पूर्वेच्या समुद्रात -१४
पूर्वेच्या समुद्रात- १३
पूर्वेच्या समुद्रात -१४
बायकोने चार दिवस पावसात, वीज नसताना, मुलं आजारी पडलेली घरात कामाला बाई नाही अशा परिस्थितीत कशी काढली याचा विचार करून मला फार वाईट वाटत होते. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार चमकला कि मी मूळ नौदलाचा अधिकारी इथे तटरक्षक दलात काही स्वयंसेवक म्हणून अर्ज करून आलो नव्हतो त्यातून मी नौदलाच्या रुग्णालयात कामही करत होतो.असे असताना केवळ एका नियम दाखवून त्यांनी मला नौदलाच्या तळावर घर दिले नाही हा स्पष्ट अन्याय आहे. माझे डोकेच फिरले. तिरीमिरीत मी जहाजावर परत आलो आणि ExO कमांडंट विश्वकर्मा यांच्याशी बोललो. ते म्हणाले कि तुला नौदलाचे घर मिळायला पाहिजे.मी पण त्यांना म्हणालो कि आता विशाखापटणम ला गेल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे कि मला घर दिले नाहीत तर मी काही जहाजावर चढणार नाही. मग माझे कोर्ट मार्शल झाले तरी बेहत्तर आणि मी अतिशय कडक शब्दात हे सांगितले. कमांडंट विश्वकर्मा सर्द झाले. थोडा वेळ चर्चा करून मी माझ्या केबिन मध्ये परत आलो.कमांडंट विश्वकर्मानि जाऊन कमांडिंग अधिकारी यांना हे सांगितले. त्यांचे नौदलाच्या पूर्व मुख्यालयाशी बोलणे झाले कि काय ते माहिती नाही. पण त्यांनी संध्याकाळी मला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि माझी हजेरी घ्यायला सुरुवात केली. मला सुरुवातीला कळेना हे वाकड्यात का शिरत आहेत? मग मात्र मी पण कडक पवित्रा घेतला. ते म्हणाले डॉक्टर तुला नौदलाच्या राजपूत जहाजात पोस्टिंग हवे आहे का? मी म्हणालो चालेल नौदलाच्या जहाजावर गेलो कि निदान मला घर तरी मिळेल. हा बार फुसका निघाल्यावर त्यांनी विचारले कि जर तुझे निकोबार किंवा कॅम्पबल बे ला पोस्टिंग झाले तर?
आता माझ्या लक्षात आले नि याचा बोलविता धनी कोणीतरी दुसराच आहे. मी त्यांना आव्हान देऊन म्हणालो मी एक वैद्यकीय विशेषज्ञ आहे आणि माझे पोस्टिंग जेथे लष्कराचे कोणते तरी रुग्णालय आहे अशाच शहरात होऊ शकते. मी तुम्हाला आव्हान देतो कि माझे पोस्टिंग करूनच दाखवा. आणि त्यातून ते बेकायदेशीर पणे झालेच तर आंध्र उच्च न्यायालयात मी त्यावर स्टे मिळवेन. आणि ती केस निकाली लागेपर्यंत माझे जहाजाचे टेन्युअर पूर्ण होईल. असे स्पष्ट आव्हान दिल्यावर त्यांचे उसने अवसान गळून पडले आणि ते मोठ्या स्नेहाने मला विचारू लागले तुझा प्रश्न काय आहे? मी सर्व राम कहाणी त्यांना सांगितली आणि परत तेच सांगितले कि विशाखापटणम ला गेल्यावर मला घर मिळाले नाही तर मी काही जहाजावर चढणार नाही. माझे पोस्टिंग आय एन एस सरकार वर आहे आणि तेथून मी तटरक्षक दलात नियुक्तीवर आहे. मी "आय एन एस सरकार" च्या दवाखान्यात जाऊन बसेन पण जहाजावर चढणार नाही. म्हणजे मी सुटी न घेता गैरहजर नसेन( absent without leave) पण नोकरीच्या जागी गैरहजर(absent from place of duty) असेन. हा काही फार मोठा गुन्हा नाही. पण सगळी चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल दिल्ली पर्यंत सदर करावा लागेल यानंतर कोर्ट मार्शल होईल त्याला पण सात आठ महिने जातील. त्याचा निकाल अगदी माझ्या विरुद्ध गेला तरी मला फार तर कडक शब्दात समज(REPRIMAND) दिली जाईल.त्याने माझ्या करियर वर कोणताही परिणाम होणार नाही. १ डिसेंबर २००० रोजी मला कमांडर पदाची कालानुरूप बढती मिळणारच आहे. अर्थात कोर्ट मार्शल पूर्ण होईपर्यंत माझे टेन्युअर पूर्ण झालेले असेलच. म्हणजे मी काही जहाजावर येणार नाही.
