मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

विकास · · काथ्याकूट

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन!

Purandare Maharashtra Bhushan आत्ताच राजभवनात, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर्‍यांना अधिकृतपणे "महाराष्ट्र भूषण" ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने संमानीत केले. ज्यावेळेस महाराष्ट्रावर "डिसकव्हरी ऑफ इंडीया"कार नेहरू आणि तत्सम काँग्रेसी वैचारीक गुलामगिरीत जोखडले होते तेंव्हा गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला. त्यांच्या भाषणमालीका ऐकताना, केवळ शिवाजीबद्दलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राबद्दल प्रेम तयार झाले. शिवाजी महाराजांचे सगळे पुतळे एकत्र करून जेव्हढे जमले नाही ते काम म्हणून नाही तर खरेच शिवाजीबद्दलचे प्रेम म्हणून त्यांनी आजन्म केले. शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते लिहीणारे अनेक होऊन गेले आहेत. नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता. (उदा.: When only a boy of nineteen he started on his predatory career) अजून एक उदाहरणादाखल: (आऊटलूकच्या) विनोद मेहतांनी इंडिपेंडन्स नावाचे वर्तमानपत्र मुंबईत चालू केले त्यात उगाच जाता येता - यशवंतराव आणि शिवाजीमहाराजांसंदर्भात वाटेल ते लिहीले... प. बंगालमधले देखील असे काही इतिहासकार होते ज्यांनी शिवाजीबद्दल काही अंंशी का होईना नकारात्मक कधीकाळी लिहीले होते. अगदी जेम्स लेन प्रकरण जेंव्हा प्रकाशात आले तेंव्हा म्हणजे २००४ च्या सुमारास आउटलूक इंडीया मधे प्रकाशीत झालेल्या शिवाजी आणि सद्य राजकारणा संदर्भातील लेखाचे शिर्षक देखील बरेच काही सांगून जाते... अशा या "बुद्धीवादी" काळात तसेच त्या आधी देखील महाराष्ट्रात अनेक चांगले (शिवाजी संदर्भात) इतिहासकार झाले पण जनसामान्यांपर्यंत जसे शास्त्रज्ञ पोचू शकत नाहीत तसेच इतिहासाचे मुलभूत संशोधन करणारे पोचू शकत नाहीत. तो त्यांचा दोष नसतो. त्यांचा स्वभाव असतो आणि म्हणूनच ते इतिहास संशोधन करू शकतात. रा.स्व. संघ जे सहा उत्सव संघटना म्हणून साजरे करते त्यातील एक उत्सव हा "शिवराज्याभिषेक दिना"चा आहे. कारण काय तर, तत्कालीन पद्धती झुगारत शिवाजीने भोसला एम्पायर म्हणून राज्य तयार न करता, हिंदवी स्वराज्य म्हणून राज्य तयार केले आणि तमाम जनतेस एकत्र आणले. या मुळे किमान संघाच्या संपर्कात आलेली अमराठी जनतेस देखील शिवाजीबद्दल आत्मियता तयार झाली. अर्थात हे अजून एक कारण आहे ज्यामुळे स्युडोसेक्यूलर्स, रिअललेफ्टीस्ट्स आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांना शिवाजीला वेगळे करायचे आहे अथवा शिवाजीचे महत्वच कमी करायचे आहे. मात्र, इतिहासकार नसलेल्यांमधे दोन अशी व्यक्तीमत्वे होती ज्यातील एका व्यक्तीने शिवाजी जनमानसात पोचवला. तर त्यातील दुसरी व्यक्ती दुर्दैवाने त्या विषयावर ज्याला "समग्र" म्हणता येईल असे लेखन करण्याआधीच निवर्तली - ते म्हणजे नरहर कुरंदकर. त्यांचे पुस्तक वाचले नसले तर अवश्य वाचा. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. या दोघांनी शिवाजीला एक राज्यकर्ता म्हणून पाहीले. त्यातील चमत्कार बाजूला ठेवले. त्यांचे कर्तुत्व, त्यांच्या योद्धा आणि शासक म्हणून प्रतिक्रीया पहाताना त्या काळाचा संदर्भ घेऊन बघितल्या. अर्थात कुरंदकरांचे लेखन हे प्राद्यापकी असल्याने ते आवडू शकेल असा वर्ग मर्यादीतच राहीला असता. ती मर्यादा बाबासाहेबांना नव्हती. कारण त्यांनी त्यांच्याच शब्दात (स्वतःस इतिहासकार/इतिहाससंशोधक असे न संबोधिता) शाहीरी केली. शाहीराला कालानुरूप शब्दरचना आणि अलंकार त्यांनी वापरले, इतकेच. जर पुरंदर्‍यांसारख्या शाहीराऐवजी असे नकारात्मक अथवा वर्गिकरण करणारे शाहीर त्यावेळेस तयार झाले असते तर महाराष्ट्राचे काय झाले असते कोण जाणे. आज मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे त्यांच्या या कार्यासंदर्भात दाखवलेली कृतज्ञता आहे.

वाचने 41381 वाचनखूण प्रतिक्रिया 133

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 20:29
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याने त्या पुरस्काराची शान वाढली आहे. संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवरायांबद्दलच्या अभ्यासाला संपूर्ण आयुष्यच समर्पित करणार्‍या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाला त्यांच्या हयातीत व उत्तम प्रकृती असताना हा सन्मान दिला गेला त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. अवांतरः या लेखात डिसकव्हरी ऑफ इंडीया बाबतचा नकारात्मक उल्लेख टाळला असता तर बरे झाले असते.

In reply to by विकास

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 20:43
माझे म्हणणे असे आहे की एखाद्याच्या आयुष्यभराचा कार्याचा गौरव राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने झालेला असताना त्याविषयी आनंद व समाधान व्यक्त करताना नकारात्मक संदर्भ टाळावेत. ते पुस्तक मी वाचलेले नसल्याने मला काही कल्पना नाही. काल परवा कुणीतरी फेसबुकवर लिहिले होते की डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकातील शिवाजी महाराजांचा लुटारू असल्याचा उल्लेख आहे असे म्हणणे हे चुकीचे भाषांतर करून केलेला दावा आहे. आम्हाला महाराष्ट्र पापुमंच्या इयत्ता ४थीच्या पुस्तका जी प्रस्तावना होती ती पंडीत नेहरूंनी लिहिली होती (बहुधा डिस्कवरी ऑफ इंडिया मधून घेतली असावी). त्यात त्यांनी महाराजांच्या विविध क्षेत्रातील कामगिर्‍यांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला होता.

In reply to by विकास

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 20:57
उपक्रमवरील चर्चेत या मुद्द्यावर बरेच जणांनी भाष्य केले आहे. त्यापैकी एकाने असे लिहिले आहे की नेहरूंनी १९३४ साली महाराजांबाबत नकारात्मक उद्गार काढले होते परंतु १९४६ सालच्या डिस्कवरी ऑफ इंडिया च्या प्रथमावृत्तीत महाराजांबाबत नकारात्मक असे काही नव्हते. अन मी अगोदरच्या प्रतिसादात कुणीतरी फेसबुकवर जे म्हंटले आहे त्याचा संदर्भ दिला होता. त्यात गुरिल्ला या शब्दाचा वापर नेहरूंनी महाराजांच्या गनिमी काव्याने लढाया लढण्याचा उल्लेख केला होता. त्याचे चुकीचे भाषांतर लुटारू असे करून वाद निर्माण करण्यात आला होता असे लिहिले होते. चुभूदेघे.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Wed, 08/19/2015 - 21:55
येथे म्हणल्याप्रमाणे, पुस्तकाचे नाव मूळ लेखात बदलले आहे. बाकी बरेच काही त्या प्रतिसादात आहे. आता तुमच्या मूळ मुद्द्याबद्दल - तुम्हाला फक्त नेहरूंचा उल्लेख काढावासा वाटला. मग तसा विनोद मेहतांचा पण काढायला हवा असे वाटले नाही का? मी ते देण्यात नेहरूंना कमी करणे वगैरे उद्देश खरच नव्हता. पण ज्यांच्याकडून आपण आपले विचार तयार करू शकतो अशांमधे नेहरू देखील होते आणि विनोद मेहता देखील म्हणून तशी वरकरणी टोकाची वाटणारी उदाहरणे दिली. आणि अशा सगळ्या influential लोकांच्या मधे, स्वतःच्या शाहीरीने जनसामान्यांमधे निकोप शिवप्रेम तयार केले म्हणून बाबासाहेबांचे महत्व अधिक आहे असे माझे म्हणणे होते आणि आहे. केवळ त्या संदर्भात हे लिहीणे मला महत्वाचे वाटले. असो.

In reply to by विकास

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 21:59
तेव्हा मी संपूर्ण लेख वाचला नव्हता. या अभिनंदनपर लेखात कुठलेही नकारात्मक संदर्भ टाळले असते तर बरे झाले असते असे माझे मत आहे. बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची ओळख आजच्यापेक्षा खूप वेगळी होती असे आजवर तरी कुणाकडून ऐकले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास Wed, 08/19/2015 - 22:09
बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची ओळख आजच्यापेक्षा खूप वेगळी होती असे आजवर तरी कुणाकडून ऐकले नाही. ती नक्कीच झाली असती असे माझे म्हणणे आहे. कारण शिवाजीबद्दल लिहीले गेलेले तथाकथीत बुद्धीवंतांचे लेखन. अथवा नेहरूंसारख्यांचे लेखन जे स्थानिक बखरी, पत्रव्यवहारांपेक्षा ब्रिटीशांच्या लेखनाच्या संदर्भाने लिहीले गेले होते. शेवटी असले लेखन हे संदर्भ बनतात आणि त्या संदर्भावर अजून पुढचे संदर्भ तयार केले जातात.

In reply to by विकास

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 22:20
मला पडलेला प्रश्न त्यापूर्वी (बाबासाहेबांचे कार्य सुरु होण्यापूर्वी) ती (शिवाजी महाराजांची) ओळख नकारात्मक होती का असा आहे? टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरु केल्याचे वाचले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले मिपाकर कदाचित मला पडलेल्या प्रश्नावर भाष्य करू शकतील. बाकी नेहरुंनी स्वतःची चुक मान्य करून दुरुस्ती केली होती हे मला अधिक शोध घेताना मिळाले. याचा संदर्भ मी खालच्या प्रतिसादात दिला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

स्रुजा Wed, 08/19/2015 - 23:10
माझ्या माहिती प्रमाणे टिळकांच्या काळात ती ओळख नकारात्मक बनत होती. कारण, ईंग्रजी अभ्यासक्रम ! टिळकांनी शिवाजी महाराज उत्सव आणि आपल्या शाळा सुरु करताना हेच उद्देश समोर ठेवलं होतं. त्या काळात लोकांचा आत्मसन्मान पणाला लागला होता. आपल्या मातीत जन्माला आलेली आदर्श व्यक्तिमत्वं "लुटारु" म्हणुन संबोधली जात होती. या आत्मसन्माना ला चेतवण्यासाठी लोकमान्यांनी मोठ्या हुशारीने या सोहळ्यांचा उपयोग करुन घेतला. जनमानसात गणपती आणि शिवाजी महाराज हे अनुक्रमे बुद्धीचे आणि शौर्याचे प्रतिक एके काळी होते , त्याला उभारी दिली गेली. गणेशोत्सवा मध्ये पण समाजातले सग्ळे जातिघटक एकत्र आले. कुणा एका जातीचा सण अशी गणपतीची ओळख कधीच नव्हती त्यामुळे या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेशी पण लोकं लगेच संलग्न झाले.

In reply to by स्रुजा

श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/20/2015 - 18:10
हे सर्व मला प्रथमच कळतय. महाराजांबद्दल कुणी काही उल्लेख केला असेल तरी महाराज हे आपले होते, आपल्या मातीतले होते. त्यांच्याबद्द्ल आपलीच माणसे असा विचार का करतील. मी खाली दिलेल्या दुव्यानुसार १९३४ साली ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी प्रकाशित झाल्यानंतर आपल्या लोकांनी आक्षेप घेतले जे देवगिरीकरांनी नेहरुंपर्यंत पोचवले अन नेहरुंनी चुक मान्य करून पुढच्या आवृत्तीत दुरुस्ती केली.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Wed, 08/19/2015 - 23:43
पुरस्कारातले फ़क्त १० पैसे घेऊन स्वत:चे पंधरा लाख टाकून २५ लाखांचा निधी हॉस्पिटलला दान केला. _/\_

दीपक साळुंके Wed, 08/19/2015 - 21:01
आता उल्लेख केलाच आहात तर नेहरुनी त्यांच्या डिस्कवरी ओफ इंडियात शिवाजीबद्दल नेमके काय 'वाटेल ते' लिहिले आहे ते अस्सल पुराव्यान्चा आधार देऊन कृपया सांगूनच टाका. बाकी कुरुंदकरांचा शिवाजी दूर दूर वर बाबासाहेबांचया शिवाजीशी मेळ खात नाही. तेव्हा पुरन्दारेन्ना एकाएक कुरुंदकरांचया तोडीस नेऊन बस्वलयाचे खूप आश्चर्य वाटले. (क्विलपॅड चा फारसा सराव नसल्याने कृपया शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष करावे, अशी विनंती.)

