तरुणपणी सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक स्वप्ने पाहिली. म्हणजे अगदी लहानपणी रेल्वे इंजीन ड्रायव्हरपासून कळायला लागल्यावर विमानाचा पायलट ते सैन्यअधिकारी किंवा एअरफोर्स पायलट अशी विविध रोमांचकारी आणि कालसापेक्ष, प्रकृतीनुरूप सतत बदलणारी स्वप्ने पाहिली. पण नियती मला पाहून हसत होती. ती म्हणत होती, 'बेट्या, मला विसरतो आहेस. तुला मीच घडविणार आहे.'
प्रथमवर्ष विज्ञानला कॉलेजला दांड्या मारून चित्रपट पाहणे आणि अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष ह्याचा परिपाक म्हणून नापासचा शिक्का बसला. अर्थार्जनाची घाई आणि चालून आलेली संधी पकडून नोकरी सुरू केली. पण तिथले वातावरण, मित्रमंडळी, साहेब ह्या सर्वांचे शिक्षण आणि पगारवाढीची (पक्षी : प्रगतीची) आपली गती अत्यंत क्षुल्लक असणार, ही बोचणी मनास लागली आणि पुन्हा एकवार शिक्षणाचा ध्यास घेतला. ऑफिसातल्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल आणि इतरांच्या निदान 'बरोबरीत' यायचे असेल, तरी पदवी मिळविणे गरजेचे होते. मॅट्रिकनंतर सात वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. (तोपर्यंत टायपिंग, टेलेक्स ऑपरेटिंग, असे फुटकळ कोर्स करीत राहिलो. पण जाणवले, हे काही खरे नाही, गड्या, पदवी पाहिजेच.) पण ह्या वेळी गरजेनुसार वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आणि जमले की राव! चार वर्षात बी.कॉम. झालो. हात आकाशाला पोहोचले. घरी आई-वडिलांनाही वाटले, वाया गेलेला मुलगा 'लाईनीवर' आला. कॉमर्स करतानाच कामानिमित्त आमच्या कंपनीच्या प्रशस्त EDP खात्याला भेटी व्हायच्या. तिथले वातानुकूलित कक्ष, स्वच्छता, टापटीप, शांतता हे एक वेगळेच विश्व खुणवायला लागले.
इथे प्रवेश मिळवायचा तर निदान IBM कार्ड पंचिंग शिकले पाहिजे, हे जाणवून इंटरला असतानाच कार्ड पंचिंग अभ्यासक्रम पुरा केला. पंच ऑपरेटरची नोकरी मिळवायला सर्वसाधारणपणे ८००० की डिप्रेशन स्पीड आवश्यक असतो, तिथे माझा स्पीड १२००० होता. म्हणजे आपल्याला EDPत नक्की प्रवेश मिळणार ह्या आत्मविश्वासाने तिथल्या साहेबांना भेटलो. मराठी गृहस्थ. आपुलकीने मला बसवून घेतले आणि पहिला प्रश्न केला, "महत्त्वाकांक्षा काय आहे?" ह्या प्रश्नाला मी तयार नसलो तरी माझे स्वप्न मी बोलून दाखविले. "प्रोग्रॅमर अणि नंतर अॅनालिस्ट व्हावे अशी इच्छा आहे." ते म्हणाले, "गुड. तुम्ही नोकरी करून इंटर करता आहात. स्वप्नही चांगले आहे. पण नंबर १) आपल्याकडे मशीन ऑपरेटरमधून प्रोग्रॅमर निवडण्याची पॉलिसी नाही. ऑपरेटर म्हणून आलात तर ऑपरेटर म्हणूनच निवृत्त व्हाल. तेव्हा प्रोग्रॅमर म्हणूनच यायचा प्रयत्न करा. नंबर २) प्रोग्रॅमरसाठी आपल्याकडे फक्त ग्रॅज्युएटच घेतात. तेव्हा आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करा. नंतर मला येऊन भेटा." हिरमुसलो मी. पण साहेबांच्या आपुलकीच्या सल्ल्याने भारावलोही होतो. कोबोल प्रोग्रॅमिंगचे वर्ग सुरू केले. दिवसभर ऑफीस, संध्याकाळी कॉलेज आणि नंतर ८ वाजता प्रोग्रॅमिग वर्ग. सकाळी ७ वाजता घर सोडले की रात्री ११ वाजता घरी. ग्रॅज्युएशन आणि प्रोग्रॅमिंग झाल्याबरोबर पुन्हा साहेबांना भेटलो. "या पेठकर.' साहेबांच्या ह्या वाक्यानेच साहेब आपल्याला विसरलेले नाहीत असा सुखद अनुभव आला. मी दोन्ही प्रमाणपत्रे दाखविल्यावर "२ महिन्यांनी मी तुम्हाला ट्रेनी प्रोग्रॅमरसाठी अपॉईंट्मेंट लेटर पाठवतो." असा विश्वासही त्यांनी दिला. मी हवेत तरंगत घरी आलो. त्या चिल्ड वातावरणात मी टाय वगैरे लावून माझ्या टेबलवर बसलो आहे वगैरे सुखासीन स्वप्नांना कुरवाळत होतो. पण नियती मला हसत होती. म्हणत होती, 'अरे गड्या, तुझ्यासाठी माझ्या मनात वेगळेच प्लान आहेत.'
माझे पूर्वीचे एक साहेब आखातात, एका मोठ्या कंपनीत अगदी वरच्या हुद्द्यावर कार्यरत होते. त्याच्या भावाचा मला ऑफिसात फोन आला. "मला येऊन भेट." संध्याकाळी त्यांच्या घरी त्यांना भेटलो तर म्हणाले, "मनोजभाईंनी (माझ्या पूर्वीच्या साहेबांनी) तुला गल्फमध्ये बोलावलंय. जातोस का?" त्या काळचे (१९८१) गल्फचे वेड, तिथे नोकरी मिळण्यातली दुर्धरता आणि सहज चालून आलेली संधी ह्या सर्वाचा विचार करून मी तत्काळ होकार भरला आणि गल्फच्या तयारीला लागलो. सर्वात आधी EDPच्या बॉसना भेटून त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले, त्यांच्याच मित्राने (माझ्या पूर्वीच्या साहेबांनी) दिलेल्या नोकरीच्या ऑफरबद्दलही सांगितले. त्या सज्जन माणसाने मला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणाले, "नक्की जा. कुठेही तुझी प्रगतीच होईल."
मस्कतात अकाऊंट्स खात्यात आलो. त्या काळी इथे काँप्यूटर्स नव्हते. सर्व ऑफिस कारभार मॅन्युअल होता. प्रोग्रॅमर व्हायचे माझे स्वप्न भंगले. ९ वर्षे नोकरी केली. आकडेमोडीत मन रमत नव्हते, पण पगार बरा होता. पहिला फ्लॅट झाला. लग्न झाले. आयुष्याला स्थैर्य येत असतानाच, (फ्लॅट झाल्यामुळे) आता आयुष्यात थोडी जोखीम उचलून ह्या नीरस आकडेमोडीच्या आयुष्यातून बाहेर पडावे असा विचार मनात घोळू लागला, अस्वस्थ करू लागला. ऑफिसात मराठी-अमराठी राजकारण चालू होतेच. माझ्या नोकरीवर त्याचा थेट परिणाम होत नसला, तरी प्रगती खुंटल्यासारखी झाली होती. त्या तिरिमिरीत नोकरी सोडून एक किराणा दुकान विकत घेतले आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आता मीच माझा बॉस होतो. माझ्या आयडियाज मी स्वतःसाठीच राबवू शकत होतो. सर्व व्यवस्थित चालू होते. पण नियती खूश नव्हती. म्हणत होती, 'तू योग्य वाटेवर आहेस, पण मला तू ह्या व्यवसायात नको आहेस.'
बर्यापैकी बाळसे धरू लागलेला माझा दुकान व्यवसाय लवकरच इराक-कुवेत लढाईमुळे विसकळीत व्हायला लागला. सुरू केलेला व्यवसाय, सप्लायरकडून उधारी आणि गिर्हाइकांकडून (कँप सप्लाय) रोख अशा अटींवर बहरत होता. पण लढाईचे वातावरण निर्माण झाले आणि सप्लायरने उधार देणे बंद करून रोखीची मागणी सुरू केली आणि सगळ्या कँप्सनी उधारी मागायला सुरुवात केली. (बाजारातील आर्थिक अस्थिरतेमुळे). माझा कॅश बॅलन्स कोसळला आणि माझ्या व्यवसायाचा बालमृत्यू झाला.
दुकान सुरू करण्याआधी मला एका गुजराथी अनुभवी व्यावसायिकाने सल्ला दिला होता, 'व्यवसाय करायचा असेल तर ज्याची तुला आवड असेल अशा क्षेत्रातला व्यवसाय कर. म्हणजे व्यवसाय उभारणीच्या सुरुवातीच्या काळात जी प्रचंड अंगमेहनत आणि मानसिक ताकद लागते, ती मिळविण्यासाठी आवडीचा व्यवसायच असावा. म्हणजे दिवसाचे २४ तास कमी पडतात पण श्रम जाणवत नाहीत, उत्साह कमी होत नाही आणि आवश्यक ऊर्जाही टिकून राहते.' अत्यंत मोलाचा सल्ला होता, पण तो गंभीरपणे न घेण्याची चूक मी केली. त्याचा परिणाम नोकरीच्या सेवानिवृत्तीच्या फायद्याची सर्व रक्कम हवेत विरण्यात झाला. थोडीफार क्षुल्लक रक्कम हाती उरली होती, त्यात काय व्यवसाय करावा/करता येईल ह्या विचारांनी मेंदूला भुंगा लागला होता. नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायात उडी घेतली, तेव्हापासून 'ह्या गाढवाने घोडचूक केली आहे' असे माझ्या तोंडावर आणि मागून बोलणारे मित्र (?) 'बघा मी म्हणालोच होतो' अशा शेरेबाजीने माझ्या पश्चात होणार्या चर्चा रंगवीत होते. पण त्याच्या नकारात्मक परिणामांनी खचून न जाता, 'काय करता येईल' ह्या सकारात्मक विचारांवर मी माझे लक्ष केंद्रित केले. सर्वच जण माझ्या विरोधात, टीकेत, शेरेबाजीत सामील नव्हते. भावनिक आणि आर्थिक आधार देणारेही होते. त्या माझ्या गुजराथी व्यावसायिक मित्राने दिलेल्या सल्ल्यावर मी पुन्हा विचार करू लागलो. काय आहे माझी आवड? माझी हॉबी? आणि थोडाफार अनुभव? तर ते होते 'खाणे आणि खाद्यपदार्थ बनविणे'. तेव्हा ठरवले - कॅफेटेरिया काढायचा. मला अत्यंत प्रिय आणि मस्कतात विशेषत्वे न मिळणारी गोष्ट होती.... 'पावभाजी'. तेव्हा ठरले, बटाटेवडे, वडापाव, पावभाजी, चाट, मिसळ, साबुदाणा वडा, रगडा पॅटीस इत्यादी, त्या काळी बाजारात उपलब्ध नसलेले, खास मुंबईचे पदार्थ घेऊन मस्कतच्या 'खाऊ' कॅनव्हासवर आपले चित्र रेखाटायचे.
