✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कर्मविपाक

ढ
ढालगज भवानी यांनी
गुरुवार, 05/02/2013 - 07:32  ·  लेख
लेख
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे. मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे. खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे. एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
20108 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

कर्म रहस्य!

स्पंदना
गुरुवार, 05/02/2013 - 07:47 नवीन
हे तू किंवा आणि कोणी विद्वान जे म्हणता आहात ते ठिक. पण मला एक सांग जेंव्हा मला खडे आणि लोखंडाचा चुरा लागायला लागतो, तेंव्हा तो कुणा तरी एका व्यक्तीमुळे लागतो. म्हणजे त्यासाठी कोणीतरी कारणीभुत ठरते. मग मला माझ्या कर्मभोगाची फळे मिळत असताना त्याला कारणीभुत ठरणारा दुसरा कुनी कर्म करुन ठेवत असतो. मग ते चांगले वा वाईट, पण ते फक्त त्याच्या हातात नसते. मग त्या होणार्‍या कर्माची कारणी मिमांसा न करताच पुढे त्याचा हंडा भरला जातो. हे कसे? समजतय का मी काय म्हणते ते? आज माझ्यावर खुनाचा आळ आला. पण मी जो खून केला आहे तो दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या कर्मभोगाची फळे म्हणुन घडलाय. म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या पुर्वजन्मी जे काही वाईट केले त्याचे फळ म्हणुन त्याला त्याच्या प्रिय व्यक्तीचा खुन होणे पहाणे नशिबी आले. आता यात खुन करणारी मी गोवले गेले, अन ज्याचा खुन झाला आहे तो ही गोवला गेला..हे कसे?
  • Log in or register to post comments

मी एक पुस्तक वाचले होते खरं

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 08:05 नवीन
मी एक पुस्तक वाचले होते खरं पाहता "लिंडा गुडमन" चे "स्टार साइन्स" त्यात तिने एक उदाहरण दिले होते की मेरी ला जॉन ने कधीतरी पूर्वजन्मी दुखावले आहे त्यावर ती या जन्मी त्याला दुखावते मग नंतरच्या कोणत्या तरी जन्मी तो तिला याचे उट्टे म्हणून दुखावतो आणि ही साखळी अशीच चालू रहाते जोपर्यंत की मेरी किंवा जॉन कोणीतरी एकमेकांना न दुखावण्याचा "कॉन्शस" निर्णय घेत नाहीत. म्हणजे "निर्णय स्वातंत्र्य" हे आहे व ते उपयोग करुन कर्माची साखळी तोडता येत. तू प्रश्न विचारला आहेस की मेरी व जॉन हे दोघे या साखळीत कसे गोवले गेले? म्हणजे पहीलं कर्म कोणी कधी सुरु केले? ही साखळी कशी सुरु झाली? या गुंत्याचे टोक कुठे आहे? तर त्याला माझे उत्तर हे की या सर्व गुंत्याचे पहीले टोक कदाचित कोणालाच माहीत नाही. पण हा दिलासा काय कमी आहे की या गुंताड्याचा अंत मी माझ्या एकेक "कॉन्शस" निर्णयाने करु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

नाही पटल.

स्पंदना
गुरुवार, 05/02/2013 - 08:25 नवीन
तूझ्यामते मेरी अन जॉन एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. जन्म मरण्याच्या फेरात ते दोघे असे वागताहेत. पण त्यात आण्खीन बर्‍याच साखळ्या गुंतत जातात. म्हणजे जॉनला दुखावण्यासाठी जॉनच्या मुलाचा मृत्यु. मग तो मुलगापण त्या चक्रात नाही का अडकला? एकुण एका क्ष व्यक्तीला त्याचे भोग भोगाअयला लावण्यासाठी दुसर्‍या य ला पाप करावे लगते. अन मग हे असेच. पुढे पुढे. समज मी निर्णय स्वातंत्र्य घेतले. म्हणजे जॉनचा मुलगा माझ्यावर हल्ला करताना मी माझा निर्णय घेउन त्याचा खुन केला नाही. पण त्या वेळी त्याच्या मुलाने माझा खून केला. मग माझ्या निर्णय स्वतंत्र्याने दुसरा एक आपला घडा भरुन रिकामा झाला. माझी त्यातुन सुटका नाही. कारण आता त्याचा पापाचा घडा मझ्या घड्यात रिकामी होणार. नाही उलगडत. अन नाही पटत. उगा मान हलवुन जय गुरु देव की! म्हणन आजवर नाही जमल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

