✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घातक स्युडोमार्ग

ऋ
ऋषिकेश यांनी
Wed, 08/27/2014 - 11:18  ·  लेख
लेख
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे! ========= "साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव! महात्मा गांधींपासून ते डॉ आंबेडकरांपर्यंत आणि पंडीत नेहरूंपासून ते मनमोहनसिंगांपर्यंत कोणालाही काहीही विचार न करता क्षणात झाडून टाकायला हे "स्युडो" हत्यार मंडळींच्या हातात आलं आहे. विचाराचा प्रतिकार करू न शकणारी लोकं मग व्यक्तीच्या वागण्यावर घसरतात आणि मग त्याचं वागणं तसं नव्हतं ना? त्याचं वागणं असं होतं ना? मग काय बाता करता? अरेच्या! त्याचे विचार चुक आहेत की नाहीत ते बोला! हवं तर त्या माणसाला दुटप्पी म्हणा दुतोंडी म्हणा पण तरीही तो विचारांचा प्रतिवाद नाहिच्चे! त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात. व्यक्तीलाच झाडून टाकलं की विचारांचा प्रश्नच येत नाही, ना रहेगा बांस... माझ्यामते कोणताही समाज पुढे यायला - बदलत रहायला - परंपरा नावाच्या चिखलाला दूर सारू शकणारी पुरोगामी मंडळी अत्यावश्यक असतात. पुरोगाम्यांचे (मग ते वैयक्तिक जीवनात तसे वागु शकत असोत वा नसोत ते इथे गैरलागू आहे) किंबहुना पुरोगामी विचारांचे कोणत्याही प्रगती इच्छिणार्‍या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्या त्याच व्यक्ती असतात ज्या परंपरेने चालत आहे, संस्कारांमुळे गरजेचे आहे असल्या भुलथापांच्या पलिकडे जाऊन तर्काला, बुद्धीला जे पटेल त्यावर आपले मत बनवतात. प्रत्येकवेळी परिस्थितीमुळे, काही भावनिक कारणांमुळे कधी कायद्याच्या भितीमुळे किंवा कधी कायदा मोडायची प्रत्यक्ष धमक नसल्याने असेल ते तसे वागु शकतीलच असे नाही, पण त्यांनी दिलेला विचार हा समाजाला पुढेच घेऊन जात असतो. पुरोगाम्यांचा आवाज दाबल्यावर, त्या व्यक्तींना आउटराईट रिजेक्ट केल्यावर भुतकाळात अडकलेल्या रादर रुतलेल्या आणि लोकांच्या निव्वळ अस्मितांना चुचकारत नेतृत्त्व करू पाहणार्‍या परंपरावाद्यांच्या हातात नेतृत्त्व गेलं की देशाचा, समाजाचा फक्त पाकिस्तान होऊ शकतो इतके लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. पुरोगामी, लिबरल म्हणजे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही किंवा विशिष्ट काळाचीही नाही. एखादी गोष्ट निव्वळ चालत आली आहे, किंवा "हे करून कुणाचं वैट झालंय का?" किंवा "आमच्या पिढ्यान पिढ्या असं वागत आल्या आहेत" किंवा "आपल्या धर्मात, जातीत, 'लोकांत' हे असंच चालतं" असली कारणं आपली मते बनवायला पुरेशी न वाटणार्‍या कोणत्याही व्यक्तीला मी पुरोगामी म्हणेन. पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो. या अभिजन वर्गाचे अस्तित्त्वच नसेल तर समाज पुढे जाईलच कसा? समाजाला साचु न देता सतत पुढे खेचत रहायचे अतिशय महत्त्वाचे कार्य हा अभिजन वर्ग करत असतो. आजवर त्यांच्या कृतीवर असंख्यवेळा टिका झाली आहे. होत असते. आणि ती होणारच कारण ते "स्टेटस कूओ" भेदत असतात त्याला विरोध हा अध्याहृत असतो. मात्र भारतात आजवर सुदैवाने हा विरोध विचारांना व कृतीला झाला आहे. त्या व्यक्तीला मात्र समाजात आदरच मिळत आला आहे. ज्योतिबांसारख्या व्यक्तीला मोठा विरोध झाला पण तो त्यांच्या कार्याला व विचारांना झाला. त्यांना अडवण्यात आले, त्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या पण समाजाने ज्योतिबांना शेवटी गौरवलेच. त्यांना आउटराईट रिजेक्ट केले नाही. त्यांना होणारा विरोध हा त्यांना "ग्राह्य" ठरवल्यानंतरची स्टेज आहे. आता लगेच प्रतिवाद येईल की ज्योतिबांना आदर दिला गेला नाही तो त्यांनी त्यांच्या कृतीतून मिळवला आहे. अर्थातच! तुमच्या बोलण्याला यशस्वी कृतीची जोड असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मान्यच आहे! पण म्हणून तुलनेने कमी कृती करू शकणार्‍या / इच्छिणार्‍या किंवा वेगळ्या प्रकारे/माध्यमांतून समाजप्रबोधन घडवू पाहणार्‍या आगरकर व/वा गोखल्यांसारख्यांच्या विचारांचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते. स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते. त्यांचे काही विचार कित्येकदा पूर्णपणे चुकीचेही असतील पण ते त्यांना मांडु देण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारीच नाही तर अत्यावश्यक कर्तव्य आहे. आततायी वाटणार्‍या विचारांकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांचा प्रतिवाद करा मात्र त्या व्यक्तीला रिजेक्ट करून, कायमचे अग्राह्य ठरवून त्याच्याकडून येणार्‍या/येऊ शकणार्‍या किंवा आधीच आलेल्या इतर विषयांवरच्या संभाव्य महत्त्वाच्या विचारांनाही तुम्ही घाऊकपणे दूर लोटता आहात. बदलत्या आर्थिक परिस्थितीने आणलेल्या वेगाबरोरच भारतात हा होऊ घातलेला नवा बदल आता सामान्य लोकांमध्ये खूप वेगात रूजतो आहे याची खंत अतिशय बोचरी आहे. या मुक्तचिंतनावरही येणार्‍या प्रतिसादांची पूर्ण कल्पना आहे. त्यावर मी प्रतिवाद करेनच, प्रतिसाद देईनच असे नाही. मात्र त्यात येणार्‍या विचारांवर पूर्ण व आदरपूर्वक विचार करेन इतके मात्र नक्की! बरेच दिवस साचले होते, एकहाती, एकटाकी टंकले आहे. प्रमाणलेखनदोष पदरात घ्याल अशी आशा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
13121 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

..वाचतेय,

कवितानागेश
Wed, 08/27/2014 - 15:31 नवीन
..वाचतेय, पण व्यक्तीच्या "स्युडो" असण्याचा प्रतिगामि किंवा पुरोगामित्वाशी खरोखरच संबंध आहे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

आभार!