व्यवसायाची काही माहिती नव्हती. स्टाफ किती लागेल, कुठून गोळा करायचे.. काहीच माहीत नव्हते. एक मित्राने अंधेरीच्या रामकृष्ण हॉटेलचा संदर्भ दिला होता. पण मी जिथे जिथे पावभाजी मिळते, तिथे तिथे जाऊन स्वतः चव तपासून मला आवडली तर त्या त्या कारागिराला भेटून "येतोस का मस्कतला?" असे विचारायचो. मला शक्यतो मराठी माणसे हवी होती. पण अनुभव चांगला येत नव्हता. मराठी कुक तुमच्यावर विश्वासच ठेवत नाही. त्याच्याकडे पासपोर्ट तयार नसतो. त्याला आई-बायको-मोठा भाऊ 'परवानगी' देत नाही. रामकृष्ण हॉटेलच्या मॅनेजरने एका मलबारी कुकचा पत्ता दिला आणि माझी भेट घडवून आणली. त्याला 'येतोस का?' विचारल्यावर लगेच 'हो' म्हणाला. 'पासपोर्ट आहे का?' विचारल्यावर खिशातून काढूनच दाखवला. मराठी माणसे आणि मलबारी कारागीर यांच्यातला हा फरक मनाला फार लागला. संध्याकाळी त्याच्या उपाहारगृहास भेट देऊन त्याच्या हातची पावभाजी खाऊन पाहिली. मस्त केली होती. लगेच त्याची निवड करून व्हिसा मागवला आणि त्याला बरोबर घेऊनच मस्कतला परतलो. जागा आधीच घेतली होती. त्याने पावभाजी आणि मी बटाटेवडे करणे आणि मी बाहेर मांडलेली चार टेबले सांभाळणे सुरू केले. मी कस्टमरची ऑर्डर घ्यायचो. बटाटेवडा, वडापाव बनवायचो, टेबलवर सर्व्हिस करायचो आणि टेबल साफही करायचो. जास्तकरून गिर्हाइके गुजराथी होती. त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलल्यामुळे आणि मालकच सेवा देतो आहे हे पाहून त्यांचे मत चांगले होत गेले. पदार्थांची चवसुद्धा अप्रतिम, इतरत्र न मिळणारी होती. त्यामुळे शब्दाने शब्द पसरत गेला आणि हळूहळू गिर्हाइके वाढू लागली. नवीन गिर्हाइके येत होती, त्याचबरोबर आधी आलेले पुन्हा पुन्हा येत होते, ही एक चांगली निशाणी होती. किरकोळ व्यवसायाच्या एका पुस्तकात मी वाचले होते की 'नवीन गिर्हाइके मिळण्याबरोबरच आधीची गिर्हाइके टिकून राहणे हेच वाढत्या व्यवसायाचे लक्षण असते.' ते घडत होते, हे उत्साहवर्धक होते. पण त्याचबरोबर फक्त दोन-तीनच पदार्थांवर कॅफेटेरिया चालविण्यापेक्षा अजून काय देता येईल यावर विचार करता माझ्या माहितीतल्या एका बेकरीवाल्याने त्याचा भाचा समोसे चांगले बनवितो असे सांगितले. लगेच त्याला बोलावून घेतले. त्याचबरोबर त्याला चाट पदार्थ शिकविले आणि बटाटेवडे, पावभाजी याबरोबरच इतर सहा नवीन पदार्थ सुरू झाले. लोकांच्या पसंतीस उतरले. आणखी दोन माणसे आणून मिसळ, साबुदाणा वडा, लस्सी वगैरे वगैरे काही पदार्थ मेन्यूत वाढविले. त्याचबरोबर टेबलवर सर्व्हिस करायला चार वेटर्स आले होते. मी मोकळा झालो. तसे गिर्हाइकांशी संवाद साधणे, त्यांची मते आजमावणे इ.इ.इ. सुरू केले. त्याने गिर्हाइकांना बरे वाटायचे. तक्रार कोणाची नव्हतीच. व्यवसाय रुजला. चांगले नाव झाले. माझे पाहून नवनवे व्यावसायिक माझ्यासारखेच पदार्थ घेऊन स्पर्धेसाठी आजूबाजूला उतरले, पण नशिबाने मी टिकून राहिलो. बहुतेकांना आपले चंबुगबाळे आवरावे लागले. ह्यात नुसते माझे व्यवसाय कौशल्य नव्हते, तर मला मिळालेली माणसे मेहनती आणि आत्मीयतेने काम करणारी होती. ज्या पदार्थांची जी चव मी त्यांना शिकविली, ती तशीच तंतोतंत त्यांनी बनविली आणि त्यात सातत्य राखले. त्यानंतर अनेकांच्या सूचनेबरहुकूम आणखी एक कॅफेटेरिया टाकावा असा विचार मनात आला. आणि नियतीने कपाळावर हात मारून घेतला.
दुसरा कॅफेटेरिया सुरू करताना थोडा वेगळेपणा हवा म्हणून 'चायनीज' मेन्यू आणला. थेट नेपाळला भेट देऊन कुक आणला. जागाही अशी सुंदर मिळाली होती की बस्स! हायवेवर एका टेकडीवर सुंदर गार्डन आणि पार्किग प्लेस असलेली जागा. तिथे कॅफेटेरीया सुरू केल्यावर काही दिवसातच समजले की तिथे डोंगर उतारावर जी वनस्पती होती, त्यात उडणारी बारीक बारीक झुरळे अंधार पडल्यावर बाहेर पडायची. गिर्हाइकांना त्रास होऊ लागला. कीटकनाशक औषधे मारून पाहिली, पण २-३ दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे. तो कॅफेटेरिया बंद करावा लागला. जागा निवडताना २-४ खेपा झाल्या होत्या, त्या सर्व दिवसा झाल्या होत्या. तेव्हा हा त्रास जाणवला नाही. पण कॅफेटेरिया सुरू झाल्यावर जाणवला. परिस्थिती माझ्या हाताबाहेरची होती. नुकसान झाले.
दुसरे एक उपाहारगृह चालवायला घेतले. तिथे स्थानिक भागीदाराची हाव, त्याचे कर्मचारी आणि माझे कर्मचारी अशी भांडणे आणि अचानक वाढविलेले भाडे ह्याचा शेवट ते उपाहारगृहही बंद करण्यात झाला. पुन्हा परिस्थिती माझ्या हाताबाहेरची होती. मी चवीवर, सेवेवर नियंत्रण ठेवू शकत होतो, पण भागीदाराची हाव आणि मूर्ख कर्मचार्यांची राजकारणे ह्यावर माझे नियंत्रण नव्हते, पण व्यवसायाचे पाय ओढण्यास हे कारणीभूत होते.
शेवटी बिनाभागीदारीत मी तिसरे उपाहारगृह सुरू केले. पुन्हा मुंबईवारी चांगले चांगले गढवाली कुक्स आणले. मेन्यू चांगला होता. पण ह्या वेळी मस्कत देशाचे अर्थकारण गंडले. भले भले व्यावसायिक नुकसानीत गेले आणि संपूर्ण मार्केटला मरगळ आली. कित्येकांच्या नोकर्या गेल्या. ह्या देशातील भारतीय लोकसंख्या घटली. माझ्या नव्या व्यवसायालाही फटका बसला. धंदा गुंडाळावा लागला. जुना धंदा तगला. नुकसानीत गेलेल्या ह्या सर्व धंद्यांचा अभ्यास केल्यावर जाणवले - मा़झी धोरणे, व्यावसायिकता चुकत नव्हती, तर काही अनपेक्षित घटनांचा अपरिहार्य परिणाम मला भोगावा लागला. पण पुन्हा नवे धाडस न करण्याचे ठरवून मी माझ्या पहिल्या कॅफेवरच लक्ष केंद्रित केले. धंदा वाढवला. मार्केटही सुधारले. पुन्हा भारतीयांची वर्दळ वाढली. धंद्याला बरकत आली. बर्याच मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा चांगली जागा मिळाली, म्हणून एक ब्रँच सुरू केली आहे. नशिबाने तीही सुरळीत चालली आहे.
