही नाही! तुम्हाला खरंच ह्या योजनेचे फायदे तोटे यावर काही चर्चा करायची असेल तर ठीक आहे नाहीतर....चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

विरोधकांनी काहीही मांडलं तरी

मोदक
Tue, 01/03/2017 - 19:45 नवीन
विरोधकांनी काहीही मांडलं तरी ते कसं द्वेषातूनच लिहिलंय हे सिद्ध करायची स्पर्धा लागते. विरोध करण्याच्या नादात कै च्या कै लॉजिक मांडता त्यावेळी तुम्ही आत्ता ज्या आदर्शवादाच्या गफ्फा हाणत आहात तो आदर्शवाद कुठे जातो..? एकदा विरोधकांना 'मूल्यहिन' ठरवले की मग त्यांनी मांडलेली तथ्ये, आकडेवारी, घटना, अनुभव सगळे अविश्वसनीय, बनावट, द्वेषमूलक व खोटेच समजले गेले पाहिजेत असा इथे अट्टाहास दिसला. मूल्यहीन ठरल्यानंतर दिलेली गोष्ट १० वेळा पारखून घेतली जाते हा जगन्मान्य नियम आहे. वीस लाखाचे ट्रक, असंबद्ध लिंका, पळवाटा इतके सगळे झाल्यानंतरही जगाने आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा ही फारच बाळबोध अपेक्षा आहे. जिथे लोकांनी आपआपले खुंट घट्ट करुन घेतलेच आहेत त्याठिकाणी चर्चा होत नाही, कसलंही ज्ञान-प्रसार, कल्पनांची देवाण-घेवाण होत नाही. फक्त चिखलफेक व संगित मानअपमान चालतं. अर्धवट, सोयिस्कर सत्य मांडणार्‍या तथाकथित निष्पक्षांना दुसर्‍यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. फायनली एखादा आरसा बघितला वाटतं..!! ;) असो.. शुभेच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरोबर, आता फक्त वीस लाखाचे

संदीप डांगे
Tue, 01/03/2017 - 20:59 नवीन
बरोबर, आता फक्त वीस लाखाचे ट्रकच दिसणार हो! ट्रोल्स ना दुसरं काय दिसणार तसंही... मुसळ बघायला तयार राहा... गुड लक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असे दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप

मोदक
Wed, 01/04/2017 - 12:57 नवीन
असे दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले आता. मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या. तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा. दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@मोदक,

संदीप डांगे
Wed, 01/04/2017 - 16:26 नवीन
@मोदक,
दुसर्‍यावर बिनबुडाचे आरोप करणे जुने झाले
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
मी जाणीवपूर्वक दिशाभूल केलेले प्रतिसाद दाखवून द्या.
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही. बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
दुकाने उघडली असताना अवघड प्रश्न विचारणारे ग्राहक येणारच, मग आता "अन्याय होतो आहे" असा कांगावा करून गळे काढणे थांबवा.
जैसी जिसकी सोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

<<<<तुम्ही भाजपविरोधी अजेंडा

विशुमित
Wed, 01/04/2017 - 16:35 नवीन
<<<<तुम्ही भाजपविरोधी अजेंडा राबवत आहात आणि मिपाचा त्यासाठी उपयोग करून घेत आहात हे उघडे पडल्याने प्रतिवाद करू शकत नाही हे मान्य करा.>>> -- तीव्र निषेद.. -- राच्याक ने पक्षीय अजेंडा राबवण्यासाठी मिपाचे काय चार्जेस आहेत ? ह्या न्यायाने बरेच जण मिपावर विना तिकिटाचा प्रवास करत आहेत म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

होक्का! कधीपासून...? मी पैसे

मोदक
Wed, 01/04/2017 - 16:57 नवीन
होक्का! कधीपासून...? मी पैसे घेऊन प्रतिसाद लिहितो हे लिहिण्यापासून ना?
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..?
दिशाभूल करण्याचा आरोप दुसर्‍यांवर करणे ह्यात तुमचं पेटंट आहे, तुमच्याकडेच असू देत.
मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..?
तुम्हाला काय वाटते ह्याचा मी विचार करत नाही, किंवा इथे कोणालाही माझ्याबद्दल काय वाटते ह्याबद्दल मी पर्वा करत नाही. तुमचा माझ्याबद्दलचा विचार महत्त्वपूर्ण नाही.
यात चुकीचे काहीच नाही. फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच.
बाकी दादागीरी, दबंगगीरी करायची तुम्हाला खास खुमखुमी असल्यास एन्जॉय द पार्टी.
तुम्हाला तसे वाटत असेल तर असो बापडे, मी तरी असे काही केलेले मला आठवत नाही आणि असे काही करायची वेळ आली तर ते स्वत:च्या जीवावर करेन. तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही.
जैसी जिसकी सोच!
जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्याच्या पूर्वीचे तुमचे