ऋषिकेश
Wed, 08/27/2014 - 16:37 नवीन
आभार! थोडक्यात उत्तम विवेचन आहे व्यक्ती स्युडो आहे किंवा नाही यावरून त्याच्या मतांना जोखु नये हेच तर सांगतोय. अनेकदा समाजात व्यक्तीला स्युडो ठरवले जाते नी त्याने मांडलेल्या पतावर विचारही न करता - मताला ग्राह्य न समजताच - ते केवळ स्युडो वाटणार्‍या/ठरवल्या गेलेल्या व्यक्तीने मांडले आहे या कारपेट खाली दडवले जाते किंवा उडवून लावले जाते तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तर्काच्या कसोटीवर मतांना

बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 16:49 नवीन
तर्काच्या कसोटीवर मतांना जोखावे. ते कोणी मांडले आहे ते गौण!
बेवड्यांनी दारूबंदीवर (मद्यप्रेमी लोक्स तूर्तास माफ करा, नंतर सवडीने भांडूच) , हिटलरने अहिंसेवर, अल कायदाने दहशतवादविरोधावर, इ. प्रवचन केले तर ते ऐकायला कुणी जावे हा ज्याचात्याचा प्रश्न. पण आपल्या विचारांची, त्यांच्या प्रसाराची समाजाला गरज आहे इ. म्हणायचे असेल तर आचारविचारांतली थोडी तरी सुसंगती असणे गरजेचे वाटते. नपेक्षा त्या व्यक्ती आणि ते विचार दोघेही तेल लावत जातील. हां आता माझे असे असे विचार आहेत, समाजाला त्याची गरज आहे की नाही त्याने मला वट्ट फरक पडत नाही असा स्टान्स असेल तर मग चालूदे. मग दारुड्यांच्या झिंगत केलेल्या दारूबंदीवरच्या प्रवचनाला मीही हजेरी लावतो आणि त्यांना चखणाही सप्लाय करतो. पण जर लिबरल विचार समाजासाठी गरजेचे आहेत आणि त्यांचा प्रसार करणे अवश्य आहे तर मग आचाराचे थोडेही उत्तरदायित्व स्वीकारायला लोकांना अडचण काय असते हे समजत नाही. (आणि हो, ते एक वाक्य सोडलं तर अख्खा लेख 'तुम्ही आमच्या आचरणावर बोट ठेवता' या अ‍ॅक्यूझेशननेच भरलेला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मुळात तुम्ही स्यूडोमिपाकर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/27/2014 - 15:39 नवीन
मुळात तुम्ही स्यूडोमिपाकर असल्याने तुमच्या मतांना फार भाव मी देणार नाही ;-)
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Wed, 08/27/2014 - 16:51 नवीन
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला? महत्त्त्वाचं कारण सांगते. तू ज्यांचा उल्लेख केलास त्या जोतिबा फुल्यांना "कर्ते समाजसुधारक" म्हणतात. मला यातला 'कर्ते' शब्द फार महत्त्वाचा वाटतो. आताचे केवळ एसी रूममधे बसून कीबोर्ड बडवणारे आणि स्वतःलाच स्वतः पुरोगामी म्हणणारे लोक हे खरेच पुरोगामी असतात का? कृतीशून्य बडबड ही शेवट चेष्टेचा विषयच होणार. आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.
  • Log in or register to post comments

ही परिस्थिती या लोकांच्या

बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 16:52 नवीन
ही परिस्थिती या लोकांच्या वागण्यामुळेच आली आहे असं नाही वाटत तुला?
ते आत्मपरीक्षण का काय ते करणं लिबरल लोकांना मानवत नाही असं ऐकून आहे. अपचन होतं म्हणे त्यानं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

'कर्तृत्त्व' या गुणाला इथे

ऋषिकेश
Wed, 08/27/2014 - 17:02 नवीन
'कर्तृत्त्व' या गुणाला इथे गौण ठरवण्याचा उद्देशही नाही आणि लेखात तसे प्रतीत होतेय असे मला वाटले नाही.
आणि अशा बडबडीचा ना या लोकांना फायदा, ना समाजाला.
असहमती इथेच आहे. प्रत्येक वेळी मत मांडणार्‍यावरच त्याच्याशी साजेशी कृती करण्याचे बर्डन टाकता येत नाही. त्याला कित्येक नोन/अननोन कारणाने ती करणे शक्य असेलच असे नाही. पण म्हणून त्यातील विचाराकडे दुर्लक्ष करणे समोरच्या व्यक्तीच्या/समाजाच्याच अहिताचे असु शकते. निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे. नव्या विचारांबरोबरच तशी कृती कोणी केली तर त्याचा परिणाम अधिक असतो किंवा अधिक जलद असतो वगैरे अमान्य नाही हे लेखात म्हटले आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लक्षात घे

पैसा
Wed, 08/27/2014 - 17:08 नवीन
टिंगल केली पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याच्या बोलण्याला अजिबात वजन येणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नवे विचार येणारच. कोणत्याही काळात आणि परिस्थितीत. संतानी आणलेले समतेचे विचार हेही नवे विचारच होते. आणि मुलींना शाळेत पाठवा हा सुद्धा नवा विचारच होता. पण ते आचरणात आणणार्‍याला बाजूला सरकवून टाकणे कठीण असते. मात्र फक्त बोलणारा तेव्हाच विसरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