सगळा केयॉस (गुंता) आहे हे

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 08:40 नवीन
सगळा केयॉस (गुंता) आहे हे जाणवतं. असा गुंता ज्याचा अंत ना पार लागतो. (डझंट मेक सेन्स) मग अशी एखादी थिअरी (सिद्धांत) वाचनात येतो व आशा वाटते की उत्तर सापडेल. पण सिद्धांतास पूरक किंवा विरुद्ध मुद्दे हे विचारमंथनातून आलेच पाहीजेत. त्या मुद्द्यांचे खंडन अथवा पूरक वाद घालता येणे हे शेवटी प्रत्येकाच्या बुद्धीवर व (मी म्हणेन ईश्वरी कृपेवर)अवलंबून आहे. मला पूरक उदाहरणे देणे नाही जमलं कदाचित अन्य कोणी करु शकेल. लेटस सी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

असे नाही

आनन्दा
Fri, 05/03/2013 - 00:03 नवीन
असे नाही. जेव्हा तुम्ही त्याला न मारण्याचा निर्णय घेता, तेव्हा तो विषय तुमच्यापुरता संपतो. त्याच्यासाठी तो चालुच राहणार अहे. परंतु त्यातही बहुधा एक मेख आहे. तुम्ही त्या कर्मात लिप्त असाल तरच ते तुम्हाला लागू होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आपला निर्णय महत्वाचा असतो .

सामान्य वाचक
गुरुवार, 05/02/2013 - 09:47 नवीन
डेस्टिनी ने जो ढोबळ मार्ग आखून दिला आहे, त्यावरून च जायचे, का आपली विचारबुद्धी वापरून योग्य तो मार्ग निवडायचा , हे आपल्याच हातात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

एकतर नियती आहे किंवा नाही

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 10:10 नवीन
नियती मानली तर आपल्या हातात काही नाही. नियती आहे हे आपण आपल्या बुद्धीनंच ठरवल्यावर पुन्हा
आपली विचारबुद्धी वापरून योग्य तो मार्ग निवडायचा'
हे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

मला एक सांगा

इरसाल
गुरुवार, 05/02/2013 - 09:21 नवीन
छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.
मौल्यवान वस्तुंनंतर जर चहा किंवा तत्सम पेय ओतले तर सगळ्यात आधी ते बाहेर निघेल याला आपण काय म्हणणार ?
  • Log in or register to post comments

बरोबर.