कॅफेटेरियात सुरू केलेल्या व्यवसायाला एव्हढे यश येत गेले की जागा अपुरी पडू लागली. ऐन जेवणाच्या वेळी गिर्हाइके अर्धा अर्धा, पाऊण पाऊण तास ताटकळू लागली आणि आता हा धंदा मोठ्या जागेत नेण्याची नितांत आवश्यकता भासू लागली. दोन नवीन उपाहारगृहांची जागा मिळविली आहे. सुरक्षित जुगार खेळतो आहे. नवीन जागेत पुन्हा नव्याने गिर्हाइके मिळविण्याची चिंता नाही. आहे हाच व्यवसाय मोठ्या जागेत जाणार आहे. त्यामुळे आहे त्याच गिर्हाइकांना चांगल्या प्रतीची सेवा, जास्तीचा मेन्यू आणि मोठ्या जागेमुळे सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असल्याने गिर्हाइके ताटकळण्याची शक्यता नाही. शिवाय आज मार्केटात नॉनव्हेज उपाहारगृहांमध्ये मलबारी, पंजाबी, अरेबिक उपाहारगृहे खूप आहेत, पण मराठी नॉनव्हेज उपाहारगृह नाही. ती कमी भरुन काढण्यासाठी मराठी मालवणी-गोवन उपाहारगृहांची मुहूर्तमेढ रोवतो आहे. माझ्या अनुभवानुसार मराठी नॉनव्हेज जेवणासाठी जसे मराठी खवय्ये आसुसले आहेत, तसेच कर्नाटक, गोवा, केरळ इथले खवय्येही मराठी जेवण पसंत करतात. त्यामुळे ही दोन्ही उपाहारगृहे चांगला धंदा करतील असा माझा कयास आहे.
आत्तापर्यंतच्या माझ्या व्यवसायाच्या यशाचे गमक शोधायला गेले, तर मला वाटते चवीचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, नशीब आणि त्याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे सेवावृत्ती. उपाहारगृह व्यवसायाला ह्या सर्वांची जोड अत्यावश्यक ठरते. थोडेफार कौशल्यही लागते - जसे गिर्हाइकांशी संवाद, त्यांच्या तक्रारींचे योग्य निवारण, चवीतील सातत्य, तुमच्या कर्मचार्यांशी तुमचा संवाद आणि त्यांच्या आपापसातल्या संबंधांवर नियंत्रण. चवीचे ज्ञान आणि नशीब दैवजात असले, तरी इतर कौशल्ये आपल्याला अनुभवातून आत्मसात करावी लागतात. कॉमर्सच्या अभ्यासक्रमात शिकलो होतो की 'Customer is always right.' हे तत्त्व मनात ठसवूनच व्यवहार करावे लागतात. गिर्हाइकांकडून क्वचित येणार्या अवास्तव मागण्याही नाकारताना सौम्यता आणि धोरणीपणा अंगीकारावा लागतो. कुठल्याच गिर्हाइकाला कायमस्वरूपी नाराज करून नाही चालत. 'Bad word spreads fast.' वेगवेगळ्या विषयांवरील वाचन आणि तत्कालीन घटनांची माहिती ही गिर्हाइकांशी बोलताना उपयोगी पडतात. गिर्हाइके खुशीत असली की शिक्षण, व्यवसाय, राजकारण, इतिहास, कविता कुठल्याही विषयावर तुमची मते अजमावतात. तुम्ही सर्वज्ञ असण्याची गरज नाही, पण प्रत्येक विषयावर दोन वाक्ये बोलून विषय चालू ठेवण्याचे किंवा आपल्याला माहीत असलेल्या विषयाकडे वळविण्याचे कौशल्य असावे लागते. कित्येक गिर्हाइकांना 'ऐकणारा कान' हवा असतो. प्रत्येक गिर्हाइकाची गरज ओळखून तदनुरूप संभाषण धोरणे आखावी लागतात. शेवटी सर्वात महत्त्वाचे - उपाहारगृह व्यवसाय हा सेवा व्यवसाय आहे. त्यामुळे ह्या व्यवसायात सेवावृत्ती ही प्रथम गरज आहे.
हे झाले जनरल माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या इथल्या वाटचालीबद्दल. उपाहारगृहांचा सेटअप कसा असतो, आपण उपाहारगृहात जाऊन टेबलला बसतो आणि आलेल्या माणसाला काय हवे काय नाही ते सांगतो, त्याचे पुढे काय होते? आपली ऑर्डर कोण कशी हाताळतो? ह्याबद्दल थोडी माहिती घेऊ या.
उपाहारगृहाचे (मध्यम पातळीच्या) कर्मचारी कुठला कोर्स वगैरे केलेले प्रशिक्षित वगैरे नसतात. अनुभवाच्या जोरावर कौशल्य आत्मसात केलेले असतात. प्रशिक्षित कर्मचारी मध्यम आकाराच्या उपाहारगृहांना परवडणारच नाहीत. त्यांना मोठी हॉटेल्सची (जिथे राहण्याची व्यवस्था असते) उपाहारगृह, रिसॉर्ट्स, उच्चभ्रूंची महागडी उपाहारगृह इथे भरपूर मागणी असते आणि मेहेनतान्यातही वेतन + कमिशन असे पॅकेज असते. पुण्याच्या अँब्रोशिया वगैरे ठिकाणी आणि मद्य सर्व्ह करणार्या तत्सम उपाहारगृहात मुख्य शेफ, किचन सुपरव्हायझर, सर्व्हिस कॅप्टन इ.इ.ना वेतन + कमिशन असते. तिथल्या पदार्थांचे दर भरमसाठ असल्याकारणाने त्यांना ते परवडते. त्यात शेफला कमिशन सर्वात जास्त. तो महिन्याला ६० ते ७५ हजारापर्यंत कमवितो (इ.स. २००५). पण त्याचबरोबर दर शनिवार-रविवारचा व्यवसाय काही लाखात होण्याची हमीही तो देतो. त्यात कमी आल्यास त्याच्या जॉबवर गदा येऊ शकते. एका शेफच्या हाताखाली चार कुक्स असतात. प्रत्येक कुकला एक असिस्टंट असतो, त्याखाली हेल्पर्स आणि शेवटी स्वीपर्स असतात. मुख्य शेफवर प्रचलित पदार्थांची चव उच्च दर्जाची ठेवणे, नवीन पदार्थ बनविणे, पदार्थाचे कॉस्टींग करून सेल प्राईस ठरविणे, मार्केटमधून आणलेल्या/येणार्या प्रत्येक जिन्नसाचा दर्जा सांभाळणे, कुक्सना नवीन किंवा जुने प्रचलित पदार्थ शिकवून तसे ते करतात की नाही ह्यावर लक्ष ठेवणे वगैरे जबाबदार्या असतात. असिस्टंट कुक्स हे पूर्ण कुक्सच असतात, पण अनुभव कमी असतो. ते कुककडून पदार्थ शिकत असतात. बनवत असतात. जेव्हा ऑर्डर्स जास्त असतात, तेव्हा काही पदार्थ ते स्वतंत्रपणे पण कुकने शिकविल्याबरहुकूम बनवत असतात. घाईगर्दीच्या वेळी डाल फ्राय, डाल तडका, जिरा राईस, मटार राईस, व्हेज पुलाव वगैरे सोपे पदार्थ पटापट बनवून मुख्य कुकचा भार हलका करतात. ग्रीन सॅलड, बुंदी रायता, मसाला पापड, सूप्स, स्टार्टर्स वगैरे बनवायचे काम त्यांच्याकडे असते आणि त्याच वेळी मुख्य कुक जो पदार्थ बनवत असेल, त्याला लागणारी सामग्री स्वतः काढून देणे किंवा हेल्परतर्फे काढणे हे त्याचे काम असते. हेल्पर चुकला तर असिस्टंट कुक मुख्य कुकच्या शिव्या खातो. कित्येक कुक अगदी आय-मायसुद्धा काढतात. पण तो बिचारा मूग गिळून सर्व ऐकून घेतो आणि पुन्हा चूक न करण्याचा कानाला खडा लावतो. कारण त्याला मुख्य कुकच्या हाताखाली शिकून तिथेच किंवा इतरत्र मुख्य कुक बनायचे असते. बाहेर जेव्हा हॉटेल गिर्हाइकांनी खच्चून भरते (सुट्यांच्या दिवशी), तेव्हा किचनमध्ये रणकंदन माजलेले असते. बाहेर, डायनिंग हॉलमध्ये गिर्हाइके बसतात. तिथे, स्टाफपैकी एक तर स्वीपर असतो. तो जमीन साफसफाई बघत असतो. कुठे काही खरकटे, पाणी वगैरे वगैरे सांडले की लगेच ती जागा पुसून स्वच्छ करावी लागते. एकतर ती ओल, खरकटे इतरांच्या पायाने सर्वत्र पसरू नये आणि कोणी गिर्हाईक, पदार्थांचे ट्रे घेऊन धावपळ करणारे वेटर्स घसरून पडू नयेत. दुसरे असतात टेबल पुसून, पाण्याचे ग्लास ठेवणारे, रिकामे ग्लास भरलेल्या ग्लासेसने बदलणारे. त्यानंतर ऑर्डर घ्यायला येणारे. त्यांना उपाहारगृह परिभाषेत 'कॅप्टन' म्हणतात. हे प्रसन्न चेहर्याचे, पदार्थांचे ज्ञान असणारे, गिर्हाइकांशी रॅपो जुळविणारे, गिर्हाइकांना चांगले चांगले पदार्थ सुचविणारे, जेवणार्या ग्रूपमधील सदस्यसंख्या पाहून पदार्थांच्या क्वांटिटीबद्द्ल सल्ला देणारे, नव्या पदार्थांची शिफारस करणारे.. एकूणात गिर्हाइकाचा उपाहारगृहातील अनुभव अविस्मरणीय बनविण्यासाठी हातभार लावणारे असतात. गिर्हाइकाचे पुन्हा त्या उपाहारगृहात येणे-न येणे (पदार्थ आवडूनही) बर्याचदा ह्यांच्या वर्तणुकीवर अवलंबून असते. हा माणूस पक्का सेवावृत्तीचा असावा लागतो. कॅप्टन हा डायनिंग हॉलमध्ये सर्व्हिस देणार्या सर्व स्टाफचा इनचार्ज असतो. कॅप्टनने लिहून घेतलेली ऑर्डर डायनिंग हॉल इनचार्जकडे जाते. तो ती POS Systemला (पॉइंट ऑफ सेल) फीड करतो आणि एक प्रिंटेड ऑर्डर हाती येते. त्याला KOT (Kitchen Order Token किंवा Ticket) असे म्हणतात. ही KOT तो वेटर किचन इनचार्जकडे देतो. तो ती पदार्थ बनवायच्या ऑर्डरमध्ये लावून ठेवतो. असिस्टंट कुक्स सतत ह्या येणार्या KOTs वर लक्ष ठेवून त्याबरहुकूम सामान बनविण्याचे व्होकल सिग्नल कुक्सना देत असतात. शिवाय लागोपाठ ३-४ KOTमध्ये जे कॉमन पदार्थ असतील, त्यांची एकत्रित क्वांटिटी सांगत असतात. म्हणजे, ३ बटर पनीर, २ आलू पालक, ४ दाल तडका वगैरे वगैरे. आणि मग कुक काय प्रथम करतो आहे ते पाहून त्या त्या पदार्थाला लागणारे जिन्नस काढून देणे - उकडलेल्या भाज्या, पनीर, शिजवलेला पालक, शिजवलेली डाळ इ.