टिंगल करू नये व त्यांचे मत

ऋषिकेश
Wed, 08/27/2014 - 17:16 नवीन
टिंगल करू नये व त्यांचे मत ग्राह्य असावे इतकी सहमती पुरेशी (व पुरेशी दुर्मिळ! ;) ) आहे. बाकी, कृतीने अधिकचे वजन येते हे मान्य असले तरी कृती नसल्याने वजन येत नाही यावर असहमती आहेच. कुरूंदकरांसारख्या कित्येक पुरोगाम्यांची कित्येक विविधांगी विषयांवरील मते त्या त्या विषयांत त्यांचे कार्य नसतानाही/कृती नसतानाही तितकीच वजनदार नी ग्राह्य वाटतातच, नी त्यांना विसरताही येत नाही नी बाजुला सरकावणेही कठीण होतेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बरं

बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 17:23 नवीन
मग असे किती कुरुंदकर आहेत म्हणे आसपास? एक अपवाद असला म्हणून काय सगळ्यांना त्या जरीवस्त्राला आपले ठिगळ जोडता येते क्की क्कॉय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

थोडा फरक आहे. माणूस किती खरा

आनन्दा
Wed, 08/27/2014 - 18:26 नवीन
थोडा फरक आहे. माणूस किती खरा आहे यावरून त्याचे वजन ठरते. एखादा माणूस त्या क्षेत्रात खरा असेल तर त्याच्या इतर क्षेत्रातील मतांनादेखील वजन येते. किमान तर्कशुद्ध विचार तरी नक्कीच केला जातो. पण तो जर त्याच्या क्षेत्रातच खरा नसेल तर त्याला किती गांभीर्याने घ्यायचे? पण असो, मला तुमचे म्हणणे देखील अंशतः पटते, नाहीतर दिग्गीराजांना क्ष्क्ष्क्ष्वरच मारावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

पण एखाद्या माण्साची एखाद्या

कवितानागेश
Wed, 08/27/2014 - 18:39 नवीन
पण एखाद्या माण्साची एखाद्या क्षेत्रातली सगळीच मत्म सदासर्वकाळ 'खरी आणि योग्य' मान्ता येतिल असं नाही. माणसं बदलतात! कधीतरी आपल्याल आज पटलेली मतं पुढे १५ वर्षांनी पटणार नाहीत. आपणही माणूस असल्यानी बदलतो! :) शिवाय मला माझा विचार आज, आत्त्ता या क्षणी तर्कशुद्ध वाटत असला, तरी तो तसा असेलच असं नाही. मग "खरे" काय? हा प्रश्न नेहमी शिल्लक रहातोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

माझी व्याख्या सरळ आहे. जो

आनन्दा
Wed, 08/27/2014 - 22:45 नवीन
माझी व्याख्या सरळ आहे. जो माणून "स्वतः"शी प्रामाणिक आहे, त्याचे बोलणे अगदी आचरणात आणण्यासारखे नसले तरी विचार करण्यासारखे नक्कीच असावे. अर्थात एकदा त्या माणसाची त्या क्षेत्रातली कुवत लक्षात आली, मग दुर्लक्ष करणे ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

याच न्यायाने मी दिग्गीराजांचे

आनन्दा
Wed, 08/27/2014 - 22:48 नवीन
याच न्यायाने मी दिग्गीराजांचे म्हणणे देखील विचारार्ह मानतो. बाकी लोक काही म्हणोत, तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

आनंदराव, हे जरूर पहा

होकाका
Mon, 09/01/2014 - 20:44 नवीन
आनंदराव, हे जरूर पहा: http://www.youtube.com/watch?v=ixsp0u9_3N0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

वॉव !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/01/2014 - 20:46 नवीन
तो माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे ??? !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हो. म्हणजे मी ज्या न्यायाने

आनन्दा
Fri, 09/05/2014 - 12:14 नवीन
हो. म्हणजे मी ज्या न्यायाने औरंगजेब प्रामाणिक होता असे म्हणतो, कर्ण, रावण वगैरे पौराणिक पात्रांना देखील सवलत देतो, त्याच न्यायाने दिग्गेराजांना देखील गांभीर्याने घ्यावे असे माझे मत आहे.. बाकी यावरून आठवले, दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्

बॅटमॅन
Fri, 09/05/2014 - 12:20 नवीन
दैवायत्तं कुले जन्म म्हणणार्‍या कर्णाला आद्य पुरोगामी म्हणावे का?
किंवा सत्यकाम जाबाल याच्या आचार्याला. त्याची जात, त्याचा बाप कोण हे माहिती नसतानाही त्याने त्याला ब्राह्मण करून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

"प्रामाणिकपणे अप्रामाणिक

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/05/2014 - 19:33 नवीन
"प्रामाणिकपणे अप्रामाणिक असलेल्यांनाही प्रामाणिक समजले जाउ शकते" हे आजच समजले... पण अर्थातच पटले नाही ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

निव्वळ एखादा योग्य, विधायक

बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 17:18 नवीन
निव्वळ एखादा योग्य, विधायक विचार व्यक्त करणारी व्यक्ती "कर्ती" नाही म्हणून तिची टिंगलच व्हावी हे नवे विचार येण्यास पोषक वातावरण निर्माण करणारे नसते असे वाटते. नी असे नवे विचार मांडणार्‍यांना गप्प करणे समाजास घातक आहे.
विचार हे व्हॅक्यूममध्ये असते तर हे ठीक होतं. समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमत

पैसा
Wed, 08/27/2014 - 17:20 नवीन
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

विचाराने पुरोगामी असलेला

सुहास..
Mon, 09/01/2014 - 19:25 नवीन
विचाराने पुरोगामी असलेला स्वतःपुरता बदल घडवतो, तर कृतीशील असलेलाच समाजाला दुसरी नवी दिशा देऊ शकतो. निव्वळ विचाराने समाज बदलणे जवळपास अशक्य वाटते. >>> महा प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समाजात बदल घडवू पाहण्याची