सामान्य वाचक
गुरुवार, 05/02/2013 - 09:42 नवीन
त्याच क्रमाने वस्तू बाहेर येतील असे नाही. पण ज्या वस्तू आपण भरल्या आहेत, त्या नक्कीच बाहेर येतील. क्रम पुढे मागे होऊ शकतो. ज्याप्रमाणे एका झाडाचे सगळे आंबे एकाच दिवशी पिकत नाहीत, त्याप्रमाणे सगळी कर्मे एकदम पक्व होत नाहीत. काही काही कर्मे संचित , काही प्रारब्ध अशी असतात. म्हणे काही फळे आत्ताच, नजीकच्या काळात मिळतात , तर काही संचित घेऊन आपण पुढच्या जन्मात जातो. (हिंदू अध्यात्मा नुसार, २-२ =० होत नाही. म्हणजे, जी काही चांगली & वाईट कर्मे आपण करतो, ती एकमेकास संतुलित करत नाहीत. दोन्ही प्रकारच्या कर्माची वेगवेगळी फळे भोगावी लागतात. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अहो कसलं कर्म आणि कसला पाक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/02/2013 - 09:37 नवीन
व्यक्तिगत जीवनात पूर्वीचं काही आलेलं नसतं त्यामुळे कर्माची फळ वगैरे पुढच्या जन्मात काही येतील असं काही मला वाटत नाही. आपल्या या सध्याच्या वास्त्वजीवनातील विविध प्रवृत्तीं पुढील जन्मात काही किरकोळ गोष्टी घेऊन येतात म्हणे, चार दोन उदाहरणे आपल्याला दिसतात आणि या चार दोन उदाहरणाच्या पुष्ठ्यार्थ काहीएक तत्त्वाज्ञानाचा आधार दिला जातो आणि आपण अशा कर्मविपाकाचं ओझं उत्तम आनंदी जीवनात घेऊन फिरतो. मला हे सर्व थोतांड वाटतं, अर्थात आपलं वाचन किती, जगण्याचा अनुभव किती त्यामुळे असल्या गोष्टी मला फार प्रभावित करत नाही आणि आपण त्यावर बोलू नये ही माझ्यासाठी चांगली गोष्ट. बाकी, भगवंतांनीच म्हटलंय तेव्हा त्याचा योग्य अर्थ घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. कर्मणोह्यपि बोद्ध्वं बोद्धवं च विकर्मणः अकर्मश्च बोद्ध्व्यं गहना कर्मणो गति: (४/१७) कर्म विकर्म व अकर्म असे तीन प्रकार कर्माचे सांगितले जातात. संकल्प करुन फळाच्या इच्छेने जे कर्म केले जाते त्याला कर्म म्हणतात. चांगले संकल्प व चांगली कर्मे करीत जावीत, फळे मिळतील. विकर्म म्हणजे विशेष कर्म म्हणजे मन लावून केलेले कर्म आणि अकर्म म्हणजे अभिमान आणि फळ सोडून केलेले कर्म आणि ही सर्व कर्म करतांना तुमच्या कर्मामुळे किती लोकांचा फायदा झाला हे जग पाहते आणि तुम्ही कर्म कसे केले तो (असेल तर) देव पाहतो, असे म्हणून आपापल्या मार्गाने जात राहावे असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रारब्ध, संचितकर्म वगैरे

मोदक
गुरुवार, 05/02/2013 - 09:51 नवीन
प्रारब्ध, संचितकर्म वगैरे बाबींचा विचार केला तर आपण जन्माला आलो त्या क्षणापूर्वीच्या गोष्टी / घटनांकडे जावे लागते व इथूनच कदाचित माझ्या विचारांमध्ये गोंधळ होण्यास सुरूवात होते. शास्त्रीयतेच्या कसोट्यांवर या गोष्टींना काहीच अर्थ नाही परंतु २ + २ = ४ इतक्या सोप्या व सरळ नसलेल्या अनेक गोष्टी या जगामध्ये आहेत याचाही जवळून अनुभव घेतला आहे. (गोंधळलेला) मोदक.
  • Log in or register to post comments

माणसाला सतत छळणार्‍या आणि अनुत्तरित अशा प्रश्नावर चर्चेला

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 09:58 नवीन
सुरूवात झाली! कर्मसिद्धांत ज्यानं मानला तो कायमचा बंधनात अडकला. त्याची उत्सफूर्तता हरवली. त्यानं स्वछंद गमावला. आपण असहाय्यपणे नियतीच्या हातात आहोत या धारणेनं तो पूर्णपणे परस्वाधिन झाला. मानसिक गर्तेत सापडला. तो कधीही मुक्त होणं शक्य नाही. कर्मसिद्धांताला कोणताही वास्तविक आधार नाही. सर्व स्मृती, धारणा, विचार, भावना, मेंदूशिवाय कुठेही नाहीत. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. कोणत्याही क्षणी, मागे घडलेल्या घटनेचा कोणताही संदर्भ न आणता पूर्ण स्वातंत्र्यानं वस्तुनिष्ठ निर्णय घेणं कर्मबंधाच्या कल्पनेतून मुक्त करतं.
  • Log in or register to post comments