इ. एकेक प्लेटच्या हिशोबाने काढून देतो. कुक त्याच्या हातच्या कौशल्याने त्यात आवश्यक त्या ग्रेव्ही, मसाले, बटर, क्रीम, काजूपेस्ट वगैरेंचे प्रमाणबद्ध मिश्रण वापरून अंतिम पदार्थ बनवून बाहेर पाठवतो. वेटर्स ते पदार्थ त्या त्या टेबलपर्यंत पोहोचवितात. जी KOT पूर्ण झाली, म्हणजे त्यातील सर्व पदर्थ बनवून झाले की ती KOT टोच्याला लावून ठेवली जाते आणि पुढची ऑर्डर बनवायला घेतली जाते. ऑर्डर दोन प्रकारच्या असतात. एक रेग्युलर, दुसरी रनिंग. रेग्युलर म्हणजे आपण जी सुरुवातीला ऑर्डर देतो ती. ती आलेल्या इतर ऑर्डर्सच्या क्रमाने बनविली जाते. दुसरी म्हणजे, आपण जेवताना की 'बाबा ही भाजी कमी पडते आहे' किंवा 'आणखी ४ रोट्या पाहिजेत', 'स्वीट पाहिजे' इ.इ.इ. - म्हणजे जेवताना मधूनच लागलेले पदार्थ, ह्या ऑर्डरला 'रनिंग' ऑर्डर म्हणतात. म्हणजे गिर्हाईक जेवते आहे आणि हे पदार्थ पाहिजेत, ते लगेच बनवून द्यावे लागतात. उपलब्धतेनुसार मुख्य कुक किंवा असिस्टंट कुक ते पदार्थ लगेच बनवून देतात. गर्दीच्या वेळी किचन स्टाफला एकमेकांशी बोलायलाही फुरसत नसते. प्रत्येक जण प्राण कानात आणून येणारे व्होकल सिग्नल उचलून कामे करीत असतात. तेव्हा बाहेर आपल्या टेबलावर वेळच्या वेळी स्वादिष्ट जेवण येते आणि आपण खूश होऊन वेटरला टिप देतो. ही टिप एका बॉक्समध्ये जमा केली जाते आणि महिन्याच्या शेवटी सर्व स्टाफमध्ये वाटली जाते. वेतन + कमिशनवाल्यांचा त्यात शेअर नसतो.
मध्यम साईजच्या उपाहारगृहासाठी - म्हणजे उडप्याचे उपाहारगृह किंवा एखादी खानावळ किंवा साधारण १००-१२५ गिर्हाईक क्षमतेच्या उपाहारगृहासाठी २५ ते ४० कर्मचारी लागतात. अँब्रोशियासारख्या उपाहारगृहाला १२५च्या घरात कर्मचारी लागतात. मुख्य शेफ आणि मुख्य कुक्स सकाळी ११ ते ३ आणि संध्याकाळी ५ ते १२पर्यंत ह्या वेळेत कार्यरत असतात. असिस्टंट कुक्स २-३ तास आधी येऊन तयारी करतात. वेगवेगळ्या बेसिक ग्रेव्हीज बनवायच्या - पांढरी ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही, पालक पेस्ट; भाज्या चिरून शिजवून ठेवायच्या - गाजर, फरसबी, फ्लॉवर इ.इ., काही नुसत्या चिरून ठेवायच्या - कांदा, मिरच्या, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण वगैरे; ऐन वेळी वापरायच्या मश्रूम, मटार इ.इ.इ., मसाल्यांचे बॉक्स भरून ठेवायचे; हळद, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, काही शेफचे पर्सनल मसाले, आख्खे मसाले (काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ, जायपत्री, धणे, जिरे, उडीद डाळ, तीळ) इ.इ.इ. मुख्य कुक आले की सर्व तयारीवरून एक नजर फिरवितात. अजून काय पाहिजे नको सांगून कामाला लागतात.
ह्या इन हाऊस सर्व्हिसव्यतिरिक्त बाहेरच्या पार्टी ऑर्डर्सही असतात. त्यात पार्ट्यांचे छापील मेन्यू असतात. त्या मेन्यूतून पदार्थ निवडायला गिर्हाइकांना कधीकधी मार्गदर्शन लागते ते करणे, किती माणसांची पार्टी आहे, त्यात व्हेज किती, नॉनव्हेज किती, लहान मुले किती वगैरेंचा हिशोब लावून अंदाजाने पदार्थ बनवावे लागतात. ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचते करून शेफिंग डिशमध्ये लावून ३ तास तरी अन्न गरम राहील ह्याची व्यवस्था लावायची. अन्न गरम ठेवणारी भांडी (शेफिंग डिशेस), अन्न वाढायला चमचे, ते ठेवायला प्लेट्स, पाण्याचे ग्लास, डिस्पोजेबल प्लेट्स बाऊल्स, चमचे, पेपर नॅपकिन्स वगैरेंची मांडामांड करावी लागते. मध्यमवर्गीय पार्ट्यांमधे दोन भाज्या, एक डाळ किंवा उसळ, पोळ्या, व्हेज पुलाव, एक सलाड, पापड, लोणचे, गोड पदार्थ असे ९-१० पदार्थ असतात, तर अजून जरा उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमधून वरील पदार्थांना २-३ पर्याय, सूप, स्टार्टर्स, शीतपेय असा जास्तीचा मेन्यू असतो. कधी सेल्फ सर्व्हिस असते, तर कधी त्यांना वाढप्यांची सर्र्व्हिस लागते. वेळच्या वेळी ही सर्व व्यवस्था करून अन्नपदार्थ पोहोचवून, पार्टी संपल्यावर सर्व आवरून, खरकटी भांडी वगैरे उपाहारगृहात आणायला स्टाफला रात्रीचा एक वाजतो. अशा वेळी अशा पार्टीची खास टिप स्टाफला द्यायची प्रथा असते. ती मालक स्वतः देत असतो. गिर्हाईकाला चार्ज केली जात नाही.
रात्री उपाहारगृह बंद करायच्या वेळी सर्व किचन धुवून साफ करावे लागते. आठवड्यातून एकदा तर थेट छतापर्यंत साबूच्या पाण्याने धुवून, कोपर्याकोपर्यात कीटकनाशके फवारावी लागतात. बाहेरचा हॉलही रोज कचरा काढून साबूच्या पाण्याने धुवावा लागतो. ८ कर्मचार्यांच्या दोन-तीन टीम बनवून ही कामे आलटून पालटून वेगवेगळ्या टीमने करायची असतात, म्हणजे सर्वांचा उत्साह टिकून राहतो. महिन्यातून एकदा सर्व पंखे, एसी फिल्टर्स स्वच्छ करावे लागतात. सगळ्यांचे गणवेश रोजच्या रोज लाँड्रीत धुवायला जातात किंवा घरी वॉशिंग मशीन असेल तर इस्त्रीला जातात.
एखादा कर्मचारी आजारी असेल तर त्याला डॉक्टरकडे नेऊन औषधोपचार, विश्रांती द्यावी लागते. महिन्यातून एकदा त्यांची नखे, वाढलेले केस कापण्यासाठी आठवण करून द्यावी लागते. रोजच्या रोज दाढी केली आहे की नाही हे तपासावे लागते. वैयक्तिक स्वच्छता काटेकोर पाळली जाते की नाही ह्यावर लक्ष ठेवावे लागते. इथे दर दोन वर्षांनी सरकारी तपासण्या असतात. संसर्गजन्य रोग, एचआयव्ही तपसणी होते. (अगदी माझीही).
ह्या सर्व रामरगाड्यात पदर्थांची चव, स्वच्छ्ता आणि कर्मचार्यांची वर्तणूक ह्या सर्वावर मालकालाच लक्ष ठेवावेच लागते. रँडमली पदर्थांची चव पाहणे, गिर्हाइकांच्या तक्रारींकडे व्यक्तिशः लक्ष देणे आणि त्या दूर करणे, येणारा कच्चा माल आणि त्याची बिले तपासणे, कुठे काही गैरव्यवहार तर होत नाही ना ह्यावर लक्ष ठेवणे आदी कामे मालकाला करावी लागतात.
हल्ली इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात बर्याच गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. POS systemवर रोजचा सेल, कुठल्या पदार्थाला किती मागणी आहे, कोणता वेटर जास्त सेल करतो आहे, कुठल्या कुकच्या कुठल्या पदार्थाला गिर्हाइकांची विशेष पसंती आहे हे सर्व कळते. KOTमुळे किचनमधून गेलेला प्रत्येक पदार्थ 'चार्ज' केला जातो आहे की नाही इत्यादी माहिती सहज मिळू शकते. CCTV कॅमेर्यांमुळे मालकाला एका ठिकाणी उभे राहून स्टोअर रूम, किचन, डायनिंग हॉल, कॅश वगैरे सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य होते.
