प्रवास २
आधीचा भाग: प्रवास १
"हो आई सगळं व्यवस्थित आहे इकडे, मस्त चाललंय"
"हो हो जेवण पण चांगलं असतं गं"
"तू काळजी नको करू, आय थिंक रजा मिळेल थोड्या दिवसात, मी कळवेन तसं"
"बाय"
आईने मुलगी बघितली असणार लग्नासाठी आणि म्हणून सुट्टी काढून ये लवकर म्हणून मागे लागली होती. आपल्या साध्या सरळ घराबद्दल आठवून त्याला मजा वाटत होती. आई तर काल परवा पर्यंत म्हणत होती कोणत्याही कंपनीत वगैरे चांगली नोकरी मिळेल, सोड आर्मीचा नाद म्हणून, पण तिने कधी त्याच्या जिद्दीला लगाम सुद्धा घातला नव्हता. बाबा दरवेळेस विचारायचे, "आशु, काम काय असतं रे तुमचं तिकडे?"
आणि दरवेळेस आशुतोष "काही नाही बाबा, कधीतरी गस्त घालायची आणि बाकी आराम" असं म्हणून वेळ मारून न्यायचा. त्याशिवाय काय करणार? सांगू शकला असता कि आम्ही कोव्हर्ट ऑप्स करतो? सांगू शकला असता कि कधी कधी बॉर्डर ओलांडून अतिरेक्यांना मारून येतो? बाबांना पण बरं वाटायचं. आपल्या पूर्ण घराण्यात पहिलाच आहे आशु ज्याने असं 'नॉट सो मेनस्ट्रीम' स्वप्न पाहिलं आणि पूर्ण करून दाखवलं. साधारण कुटुंबातला साधारण मुलगा ते हायली ट्रेंड एलिट पॅरा कमांडो हा आशुतोष चा प्रवास चित्तथरारक होता. ह्याच प्रवासाचा त्याला सार्थ अभिमान होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जगजीत सांगत आला, "शाब, सीओ शाब हॅस कॉल्ड यू फॉर ब्रिफिंग"
आणि आशुतोष च्या डोक्यात शंका आली. परत ब्रिफिंग म्हणजे परत चुहे घुसनेवाले है.
मेजर सिद्दीकी म्हणतात त्याप्रमाणे इनफिल्टरेशन हि दिल्लीत एसी मधल्या बसलेल्या बाबूंना त्रासदायक गोष्ट असेल, आपल्याला तर हे रोजचंच काम आहे. नित्य मढं त्याला....
"गुड मॉर्निंग जेटलमेन, हाऊ आर यु ऑल डुइंग?"
"अबसोलुटली फाईन सर, थॅंक यु"
कर्नल माधवन हे एक हायली डेकोरेटेड सैन्यधिकारी होते. अनेक ऑपरेशन्स गाजवलेली असताना सुद्धा चेहेऱ्यावर गर्वाचा लवलेश हि नव्हता. प्रसन्न स्मितहास्याचे हे व्यक्तिमत्व. पण जेव्हा हे बोलायला सुरुवात करत, तेव्हा मात्र शब्दांनी उभा जाळणारा सूर्य च होते.
"अकॉर्डिंग टू आर सोर्स, 48 तासात घुसखोरी होणार हे 80% कन्फर्म आहे. नाऊ, यु ऑल नो द ड्रिल. ट्रॅप कधी कुठे कसा बसवायचा हे एका तासात तुम्ही ठरवून घेऊन या, वुई विल डिस्कस. क्लिअर?"
"येस सर"
हा सोर्स म्हणजे कोण ते आशुतोष लाच काय पण मेजर ना पण माहित नव्हतं. तो मिलिटरी इंटेलिजन्स चा असू शकतो, रॉ चा असू शकतो, किंवा इतर काश्मिरी लोकांप्रमाणे च एखादा युवक, कुणीही असू शकतो. त्यानं असं ऐकलं होतं की काश्मीर मध्ये मूळ काश्मिरी लोकसंख्या कमी आणि रॉ आणि आय एस आय चे एजंट्स च जास्त होते. त्यात तथ्य किती हे फक्त सिनिअर ऑफिसर्स ना च माहित. पण एकूणच या एजंट्स बद्दल सर्वांनाच कुतूहल असायचं.
दर वेळेस स्वतः प्लॅन करणारे सीओ सर आज आपल्याकडून प्लॅन डिमांड करत आहेत हे ऐकून सर्वाना आश्चर्य वाटलं.
अखेर अनेक शक्यतांचा विचार करत एक प्लॅन निवडण्यात आला..
संध्याकाळी 5.30 ला संचारबंदी लागू झाली आणि 10 जणांची टीम तोंडावर काळे पट्टे काढून निघाली. काश्मीर मधील ठराविक भागात अनिर्बंध काळासाठी 5.30 नंतर कडक संचारबंदी लागू होते. रस्त्यावर फक्त आर्मी च्या जिप्सीज् आणि जवान. याव्यतिरिक्त कुणी दिसला तर शूट ऍट साईट च्या स्टँडिंग ऑर्डर असतात. यामुळे ट्रॅप लावणाऱ्या टीम ला कार्यरत होण्यात मदत होते आणि बातमी फुटायची शक्यता कमी असते. एव्हढ असून सुद्धा 80% ऑपरेशन्स फसत असत.
एका छोट्या ओढ्याजवळ ट्रॅप लावण्यात आला होता. जवानांची पोजिशन रँडम असली तरी अडकल्यावर अतिरेक्यांना पळायला एव्हीडीशीही जागा राहू नये ह्याची खबरदारी घेतली होती. बॉर्डर वर कुठूनही घुसखोरी झाली तरी घुसखोरांना या भागातून यावंच लागणार असा हा प्रदेश. आजूबाजूला गच्च झाडी. भुतांना सुद्धा भीती वाटेल असा किर्रर्र अंधार पसरला होता. अश्या या वातावरणात 10 भारतीय सैनिक डोळ्यांवर नाईट व्हिजन डिव्हाईस लावून सावजाची वाट पाहत दबा धरून बसले होते. रेडिओ सेट असलेला एक सैनिक सर्वात मागच्या बाजूला होता. मेजर सिद्दीकी, सुभेदार विकास, लेफ्टनंट आशुतोष आणि कॅप्टन रावत चौघे चार वेगवेगळ्या ठिकाणी आघाडीवर होते. लान्स नाईक थापा एका झाडावर चढुन बसला होता. सर्वांकडे वॉकि टॉकी होते..ह्यावर शेजारच्याला पण ऐकू जाणार नाही अश्या पद्धतीने कसा बोलायचं हे सर्वांना अवगत होतं.
1.30 च्या सुमाराला झाडावरच्या सैनिकाकडून संदेश आला आणि सर्व जण अधिकच सजग झाले.
"मूव्हमेंट है 50 मीटर पे"
"क्या दिख रहा है?-मेजर
"दूर है..दिखेगा नही, पर पास आ रहा है"
आता मात्र सर्वजण अत्यंत तयारीत बसले होते. हळू हळू हालचाली चा झाडांमध्ये आवाज होऊ लागला.
बंदुका झाडावर रोखल्या गेल्या.
आवाज जवळ जवळ येऊ लागला.
सर्वांची बोटं ट्रिगर वर अशी काही बसली होती की किंचित जरी हलवली कि गोळी निघणार होती.
एवढ्यात आवाज थांबला.
इकडे सर्वांचा श्वास रोखला होता.
आवाज थांबल्याने मेजर थोडेसे निराश झाले.
सर्वांच्या मनात एकच विचार कि बातमी फुटली तर नसेल?
बातमी फुटणे म्हणजे अतिरेकी येणारच नाहीत असा त्याचा अजिबातच अर्थ नसतो, उलट सावध शत्रू समोर आपली जवान सिटिंग डक्स होण्याची शक्यता जास्त असते.
4 क्षण शांततेत गेले आणि पुन्हा झाडाची सळसळ झाली.
पुन्हा ट्रिगर वर बोटं टाईट.
स्वतः च्या श्वासाचा पण आवाज न करता सर्व जण दबा धरून बसले होते.
इतक्यात.....
समोरच्या झाडातून बिबट्या बाहेर पडला.
"ब्लडी बास्टर्ड. इसकी माँ कि........" वॉकि टॉकी वर मेजर सिद्दीकिंचा आवाज घुमला.
तो पाणी प्यायला आला होता. पिऊन निघून गेला.
आता सर्व जण वैतागले होते. चुळबुळ वाढली होती.
हाही ट्रॅप फेल जाणार असं जवळपास निश्चित झालं होतं...
आशुतोष च्या डोक्यात वेगळंच चालू होतं. एजंट्स च्या विश्वासार्हतेबद्दल त्याला प्रश्न पडत होते.
एवढ्यात लान्स नाईक थापा जवळ जवळ ओरडलाच
"मूव्हमेंट, 4 लोग है साब"
.
.
.
.
क्रमश:
Book traversal links for प्रवास २
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
अप्रतिम लिहिताय.
हो
वाचतोय. पुभाप्र.
सोपे मराठी टायपिंग
जबर्दस्त लेखन!! पु.भा.प्र.
जबरा
फारच छान!
छान
_/\_
वाचतोय...
उत्तम भाग, एम्बुश फेल गेले
छान लिहिताय.