चाची ४२०
चाची ४२० तसा जुना चित्रपट आहे , टीव्हीवर अनेकदा लागून गेला आहे ... बहुतेक लोकांनी किमान एकदातरी पाहिला असेल असं वाटतं ... मीही बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता आवडलाही होता पण 1 - 2 आठवड्यांपूर्वी युट्यूब वर पाहिला आणि त्यांनतर मधले मधले सीन असे काही वेळा पाहिले गेल्या 1 - 2 आठवड्यात ... आजच तो ज्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे तो अव्वाई शानमुगी पाहिला .
दोन्ही चित्रपट मिसेस डाऊटफायर या इंग्रजी चित्रपटावर आधारीत आहेत . मिसेस डाऊटफायर मागेच कधीतरी पाहिला होता .
पण चाची ४२० ची सर अव्वाई शानमुगीला नाही आणि मिसेस डाऊटफायरला तर नाहीच नाही . रिमेक मूळ चित्रपटापेक्षा उत्कृष्ट बनवण्याचं श्रेय कमल हसनला द्यावं लागतं .
खरं तर विनोदी चित्रपटावर एवढी स्वतंत्र पोस्ट लिहिण्याएवढा तो भारी वगैरे आहे का असा विचार आला होता मनात ... टीकेची सुद्धा भीती वाटत होती . पण एवढा आवडला आहे तोपण इतक्या वर्षांनी पुन्हा पाहिल्यानंतर तर का ते लिहावंच असं वाटलं .
छोटे छोटे प्रसंग खूप लक्ष देऊन सुंदर चित्रित केले आहेत ... विशेषतः अव्वाई शानमुगी पाहिल्यानंतर तर हिंदी कलाकारांचा अभिनय खूपच चांगल्या दर्जाचा वाटू लागतो . अव्वाई वेगळ्या दिग्दर्शकाने बनवला आहे तर चाची ४२० कमल हसनने दिग्दर्शित केला आहे .. अव्वाई मधले सीन , संवाद , ओव्हरऍक्टिंग यातलं काहीही चाची ४२० मध्ये येऊ दिलेलं नाही ..
दोन्ही चित्रपटांमधल्या त्या - त्या पात्राच्या कलाकाराकडे पाहिलं की प्रत्येक हिंदी कलाकाराने किती अप्रतिम अभिनय केला आहे हे जाणवतं . खुद्द कमल हसनचा अभिनयही चाची ४२० मध्ये अधिक नैसर्गिक आहे .
चाची ४२० मधली मनाला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे कमल हसन / जय आणि त्याच्या मुलीचं दाखवलेलं नातं ... बाप मुलीचं इतकं सुंदर नातं दुसऱ्या कुठल्याही हिंदी मराठी चित्रपटात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही ... अव्वाई मध्ये ते अजिबात जमून आलेलं नाही ... चाची मध्ये छोट्या भारतीचं काम केलेल्या बालअभिनेत्रीने जबरदस्त अभिनय केला आहे आणि कमल हसननेही बापाचं पात्र अव्वाईपेक्षा अधिक चांगलं साकारलं आहे ... दोघांमधली जवळीक आणि केमिस्ट्री इतकी नैसर्गिक दाखवली आहे की खरोखरच वडील - मुलगी आहेत की काय असं वाटावं .... कमल चाची बनून आल्यावर बायको सासरा ओळखत नाहीत पण मुलगी ओळखते , तरी सुरुवातीला तो आपली ओळख झाकण्याचा प्रयत्न करतो पण ती रडकुंडीला येऊन जुनी दोघा - दोघांतलं खास कडवं म्हणते तेव्हा नाटक सोडून देऊन गहिवरून जाऊन तिला उराशी कवटाळतो तो सीन बघताना एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू येतं ....
स्वयंपाकिणीने चटका दिल्यावर ती ज्या पद्धतीने बापाला तक्रार सांगते , मांडीवर बसून ... विश्वासाने की आता माझा बाबा नक्की काहीतरी करेल ते पाहताना खरे बाप - लेक पाहत आहोत स्क्रिन वर असं वाटतं .
छोट्या छोट्या प्रसंगांतून कथेत खोलपणा आणायचा प्रयत्न केला आहे .... पहिल्याच भांडणाच्या सिन मध्ये जेव्हा कमल " मुझे बीबी चाहीए , तुम्हे टीव्ही चाहीए , झगडा किस बात का " म्हणत पडतं घेत भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो संसारात क्लेश होऊ नयेत म्हणून आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे हे दिसतं .