उपाहारगृह व्यवसाय हा खाण्यापिण्याशी आणि त्यातून आनंद उपभोगण्याशी निगडित आहे. तेव्हा त्या विषयाच्या अनुषंगाने माझी आणखी काही निरीक्षणे आहेत, जी उपाहारगृहाला लागू आहेत, तसेच दैनंदिन जीवनात घरच्या जेवणाशीही संबंधित आहेत. एक तर आपण पदार्थाच्या चवीचा आनंद केव्हा घेऊ शकतो? तर जेव्हा आपल्याला कडकडून भूक लागलेली असते. भूक लागली असता अन्नसेवन केल्यास पदार्थाची चव, त्यापासून मिळणारा आनंद द्विगुणित होतो. भरल्यापोटी आणखी दोन घास खाल्ल्यास चवीचे ज्ञान आणि त्यापासून मिळणारा आनंद मनस्वी नसतो. तसेच, आपली आणि आपल्याबरोबर जेवणार्यांची मानसिक स्थितीही जेवणाचा आनंद वाढविते. मन आनंदी असावे. दु:खी, तणावपूर्ण, चिडचिडल्या मानसिक अवस्थेत अन्नग्रहण हे उदरभरण होऊ शकते पण त्यापासून आनंद मिळत नाही. विचार करून पाहा - घरात नवरा बायकोचे भांडण, वादावादी झाली असेल, नोकरी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, घराचे कर्जाचे, आजारपणाचे खर्च हाताबाहेर चालले आहेत.. अशा वातावरणात पदार्थाची चव आणि त्यापासून मिळणारा आनंद विरून जातो.. बाष्पीभूत होतो म्हणा ना. ह्या उलट सणासुदीला, सहलीला गेलो असता आनंदी मनोवृत्तीमुळे जेवण्याखाण्यातून जास्त आनंद मिळतो. घरातले वातावरण हसतेखेळते असेल, तर घरच्या चौघांनी एकत्र रोजचेच साधे भोजन घेतले तरी तृप्तीचे ढेकर येतात. हा आनंद गिर्हाइकाला मिळावा, त्याचे ताणतणाव त्याने विसरावे म्हणून उपाहारगृहातून मंद संगीताची सोय केलेली असते. पण दिवसभराची विक्री कमी-जास्त होण्याशी ह्या पार्श्वसंगीताचा फार जवळचा संबंध असतो. आपल्या नकळत आपण पार्श्वसंगीताशी एकरूप होतो आणि संगीताच्या संथ किंवा जलद गतीवर आपले जेवण चालते. म्हणजे जर तुम्ही सैगलची गाणी लावली, तर लोक जेवताहेत जेवताहेत जेवताहेत..... असे चित्र असते. मागच्या गिर्हाइकांना जागा न मिळाल्याने ते दुसर्या उपहारगृहाकडे जातात, तुमची विक्री कोसळते. हेच जर किशोर कुमारची उडती, वेगवान गाणी लावली, तर तासाभरात ३-४ बॅचेस जेवून उठतात. (जाताना "तुमच्याकडे गाण्यांचे कलेक्षन मस्त आहे हं!" हेही आवर्जून सांगतात). तेव्हा अलिखित नियम म्हणजे 'संथ संगीत लावायचे नाही.'
मी कुठला कॅटरिंग किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास केलेला नाही. अनुभवातून, निरीक्षणातून, गिर्हाइकांशी चर्चा करून, वेळप्रसंगी नुकसान सोसून काही ज्ञान मिळविले आहे. अजून शिकतोच आहे. पल्ला खूप दूरचा आहे. आपल्या मिपावर जे कोणी उपाहारगृह व्यवसायात उतरू पाहत असतील, त्यांना माझ्या जुजबी अनुभवाचा काही लाभ व्हावा ह्या उद्देशाने श्री गजाननचरणी हा लेखनप्रपंच समर्पित आहे.
धन्यवाद.
छान वाटले वाचून.
विलासराव,
व्यवसायवृद्धीच्या प्रयत्नांआधी तुमची यंत्रणा सक्षम बनवा. पुरेसे, कर्मचारी हाताशी नसताना व्यवसायवृद्धी मागे धावल्यास (आणि त्याचा विधायक परिणाम धडू लागल्यास) मागणी नुसार पुरवठा न झाल्याने नांव खराब होऊ शकते. ते टाळावे. माऊथ पब्लिसिटी तुमच्या यंत्रणा सक्षम बनवायच्या वेगानुरुप असेल आणि येणारी गिर्हाईके कधी नाराज होणार नाहीत. एकदा पुरेशी यंत्रणा हाताशी तयार झाली (पुरेसे कर्मचारी, बसण्याची वाढीव व्यवस्था) की मगच आक्रमक जाहिरातबाजी करावी.
हा खरंच मोलाचा सल्ला आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे ठाण्याचे मेतकुट उपहारगॄह सुरु होण्यापूर्वी व झाल्यावरही अक्षरशः राक्षसी प्रसिद्धी करण्यात आली. आम्हाला अमेरिकेत असूनही पारंपारिक मराठी खाद्यपदार्थांचं नवं उपहारगृह ठाण्यात सुरु होतंय हे इतके वेळा वाचायला मिळाले की आजवर इतर कुठल्याही उपहारगृहाच्या सुरु होण्याबाबत वाचले नव्हते.
परंतु काहीच दिवसांनी मिपावर हे अनुभवकथन वाचायला मिळाले. ग्राहकांच्या भयंकर प्रतिसादाला सामोरे जाताना मेतकूटकरांची चांगलीच तारांबळ उडून त्यांना नकारात्मक प्रसिद्धी मिळू लागल्याचे दिसू लागले.
माझ्या पहिल्या कंपनीत आमचे युनिटप्रमुख त्यांच्या अधून मधून होणार्या भाषणात म्हणायचे की प्रसिद्धी करण्यापूर्वी आपली तेवढी क्षमता विकसित होणे खूप गरजेचे असते. कारण एकदा का ग्राहकांना नकारात्मक अनुभव आला तर वेगाने त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते व अशा प्रतिमेतून बाहेर पडणे दीर्घकालीन आव्हान बनते.
खरय काका.
सध्या स्टाफ वाढवायच्याच् खटपटित आहे.
कारण एकच कुकवर लोड असल्याने वेळेत सेवा देणे मुश्किल झाले आहे.
रोज नवनवीन ग्राहक येत आहेत आणि आमची धावपळ होत आहे,खासकरुण डीनरला.
अचानक पार्सल वाढले की टेबल सर्विसला अड़चन येते.
पण लवकरच यावरहि उपाय योजना होउन सरव काही सुरळीत होईल.
_/|\_ _/|\_ _/|\_
लेख जबरदस्त आवडला.
लिहायला नक्कीच वेळ आणि बरीच मेहनत लागली असणार कारण बरेच छोटे छोटे तपशील काळजीपूर्वक लिहिलेत.
लै भारी.
तुमचा लेख "गाईडलाईन" किंवा हॉटेल व्यवसायाचं "गाईड" होऊ शकेल या व्यवसायात नव्यानं येऊ इच्छिणार्या आपल्या मराठी लोकांसाठी.
तुमच्या पेशन्सला, कष्टांना .. एकंदर तुम्हालाच सलाम! आणि शुभेच्छा
धन्यवाद पेठकर काका आपल्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. पुढे मागे माझा आणि माझ्या भावाचा असाच स्नाक्स बार / कॅफेटेरीआ काढण्याचा मनसुबा आहे. तुम्ही दिलेल्या टिप्स चा नक्कीच फायदा होईल.
काका, एक शंका,
हॉटेलमधले कर्मचारी रोज रोज तेच जेवण जेवून कंटाळत नाहीत का? तसेच जेवणही हायरारकीप्रमाणे सर्व्ह केले जाते, त्याचीही माहिती वाचायला आवडेल.
आणखी एक.. रोजचा कर्मचार्यांचा मेन्यु कोण ठरवतो?
खरं पाहता उपहारगृह व्यवसायात (आणि कदाचित इतर अनेक व्यवसायात) कर्मचार्यांना मिळणारी वागणूक, त्यांची मनोवृत्ती, त्यांच्या आवडीनिवडी, आणि त्यांची समाधान लेव्हल ह्या बाबींबाबत मालकाला नेहमीच जागरूक राहिले पाहिजे.
मी उपहारगृह नव्याने सुरु केले तेंव्हा माझा एक कर्मचारी कॉलीफ्लॉवर चिरत होता. बाजूलाच भरपूर कचरा (भाजीचे जाड दांडे, पाने इत्यादी.) जमला होता. त्याला काम करायला पुरेशी जागा मिळावी म्हणून मी तो कचरा गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचा विचार करत होतो. तेंव्हा त्याने मला थांबविले. मला वाटले तो मला ते करण्यापासून परावृत करू इच्छित होता. मी त्याला कारण विचारल्यावर तो मला म्हणाला 'ह्याची स्टाफसाठी भाजी करणार आहे.' मला धक्काच बसला. हा कचरा शिजवून खाणार? पण तो आधी ज्या उपहारगृहात काम करीत होता (मुंबईत) तिथली हिच पद्धत होती. मी त्याला सांगीतले 'स्टाफसाठी आपल्या स्टोअर मधून कुठलीही भाजी घेऊन बनव. हा कचरा नाही. कधीच नाही.' मला माझ्या स्टाफने जे मी आणि माझी गिर्हाईके खातात तेच खावे अशी इच्छा असते. तोच माझा कटाक्ष असतो. हॉटेल मेन्यूतील पदार्थ ते खात नाहीत., कधीतरी ठिक आहे, किंवा नाश्त्याला बटाटावडा, इडली, उपमा इ.इ.इ. मेन्यूतील पदार्थ खाल्ले जातात. पण रोजच्या जेवणात आपल्या घरच्या प्रमाणेस आमटी, भात, भाजी, दही, लोणचे इ.इ. पदार्थ असतात. त्याना रोज नॉनव्हेज खायला आवडते पण मी त्याला आळा घातला. माझ्या खर्चासाठी नाही तर त्यांच्या आरोग्यासाठी एकदिवसाआड व्हेज आणि नॉनव्हेज असा पायंडा पाडून दिला. एकच कर्मचारी जेवण बनवितो तेंव्हा कांही दिवसांनी त्याचा कंटाळा येऊ लागतो. मधून मधून मी स्टाफसाठी मासे, बिर्याणी, स्पेशल भाजी वगैरे वगैरे बनवितो. त्यांना ती वेगळी चव आवडते. माझा बराचसा स्टाफ हा दक्षिण भारतिय आहे त्यामुळे त्यांचे मी केलेले पदार्थ आवडणे इथल्या मलबारी बहुल समाजात ते कितपत स्विकारले जातील ह्याची माहिती मला मिळते. ते ही खुश मी ही खुश. दुहेरी फायदा.