In reply to by दीपक साळुंके

विकास Wed, 08/19/2015 - 21:51
नेहरूंच्या पुस्तकाचे नाव Glimpses of World History हे होते. अनावधानाने डिसकव्हरी ऑफ इंडीया लिहीले. (श्रीरंग जोशींना चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद). आता तुम्ही विचारलेतच म्हणून येथे उत्तर देतो. आपले त्यावरचे विचार सांगितलेत तर बरे होईल... जालावर असलेल्या आवृत्तीतले एक वाक्यः "... When only a boy of nineteen he started on his predatory career..." यातील "predatory" शब्द आपल्याला योग्य वाटत असेल आणि त्यातून जनतेला योग्य संदेश दिला गेला असे वाटत असेल तर तसे अवश्य सांगावेत. त्या व्यतिरीक्त, "The book on trial: fundamentalism and censorship in India" या पुस्तकात या संदर्भात म्हणजे नेहरूंच्या १९३४ सालच्या Glimpses of World History पुस्तकात शिवाजीबद्दल: "With his enemies, he was prepared to adopt any means, good or bad, provided he gained his end. He killed a general sent against him by Bijapur by treachery" असे एक वाक्य संदर्भ म्हणून दिले आहे. शिवाय दोन परीच्छेदात शिवचरीत्र (असली वाक्ये वापरून) उरकल्यावर शेवटी म्हणायचे, " In 1674 Shivaji had himself crowned with great ceremony at Raigarh. His victories continued to his death in 1680." म्हणजे वाचणार्‍याचे आणि त्यातून समजून घेणार्‍याचे शिवाजीबद्दलचे नक्की काय मत होणार ते तुम्ही बघा. आता तुम्हाला शिवाजीने अफझलखानाला विश्वासघाताने मारले आणि हवे ते मिळवण्यासाठी शिवाजी काहीही करायचा ही वाक्ये योग्य वाटत असली तर तो तुमचा मुद्दा. मला ती पटत नाहीत आणि इतर अनेकांना ती पटली नाहीत. बरं औरंगजेबाच्या हिंदूंवरील अत्याचारांबद्दल लिहीताना काय लिहीणार तर, "But this religious Hindu nationalism of a kind had its roots even earlier than Aurangzeb's reign and it may be that it was partly because of this that Aurangzeb became so bitter and intolerant." म्हणजे कस्सा माझा औरंग्या गुणी होता, उगाच ते "प्रिडेटर", "ट्रेचरस" शिवाजी (आणि वरती शिख) हिंदू नॅशनॅलिस्ट आले आणि बिचारा त्यांच्यामुळे बिघडून bitter and intolerant झाला. असे त्यांचे म्हणणे आहे. (आणि हो, मी पुस्तकबंदीच्या, कलाबंदीच्या विरुद्ध आहे. पण जर काही खोटे अथवा चुकीचे लिहीले गेले आहे असे सिद्ध झाले असले तर ते बदलायला हवे असे नक्की म्हणेन. या बाबतीत नेहरूंनी तसे बदल अंशतः केले असे म्हणावे लागेल.) --- तेव्हा पुरन्दारेन्ना एकाएक कुरुंदकरांचया तोडीस नेऊन बस्वलयाचे खूप आश्चर्य वाटले. माझ्या कुठल्या वाक्यात मी त्यांना एका तोडीचे म्हणलेले आहे असे वाटले ते सांगाल का? म्हणजे नक्की आपण विश्लेषण कसे करतात ते तरी कळेल. धन्यवाद.

बॅटमॅन Wed, 08/19/2015 - 21:15
बाबासाहेबांचे अभिनंदन!!!!!!!!! बाकी त्या लेखाचे शीर्षक निव्वळ संतापजनक आहे. महाराजांबद्दल असे शब्द आजवर फक्त इंग्रज आणि डच यांनीच काढलेले आहेत, मुघलांनीही नाही. फ्रायर नामक इंग्रज आणि हॅवार्ट नामक डच या दोघांनीही लिहिलेल्या समकालीन पुस्तकांत तसा उल्लेख आलेला आहे. तोच उल्लेख जाणूनबुजून करणे म्हणजे अजूनही वसाहतवादी मानसिकतेचे गुलाम असणे होय.

सौन्दर्य Wed, 08/19/2015 - 21:23
खरं आहे, अत्यंत लायक व्यक्तीला हा पुरस्कार लाभाल्याने त्या पुरस्काराची शान वाढली. मानाचा मुजरा शिव शाहिरांना.

श्रीरंग_जोशी Wed, 08/19/2015 - 21:52
नेहरूंच्या १९३४ च्या "Glimpses of world history" पुस्तकातला उल्लेख असाच नकारात्मक होता.
जालावर शोधले असता हा दुवा मिळाला. यात लिहिल्याप्रमाणे Glimpses of world history ची प्रथमावृत्ती प्रकाशित झाल्यानंतर तत्कालिन कॉंग्रेस नेते श्री देवगिरीकर यांनी महाराजांचा असा उल्लेख केल्याबद्दल नेहरूंना इतिहास संशोधकांचा आक्षेप कळवला. त्यानंतार नेहरुंनी याबाबत त्यांची झालेली चुक मान्य केली व पुढील आवृत्तीतून तसा उल्लेख वगळला.

In reply to by श्रीरंग_जोशी

आबा गुरुवार, 08/20/2015 - 04:14
या वर्णनाला शिवाजी महाराजांचा अपमान समजणे हा अडाणीपणा आहे

In reply to by आबा

फारएन्ड गुरुवार, 08/20/2015 - 18:12
अपमान आहे की नाही माहीत नाही, पण सन्मान नक्कीच नाही. नेहरूंनी याबद्दल फीडबॅक मिळाल्यावर बदल करणे व दिलगिरी व्यक्त करणे हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे. पण त्यांची इतर पुस्तके बघितल्यावर शिवरायांबद्दल फ्रेंच व इतर इतिहासकारांनी जे लिहीले आहे त्या कोनातून बघण्याची टेण्डन्सी दिसली होती. आग्र्याहून सुटके बद्दल त्यांना औरंगजेबानेच जाउ दिले असेही कोठेतरी (बहुतेक डिस्कवरी ऑफ इण्डिया) म्हंटलेले आहे. एकूण त्यांची अनेक संस्कृतींबद्दलची मते (अमेरिकन्स ही आले त्यात) त्यांच्या 'ब्रिटिश कंडिशनिंग' मुळे झालेली होती त्याचा प्रभाव त्यांच्या विचारात दिसतो. पण तो बदलायची फ्लेक्झिबिलिटीही त्यांनी येथे दाखवली.

In reply to by फारएन्ड

आबा Fri, 08/21/2015 - 00:00
मी नेहरूंची तळी ऊचलायची म्हणून तसं लिहीलं नाही फारएन्ड. मराठ्यांच्या इतिहासाबद्दलच्या अनेक दृष्टीकोनामधला त्यांचाही एक दृष्टीकोन, एवढंच. आता कोणताही इतिहास ऑब्जेक्टिव्हली कसा काय सांगता येईल? बाबा साहेबांच पुस्तक मला त्यांच्या शैली मुळे कंटाळवाणं वाटतं, इतिहासामुळे नाही.

In reply to by आबा

प्यारे१ Fri, 08/21/2015 - 00:07
आपलं म्हणणं कितीही योग्य असलं तरी या धाग्यापुरतं अस्थानी आणि अवेळी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. असो! मत व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो.

चतुरंग Wed, 08/19/2015 - 22:08
महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे यात शंका नाही. वादविवादाचे गालबोट या सगळ्या प्रसंगाला लागण्याने त्यांच्या कार्याला दृष्ट लागू नये याची सोय या लोकांनी आधीच करुन ठेवली असे वाटते! :) काही आठवणी - बाबासाहेबांचे शिवचरित्राख्यान मी नगरला शाळेत असताना ऐकले आहे (१९७८-१९८० चा सुमार असेल..). सात दिवसांची मालिका होती. रोज संध्याकाळी सहा वाजता भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मोने कलामंदिरात व्याख्यान असे. बरोब्बर ६ वाजता दरवाजे बंद करुन घ्यायची त्यांची सूचना होती. पहिल्या दिवशी उशीरा आलेल्या लोकांना प्रवेश मिळाला नाही. दुसर्‍यादिवशी ५.५० ला एकूणेक जागा भरलेली होती आणी लोक चिडीचूप बसून व्याख्यान सुरु होण्याची वाट बघत होते! शिवजन्माच्या आधीपासूनचा इतिहास कथन करत करत, शिवजन्म, मग राजांचे मोठे होणे, अनेक लढाया, अफझलखान वध, आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग कथन करताना त्यांची वाणी अशी काही तळपत होती की ज्याचं नाव ते. तारीख वार, सनावळ्या, मराठी महिना, तिथीसकट उल्लेख एका दमात ते करत तेव्हा ऐकणारे चाट पडत. बाजीप्रभू देशपांड्यांच्या पावनखिंड लढाईचा प्रसंग तर त्यांनी असा काही सांगितला होता की ऐकणारा प्रत्येक माणूस डोळे पुसत होता! जिताजागता इतिहास डोळ्यांसमोर उभा करणे खायचे काम नाही. हृदयात ओतप्रोत शिवप्रेम भरलेले असल्याखेरीज हे शक्य नाही. ती ओजस्वी व्याख्याने आता सगळी आठवत नसली तरी त्यावेळचे भारलेपण आणि हा माणूस काही वेगळाच आहे हे जाणवणे अजूनही ताजे आहे. त्यांची दुसरी भेट ही आमच्या घरी झाली हे माझे अहोभाग्य. बहुदा नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या काही कामानिमित्त ते आले होते त्यावेळी माझ्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. जवळपास एक तास आमच्याकडे असावेत. त्यांच्या लहानपणातल्या शाळेपासूनच्या काही गमती, किस्से ऐकवून त्यांनी आम्हाला खळखळून हसवले होते. निगर्वी व्यक्तिमत्त्व, अतिशय सूक्ष्म विनोदबुद्धी आणि प्रत्येक विषयाच्या खोलात जाण्याचा जिज्ञासायुक्त स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये लक्षात राहिली आहेत. त्यांनी चुकूनही स्वतःचा मोठेपणा वगैरे सांगितलेला आठवत नाही. तिसरी भेट मिरजेला झाली. ते व्याख्यानासाठी आलेले होते. बहुतेक काशीकर मंगलकार्यालयाचा हॉल होता. पाऊल ठेवायला जागा नव्हती. व्याख्यानाचा विषय आठवत नाही. परंतु बोलण्याच्या ओघात इंग्लिश खाडी पार करुन जाणारी पहिली भारतीय महिला कोण असा प्रश्न आला. संपूर्ण सभागृहात चिडीचूप शांतता. बाबासाहेब गरजले "अरे ह्या मिरजेत उत्तर माहीत असणारा एकही माईचा लाल असू नये? लांछनास्पद आहे!" ताबडतोब एकाने "आरती साहा" हे उत्तर दिल्याबरोब्बर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी त्या मुलाचे तोंडभरुन कौतुक केले! तुमचा इतिहास विसरु नका त्यातून प्रेरणा घ्या, शिकत राहा हा संदेश त्यांनी दिला!

In reply to by चतुरंग

पिलीयन रायडर गुरुवार, 08/20/2015 - 00:09
किती भाग्यवान आहात!! मला कधीच त्यांना प्रत्यक्षात भेटता आले नाही. पण शिवछत्रपती पुस्तक वाचताना अगदी मंत्रमुग्ध झाले होते. एखाद्याच्या संपुर्ण आयुष्याला एकाच विचाराने झपाटले म्हणजे काय होते हे तेव्हा कळालं होतं. माझी आई त्यांच्या व्याख्यानाला गेली होती तेव्हा म्हणे त्या भाषणात त्यांनी अनेकदा एकच वाक्य म्हणले की माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाचे वाईट केले नाही तऋ माझ्या वर काळी शाई टाकली.. (मला नक्की माहित नाहीये हा प्रसंग त्यामुळे शब्द मागे पुढे होऊ शकतात) त्यांना फारच खंत लागलेली दिसली. वाईट वाटलं खुप ते ऐकुन... असो.. मुर्खांना जगात कमतरता नाही. बाबासाहेब पुरंदरेंना हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन!! आज त्यांचा वाढदिवसही आहे म्हणे.. त्यासाठी सुद्धा मनःपुर्वक शुभेच्छा!

In reply to by पिलीयन रायडर

काळा पहाड Sat, 08/22/2015 - 19:48
या ब्रिगेडी मनोवृत्तीच्या लोकांनी प्रत्यक्ष महाराजांनाही मनस्ताप दिला होता. महाराज त्यांच्या बरोबरीचे नाहीतच (भोसले कूळ हे जाधव, मोरे, सावंत आदींच्या बरोबरीचे नाहीच) अशा मनोवृत्तीतून महाराजांना त्यांनी सशस्त्र विरोध केला होता. जिथे महाराजांना सोडलं नाही तिथे पुरंदरे कोण?

