अंगणातल्या चिमण्या
खरं म्हणजे एक दिवसासाठी बेळगाव ते मुंबई असा प्रवास करायचे सुचित्राला अगदी जीवावर आले होते. नणंदेच्या सासूच्या भाचीचं लग्न. पण सासू सासरे नेमके चार धाम यात्रेला गेलेले. माहेरचं कुणी आलं नाही तर नणंदेचा रुसवा फुगवा काढायचं अवघड झालंच असतं, शिवाय सासूबाई परत आल्यावर त्यांचे टोमणे खावे लागले असते ते निराळेच. म्हणून तिने बेत केला, आदल्या दिवशी रात्री पुण्यात असलेल्या मावसबहिणीकडे, प्रियांकाकडे मुक्काम करायचा अन खूप दिवसांच्या तटलेल्या गप्पागोष्टी करून घ्यायच्या. अन मग दुसरे दिवशी सकाळी लवकर मुंबईसाठी निघायचं . साडेबाराचा मुहूर्त. अकरापर्यंत सहज पोचता येईल.
सुचित्राचा फोन येताच प्रियांकाच्या उत्साहाला उधाण आलं
'अगं सु.ताई, किती दिवसांनी येतेयस ? आणि एकच दिवस मुक्काम ? ते काही नाही. तू आपली सरळ ४ दिवस सुट्टी टाक ऑफिसात. मस्त फिरू.’
'नाही गं ! प्रणवची परिक्षा सुरु आहे ना. मेला, लग्नांचा अन परिक्षाचा सिझन नेमका एकदमच येतो.’’'
सकाळी सहाच्या बसचं रिझर्वेशन केलेलं. जेवणाच्या वेळेपर्यंत सुचित्रा पुण्यात पोचली. प्रियांका चार चाकी घेऊन न्यायला आली होती.
जेवण आवरल्यावर गप्पा रंगल्या. सहा वाजता अमित आल्यावर प्रियांका चहा टाकायला उठली. चहा घेऊन सुचित्रा पाय मोकळे करायला बाहेर पडली. परत येईपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले.
प्रियांकाची, मुलगी ईशा आता दहावीत गेलेली. प्रियांका स्वयंपाक करता करता , मैत्रिणीकडे गेलेल्या ईशाची वाट पाहत होती. तिची अभ्यासाची वेळ झाली होती. साडेसात वाजले, पावणेआठ वाजले, ईशाचा पता नव्हता. प्रियांकाचा पारा चढत होता. अखेर आठला ईशा आली. झाले ! प्रियांकाने संतापाचा भडीमार तिच्यावर केला. मग तिची उलट उत्तरे, प्रियांकाचे पित्त खवळणे असा काही वेळ कल्लोळ झाला. ईशा चिडून वरच्या बेडरूममध्ये निघून गेली.
सुचित्राने प्रियांकाला म्हटले, 'अगं, किती खवळशील ? तुझंच बीपी वाढेल बघ.’
'ताई, तू पण असं म्हणावंस ? आपल्या लहानपणी, तरुणपणी आपण संध्याकाळी सातनंतर कधी राहत होतो का बाहेर ? अन अभ्यास चुकवून कधी तरी टवाळक्या केल्या होत्या का ?’
'हो गं, पण आता जमाना बदललाय ! अशी कडक शिस्त आताच्या मुलांना नाही चालायची. अन इतकं संतापतेयस ते का ? विसरलीस तो अंगणातला प्रसंग ?’
प्रियांकाने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिची अन सुचित्राची नजरानजर झाली अन दोघींच्या नजरा एकदमच बैठकीच्या खोलीत लावलेल्या आबांच्या फोटोकडे गेल्या. जुन्या आठवणींचे तरंग दोघींच्या मनाच्या किनाऱ्याला धडाका देऊ लागले. पाहता पाहता प्रियांकाच्या मुद्रेवरचे भाव पालटून प्रथम ते सौम्य अन नंतर काहीसे हळवे झाले. ती सोफ्यावर सुचित्राशेजारी येऊन बसली अन तिने सोफ्यावरच्या तिच्या हातावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
'कशी विसरेन, ताई ? अजूनही आबांचा फोटो पाहिल्यावर मला तीच आठवण प्रथम येते.’ ती हळुवारपणे म्हणाली.