संदीप डांगे
Sun, 01/08/2017 - 00:49 नवीन
त्याच्या पूर्वीचे तुमचे बिनबुडाचे आरोप विसरलात का..? >> असं तुमचं तुम्ही म्हणायचं-समजायचं आणि बसायचं टाळ कुटत. चालुद्या.. मी सरसकट सर्वांवर आरोप करत नाही. >> अच्छा, माणूस पाहून आरोप करता तर. बिनबुडाचे असले तरी रेटून प्रत्येक् धाग्यावर तेच दळण दळता यात तुमचा काही अजेंडा असेल तर माहिती नाही. तुम्ही अजेंडा राबवण्यासाठी दिशाभूल केलेले प्रतिसाद मिपावरच आहेत. >> गुड जोक! ब्रिंग सम मोअर...! आपण काहीतरी भव्यदिव्य लिहितोय हा भ्रम झाला आहे तुम्हाला असे भासते. अनेकदा तुम्हाला लिंका दिल्या आहेत. तेथून तुम्ही नेहमीप्रमाणे पळ काढला आहेच. >> पळ काढणे, लढणे वगैरे लुटूपूटूच्या गोष्टी करण्यात तुम्हाला इन्टरेस्ट असेल. एखाद्याने एखाद्या ठिकाणी उत्तर दिले नाही तर पळ काढणे समजतात होय तुमच्यात..? पोकळ लिहिण्यात व माझी वैयक्तिक बदनामी करण्यामागे तुमचा काय अजेंडा असेल देव जाणे. मी दिशाभूल केलेले प्रतिसाद सापडले का..? सापडले नसतील तर आरोप मान्य करताय असे समजावे का..? >> मी पैसे घेऊन प्रतिसाद देतो व दिशाभूल करतो हे आरोप तुम्ही केले ते दिशाभूल करण्यासाठीच. वैयक्तिक माझ्या बदनामीचा अजेंडा चालवत आहात तुम्ही मिपावर. अजून काय पुरावा हवा? फक्त जे बोलायचे आहे ते खरे बोला आणि चष्मे घालून खोटेपणा, कांगावा केल्यास प्रत्युत्तर मिळणारच. >> तुम्ही काय खरे बोललात हो माझ्यावर पैसे घेऊन प्रतिसाद लिहण्याचा आरोप करतांना? काय पुरावा मिळाला तुम्हाला? आधी करावे मग सांगावे. बाकी चष्मे-कांगावा ह्याबद्दल रडारड करत राहणे हा तुमचा माझ्याविरुद्ध अजेंडा राबवण्याचा भाग असू शकतो. लेट इट बी, आय जस्ट डोन्ट केअर! तुमच्यासारखे पडकी बाजू सावरायला दुसर्‍याच्या मागे लपणार नाही. >> मनाला येईल ते बोलत सुटणे याचा आणखी एक पुरावा. धादांत खोटे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा अजेंडा पुरता उघड पडत चाललाय... जी आहे ती सोच क्लीयर आहे. त्यामुळे मला विशिष्ट पक्षाची भलामण करण्यासाठी कोलांट्याउड्या माराव्या लागत नाहीत - अर्थात हे तुम्हाला कळणार नाहीच. >> बरोबर. मला कळणारच नाही कारण विशिष्ट पक्षाची भलामण करायला मी मिपा वापरत नाही, व त्या पक्षाविरुद्ध कोणी विरोधात लिहितोय तर कोणाविरुद्ध टिनपाट गोष्टी घेऊन वैयक्तिक बदनामीचा अजेंडा राबवत बसत नाही. ज्यांना भलामण करायचे पैसे मिळत असतील ते करतील की भलामण. मला ते कळून घ्यायची इच्छा सुद्धा नाही. अजून एक, शेवटचा प्रतिसाद आपला अस्ला म्हणजे आपण जिंकलो ह्या पोकळ भ्रमात मी जगत नाही. त्यामुळे ह्यापुढे प्रतिसाद नाही दिला तर पळून गेलो वगैरे म्हणायला तुम्ही मोकळे असला तरी मला वेळ नाही ट्रोल्सकडे लक्ष द्यायला. आपका दिन शुभ रहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