कै च्या कै

नगरीनिरंजन
गुरुवार, 05/02/2013 - 10:00 नवीन
सगळ्यात पहिल्या जीवाला/मनुष्याला काहीही पूर्वसंचित नसल्याने त्याचे नशीब कोरे (म्हणजे ना सुख ना दु:ख) होते का? गेल्या ६०-७० वर्षांमध्ये माणसांची संख्या दुपटीहून जास्त वाढली आहे याचा अर्थ जीवांचे इतर योनींमधून मनुष्ययोनीत येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. म्हणजेच या काळात प्राण्यांमध्ये पुण्य करण्याची लाट आली आहे असे सिद्ध होते का?
  • Log in or register to post comments

पहील्या प्रश्नाचे उत्तर

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 10:19 नवीन
पहील्या प्रश्नाचे उत्तर "गुंत्याचे पहीले टोक माहीत नाही" असे वर दिलेले आहे. हा सर्व पसारा कसा सुरु झाला माहीत नाही. दुसरा प्रश्न तर्कशुद्ध आहे की अनेक पशुयोनीतील जीव अचानक मनुष्ययोनीत येऊ घातलेत की काय? तर मग तर्काच्या लाइनवर बोलायचं झालं तर अशी कल्पना करा की एक हौद आहे ज्यात वरुन पाणी पडतं आहे (पशूयोनीतील जीव मनुष्य योनीत येणे) व खालील लहानशा छिद्रातून वाहूनही जात आहे (मनुष्ययोनीतील जीवांना मोक्ष मिळणे). मग कदाचित अशी असू शकेल की प्राण्यांमध्ये पुण्याचीलाट वगैरे आलीली नसून नेहमीप्रमाणेच प्राणी मनुष्य बनत आहेत परंतु मनुष्ययोनीतील जीव मात्र "तथाकथित" कलीयुगामुळे मोक्षप्राप्ती करुन घेऊ शकत नाहीयेत ज्यामुळ हौदात पाणी साठत चाललय. वरील थिअरी वर मी विश्वास करते असे नाही पन तुम्ही १ तर्क तर मी ७ तर्क एवढच. चला नवरा ओरडतोय. गुड नाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ननि, पुनर्जन्म किंवा तत्सम

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 10:21 नवीन
ननि, पुनर्जन्म किंवा तत्सम कल्पना मानायच्या तर तुम्ही उपस्थित केलेल पॅरेडॉक्सिक प्रश्न हे फक्त पहिले दुसरे किरकोळ प्रश्न आहेत. नीटपणे विचारले तर प्रश्नांचं शतक नक्की होईल. या सर्व गोष्टी मनुष्याला एक थियरी म्हणून मानायला आवडतात. कारण त्या सोपं एक्स्प्लेनेशन देतात. एरवी आपल्याला (मानवजातीला) एकूणच शष्प काही माहिती नाही किंवा समजणं शक्य नाही हे स्वीकारणं हजारपट कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>असे होताक्षणी मनुष्याचा

विसोबा खेचर
गुरुवार, 05/02/2013 - 10:08 नवीन
>>असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे तो कसा काय? जो जन्माला येतो तो स्वत:चंच पिंप कसं काय भरू शकतो?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 10:17 नवीन
हेच म्हणतो. मुळात ही संकल्पना मानायची म्हणजे मागचा जन्म अन पुढचा जन्म मानला पाहिजे. या दोन्ही गोष्टी चालू जन्माच्या जाणिवेच्या (कॉन्शसनेस) कक्षेबाहेरच्या आहेत. त्या मानल्या की मग काहीही मानता येईल. तसंही काही मानायला हरकत नाही. ही थियरी नाही तर ती थियरी. आपल्याला थियरी पाहिजे हे महत्वाचं. बाकी पाककृती समजून लेख उघडला होता. कर्माच्या फळांना पाकात घालण्यापेक्षा सध्या हापूसचा सीझन आहे त्यांचा मोरांबा केलेला उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पिंप वगैरे काही नाही