In reply to by चतुरंग

हेमंत लाटकर Tue, 08/25/2015 - 12:33
तुम्ही खुप भाग्यवान आहात. बाबासाहेब पुरंदरे प्रत्यक्ष तुमच्या घरी आले. तुम्ही लिहलेले वाचूनच मी भारावलो, तुमची काय अवस्था झाली असेल. त्याचबरोबर शाळेत मित्रांसमोर भाव वाढला असणार.

आरोह Wed, 08/19/2015 - 23:21
नरहर कुरंदकरांची एक सुन्दर प्रस्तावना वाचल्याचे आठवते...कदाचित श्रीमान योगी साठी असेल...कुठल्याही अभिनिवेशा शिवाय लिहिलेली एक छान प्रस्तावना आहे.

सुबोध खरे Wed, 08/19/2015 - 23:47
"पुरस्काराच्या स्वरुपात आपण मला १० लक्ष रुपये दिले. हे पैसे महाराष्ट्राचे आहेत, शाहीरांचे आहेत, कवींचे आहेत, लेखकांचे आहेत, इतिहासकारांचे आहेत, कलाकारांचे आहेत! ह्या पैश्यांवर माझा जरादेखील अधिकार नाही. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल यांचा आणि समस्त महाराष्ट्राचा मान राखायचा म्हणून, मी यांतले १० पैसे तेवढे घेतो. आणि त्या १० लक्ष रुपयांत माझ्याकडचे १५ लक्ष रुपये घालून, पैश्यांअभावी कॅन्सरवर उपचार करवू न शकणाऱ्या गरीब रुग्णांसाठी एकूण २५ लक्ष रुपये देऊन टाकतो!" — 'महाराष्ट्रभूषण' शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.

पैसा Wed, 08/19/2015 - 23:55
बाबासाहेब पुरंदर्‍यांचे अभिनंदन! ज्या काळात पुस्तके लिहिणे, ती छापून आणणे आणि खपवणे हे जिकिरीचे काम होते त्या काळात बाबासाहेबांनी इतिहासावर पुस्तके लिहिली आणि विक्रमी संख्येने त्यांचा खप झाला. जाणता राजा उभे करण्यासाठी त्यांनी काय कष्ट केले असतील आणि पैसे कसे गोळा केले असतील तेच जाणोत. ऐतिहासिक संदर्भ, रुमाल, तलवारी बघण्यासाठी त्यांची आणि गोनिदांची जी काय धावपळ आणि पायपीट चालायची आणि स्पर्धाही, त्याबद्दल गोनिदांनी छंद माझे वेगळे पुस्तकात फार सुरेख शब्दात लिहिलेले आठवते. पुरस्काराचे राजकारण करणार्‍यांना देव क्षमा करो. ते काय करत आहेत हे त्यांनाही कळत नाही. मात्र या पुरस्काराची रक्कम त्यात स्वतःची भर घालून कॅन्सर रुग्णांसाठी देणार्‍या बाबासाहेबांनी आपण काय आहोत आणि हे कोल्हेकुई करणारे काय आहेत हे या लुच्च्या लफंग्यांना दाखवून दिले. शाळकरी वयात रत्नागिरीला बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली होती. त्यानंतर मुले शाळकरी असताना जाणता राजाचा प्रयोग पाहिला. दोन्ही वेळी भारलेले वातावरण तेच, तसेच. ८० व्या वर्षी औरंगझेबाची भूमिका बाबासाहेबांना हौसेने करताना पाहिले. सुई पडली तरी आवाज येईल अशा शांततेने लोक तासंतास इतिहासाबद्दल व्याख्याने ऐकत आहेत असे बाबासाहेबांपूर्वी कधी झाले नसावे. महाराष्ट्रात अनेक इतिहास संशोधक अभ्यासक झाले, आहेत. पण ते असे लोकांपर्यंत पोचले नाहीत. इतिहासाचार्य राजवाड्यांना तर विपन्नावस्थेत दिवस काढावे लागले. बाबासाहेबांनी इतिहास अभ्यासकाला एक प्रकारचे ग्लॅमर नक्कीच मिळवून दिले. शिवसेनेच्या स्थापनेत बाबासाहेबांचा महत्त्वाचा वाटा होता असे कुठेतरी वाचले होते. हे अस्सल शिवभक्त नंतरच्या काळात सेनेत सक्रीय राहिले नाहीत. राजकारणात न जाता ते आपली शाहिरी करत राहिले हे आपले नशीब. नाहीतर शिवाजी महाराज हा चौथीच्या अभ्यासाचा विषय राहिला असता आणि आता परीक्षा नसल्यामुळे मुलांनी तेवढाही अभ्यास केला नसता. लहान मुलांना इतिहासाची गोडी लावण्याचे काम राजा शिवछत्रपती या पुस्तकाने चोख केले. संस्कार व्हायच्या वयात राजा शिवछत्रपती पुस्तकाचे खंड घरात होते हे माझे मोठे नशीब! बाबासाहेबांना आता कोणता पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय, आमच्यासारख्यांना काही फरक पडत नाही. तसा स्वत: बाबासाहेबांनाही पडणार नाही. मात्र हा पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने पुरस्काराची शोभा वाढवली आहे. असेच शाहिरी करत बाबासाहेब शंभरावा वाढदिवस बघू देत ही आमची सामान्य माणसांची शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/20/2015 - 00:13
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महारष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. छत्रपती शिवरायांचे चरित्र जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अनन्य आहे !

पद्मावति गुरुवार, 08/20/2015 - 00:45
पैसा यांनी जाणता राजाचा उल्लेख केला म्हणून आवर्जून सांगते. एक दोन महिने आधी इथे लंडन मधे जाणता राजा चा प्रयोग होता, त्याला मुलांना घेऊन गेलो होतो. असे बरेच लोक आपल्या मुलांना मुद्दाम घेऊन आले होते. तो प्रयोग आणि शेवटचा राज्याभिषेकाचा देखावा ही मुले डोळे मोठाले करून पहात होती. त्यांचा तो आ वसलेला, त्यांच्या टाळ्या आणि त्यांच्या तोंडून शिवाजी महाराज was soooo awesome....हे जेव्हा ऐकलं तेव्हा अक्षरश: जग जिंकल्यासारखं वाटलं होतं. परदेशात जन्मलेल्या, वाढत असलेल्या आमच्या मुलांपर्यंत महाराजांच्या चरित्राला पोहोचविणार्या बाबासाहेबांचे शतश: आभार.

In reply to by पद्मावति

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 08/20/2015 - 14:56
येथे झालेल्या जाणता राजाच्या प्रयोगात माझा लंडनवासी मित्र प्रदीप नेहे आणि त्याच्या मुलाने काम केले होते. त्याचे मस्त फोटोही पाठविले होते मला. बाबासाहेब पुरंदर्‍यांचे हार्दीक अभिनंदन. त्या पुरस्काराच्या पैशात स्वतः कडची भर घालुन त्याचे जे दान केले त्यामुळे टिकाकारान्च्या सणकुन थोबाडीत बसली असेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रमेश आठवले Fri, 08/21/2015 - 02:13
बाबासाहेब पुरंदर्‍यांचे हार्दीक अभिनंदन. त्या पुरस्काराच्या पैशात स्वतः कडची भर घालुन त्याचे जे दान केले त्यामुळे टिकाकारान्च्या सणकुन थोबाडीत बसली असेल

आबा गुरुवार, 08/20/2015 - 04:21
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं असेच मत श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक या पुस्तकांविषयी सुद्धा आहे

In reply to by आबा

कहर गुरुवार, 08/20/2015 - 16:52
बाकी जाँन्र सारखाच
राजाशिवछत्रपती आणि हरी पोटर ची तुलना??? तुम्हीतर तारे तोडण्यात पप्पू वर मात केलीत आबा

In reply to by कहर

आबा गुरुवार, 08/20/2015 - 17:25
राजा शिवछ्त्रपती न आवडणार्‍याला हॅरी पॉटर वाचण्याचा सल्ला देऊन आपण साक्षी महाराजांवर मात केलीत त्याचं काय ?

In reply to by प्यारे१

आबा गुरुवार, 08/20/2015 - 17:40
त्यामुळे विषय बदलेल, बाबासाहेबांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल कौतुक आहे, परंतू राजा शिवछत्रपती मला काही आवडलं नव्हतं

In reply to by आबा

कहर गुरुवार, 08/20/2015 - 17:51
आबा फक्त राजाशिवछत्रपती नाही
श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक
सुद्धा मराठीतील प्रसिद्ध पुस्तके आंतरजालावर शोधली तर पहिल्या दहात हि सारी पुस्तके येतात. मराठीत वाचण्यासारखे भरपूर आहे मान्य आहे पण आपली "ही" (ना)आवड पाहून बाकीच्या पुस्तकांवर दया दाखवून हरी पोटर सुचवले ओ … असे लोक देखील महाराष्ट्रात आहेत हे कळल्यानंतर जीतुभैय्या बद्दल सहानभूती वाटणारा कहर

In reply to by कहर

आबा गुरुवार, 08/20/2015 - 18:03
खुप आहेत हो असे लोक, आणि त्यातल्या सर्वांनाच जीतुभैय्या बद्दल सहानुभुती वगैरे वाटत नाही आणि मराठी मध्ये वाचण्यासारखे भरपूर आहे हे म्हणालात त्याबद्दल धन्यवाद

In reply to by आबा

कहर गुरुवार, 08/20/2015 - 18:12
महाराजांच्या कार्याबद्दल तरी अभिमान वाटतो कि तेही विशेष नाही सहज उत्सुकतेपोटी विचारली. मनात एक नि इथे सांगायला एक असे उत्तर दिले तरी चालेल

In reply to by कहर

काळा पहाड Sat, 08/22/2015 - 19:54
एक फक्त सांगतो, की राजा शिवछत्रपती वाचण्याचा कदाचित मलाही कंटाळा येईल, कारण ते भावनात्मक जास्त आहे आणि बुद्धीला खाद्य देणारं कमी आहे. किंवा असंही असेल की महाराजांचं सर्व आयुष्य पाठ झाल्यामुळे (आणि पूर्वी एकदा ते वाचूनही झाल्यामुळे) त्यात नावीन्य वाटणार नाही. पुरंदरेंची व्याख्यानं बर्‍याचदा ऐकल्यामुळेही असं होवू शकेल.

In reply to by आबा

फारएन्ड गुरुवार, 08/20/2015 - 18:16
मृत्युंजय वगैरे वाचायचा मलाही कंटाळा आला. मात्र राजा शिवछत्रपती चे मॅजिक वेगळेच आहे. ते वाचले पण आवडले नाही म्हणणारे तुम्ही पहिलेच माझ्या माहितीत. पण समाजाने डोक्यावर घेतलेल्या काही गोष्टी बोअर वाटणारे काही मित्र आहेत, मलाही असे एक दोन कलाकृतींबद्दल वाटते. त्यामुळे याचे आश्चर्य वाटले नाही.

In reply to by आबा

अर्धवटराव गुरुवार, 08/20/2015 - 22:19
अत्यंत बोर नाहि पण बराचसा भाग पल्हाळ वाटतो राजा शिवछत्रपतीचा. श्रीमान योगी पण काहि अंशी तसं आहे (या कादंबरीवर कुरुंदकरांच्या प्रस्तावनेची अनेक पारायणं केली आहेत ) . मृत्युंजय देखील अपवाद नाहि. राधेय मी वाचलं नाहि. महानायक मात्र अवडलं होतं... पण त्याला आता फार वर्षे झाली. या यादीत 'छावा' पण यायला हवा असं वाटतं :)

In reply to by अर्धवटराव

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 22:39
पाल्हाळाबद्दल सहमत. त्यामुळेच एका मर्यादेनंतर त्याऐवजी मेहेंदळ्यांचे शिवचरित्रच बरे वाटते. यात 'एका मर्यादेनंतर' हा भाग कळीचा आहे. त्या विषयाची गोडी लागायला मात्र राजा शिवछत्रपतीच पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

अर्धवटराव गुरुवार, 08/20/2015 - 22:46
खरय. नाहिपेक्षा 'राजे तुम्ही नाटकातच का नाहि राहिलात' अशी पु. लं. सारखी आर्त साद घालावी लागली असती.

In reply to by आबा

पिलीयन रायडर Fri, 08/21/2015 - 09:20
आबा, तुम्ही अगदीच कामातुन गेलेले वाटत नाही तुमच्या लिहीण्याच्या शैलीवरुन.. म्हणुन एक प्रश्न..
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं
आवर्जुन ह्याच धाग्यावर हे का सांगावसं वाटलं?