बाळ सप्रे
गुरुवार, 08/28/2014 - 14:40 नवीन
समाजात बदल घडवू पाहण्याची इच्छा असलेल्यांकडून कृतीची थोडीसुद्धा अपेक्षा करणं गैर का आहे ते समजत नाही
अपेक्षा गैर नव्हे. पण कृतीअभावी कोणाला Write-off करु नये. असा विचार करुन बघा की विचार (Idea generation) ही एक प्रक्रीया आहे. त्याची अंमलबजावणी (execution) ही पुढील प्रक्रीया आहे. एकच मनुष्य सर्वच प्रक्रियांमधे निष्णात नसतो. एखादा उद्योजक स्वतः एखादा विचार करण्यास समर्थ नसेल पण अंमलबजावणी चोख करु शकेल. विचार करणार्‍याने अंमलबजावणी करण्यात अडथळा येइल असे वर्तन करु नये इतकी अपेक्षा असणारच. बेवड्याच्या दारुबंदीवरील व्याख्यानाच्या उदाहरणावर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ठीके, पण अशी अपेक्षा करणार्

बॅटमॅन
गुरुवार, 08/28/2014 - 18:07 नवीन
ठीके, पण अशी अपेक्षा करणार्‍यांची कृती तर सोडाच, काही अपवाद वगळता विचारही धड नसतात. ते ज्या लोकांना तुच्छ समजतात त्यांच्याहून स्वतः बरे इ. आजिबात नस्तात. अशा आर्मचेअर फिलॉसॉफर लोकांना सीरियसलि आणि काय घ्यायचंय? खरोखरचे चिमूटभर पुरोगामी विचारवंत सोडले तर सेल्फ स्टाईल्ड विचारजंतांना हिंगलण्याचे वट्ट कारण दिसत नाही. शरीराने भारतात आणि मनाने भारताबाहेर राहणारी हिंदूद्वेष्टी मंडळी ही. स्वतःच्याच दुटप्पी वर्तनाने त्यांनी ही परिस्थिती ओढवून घेतलेली आहे. भोगा म्हणावं आता कर्माची फळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

विचारात बदल घडवू

प्रदीप
गुरुवार, 08/28/2014 - 20:41 नवीन
पहाणार्‍या ह्या प्रोफेसरने आता, आपल्या सुहृदांपैकी स्त्रीयांना बिनधास्त नायजेरीयात पाठवावे. ह्या व्यक्तिचा, आफ्रिका व विशेषतः नायजेरीया येथील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा विशेष अभ्यास, प्रदीर्घ काळापासून आहे, असे ह्या संस्थळावरून दिसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

बाकी, तर्कावर मत जोखावे इ.इ.

बॅटमॅन
Wed, 08/27/2014 - 16:53 नवीन
बाकी, तर्कावर मत जोखावे इ.इ. पाहून अमेरिकेची आर्थिक घडी बसवणार्‍या पुणे मनपामधील उंदीरमाराची आठवणही झाली.
  • Log in or register to post comments

आभार

ऋषिकेश
Wed, 08/27/2014 - 17:17 नवीन
आता मी हाफिसातून घरी गेलो की गणपतीच्या धामधुमीत रविवार/सोमवारपर्यंत बहुतांशवेळ ऑफलाईन असेल. त्यामुळे या चर्चेत भाग घेता येईलच असे नाही, मात्र परतल्यावर चर्चेत पुन्हा सहभागी होईनच. तोवर अजून विविधांगांनी मते वाचायला आवडतीलच.
  • Log in or register to post comments

टैम प्लीज

पैसा
Wed, 08/27/2014 - 18:56 नवीन
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का?
  • Log in or register to post comments