मालक स्वतः जेवण बनवितो ह्याने माझ्या कुक्सना क्लिअर संदेश मिळतो की ह्या माणसाला जेवण बनविता येते त्यामुळे ते एखाद्या पदार्थाच्या चवीवरून माझ्याशी वाद घालत नाहीत. मी सुचविलेले बदल आनंदाने स्विकारले जातात. ह्या सर्वातून माझा माझ्या स्टाफ वर एक विधायक वचक असतो. धंद्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक.
सर्वांना जेवण समान असते. वेगवेगळे नाही.
यासमच असलेला एक अनुभव सांगावासा वाटतो.
एक वर्ष ताज समूहातल्या एका हॉटेलात मी नोकरी केली. तिथे स्टाफ कँटीनमध्ये हाच प्रकार होता. साधं गरमागरम आणि रुचकर जेवण. बुधवार-शनिवार नॉनव्हेज.
त्या हॉटेलात तीन रेस्टॉरंट्सचे तीन अधिक रूमसर्व्हिसचा एक असे चार हेडशेफ होते. (आणि त्यांचा एक अतिप्रसिद्ध घनचक्कर बॉस - पण तो वेगळाच विषय आहे.) कर्मचार्यांना मिळणारं जेवण चांगलं असावं म्हणून हे चार हेडशेफ आलटूनपालटून स्टाफ किचनचे इन-चार्ज असत. तीन महिन्यांनी शेफ बदले, तेव्हा तो त्याच्या स्पेशालिटी थीमचं एक जेवण बनवे.
त्या हॉटेलच्या स्टाफ कँटीनमध्ये "रुचकर"पेक्षा कमी दर्जाचं काही खाल्ल्याची आठवणच नाही. स्टोअर्स इन-चार्ज असलेले काका माझे मित्र होते. ऐन बदाबदा पावसात ताजी कोथिंबीर वगैरे मिळवायची त्यांची धडपड जवळून पाहिली आहे. पण स्टाफ कँटीनमध्ये काही काटकसर झाल्याचं नजरेला आलं नाही.
धन्यवाद पेठकर काका आणि आदुबाळ!!
काका - अजुन असे अनुभव येवुद्या. या व्यवसायाबद्दल आणि त्यातल्या प्रवृत्ती / अपप्रवृत्तींबद्दल बाहेरच्या लोकांना खूप कमी माहिती असते.
रोजच्या लढाईमध्ये काही हलकेफुलके, मजेशीर अनुभवही येतच असतील तेही जरूर लिहा.
स्टाफच्या जेवणाविशयी वैयक्तिक अनुभव सांगतो. स्टाफला सकाळी ११ ला पोहे बनवले जात नाश्त्याला. बार असलेने वेटरलोकंचे टायमिंग उशिराच असे. कधी उप्पीट किंवा शिरा. त्यात जास्त चेंजेस नसत. दुपारच्या जेवणाला स्टाफसाठी म्हणून दोन भाज्या केल्या जात. महत्वाचा फरक म्हणजे नेहमीचा जो आचारी तो ह्या भाज्या बनवत नसे. पंजाबी पध्दतीने ग्रेव्हीतल्या भाज्याएवजी घरगुती पध्दतीने केलेल्या भाज्या असत. त्या चपात्यावाल्या मावशी करत. त्यांना सकाळी जास्त काम नसे त्य वेळात ह्या भाज्या करत. संध्याकाळी पण स्वतंत्र भाज्या असत. मलाही हॉटेलच्या रेगुलर डिशएवजी ह्याच भाज्या आवडायच्या. स्टाफ कधी चेंज म्हणून इतर भाज्या घेई पण फार कमी वेळा. आठवड्यातून एकदा नॉनव्हेज असे. व्हेज वेटर्ससाठी तेव्हा स्पेशल भाजी बनवली जाई. लहान गावातील बारचा हा अनुभव असलेने मोठया शहरातील हॉटेलशी तुलना नाही पण तेथही असेच असावे हा अंदाज.
पेठकरसाहेब
अतिशय सुंदर कथन. मुळात तुम्हाला उत्तम पदार्थ लोकांना खायला घालायची आवड आहे हेच खरे. तुमच्या हातचे भरीत अजूनही लक्षात आहे. आपली कारकीर्द आणि विशेषतः आपली जिद्द आणि प्रचंड कष्ट यांना दंडवत.
प्रतिसाद द्यायला (मुळात लेख वाचायला) अक्षम्य विलंब झाला, क्षमस्व. आपण दिवसभर इतका व्याप सांभाळूनही मिपावर येता, तेव्हा कुठलही कारण देण्याची लाज वाटते. सपशेल माफी! सध्या दिल्लीत तंबू ठोकुन आहे, उद्या रात्री परतणार
आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
आवर्जून पोहोच द्यावीशी वाटली असे लेखन.
सेवा क्षेत्रातील सर्वांनीच वाचण्या व समजून घेण्यासारखे लिहिले आहे.
सेवा देणे म्हणजे सेवक असणे नव्हे, अन सेवा देतोय म्हणजे तुमच्यावर उपकार करतोय, असे दाखवणेही नव्हे.
अॅनास्थेशिया ही जशी झोप व मृत्यू यांच्या दरम्यानची अवस्था, तशी ही त्या दोन अवस्थांच्या मधली वागणूक, सेवा क्षेत्रातली सेवादात्याची असायला हवी.
दुसरा अजून एक पैलू मी मांडू इच्छितो, जो पेठकर यांच्या लिखाणातून दिसतो तर आहेच, पण उघडपणे शब्दांत पकडला गेलेला नाही. तो म्हणजे गुरुकिल्ली देणे.
पेठकर काकांनी त्यांच्या व्यवसायाची व आजवरच्या यशाची गुरुकिल्ली खुलेआम सर्वांना दिली आहे. मनापासून शंका विचारणार्यांना मार्गदर्शनही केलेले आहे जे उघडउघड हातचे न राखता केलेले दिसतेच आहे.
अगदी माझ्या शेजारीही दुकान उघडले तर त्या मराठी माणसाला मी हे सगळे सल्ले देईनच, ही मनोवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. एकमेकांच्या शेजारी बसून एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा, तू शर्ट-प्यांटी विकतोस का? मग मी उत्तम टाय, जॅकेट किंवा अंडरगार्मेंट्स विकतो, दोघांचा फायदा वाढेल अशी आयडिया केलेली सगळ्यांच्याच जास्त फायद्याची...
पेठकरजी,
आपल्या या लिखाणाबद्दल आपले अभिनंदन व अनेकानेक आभार!
पेठकर साहेब यांचा लेख उत्कृष्ट आहेच यात शंका नाही परंतु त्यात घ्यावे लागणारे/ घेतलेले अविरत कष्ट त्यांच्या नम्र मर्यादशील स्वभावामुळे त्यांनी बर्रेच कमी करून दाखवलेले आहेत. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचा हा कोणताही प्रयत्न नाही. परंतु २००४ ते २००६ या कालावधीत पुण्यात लष्करी रुग्णालयात काम करताना माझे कुटुंब मुंबईत होते. माझी मामेबहीण आणि तिच्या नवर्याचे( तो पारशी आहे) यांचे पारशी हॉटेल (परवरा नावाचे) कोंढव्याला होते. तेंव्हा जवळ जवळ २ वर्षे त्या रेस्तौरंटमध्ये मी बराच काळ पडीक असे. तेंव्हा पाहिलेल्या अनेक कटकटी लिहित आहे. पुण्यात हॉटेलं बरीच आहेत हे जसे ग्राहकाना सोयीचे आहे तसे ते हॉटेल मालकांना गैरसोयीचे आहे. स्पर्धा प्रचंड आहे. त्यातून कर्मचारी वर्गाची बेफिकिरी वाढत जाते. कारण इथे नाही तर तिथे नोकरी लगेच मिळते. त्यामुळे एका हॉटेलात पगारावर राहायचे आणि शनिवारी रविवारी दांडी मारून दुसर्या हॉटेलात अतिरिक्त पैशासाठी काम करायचे हे सर्रास चालते. पगार १५००० असेल तरी एका शनिवारचे १००० रुपये मिळतात तेंव्हा मालकाने पगार कापला तरी चालेल ५०० रुपये जास्त मिळतात. दारू पिउन पडून राहणे. न सांगता दांड्या मारणे.एक आठवडा सुटी घेतो सांगून तीन आठवडे न उगवणे. यात मालकाला नवीन नोकर सुद्धा ठेवता येत नाही आणि अनिश्चिततेचि तलवार टांगती राहते. त्यातून त्यांच्या नातेवाईकांच्यात सतत "गंभीर आजारपण" चालूच असते. मामा नाहीतर काका सारखे सिरीयस होत असतात. जास्त काम असेल( मोठी ऑर्डर असेल तर दांड्या मारणे). हॉटेलात चोरी करणे पैसे उचल म्हणून घेणे आणि पळून जाणे. घरपोच सेवेत मधेच कुठेतरी जाऊन चकत्या पिटत राहणे ( विशेषतः शनिवारी संध्याकाळी). खरेदीसाठी नोकरांना पाठवले तर जिन्नस "महाग" मिळतात. लोणी, सामिष पदार्थ. सुका मेवा खाणे इ गोष्टी सुद्धा सहज करतात. चांगला नोकरवर्ग थोडा फार टिकला असे वाटेपर्यंत सोडून जातो.१५००० पगार( २००४ मध्ये) दिला तरी कुणी १६००० देत असेल तर दुसर्या दिवसापासून येणे बंद करत. तेंव्हा मोबाईलहि नव्हते.अशा सर्व गोष्टीन्मुळे मालकाला स्वतः तेथे उभे रहावेच लागते. परंतु मालक स्वतः किती आणि कुठवर पुरा पडणार. अशा कटकटी ना कंटाळून शेवटी माझ्या बहिण आणि मेहुण्यांनी ते रेस्तोरन्त बंद करायचा निर्णय घेतला. त्या रेस्तोरन्तमध्ये प्रामाणिकपणे काम करून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला होताच त्यावर त्यांनी स्थावर मालमत्तेचा ( estate agent) व्यवसाय चालू केला आणि त्यात त्यांना कमी कटकटीत जास्त यश मिळत आहे.