In reply to by पिलीयन रायडर

मैत्र Fri, 08/21/2015 - 16:43
माझ्या आवडत्या पुस्तकांमध्ये कदाचित हे पुस्तक येणार नाही. पण ती चर्चा करण्याचा हा धागा नक्कीच नाही. आणि मला बोअर वाटलं असं sweeping generalized statement (इंग्रजीबद्दल आधीच क्षमस्व) करण्याचाही नाही. तुम्हाला ही पुस्तकं नसतील आवडली. सहज शक्य आहे. प्रसिद्ध पुस्तकं प्रत्येकाला आवडलीच पाहिजेत असा काही नियम नाही आणि त्यावरून कोणाची अभिरुची ठरू नये. मला वैयक्तिक रित्या कुरुंदकरांनी मांडलेले शिवाजी महाराज फार जबरदस्त वाटतात. कारण त्यामागचा सखोल विचार. तरीही लहानपणी महाराजांच्या बद्दल गोडी, आदर, अस्मिता निर्माण झाली ती पुरंदरे यांनी लिहिलेल्या "महाराज" या पुस्तकामुळे. ते राजा शिवछत्रपती प्रमाणे कादंबरीवजा नाही आणि त्यात संवाद नाही. काही प्रमाणात सनावळ्यांनी भरलेलं चरित्र आहे. पण माहिती आणि दीनानाथ दलाल यांची चित्रं अप्रतिम आहेत. आता आउट ऑफ प्रिंट असावं.

In reply to by पिलीयन रायडर

आबा Fri, 08/21/2015 - 19:51
तुम्ही अगदीच कामातून गेलेले वाटत नाही ... अशी वाक्ये मी काँन्व्हरसेशन स्टार्टर म्हणून वापरत नाही, म्हणजे माझं डोकं तरी ठिकाणावरच असावं असा अंदाज आहे

तुडतुडी गुरुवार, 08/20/2015 - 14:16
राजा शिवछत्रपती हे अत्यंत बोअर पुस्तक आहे असं वाचल्यानंतर मत झालं होतं असेच मत श्रीमान योगी, मृत्यंजय, राधेय, महानायक या पुस्तकांविषयी सुद्धा आहे>>> धन्य आहात मग कसली पुस्तकं विंटरेष्टिंग वाटतात तुम्हाला ? राधेय आणि महानायक नै वाचलं बाकीची सगळी पुस्तकं उत्तम . श्रीमान योगी तर लाजवाब . माझ्यात इतिहासाची गोडी निर्माण करण्याला हे पुस्तक कारणीभूत आहे बाबासाहेब पुरंदरेंच अभिनंदन

कलंत्री गुरुवार, 08/20/2015 - 14:21
शिवशाहीर बाबासाहेबांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल विनम्र अभिवादन.

समीरसूर गुरुवार, 08/20/2015 - 14:30
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! त्यांच्यासारखा आयुष्य पणाला लावून शिवचरित्राचा अभ्यास करणारा इतिहासकार उभ्या महाराष्ट्रात झाला नाही आणि होणारही नाही. आणि देवेंद्र फडणविस आणि महाराष्ट्र शासनाचेदेखील अभिनंदन! कुठल्याही दडपणाला बळी न पडता हा सोहळा दिमाखात पार पाडून दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावयास हवे. राष्ट्रवादी, आव्हाड, ब्रिगेड, आणि इतर उपद्रवी घटकांनी जो तमाशा केला तो महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे हे नक्की. कित्येक महत्वाचे प्रश्न असतांना एका पुरस्काराच्या सुयोग्य निवडीवरून आकांड-तांडव घालून राष्ट्रवादी पक्षाने नेमके काय साधले त्यांनाच माहित. पवारांचे सगळे फासे उलटे पडत आहेत हे बहुधा त्यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये. ब्राह्मण - मराठा द्वेष याखेरीज बाबासाहेबांना विरोध करण्याचे कुठलेही कारण नव्हते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे. राष्ट्रवादीने गेली १५ वर्षे हेच विघातक आणि समाज तोडण्याचेच राजकारण केलेले आहे. २०-२५ वर्षांपूर्वी जातीय तेढ इतकी नव्हती; राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीय अराजकतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. शिवाय बेसुमार भ्रष्टाचार आणि गुंडगिरी प्रचंड फोफावली हे सांगणे न लगे. नेमाडे सध्या काहीही बरळत आहेत. त्यांना ज्ञानपीठ कसा मिळाला हेच मला न उलगडलेले कोडे आहे. त्यांच्यातही ब्राह्मण द्वेष ठासून भरलेला आहेच. उलट-सुलट विधाने करणे, कुणावरही कशीही टीका करणे, पुरस्कार स्वीकारतांना मात्र मूग गिळून स्वीकारणे असले आचरट प्रकार नेमाड्यांनी चालवलेले आहेत. असो. बाबासाहेबांचे पुन:श्च अभिनंदन!

In reply to by समीरसूर

बबन ताम्बे गुरुवार, 08/20/2015 - 14:58
बाबासाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन! "राजा शिवछ्त्रपती" ची मी पारायणे केली आहेत आणि जाणता राजा हे महानाट्य पण पाहिले आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य छ्त्रपती शिवाजी महाराज या दैवताला अर्पण केले, त्या कॄषितुल्य व्यक्तिमत्वाच्या वाटयाला आयुष्याच्या उत्तरार्धात अवहेलना यावी यासारखे दुर्दैव नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात असे व्हायला नको होते.

लोटीया_पठाण गुरुवार, 08/20/2015 - 15:11
कुरुंदकरांच्या शिवाजी महाराज या विषयावरील व्याख्यानाच्या लिंक्स. यातील दुसर्या भागात ब्राह्मण -ब्राह्मणेतर वाद, दादोजी- रामदास - गागाभट्ट-शिवाजी, वैदिक राजाभिषेक, गोब्राह्मण प्रतीपालंकत्व वगैरेंवर विस्तृत विवेचन आहे. अन हि मांडणी बाबासाहेबांनी केलेल्या मांडणीपेक्षा फार वेगळी आहे असा मला वाटत नाही.

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 18:03
लोक्स एक लक्षात घ्या. बाबासाहेबांचे कार्य सुरू कधी झाले? चरित्र कधी लिहिले? १९५५-६० सालच्या आसपास. त्याच्या अगोदर कोणी इतिहासकार नव्हते? लेखकांनी काही कथाकादंबर्‍या लिहिल्या नव्हत्या? कुठल्याही युरोपियन भाषेतले पहिले शिवचरित्र म्हणजे १६८८ साली एका फ्रेंचाने लिहिलेले होय. त्यानंतर १६९५ साली पोर्तुगीज भाषेत कॉस्मा द ग्वार्दा याने लिहिलेले शिवचरित्र आहे. त्यानंतर अनेक पुस्तकांत शिवरायांचा उल्लेख आलेला आहे. मराठी बखरी-कागदपत्रे सोडून द्या, मुघलांचे फारसी भाषेतील इतिहास ग्रंथ, उदा. खाफीखानाचा मुन्तखब-उल-लुबाब किंवा भीमसेन सक्सेना याचा तारीख-ए-दिल्कुशा, आदिलशाहीचा इतिहास बसातीन-उस-सलातीन, हफ्त अंजुमन, वगैरे अनेक फारसी ग्रंथ आहेत. इतकेच कशाला, आसाम प्रांतातील आहोम राजसत्तेच्या बखरींमध्येही दोनेक ओळींचा का होईना उल्लेख आहे. आणि या सर्वांनी महाराजांची फक्त निंदाच केलीय असे आजिबात नाही. पुढे मराठ्यांचा सर्वांत पहिला इतिहास लिहिला तो कीर नामक इंग्रज इतिहासकाराने, १७८२ साली. इंग्रजी सत्ता आल्यावरचा पहिला इतिहास म्हणजे ग्रँट डफचा, तो लिहिला गेला १८२१ साली. त्यातील काही चुका काढणारे पहिले गृहस्थ म्हणजे नीळकंठराव कीर्तने. त्यांच्या त्या निबंधाचे प्रकाशनवर्ष आहे १८६७. तिथून पुढे १९०० सालापर्यंत इतिहासाचार्य राजवाडे, द.बा.पारसनीस, वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार सरदेसाई अशी इतिहासकारांची सलग लड लागल्यासारखी होती. इतकेच नव्हे तर अनेक कादंबरीकार, नाटककार हे शिवकाल-पेशवेकालविषयक कादंबर्‍या लिहीतच होते पूर्ण १९व्या शतकभर. महात्मा फुल्यांनी शिवजयंतीचा उत्सव प्रथम सुरू केला, त्याला लोकमान्यांनी मोठे स्वरूप दिले व १९०६ साली शिवसमाधी नव्याने बांधून घेतली. हडप नामक कादंबरीकारांनी पूर्ण मराठा इतिहास कव्हर करणार्‍या पन्नासेक कादंबर्‍या लिहिल्या. काव्येतिहाससंग्रह नामक मासिकातून १८७०-८० पासून जुन्या मराठी बखरी, पोवाडे वगैरे एकदम भसाभस बाहेर पडत होते. संशोधक जुनी कागदपत्रे तपासायचे आणि प्रकाशित करायचे. अनेक मेळे, समारंभ, इ. च्या माध्यमातून नाटके सादर व्हायची. वासुदेवशास्त्री खरे आणि इतर अनेकांनी तशी कैक नाटके लिहिलेली आहेत. गड आला पण सिंह गेला, कांचनगडची मोहना वगैरे कादंबर्‍या याच काळाच्या आसपासच्या. त्यातून शिवाजीमहाराजांची एक विशिष्ट इमेज महाराष्ट्रावर हळू हळू दृढपणे ठसत गेली. स्वराज्यासाठी लढणार्‍या या वीराची कीर्ती इंग्रजी अंमलाच्या काळात पूर्ण भारतभर पसरली. बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी 'जयतु शिवाजी' ही कविता लिहिली, त्या प्रांतात शिवाजीउत्सवही साजरा होऊ लागला. (सखाराम गणेश देऊस्कर या गृहस्थांच्या पुढाकाराने) महाराष्ट्राबाहेर अनेक प्रांतांत या काळात (१९०० च्या पुढे, १९३०-५० पर्यंत) शिवचरित्रे लिहिली जाऊ लागली. तेव्हाच कोल्हापूरला १९३० साली बाळकृष्ण या पंजाबी गृहस्थांनी एक चार खंडी शिवचरित्र लिहिले 'शिवाजी द ग्रेट' या नावाने. ते राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांचे शिवचरित्र त्या काळचे सर्वांत अद्ययावत चरित्र म्हटल्यास हरकत नाही. त्याचा वापर अनेकांनी पुढे केला पण बाळकृष्णांचे नाव फारसे कुणालाच माहिती नाही. [इंग्रजांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा नेहमीच लुटारू, बंडखोर अशी रंगवलेली नाही हेही जाता जाता सांगतो.] पुढे रियासतकार सरदेसायांनी बरेच कष्ट घेऊन मराठ्यांचा पूर्ण इतिहास एकटाकी लिहून काढला, जदुनाथ सरकारांनीही एक शिवचरित्र लिहिले. पुढे सुरेंद्रनाथ सेनांनी जे काम केले त्यामुळे पॅन-इंडियन लेव्हलवर मराठ्यांची इमेज पुन्हा एकदा सुधारण्यास मदत झाली, नायतर "शिवाजी चांगला होता पण मराठे लुटारू होते" छाप इमेज खूप रूढ होती. शिवाय मोडीसाठी राजवाडे, खरे, आणि अजूनही अनेक, फारसीसाठी सेतुमाधवराव पगडी व ग ह खरे, पोर्तुगीजसाठी पांडुरंग पिसुर्लेकर, इंग्रजीसाठी बी जी परांजपे, फ्रेंचसाठी हतळकर व सेन, डचसाठी बाळकृष्ण व वाडेकर, एका पर्स्पेक्टिव्हकरिता त्र्यंबक शंकर शेजवलकर वगैरे असे अनेक संशोधक उदयाला आले. मी खरे तर अजून अनेकांची नावे वगळली आहेत. मेन उद्देश हाच होता की जणू बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, आणि नेहरूंचा उल्लेख हाच काय तो भारतभर आणि जगभर प्रमाण मानला जायचा, त्यांच्या चुकीच्या इतिहासात सुधारणा करणारे फक्त बाबासाहेबच काय ते अशा भ्रामक समजुतीत कोणीही राहू नये. बाबासाहेबांच्या मागे किमान शंभरदीडशे वर्षांची संशोधनपरंपरा आहे. पैलवानाने कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत जाऊन कुस्तीचे धडे घ्यावेत त्याप्रमाणे त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन इतिहासाचे अध्ययन केलेले आहे. त्यांच्या मागे या शेकडो संशोधकांच्या अफाट परिश्रमाची प्रचंड मोठी पुण्याई आहे. बाबासाहेबांच्या स्तुतीपायी पूर्वी ज्यांनी हाडाची काडे करून इतिहास वाचवला, वाण्याच्या दुकानातल्या रद्दी कागदांना खरेदी करुन, बंबाचे सर्पण म्हणून वापरल्या जाणारे कागद वाचवून, माळ्यावर पडलेल्या, उंदराच्या लेंड्या पडलेल्या आणि वाळवीने खाल्लेल्या पोथ्यांतून जमेल तेवढा इतिहास वाचवणार्‍या आणि आपल्यापुढे आणणार्‍या बाकी संशोधकांनाही विसरू नका असे या निमित्ताने कळकळीचे आवाहन आहे.