प्रच्छन्न

विकास
Wed, 08/27/2014 - 23:45 नवीन
वास्तवीक चर्चेच्या सुरवातीसच लीमाउजेट यांनी एका वाक्यात उहापोह केला आहे त्याच्याशी सहमत म्हणून गप्प बसता येईल, पण... ;) जरा केसस्टडी करूयात... सर्वप्रथम जर तुम्ही लिबरल / सुधारक असलात आणि मिपावर सगळे अँटीसुधारक/अँटीलिबरल्स बुरसटलेले विचारजंत असतील तरी तुमचे विचार येथे कार्पेटखाली ढकलले गेले नाहीत, असे आलेल्या प्रतिसादांवरून तरी वाटत आहे. :) विषयाचा मथळा "घातक स्युडोमार्ग" असा आहे. आता तसे म्हणले तर स्युडोमार्ग कुठेही असू शकतो. एखादा अधुनिक गुरू-बाबा-बुवा प्रवचन संपवून पब्लीक नसताना काय दिवे लावतो (अथवा चालू असेलेले घालवून करतो) त्यावरून त्याला भोंदू म्हणायची पद्धत आहेच. त्यामुळे समाजातील खरेखुरे बाबा-बुवा, जे प्रवचनातून अध्यात्मच नाही तर समाजाला चांगल्या वळणावर ठेवायचा प्रयत्न करतात, ते कधी दुखावले नाहीत. हे अगदी हिंदूंमधेच नाही तर इतर धर्मियात देखील आहेच. उदाहरणार्थ लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे अमेरीकेतील अनेक कॅथलीक पाद्र्यांना तुरूंगात जायची वेळ आली, त्यातून जे काही कायदेशीर बाबी/भरपाई वगैरेवर पैसे देण्याची वेळ आली, त्यातून अनेक चर्चेस बंद करून विकावी लागली. पण म्हणून अनेक पाद्री आहेत जे खर्‍या अर्थाने रविवारी चर्च मधे प्रवचन करणे आणि इतरवेळेस देखील कॅथलीक समाजात धार्मिक नेता म्हणून धार्मिक/समाजसेवा करणे कर्तव्य समजतात त्यांना कोणी भोंदू म्हणत नाही. त्याच्या किंचित उलट उदाहरण हे शंकराचार्य आणि लोकमान्य टि़ळकांचे बघूयात. त्यांना त्यांच्या त्यांच्या काळात लोकांनी प्रच्छन्न बुद्ध (शंकराचार्य) अथवा प्रच्छन्न सुधारक (टिळक) म्हणलेच होते. कारण काय तर ते देखील प्रस्थापितांमधे सुधारणाच करण्याचा प्रयत्न करत होते फक्त अलगदपणे आणि वरकरणी त्याच्या विरोधातील भुमिका वाटू शकेल असा स्टँड घेऊन. मी अनेकदा सांगितलेले एक अजून उदाहरण... उंच माझा झोका मुळे नव्याने आणि पुन्हा सुप्रसिद्ध झालेले न्यायमुर्ती रानडे आणि रमाबाई.. रानडे जरठबाला विवाहाच्या विरोधातले आणि विधवाविवाहाला प्रोत्साहन देणारे सुधारक. पण प्रथमपत्नीच्या निधनानंतर स्वतःच्या वडीलांच्या आग्रहाला विरोध करू शकले नाहीत. वडीलांनी काशीस निघून जाईन, प्राणत्याग करेन का असेच काहीसे ब्लॅकमेलींग केले आणि न्या. रानड्यांचा विरोध कोलमडला. त्यावर रानडे वादविवाद स्पर्धेतच एका तरूण मुलाने टिका केली आणि कधी नव्हे ते चिडणारे रानडे चिडले. त्यावेळेस मला वाटते विशीच्या आत असलेल्या आणि कॉलेजातही न गेलेल्या गंगाधरपंतांच्या मुलाने टिळकांनी त्यावर त्या कार्यक्रमातच जाहीर आवाज उठवला आणि पुण्याच्या पब्लिकची काही काळ करमणूक झाली. पण त्याच रानड्यांनी रमाबाईंना शिकवले, त्याबाबतीत मात्र कुणाचे ऐकले नाही. त्यामुळे कदाचीत ते स्युडो कर्मठ ठरले असतील, स्युडो-सुधारक नाही. त्यामुळेच नंतरच्या काळात १९०१ सालात जेंव्हा रानड्यांचे निधन झाले तेंव्हा त्यांच्यावर लिहीलेल्या मृत्यूलेखात टिळकांनी जे काही म्हणले आहे, ते या संदर्भात कायमच लक्षात ठेवावे असे वाटते (अर्थात कालानुरूप वर्तणूकीत बदल करावा लागेल हेवेसांनल)
"अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशहिताची खरी कळकळ, विद्यार्जनाचे व्यसन,अचूक कल्पकपणा हे रानड्यांचे मुख्य गुण होते. तरी पण हे गुण अंगी असलेल्या इतर लोकांहून रानड्यांविषयी विशेष हळहळ वाटण्याचे कारण हे की, त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रकार्याचे वळण लावले आणि सर्व प्रकारच्या अडचणी सोसून देशोतीच्या कार्याकरिता, उत्साहाने हाती भगवा झेंडा घेऊन नेहमी आघाडी सांभाळली. जन-समाजाला शहाणे करून ठेवण्याचा क्रम अखंड चालू ठेवला. समाजाचे गुरूत्व स्वीकारले व पार पाडले. तात्पर्य रानड्यांसारखा पुरुष इंग्रजी राज्य आल्यापासून महाराष्ट्रात झाला नाही व त्याची जागा यापुढेही भरून येणार नाही. या राज्यात जुनी सर्व कर्तृत्व, परंपरा नष्ट होऊन, लोक तेजोहीन, बलहीन, स्वहितपरायण असे झाले व महाराष्ट्र हा एक थंड गोळा होऊन पडला होता, त्या गोळ्यात प्रथम चैतन्य व उष्णता रानड्यांनी उत्पत्ती केली.''
याचा अर्थ काय? तर रानड्यांनी ज्या समाजात काम करायचे ठरवले त्यांच्याशी फटकून वागायची भुमिका घेतली नव्हती. पण समाजाला चेतना देण्याचे आणि जागे करण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले. बदल एकदम घडणार नाहीत हे टिळकही जाणून होते आणि रानडे देखील. त्यांनी आचरणात सातत्य ठेवले पण घाई केली नाही आणि सामान्यांना तुच्छ ठरवले नाही. दुर्दैवाने ती घाई आगरकरांनी केली, पण तो वेगळा विषय आहे. तशी घाई केल्याने ते काही स्युडो ठरले नाहीत. आत्ताच्या काळात जे लिबरल अर्थात "निधर्मी" समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल का? एखादा दाभोळकरांचा अपवाद सोडावा लागेल. तरी त्यांना देखील अनुभवानेच समजायला लागले असे म्हणावे लागेल. पण त्यासाठी सातत्याने ते काम करत राहीले केवळ तुच्छ वागत राहीले नाहीत. बरं असं आहे का की केवळ सेक्यूलर्स, निधर्मीं, लिबरल्सच्या बाबतीतच टिका होते? फक्त काही संस्थळावर लिहीण्यात सक्रीय असलेल्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीने, स्वतःस हिंदू म्हणवून घेतले आहे, हिंदूत्ववादी म्हणून घेतले आहे, त्यावर इथे आणि इतरत्र अनेकांनी कसले दिवे लावले आहेत (ते देखील स्युडो आयडी तयार करून!) हे सांगायला हवे का? मधे मी मिपावर येऊ शकलो नव्हतो, पण आत्ताच एक "वन नाईट स्टँडवरून" चर्चा बघितली. त्यात देखील त्याला विरोध करणे म्हणजे "आमची संस्कृती" वगैरे टोमणे आलेच आहेत. असे कशाला हा प्रश्न पडतो का? विचारावासा वाटतो का? बाकी भारतात आणि अमेरीकेत लग्नाची गरज काय म्हणणारे पण बघितले आहेत... लग्नाबाबत तुच्छ बोलणारे पाहीले आहेत. गंमत म्हणजे आता अमेरीकेत असेच लिबरल्स हे समलिंगिंना लग्नाचा हक्क मिळावा म्हणून ओरडताना देखील पाहीले आहेत! आता हे स्युडो का रिअल? (मला कोण कुणाशी लग्न करतोय/करतेय याच्याशी काही देणंघेणं नाही. तो व्यक्तीगत प्रश्न आहे आणि सर्वांना सर्व हक्क असायला हवेत असेच माझे स्वतःस लिबरल न म्हणता मत आहे!) थोडक्यात - समाजसुधारणेची गरज प्रत्येक काळातच असते. आणि तशी सुधारणा कालानुरूप होणे देखील महत्वाचे असते. पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते.
  • Log in or register to post comments

