मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

चिंतातुर जंतू · · काथ्याकूट
आदित्य ठाकरे एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमाचा एक वैकल्पिक भाग म्हणून निवडण्यात आलं तेव्हा आमचा वाघाचा बच्चा जरा वयानं लहान होता. यथावकाश मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये बी.ए. (इतिहास) करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला त्यानंतर कधीतरी बहुधा या कादंबरीत केल्या गेलेल्या ऐतिहासिक अपराधांची त्याला जाणीव झाली असावी. अगदी अशोकरावजी चव्हाणांनीही त्याची री ओढली आहे. आहात कुठे? कुणीतरी म्हटलंच आहे ना की अंधेर नगरी चौपट राजा, सॉरी देवाच्या दारात उशीर होऊ शकतो पण अंधार नाही! अर्थात प्रथेप्रमाणे मराठीजनांचा द्वेष करणार्‍यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. कुठल्याशा बुकर नावाच्या परदेशी पारितोषिकासाठी या पुस्तकाचं नामांकन झालं होतं म्हणे. करायची आहेत काय ती परदेशी पारितोषिकं? आम्ही नुकतीच किती सुवर्णपदकं लुटलीयेत माहिती आहे नं? पत्रकार-लेखक अरूण टिकेकरांनी म्हणे म्हटलं आहे की अभ्यासक्रमातून पुस्तक काढण्यासाठी एक विशीतला मुलगा मुंबई विद्यापीठाच्या व्हाइस-चॅन्सलरला अशी २४ तासांची नोटीस कशी बजावू शकतो? आता अशा गोष्टी टिकेकरांना या वयातही नसतील जमत कदाचित, पण आमच्या मराठी माणसाच्या हृदयसम्राटांच्या नातवाला यात काय अवघड आहे? विघ्नसंतोषी मराठी माणसाला मुळी कुणाची प्रगती झालेली बघवतच नाही! काही लोकांनी असंही म्हटलं आहे की खरं तर या अभ्यासक्रमाचं हे शेवटचं वर्ष होतं म्हणे. आणि एमेच्या वर्गात गेली २० वर्षं हे पुस्तक शिकवलं जातंय म्हणे. म्हणून काय झालं? शेवटी उदाहरणार्थ हा तत्त्वाचा वगैरे प्रश्न आहे ना? (म्हणजे आमच्या बछड्याचं शक्तीप्रदर्शन हे तत्त्व बरं, नाहीतर म्हणायचात एका टीचभर पुस्तकावरच्या बंदीत काय मेलं तत्त्व न फित्त्व?) त्या पुस्तकात म्हणे पारशांच्या विक्षिप्तपणाचं सुध्दा खूप चित्रण आहे म्हणे. आता पारशांना नसेल काही घेणं आपलं चित्रण कसं आहे याच्याशी. पण त्यांच्यात नसली अस्मिता तरी आमची अस्मिता जिवंत आहे की! काय म्हणता? त्यांच्यात मुलींचं नाव अस्मिता ठेवत नाहीत? अहो असं नाही हो म्हणत मी. म्हणजे तसं ते नाहीच ठेवत, पण मी तसं म्हणत नाही आहे. दुसरी एक अस्मिता नावाची भानगड असते काहीतरी. मला नका विचारू म्हणजे काय ते. तिला काहीतरी दुखापत झाली एवढंच लक्षात ठेवाल तर तेवढं पुरेसं आहे आपल्याला. उगाच भलत्या चौकशा नकोत. अंगाशी येतील बरं! रोहिंटन मिस्त्री आणि त्या मिस्त्रीनं म्हणे असं म्हटलं आहे की या वीस वर्षांच्या मुलाबद्दल कीव, किळस की करुणा बाळगावी ते कळत नाही! त्याला म्हणावं तिथे कॅनडात बसून अशा गमजा करण्याऐवजी आमच्या गल्लीत ये, मग दाखवतो तुला आमचा बडगा! काय म्हणालात, आमचा बडगा फक्त आमच्याच गल्लीत दिसतो? थांबाच जरा, आमचा बछडा अजून थोडा मोठा होऊ दे, मग लावू पुन्हा अटकेपार झेंडा. आहात कुठे? आमच्या आदित्यजींच्या कॉलेजातल्या मुख्याध्यापकांनी पण त्या शिंच्या मिस्त्रीचीच बाजू घेतली म्हणे. 'एकविसाव्या शतकात एका राजकीय पक्षानं आपल्यावरची टीका सहन करण्याची आणि आपल्या वागणुकीतून टीकाकारांना चोख उत्तर देण्याची प्रगल्भता दाखवायला पाहिजे. निव्वळ आपल्यावरच्या टीकेपोटी पुस्तकावर बंदी घालणं हे अयोग्य आहे', असं त्यांनी म्हटलं आहे म्हणे. आता तो मिस्त्री पण त्यांच्याच कॉलेजातला आणि त्यात पुन्हा जागतिक किर्तीचा वगैरे. मग त्यांना ही दादरची मुर्गी दाल बराबर वाटणार नाही तर काय? पण आमची मुर्गी नाही बरं, वाघ आहे वाघ! खाल तेव्हा कळेल आपलं, खाईल तेव्हा कळेल! पण आमच्या वाघाच्या बछड्यानं तरी असल्या ख्रिस्ती कॉलेजात जावंच कशाला? करायची काय ती बी.ए. न फी.ए. ची थेरं? असले इतिहास वगैरे शिकून कोण्णाचं भलं होत नाही! शिवाय घरची एवढी रग्गड जहागीर आहे की. नुसतं बसून खाल्लं तरी काही कमी पडणार नाही. काय म्हणता? घराणेशाही? कोण आहे रे तिकडं? जरा जीभ हासडा बरं यांची. फारच वळवळते आहे! अजूनही काही शंका असतील तर हे घ्या दुवे आणि लावा आपली अस्मिता दावणीला... भारतानं आता पुस्तक जाळण्यापलीकडे गेलं पाहिजे सेनेच्या वारसदारानं अभ्यासक्रमातून पुस्तक मागे घ्यायला लावलं