असूदे हो.. पब्लीक तुमची २०

मोदक
Tue, 01/10/2017 - 16:19 नवीन
असूदे हो.. पब्लीक तुमची २० लाखाचे ट्रक फिरवायची मजबुरी समजू शकेल. वाढदिवसासोबत बालदिनाच्याही शुभेच्छा घ्या आणि शक्य झाल्यास मोठे व्हायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ही वीस लाखाच्या ट्रकची काय

अप्पा जोगळेकर
Wed, 01/04/2017 - 13:31 नवीन
ही वीस लाखाच्या ट्रकची काय भानगड आहे ? हा उल्लेख वारंवार जिथेतिथे दिसतो. म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

http://www.misalpav.com/node

मोदक
Wed, 01/04/2017 - 15:02 नवीन
http://www.misalpav.com/node/38043 काय राव अप्पा.. आपण आयटीमध्ये उगाच खुर्च्या उबवतो आहोत. चला ट्रक घेऊया. :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आय मिस्ड इट.

अप्पा जोगळेकर
Wed, 01/04/2017 - 15:44 नवीन
आत्ता सगळे वाचले. लिंकसाठी शतशः आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आय मिस्ड इट.

अप्पा जोगळेकर
Wed, 01/04/2017 - 15:46 नवीन
आत्ता सगळे वाचले. लिंकसाठी शतशः आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मग तुम्ही सुरुवातीला या

अप्पा जोगळेकर
Wed, 01/04/2017 - 13:28 नवीन
मग तुम्ही सुरुवातीला या योजनेचं समर्थन केल्याचं अंधुक अंधुक आठवतंय, ते कोणते हेतू गृहीत धरून होतं? नाही. बहुधा डांगे यांचे सुरुवातीचे प्रतिसाद सावध पवित्र्यातले होते. किंवा असे असेल तर / असे झाले तर हा निर्णय योग्य ठरेल अशा स्वरुपाचे होते. कदाचित ते संधीची वाट पहात असावेत असे वाटले होते तेंव्हा. आता खात्री पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

अप्पा, असू शकेल! धाडसी

हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/04/2017 - 15:17 नवीन
अप्पा, असू शकेल! धाडसी पंतप्रधानांनी पूर्ण अभ्यासाअंती योग्य निर्णय घेतला आहे आणि आता कितीही दबाव आला तरी हा निर्णय मागे घेतला जाऊ नये असं काहीसं ते बोलल्याचं आठवतंय म्हणून म्हटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

