कोविड-19 माझी डायरी
07 मार्च
एस. पी. कॉलेजमधे एकत्र शिकलेले आम्ही मित्र आज (ब-याच दिवसांनी) भेटतो. प्रभात रस्त्यावरच्या एका हॉटेलात बसून आम्ही रात्रीचं जेवण घेतो, नंतर सुजाता मस्तानीत मस्तानी हाणतो. (आंबा मस्तानीला तोड नाही!) ब-याच गप्पा होतात, पण मला आठवतं तसं करोनाव्हायरसचा विषय निघत नाही.
13 मार्च
आज आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवतो. मॉडर्न कॅफे हे आमचं आवडतं हॉटेल आहे. तिथलं व्हेज कटलेट आणि उपवासाची कचोरी आम्हाला विशेष आवडतात. भरपेट जेवण करायचा कुणाचाच मूड नसतो (आणि तसंही त्या पंजाबी जेवणाला आम्ही जाम कंटाळलोय) तेव्हा मॉडर्न कॅफेवर पटकन एकमत होतं. आज हॉटेलात गर्दी नेहेमीपेक्षा कमी दिसते. 'करोनाला पुणेकर जाम घाबरलेले दिसतात', कुणीतरी म्हणतं आणि मी हसतो. हॉटेलबाहेर पडताना 'आता एक वर्षभर हॉटेलात जायचं नाव काढू नको' असं जर कुणी मला तेव्हा म्हटलं असतं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता का?
17 मार्च
ऑफिसमधे आज खूप म्हणजे खूपच कमी लोक आहेत. एरवी 700/800 लोक असलेल्या आमच्या मजल्यावर आज मला (मी धरून) अंदाजे दहा एक लोकं दिसतात. पण याची एक चांगली बाजूही आहे. एरवी पॅंट्रीमधली दुपारपर्यंत गायब होणारी बॉरबॉन बिस्कीटं आज संध्याकाळ झाली तरी डब्यात जशीच्या तशी दिसतात. मी रिकाम्या ऑफिसचा एक व्हिडिओ काढतो आणि लोकांना पाठवतो. लोक हादरतात. 'तू जरा गंभीरपणे घे हं', मला ऐकविण्यात येतं. खरं तर मला रिकाम्या ऑफिसात काम करायला खूप मजा येत असते, पण मी घाबरतो. राहिलेला आठवडा मी घरूनच काम करतो.
19 मार्च
'येत्या रविवारी, 22 मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ आपण जनता कर्फ्यू पाळूया आणि संध्याकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवा देणा-या आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवूया' अशी सूचना पंतप्रधान मोदी करतात. या आवाहनातला पहिला भाग मला पटतो, पण दुसरा भाग काही केल्या पटत नाही. भारतीयांना प्रत्येक गोष्टीचा सोहळा करायची एक सवय आहे, त्यामुळे इथे काय होणार हे मला स्पष्ट दिसत असतं आणि घडतंही तसंच. संध्याकाळी पाच वाजता थाळ्या बडवणारे, ढोल वाजवणारे, मिरवणूक काढणारे, घोळक्याघोळक्याने फिरणारे लोक पाहून हसू येतं (आणि रडूही).
22 मार्च
ह्या दिवशी मी (दर रविवारसारखा) घरातच असतो. पुण्यातल्या रिकाम्या रस्त्यांचे वरून घेतलेले फोटो, छायाचित्रण व्हॉट्सअॅपवर पहायला छान वाटतं. ही दृश्य पाहून '28 Days Later' ह्या ब्रिटिश सिनेमाची आठवण येते.
25 मार्च
आज गुढीपाडवा. आम्ही गुढी उभारतो खरी, पण त्यात दरवर्षीसारखा उत्साह नसतो. गाठ्या मिळवण्यासाठी काल आम्हाला बरीच धावपळ करावी लागलेली असते. दरवर्षी ऑफिसात डब्यातल्या गार पुरणपोळ्या खाणारा मी या वर्षी मात्र घरी गरमागरम पोळ्या खातो.
01 एप्रिल
यावर्षी मी कुणालाच एप्रिल फूल करत नाही कारण या वर्षी करोनाव्हायरसनंच मला जबरदस्त एप्रिल फूल केलेलं असतं. ज्याला स्वत:लाच वेड्यात काढलं गेलंय तो इतरांना काय वेड्यात काढणार? पोलिसांनी गृप अॅडमिन्सना जबरा दम भरल्यामुळं या वर्षी एप्रिल फूलचे संदेश व्हॉट्सअॅपवर अजिबात येत नाहीत.
04 एप्रिल
सकाळी उठल्यावर आरशात पहाताना, आपलं पोट करोनाव्हायरससारखं पसरत चालल्याचं मला जाणवतं. लॉकडाऊनमधे पहिला बळी पडलेला असतो तो माझ्या जीमचा. मी घरच्यांना सोबत घेऊन रोज सकाळी व्यायाम करायला सुरुवात करतो. घरी जीमइतका चांगला व्यायाम होत नाही, पण काहीच व्यायाम न करण्यापेक्षा हे चांगलंच आहे, नाही का?