वाचने 27582 वाचनखूण प्रतिक्रिया 105

In reply to by यशोधरा

चिंतातुर जंतू Mon, 10/25/2010 - 19:02
सदर कादंबरी कुणी वाचली आहे का अशी काही जणांनी पृच्छा केली आहे. मी मिस्त्री यांचा 'टेल्स फ्रॉम फिरोजशा बाग' (१९८७) हा कथासंग्रह पूर्वीच वाचला होता आणि तो मला आवडलाही होता. म्हणून 'सच अ लाँग जर्नी' (१९९१) प्रकाशित झाल्या झाल्या लगेचच वाचली होती. मुंबईचं इंग्रजी साहित्यातलं प्रभावी चित्रण ज्यात आहे अशा निवडक कादंबर्‍यांमध्ये माझ्या मते या कादंबरीचा समावेश नक्कीच व्हायला हवा. त्यातलं प्रमुख पात्र खास पारशी विक्षिप्तपणानं आजूबाजूच्या परिस्थितीवर टोकदार भाष्य करत असतं. तो विक्षिप्तपणा खूपच परिचयाचा असल्यामुळे आणि त्यातला गोडवा जाणवत असल्यामुळे या कादंबरीबद्दल (आणि तेही इतक्या वर्षांनी) असा गदारोळ उठेल असं तेव्हा अजिबातच वाटलं नव्हतं. प्रमुख पात्र आजूबाजूच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे (कादंबरीला १९७१ च्या बांगलादेश युध्दाची पार्श्वभूमी आहे) आणि स्वतःच्या कौटुंबिक समस्यांमुळे खूप हताश होत जातं आणि त्याचा वास्तवावरचा ताबाही हळूहळू सुटू लागतो असं आठवतं. खाली कुणीतरी उल्लेख केलेल्या उतार्‍यांकडे या सर्व संदर्भासहित पाहिलं पाहिजे. प्रथेप्रमाणे आपलं राजकीय नेतृत्व 'कादंबरी वाचली नाही' हे अभिमानानं सांगत आहे आणि तरीही त्यातला तथाकथित आक्षेपार्ह संदर्भांविना उद्धृत करत आहे हे लक्षात घ्यायला हवं. प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. अवांतरः प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊ नये म्हणून पहिल्या प्रतिक्रियेला प्रतिसाद म्हणून लिहीत आहे.

In reply to by चिंतातुर जंतू

विकास Mon, 10/25/2010 - 19:19
थोडक्यात कादंबरीची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच वाचायला आवडेल (आणि मिळाली तर वाचेन). मला वाटते हे मधल्या काळात जे काही "भावना दुखावू नयेत" म्हणून अतिरेक होऊ लागला त्याचा हा परीणाम आहे. यात त्याची बाजू घेणे हा उद्देश नसून हा कॉज पेक्षा इफेक्ट आहे असे वाटते हे सांगणे हा उद्देश आहे. म्हणूनच आपल्याकडे असल्या बंदी करण्यास कायद्याने बंदी केली पाहीजे असे वाटते. अमेरिकेत एका पाद्र्याने मुस्लीम धर्मग्रंथ जाळायचा आचरटपणा करण्याचे ठरवले होते. त्याला सगळ्यांनी विरोध केला अगदी ओबामाने देखील. तसे करू नका असे आवाहन केले गेले, मात्र त्याला कायद्याने कोणी अडवू शकले नाही. (सुदैवाने तसे त्याने काही केले नाही). हे थोडेफार अवांतर आहे. पण हा विषय महत्वाचा वाटत असल्याने येथे लिहीले आहे इतकेच.

गुंडोपंत Fri, 10/22/2010 - 18:47
आपल्याला तर आवडला बॉ हा नवीन ठाकरा! जवान काट्टा आहे, थोडी मस्ती केली तर काय जळते हो तुमची?

In reply to by गुंडोपंत

प्रियाली Fri, 10/22/2010 - 18:51
मिसळपावावरून असे लेख ब्यान करायला हवेत. ठाकरे म्हणजे दैवत. दैवतांची अशी गंमत करू नये. लोकांची किती श्रद्धा आहे ठाकर्‍यांवर. जनमानसाचा काही विचार करा चिंजं तुम्ही.

