दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल?
माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो.
सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..."
गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मी सुहासला ओळखतो.