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 10:29 नवीन
सर्व स्मृती मेंदूत असते आणि माणूस गेला की मेंदू पूर्णपणे फॉरमॅट होतो. नवजात अर्भकाला नवी कोरी हार्डडिस्क मिळते. सिद्ध बालवत होतो याचा अर्थ तो स्मृतीचा उपयोग केवळ डेटाबेस म्हणून करतो. त्यातून स्वतःच व्यक्तिमत्त्व सक्रिय होऊ देत नाही. हे एकदा लक्षात आल्यावर या क्षणी, प्राप्त प्रसंगात वागतांना, मनाच्या गुंत्यात न अडकता तुम्ही पूर्ण स्वातंत्र्यानं कोणताही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता आणि ते खरं स्वातंत्र्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सर्व स्मृती मेंदूत असते आणि

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 10:34 नवीन
सर्व स्मृती मेंदूत असते आणि माणूस गेला की मेंदू पूर्णपणे फॉरमॅट होतो.
हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असूनही असे बॅरियर क्रॉस करताना फॉर्मॅट झालेली डिस्क घेऊन जन्माला आलेले अनेक मनुष्यप्राणी ही जन्म्-मृत्यू बॅरियरच्या दोन्ही बाजूंची थियरी ठामपणे जाणू आणि मांडू शकतात. :) हे कसं? वदतोव्याघातच वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमतच...पण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/02/2013 - 10:39 नवीन
>>> प्रत्येकाच्या बाबतीत होत असूनही असे बॅरियर क्रॉस करताना फॉर्मॅट झालेली डिस्क घेऊन जन्माला आलेले अनेक मनुष्यप्राणी मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही काही फायली नव्याने पुना इन्स्टॉल केल्यावर दिसू लागतात. अनेकदा आपण असे किस्से वाचतो आणि ऐकतोही. विज्ञान अशा गोष्टींचं कसं निराकरण करतं काही माहिती नाही. पण, माझ्यासारखे पुन्हा अशा किश्श्यांनी अनुभवांनी डळमळीत होतात राव. :( -दिलीप बिरुटे नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 10:47 नवीन
मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही काही फायली नव्याने पुना इन्स्टॉल केल्यावर दिसू लागतात. अनेकदा आपण असे किस्से वाचतो आणि ऐकतोही. विज्ञान अशा गोष्टींचं कसं निराकरण करतं काही माहिती नाही. पण, माझ्यासारखे पुन्हा अशा किश्श्यांनी अनुभवांनी डळमळीत होतात राव.
तेही ठीक. पण मग मूळ थियरी सत्य ठरत नाही. मागची मेमरी शिल्लक राहून यंदाच्या व्यक्तिमत्वात फेरफार घडवण्याचे बरेच चान्सेस राहतात. शिवाय विज्ञान हे आत्ता ज्या अर्थाने प्रचलित आहे ते अशा गोष्टींवर काही करु शकणार नाही. किंबहुना कोणतीही जिवंत माणसाची विचारशक्ती हे सोडवू शकणार नाही. याचा अर्थ बुद्धी कमी आहे असा नसून या सर्व गोष्टी जाणण्यासाठी आपण चौकट भेदू शकत नाही. "लंघून चौकट पार निघाया बघतो" हे खरं.. लंघून जाण्यासाठी नुसतीच पंखांची फडफड करत बसतो झालं. प्रत्यक्ष लंघू शकत नाही कारण आपलं अस्तित्वच "आत" आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिस्क फॉरमॅट हा रूल आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 10:50 नवीन
काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो. अर्थात तो डेटा त्याचा नसतो त्यामुळे पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी फोल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) काही अनफॉरमॅटेड डेटा