In reply to by प्रियाली

गुंडोपंत Fri, 10/22/2010 - 18:53
जंत्याला म्हणावं आधी एक पुस्तक तर ब्यान करून दाखव मग असले लेख लिही. आम्ही आमचे प्रतिसाद लगेच म्यान करू! :)

In reply to by Dhananjay Borgaonkar

मनोहर काकडे Sat, 10/23/2010 - 02:08
सायबांचा असा एकेरी उल्लेख ? साहेब युवराजांसारखे ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कॉलेजांमध्ये शिकले असते तर त्यानी पुस्तक वाचले असते व फक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढायचे काय, विद्यापीठच बंद केले असते. आणि सोज्वळ शिव्या कशा असाव्यात यासाठी “माझे विद्यापीठ” सुरू केले असते. .छावा अजून लहान आहे. त्याच्या दुडक्या पावलांचे कौतुक करा. आताच हातात तलवार आली आहे अजून ती नीट चालवायला शिकायचं आहे. सायबांना तलवारीची गरज नव्हती त्यांचं मत होतं: खिंचों न कमानको न तलवार निकालो जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो !!! चला आता जवळ जवळ पॉपकॉर्न खायची वेळ झाली!!!

In reply to by अवलिया

छोटा डॉन Fri, 10/22/2010 - 18:57
>> पण विधान सभेतुन की विधान परिषदेतुन निवडुन येणार? मुख्यमंत्री होणार हे एकदा सांगितले ना. पुन्हा असले गावंढळ प्रश्न का विचारत आहात ? कुठुन का निवडुन येईनात, तुम्हाला काय त्याचे ? मराठी माण्सचे पाय ओढणे बंद करा नायत्र पुढच्यावेळी नारळ फोडताना तुम्हाला उचलुन आणावे लागेल ;)

In reply to by छोटा डॉन

अवलिया Fri, 10/22/2010 - 19:00
अरे डान्राव तुम्ही का? अरं चुकलो चुकलो परत नाही असे विचारणार. कुठुनका येईना ! मराठी मानुस आहे ना ! बास्स. तेवढं मंडपाच कान्ट्राक्ट आपल्याकडं येईल येवढं बगा राव.. मराठी मानसाला मदत !

In reply to by छोटा डॉन

तिमा Fri, 10/22/2010 - 20:25
डॉनजींचा प्रतिसाद पाहून मन भारावले. आपल्या मोठ्या भावाची, तिकडे पाकिस्तानात म्हणे बायपास झाली आहे नुकतीच. असो. सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेस करते तीच फक्त घराणेशाही. बाकीच्यांची मुले, पुतणे, नातू हे स्वयंभू असतात.

In reply to by अवलिया

Nile Fri, 10/22/2010 - 18:59
आम्हीतर विचारनार होतो मिपावरुन की उपक्रमावरुन. बरं झालंत तुम्ही खुलासाकेला! ;-) श्री जंतुंचा लेख आवडला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गुंडोपंत Fri, 10/22/2010 - 18:56
अरे माझ्या राजकुमारा, तो ठाकरा मराठी शाळेत शिकलेला असता ना तर तुझ्या तोंडात साखर पडो असे म्हणालो असतो. पण तो पडला क्षेव्हियरवाला. त्याला काय कळणार रे झा@ मराठी? पाहू काय होते ते. त्या राहूल पेक्षा बरा इतकेच!

In reply to by बेसनलाडू

अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली), किंग जॉर्ज नाही राजा शिवाजी. आत्ताच सांगितले ना मिभोंनी? स्वतःच्या शाळेचे नाव ही तुम्हाला माहित असू नये हे जरा अतीच झाले. तुम्हाला राजा शिवाजी नावाचे वावडे आहे का? किंवा हे नाव फारच डाऊन मार्केट वाटते का? कृपया, शाळा स्थापन झाली तेव्हा किंग जॉर्ज नाव होते म्हणून तसे लिहिले असा युक्तिवाद करू नये. (स्टंप सोडून खेळणाऱ्या शतकवीरांना त्रिफळाचीत करणारा) वि.मे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बेसनलाडू Sat, 10/23/2010 - 00:03
कृपया, शाळा स्थापन झाली तेव्हा किंग जॉर्ज नाव होते म्हणून तसे लिहिले असा युक्तिवाद करू नये. का बरे? तेच सत्य आहे. आणि मला माझ्या शाळेच्या नावाचा अभिमान आहे, म्हणूनच माझ्या व्यक्तिगत माहितीत ते जसेच्या तसे लिहिले आहे. कृपया विनाकारण काड्या सारून स्वतःचा आणि माझा वेळ दवडू नये. (नाबाद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

का बरे? तेच सत्य आहे. त्याकाळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते हे ही सत्य आहे. आता उठून तुम्ही "God save the queen" म्हणायला लागणार की काय? मला माझ्या शाळेच्या नावाचा अभिमान आहे वरील प्रतिसादातून तसे दिसले नाही. मुंबईला बॉम्बे म्हटल्यावर चिडतो की नाही आपण? मी चिडतो, तुमचे माहित नाही. माझा त्या शाळेशी / संस्थेशी काही संबंध नसता तर नसतो बोललो काही. म्हणूनच माझ्या व्यक्तिगत माहितीत ते जसेच्या तसे लिहिले आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत माहितीत काहीही लिहा हो. अनवधानाने इथे काय लिहून गेलात ते महत्त्वाचे. कृपया विनाकारण काड्या सारून स्वतःचा आणि माझा वेळ दवडू नये. काड्या सारायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्या कडे पण तो आहे असे दिसते. उसामध्ये कामाचा दिवस आणि वेळ असताना प्रतिक्रिया येतात म्हणून म्हटले. एका धाग्यावर दोनपेक्षा जास्त अवांतर प्रतिसाद देणे टाळण्यासाठी पुढील बातचीत करायची असल्यास खव/व्यनी मधून करेन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बेसनलाडू Wed, 10/27/2010 - 23:14
मुंबई- बाँबे, राजा शिवाजी - किंग जॉर्ज या नामधारी वादांमध्ये पडायला मला आवडत नाही. माझ्या शाळेबद्दलच्या भावनांच्या सच्चेपणासाठी मला तुमच्यासारख्या काडीघालूंच्या संकुचित प्रमाणपत्रांची गरज वाटत नाही. काड्या सारायला तुमच्याकडे वेळच वेळ आहे हे तुम्हीच कबूल केलेत हे बरे. माझ्याकडे असलेला वेळ मी तुमच्या या सत्कार्यात खर्चू इच्छित नाही. पण तरीही आगलावेपणा करायचाच असेल, तर तो शिखंडीसारखा व्यनि/खरडींच्या आडून नको; येथेच होऊ देत. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by गुंडोपंत

शहराजाद Sat, 10/23/2010 - 01:39
एक शंका: काका बालमोहनवाला असे वाचल्याचे आणि ऐकल्याचे स्मरते. नक्की कुठला? माहितगारांनी कृपया शंकानिरसन करावे. म्हणजे किंग जॉर्ज / राजा शिवाजी चर्चा करायची की बालमोहन (? सेंट बाल्स?) तेवढे निश्चित होईल.:) चिंज, उत्तम लेख.

In reply to by यशोधरा

गुंडोपंत Fri, 10/22/2010 - 19:03
हे मात्र काही दिवसांनी कळेल. आत्ताच तर येंट्री घेतली ना? ते ही खरंच म्हणा! पण वाद झाल्या शिवाय प्रसिद्धी कशी मिळणार? ती नाही मिळाली, तर लोक नेत्यांना 'पावरबाज' कसे म्हणणार? असो, नाशकातले मुजोर भय्ये पाहता, सध्या तरी आमचे मत राज ठाकरेला!

चिरोटा Fri, 10/22/2010 - 18:54
मस्तच लेख. सध्या ह्या मुंबई विद्यापीठाचे महान कुलगुरु कोण आहेत ?
अरूण टिकेकरांनी म्हणे म्हटलं आहे की अभ्यासक्रमातून पुस्तक काढण्यासाठी एक विशीतला मुलगा मुंबई विद्यापीठाच्या व्हाइस-चॅन्सलरला अशी २४ तासांची नोटीस कशी बजावू शकतो
नोटीस मी पण बजावू शकतो, त्या नोटीशीचे पालन करणारा गाढव नाही का?असो.पारशी लोक नाहीतरी मराठी माणसांना घाटी म्हणून हिणवतातच. बरी जिरवली आदित्यरावांनी!!

In reply to by चिरोटा

वाहीदा Sat, 10/23/2010 - 00:28
भेंडी तुझे किती मित्र / मैत्रिणी पारसी आहेत अन त्यातील किती जणांनी तुला घाटी म्हणून हिणविले आहे ?? मला अन माझ्या ताईला कॉलेज पासून आजपर्यत असंख्य पारसी मित्र मैत्रिण लाभले त्यातील कोणीही मला किंवा माझ्या ईतर मराठी मित्रांना / मैत्रिणींना घाटी म्हणून कधिही हिणविलेले माझ्या आठवणीत नाही. इंडियन होटेल्स कंपनीस लिमिटेड (IHCL)च्या ताज ग्रुप ऑफ होटेल्स मध्ये सिस्टीम अन्लिस्ट म्हणून काम करतानाही मी पारसी लोकांना खुप जवळून पाहीले आहे and some of them are really really worth to call a good human beings. हे घाटी म्हणून हिणविण्याचे कुकर्म काही गुजराथी करतात पारसी नव्हे. कादंबरी लिहणार्‍या लेखकाच्या धर्मावर टिकास्त्र रोखायची येथे गरज नव्हती . मला जर कोणी घाटी म्हंटले तर माझे एकच उत्तर असते, " Yes I am Ghati! I am proud to call myself Ghati because I belongs to beautiful Ghats of Maharashtra." पारशी जमाती एवढी गोड जमात अन लोक शोधुन सापडणार नाहीत असो , बाकी चिंजंचा लेख नेहमीच प्रमाणे अप्रतिम ! Tiger Thackeray close to extinction by his own Blood

In reply to by वाहीदा

पिवळा डांबिस Sat, 10/23/2010 - 09:57
वाहिदा, तुझ्याशी पूर्णपणे सहमत! माझे काही प्रोफेसर पारशी असल्याने माझा त्यांच्याशी आणि त्यांच्या फॅमिलीजशी अगदी जवळून संबंध आणि अनुभव आला आहे... पण ते कोणीही मला अथवा इतर मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवतांना मी बघितलेलं नाही... (पारसी लोकं मराठी माणसाला थट्टेत "तात्या" म्हणतात, "घाटी" नाही!!! जसे आपण त्यांना थट्टेत "बावाजी" म्हणतो!!!) खरं सांगायचं तर मला मुंबईचा गैरफायदा उठवणार्‍या नॉन मुंबईकर मराठी माणसापेक्षा (वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरदराव पवार इत्यादि मुख्यमंत्री) मुंबईकर पारसी मला जास्त जवळचा वाटतो!!! मुंबईकर, पिडां

In reply to by वाहीदा

प्रदीप Sat, 10/23/2010 - 10:37
पारशी जमाती एवढी गोड जमात अन लोक शोधुन सापडणार नाहीत
अ‍ॅब्सोल्युटली. अत्यंत छान जमात (दुर्दैवाने नामशेष होण्याच्या मार्गावर).

In reply to by चिरोटा

मनोहर काकडे Sat, 10/23/2010 - 00:55
पण पारशांची खरी जिरवली ती मिस्त्रीनच. आपल्या पुस्तकात त्याने बावाजींची चांगलीच टिंगल टवाळकी केली आहे. आणि सगळ्यात त्याने जिरवली आहे व जास्त टिंगल केली आहे ती इंदिरा गांधींचीच, सायबांची नाही. पण बॉम्बे स्कॉटीश स्कूलध्ये शिकलेल्या युवराजांसारखे आपल्याला इंग्लीश येत नसल्याने आपन पुस्तक नाय वाचला. पण पुस्तक वाचतांना सायबांच्या व्यंगचित्रांची आणि शिवाजी पार्कातल्या भाषणांचीच सारखी आठवण येत होती

In reply to by मनोहर काकडे

चंद्रू Sat, 10/23/2010 - 01:14
आपण मराठी मराठी बोंबलत बसलो. इंग्रजी नाय शिकलो. पण आपल्यातला हा पयलाच पोरगा फाड फाड इग्रजी शिकला म्हणून पुस्तकात काय लिवलंय हे कळायला यवडी, म्हणजे वीस वर्ष लागली. नायतर तेवाच पुस्तक जाळून टाकला असता नाय का? आता आपल्यातला दुसरा पोरगा (छोटे युवराज ) तोड फोड इंग्रजी शिकतोय. मग काय मजा येईल ते बगा. पण ती तलवार लयच जड व्हती, हाय का नाय ? म्हणून उभी धरायच्या बदली विटी दांडूच्या दांडू सारकी आडवी धरली होती. विटी दांडू खेळायच्या वयात हातात तलवार दिली तर काय व्हनार?

रेवती Fri, 10/22/2010 - 18:57
राजकारण्यांची मुले पालकांच्या वलयातून बाहेर पडली तर त्यांचं काय होइल असं वाटतं. पोटापाण्यासाठी कोणता मार्ग स्विकारतील?;) आज विशीत जिथे सामान्य नागरिक चार पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो तिथे ही ब्रँडेड वस्तू वापरणारी पिलावळ कितपत टिकते? बरीच वर्षं आईवडीलांच्या आशिर्वादानं असली छोटीमोठी कामं करून मिरवता येतं तोपर्यंत ठिक, पण त्यानं एखादं पुस्तक लिहावं कि! खरी मर्दुमकी कश्यात आहे हे आपल्या मुलांना कळणार नाही आणि ती तशीच मोठी (वयाने) होत जातील या कल्पनेची मला तरी भिती वाटते.

सुहास.. Fri, 10/22/2010 - 19:06
हा हा हा हा हा चिंत्यापण ना !! मस्त टोला हाणलास रे भावा !! दणकेबाज लिखाण......... आता विद्यार्थी सेनेचे काय असा प्रश्न विचारतो. >>> 'ती' विद्यार्थी सेना कुठे राहिली आता ? आताची नुसतीच 'पद आणी अर्थ'सेना

मुक्तसुनीत Fri, 10/22/2010 - 19:10
उत्तम उपरोधिक लिखाण. प्रश्न अर्थात वीस वर्षांच्या बछड्याने दिलेल्या आवाजाचा नसून, सत्ताबाह्य सत्ताकेंद्राच्या शक्तीचा आहे. नक्की कुठल्या यंत्रणेने ही कादंबरी अभ्यासक्रमाबाहेर काढली ? एकंदर प्रक्रिया काय होती ?

In reply to by अवलिया

विकास Fri, 10/22/2010 - 19:20
त्यात काय काय लिहिले आहे याबद्दल कुणाकुणाला माहिती आहे? उत्तम प्रश्न. राहूल गांधींच्या संदर्भात असेच म्हणले गेल्याचे आठवते. ;)

विकास Fri, 10/22/2010 - 19:19
आदीत्य ठाकर्‍यांच्या राजकीय बायोडेटामधे यामुळे भर पडली आहे... पुस्तके, कला, विचार बॅन करण्याच्या मी विरोधात आहे. मग ते भांडारकर इन्स्टीट्यूटचा विध्वंस असुंदेत की सलमान रश्दी की एम एफ हुसैन... त्या साठी कायद्यातच असे विचारस्वातंत्र्य समान मानलेले आणि वापरलेले दिसले पाहीजे इतकेच. मुख्यमंत्र्यांनी त्यांची रि ओढली यात काही नवल वाटत नाही: politics makes strange bedfellows हे लक्षात असुंदेत. त्यांना आत्ता शिवसेनेपेक्षा नारायणसेना, विलाससेना, शरदसेना आदींची जास्त काळजी आहे. यावरून वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेस "वसंतसेना" म्हणले गेल्याचे आठवले. बाकी गार्डीयनच्या दुव्यातली बातमी विश्वासार्ह धरावी का नाही या विषयी त्यात पहील्याच ओळीत जे, "Three weeks ago, the University of Mumbai, one of India's oldest and most prestigious educational institutions, " असे म्हणले आहे त्यामुळे शंका येत आहे. ;)

वेताळ Fri, 10/22/2010 - 19:22
वाईट वाटले. तरी देखिल रा. रा. श्री. वांद्रानिवासी आदित्य ठाकरेनी जेव्हा साहेबानी दिलेली तलवार उचावली त्यावेळची त्याची मुद्रा बघितली तर मन अगदी भरुन येते. एका बापाने मुलाचे व नातवाचे खेळणे म्हणुन केलेला शिवसेनेचा वापर बघुन मन अगदी संतापुन जाते.

ज्ञ Fri, 10/22/2010 - 19:39
वरील लेखातील दोन्ही फोटो एकाच माणसाचे वेगवेगळ्या कोनातून काढल्यासारखे वाटत आहेत.. एका फोटोत जुना चष्मा आणि दुसर्‍यात नवीन....

धनंजय Fri, 10/22/2010 - 19:53
रोहिंतन मिस्त्रीच्या कादंबर्‍या (अंतःकरणाला त्रास देतात तेव्हाही) उच्च प्रतीच्या असतात. (प्रकाशचित्रात आदित्य ठाकरे यांनी शेंदरी शर्टाच्यावर अक्षरशः हिरवा शर्ट चढवलेला दिसतो.)

In reply to by धनंजय

Nile Fri, 10/22/2010 - 20:11
(प्रकाशचित्रात आदित्य ठाकरे यांनी शेंदरी शर्टाच्यावर अक्षरशः हिरवा शर्ट चढवलेला दिसतो.)
हा हा! हे लक्षातच आले नव्हते.

अडगळ Fri, 10/22/2010 - 20:01
१. मुंबईत राहून इंग्रजीत पुस्तक लिहलेच का? मराठीत का नाही? २.आमच्या सरांनी जेव्हा "डायरी" लिहीली , तेव्हा केली होती का अशी कुणावर चिखलफेक ? एवढा मोठा माणूस , पण किती साधेपणाने लिहीले आहे पुस्तक. त्यांना जरा कानाने कमी ऐकू येते तरीही. या मिस्त्र्याचे दोन्ही कान शाबूत आहेत , पण तरी याला आमच्याबद्दल चांगले काही नाही का ऐकू आले ? आता याच शाबूत कानाखाली आवाज निघाला की डोळ्यासमोर ताबूत नाचताना दिसतील ( काय गेलंय वाक्य ! राऊत साहेब , हे वाक्य टाकता काय अग्रलेखात ?) ३.आधी गुंड म्हणून हिणवायचं , आता शिकायला कॉलेजात जातंय पोर तर तिथंपण असली पुस्तकं लावायची अभ्यासाला? चुलीत घाला शिक्षण. एक सामना वाचा फक्त . काय जनरल नॉलेज असतंय त्यात ? अग्रलेख : हिरवे पादरे पावटे देव्हारा : पूजेपूर्वी करायची वैयक्तिक तयारी. इंद्रधनु : माहिती आहे का ? पाणघोड्यांना जेव्हा राग येतो त्यावेळी त्यांना लाल रंगाचा घाम येतो. मानिनी : दूध तापवताना दुधाला उकळी आल्यावर सायीचा तवंग बाजूला सरकवावा म्हणजे दूध वर येत नाही चिरायु : प्रेमाने कुठलेही दु:ख नाहीसे होते असे म्हणतात ते यामुळेच, हे आता संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. इतकेच काय पण जोडीदाराशी रुसवा असेल तर सगळे आजार डोकं वर काढतात. थर्ड जनरेशन : कॉर्पोरेट मंत्र - स्वप्न आणि अपेक्षा यात कधी कधी अंतर सांगणे कठीण होते. भेळपुरीतून गोड चटणी आणि तिखट चटणी वेगळी करून दाखवा असे सांगण्यासारखेच आहे. जै म्हाराश्ट्रः शाखाप्रमुख , चंबुखडी ,शाखा क्र. ३१३ (बघतोयस काय रागानं , पंजा मारलाय वाघानं)

In reply to by आमोद शिंदे

गुंडोपंत Sat, 10/23/2010 - 03:14
का हो आमोदराव, थेट आमच्या नावावर खपवायला निघालात? फक्त अर्धी लाकडे गेली आहेत. अजून 'गेलो' नाही आम्ही! गेल्यावर खपवायचे आमच्या नावावर. आणि आहेत आमचे दृष्टीकोन जरा 'व्यापक विचारांचे' त्याला काय मी करणार? ज्यांचे नाहीत त्यांनीही करून घ्यावेत!

In reply to by अडगळ

वाहीदा Sun, 10/24/2010 - 14:43
हाथ कंगन को आरसी क्या ? The poor person does not realise the value of " Diamond Studded Bracelet" when he/ She can not afford to feed his/her hunger Here you can refer to "Hunger for Power" :-( जाहील को फ़ारसी क्या ?? As a Diamond is Useless for a Hungry men at the time of Hunger or the Beauty of a full moon is useless for a blind man , so is the Farsi (The Persian Lanugage) for an Uncultured person who is also Liar :-( अडगळ यांचा प्रतिसाद अप्रतिम !!

श्रावण मोडक Fri, 10/22/2010 - 20:34
उपरोध खचाखच भरलेला लेख आवडला. पण हे सारे बोचरे असले तरी, "त्यांना" खरोखरच बोचेल का? बहुदा नाहीच.

In reply to by श्रावण मोडक

चंद्रू Sat, 10/23/2010 - 03:02
असला उपरोध शैनिकाना कलतच नाय मंग बोचायचा प्रश्नच कुटे येतो ? आपलं काम सरळसोट. धर की हान्न तिच्यायला ! (स्वारी ! मेस्त्रीची भाषा तोंडात आली. नेमी बोलतांना आपली हीच भाषा असते. पण लिवायचं म्हनजे सभ्यपने लिवायला हवं नाय का?)

नगरीनिरंजन Fri, 10/22/2010 - 20:56
योग्य ठिकाणी चिमटे आणि चावे घेतले गेले आहेत! चिंजंनी तलवारीपेक्षा लेखणी कशी धारदार असते हे दाखवून दिलेले आहे. राहिली गोष्ट बाळराजांची तर पिंडीच्या आश्रयाने राहणार्‍या विंचवाप्रमाणे झुंडीचा आश्रय असेपर्‍यंत यांच्या बाळलीला पाहणे भाग आहे.

पैसा Fri, 10/22/2010 - 21:23
चिमटे, चटके आणि फटके असलेला लेख. प्रतिसाद पण लै भारी.

विकास Fri, 10/22/2010 - 21:47
चिंतातुरजंतुजी, तुम्ही असे धाग्यावर धागे काढून काय साध्य होणार? सरळ दुर्लक्ष करावेत. आता आपण दिल्लीच्या तख्ताचे युवराज राहूलकडे आणि त्याच्या विधानांकडे आपण दुर्लक्ष करतोच का नाही? तर ह्या एका "मुंबईच्या बाबू"चे कशाला घेऊन बसायचे? असे बघा, शिवसेनेस फॅसिस्ट म्हणले गेले, वसंतसेना म्हणले गेले, गुंड म्हणले गेले इत्यादी इत्यादी... तरी देखील अशा सततच्या बोलण्याने त्यांची (ठाकरे + शिवसेना यांची) प्रसिद्धी वाढतच गेली का नाही? बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना कधीकाळी केवळ मराठी वृत्तपत्रे, झालेच तर काही मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांपुरतेच मर्यादीत नाव होते. असल्या टिकांमुळे त्यांचे नातू तर अटकेपार काय अगदी साहेबाच्या राज्यातील पेपरात पोचले की! म्हणूनच, "सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे " असे काही उपरोधक लिहीलेले इथल्या अज्ञ मिपाकरांना थोडेच कळणार आहे? म्हणून म्हणावेसे वाटते की, जो पर्यंत आदित्य ठाकरे हे कर्तुत्वहीन आहेत अशी जनमानसात जागृती करत नाही आहात तो पर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत... ;)

In reply to by नितिन थत्ते

विकासराव्,समजा राहूल गांधींनी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंना अशीच नोटीस पाठवली असती तर काय झाले असते? आपण किती लेख लिहिले असतेत त्यावर? हुप्प्या,गांधीवादी तर अ़़क्षरशः पेटून उठले असते.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्.

In reply to by प्रिया देशपांडे

मिसळभोक्ता Sat, 10/23/2010 - 00:35
.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्. वा ! क्या सीन है ! आवडला !

In reply to by प्रिया देशपांडे

उल्हास Sat, 10/23/2010 - 03:34
पण एक फरक आहे ठाकरे घराण्यात अजुन तरी कोणी नगरसेवक , आमदार, खासदार झाला नाही ईतर पक्षात मात्र बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच

In reply to by उल्हास

गुंडोपंत Sat, 10/23/2010 - 03:45
बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच??? बाप पंतप्रधान - पोरे पंतप्रधान - नातू पंतप्रधान वगैरे चालू असतेच असे म्हणायचे असावे बहुदा! ;)

In reply to by गुंडोपंत

मिसळभोक्ता Sat, 10/23/2010 - 03:54
रिमोटकंट्रोलपदासाठी निवडणुका झाल्या तर ह्या तीन पिढ्या व्यंगचित्रे काढत बसतील.