In reply to by बॅटमॅन

श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/20/2015 - 18:26
अभ्यासपूर्ण अन माहितीपूर्ण प्रतिसाद रे बॅट्या. तुझ्याएवढा अभ्यास दूरदूरपर्यंत नसला तरी आजवरच्या निरिक्षणांतून माझेही मत तुझ्यासारखेच होते व आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 18:31
आजवरच्या निरिक्षणांतून माझेही मत तुझ्यासारखेच होते व आहे.
धन्यवाद सरजी. लोकांची अतिशयोक्ती पाहून वाईट वाटते. बाबासाहेबांचे कार्य मोठे आहे, पण त्यापायी अगोदरच्यांचा अपमान होता कामा नये. आणि यात फक्त संशोधकच नाहीत तर अनेक लेखक-कवी-नाटककार लोकांचाही तितकाच हातभार लागलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 08/20/2015 - 18:57
हे खरेच कुणीतरी सांगायला हवे होते. एका प्रतिसादातच सगळी इतिहासकारांची फळी आपण सांगितलीत. राजवाडे, खरे, सरदेसाई, हडप, पगडी ही नावे, जदुनाथ सरकार आदी प्रभूती ऐकून माहिती होते. त्यांनी केलेल्या अफाट परिश्रमांना खरच तोड नाही. ह्यांची किमान पाच पुस्तके तरी प्रत्येक इतिहासप्रेमींनी वाचायला हवीत :) आणि हो, बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, असे नाही; पण जे वातावरण गढूळण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे पुरस्काराचा उदो जास्त झाला असे वाटते.

In reply to by बॅटमॅन

स्रुजा गुरुवार, 08/20/2015 - 19:07
प्रतिसाद फार आवडला. तुकड्या तुकड्यांमध्ये ही माहिती होती पण एक सलग एवढी तपशीलात जाऊन आज प्रथम च वाचली. धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

चतुरंग गुरुवार, 08/20/2015 - 19:14
'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले. सर्वसामान्य लोकांना इतर इतिहास संशोधनाबद्दल फारशी माहिती नसते. 'लोकप्रिय पुस्तकाचा लेखकच महान' असे सरस्कटीकरण सहज होते. ते होऊ नये यासाठी हा प्रतिसाद आवडला. बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या पुरस्काराच्या भाषणात पूर्वसूरींचा उल्लेख केलाच आहे, संशोधनाचे श्रेय त्यांना दिले आहे. त्यांच्या चरित्र लिहिण्यामागच्या भूमिकेचा उहापोह केला आहे. वयोमानाने भाषण थोडे विस्कळित आणि किंचित पाल्हाळयुक्त वाटते परंतु आशय समजून घेणे महत्त्वाचे! :)संपूर्ण भाषण इथे ऐकू शकाल. http://goo.gl/kb2P1H

In reply to by चतुरंग

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 19:31
सहमत, बाबासाहेबांनी कधीही पूर्वसूरींचे ऋण नाकारले नाही. बाबासाहेबांच्या आधीही अनेक शिवकालविषयक कादंबर्‍या आणि नाटके तुफान फेमस होती, पण बाबासाहेबांनी ग्रंथ आणि नाट्य अशा दोन्ही स्वरूपात एकहाती जे प्रचारकार्य केले त्याला तोड नाही. त्यामुळे जनतेला त्यांच्या कार्याची महती जास्त भावली. आणि वैसेभी गावस्कर किंवा रणजी हे दोघेही महान असले तरी सध्याच्या पिढीला तेंडुलकर जसा जास्त भावतो तोच न्याय काहीसा इथेही लागू होईलसं वाटतं. बाकी भाषणाच्या दुव्याकरिता धन्यवाद! नक्की ऐकतो.

In reply to by चतुरंग

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/20/2015 - 20:20
+१ 'राजा शिवछत्रपती' या पुस्तकाचे मुख्य यश माझ्यामते मराठी घराघरातून महाराजांचा इतिहास सोप्या आणि लालित्यपूर्ण भाषेत पोचवणे हे आहे. ओघवत्या भाषेमुळे, संशोधन निबंधातला/लेखातला जडपणा टाळल्यामुळे ते लोकप्रिय झाले. +१०० इतिहास लालित्यपूर्ण भाषेत पोहोचवणे हे फार कमी इतिहास संशोधकांना जमते (जसे आधुनिक विज्ञान लोकांना समजेल असे सांगणारे वैज्ञानिक-संशोधक विरळा आहेत तसेच हे पण). इतिहास तोच असला तरी तो सद्यकालात लोकाभिमुख करण्याचे ... आणि मुख्य म्हणजे ते काम आपल्या हितसंबंधांना सोईस्कर अशी त्याची मोडतोड न करता करण्याचे.... श्रेय पुरंदरेंना नक्कीच देता येईल.

In reply to by बॅटमॅन

विकास गुरुवार, 08/20/2015 - 20:24
माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्यातील माझ्या मूळ वक्तव्यावर केलेल्या टिपण्णी बाबत लिहीणे (प्रतिसाद माहितीपूर्ण आणि समतोल असल्याने) मी महत्वाचे समजतो... सर्वप्रथम एक प्रश्न - शिवाजीबद्दल चांगले लिहीणारेच एतद्देशीय आहेत का? तसे असते तर जदुनाथ सरकार ना शिवाजी अँड हिज टाईम या पुस्तकात, अफझलखान वधावरून (शिवाजीचे समर्थन करण्यासाठी) एक परिशिष्ठ का लिहावे लागले असते? त्यात ते शिवाजीचे समर्थन करणार्‍या अधुनिक सुशिक्षितांचा उल्लेख हा 20th century apologists of the national hero असा करतात... इतकी वेळ का आली असावी? असो. मी खरे तर अजून अनेकांची नावे वगळली आहेत. मेन उद्देश हाच होता की जणू बाबासाहेबांच्या अगोदर सगळा अंधार होता, आणि नेहरूंचा उल्लेख हाच काय तो भारतभर आणि जगभर प्रमाण मानला जायचा, त्यांच्या चुकीच्या इतिहासात सुधारणा करणारे फक्त बाबासाहेबच काय ते अशा भ्रामक समजुतीत कोणीही राहू नये. बाबासाहेबांना मी इतिहासकार म्हणलेले नाही, त्यांनी सुधारणा केल्या असे देखील म्हणलेले नाही. माझ्या लेखनात आधीच म्हणल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी "गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला.". त्यावेळचे वातावरण म्हणजे त्यांनी सुरवात केली त्यावेळी १९५५-६० साली जे काही वातावरण होते ते महाराष्ट्र-फ्रेंडली होते असे नव्हे. गांधीहत्येमुळे पश्चिम महाराष्ट्रात होरपळ झाली (आणि हो याबद्दल तुम्हाला हवी असल्यास व्यनिने अधिक लिहीन) नंतर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच जातीयवाद फोफावला होता (त्याचेच एक रूप आत्ता देखील दुर्दैवाने बघावे लागत आहे). त्यात भर म्हणजे नेहरूंचा संयुक्त महाराष्ट्रास विरोध होता. इतका की त्यामुळे सी.डी. देशमुखाने त्या कारणावरून अर्थमंत्रीपदाचा राजीनामा संसदेत दिला... नेहरूभक्त स.का. पाटलांसारखे तर "यावच्चंद्रदिवकरौ" मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार नाही असे म्हणत होते. तरी देखील बाकी इतर अनेक सन्मान्य कारणांमुळे नेहरू हे जनसामान्यांमधे प्रिय होते. ही त्याची पूर्वपिठीका... तुम्हीच बघत आहात, जी काही नावे तुम्ही वरील प्रतिसादात दिली, ती इतर कुणालाच माहीत नाहीत हे त्यावर आलेल्या प्रतिसादातून समजते - टिळक, काही अंशी महात्मा फुले यांचा अपवाद सोडल्यास... रियासतकार हे अधिक मराठ्यांच्या इतिहासाबद्दल माहीत असतात. बरं जे इतिहासकार असतात त्यांची जनसामान्यांत जाणारी पोच ही मर्यादीत असते. जसे मी आधी कुरंदकरांच्या बाबतीत बोललो. त्यात त्यांचा दोष नसतो पण ती केवळ मर्यादाच असते. अशा वेळेस माहीत काय असते तर ज्यांना माध्यमांनी ज्यांना मोठे केलेले असते अशी व्यक्तीमत्वे आणि माध्यमांमधील म्होरक्यांना जे काय चांगले - वाईट दाखवून जनमत तयार करायचे असते ती माहिती... "जे जे आचरीतो श्रेष्ठ, ते ते ची दुसरे जन, तो मान्य करतो ते ते, लोकं चालवितात ते" या उक्तीप्रमाणे त्यात नेहरू येतात... दुसर्‍या टोकाला विनोद मेहता तसेच त्यांच्याच आउटलूक मध्ये जेम्स लेन्स प्रकरणी आणि त्यावरून तत्कालीन राजकारणावर २००४ साली लिहीताना शिर्षकातच शिवाजीचा उल्लेख "To Chase A Moutain Rat " असा करणार्‍या स्मृती कोप्पिकर या देखील येतात. गोष्टी बर्‍याच वेळेस अत्यंत subtle पद्धतीने बिंबवल्या जातात. कधी कधी त्यात अंतस्थ हेतू असतात, जे मी मेहता-कोप्पिकर आणि तत्सम डाव्यांच्या बाबतीत म्हणेन तर कधी कधी इतरांच्या, मग ते कोणिही असोत, लेखनाने / विचाराने influence झालेल्यांचा ज्यात नेहरूंसारखे येतात. नेहरूंनी "Glimpses of world history" मधे केलेले उल्लेख (इतर प्रतिसादात दिले आहेतच) नंतर काढले - भावना दुखावल्या म्हणून नाही तर factually incorrect होते म्हणून. त्यात त्यांचा प्रामाणिकपणाच दिसतो. पण "Discovery of India" मधे तरी देखील "Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism.." असे म्हणलेले आहेच. आता "Hindu Nationalism" हा शब्द अधुनिक काळासाठी नेहरूंमुळे रुढ झाला का हा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल... पण मला सांगा इथे किती जणांना असे म्हणायचे आहे की पुरंदर्‍यांच्या भाषेत महाराजांनी जो तीन तपे हलकल्लो़ळ केला तो "Hindu nationalism" म्हणून केला? थोडक्यात, स्वत:च्या इतिहासातील पराक्रमी व्यक्तींचा अभिमान ठेवण्यापासून जनतेला लांब ठेवले तर उत्तम असे काहीसे विचार, भले त्यामागील कारणे प्रामाणिक आणि उद्दात्त असोत, अनेकदा असतात. हे केवळ भारतातच असते असे म्हणायचे नाही. पण असते हे वास्तव असते. त्यातूनच वर जदुनाथांनी वर्णन केलेले apologists तयार होतात. या संदर्भात तुम्ही आणि इतर कुणाला काय वाटते ते वाटू देत. मला विशेष करून तुमच्या वाटण्याबद्दल आदरच आहे कारण तो इन्फॉर्म्ड विचारातून आलेला आहे. पण माझ्या लेखी, बाबासाहेबांनी जे शाहीरीचे काम केले त्यामुळे अधुनिक महाराष्ट्राला शिवाजी परत एकदा समजला असे म्हणायचे होते, म्हणले आणि अजूनही तेच म्हणेन.

In reply to by विकास

पैसा गुरुवार, 08/20/2015 - 20:42
राजा शिवछत्रपती लहान वयात वाचलं नसतं तर इतिहासातल्या इतर व्यक्तींबद्दल जितपत माहिती आणि प्रेम वाटतं तितकंच शिवाजी महाराजांबद्दल वाटलं असतं हे निर्विवाद! आणि माझ्यासारखे अगणित लोक महाराष्ट्रात सापडतील की या पुस्तकांमुळे त्यांच्यासाठी शिवाजी महाराज हा निव्वळ चौथीत अभ्यास करायचा धडा राहिला नाही. तर जिवंत माणसांचा इतिहास बनला. अन्यथा गोव्यात पोर्तुगीजांनी बिचोलीतला संभाजी राजांचा वाडासुद्धा जाळून टाकला, शिवाजी आणि संभाजी राजांच्या विजयांची वर्णने पराभव म्हणून लोकांच्या माथी मारली. महाराष्ट्रात तितके नाही, पण काही प्रमाणात तरी झाले असते. शिवसेनेची स्थापना होण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते, हा निव्वळ योगायोग नाही.

In reply to by विकास

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 20:50
सर्वप्रथम एक प्रश्न - शिवाजीबद्दल चांगले लिहीणारेच एतद्देशीय आहेत का? तसे असते तर जदुनाथ सरकार ना शिवाजी अँड हिज टाईम या पुस्तकात, अफझलखान वधावरून (शिवाजीचे समर्थन करण्यासाठी) एक परिशिष्ठ का लिहावे लागले असते? त्यात ते शिवाजीचे समर्थन करणार्‍या अधुनिक सुशिक्षितांचा उल्लेख हा 20th century apologists of the national hero असा करतात... इतकी वेळ का आली असावी? असो.
आजिबात नाही. चांगले उल्लेख समकालीन मुघल, इंग्रज आणि पोर्तुगीज साधनांमधूनही आढळतात, उदा. शिवाजी हा अलेक्झांडर + सीझर या दोघांना तुल्यबळ आहे असे एका इंग्रजी पत्रात वाक्य आहे. मुघल इतिहासकार खाफीखान, जो महाराजांची एक काफर म्हणून संभावना करतो तोच असेही लिहितो की शिवाजीने कुरानची प्रत युद्धात कधी हाती लागल्यास सन्मानाने नेहमीच मौलवीकडे सोपवलेली आहे, बायकांचीही विटंबना कधी केली नाही. कॉस्मा द ग्वार्दाच्या चरित्रातही स्तुतिपर वाक्ये आढळतात. हे झाले समकालीन पर्सेप्शनबद्दल. नंतरचे काय? नंतर ग्रँट डफचा इतिहास मुख्यतः शिकवला गेला. त्यातही त्याने महाराजांना फक्त शिव्याच घातलेल्या नाहीत. त्याला मराठ्यांबद्दल साधारणपणे आत्मीयताच होती. पण असे असले तरी मुघलांविरुद्धचा बंडखोर- भले मग तो यशस्वी आणि पर्सनल करिष्मेवाला असला तरी चालेल- ही प्रतिमा बर्‍यापैकी दृढमूल होती. ओव्हरऑल इतिहासाचा थ्रस्ट असा होता की अगोदर मुघल होते, मग नंतर बर्‍याच प्रादेशिक सत्ता आल्या आणि प्लासी वगैरे होऊन इंग्रज आले. मराठा इतिहासाला कव्हरेज असायचा पण तितकाही जास्त नाही. शिक्षणाचा प्रसार हळू हळू होत होता आणि अनेक सुशिक्षित लोक हे उघड्या डोळ्यांनी पाहत होते. हे जास्त काळ खपण्यापैकी नव्हतंच. त्यात अजून एक घटना घडली ती या सर्व गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वाची आहे आणि जिचा उल्लेख कुठेच फारसा मिळत नाही. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावल्यानंतर इंग्रजांनी तिथले सगळे कागदपत्र हलवले ते आज पुणे कँपमधील वास्वानी चौक येथे 'पूना आर्काईव्हज' किंवा 'पेशवे दफ्तर' इथे. जवळपास साडेतीन हजार बैलगाड्या भरून ऐवज हलवला असे वर्णन आहे. आज जवळपास तीन ते चार कोटी मोडी लिपीतील कागदपत्र तिथे आहेत. इतिहासाचा अभ्यास करणार्‍यांसाठी ही साहजिकच पर्वणी होती. पण 'पूना ब्रॅह्मिन्स' वर खार खाऊन असलेल्या सरकारने ते सर्व आर्काईव्ह देशी संशोधकांना मोस्टलि बॅन केले. राजवाड्यांसारख्यांनाही ते बॅन होते. त्यामुळे त्यांची किती जळाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी गावोगाव हिंडून कागदपत्रे गोळा करण्याचा सपाटा लावला आणि सरकारच्या नावावर टिच्चून भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. [त्यामुळे जदुनाथ सरकार- जे मोठ्या पोझिशनवर होते आणि त्यांच्या सोबत रियासतकार या दोघांना तिथे अ‍ॅक्सेस मिळाल्यावर बाकी पुणेकरांची खूप जळाली, त्यामुळे बरीच भांडणे वगैरे झाली पण तो भाग अलाहिदा.] हां तर मूळ मुद्दा असा की असे पेटून मराठ्यांच्या इतिहासाचे अध्ययन करणारा वर्ग जो होता त्यात मुख्यत्वेकरून इंग्रजद्वेष्ट्या ब्राह्मणांचा भरणा होता आणि साहजिकच हिंदू पारंपरिक विचारांचा पगडा त्यांवर जास्त होता. मराठ्यांचा गौरवशाली इतिहास कोणीही विसरले नव्हते, इनफॅक्ट पेशवाई जाऊन पुरती शंभर वर्षेही झाली नव्हती. त्याच्या आठवणी आणि सद्यकालीन दैन्य आणि त्याबद्दलचा राग या सर्व गोष्टींचे मिश्रण त्यांच्या प्रेरणेत दिसते. यांपैकी क्वचितच कोणी युनिव्हर्सिटी प्रोफेसर ऑफ इतिहास होते. बहुतेकजण काहीतरी कामधंदा सांभाळून राष्ट्रकार्य कम छंद म्हणून हे काम करायचे. तस्मात या लोकांचे आणि युनिव्हर्सिटी सिस्टिममध्ये तयार झालेल्या, सरकार-फ्रेंडलि लोकांशी जमणे तसे अवघडच होते. त्यामुळे तसे उद्गार आले असावेत. ब्रिटिश सरकारी विचारधारेत हिंदू नॅशनॅलिझम वगैरेंना स्थान असणे अशक्य होते.
बाबासाहेबांना मी इतिहासकार म्हणलेले नाही, त्यांनी सुधारणा केल्या असे देखील म्हणलेले नाही. माझ्या लेखनात आधीच म्हणल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी "गावोगाव अथक हिंडून शिवाजी बद्दल अधुनिक महाराष्ट्राला जाण करून दिली, प्रेम लावले आणि जनतेसमोर एक आदर्श उभा केला.".
माझ्या प्रतिसादात मी हार्डकोअर इतिहासकारांसोबत अनेक कादंबरीकार व नाटककारांचाही उल्लेख केलेला आहे. शिवचरित्र पॉप्युलर करणे हे त्या लोकांनी तसेच अनेक वक्त्यांनी कायम काम सुरूच ठेवले होते. अर्थात सध्याच्या पिढीला बाबासाहेबच दिसतात हेही सत्यच कारण शिवचरित्राशी पहिली ओळखच 'राजा शिवछत्रपती' च्या द्वारे होते अनेकांना. त्यामुळे सध्याच्या पिढीसाठीचा हा सर्वांत मोठा शाहीर आहे यात आजिबात शंका नाही. पण बाबासाहेब 'एकमेव' वगैरे नक्कीच नाहीत. काही प्रतिसादांतून तसे दिसले म्हणून लिहिले, असो. जसे शिवचरित्राचे स्मरण केले जाते तसेच चरित्रकारांचेही स्मरण केले जावे असे वाटते, कारण अनेक प्रतिकूल परिस्थितींमधून या चरित्राची साधने गोळा केलेली आहेत. इनफॅक्ट शिवचरित्राची सर्व साधने कशी अन कुठल्या परिस्थितीत गोळा करून प्रकाशित करण्यात आली याची कथाही शिवचरित्रासारखीच रंजक आहे (त्या त्या क्षेत्रातल्याप्रमाणे).

In reply to by बॅटमॅन

श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/20/2015 - 21:03
या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादात शिवरायांबद्दल लिहिले गेलेले नकारात्मक उल्लेख अभिनंदनपर धागा असल्याने टाळायला हवे होते अशी भावना मी व्यक्त केली. परंतु तसे उल्लेख नसते तर तुझे इतके माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळाले नसते. दुसर्‍या प्रतिसादातली बरीच माहिती तर प्रथमच वाचायला मिळाली. शक्य असल्यास शिवकालिन इतिहास संशोधन कसे होत गेले या विषयावर एक लेखमालिका लिहिण्याचे करावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

काळा पहाड Sat, 08/22/2015 - 23:16
वटवाघुळ असं डिट्टेलवार लिहिणार असेल तर त्याच्या प्रत्येक वाक्याला उगीचच विरोध करायला मी तयार आहे. मग निदान आम्हाला असलं काही तरी नवीन वाचायला तरी मिळेल.

In reply to by बॅटमॅन

विकास गुरुवार, 08/20/2015 - 21:09
अर्थात सध्याच्या पिढीला बाबासाहेबच दिसतात हेही सत्यच कारण शिवचरित्राशी पहिली ओळखच 'राजा शिवछत्रपती' च्या द्वारे होते अनेकांना. सध्याच्याच कशाला हो, सध्याच्या पिढ्यांच्या बापजाद्यांना पण अशीच ओळख झाली. किंबहूना राजा शिवछत्रपतीच्या वाचण्याआधी देखील बाबासाहेबांची ३ अथवा ७ दिवसांची भाषणे ऐकणे पण अनेकांनी केले त्यातून ओळख झाली. दुसरी ओळख झाली कारण श्रीमानयोगी सारख्या कादंबर्‍या. पण ते परत वाचनावर भर झाला. मग कधीकधी एखादा सिनेमा, नाटक, बाबासाहेबांच्या कॅसेट्स अथवा शिवाजीच्या गाण्यात आणि त्यात मधे असलेले बाबासाहेबांनी केलेले प्रसंगांचे वर्णन... थोडक्यात सामान्य माणूस इतिहासकाराचा इतिहास वाचू शकत नाही. अगदी रामायण-महाभारत देखील कितीजणांनी वाल्मिकी-व्यासांनी लिहीलेले (अथवा त्याची सगळ्यात अधिकृत प्रत मानले गेलेले खंड) वाचलेले असतात? त्याही पुढे, हॅरी पॉटर हे किती जणांनी वाचले आहे आणि कितीजणांनी नुसते चित्रपट पाहीले आहेत? ;) त्यातलाच हा भाग. गैर नाही, हे वास्तव आहे इतकेच. त्यामुळे सध्याच्या पिढीसाठीचा हा सर्वांत मोठा शाहीर आहे यात आजिबात शंका नाही. पण बाबासाहेब 'एकमेव' वगैरे नक्कीच नाहीत. काही प्रतिसादांतून तसे दिसले म्हणून लिहिले, असो. "एकमेव नाहीत" याच्याशी देखील पूर्ण सहमत. माझे देखील तसे म्हणणे नाही. मी काही सद्याच्या संज्ञांमधे, बाबासाहेबभक्त अथवा बाबासाहेबटार्ड नाही... तरी देखील त्यांना मिळालेला सन्मान योग्य वाटला हे नक्की... बाबासाहेबांचे कालचे भाषण ऐकले तर लक्षात येईल की त्यांनी देखील त्याचे भान ठेवत ऐकणार्‍यांना परत परत त्याची जाणीव करून दिली आहे, की ते एकटेच नाहीत. असो.

In reply to by विकास

बॅटमॅन गुरुवार, 08/20/2015 - 21:17
सध्याच्याच कशाला हो, सध्याच्या पिढ्यांच्या बापजाद्यांना पण अशीच ओळख झाली. किंबहूना राजा शिवछत्रपतीच्या वाचण्याआधी देखील बाबासाहेबांची ३ अथवा ७ दिवसांची भाषणे ऐकणे पण अनेकांनी केले त्यातून ओळख झाली. दुसरी ओळख झाली कारण श्रीमानयोगी सारख्या कादंबर्‍या. पण ते परत वाचनावर भर झाला. मग कधीकधी एखादा सिनेमा, नाटक, बाबासाहेबांच्या कॅसेट्स अथवा शिवाजीच्या गाण्यात आणि त्यात मधे असलेले बाबासाहेबांनी केलेले प्रसंगांचे वर्णन... थोडक्यात सामान्य माणूस इतिहासकाराचा इतिहास वाचू शकत नाही. अगदी रामायण-महाभारत देखील कितीजणांनी वाल्मिकी-व्यासांनी लिहीलेले (अथवा त्याची सगळ्यात अधिकृत प्रत मानले गेलेले खंड) वाचलेले असतात? त्याही पुढे, हॅरी पॉटर हे किती जणांनी वाचले आहे आणि कितीजणांनी नुसते चित्रपट पाहीले आहेत? ;) त्यातलाच हा भाग. गैर नाही, हे वास्तव आहे इतकेच.
हां हेही आहेच म्हणा. गेल्या दोनेक पिढ्या तरी बाबासाहेब एकदम छा गये हैं. सवालच नाही.
तरी देखील त्यांना मिळालेला सन्मान योग्य वाटला हे नक्की... बाबासाहेबांचे कालचे भाषण ऐकले तर लक्षात येईल की त्यांनी देखील त्याचे भान ठेवत ऐकणार्‍यांना परत परत त्याची जाणीव करून दिली आहे, की ते एकटेच नाहीत. असो.
कमॉन, त्यांना हा पुरस्कार मिळणे हे अगदी उचितच झाले असेच माझेही मत आहे. खुद्द बाबासाहेब पूर्वसूरींचे ऋण कायमच मान्य करतात, फक्त कधी कधी लोक तेच एकमेव असल्याच्या थाटात बोलू लागतो तेव्हा राहावत नाही. आदतसे मजबूर, दुसरे काय? असो.

In reply to by बॅटमॅन

सुबोध खरे Fri, 08/21/2015 - 13:14
बॅटमॅन साहेब, बाबासाहेब श्रीकृष्ण नसतील परंतु श्री ज्ञानदेव नक्कीच आहेत. भगवद्गीता हा मूळ ग्रंथ अपौरुषेय असा आहे( असे माझ्या अल्पमतीप्रमाणे वाटते) परंतु तो सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आणण्याचे अफाट काम श्री ज्ञानेश्वर माउलीनि केले. आता ज्ञानेश्वरी "पाल्हाळीक" आहे "बोअर" आहे असे अनेक लोकांचे मत असू शकते परंतु ज्यांना क्लिष्ट भाषेतील विद्वत्ताप्रचुर ग्रंथ समजत नाहीत अशा आमच्यासारख्या पामरांना समजेल अशा भाषेत आणण्याचे श्रेय श्री ज्ञानेश्वर माउली यांनी केले. याच धर्तीवर मी म्हणेन मोठे मोठे इतिहासकार होते, आहेत, असतील परंतु छत्रपतींचे चरित्र सोप्या आणी रसाळ भाषेत लिहिणे किंवा व्याख्याने देऊन लोकांची शिवभक्ती जागृत करण्याचे महान काम त्यांनी केले. त्यामुळे अगोदर कोणी आणी किती विद्वत्तापूर्ण काम केले याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही . (बहुत नृपती ते आले गेले परी मनाला यदुवर झाला झाला मंत्र महान याच धर्तीवर )

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 13:55
डॉक्टरसाहेब, पुन्हा एकदा तोच मुद्दा मी कितीवेळा सांगू? इतिहासकार सगळे सोडून दिले तरी खंडीभर कादंबरीकार, नाटककार आणि कवी व फुटकळ लेखांचे लेखक दाखवता येतील प्री-बाबासाहेब काळात. त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यकृतीही त्या त्या काळात खूप पॉप्युलर होत्या. त्यामुळे लोकांची शिवभक्ती जागृत करण्याचे काम हे बाबासाहेबांच्या अगोदरही खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे.

In reply to by बॅटमॅन

प्रभाकर पेठकर Wed, 09/02/2015 - 10:56
आधीच्या सर्व इतिहासकारांच्या मेहनतीचे कौतुक आहेच. पण कित्येकांची फक्त नांवेच ऐकली होती, पुस्तके वाचनात आली नाहीत (हा माझाही दोष असू शकतो) तर कित्येकांची नांवेही आज तुमच्या लेखातून समजली. बाबासाहेबांचे असे नाही. शिवजयंतीनिमित्त त्यांची व्याखाने ऐकण्याची, पाहण्याची संधी लाभली आणि शिवाजी महाराज हे, त्या वयातही, आमच्या मनांत 'हिरो' बनून राहिले. आमची बालमने घडविण्याचे, तिन शाह्यांमधून 'महाराष्ट्र राज्य' कोरुन काढणार्‍या विस्मयकारक शिवाजी महारा़जांबद्दल आदर, अभिमान रुजविण्याचे कार्य, पुस्तके वाचणार्‍या/ न वाचणार्‍या प्रत्येक मराठी मुलापर्यंत, तरूणांपर्यंत शिवाजी महाराजांना पोहोचविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. हे आधीच्या सर्व लेखकांपेक्षा 'वेगळे' आहे. त्यामुळे आधीच्या लेखकांचे कार्य कुठेही कमी होत नसले तरी बाबासाहेबांचे कार्य हे त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. बाबासाहेबांच्या मनांत शिवाजी महाराजांचे स्थान कदाचित देवाच्याच्याही वरचे आहे. 'जाणताराजा'च्या एका कार्यक्रमाप्रसंगी मी त्यांना स्टेजच्या मागे जाऊन भेटलो होतो. त्या वेळी त्यांच्या भोवती, 'मला ह्या विषयावर एकदा तुमच्याशी बोलायचे आहे' प्रकारची माणसे बसली होती. त्या गराड्यातील एकाने 'जाणता राजा' राज्याभिषेकप्रसंगावरच संपविला ह्या बद्दल नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर विशेषत: शेवटच्या कालखंडावर आणि त्यांच्या मृत्यूवर प्रकाश पाडीत नाही ह्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर त्याला उत्तर देताना बाबासाहेबांचे डोळे भरून आल्यासारखे झाले. ते म्हणाले, 'महाराजांचा मृत्यू ही घटनाच मला सहन होत नाही.' हे त्यांचे वाक्य आणि एकूणच 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातील भाव हा एखाद्या आरती संग्रहासारखा आहे. (तरीपण ती कादंबरी मला खुप आवडते). एक लेखक म्हणून लेखनाची, वाचकच्या डोळ्यांसमोर प्रसंग 'उभा' करण्याची, हातोटी विलक्षण आहे. सनावळ्या, तिथी, वार, वेळ ह्यासकट त्या काळची सामाजिक, राजकिय परिस्थिती ह्याचे वर्णन. करूणा, आवेश, तडफ, भिती, आनंद वगैरे वगैरे अनेक भावभावनांचे संमिश्रण ह्याने ओतप्रोत भरलेले 'राजा शिवछत्रपती' हे त्यांचे शिवचरीत्र वाचकाला खिळवून ठेवते. ते इतिहास संशोधक नसतील, त्यांच्या कादंबरीतून 'भाटगिरी' दिसून येत असेल पण त्यांनी आमच्या बाल आणि तरूण मनांत 'शिवाजी महाराज' रुजविले हे नाकारता येणार नाही. आधीच्या समस्त महान लेखकवर्गाने ते केले असे मला वाटत नाही. म्हणूनच मी बाबासाहेबांना 'वेगळे' मानतो. गेल्यावर्षी, लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशनाप्रसंगी मी हजर राहण्याचे भाग्य मला लाभले. (त्या पर्यटन सहलीचा एक सदस्य होतो) तेंव्हा सलग पांच दिवस बाबासाहेबांचा सहवाल लाभला. त्यांच्याशी व्यक्तीशः भेटण्याचे, बोलण्याचे भाग्य लाभले. वयाच्या ९२व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह, वाणी, स्मरणशक्ती आणि तेज वाखाणण्याजोगे होते. मस्कत मध्ये त्यांचा शिवचरीत्र कथनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून मी अनेक वर्षे प्रयत्न करतो आहे. प्रथम इथल्या महाराष्ट्र मंडळात मी हा प्रस्ताव मांडला तेंव्हा (१९९५) 'हल्ली ते प्रकृती अस्वास्थामुळे असे कार्यक्रम करीत नाहीत' असे तत्कालीन उपाध्यक्षाने सांगून तो प्रस्ताव फेटाळाला. पुढे जाणता राजाच्या निमित्ताने २००२ साली मी भेटून हा माझा विचार मी त्यांना बोलून दाखविला तेंव्हा ते आनंदाने तयार झाले. त्यावर त्यांच्या 'प्रकृती अस्वास्थाचा' मुद्दा काढल्यावर ते म्हणाले, 'अहो, कोणी न कोणी हितशत्रू अशा अफवा उठवत असतात. पण माझी प्रकृती ठणठणीत आहे. मी येईन.' खरं पाहता, महाराष्ट्र मंडळात माझा प्रस्ताव नाकारला जाण्यात इथलंच अंतर्गत राजकारण होतं हे मला नंतर कळलं. असो. आत्ता गेल्यावर्षी पुन्हा प्रत्यक्ष भेटीत मी हा विषय काढल्यावर तो ९२ वर्षीय शिवभक्त पुन्हा चटकन तयार झाला. मस्कतात येऊन मी हा प्रस्ताव पुन्हा एकदा महाराष्ट्र मंडळाकडे माझ्या मित्राकरवी पाठविला (आता मी मंडळाचा सभासद नाहीये) बाबासाहेबांच्या सेक्रेटरीचे नांव पत्ता सर्व दिले मंडळाचा सेक्रेटरी त्यांना जाऊन भेटला १ मे रोजी कार्यक्रम ठरला सुद्धा. अशंतः स्पॉन्सरशिपसुद्धा मी स्वतःहून देऊ केली. पण पुन्हा कुठेतरी माशी शिंकली आणि कार्यक्रम बारगळला. असे का झाले, असे माझ्या मित्राला विचारल्यावर त्यालाही उत्तर देता येईना. वरून नाही म्हंटले आहे एव्हढेच तो सांगू शकला. म्हणजे पुन्हा स्थानिक 'राजकारण' आड आले. माझ्या प्रतिसादातील उत्तरार्ध मुळ विषयाला सोडून आहे पण अजूनही मराठी माणसे शिवाजी महाराजांबद्दल, इतिहासाबद्दल किती उदासीन आहेत आणि वर्तमानातही 'मी' ला चिकटून आहेत हे दिसून येते. असो.

आबा गुरुवार, 08/20/2015 - 18:14
[इंग्रजांनी शिवाजीमहाराजांची प्रतिमा नेहमीच लुटारू, बंडखोर अशी रंगवलेली नाही हेही जाता जाता सांगतो.] ही नवीन माहीती मिळाली

प्यारे१ गुरुवार, 08/20/2015 - 21:05
या वाद प्रतिवादांमधून छान माहिती मिळत आहे. वाईट एवढंच की हे सगळं अभिनंदनपर धाग्यामध्ये नको होतं. यासाठी एक छानसा धागा काढता आला असता. असंही बरेच माहितीपूर्ण प्रतिसाद कुठंतरी धाग्याच्या आत दडपले जातात. अर्थात धागाकर्त्यानं आपल्या हिंदुत्ववादी आणि गौरवशाली इतिहासाची परंपरा असल्याचं कोंदण लावून धागा काढल्यानं हे असं होणं थोडंसं स्वाभाविक आहे. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 08/20/2015 - 21:19
बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या जीवनकार्‍याचा गौरव झालेला बघुन खुप आनंद झाला. बाकी जळजळ ब्रिगेड, इथे अत्यंत टाकाउ दर्जाचे जातीयवादी लिखाण करणार्‍यांकडे एक एक जहाज इनो पाठवण्यात यावे हि महाराष्ट्र सरकारला विनंती. तसचं त्यांच्या वेडकर, दरिद्री भोकाटे वगैरे खुनशी लोकांना विचारठणठणपाळभुषण पुरस्कार देण्यात यावाचं.

In reply to by अर्धवटराव

विकास गुरुवार, 08/20/2015 - 22:20
मिपाभूषण बॅटमन साहेबांचा विजय असो !! कृपया या संदर्भातले आपले विचार "मिपा भूषण पुरस्कार वाद" या धाघ्यात मांडावेत. ;)

In reply to by विकास

नाखु Tue, 08/25/2015 - 10:04
या उप प्रतीसादाला आणि बॅट्याला +१११११ सटीप निरक्षीर माहीती बद्दल. मूळ अवांतर : मिपाभूषण बॅटमन आहे का ते माहीत नाही कारण तो वाद-विवाद करतो "वादाचा" उगमविषय नाहीय. "मिपाभिषण पुरस्कारासाठी समीती नेमीत आहे इच्चुकांनी संपर्क करणे.
बिग्रेडीमार्फाट्यावर्बमोतिर्स्कारक्प्रती-दया-कीववजाघृणा,समयोचीत्फट़्केअंमल्बजावणी संघ.

खटपट्या गुरुवार, 08/20/2015 - 22:18
श्री बॅटमन यांचे वरील सर्व प्रतिसाद जतन करुन ठेवण्यासारखे आहेत. प्यारे यांनी सुचवलेल्या प्रमाणे बॅटमन यांनी वेगळा धागा काढावाच. शिवचरीत्रात रस असणार्‍यांना ती एक पर्वणीच असेल.

शब्दबम्बाळ गुरुवार, 08/20/2015 - 22:23
पण जेम्स लेन सारख्या नकारात्मक गोष्टी या लेखात लिहिल्या नसत्या तरी चालले असते असे वाटले... इतिहास हा कितीही प्रयत्न केला तरीही थोडाफार व्यक्तीसापेक्ष राहतोच असे माझे मत आहे. मिळालेले दस्तावेज कोणत्या प्रकारे तपासले जातात आणि त्यातून कोणते अर्थ निघतात हे बर्याचदा इतिहासकाराच्या दृष्टिकोनावरही अवलंबून असते. त्यामुळे इतिहास काळानुरूप व मिळत जाणार्या पुराव्यांनुसार बदलूही शकतो पण आपण या सगळ्या गोष्टींना खुल्या दृष्टीकोनातून कधी पाहणार आहोत काय माहित! ग्रांट डफने लिहिलेल्या इतिहासातल्या चुका दाखवून देताना आपल्या लोकांनी इतिहासाचा खूप अभ्यास केला आणि या सगळ्या घडामोडींमुळे आपल्याला आज माहित असलेला इतिहास तयार होत गेला त्यामुळे खर तर त्याचेही आभार मानले पाहिजेत. थोडक्यात काय, वाईटातूनही चांगले निर्माण होऊ शकते! या निमित्ताने, आयुष्यभर झटलेल्या सर्व इतिहासकारांना शतशः नमन!

नंदन Fri, 08/21/2015 - 00:10
विकास आणि बॅटमॅन यांच्यातली चर्चा अतिशय आवडली. प्रत्युत्तर म्हणून टोकाची भूमिका न घेता, विषयाचे आणि संदर्भांचे व्यापक परिप्रेक्ष्य ('बिग पिक्चर') लक्षात घेऊन केलेल्या चर्चेचे उत्तम उदाहरण.

एका मित्राकडून मला नुकताच खालील संदेश आला: झी २४ तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी सांगितलेला हा किस्सा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेण्यासाठी त्या दोघांची भेट झाली. तुमच्या आडनावाचा महिमा तुम्हाला माहित आहे का? असं निरगुडकरांना बाबासाहेबांनी विचारलं आणि सांगायला सुरुवात केली. "शिवनेरीवर जिजाऊ आईसाहेबांना प्रसवकळा सुरु झाल्या. आसपासच्या गावांत वैद्यांना बोलावणं गेलं. वैद्य गंगाधरशास्त्री आले आणि त्यांनी बाहेरच्या दालनातून दिलेल्या वैद्यकीय सूचनांनुसार उपस्थित दायांनी आत प्रसव क्रिया पार पाडली. शिवबांचा जन्म झाला आणि "मुलगा झाला" हे गंगाधरशास्त्री यांना दायांनी बाहेर येऊन सांगितलं. मग शिवबांच्या जन्माची पहिली जाहीर घोषणा शास्त्रीबुवांनी सदरेवर जाऊन केली. झी २४ च्या दालनात उपस्थित असलेल्या सर्वांकडे बघून बाबासाहेब पुढे म्हणाले “त्या गंगाधरशास्त्री वैद्यांचं आडनाव होतं निरगुडकर आणि आज आत्ता इथे माझ्यासमोर जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!"

In reply to by श्रीनिवास टिळक

कसलं भारी वाटलं असेल त्यांना हे ऐकुन. :) असे इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने कसा खणतात ह्याबद्दल नेहेमी उत्सुकता वाटत असते.

पिलीयन रायडर Fri, 08/21/2015 - 08:31
सगळ्यांनी अभिनंदन अभिनंदन लिहीलं असेल किंवा कुणीतरी तरी नक्कीच काहीतरी निगेटिव्ह लिहुन अकलेचे तारे तोडले असतील असं वाटुन हा धागा पाहिलाच नाही. पण इथे तर अन्पेक्षितरित्या फारच सुंदर चर्चा झाली आहे, विशेष्तः बॅट्याचे प्रतिसाद! वेगळा धागा करता आला तर बरं होइल..

In reply to by पिलीयन रायडर

कोमल Fri, 08/21/2015 - 10:35
अगदी यासाठीच मी पण धागा पाहिला नव्ह्ता. वाचनिय प्रतिसाद. प्रत्यक्ष बाबासाहेबांना भेटले आहे. मीना प्रभू यांचा प्रवासनामा हा कार्यक्रम होता आणि बाबासाहेब प्रमुख पाहुणे होते. रात्री ९.१५ - ९.३० ला कार्यक्रम चालू झाला तरी बाबासाहेब सकाळ असल्या प्रमाणे प्रसन्न होते आणि भरभरुन बोलले. अगदी अनौपचारीक कार्यक्रम होता, गप्पा-आठवणी. बाबासाहेबांच्या तोंडून लंडन आणि न्युयॉर्कची वर्णने ऐकली. त्यांमधुनही शिवचरित्राने भारावलेले बाबासाहेब प्रकट होत होते. लंडन ला अल्बर्ट म्युझियम मध्ये बाबासाहेब गेले असता त्यांनी भवानी तलवार पाहण्याबद्दल विचारणा केली. कडक पहार्‍यातून त्यांना तलवारीच्या दालनात नेले. सोबत म्युझियम मधील एक माहितगार होती. तिने बाबासाहेबांना सांगितलं, 'या तलवारीला २४ तास कडक पहारा असतो, आजुबाजुला सुरक्षारक्षक असतात. अद्यावत सुरक्षा व्यवस्था पण आहे. कोणीही हि तलवार इथुन हलवू शकत नाही' (आपल्या राजांची तलवार त्यांच्या राणीच्या रॉयल कलेक्शन मध्ये अगदी सुखरूप आहे) एवढं ऐकुन बाबासाहेबांनी त्या मुलीला विचारलं, 'मी इथे थोडावेळ बसू शकतो का?' तिचा होकार आला. बाबासाहेबांनी तलवारी समोर खाली बसुन बराचं वेळ चिंतन केलं. तोवर ती मुलगी पण तिथेच उभी होती. उठतांना बाबासाहेबांनी तलवारीला वाकून दंडवत घातला आणि मग मात्र ती मुलगी न राहावून बोलली, 'तुम्ही हे सगळं इतक्या मनःपुर्वक का करत आहात?' बाबासाहेबांचं उत्तर असं काहिसं होतं, "या तलवारीशी आणि त्या राजाशी आमच भक्तिचं नात आहे" ज्या ताकदीने बाबासाहेबांनी आम्हाला तो प्रसंग सांगितला तेवढ्या नीट इथे नाही सांगता आला. पण खुप खुप गप्पा मारलेल्या त्या दिवशी. शरीर थकलेल जाणवतं बाबासाहेबांचं पण एकदा बोलायला सुरवात केली की आपल्याला वेगवेगळ्या गडांवरून, बुरुजांवरून, माचींवरून मस्त फिरवून आणतात. २०-२२ वर्षांपूर्वी अभ्याच्या गावी एका भाषणाला बाबासाहेब गेले होते तेव्हा अभ्याने त्यांना एक चित्र काढून दिलेले. (याचे डीटेल्स तोच देईल) पण मी तो संदर्भ सांगितला तर ते पण त्यांच्या लक्षात होते. अश्या ग्रेट माणसाला माझा दंडवत __/\__

In reply to by कोमल

प्यारे१ Fri, 08/21/2015 - 19:56
>>>२०-२२ वर्षांपूर्वी अभ्याच्या गावी एका भाषणाला बाबासाहेब गेले होते तेव्हा अभ्याने त्यांना एक चित्र काढून दिलेले. अब्बा रुखसाना को भी पता चल गया????

जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!">>>>>>>>>.>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

कहर Fri, 08/21/2015 - 11:23
संशोधन यालाच म्हणतात. खापर पंजोबंपर्यंत पोचायची आपली कुवत नाही मग इतिहास काय कपाळ कळणार आपल्याला. त्यांना इतिहासाचा ध्यास आहे… आपल्याला फक्त त्याचा वरवरचा वास आहे …

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Fri, 08/21/2015 - 14:50
>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे..... का माहित नसावं? इथल्या सर्वांना तुमच्या गेल्या ७-८ पिढ्या माहिती आहेत की. तुमचा कुलवृत्तांत खालीलप्रमाणे - मूळपुरूष - ग्रेटथिन्कर दुसरी पिढी - टॉपगिअर्ड फिलोसोफर तिसरी पिढी - सचीन चौथी पिढी - नानासाहेब नेफळे आणि माईसाहेब कुरसुंदिकर पाचवी पिढी - ग्रेटथिंकर सहावी पिढी - मंदार कुमठेकर सांप्रतची सातवी पिढी - फुलथ्रॉटल जिनियस यातला चौथ्या पिढीतला माईसाहेब कुरसुंदीकर अजून जिवंत आहे (नानासाहेब नेफळे आणि माईसाहेब कुरसुंदीकर हे एकाच वेळी असित्वात होते. साधारणपणे २ इन १ किंवा मिक्स्ड सिंगल्स अशा तर्‍हेची ती रचना होती). बाकी सर्वजण केव्हाच आणि अकाली अल्लाला प्यारे झाले. सारांश - एखाद्या व्यक्तीच्या मागील अनेक पिढ्यांचा इतिहास माहिती असू शकतो. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

प्यारे१ Fri, 08/21/2015 - 14:59
खुलासा: अल्लाला प्यारे होणे काही संबंध नाही. गुरुजींना प्रश्न : दादादरेकर, जामोप्या यांचं वरील घराण्याशी काही नातं नाही का?

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Fri, 08/21/2015 - 15:05
थोर इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे आणि महान इतिहासतज्ज्ञ पुरूषोत्तम खेडेकर यांच्यात जे नातं आहे किंवा कसाब आणि अफझल गुरू यांच्यात जे नातं होतं किंवा हिटलर आणि स्टॅलीन यांच्याच जे नातं होतं, तेच नातं या दोन घराण्यात आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कहर Fri, 08/21/2015 - 15:55
तुम्ही ".हितेश " ला विसरला का ? (बहुतेक माईंच्या पुढची पिढी किंवा समकालीन) पप्पू प्रेमापायी त्याने मोडी उदयानंतर काही दिवसातच जीव दिल्याचे ऐकिवात आहे

जे डॉ. उदय निरगुडकर बसलेले आहेत ते वैद्य गंगाधर शास्त्री निरगुडकरांचे १४ वे थेट वंशज आहेत!">>>>>>>>>.>>> यावर लै हसलो,असेच विनोद टाका जावा,बहुतांश लोकांनाच आपला खापरपणजोबा काय करत होता हे ठाऊक नसते,इथे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अर्धवटराव Fri, 08/21/2015 - 11:22
थे मात्र पुरंदरेंना कोन कोनाचा वंशज आणि कीतवा हे ठाउक आहे म्हणे.....
त्याबद्दल कुतुहल वगैरे वाटणं अशी फालतु लक्षणं आमच्या ब्रीगेडी संस्कृतीत बसत नाहि. पण तुम्हाला हसु का आलं ? एव्हाना बाबासाहेबांना वाद-विवादाचं आव्हान देऊन ते कसे चर्चेला घाबरले वगैरे बातम्या यायला हव्या होत्या अव्हाड आणि मंडळाकडुन.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

सुबोध खरे Fri, 08/21/2015 - 13:04
जीनियस साहेब इतिहासाचार्य ग ह खरे यांनी संशोधन करून खरे कुलवृत्तांत लिहिला आहे त्यात आमच्या कुळाचे १२५० पासूनचे पूर्ण संदर्भ आहेत.पूर्ण वंश विस्तार काय आणी कसा आहे याचे २००० पानी सविस्तर वर्णन त्यात आहे.आणी हा छापील स्वरुपात उपलब्ध आहे. मला माझ्या आठ पिढ्यांची नावे माहित आहेत. तेंव्हा बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या दिग्गज माणसाने स्वतःच्या अभ्यासातून किंवा जर अशाच निरगुडकर वृत्तांतातून माहिती काढली असेल तर ते सहज शक्य आहे. किमान पक्षी तुम्ही ठरवता तशी "हास्यास्पद" नक्कीच नाही. जाता जाता -- आपल्या इतिहासाची माहिती कशाला असावी?याचा एक पैलू पाकिस्तानने इस्लामच्या उदयाच्या अगोदरच आपला इतिहास नाकारला असल्याने त्यांच्याकडे समृद्ध अशी परंपरा नाही. त्यामुळे त्यांच्या कडे क्षेपणास्त्राना सुद्धा घोरी, अब्दाली अशी अफगाण योद्ध्यांची आहेत. त्यांच्याकडे योद्धे नाहीतच? ( भारत द्वेष हा एकच धागा त्या देशाला अखंड ठेवत आहे).

In reply to by सुबोध खरे

खटपट्या Fri, 08/21/2015 - 16:12
माझ्या गावातील माझ्या आडनावाचे जे लोक आहेत त्यांची संपूर्ण माहीती चार्टच्या स्वरुपात उपलब्ध आहे. बर्‍याच लोकांची वंशावळ नाशीक येथे उपलब्ध आहे असे ऐकीवात आहे. अवांतर - मधे ऐकले होते की ईंदीरा गांधी यांची वंशावळ काशी येथे आहे. अक्चुअली असेल तर ती तीथून नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. :)

तुडतुडी Fri, 08/21/2015 - 13:17
तुम्हाला कोणी विचारलं होतं का तुम्हला कोणती पुस्तकं आवडतात आणि कोणती बोर होतात ? स्वतःच सांगायचं आणि मग प्रतिसाद आल्यावर पुन्हा चिडायचं . हे काही बरोबर नै

सिरुसेरि Sat, 08/22/2015 - 18:57
देशाला सर्वांगीण सामाजिक विकास साधण्याची अत्यावश्यक गरज आहे . हा सर्वांगीण सामाजिक विकास साधला तरच प्रत्येक मनूष्य हा राजकीय , वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा सामाजिक हित ओळखून त्याप्रमाणे आचरण करेल .

शेखरमोघे Fri, 08/28/2015 - 00:50
शिवचरित्राबद्दल लोकान्चे औत्सुक्य आणि आकर्षण वाढवणे आणि त्याना शिवकालात घेऊन जाता जाता जास्त जास्त गुन्गवणे,गुन्तवणे आणि एकाच वेळी विनम्र (स्वदेशाच्या कल्पनेपुढे) आणि उन्नत (येन केन प्रकारेण शत्रूवर विजय मिळवल्याने) करणे अशा अनेक प्रकारे बाबासाहेबान्च्या लिखाणाचे वर्णन करता येईल. त्याना मिळालेली लोकमान्यता आणि राजमान्यता यथायोग्यच! साधारण असाच परिणाम माझ्यावर नाथ माधव (द्वारकानाथ माधव पितळे) यानी लिहिलेल्या स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याचा कारभार, स्वराज्याची स्थापना, स्वराज्यावर सन्कट या व इतर यासारख्या पुस्तकान्च्या वाचनानन्तर झाला होता. ही पुस्तके मी १९५० च्या दशकात वाचली.

नाखु Fri, 08/28/2015 - 08:59
पांडुरंग बलकवडे प्रतिपादन पुराव्यानिशी आता तर इतर धाग्यावर काढलेल्या गरळवाल्यांना काही उमज पडेल अशी आशा करू या! जय शिवराय जय महाराष्ट्र जय मिपाकर

In reply to by नाखु

पैसा Fri, 08/28/2015 - 10:06
ते त्यांना सुद्धा माहित आहे. पण "घटं भिंद्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात रासभरोहणम्" वाल्यांना त्याचं काय पडलंय?