खरं आहे डॉक्टरसाहेब.
भारतात उपहारगृह व्यवसाय जास्त कसरतीचा आहे. चांगल्या प्रतिचे उपहारगृह सुरु करून मुख्य मुख्य स्टाफला मार्केटपेक्षा जास्त पगाराचे आमिष दाखवून ५ वर्षांचा बाँड लिहून घेतला पाहिजे. बाँड मोडल्यास वकिलाकडून नोटीस पाठवायची. हा प्रयोग करून पाहिला पाहिजे. दहातले नऊजणं नोटीशींना घाबरतात. पुढची न्यायालयीन कारवाई करावी लागत नाही.
सुदैवाने, इथे, आखातात, तसे करणे (म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणे) बेकायदेशीर आहे. पोलीसच अशा माणसाला उचलून 'आत' टाकतात. शिवाय हल्ली तर, कार्यकाळ संपल्यावरही नोकरी बदलणे आधीच्या मालकाच्या NOC शिवाय शक्य नसतं.
पेठकर साहेब,
अशा चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या बाबतीत काहीही करणे शक्य नाही. तुम्ही अगदी बॉन्ड लिहून घेतलात आणि त्याने येउन तुमचे पदार्थ बिघडवले तर असलेले ग्राहक हि जातील. आणि अशा सड्या फटिंग लोकांच्या नादाला लागणे शक्य नाही.नंगे से खुदा डरे!
बाकी पोलिसांचे म्हणाल तर पुण्याला ते रात्री ११ वाजता गस्त घालायला सुरुवात करतात आणि आणि जी हॉटेल उघडी असतात त्यांच्याकडून हप्ता घेतात अन्यथा आपल्याला हॉटेल १०.४५ पासून बंद करायला सुरुवात करावी लागते म्हणजे तोवर आलेल्या ग्राहकांना सांगावे लागते लवकर ऑर्डर द्या. मग तुम्ही धंदा काय करणार? शिवाय गणेशोत्सव नवरात्रोत्सव इ साठी गुंठा मंत्री येउन "विनंती" करत. हे असे धंदे आमच्या मेहुण्याला ( पारशी असल्याने) जमणारे नव्हते म्हणून त्याने कंटाळून धंदा बंद करायचे ठरवले.
त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलात हुक्का मिळत असे. त्याबरोबर चरस गांजा ची गोळी सुद्धा.दारू तुम्ही आणली तर तो मालक "मना" करत नसे. थम्स अप किंवा पेप्सी ची २०० मिली बाटली ३५ रुपयाला देत असे. त्यामुळे ते हॉटेल रात्री एक दीड पर्यंत चालत असे. मग तेथे पदार्थ चवीला कसे का असेना? पोलिस सुद्धा "मेहेरबान" असत.
जाऊ द्या. कल्याणकारी राज्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात.
चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या बाबतीत काहीही करणे शक्य नाही. तुम्ही अगदी बॉन्ड लिहून घेतलात आणि त्याने येउन तुमचे पदार्थ बिघडवले तर असलेले ग्राहक हि जातील. आणि अशा सड्या फटिंग लोकांच्या नादाला लागणे शक्य नाही.नंगे से खुदा डरे!
त्यांनाही ते एव्हढे सहज शक्य नसते. मुख्य शेफचे नांव मार्केटात खराब होऊन त्याला चालत नाही. तो न सांगता नोकरी सोडून जाईल पण शनिवार-रविवार मालकाला फसवून दुसरीकडे नोकरी करणे त्याला परवडणारे नसते. जे असे करतात त्यांचे नुकसान होत जातेच. शिवाय त्यांनाही 'स्थैर्य' हवे असते. जास्त पगार, चांगली वागणूक, चांगली मॅनेजमेंट मिळाल्यावर सहसा सोडून जात नाहीत. पण ते मिळे पर्यंत 'उड्या' मारणे सुरु असते.
तसेच, चांगल्या कर्मचार्यांना धरून ठेवण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्जे देणे हाही एक मार्ग असतो. कर्ज देताना, पेपर बनवून, वडिलांची सही घेऊन कर्ज दिल्यास त्या कर्मचार्यावर घरूनही अंकुश राहतो.
पोलीस स्टेशन माझ्याकडून महिन्याला १५०० रुपये घ्यायचे. बाकी महिन्या भरात कोणीही पोलीस (अगदी ऑन ड्यूटी, युनिफॉर्म मध्ये) येऊन जेवून गेला तरी त्याला मेन्यूबरहुकूम बिल लावले जायचे. (पोलीसस्टेशनच्याच तशा सूचना होत्या).
काका, अनुभव कथन आवडलं.
वेळेअभावी अधिक सविस्तर काही लिहू शकत नाही.
तुमच्या उर्वरित भावी योजनांसाठी शुभेच्छा.
मी कर्वे नगरात रअसतान्माना एखाद दोन वेळेसच यज्ञकरम्र्मला येउन गेलो होतो; दोन-तीनच पदार्थ चाखून पाहिले. ते सर्व आवडले होते. तुम्हाला पुन्हा इकडे यायला जमो; हीच इच्छा.
.
.
.
बालगंधर्व समोर "गंधर्व" नावाचं हॉटेल आहे. तिथे दोन चार वर्षाखाली दोन-तीनदा गेलो आहे. पदार्थ, चव ठीकठाक्/व्यवस्थित. म्हणजे फार थोर नाही; आणि फार वाईटही नाहित; असे. पण सर्व्हिस खरोखर भन्नाट. एकदम फास्ट.
तुम्ही वर साम्गितलेल्या प्रत्येक टप्प्यत ( ऑर्डर घेण्यापासून ते जिन्नस टेबलावर पोचेपर्यंतचा भाग) ती माणसं तरबेज असावीत. आणि त्यासाठी किती कसरत लागत असावी ह्याचा विचार करुनच आश्चर्य वाटतय . तुमच्यामुळे ते प्रथमच जाणवलं.
गवि, मधुरा देशपांडे, अन्या दातार, राजेंद्र मेहेंदळे, सांगलीचा भडंग, शि बि आय, नीलमोहर, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, खटपट्या, शंतनु _०३१, दमामि, प्रास, यमन, रातराणी, Jack_Bauer, विशाखा राऊत, नमकिन, बाळ सप्रे, कंफ्युज्ड अकौंटंट, लै शाना, स्वप्क००७, सर्वसाक्षी, तर्री ताई, आनंदी गोपाळ, यशोधरा, संदीप चित्रे, जीएस, पप्पुपेजर आणि मन१ मनःपूर्वक धन्यवाद.
आज माझ्या लेखाच्या निमित्ताने अनेक जुनेजाणते वाचक/लेखक मिपावर दर्शन देऊन जात आहेत हा मी माझा सन्मान समजतो. चविष्ट खाणे, उपहारगृह भेट ह्याची वाढती आवड, उपहारगृहाची अंतर्गत व्यवस्था, कार्यपद्धती ह्या बद्द्ल एक प्रकारचे गुढ-रम्य कुतुहल प्रत्येकाच्या मनांत असतेच (जसे इंजिनची शीट्टी वाजविण्याची इच्छा) त्यामुळे ह्या लेखावर प्रतिसाद कर्त्यांची झुंबड उडालेली दिसते आहे. त्या सर्व चोखंदळ वाचकांची इच्छापूर्ती मी करू शकलो हे एक फार मोठे समाधान आहे.
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्हाईकांच्या तर्हा, कायद्यांचे दडपण वगैरे अनेक विषय हाताळण्याचा विचार आहे. त्या निमित्ताने वाचकांची 'दिल माँगे मोर' ची भूकही थोडीफार भागविता येईल अन मलाही 'मोकळे' व्हायला आवडेल. पण कधी जमेल सांगता येत नाही. लवकरच प्रयत्न करेन.
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्हाईकांच्या तर्हा, कायद्यांचे दडपण वगैरे अनेक विषय हाताळण्याचा विचार आहे. त्या निमित्ताने वाचकांची 'दिल माँगे मोर' ची भूकही थोडीफार भागविता येईल अन मलाही 'मोकळे' व्हायला आवडेल. पण कधी जमेल सांगता येत नाही. लवकरच प्रयत्न करेन.
काका.. नविन लेखमाला सुरू करा.
आवडले. झुरळांचा त्रास वेगळाच, अकल्पनीय. सारे रिस्क रेस्पॉन्स कोलमडून टाकणारा होता. तुमच्या जिद्दीला सलाम. खरे तर जिद्द ही जवळजवळ प्रत्येक यशस्वी उद्योजकाची पहीली अर्धांगिनी म्हटली पाहिजे.
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्हाईकांच्या तर्हा, कायद्यांचे दडपण वगैरे अनेक विषय हाताळण्याचा विचार आहे. त्या निमित्ताने वाचकांची 'दिल माँगे मोर
लवकर आणी अगदी डीट्टेलवार येउद्या.
लई इंट्रेष्टिंग लिवता.
पाहिजे तेव्हडा वेळ घ्या काका पण लिहा.
मला एक लेडीज असिस्टेंट कुक मिळाल्या आहेत.