पण पुढे याच सीन मध्ये तो तब्बूवर हात उचलतो ... तेव्हाही तो भांडण मिटवण्याचा करत असलेला प्रयत्न आणि ती अधिकाधिक आक्रमक पवित्रा घेत आहे आणि शेवटी ती नेमकं खूप अपमान करणारं बोलते तेव्हा त्याचा ताबा सुटून हात उचलला जातो ... आणि लगेच क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसतो की हे काय घडून गेलं आपल्या हातून , असा ताबा सुटू दयायला नको होता ... ही इमिजीएट रिऍक्शन सांगते की असा हात उचलला जाणं त्याच्या स्वभावाच्या अगदी विपरीत आहे .... अव्वाई मध्ये असे काहीही पश्चातापाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दाखवलेले नाहीत आणि मारणंही ताबा सुटून नाही तर रागाने जाणीवपूर्वक शिक्षा देण्याकरता मारलं आहे असं वाटतं . ते कमल हसनने चाची मध्ये होऊ दिलेलं नाही .
कोर्टामध्ये मुलीचा ताबा आईकडे देण्यात येणार असल्याचा निर्णय जज देतात तेव्हा अडखळत विरोध करण्याचा प्रयत्न करत " मैं अच्छेसे देखभाल कर सकता हूं ..... " " हर रोज मैं उसका चेहरा देख कर सोया हूं , उसके बिना नही रह सकता " सांगतो... यावेळचा अभिनय अप्रतिम आहे .... त्यातही मान हलवून मुलीला रडू नको म्हणून सांगतो , तीही बापाचं ऐकायचं म्हणून लगेच हाताने अश्रू पुसते पण त्याची मान वळल्यावर आवाज न करता ओक्साबोक्शी रडू लागते तेव्हा क्षणभर चित्रपट आहे याचा विसर पडून जीव कळवळतो .... त्यावेळीही तब्बूच्या चेहऱ्यावर आपण बापमुलीची ताटातूट करत आहोत याचं किंचित दुःक आणि अपराधीभाव जाणवतो .... एवढे बारीकसारीक बारकावे दिग्दर्शकाने लक्षात घेतले आहेत ....
मुलीला सांभाळणाऱ्या बाईसाठीच्या इंटरव्ह्यूला आलेला असताना बाजूला बसलेली बाई सहज मांडीवर हात ठेवते तेव्हा एकदम दचकणं ... अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या अव्वाई मध्ये नव्हत्या त्या कमल हसनने चाची मध्ये ऍड केल्या आहेत .
तब्बूच्या उशीच्या कव्हर मध्ये कमलचा फोटो सापडतो त्यावेळी "पती थे मतलब ? अब नहीं रहे ?" विचारल्यावर ती चटकन " धत् " म्हणते , त्यावेळी अजूनही तिचं आपल्यावर प्रेम आहे हे समजल्याचे भाव कमलच्या चेहऱ्यावर दिसतात ..
ती तो फोटो फाडते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव - अगं_ अगं .... आणि नंतर कधी या बाईला कळणार माझं किती प्रेम आहे तिच्यावर आणि ती समजते तसा मी नाही , कधी मोडलेला संसार सावरणार ..
तिच्या ड्रॉवर मध्ये मंगळसूत्र दिसतं तेव्हाचे भाव ... ती म्हणते ड्रॉवर मध्ये कचरा फार झाला आहे , उद्या साफ करायला आठवण कर तेव्हाचे भाव ...
तिला पिन सापडत नाही तेव्हा मंगळसूत्रात अडकवलेली पिन चाची काढून देते ... मध्यमवर्गीय / वयस्कर स्त्रियांच्या वेषभूषेतले बारकावे टिपले आहेत .
एकूणच चित्रपटात भव्यदिव्य सेट , बंगले गाड्या वगैरे फार नाही ... चाळीचं वातावरण , भाजी बाजाराचा सीन अशी खऱ्या आयुष्याचं चित्रण करणारी दृष्यं जास्त आहेत .... बंगला आहे पण बंगल्याच्या थाटापेक्षा पात्रांवर , संवादांवर लक्ष जास्त केंद्रीत केलं आहे .
अमरिश पुरी यांनी पैशाचा , श्रीमंतीचा गर्व असलेल्या खानदानी वगैरे बिझनेसमन आणि मुलीला कशी परत आपल्याकडे आणली याचा अहम असलेल्या बापाच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे .
परेश रावल आणि ओम पुरी यांच्या भूमिका चित्रपटात किती जान आणणाऱ्या होत्या हे अव्वाई मधला चाळमालक आणि सेक्रेटरी बघितल्यावर समजतं ...