पाण्यात बुडालेली एखादी कमळकळी फुलून पुन्हा वर यावी तसा प्रियांकाचा गोरापान रेखीव चेहेरा आर्द्र-वत्सल झाला. आज इतक्या वर्षांनी तो प्रसंग पुन्हा दोघी बहिणींच्या चित्तावर उन्हाच्या कवडशासारखा तळपला.
सुचित्राची आई वीणा, प्रियांकाची आई राधा, अन मानसीची आई सुलू तिघी सख्ख्या बहिणी.
दरवर्षी दिवाळी अन मेच्या सुट्टीत या तिघी अन त्यांची एकूण सात मुले आजोळी महिनाभर राहायला जात. आजोबा खूप हौशी अन तितकेच कर्तृत्ववानही. सारे त्यांना 'आबा’ म्हणत. शिस्तीचे कठोर पण अंत:करणाचे खूप मायाळू.
सुट्टीला आल्यावर सुचित्रा, प्रियांका अन सारी भावंडे बहुतांश वेळ इकडे तिकडे उंडारण्यात घालवत. टीव्ही नसायचा. त्यामुळे खेळ, खादी अन भटकंती हेच सुट्टीचे मुख्य उद्योग. फारसा कुणाचा अंकुशही नसायचा.
एक राधामावशी सोडून. तिच्या सासरी एकत्र कुटुंब. मुले अन मोठी मिळून पन्नासेक माणसे. भलती कडक शिस्त. मुलांनी ठराविक वेळेत घरी यायचे, नेमक्या वेळी जेवण, मग अभ्यास अन ठराविक वेळेत अंथरून गाठायचे, असा सारा कारभार. सिनेमा-नाटक मोजून. अन तेही पूर्वपरवानगी शिवाय नाही. परवानगीशिवाय मुलांनी घर अन शाळेव्यतिरिक्त कुठे जायचे नाही. इ. इ. बंधने खूप होती. स्वत: राधामावशीसुद्धा पुष्कळ बंधने धाकाने पाळीत असे. आणि मुलांनाही पाळायला लावीत असे. अगदी आजोळी आल्यावरही. सुचित्रा सात मावसभावंडांमध्ये मोठी. ती खुपदा राधामावशी बरोबर वाद घाली. पण ती मुळीच लक्ष द्यायची नाही.
त्या सुट्टीत मुलांना सिनेमा पाहायला जायचे होते. सिनेमा संध्याकाळी सहाचा. यायला नऊ वाजणार. राधामावशी प्रियांकाला परवानगी देईना. प्रियांका काही हट्ट सोडेना. अखेर राधामावशी उठली अन प्रियांकाच्या पाठीत एक धपाटा घातला.
झाले ! प्रियांका रडत बसली. साऱ्यांचाच मूड गेला. हिरमुसले चेहेरे करून सारी मुले देवघरात जाऊन आजीपाशी बसली. आजीचा स्वभाव शांत. आपल्या मुलीलासुद्धा हुकुम करणार नाही कधी. ती म्हणाली 'थांबा, तुमचे आबा येतील आता. त्याना सांगा.’
आबा आले. मुले धावत त्यांच्याकडे गेली अन सारा प्रकार सांगितला.
आबांनी साऱ्यांना आत जायला सांगितले अन हाक मारली 'राधा...’
राधामावशी पाण्याचा तांब्या घेऊन आली. मुले मधघरातच बसून हळूच बाहेर पाहत होती.
पाणी पिऊन तांब्या तिच्या हातात देण्याऐवजी आबा खिडकीशी गेले अन त्यांनी राधाला खुणेनेच बोलावले.
'अंगणात पहा बरं जरा..’