हि सरबत्ती ऐकून कमांडिंग अधिकारी सर्द झाले. दोन मिनिटे विचार करून मला म्हणाले डॉक्टर विशाखापटणम ला गेल्यावर तुला नौदलाच्या तळावर घर मिळवून देणे याची जबाबदारी मी घेतो. हे बोलणे झाल्यावर आम्ही हस्तांदोलन केले आणि मी बाहेर आलो.
कमांडंट विश्वकर्मा बाहेर भेटले त्यांना हा वृत्तांत सांगितला ते म्हणाले डॉक्टर हे एवढं सगळं तू सी ओ ला ऐकवलंस? मी हो म्हणालो त्यावर ते म्हणाले तू "टफ" आहेस. मी फक्त हसलो.
काही दिवस असेच अंदमान च्या समुद्रात इकडे तिकडे गस्त घालत फिरलो आणि आमची परत जायची वेळ झाली होती. दोन महिने समुद्रात घरापासून दूर खवळलेल्या समुद्रात गस्त घालून सगळे जण वैतागले होते. तेवढ्यात एक संदेश आला. जहाज विशाखापणटम ऐवजी चेन्नैला यायचा हुकुम मिळाला. सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. कारण चेन्नईला तटरक्षक दलाचे मुख्यालय होते आणि तेथे गेले तर दुसरी कोणती तरी कामगिरी गळ्यात पडण्याची शक्यता होती. लोकांना घर सोडून दोन महिने होऊन गेले होते. मधल्या काळात वादळ झालेले होते आपले कुटुंब कसे असेल याची सैनिकांना कोणतीही माहिती नव्हती. पगार खिशात होता पण कुटुंबापर्यंत पोहोचवायचा होता. पोर्ट ब्लेअर वरून मनी ऑर्डर जाण्यास दोन महिने लागत असत त्यामुळे कोणीच पगार घरी पाठविलेला नव्हता. ( तेंव्हा सैनिकांना पगार रोख मिळत असे).
असो, आलीया भोगासी असावे सादर म्हणून सगळे हिरमुसल्या चेहऱ्याने तयार झाले. दोन दिवसांनी आम्ही चेन्नईला पोहोचलो. तेथे परत त्या कोळशाच्या जेट्टी वर उभे होतो. त्यावेळी तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी chief staff officer CSO (Personnel) आणी CSO (OPS)operations ई भेटीसाठी आले. मी बर्यापैकी वरिष्ठ दर्जाचा असल्यामुळे त्यांच्या बैठकीत मला प्रवेश होता. जहाज २ महिने समुद्रात होते तेंव्हा त्याचे तेलपाणी आणि नियतकालिक देखरेख करायची बाकी होती. त्याबद्दल चाललेली बैठक होती. तेथील वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे होते कि हि १२-१४ दिवसांची देखरेख तुम्ही चेन्नैतच उरकून परत पाल्कच्या सामुद्रधुनीत गस्त घालण्यासाठी जावे. कमांडिंग अधिकारी आणि इतर अधिकारी मूग गिळून स्वस्थ बसले होतई, वरीष्ठांसमोर तोंड कसे उघडायचे म्हणून?