या वयात तुम्हाला जोडीदार हवासा वाटतो तर तुमची मुलगी कशी राहणार अशी एकटी आणखी किती दिवस , तिचा संसार परत नीट सुरू व्हावा याची काळजी नाही वाटत का तुम्हाला असं कमल / चाची अमरिश पुरीना विचारते तेव्हाचा अभिनय अगदी संयत समजूतदार अशा वयस्कर बाईचा उत्कृष्ट अभिनय केला
आहे .
कमल / जयचा टीव्हीवर इंटरव्ह्यू पाहिल्यावर 5 - 7 मिनिटात तब्बूला भेट कशी झाली तिथपासून प्रेमात पडणं , लग्न , एकत्र राहणं त्यातले छोटेसे प्रसंग - मिळून कपडे धुणं मिळून स्वयंपाक करणं , पुढे प्रेग्नन्सी , मुलीचा जन्म , मुलगी मोठी होताना दोघांनी पाहणं , तिघांचे आनंदाचे दिवस असं सगळं डोळ्यासमोरून जातं आणि नकळत डोळ्यातून अश्रू झरू लागतात ... तेच अव्वाई मध्ये स्फुंदून रडणं आणि जुन्या आठवणींऐवजी हिरो हिरोईनचं सतरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कपड्यात फिरून नाचून म्हटलेलं टिपिकल गाणं आहे .
अव्वाई मध्ये सुरुवातीला तो बायको ही कॉमिक पात्र / कटकटी बायको दाखवण्याचा प्रयत्न केला आहे , जी सतत माझ्या वडिलांच्या घरी हे होतं , ते होतं , मी आता या खुराड्यात कशी राहणार आयुष्यभर , कसलं विहिरीचं पाणी प्यावं लागतं अशा सतत तक्रारी करत असते , उलट चाची मधली तब्बू ऍडजस्ट करत आपल्या परीने सुखाने राहण्याचा प्रयत्न करत असताना अमरीश पुरी पद्धतशीर पणे हळूहळू तिच्यात आणि नवऱ्यात दुरावा निर्माण करतो . तब्बूचं पात्र तुलनेने खूप समजूतदार आहे .... अव्वाईतल्या बायकोच्या अभिनेत्रीपेक्षा तब्बूचा अभिनयही खूप संयत आणि तरीही अधिक जिवंत आहे .
कमलचा सासरा चाचीशी बोलत असताना मुलीने आपल्या मनाविरुद्ध गरीब अशा माणसाशी पळून जाऊन लग्न केलं , पण मी तिला आणलीच शेवटी परत ... हळूहळू पध्दतशीर प्रयत्न करून असं बोलून दाखवतो .... त्याचवेळी त्याला हार्ट अटॅक येतो ... ज्या माणसाने आपला संसार मोडण्यात हातभार लावला त्याला वाचवण्यासाठी कमल ट्रॅफिक , गाड्या कशाची पर्वा न करता लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलात ऍडमिट करतो .... इथे परत त्याचा चांगुलपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे ...
विनोदी म्हणूनसुद्धा खूप उजवा आहे ... हलकाफुलका .. खूप जड , ताप नाही डोक्याला .. मधूनच कधीतरी पाहिला तरी सगळे विनोद पाहिल्यावेळ इतकेच फ्रेश वाटतात एवढा सगळ्यांचा अभिनय सुरेख आहे .
अजून पाहिला नसाल तर एकदा नक्की पाहण्यासारखा आहे .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लिहिलेय,
धन्यवाद :)
उत्तम!
हो ..... ते लिहायचं राहून
छान लिहीलंय !
धन्यवाद ...
मला खूप आवडतो
हे माहीत नव्हतं ... बाकी
अहो काय सांगताय? जॉनी वॉकर
आणि चाची ४२० हा जॉनी वॉल्कर
हो खरंच की ... लक्षातच नाही
छान
धन्यवाद :)
या चित्रपटात ओम पुरीचा,
हो :) म्हटलं तर दुय्यम पात्र
छान लिहिलं आहात. सिनेमा देखील
छान लिहिलं आहात. सिनेमा देखील
धन्यवाद
सुंदर लेख!
कमल हसनचा अभिनय सुंदर आहेच,
ये घर हैं या कंजर खाना
हो ... माझे आवडते संवाद
@ nishapari,
पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवणे
असाच
+१ लिहायचं मनावर घ्याच !
मस्तं लिहिलंय nishapari
मस्तच!
ते खुसखुशीत संवाद गुलझार
मी विनोदी चित्रपटांचा फारसा
मर्म
हे भारी आहेय राव ! कसं लक्षात
हायला!
+1