शतशब्दकथा कशी असावी?
शतशब्दकथा या कथा प्रकारावर मनात आलेले उलट-सुलट विचार शब्दात पकडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यात अजून भर घातल्यास नव्याने अशी कथा लिहिणाऱ्याला मार्गदर्शक होईल असे वाटते .
अतिवास यांनी लिहिलेली शतशब्दकथा मिसळपाव वर मागच्या वर्षी पहिल्यांदा वाचली तेव्हाच छान वाटली. म्हणजे या प्रकाराचं हे नाव नंतर ठरलं- तेव्हा आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं इतकंच.
मग कथा पुन्हा एकदा आवडली. एका छोटीच्या निरागस मनातले विचार विविध प्रसंगातून वाचायला मिळत आहेत.
नंतर मीही एक शतशब्द कथा लिहून पाहिली. मस्त वाटलं. प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनेवर होती म्हणून सोपं गेलं. अजून एक काल्पनिक पण लिहू असं वाटलं, पण मग थांबलो. म्हटलं थोडा या प्रकाराचा अजून विचार करूयात. मिपा वर अतिवास यांनी 55 word story बद्दल कुठेतरी माहिती दिलीच होती. तशा खूप इंग्रजी लघुकथा जालावर वाचायला मिळाल्या.
असंच इंग्रजी ५५ शब्द कथेचं एक उदाहरण बघू:
The world's last genie's lamp was discovered accidentally by a crocodile who brushed past it while prowling the depths of a watering hole in Kenya. This was why the world's last burst of real magic raised no eyebrows; only a few biologists noticed when the local gazelles suddenly became plumper, slower, and much, much thirstier.
परिकथेचा संदर्भ, उपहास, काळा विनोद, अशा अनेक रंग छटा या इवल्याश्या कथेत कश्या मिसळल्यात!
आता मराठीत हे पोहोचवायचं , तर पंचावन्न शब्द कसे पुरणार? कदाचित कुणी करेलही प्रयत्न. पण मग संदर्भाशिवाय ती त्रोटक होण्याचा धोका पण आहे. त्यापेक्षा शंभर शब्द म्हणजे बरेच बरे!
हा कथा प्रकार लिहिताना काय हवं? तर मोजक्या शंभर इतक्या कमी शब्दांत मांडण्याचं कौशल्य, ती रोचक ठेवण्याचं आव्हान, सोपे संदर्भ, आणि अधिकाधिक वाचक समूहाला ती कथा आपली वाटण्यासारखी रचना.
कथा म्हटली की एक चित्र मनात उभं रहातं, आपण आधी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या घटनां प्रमाणे तपशील येत जातात. म्हणजे शाळा, गुरुजी, आजी, राजवाडा वगैरे गोष्टींचा एक साचा मनात तयार असतो, त्यात आपण नकळत समोर आलेल्या नव्या गोष्टीतल्या पात्रांना अन ठिकाणांना बसवतो. साहजिकच आपल्या वेगळ्या पूर्व अनुभवामुळे तीच कथा वेगवेगळ्या व्यक्तीना कमी-अधिक आवडेल. त्यातून संदेश पण कदाचित वेगवेगळा जाईल.
बोधकथा थोड्याश्या वेगळ्या. त्याही त्रोटक वाटतात. गौतम बुध्दाची शिकवण लोकाना समजण्यासारख्या भाषेत लिहिलेल्या नीतीकथा. मनोरंजन हा त्यांचा मूळ उद्देश नाही. पण संस्कार क्षम वयात मुलांनी मनोरंजन म्हणून वाचाव्यात आणि नकळत संस्कार व्हावेत असा काहीसा उद्देश.
शतशब्दकथेचा विचार करता मुख्य उद्देश मनोरंजन, त्या खालोखाल कांही विचार देता आला तर अजून चांगले! विविध घटकांची वा व्यक्तींची विचार करण्याची वेगळी पद्धत किंवा वर्णन वाचून आणखी गम्मत वाटणे यात मजा आहे. त्यासाठी शेवटचा ट्विस्ट महत्वाचा वाटतो. शेवटी प्रश्न राहतो संदर्भांचा, लोकभाषेत लिहिलेली कथा असेल तर मूळ वाक्यप्रयोग तसेच्या तसे येतील, पण सर्वाना ते शब्द माहीत नसतील, पण म्हणून प्रमाण भाषेत लिहिल्यास मूळ प्रादेशिक भाषेचे सौंदर्य रहाणार नाही. हेच शतशब्द कथा लिहिताना आव्हान आहे असे म्हणता येईल.
शाळेत असताना आपल्या सगळ्याना कविता होत्या आणि रस ग्रहण करायला चक्क शिकवले जाई.
बहिणाबाई, शांताबाई, केशवसुत आणि अनिल यांच्या रचना सर्वाना सारख्याच कशा कळणार? किती नवीन शब्द आणि संदर्भ! म्हणून कविता पण शिकवायच्या. इथं पर्यंत ते ठीक सुद्धा आहे. पण त्याची परीक्षा मात्र नको वाटायची. म्हणजे आम्ही कविता वाचू, त्यातून आनंद घेऊ पण कवितेची परीक्षा मात्र नाही, (ही स्थिती- म्हणजेच आताची अवस्था). कदाचित त्यामुळे आपण आज कवितेचा आस्वाद घेऊ शकतोय.
पण मुळात शालेय जीवनात कविता अभ्यासल्या नसत्या तर? कदाचित आपल्याला आताच्या स्थितीत जालीय कवितांचा आनंद घेता आला नसता. आपण मराठी शिवाय हिंदी आणि इंग्रजी कविता शिकल्या हा अजून एक फ़ायदाच.
थोडक्यात, काव्याच्या सौंदर्याचे असे काही नियम नाहीत, पण काव्य कसे काय असावे/ असते, त्याचे भाषीय नियम आपण शिकलो, त्यापुढे मग कवीची प्रतिभा, दिलेल्या उपमा, चमत्कृती, मांडलेली एक विशिष्ठ कल्पना आणि शेवटी त्यातून आलेलं सौंदर्य असा काहीसां अभ्यास आपण शाळेत असताना केला असं म्हणता येईल.
अन्य भाषेतून आलेल्या प्रकारांपैकी सुनीत या प्रकारचं उदाहरण घेऊ. मूळ इंग्रजी सॉनेट प्रमाणे चौदा ओळी, ठराविक मीटर आणि शेवटच्या दोन ओळीत सारांश. (लगेच केशवसुत आणि केशवकुमार आठवतात!) म्हणजे मूळ कल्पनेतून मराठीत आणलेला प्रकार कालांतराने आपलाच वाटू लागतो.
आता असेच नियम शतशब्द कथेसाठी पण असावेत का? आणि बनवायचे झालेच तर काय असावेत? मला सुचलेले काही असे:
१. शीर्षक सोडून फक्त शंभरच शब्द असावेत. बसत नसेल तर खास प्रयत्न करावेत. जमेलच.
२. कथेचा सारांश म्हणून एक काही मुद्दा सांगता येण्यासारखा असावा.
३. कथा संपताना काहीतरी रोचक वळण असावे.
४. क्रमशः असू नये.
५. फार क्लिष्ट नियम असू नयेत!
अजून काय काय?
शतशब्दकथा भाषांतरित, काव्यरुपात पण असू शकेल. मात्र शंभर शब्द्संख्या महत्वाची.
(कुणाला असंही वाटेल काय करायचेत नियम वग्रॆ ? असे ना का फ्री फॉर्मेट- वाचा आणि सोडून द्या.)
पण एक नवा साहित्य प्रकार उदयाला वगैरे येत असेल तर विचार करून तर बघू!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहस्त्रशब्दलेखन म्हणून
रोचक!
शंभर शब्द हा एकच नियाम लागु
रोचकता शब्दसंख्येवर अवलंबून
वळण असलंच पाहिजे का?
चांगली साहित्यचर्चा!
शब्द
शतशब्दकथा म्हणजे शिर्षक सोडून
मिपावरच्या शतशब्दकथांचे संकलन
एकत्रित मिळत नाहीत . गुगलून
वाह! लय भारी आज पारायण करतो.
आणखी काही दुवे
थोडक्यात वाचलो >> _/\_