मोदक
गुरुवार, 05/02/2013 - 10:58 नवीन
१) काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो. अर्थात तो डेटा त्याचा नसतो. २) त्यामुळे पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी फोल आहे १ व २ ही दोन विधाने परस्परविरोधी वाटत नाहीयेत का..? एकदम टोकाचा निष्कर्ष कसा काय काढलात..? २ मध्ये "पुनर्जन्म ही कल्पना या अपवादात्मक स्थितीवर आधारित असली तरी" म्हणजे या कल्पनेचे अस्तित्व तुम्ही मान्य करत आहात ना..? मग ती फोल कशी काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

परस्पर विधानं आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/02/2013 - 11:18 नवीन
>>> १ व २ ही दोन विधाने परस्परविरोधी वाटत नाहीयेत का..? तुमच्यासारखीच ती विधानं मला परस्पर विरोधी वाटतात आणि संक्षीं साहेबांना वाटतात की नै म्हैती नै. नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

परस्परविरोध नाहीये

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 13:34 नवीन
कुणाला तरी अनफॉरमॅटेड डेटा मिळाला याचा अर्थ मृत व्यक्तीनं पुन्हा जन्म घेतला असं नाही. फक्त एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झाली. आणि ते देखील अपवादात्मक आहे. नॉर्मली मृत्यू म्हणजे कंप्लीट डेटा फॉरमॅट. आणि तसं आहे म्हणून तर अस्तित्व नित्यनूतन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन"

मोदक
गुरुवार, 05/02/2013 - 15:15 नवीन
संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन" असेल तर ते संपूर्णपणे नवे हवे. एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झाली मग हे अस्तित्व नित्यनूतन कसे? (अवांतर - तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे, "क्ष" या व्यक्तीचे मरणापूर्वी एखादे फ्रॅक्चरचे ऑपरेशन झालेले असावे व हातामध्ये रॉड बसवलेला असावा, "य" या बालकाने "क्ष" च्या स्मृतीसह जन्म / पुनर्जन्म घेतला सेल तर "य" च्याही हातामध्ये रॉड असावाच असे काही अपेक्षीत आहे का..?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नॉर्मली प्रत्येकाला फ्रेश हार्डडिस्क मिळते

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 18:04 नवीन
आपण प्रत्येक जण त्याचं उदाहरण आहोत. त्यामुळे अस्तित्व सदैव नित्यनूतन निर्मितीच करतं. अपवादात्मक स्थितीत एखाद्याला, गेलेल्या व्यक्तीचा अनफॉरमॅटेड डेटा मिळाला, याचा अर्थ गेलेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला असा होत नाही. फिजिकल गोष्टी संक्रमित होऊ शकत नाहीत. केवळ स्मृती संक्रमित होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

थोडी गुंतागुंत आहेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/02/2013 - 11:16 नवीन
काही गोष्टी येतात हे गवि आणि क्षीरसागर साहेब मान्य करत आहेत असे दिसते. काही डेटा परस्पर अनोळखी माणसाच्या जीवनात कसा घुसतो. अर्थात हे सर्व कर्मविकाचे फळ आहे, असे समजायचे कारण नाही. पण, या जन्म-पुनर्जन्म या कल्पनेत म्हणा की काही अन्य म्हणा काही गोष्टी येतात, मग ती अपवादात्मक स्थिती असो की अन्य काही. असे वाटायला लागते. -दिलीप बिरुटे नीलकांत, भल्या माणसा अरे ते अक्षररंग आणि खरडी दिसायची सोय दे ना भो...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/02/2013 - 12:37 नवीन
@काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी तरगंत राहतो >>> कुठे तरंगत राहातो? अवकाशात का? की अणखि कुठे तरी!? याला पुरावा काय? कुणी तपासलं हे? @आणि तो नवजात अर्भकाच्या (किंवा एखाद्या जीवंत व्यक्तीच्या) मेंदूत सरळ पेस्ट होतो.? १ तरी पुरावा द्या हो!!! काय प्रचंड अचरटपणा आहे हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अत्रुप्त आत्म्याशी प्रचंड