राधामावशीने पाहिले. आजी अंगणात चिमूट चिमूट तांदळाच्या कण्या टाकत होती अन २५-३० चिमण्या ते दाणे टिपत तिच्या मागून निर्भयपणे फिरत होत्या. मधूनच आजीच्या हाताच्या दिशेने हवेत झेप घेऊन दाण्यांचा वेध घेत होत्या. एखादी थेट आजीच्या पदराशी लगट करत होती. आजी लटक्या रागाने तिला हाकी.
राधामावशी कौतुकाने पाहत होती. इतक्यात आबांनी तांब्यातल्या पाण्याचा सपकारा अंगणात टाकला. त्यासरशी सगळ्या चिमण्या भुर्रकन उडून गेल्या. आजी गोंधळली. तिने पुन्हा कण्या टाकल्या अन ती चिमण्यांना बोलावू लागली. पण आता त्या येईनात. २-४ मिनिटे वाट पाहून आजी आपल्या कामाला निघून गेली.
राधामावशीनं आबांकडे अचंब्याने पाहिले. आबा हसले.
'अगं, दारी आलेल्या चिमण्या त्या ! त्यांना रागावलं, धुत्कारलं तर परत येतील का बोलावलं तरी ?
तशीच तु नि तुझ्या बहिणी ! मी नि तुझी आजी तुमचं मन कधी दुखावत नव्हतो, आठवतं का ? आणि आता आपापल्या घरट्यात गुंग झाला आहात. आता मी तुला राहा म्हटलं इथंच तर राहशील का आपलं घर सोडून माझ्यापाशी ?
आणि तशीच तुझी पियू ,वीणाची सुचू अन सुलूची मानसी. अंगणातल्या चिमण्याच साऱ्या. नको गं दुखवू त्यांच्या मनाला ! एक दिवशी भुर्र उडून जाणारेत आपापल्या घरट्यात...!’
राधामावशी समजली. 'आबा...! ' म्हणून त्यांच्या कुशीत शिरताना तिच्या पापण्या ओल्या झाल्या.
दुसऱ्या दिवशी प्रियांकाला अन सगळ्या मुलांना खुद्द आबा घेऊन गेले सिनेमाला.
अन आज इतक्या वर्षांनी त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होत होती.
पावसात मधूनच ऊन पडावं, तसं प्रियांकाच्या मुद्रेवर हसू उमललं. ती सुचित्राला म्हणाली,
'सु ताई, कळली बरं चूक ! पण आता तूच जा अन काढ बाई समजूत तुझ्या लाडक्या भाचीची !’
सुचित्रा हसत हसत वरती गेली. मुसमुसत पालथ्या पडलेल्या ईशाच्या पाठीवर एक चापट मारून ती म्हणाली,
'ए खुळाबाई, अंगणातल्या चिमणीची गोष्ट ऐकणार का ?’
'गोष्ट’ म्हटल्यावर ईशाचा सारा रुसवा पळाला. चटकन उठून ती सुचीत्राला बिलगली.
'सांग ना गं मावशी...!’
----xxx----
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडली कथा.
+१
+१
+१
आवडली.
मस्तच लिवलंय आवडल
मस्त
कथा आवडली.
छान कथा
+१
कथा आवडली.
कथा आवडली...
कथा आवडली. मला आठवतंय तसं
कथा आवडली.
मस्त आहे.
छान लिहीले आहे.
कथा छानच. पण... दहावीतली
गोष्ट सांगणे
सर्व वाचक व प्रतिसादक,
अतिशय सुरेख मांडणी. कथा अगदी
@ स्नेहांकिता कालाय तस्मैनमः
छान लेखन व त्याचबरोबर
प्रतिसाद फार आवडला.
+१ प्रत्येक पिढीत बंडखोर
ही घ्या
मनाला स्पर्शून गेला
आवडली गोष्ट.
मस्त
खूप छान !!
छान!
पैजारबुवांचा प्रतिसाद
साधा प्रसंग छान खुलवला
सर्वाना धन्स ! विशेषकरून पैजारबुवांना.
खुपच छान लेख आहे ...सरळ आणी
आवडलं..छान लिहीलंय. एकदम
खुप छान!