तीन मुद्दे

गॅरी ट्रुमन
Tue, 01/03/2017 - 13:10 नवीन
या निर्णयावरून विविध ठिकाणी होणारी गरमागरम चर्चा बघितली की आंधळे आणि हत्ती या गोष्टीची आठवण येत आहे. हत्ती म्हणजे नक्की काय हे त्या आंधळ्यांपैकी कोणालाच समजले नाही आणि प्रत्येक जण त्याला समजेल त्याप्रमाणे हत्तीचे वर्णन करत होता. त्याचप्रमाणे हा निर्णय, त्यामागची कारणमिमांसा आणि त्यामुळे होणारे अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे बर्‍यापैकी समजले आहे आणि त्यावर आधारीत आपले मत मांडणारे किती जण असतील हे समजत नाही. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसत आहे. जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत. तरीही काही महत्वाच्या गोष्टी आतापर्यंत समोर आल्या आहेत त्यांचे खंडन करणे तसे जडच जाईलः १. मोदींनी हा निर्णय घेताना जबरदस्त मोठी जोखीम घेतली आहे. लहानसहान व्यापारी हे जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचे समर्थक होते (शेठजी-भटजींचा पक्ष). या निर्णयामुळे या वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. मागच्या वर्षी दागिन्यांच्या दुकानांवर कर लावला त्यावेळी या वर्गातून "एकही भूल कमल का फूल" अशीही घोषणा झाली होती. आपल्याच "कोअर व्होटबँक"ला अप्रिय असा निर्णय घेणे तितके सोपे नाही. मोदींनी नेमके तेच केले आहे. २. अजून तरी मोदींनी या निर्णयामागे लोकांना "रॅली" केले आहे असे चित्र आहे. याला मोदींवरचा लोकांचा अजूनही असलेला विश्वास म्हणा की भाजपची प्रोपोगांडा मशीनरी म्हणा की काहीही म्हणा. अण्णा हजारेंचे उपोषण चालू होते तेव्हा देशभरात रस्त्यावर हजारो लोक उतरले होते. भ्रष्टाचाराचा समाज म्हणून सगळ्यांना त्रास होत असला तरी तो कुणा एका माणसाला थेट जाणविण्याजोगा नसतो.तरीही इतके लोक रस्त्यावर आलेच होते. या नोटबंदी प्रकरणी लोकांना त्रास झाला ही गोष्ट खरी आहे. उगीच कुणालाही तासनतास रांगेत उभे राहायला आवडणार नाही. पण आपण जो त्रास सहन करत आहोत तो देशासाठी आहे ही जाणीव काही प्रमाणात तरी लोकांच्या मनात निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले हे अमान्य करता येणे थोडे कठिणच आहे. केजरीवाल-ममता जोडगोळीने "७२ तासात निर्णय मागे घ्या अन्यथा मोठे आंदोलन करू" ही धमकी पूर्णच फुसका बार ठरली हे पण आपण बघितलेच आहे. भाऊ तोरसेकरांनी याविषयी एक प्रश्न विचारला होता. गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली आणि ती यात्रा दांडीच्या दिशेने पुढे जाऊ लागली तशी लोकांची गर्दी वाढू लागली. कुणा विरोधी पक्षाच्या नेत्याने एखादे ठिकाण (समजा लखनौ) ते दिल्ली अशी पदयात्रा या निर्णयाविरूध्द सुरू केली असती आणि त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला असता तर मोदी सरकारला मोठ्या नामुष्कीने हा निर्णय मागे घ्यायला लागला असता. हे विरोधी पक्षांना समजले नसेल असे वाटत नाही. तरीही असे काही करायला गेले तर आपलाच पचका होईल अशी भिती त्यांना वाटली का याची कल्पना नाही. ३. अनेकदा निर्णय घेताना तो निर्णय अंततः हिताचा असला तरी त्याचे लगेच परिणाम कसे होतील हे समजत नाही. पण आपण घेतलेला निर्णय अंततः हिताचा आहे हे कव्हिक्शन असेल तर तो निर्णय घेणारा नेता त्या निर्णयावर ठाम राहतो. १९९१ मध्ये मनमोहनसिंग त्यांच्या निर्णयावर असेच ठाम होते. त्यांनाही त्यावेळी "आय.एम.एफ चे एजंट" वगैरे म्हटले जातच होते. तरीही ते मागे हटले नाहीत. असेच कन्व्हिक्शन मोदींमध्ये आहे असे दिसत आहे. भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

सहमत!

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 01/03/2017 - 14:56 नवीन
सहमत! हे
जे मुळात मोदी समर्थक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदी समर्थनाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत तर मोदी विरोधक आहेत त्यापैकी बरेच आपल्या मुळातल्या मोदीविरोधाला पाठबळ कसे देता येईल हे या निर्णयात शोधत आहेत आणि आपापल्या परिने आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावत आहेत.
आणि हे
भविष्यात नक्की काय होते हे समजायला काही महिने आणखी थांबावे लागेल.
कूड नॉट ऍग्री मोअर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

साहेब, हे सगळे ठीक आहे.