संपूर्ण प्रतिसादात खंडन

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 14:51 नवीन
संपूर्ण प्रतिसादात खंडन करण्यासारखे फारसे काही वाटले नाही. माझ्या लेखातील मुद्द्याभोवती हा प्रतिसाद/प्रतिवाद फिरत असला तरी मुळ मुद्द्यावर मौन बाळगून आहे ;) अपवादळ
पण तशी सुधारणा सुचवणारे नक्की कशी घडवू इच्छितात यावर बरेच काही अवलंबून असते
सुधारणा सुचवणार्‍यांवर ती घडवण्याचे उत्तरदायित्त्व नसावे असे माझे मत आहे. त्यांनी ती योग्य ती कृती करून घडवली तर ते निश्चितच कौतुकास्पद आहे, नुसते विचार मांडणार्‍यापेक्षा अधिक महान/थोर आहे. पण म्हणून तशी कृती करणे येनकेनकारणाने शक्य नसणार्‍यांना राईट ऑफ करू नये, त्यांचे मत विचारासाठी ग्राह्य ठरवावे (स्वीकारावे असे नाही) हा मुख्य पॉइंट आहे. एखाद्या व्यक्तीने काहीही लिहिले की "हे आले विचारजंत!" इतकाच प्रतिवाद निव्वळ त्या व्यक्तीला झिडकारतो, विचारांचा प्रतिवाद होतच नाही, तेव्हा हे वातावरण अजिबात पुरेसेही नाही आणि समाजासाठी आरोग्यपूर्णही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लेख पटला नाही

क्लिंटन
गुरुवार, 08/28/2014 - 00:01 नवीन
लेख पटला नाही.स्पष्ट लिहायचे झाले तर लेख बराच गंडलेला वाटला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेखकाचा असा दावा आहे की स्युडो या शब्दाचा अर्थ बराच व्हेग आहे.मान्य आहे.पण मग या लेखाचा डोलारा ज्या शब्दावर आधारीत आहे तो शब्द (पुरोगामी/लिबरल) पण तितकाच व्हेग नाही का?आणि तसे असेल तर ज्या आधारावर सगळा लेख आधारीत आहे त्या शब्दाचा नक्की कोणता अर्थ लेखकाला अभिप्रेत आहे हे स्पष्टपणे लिहायची गरज कशी वाटली नाही?की लेखकाला पुरोगामी/लिबरल या शब्दाचा जो काही अर्थ अभिप्रेत आहे तोच इतरांनाही अभिप्रेत आहे आणि इतकेच नव्हे तर तो अर्थ इतरांनाही मान्यही आहे असा अर्थ घ्यायचा का? लेखामध्ये जी काही वाक्ये दिली आहेत त्यावरून पुरोगामी म्हणजे परंपरा नावाच्या ’चिखलातून’ बाहेर निघावे असे वाटणारी आणि "स्टेटस कुओ" भेदणारी म्हणजे सध्या या घडीला जे मत चारचौघांचे असते त्यापेक्षा वेगळे मत असणारी मंडळी असा अर्थ अभिप्रेत असावा असे वरकरणी म्हणता येईल.तरीही पुरोगामी शब्दाची नक्की व्याख्या लेखात आढळली नाही. (उदाहरणार्थ "स्टेटस कुओ" भेदणे हे ’पुरोगामी’ पणाचे लक्षण असले तर स्टेटस कुओ भेदणारा प्रत्येक माणूस पुरोगामी म्हणता येईल का की पुरोगामी म्हणण्यासाठी अन्य काही करावे लागेल याविषयी लेखात काहीही उल्लेख नाही आणि त्या अर्थी लेखात ती व्याख्या केलेली नाही असे म्हणतो). दुसरं म्हणजे परंपरा म्हणजे चिखलच किंवा "स्टेटस कुओ" हा भेदण्याच्याच लायकीचा असतो हा दृष्टांत नक्की कुठून झाला? केंब्रिज विद्यापीठाला ८०० वर्षांची शिक्षणाची परंपरा आहे. ती परंपराही चिखल झाली का? तेव्हा महत्वाचे काय? चिखल नक्की काय आहे हे शोधणे आणि त्याचा बंदोबस्त करणे की एखादी गोष्ट परंपरेत आहे म्हणजे चिखलच आहे असे म्हणणे? मान्य आहे तथाकथित भारतीय परंपरेत (की व्यवस्थेत की अन्य कशात) चिखल म्हणाव्या अशा अनेक गोष्टी आहेत.पण भारतीय परंपरेतल्या सगळ्या गोष्टी नक्कीच चिखल नाहीत.आणि सगळा चिखल केवळ परंपरेतच आहे आणि सगळ्या नवीन गोष्टी धुतल्या तांदळासारख्या आहेत असेही नाही.मग केवळ परंपरेतल्या ’चिखलाविरूध्द’ आवाज उठविणारा तो पुरोगामी आणि इतर ठिकाणच्या चिखलांविरूध्द आवाज उठविणारापण पुरोगामीच की अन्य कोणी? याविषयीही लेखात काहीही नाही.
कोणत्याही समाजाला नवे विचार, नवी दिशा हवी असेल, समाज प्रवाही हवा असेल तर चाकोरी मोडणार्‍या नव्या विचारांची समाजाला आत्यंतिक गरज असते.स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी हल्ली अनेकदा व्यक्तीला दूर केले जाते.
यातील पहिल्या भागाशी--नव्या विचारांची गरज याविषयी फारसे दुमत नाही. तरीही ’नवे’ विचार हे केवळ ’नवे’ असतात म्हणून ते समाजाला प्रवाही बनवतील असे अजिबात नाही.तेव्हा नक्की कोणते विचार घेण्याजोगे आणि नक्की कोणते टाकण्याजोगे?हे ठरवायचे कोणी? कोणत्या निकषांवर?तेव्हा महत्वाचे काय? जे चांगले ते स्विकारणे की परंपरेतले ते टाकणे? दुसरे म्हणजे असे नवे विचार मांडणारे भारतातच कित्येक लोक होऊन गेले.अगदी अमूलच्या व्हर्गिस कुरियनपासून अण्णा हजारे, सेवा फाऊंडेशनच्या इला भट इत्यादी अनेक.इतकेच काय तर गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या गावातील समस्या ग्रामसभेच्या माध्यमातून कशा सोडविल्या हा पण एक नवा विचारच.असे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात दिसतील.यापैकी किती जणांना स्युडो लिबरल, स्युडोसेक्युलर, विचारजंत, हस्तीदंती मनोर्‍यातील मूर्ख अश्या शब्दांनी संबोधले गेले आहे?तेव्हा अशा शब्दात संभावना होणे हे पुरोगामी असल्याचे लक्षण आहे असे अपेक्षित आहे का?
पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो
ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. वर म्हटल्याप्रमाणे नवे विचार मांडणारे लोक अगदी प्रत्येक क्षेत्रात आढळतील.पण तरीही अशा सगळ्यांना स्युडो कोणी म्हणत नाही.मग कोणाला स्युडो म्हटले जाते?ज्या लोकांना असे म्हटले जाते त्यातली बरीचशी मंडळी डाव्या विचारांची असतात.आणि डावी मंडळी म्हटली की देश वगैरे कल्पना त्यांना मान्यच नाहीत.मग या मंडळींच्या समर्थनार्थ बाकी कशाचाही आसरा घेता येऊ शकेल पण इतरांवर देशद्रोहाचा आरोप नक्कीच करता येणार नाही.कारण देश हा प्रकार त्यांनीच अडगळीत काढला आहे.मग इतरांवर देशद्रोहाचे आरोप कसे करणार? कर्णाने जन्मभर धर्माची बाजू घेतली नाही तेव्हा रथाचे चाक अडकल्यानंतर मात्र त्याला धर्म आठवत असेल तर ते कसे चालेल? दुसरे म्हणजे ज्या लोकांना स्युडो म्हटले जाते त्यांच्या समर्थनार्थ हा लेख असेल तर ते नक्कीच अमान्य. स्युडो म्हटले जाते त्या अनेक लोकांमध्ये एक आहे अरूंधती रॉय.तिच्या तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना. संसदेवर हल्ला होण्याइतकी महाभयंकर घटना घडूनही त्या घटनेसाठी देशाच्या कायद्याने फाशीची शिक्षा ठोठावली आणि त्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणारे हे !! समाजाला काय डोंबलाचे प्रवाही बनवतात हे अस्तनीतले निखारे? असल्यांचे समर्थन करणे तर सोडाच यांना गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग केले तर मी मिपावर जेवढ्या सदस्यांना ओळखतो त्या सगळ्यांना पेढे वाटीन. असो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.
  • Log in or register to post comments