बॅटमॅन
गुरुवार, 05/02/2013 - 12:56 नवीन
अत्रुप्त आत्म्याशी प्रचंड सहमत!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

१ तरी पुरावा द्या हो!!!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 13:37 नवीन
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे. अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काही लोकांना त्यांच्या जीवनात

मोदक
गुरुवार, 05/02/2013 - 15:22 नवीन
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे. मग पुनर्जन्म फोल कसा..??? अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे. जरा आणखी डीटेल्स देता का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ न घडलेल्या घटना सरळ सर्व

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/02/2013 - 16:18 नवीन
@ न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे.>>> या पुराव्यांची जंत्री सादर करा,तुंम्ही सगळ्या या प्रांतातल्या समर्थकांनी एकत्र येऊन १ मोठ्ठी आघाडी उघडा आणी हा वाद एकदाचा हतावेगळा करा. दुसरं असं की वरिल पद्धतीचा पुरावा हा संपूर्ण नाही.विश्वातल्या अश्या घटनेबद्दल सायंटिफिकली प्रूफ म्हणता येइल अश्या स्वरुपाचा तर हा पुरावा अज्जिब्बात नाही. तेंव्हा आकाशात हे कुठे काय असतं? हे तिथे जाऊन फोटो किंवा तत्त्सम काहि पद्धतिने पकडलं आहे का? या बद्दल गेल्या हव्यातितक्या वर्षात अखिल आध्यात्मवादी जगतात कुणी काही प्रयत्न केले आहेत का? याची उत्तरे द्या. इहलोकात घडणार्‍या घटनांनी तुंम्ही ज्याला परलोक वगैरे समजता तिथल्या कार्यकारण भावाची अचुक उत्तरे शोधण्याची आर्धी पद्धत तुंम्ही उपरोक्त मुद्यातून दाखवली.अता उरलेली अर्धी दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही आणि मी एकच गोष्ट सांगतोय:

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 17:47 नवीन
कर्मसिद्धांत असं काही नाही. थोडं पुढे जाऊन, कुणाचाही पुनर्जन्म होत नाही हे मी स्पष्ट केलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मृत्यु?

अर्धवटराव
गुरुवार, 05/02/2013 - 22:25 नवीन
शरीरात वावरत असताना सत्य गवसो वा नाहि, मृत्युनंतर मेंदु नाहि, म्हणजे विचार नाहि... म्हणजे मुक्त अवस्था. मग सत्य शोधनाचा आटापिटा कशाला? मृत्युपश्चात तसंही जाणिव निराकार. होईल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पूर्वसंचित तात्या. मला जेवढं

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 15:57 नवीन
पूर्वसंचित तात्या. मला जेवढं आठवतय त्याप्रमाणे पूर्वसंचित = आपल्या पूर्वीच्या अनेकानेक जन्मांच्या कर्मांचे गाठोडे व या जन्मीचे प्रारब्ध = अ‍ॅक्टीव्ह (कार्यरत) होणारे पूर्वसंचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आम्ही

तिमा
गुरुवार, 05/02/2013 - 18:17 नवीन
आम्ही आमच्या पिंपात फक्त 'बिअर' भरुन ठेवली होती, त्यामुळे आम्हाला ती भरपूर मिळते आहे. या जन्मात सोकाजीरावांची सर्व कॉकटेल्स भरुन ठेवण्याचा मानस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हाहाहा

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 18:20 नवीन
हाहाहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