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/03/2017 - 15:45 नवीन
साहेब, हे सगळे ठीक आहे. कोणत्याही विचारी माणसाला ते दिसत/समजत नाही असेही नाही. पण, तरीही या प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आल्या तर आश्चर्य नाही. कारण... "तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, त्याला पाणी प्यायला भाग पाडू शकत नाही" :) ;) "एखादी व्यक्ती कायम चूकच असणार हाच ठाम, अचल आणि अंतीम निष्कर्ष आहे" असे एकदा ठरवले आणि तोच एकुलता एक निष्कर्ष सिद्ध करायचा आहे असे मनात ठरवले की (अ) समोरचा आस्तित्वात असलेला पर्वत दिसतच नाही किंवा ती मोहरीच आहे, (आ) समोरची आस्तित्वात असलेली मोहरी नाही तर पर्वतच आहे, किंवा (इ) आस्तित्वात नसलेली मोहरी कल्पनेने निर्माण करून तिला पर्वत म्हणून दाखवणे, इत्यादी गोष्टी आपोआप केल्या जातात. त्या व्यक्तीचा (अ) विरोधक तो आपला मित्र (मग पूर्वी अनेकदा आपण एकमेकाचे गळे धरले असले तरी ते गौण असते) आणि (आ) त्या व्यक्तीबाबत, पूर्वग्रह न बाळगता, तथ्यांवर आधारलेला तर्क करून कोणी जराही बरे बोलेल तो आपला शत्रू... या सगळ्यात सत्याची आणि देशाची ऐसी कि तैसी झाली तरी हरकत नाही. असे धृवीकरण सद्या भारतीय राजकारणात झाले आहे. मिपा भारतिय राजकारणाचा किंचितसा का होईना पण सबसेट आहे... तेव्हा वरच्या मनःस्थितीचे प्रतिबिंब मिपात दिसले तर आश्चर्य नाही. पण, हे बर्‍याचदा विसरले जाते की, "सामान्य जनतेला फारसा आवाज नसतो पण तिला डोळे, कान आणि विचारशक्ती जरूर असतात" आणि शिवाय... Image removed. मोदींना याचा भूतकाळात फायदा मिळालेला आहे आणि तो ट्रेंड भविष्यातही चालू रहावा याची विरोधक पुरेपूर काळजी घेत आहेत !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

एकसंधत्व आणि हुशारी

गामा पैलवान
Tue, 01/03/2017 - 18:03 नवीन
संदीप डांगे, १.
एकसंध असणे आणि हुशार असणे ह्याचा काही संबंध असतो काय? उगाच उत्तर नाही म्हणून काहीही लिहू नका.
हो आहे. नेव्हिल मॅक्सवेल म्हणून एका नामांकित पत्रकाराने भारतातली १९६७ सालची सार्वत्रिक निवडणूक शेवटची असेल म्हणून भाकीत केलं होतं. भारतीय जनता तुम्ही समजता त्यापेक्षा बरीच हुशार आहे. तुम्हाला जर बावळट वाटंत असेल तर तिला शहाणं बनवायचा मार्ग दखवावा, ही विनंती. २.
मोदींच्या आरत्या ओवाळायच्या तर ओवाळा स्पष्टपणे, उगाच देशाची जनता जागी झाली वगैरे पोकळ गफ्फा मारु नये.
कर्रेक्ट ! जनता झोपलेलीच आहे. तिला कसं जागं करायचं? कृपया मार्ग दाखवावा ही विनंती. बरं, ते मोदींच्या आरत्या हे काय प्रकरण आहे? मला नीटसं कळलं नाही. जरा ओवाळून दाखवता का, म्हणजे कळेल मला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

(१) http://www

श्रीगुरुजी
Tue, 01/10/2017 - 16:01 नवीन
(१) http://www.maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-nov-8-rs-80000-crore-of-loan-repayment-in-old-notes-i-t-dept/articleshow/56440818.cms नोटबंदीनंतर तब्बल ८० हजार कोटी रूपयांच्या थकीत कर्जाची वसुली झाली आहे. (२) http://www.thehindu.com/business/Economy/Rs.-3-4-lakh-crore-of-tax-evaded-income-deposited-in-banks-post-demonetisation/article17017778.ece?homepage=true As it analyses bank deposits post demonetisation, the Union government has found that an estimated Rs. 3-4 lakh crore of tax evaded income were deposited during the 50-day window provided to get rid of the junked Rs. 1,000 and old Rs. 500 notes. Also, it had come to light that Rs. 25,000 crore in cash was deposited in dormant bank accounts while nearly Rs. 80,000 crore of repayment of loans was done in cash since November 8, 2016 when demonetisation was announced.
  • Log in or register to post comments

दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या

विशुमित
Tue, 01/10/2017 - 18:00 नवीन
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या

विशुमित
Tue, 01/10/2017 - 18:00 नवीन
दोन्ही बातम्यांमध्ये कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याचे नाव नाही सांगितले. ह्या बातमीला आताच अधिकृत मानायचा का? चला ठीक आहे.. काही तरी चांगलं होतंय... आणखी चांगलं होवो ही सदिच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा