Skip to main content

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

Published on 14/09/2022 - 09:51 प्रकाशित मुखपृष्ठ
नुकत्याच होऊन गेलेल्या वर्षावाला, निथळून टाकणारी हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई. सकाळचे कोवळे ऊन पिऊन तजेलदार झालेली नवी पालवी. स्वच्छ धुऊन निघालेले, लाल मातीच्या चिखलावर, रेखीव छान वळणदार रांगोळीची जणू निळीशार रेघच असलेले रस्ते. त्यावरून वळणे घेत घेत मी निवांतपणे, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत, मजेत आवडीचे गाणे गुणगुणत, घाटमाथ्यावर चढून जातो आणि, पुढे तसाच खाली उतरून जातो. दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं. - संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)
लेखनविषय:

याद्या 6333
प्रतिक्रिया 12

आवडली कविता, जाता येता दिसणारी ही विलोभनिय दृष्ये, मधला सिमेंट मधे वाळू मिसळण्याचा काळ सुसह्य करतात. पैजारबुवा,

सुरुवातीची कविता छान आहे, पण..
दिवसभर राबायला, सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला. परत येताना पुन्हा तेच सारं.
याला पर्याय नाही..

कधी काळी दुचाकीवरून शनिवार रविवार ताम्हिणी घाट उतरुन जात असे ते आठवले :)

व्वा, सुंदर शब्दचित्र. आवडली कविता ! पण शेवटच्या तीन ओळीत खडा लागून भानावर आलो. आपल्या सर्वांचे तेच आहे, वास्तवात परतावे लागतेच. तेच आयुष्य आहे !

कविता वाचताना फार फार वर्षांपूर्वी पावसाळ्यात करत असलेल्या भटकंतीच्या आठवणी मनात दाटून आल्या. तेंव्हा शहराबाहेरचा परिसर फार रमणीय होता, आणि त्यात फिरताना अद्भुततेचा प्रत्यय यायचा.

या कवितेत 'एका दिवसातले येणेजाणे' याऐवजी संपूर्ण आयुष्याचे सांकेतिक चित्रण आहे, असा विचार केला, तर 'परत येताना पुन्हा तेच सारं' जर होऊ शकलं, तर किती छान होईल, असं वाटून गेलं. अर्थात काही उद्यमी (आणि भाग्यवान) लोक अगदी उतारवयातही नवनवे उपक्रम हाती घेत असतात, तसा प्रयत्न करायला हवा.