मला संताप आला आणि मी त्यांना विचारले कि हि देखरेख विशाखापणटमला केली तर काय होईल? त्यावर मुख्यालयातील अभियांत्रिकी अधिकारी CSO (TECH) म्हणाला कि तसेही करता येईल. यावर कमांडिंग अधिकारी म्हणाले कि सैनिकांची येथेच राहून देखरेख करण्याची तयारी आहे. त्यांच्या बोटचेपेपणाचा मला राग आला. मी कडक शब्दात म्हणालो कि चाळीस पैकी दोन जरी सैनिक विशाखापणटम ऐवजी चेन्नईत देखरेखीला आम्ही "खुशीने" तयार आहोत असे म्हणाले तरी मी आपल्या कमिशन चा राजीनामा देईन.
मी स्पष्टपणे त्या वरिष्ठ अधिकार्यांना म्हणालो कि इथे सैनिक दोन महिन्यांपासून अंदमानच्या समुद्रात काम करीत आहेत. घराशी कोणाचा संपर्क नाही.कुटुंबाला पगार पोहोचवायचा आहे. घरी वादळानंतर काय परिस्थिती आहे हे पहायचे आहे असे असताना तुम्ही इथेच देखरेख करा कसे म्हणता? तुम्हाला सैनिकांची काळजी वाटत नाही का? मी जहाजाचा सैनिक कल्याण अधिकारी( welfare officer) सुद्धा आहे त्या नात्याने मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. सुटी घेऊन किती लोकांना विशाखापणटमला पाठवणार? या ऐवजी तुमची देखरेख विशाखापणटमला करा. निदान सैनिक रोज संध्याकाळी घरी जातील. कुटुंब समवेत काळ घालवतील. त्यांची सुटी पण फुकट जाणार नाही आणि ताजे तवाने झाले कि दोन आठवड्याने जिथे कुठे पाठवायचे तिथे पाठवा.
हि सरबत्ती ऐकून ते वरिष्ठ अधिकारी सुद्धा सर्द झाले पण सुदैवाने त्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला. आणि आम्हाला दुसर्याच दिवशी विशाखापणटमला कूच करण्याचे आदेश मिळाले. त्या बैठकीतील बोलणे आम्हाला चहापाणी देणार्या स्टेवर्डनि ऐकले होते आणि ती बातमी बाकी सैनिकापर्यंत पोहोचली. दुसर्या दिवशी प्रत्यक्ष आदेश आल्यावर मला कितीतरी तट रक्षक दलाच्या सैनिकांनी खाजगीत येउन धन्यवाद दिले. आता मी विशाखापणटमला घरासाठी होणार्या भांडणाला तयार होत होतो.
लष्करात परखडपणे सत्य मान्ड्ल्याबद्दल मला कधीही शिक्षा झाली नाही. उलट कॉर्पोरेट जगतात सत्य बोलणे हा गुन्हा समजला जातो. पराकोटीची शिस्त असली तरी लष्करात मुलकी जगता पेक्षा जास्त लोकशाही आहे.
क्रमशः
Book traversal links for पूर्वेच्या समुद्रात -१४
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा! नेहमीप्रमाणेच हाही भाग
उलट कॉर्पोरेट जगतात सत्य
छान लेख.
वाह ! मान गये उस्ताद !
दबंग खरे काका!!
मला वाटतं की सत्य "कोण"
छान लेख
पराकोटीची शिस्त असली तरी.....
त्यावर ते म्हणाले तू "टफ"
लष्करात परखडपणे सत्य
४ वर्षे कॉर्पोरेट जगाचा
आवडलं
+१
फारच सही!! माझी अजुन हिंमत
लेख आवडला. सरकारी नौकरीत सत्य
मस्त लिहिता आहात
अनुभवकथन आवडले
या धाग्यावर हा विषय अस्थानी
सगळीकडे सगळ्याप्रकारची माणसे
बिका साहेब,
लेखन आवडले.
खरे खरे बोल...
रोचक अनुभव.
+१
लष्करात परखडपणे सत्य
प्रकरण नेहेमीसारखेच वाचनीय.