एक मुलगा उद्यापासून येणार आहे.
आज पहिल्यांदा वड़ापाव बनवला अणि संपलाही.
उद्या बटाटा, कांदा आणि पालक मेथी भजी , इडली चटनी, पोहे ठेवतोय.
सुरुवात तर मस्त आहे. सतत गिर्हाईकांशी बोलून त्यांना काय आवडतं काय आवडत नाही ह्याचा अंदाज घेत आपली व्यावसायिक मार्गक्रमणा करावी. पण गिर्हाईकांच्या तालावर नाचायचेही नाही हेही लक्षात ठेवावे. लोक त्यांच्या स्पेसिफिक आवडीनिवडी तुमच्या गळ्यात मारायचा प्रयत्न करतात. पण सर्व सूचनांमधून 'सर्वासाठी' योग्य असे निर्णय घ्यावेत.
म्हणून गेला आठवडाभर ऊर्मी दाबून ठेवली होती त्याचे पूर्ण सार्थक झाले!
अत्यंत प्रामाणिक, निगर्वी आणि मनमोकळे कथन. उपहारगृहाचा व्यवसाय आणि त्यातले अनुभवसिद्ध बारकावे इतक्या सहजपणे आम्हाला वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल फारच छान वाटले. सातत्याने सजग राहणे, नाविन्याचा ध्यास ठेवणे आणि गिर्हाइकाची मानसिकता समजून घेणे हे तीनही तुमच्या यशातले महत्त्वाचे गुण दिसतात. स्वतःला कुकिंगसारखी मुख्य गोष्ट येत असल्याने ठेवता येणारा अदृश्य वचकदेखील फार महत्त्वाची भूमिका बजावतो अन्यथा शेफ आणि कुक्स मिरे वाटणार हे नक्की.
व्यवसायात अपयशाची तयारी ठेवावी लागते हे म्हणणे सोपे असते परंतु प्रत्यक्ष अपयश आल्यावर त्यातून सावरायला जबरदस्त मानसिक ताकद लागते आणि घरच्यांचा सपोर्ट लागतो. (एक व्यवसाय बंद करुन नोकरीची वाट धरल्याने हे स्वानुभवातून समजलेले आहे. काकांची कहाणी वाचून पुन्हा व्यवसाय सुरु करावा का या इच्छेने मनात पालवी धरली!) इथे तर काकांनी अपयशाची मालिका पचवली आहे. एक कडक सलाम. काका, सौ.पेठकरांनाही खास शुभेच्छा कळवा. तुमच्या प्रत्येक यशापयशात त्यांचा तुम्हाला समजून घेण्याचा आणि पाठीशी असण्याचा रोल फार महत्त्वाचा असणारच हे नक्की.
व्यवसाय सुरु करणार्यांसाठीच किंवा त्यात असलेल्यांसाठीच नव्हे तर रोजच्या आयुष्यातही यातले कितीतरी बारकावे मोलाचे मार्गदर्शन करणारे आहेत.
एकदाच काकांशी बोलणे झाले होते त्यावेळी ते सिंबायोसिसचे कँटीन चालवत होते. त्यावेळी भेटीचा योग आला नाही. नंतरही 'यज्ञकर्म' चालू झालेले समजले परंतु त्यावर्षी स्वाईन्फ्लूच्या उपद्रवाने पुण्यात असूनही बाहेर खाणे टाळले होते त्यामुळे ती देखील संधी हुकली, त्याबद्दल वाईट वाटते. पुन्हा संधी कधी येईल याची वाट बघतोय.
पेठकर काका तुमच्या व्यवसायवृद्धीला शुभेच्छा! :)
धन्यवाद चतुरंग.
एक इंग्रजी म्हण आहे. 'It is very easy to open a shop but, very difficult to keep it open.' ह्याचा अनुभव पदोपदी घेतला आहे. काकूंचा सहभाग आणि मदत नक्कीच असते.
येत्या ५-१० वर्षात माझ्या प्रयत्नांना आणि कल्पनेला मूर्त स्वरूप येईल आणि सुखाने निवृत्ती घेऊन जगभर प्रवास करत बसेन.
पाकशास्त्राबद्दलची पराकोटीची आत्मियता, कौतुकाची लालसा, अतिथी देवो भवः हा भक्तीभाव ह्या सार्याचे सार ह्या यशामागे असावे असे मला मनोमन वाटते. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधताना स्वतःला आनंद मिळणं आणि दुसर्यांना मिळवून देणं ही एक तारेवरची कसरत आहे. लोकांकडून चांगल्या चवीसाठी, वेटर्सच्या तत्परतेसाठी आणि विनम्रेतेसाठी कौतुक तर होतंच पण कांही चुका घडल्या तर खणखणीत नाराजीलाही समोर जावं लागतं. ह्याला जीवन ऐसे नांव. कौतुकाने हुरळून जायचं नाही आणि नाराजीने कोलमडून पडायचं नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक खुश किंवा नाराज गिर्हाईक हा एक गुरू असतो आणि आपल्याला बरेच कांही शिकवून जातो. असो.
प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद.
आणि व्यवसायातील भरभराटीसाठी मनापासून शुभेच्छा! व्यवसायाचे स्वरूप वेगळे असले तरीही तुमच्या अनुभावातून खूप शिकता येण्यासारखे आहे. मी वाचलाय पण थोडा वेळ काढून नवय्रालाही वाचायला सांगितलेय.
धन्यवाद अनन्या,
मराठी माणसाने न्यूनगंड झटकून व्यवसायक्षेत्रात पाऊल ठेवावं, डोळस धाडस करावं आणि पुढच्या पिढीलाही व्यवसायाचे बाळकडू द्यावे जेणे करून मराठी माणसाच्या हक्कांसाठी कोणाला झगडावे लागणार नाही, त्याना आपल्या दावणीला बांधून राजकारणं करता येणार नाहीत.
निव्वळ अप्रतिम लेख. अतिशय उपयुक्त....ह्या निमित्ताने माझी हॉटेल काढण्याची सुप्त ईच्छा परत एकदा उफाळून वरती आली आहे. आशा करो आणि तो सुदिन लवकरच उगवो. आपल्या जिद्दीला कडक सलाम!!
आम्हांस सर्विंग विंडो च्या आत काय चालते त्याचे लैच कुतूहल असे, आमच्यालेखी ते एक असे द्वार असते जिथुन उत्तम चकना जेवण वगैरे बाहेर येते,
ह्या सगळ्यामागची मेहनत दाखवल्या बद्दल पेठकर साहेब ह्यांचे आभार
(जितकी स्कॉच तितका चकना) नाना जॉनी वॉकरवाले
पेठकर काका,
तुमच्या पाककृती वाचनमात्र मोडमध्ये वाचल्या होत्या. त्यामुळे या लेखाबद्द्ल उत्सुकता होतीच. अतिशय सुंदर शब्दांत तुमची कहाणी वर्णन केलीत आणि हा अनुभव दिलखुलासपणे मांडलात त्याबद्द्ल अनेक आभार.
काका.. एक शंका,
भारतामध्ये मिळणारा खाद्यपदार्थांचा कच्चा माल उदा. हिरव्या भाज्या, मसाले, आणि तेल आणि भारताबाहेर मिळणारे तेच पदार्थ यांच्या चवीमध्ये हमखास फरक असतो. अगदी जमीनआस्मानाचा फरक नसेल तरी कृष्णाकाठची वांगी आणि जळगांवची वांगी चवीमध्ये वेगळी असतात..!
मस्कतमध्ये तुमचा कच्चा माल स्थानिक असणार आणि गिर्हाईक मात्र भारतीय चवीची अपेक्षा करत असणार अशा वेळी तुम्ही कच्च्या मालाच्या चवीच्या बदलाचा एकंदर पदार्थाच्या चवीवर फरक पडू नये म्हणून काय काळजी घेता..?
प्रतिक्रिया
जाहिरातबाजी.
मोलाचा सल्ला
खरय काका.
अप्रतिम लेख.. नवोदितांना
लेखाच्या शिर्षकातील सेवा
पेठकर काका अप्रतिम !
धन्यवाद!!!
काका, एक शंका,
रोजचे जेवण.
क्या बात है
यासमच असलेला एक अनुभव
धन्यवाद पेठकर काका आणि आदुबाळ
स्टाफच्या जेवणाविशयी वैयक्तिक
अफलातून!
प्रेरणादायी. उत्तम. खरेच एक
आवर्जून पोहोच द्यावीशी वाटली
+११११
काका, क्या बत है! मस्तच
क्या बात है!
उत्कॄष्ट लेख
एक नम्बर !!
पेठकर साहेब यांचा लेख
खरं आहे.
पेठकर साहेब,
खरं आहे पण एव्हढे सोपेही नाही.
मस्त
धन्यवाद.
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्हाईकांच्या तर्हा, कायद्यांचे दडपण वगैरे अनेक विषय हाताळण्याचा विचार आहे. त्या निमित्ताने वाचकांची 'दिल माँगे मोर' ची भूकही थोडीफार भागविता येईल अन मलाही 'मोकळे' व्हायला आवडेल. पण कधी जमेल सांगता येत नाही. लवकरच प्रयत्न करेन.काका.. नविन लेखमाला सुरू करा.काका.. लेखमालेच्या प्रतिक्षेत
नमस्कार काका.. :)
वा ! सुरेख ........
कर्मचार्यांची वर्तणूक, गिर्
धन्यवाद.
पाहिजे तेव्हडा वेळ घ्या काका
ग्रेट...
नक्कीच काका.
प्रेरणादायी लेख. अतिशय आवडला.
पेठकर काकांचा लेख वीकांताला वाचायचा
धन्यवाद चतुरंग.
अप्रतिम लेख,त्याला अनुभवाची
धन्यवाद.
काका तुमच्या जिद्दीला सलाम.
धन्यवाद.
काका
गो अहेड..
त्रिवार दंडवत काका
लवकर सुरु कर.
आम्हांस सर्विंग विंडो च्या आत
छान लेख
काका.. एक शंका,
Pagination