अमोल खरे Sat, 10/23/2010 - 11:24
का आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप ? इथे मराठी माणसांबद्दल काहीही वाईट लिहिले तर ते बघत बसायचे का ? एरवी शिवसेनेच्या विरोधात असणारे मुख्यमंत्री पण बरखा दत्त च्या कार्यक्रमात ह्या पुस्तका विरोधात बोलले. अ‍ॅटलीस्ट पुस्तक तर वाचा.....त्या कार्यक्रमात पुस्तकातील काही उतारे दाखवत होते. नक्कीच आक्षेपार्ह होते. इथे शिवसेना वि. काँग्रेस असा रंग न देता मराठी वि. बाकी लोकांचा द्वेष ह्यावर चर्चा करावी ही माफक अपेक्षा.

In reply to by अमोल खरे

बेसनलाडू Sat, 10/23/2010 - 11:47
येथील दुव्यावरच्या माहितीनुसार पुस्तकात खालील आक्षेपार्ह वाक्ये असल्याचे समजते - 'What to do with such low-class people? No manners, no sense, nothing. And you know who is responsible for this attitude—that bastard Shiv Sena leader..... He and his “Maharashtra for Maharashtrians” nonsense. They won’t stop till they have complete Maratha Raj' ‘Wait till the Marathas take over, then we will have real Gandoo Raj,’

In reply to by बेसनलाडू

गांधीवादी Sat, 10/23/2010 - 12:05
श्री बेसनलाडू, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप करण्याचे काहीच कारण (मला तरी) दिसत नाहीये. . . . बाकी चालू द्या. अवांतर : आजकाल कोलेजात काय हे असलं शिक्षण देतात कि काय ? माननीय हुप्प्या ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते. त्या धाग्याची अशी उडवलेली खिल्ली हे बघून एक मिपाकर नागरिक म्हणून मला शरम वाटली. ड्वोले पाणावले. :wink:

जयंत कुलकर्णी Sat, 10/23/2010 - 20:15
चायला... आता "ठाकरे एक जगण्याविरूध्द भली मोठी अडगळ" असे पुस्तक लिहावे म्हणतो. कमीत कमी एक लेखमाला तरी ...... कंटाळा आला यार या ठाकर्‍यांचा आता....

अडगळ Sat, 10/23/2010 - 21:23
भाऊ पाध्येंच्या राडा या कादंबरीची या निमीत्ताने आठवण झाली. जबरदस्त कादंबरी आहे. ( यातला मंदार (हेच नाव होतं बहुतेक) हा नायक अगदी बॅ.अ.धोपेश्वरकराचा धाकटा भाऊ शोभावा इतका भारी आहे.सेनेचं वॉर्डावॉर्डातलं राजकारण त्यात उपकथानक म्हणून आलं आहे) ती पण सेनेने अशीच गायब केली असे म्हणतात.पण नंतर ती अक्षर प्रकाशनाने परत प्रकाशीत करुन बाजारात आणली. रिडल्स च्या वेळेला पण अशीच बोंबाबोंब केली होती. वासुनाकाप्रेमी अडगळ.

मालोजीराव Mon, 10/25/2010 - 20:32
इंग्लंडच्या राजपुत्रापासून ते जगभरातील कॉर्पोरेट जगताने मॅनेजमेंट गुरू म्हणून ज्यांना सलाम ठोकला ते मुंबईचे डबेवाले म्हणजे घामटलेली डुकरे आहेत, त्यांच्या घामाला डुकरासारखी दुर्गंधी येते अशी गरळ ‘सच अ लॉंग जर्नी’ या पुस्तकातून ओकणार्‍या रोहिंटन मिस्त्री याच्या विरोधात मराठमोळे डबेवाले आज मैदानात उतरले. * मिस्त्री नाराज दरम्यान, शिवराळ भाषा असलेले रोहिंटन मिस्त्री याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक शिवसेनेच्या आंदोलनानंतर मुंबई विद्यापीठाने अभ्यासातून वगळले, मात्र विद्यापीठाचा हा निर्णय मिस्त्री याच्या पचनी पडलेला नाही. त्याने विद्यापीठाकडे या निर्णयाबाबत ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्याची नाराजी व्यक्त करणार्‍या या ई-मेलची पत्रके वाटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद पटवर्धन यांनी विशेेष पुढाकार घेतला. मुंबईत जन्म झालेला रोहिंटन मिस्त्री कॅनडात स्थायिक झाला आहे. 1 एप्रिल 1991 साली त्याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 424 पानांचे हे पुस्तक असून 2007 मध्ये ते आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाला अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. मराठी माणसांबद्दल अतिशय घृणास्पद उल्लेख असलेले हे पुस्तक 15 ते 16 महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासाठी घेतले होते.