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 15:02 नवीन
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की हा लेख बराच गंडलेला वाटला.
आभार. अभिप्रायाचे स्वागत आहे. मुख्य आक्षेप हा आहे की "पुरोगामी" ची व्याख्या पुरेशी दिलेली नाही. हा आक्षेप मान्य आहे नी ते हेतुपुरस्सर आहे. कारण पुरोगामी म्हणजे कोण आणि त्यांचे प्रश्न असा लेखाचा मुख्य विषय नाही! तर १. व्यक्तीला बोलल्याप्रमाणे कृती करता येणे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही २. प्रय्तक्ष कृती नसतानाही व्यक्ती त्या विषयात काही विचार मांडते अशावेळी त्या व्यक्तीला राईट-ऑफ न करता तो विचार "ग्राह्य" ठरवावा. त्या व्यक्तीला राईट ऑफ करू नये! साजेशी कृती असणे हे उत्तमच! पण ती नसल्यास लगेच मत चुकिचे किंवा अग्राह्य ठरत नाही. मताचे महत्त्व हे तितकेच असते. बाकी शेवटच्या परिच्छेदातील अस्मितेने भारलेली मते म्हणून वाचनीय आहेत. प्रत्यक्षात तशी कृती करण्याचे आवाहन (गितमोच्या कॅम्पमध्ये नेऊन हजारवेळा वॉटरबोर्डिंग वगैरे) सिरीयसली नसावे अशी आशा (व बर्‍यापैकी खात्री) आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

लिबरल लोकांना नक्की गुस्सा

बॅटमॅन
गुरुवार, 08/28/2014 - 01:18 नवीन
लिबरल लोकांना नक्की गुस्सा कशामुळे येतो? एक भन्नाट फ्लोचार्ट. http://my.fakingnews.firstpost.com/2014/08/27/outrage-flowchart-for-indian-liberals-explained-with-hulk/
  • Log in or register to post comments

who cares !!

सुहास..
गुरुवार, 08/28/2014 - 01:44 नवीन
who cares !! दोन अर्थ निघतात याचे ऋषी , एक पर्वा कोणाला आणि दुसरा पर्वा करणारा ;) तुझ्या/माझ्या/याच्या/त्याच्या स्युडो असण्याचे असे अनेक अर्थ निघु शकतात ...शेवटी ज्याची त्याची ...... पुरोगामी किंवा अभिजन वर्ग हा मुठभर उच्चजातीतील किंवा उच्चभ्रुंचा अट्टाहास आहे किंवा त्यांची नाटकं आहेत, हि प्रतिमा उभी करणे हा मला देशद्रोह वाटतो >>> आणि ही गोष्ट ’हजम’ झाली नाही. >>> का ब्वा ? अश्या लोकांना स्युडो म्हटल जात नाही हे मान्य ....पण मग रघुनाथराव कर्वेंना ( ज्युनियर कर्वें ) विरोध करणारे कसे हजम झाले, त्यांना तरी कमीत कमी स्युडो म्हणायचे का ? तथाकथित ’नव्या’ विचारांनी कसला डोंबलाचा फायदा होत आहे? स्युडो म्हटले जाते स्वयंघोषित मानवाधिकारवाल्यांना >>> ही तुझी व्याख्या आहे ....हेच मानवधिकार वाले त्या दोन बहीणींना फाशी दिल्यावर फिर्याद द्यायला गेले होते .... म्हटलं ना शेवटी ज्याची त्याची व्याख्या ... मला एकच म्हणायच " गटाराचा " दुर्गंध लांबुनही येतोच ..त्याकरिता गटारात उतरावं लागत नाही , अत्तराचा मात्र पार बोटावर धरून नाकापर्यंत न्यावा लागतो ...चांगुलपण स्युडो मध्ये आहे आणि नॉन स्युडो मध्ये पण...यु कान्ट एग्नोर ईट !! ...असो ...बाकी तुझ्यासारख्या लिबरल ला उदाहरणादाखल इतिहासात शिरावं लागल, ते ही पारंपारिक , शिवाय कारण नसताना कोणाचही नावं घ्याव लागलं, याच आश्चर्य वाटल :)
  • Log in or register to post comments

अरे दुसरा आणी तिसरा पॅरा '

सुहास..
गुरुवार, 08/28/2014 - 01:45 नवीन
अरे दुसरा आणी तिसरा पॅरा ' क्लिंटन' साठी आहे
  • Log in or register to post comments

लेखाचा आशयाशी सहमत

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 08/28/2014 - 20:45 नवीन
एका आव्हानात्मक विषयाला हाती घेतल्याबद्दल अभिनंदन. चर्चा वाचतोय.
  • Log in or register to post comments

लेख काहि पटला नाहि.