कर्मविपाक

सुधीर
गुरुवार, 05/02/2013 - 10:24 नवीन
(टिळकांनी गीतारहस्यात खूप चांगलं समजवलय, तरीही) माझाही कर्मविपाकावर फारसा विश्वास नाही. पण मला असं वाटतं ते मानल्यामुळे वा न मानल्यामुळे फारसा फरक पडत नाही. आपल्या नशिबामागे वा कमनशिबामागे काय कारण असलं पाहिजे ह्यावर जास्त चर्चा करून काही उपयोग नाही. त्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारून पुढे कसं जायचं हा विचार करणं जास्त उपयोगी ठरेल असं वाटतं. यावर स्टिव्हन कव्हींच्या ७ सवयी मधली पहीली सवय मला जास्त भुरळ घालते. ते म्हणतात, घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात, पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं. पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. असो जाणकारांचे प्रतिसाद वाचण्यास उस्तुक!
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/02/2013 - 10:29 नवीन
घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात, पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं. पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. -दिलिप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

हेच सागायचे होते.

सामान्य वाचक
गुरुवार, 05/02/2013 - 10:45 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 15:58 नवीन
खरय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

घडणार्‍या घटना आपल्या हातात नसतात,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 10:54 नवीन
>पण त्याला काय प्रतिसाद द्यायचा हे नक्कीच आपल्या हातात आसतं.
पण प्रतिसाद दिल्यावर दिलेल्या प्रतिसादाचे परिणाम पुन्हा आपल्या हातात नसतात. ते पुन्हा निसर्गनियमांना धरून असतात. वागतांना हेतू शुद्ध ठेवा. त्याचा एकमेव नियम आहे : `मी कुणाला वापरणार नाही आणि स्वतःला कुणाला वापरू देणार नाही'. यामुळे मोहात अडकण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्ही पूर्णपणे ऑथेंटिक होता, मग परिणामांची तमा बाळगण्याचं काही कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

आंतरजालिय भाषेत....

मन१
गुरुवार, 05/02/2013 - 12:57 नवीन
आंतरजालिय भाषेत बोलायचं तर धागे कोणते कुणी टाकावेत हे आपल्या हातात नसतं. त्यांना किती/कोणते प्रतिसाद द्यायचे (किंवा दुर्लक्ष करायचं) हे आपल्या हातात असतं. पुन्हा येणारे उपप्रतिसाद आपल्या हातात असतीलच असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

:)

सुधीर
गुरुवार, 05/02/2013 - 13:34 नवीन
अगदी खरं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

+१

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/02/2013 - 13:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

बरोबर .. सुधीर

विटेकर
Fri, 05/03/2013 - 15:39 नवीन
यालाच भगवंताने पुरुषार्थ असे म्हंटले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

बेसिक प्रश्न

पैसा
गुरुवार, 05/02/2013 - 12:53 नवीन
मी म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? मोक्ष का मिळवायचा? मोक्ष्/मुक्ती मिळाली किंवा न मिळाली तर मला काय फरक पडेल?
  • Log in or register to post comments

रमतारामाचा लेख "पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न"

मन१
गुरुवार, 05/02/2013 - 13:08 नवीन
रमतारामाचा एक लेख "पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न" ह्यातील काही भागाशी संबंधित वाटला http://www.misalpav.com/node/19118
  • Log in or register to post comments

कर्माची फळे, बरी, वाईट,

मनीषा
गुरुवार, 05/02/2013 - 13:36 नवीन
कर्माची फळे, बरी, वाईट, कडू, गोड, आंबट प्रत्येकालाच मिळतात.. पण ज्या जन्माची त्याच जन्मात .. आता आयसीआयसीआय चे लोन घेतले आणि एच डी एफ सी ला पेमेंट केले तर तुमचे पैसे जातील पण आयसीआयसीआय चे लोन कसे फेडले जाईल ? ते तसेच राहणार नाही का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा