श्री तिर्थक्षेत्र रावेरी
सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य
श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.
त्रेतायुगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह १४ वर्षाच्या वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेत अशोकवनात ठेवलेले होते. प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव करून सीतेला अयोध्येत परत आणल्यानंतर पावित्र्याबद्दल शंका निर्माण झाली. सीतेने अग्निपरिक्षा देऊन पावित्र्य सिद्ध केले परंतु समाजातील कोणत्यातरी व्यक्तीचे समाधान झाले नाही. प्रभू रामचंद्राने समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी सीतेला गरोदर अवस्थेत लक्ष्मणाच्या रथात बसवून दंडकारण्यात सोडून दिले.
**************
श्रीक्षेत्र रावेरी गावातील पूर्वजापासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मिकॠषिचे आश्रयाने वास्तव्य केले. रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लव आणि कूश यांचा जन्म झाला. लव-कुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला. गहू देण्यास लोकांनी नकार दिल्यावर तिने गावकर्यांना शाप दिला की या गावात गहू पिकणार नाही. शापाप्रमाणे या गावात गहू पीकत नव्हता. परंतू अलिकडे सन १९०० चे दरम्यान गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीतामंदीरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही. असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली.
आणखी अशीही एक कहाणी आहे की, रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लव-कुशांनी अडविला आणि त्या घोड्याबरोबरोबर आलेल्या शत्रुघ्न, लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेल्या हनुमंताला वेलीने बांधून ठेवले. रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती आहे. ज्या ठिकाणी लव-कुशांनी अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे (रामगंगा) तीरावर आजही पाहण्यास मिळते. गावाच्या दक्षिण भागाकडून तमसा (रामगंगा) नदीचे वळण असून उत्तर वाहनी असलेल्या नदीचे तिरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदीर आहे. तसेच बाजुला वाल्मिक ऋषिचा आश्रम सुद्धा आहे. शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरूज (गढी) व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो.
अशा पौराणिक इतिहास असलेल्या गावात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशींनी २ मे १९८२ ला भेट देऊन संपूर्ण इतिहास जाणून घेतला.
जगातील एकमेव सीतेचे मंदीर जिर्ण असून मंदीराचा जिर्णोद्धार करण्याची गरज असल्याचे सांगीतले, परंतू एका शेतकरी राजाची भूमीकन्या सार्वभौम राजाची राणी वनवासी सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल. वाल्मिकी ऋषीचे आश्रयाने वनवासी सीतेने धैर्याने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करून समाजाला दाखवून दिले. त्याचप्रमाणे समाजातील ६०% महिला आपला घाम गाळून शेतीचे कष्ट करते. परंपंरेने चालत आलेला अन्याय होतच आहे. त्यासाठी महिलांना आधाराची गरज आहे. ज्याप्रमाणे वनवासी सीतेला श्री क्षेत्र रावेरी हे आधारस्थान मिळाले त्याचप्रमाणे समाजातील परित्यक्त्या महिलांसाठी सुद्धा रावेरी हे माहेर झाले पाहिजे, अशी मा. शरद जोशींनी गावकर्यांसमोर इच्छा प्रगट केली. १९९४ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचा लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाचे रावेरी येथे आयोजन करून शेतकरी महिला आघाडी समोर विषय ठेवला. हे काम शेतकरी महिला आघाडीने करावे अशी मा. शरद जोशी यांनी सुचना करून आम्ही शेतकरी संघटनेचे पाईक बंधू तुमच्या सोबत असल्याचे सांगीतले.
सन नोव्हेंबर २००१ ला मा. शरद जोशींनी शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन रावेरीला घेऊन अधिवेशनात जगातील एकमेव सीता मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व मा. शरद जोशी यांनी स्वत:च्या मिळकतीतून दहा लाख खर्चून मंदीराचा जिर्णोद्धार करून २ ऑक्टोंबर २०११ ला लोकार्पण सोहळा घेऊन गावाच्या सुपूर्द करण्यात आले.
परित्यक्त्या महिलांचे श्रीक्षेत्र रावेरी हे माहेरघर व्हावे, ही संकल्पना मा. शरद जोशींनी पुढे नेण्यासाठी गावकर्यांना आवाहन केले. श्रीक्षेत्र रावेरी येथे श्री हनुमान मंदीर संस्थान रावेरी, र.नं. ए ६३६ या नावाने विश्वस्त ट्रस्ट आहे. मा. शरद जोशींची संकल्पना पुढे नेण्यासाठी विश्वस्त मंडळाने गावातील २५ तरुण युवकांची सन २०१० ला सौंदर्यीकरण विकास समिती निर्माण करून समितीमार्फ़त रावेरी हे गाव तिर्थक्षेत्र, परित्यक्त्या महिलांचे माहेर कसे करता येईल त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू केले आहे. तरी या कार्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
**************
वाल्मिकी ऋषीचा आश्रम व समोरील परिसर
**************
**************
**************
**************
**************
**************
गाभार्यातील मुर्ती
**************
सीतेची न्हाणी
**************
मंदीराचा दक्षिणभाग
**************
**************
वेलीने बांधलेल्या स्थितीतील ९ फ़ूट उंचीची हनुमंताची भव्य मुर्ती
**************
**************
दिनांक २७/०४/२०१५ रोजी सीतानवमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर श्री विजय निवल, सौ. स्वाती मते, श्रीमती सुलोचना राहणे, सौ. सरोज काशीकर, सौ. शैलजा देशपांडे, गंगाधर मुटे व ट्रस्टचे पदाधिकारी.
**************
या प्रसंगी स्वत:ची किडणी देऊन पतीचे प्राण वाचविणार्या सौ. स्वातीताई मते यांचा व मुलांचे योग्य पालनपोषण करून त्यांना उच्चपदस्थ नोकरीपर्यंत पोचविणार्या सुलोचनाबाई राहणे यांचा शाल व श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सौ. सरोज काशीकर यांनी त्यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले.
**************
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना माजी आमदार अॅड वामनराव चटप.
**************
श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग-१
येथे वाचा.
प्रतिक्रिया
30 Apr 2015 - 10:03 pm | प्रचेतस
मंदिराच्या सभामंडपातल्या स्तंभांवरून मंदिर यादवकाळातील असावेसे दिसत आहे तर हनुमान आणि देवी तदनंतरची बहुधा शिवोत्तरकाळातली दिसत्ये.
1 May 2015 - 1:27 am | अर्धवटराव
.
1 May 2015 - 8:41 pm | गंगाधर मुटे
मंदीर हेमाडपंथी आहे. त्यावरुनही मंदिर यादवकाळातील असेल याला पुष्टी मिळते.
@ वल्लीजी, आपण आणखी काही टिप्स दिल्या तर मी पुढल्यावेळेस तेथे भेट देइल तेव्हा काही आणखी उपयुक्त माहीती येथे शेअर करू शकेल.
1 May 2015 - 10:31 pm | प्रचेतस
हेमाडपंती म्हणजेच यादवकालीन असेलच असे नव्हे. ही शैली यादवांच्याही आधी जवळपास २०० वर्षांपासून प्रचलित होती. मूळची ही भूमिज शैली. हेमाद्रीने किंवा यादवांनी ह्या शैलीत कित्येक मंदिरे बांधली म्हणून हेमाद्रीचे नावाने ही शैली पुढे प्रचलित झाली.
आता ह्या मंदिराचे मूळचे शिखर गायब असून फ़क्त स्तंभांवरुन हे यादवकालीन असल्याचे समजते इतकेच.
1 May 2015 - 10:10 pm | उगा काहितरीच
वा ! चांगली माहिती सर. या जागी कसं पोहोचू शकतो (स्वतःच्या वहानाने आणि एस टी ने ) हे सांगा.
2 May 2015 - 8:18 pm | गंगाधर मुटे
यवतमाळ - कळंब - राळेगाव - रावेरी
अंतर ३०-३२ किमी.
अ.भा.शेतकरी सहित्य चळवळीच्या वतिने तेथे येत्या काही महिन्यात एखादा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करयचा विचार आहे.
1 May 2015 - 10:20 pm | सतिश गावडे
नाशिक हे पूर्वीचं दंडकारण्य होतं असं म्हणतात. मुटेजींच्या या लेखावरुन यवतमाळ सुद्धा दंडकारण्याचाच भाग होता असे दिसते. नाशिक ते यवतमाळ हे अंतर रस्त्याने जवळपास साडे पाचशे किलोमिटर आहे.
दंडकारण्य एव्हढे विस्तिर्ण होते का?
1 May 2015 - 10:26 pm | प्रचेतस
दंडकारण्य म्हणजे विंध्याच्या खालचा भाग. म्हणजेच चंद्रपुर, गडचिरोली, झाडीमंडळ आणि मध्यप्रदेशचा महाराष्ट्राला लागून असलेला भाग.
नाशिक म्हणजे जनस्थान.
यवतमाळ हे दंडकारण्यात येत नाही.
1 May 2015 - 10:29 pm | सतिश गावडे
इथे संजय सोनवणींनी रामायणाबद्दल आपली मते इंग्रजीत मांडली अहेत. त्यामध्ये विंध्य पर्वताबद्दल काही माहिती आहे.
1 May 2015 - 10:36 pm | प्रचेतस
लेख वरवर चाळला.
बरीचशी मते पटली नाहित.
1 May 2015 - 10:40 pm | सतिश गावडे
आमचं काहीच म्हणणं नाही. :)
आपला अभ्यास आहे म्हणून विचारतो,
याबद्दल आपलं काय मत आहे?
1 May 2015 - 10:45 pm | प्रचेतस
उपरोक्त मुद्द्याशी पूर्णपणे सहमत आहे.
उत्तरकाण्ड पूर्णपणे प्रक्षिप्त असून त्याचा काळ ३रे/४ थे शतक असावा.
1 May 2015 - 10:55 pm | सतिश गावडे
असे कुठे कुठे काय आणि किती प्रक्षिप्त असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी.
1 May 2015 - 11:02 pm | प्रचेतस
हो ना.
1 May 2015 - 11:03 pm | पैसा
काही लोक तरी रामाने सीतेला अग्निदिव्य का करायला लावले, रानात कसे सोडून दिले, शंबूक वध ही रामाची कशी चूक आहे यावरून तुझा गळा धरायला येणार म्हणजे येणार! मग ते वाल्मिकीच्या मूळ रामायणात असो की नसो!
1 May 2015 - 11:16 pm | प्रचेतस
नायतर काय.
बाकी रामायणाच्या अधीच्या काण्डांतही काही सर्ग प्रक्षिप्त आहेत.
2 May 2015 - 10:31 pm | गंगाधर मुटे
रावेरीच्या बाजुने जे आजही विरळ अरण्य आहे ते थेट सातपुडा पर्वताशी जुळलेले आहे.
रावेरीच्या उत्तरेस १५० किमि अंतरावर सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत.
रावेरीच्या पूर्वेस २५० किमी अंतरावर ताडोबा अभयारण्य आहे.
त्यामुळे या भागाला दंडकारण्य म्हटले जाते त्यात तथ्य असावे, असे वाटते.
4 May 2015 - 8:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
शक्य वाटत नाही, यवतमाळ हे महाभारत कालीन विदर्भ नरेश भीष्मक अन त्याचा मुलगा रुक्मी ह्यांचा प्रदेश असावा