14 एप्रिल
पंतप्रधान मोदी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवतात. अर्थात असं घडणार हे जवळपास प्रत्येकालाच माहित असतं. मी नातेवाईकांना, मित्रांना फोन लावतो. मी त्यांचं आणि ते माझं सांत्वन करतात. त्यांच्याशी फोनवर बोलल्यावर जरा बरं वाटतं.
23 एप्रिल
आज लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास एक महिना झालेला असतो. मी घरून काम करत असतो. एक-एक महिना सुट्टीवर असलेल्या लोकांशी बोललं की मला त्यांचा जाम हेवा वाटायला लागतो.
1 मे
आज महाराष्ट्र दिन. पण आजूबाजूला पाहिलं तर मला महाराष्ट्र दीन झालेला दिसतो. (आमचा आपला कंट्री विनोद हो जावईबापू...)
02 मे
आज मी डालगोना कॉफी बनवतो. लॉकडाऊनमधे एकदा तरी डालगोना कॉफी बनवली नाही तर पोलिस तुरुंगात टाकतात असं कानावर आल्यामुळे मी घाबरून ही कॉफी बनवतो. कॉफी ठीकठीकच लागते. लोक हिच्यामागे एवढे वेडे का झालेत हे मला काही केल्या समजत नाही.
8 मे
'रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी अंगावरून गेल्याने मृत्यू' ही बातमी वाचून हृदय कळवळतं. आता रूळ ही काही झोपण्याची जागा नव्हे, पण चालून चालून थकलेल्या ह्या मजूरांना जर पहाटे थोडी झोप घ्यावीशी वाटली तर त्यांना दोष कसा देता येईल? सरकारनं त्यांना औरंगाबादपर्यंत पोचवण्याची सोय केली असती तर...
14 मे
आज आम्ही आमच्या आंब्याच्या झाडावरचे आंबे उतरवतो. मला मार्केटयार्डमधे दरवर्षी भरणा-या आंबा महोत्सवाची आठवण येते...
17 मे
'लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला' अशी बातमी आज येते. मला काहीच वाटत नाही. ही बातमी 'लॉकडाऊन 31 डिसेंबर पर्यंत वाढवला' अशी असती तरी मला काही वाटलं नसतं. एव्हाना मला काही वाटणंच बंद झालेलं असतं.
22 मे
लॉकडाऊनचा आता मला जबरदस्त कंटाळा आलेला असतो. 'आता तो करोना परवडला, पण हे लॉकडाऊन नको' असं मी मनाशी म्हणतो. त्याचवेळी दोनदोन राज्यं पार करून आपल्या गावी चालत जाणारे लोक, घरात खायला काही नसल्यामुळं उपासमारीनं मेलेले ते सोलापुरातले वृद्ध नवरा बायको, आपल्या वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणारी ज्योती, इच्छा असूनही आपल्या वडिलांचा अंत्यविधी न करू शकणारी आणि तो आता तुम्हीच करा असा पोलिसांना आग्रह करणारी मुलं, आठवड्यातले सातही दिवस काम करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलिस यांची मला आठवण येते. यांच्या तुलनेत आपण किती नशीबवान आहोत हे जाणवलं की थोडी लाजही वाटते.
26 मे
पुण्यात करोनाव्हायरसच्या केसेस वेगानं वाढत चालल्याचं मी वर्तमानपत्रात वाचतो. सोबत 'नायडू रूग्णालयातल्या 3 नर्सेसना करोनाची लागण' आणि 'खाजगी रूग्णालयातल्या नर्सेस देत आहेत राजीनामे' ह्या दोन बातम्या आत सापडतात. करोनाव्हायरसच्या केसेसच्या बाबतीत देशात पुण्याचा जवळपास पहिला नंबर असतो. 'कुठलीही गोष्ट असूद्या, आपलं पुणं नेहमी पहिल्या क्रमांकावर पाहिजे' ही घोषणा लोकांनी जरा जास्तच गंभीरपणे घेतल्याचं मला जाणवतं. परिस्थिती सुधारणं सोडा, आता ती अधिकाधिक अवघड होत जाणार आहे हे मला दिसतं आणि मी हादरतो.
त्या रात्री 'मी मॉडर्न कॅफेमधे बसून व्हेज कटलेटची तिसरी प्लेट फस्त करतोय' असं स्वप्न मला पडतं. पण अचानक त्या कटलेटसची वटवाघुळं होतात आणि माझ्याकडं पाहून फिस्कारतात. मी किंचाळत ऊठतो. माझी झोप जी उडते ती उडतेच, नंतर परत काही मला झोप लागत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान.
पाश्वभुमी
अगदी सहमत
सहमत
व्वा, भारी लिहिलंय ! डायरी
आखाडा
+१
माझा रोख
तुमच्या प्रतिसादात काहीच गैर
भावना व्यक्त करण्याचा
तुम्ही थाळ्या बडवल्या का ऑस्ट्रेलीयात ?
.
ऑस्ट्रेलियात थाळ्या बडवल्या
छान लिहीलंय !