अर्धवटराव
Fri, 08/29/2014 - 05:54 नवीन
पुरोगामित्वाची उगाच भलावण आणि परंपरेच्या नावे कर्कश्य कंठशोक असं काहिसं लेखाचं स्वरुप वाटतय. पुरोगामित्वासारखा भंपक अहंकार आणि आंधळा परंपरावाद यात फार डावं - उजवं करण्यासारखं काहि नहि. माणसाचं कल्याण पुरोगामित्वं अथवा परंपरावादात नसुन प्रकाशगामित्वात आहे. हा प्रकाश परंपरेतुन बॅक लाईट सोर्स प्रमाणे आलेला असो किंवा भविष्याच्या अचुक अंदाज बांधण्याच्या शहाणपणातुन... त्याला सन्मुख होणं हाच एकमेव कल्याणमार्ग आहे. असो.
  • Log in or register to post comments

व्यक्ति विषेश स्युडो असेल तर

अविनाशकुलकर्णी
Fri, 08/29/2014 - 10:00 नवीन
व्यक्ति विषेश स्युडो असेल तर समजु शकतो..कारण विचारा प्रमाणे वागणे त्याला जमेलच असे नाहि..मात्र संस्था..सरकार असेल तर पंचाईत होते..आपल्या कडे नेमके तेच झाले आहे..मुस्लमानाना न्याय वागणुक हिंदुना वेगळी..मंदीरे सरकारने ताब्यात घेतली पण मशीदी चर्चला हात लावण्याची हिम्मत नाहि.. हिंदुंचा अक्रोश हि प्रतिक्रिया असते..क्रिया न समजावुन घेता त्याना झोडपत रहाणे व विवेकाचे धडे देणे या मुळे स्युडो शब्द पोप्युलर झाला..आता लोकसंख्या १५० कोटीच्या घरात पोहोचत असताना लढे त्रिव्र होत जाणार...
  • Log in or register to post comments

स्युडो, पुरोगामी व प्रतिगामी

अन्या दातार
Fri, 08/29/2014 - 15:40 नवीन
स्युडो, पुरोगामी व प्रतिगामी याची व्याख्या कशी करता यावर पुढे बोलणे उचित ठरेल. तरी तोंडाच्या वाफेला कृतीची जोड दिल्यास परिणाम साधता येतो असे माझे मत आहे. नाहीतर "काशीस जावे नित्य वदावे" हे आहेच. :)
  • Log in or register to post comments

प्रतिसादकांचे आभार. वेळ

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 12:13 नवीन
प्रतिसादकांचे आभार. वेळ मिळाताच एकेकाला उत्तरे देतो. इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की आपल्यामते एखादी व्यक्ती (जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. मात्र, त्या व्यक्तीला मत मांडता येण्यासारखे वातावरण हवेच हवे - जे त्या व्यक्तीवर बोट दाखवून त्यांच्यावग व्यक्तिगत टिपणी केल्याने राखले जाते असे मला वाटत नाही (स्युडोसेक्युलर काय किंवा स्युडोलिबरल काय किंवा तत्सम इतर विषेशण काय हे त्या व्यक्तीला लावलेले असते) दुसरे असे की विचार मांडणार्‍यावर कृती करण्याचा भार टाकणे. कित्येक थोरांनी कृतीसह विचार मांडले जे चांगले आहे, पण प्रत्येक विचार मांडणार्‍याने त्या व्यक्ती इतके थोर व्हावेच हा अट्टाहास का? येनकेनकारणेन नाही जमत कृती करायला म्हणून विचाराला काहीच महत्त्व नाही? इखाद्याने मांडावा विचार तो अनेकांना रुचला / दुसर्‍या एखाद्याला पटला/रुचला व त्याला शक्य असेल तर ती व्यक्ती करेल कृती. निव्वळ साजेशी कृती नाही म्हणून व्यक्तीला स्युडो ठरवत झटकून टाकल्याने त्या व्यक्तीचे नुकसान खचितच नाही, झालेच तर ते आपले आहे कारण ती व्यक्ती पुन्हा मते मांडायला जाईलच असे वातावरण आपण देत नाहियोत. पुन्हा एकदा मत पटले तर विचार करा, नाही पटले तर विरोध करा किंवा दुर्लक्ष करा, मात्र "कोणालाही" (अगदी डाव्या टोकाच्या अरुंधतींपासून ते उजव्या टोकाच्या ओसामापर्यंत) मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. वर उदा. दिलेल्या टोकाची मंडळी इतकी निर्ढावलेली असतात की तुमच्या स्युडो लेबलांना त्यांना फरक पडत नाही, मात्र ज्यांचे विचार खरंच विचार करण्यासारखे असतात ते मात्र या गदारोळामुळे गप्पच रहाणे पसंत करतात हेच तर दुर्दैव आहे :(
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

पैसा
Mon, 09/01/2014 - 14:25 नवीन
पुरोगामी या शब्दाची नक्की व्याख्या काय? जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात, त्यांच्यामुळेच समाज पुढे जातो हे नक्की खरेच आहे का? त्याहून बेसिक प्रश्न. समाज पुढे जातो म्हणजे काय? ते कोणी ठरवायचं? जे जे जुने ते नेहमी टाकाऊच असते का? इथे नवीन विचार आणणार्‍याला नेहमी त्रासच दिला जातो, त्याला नावे ठेवली जातात असे एक जनरलायझेशन दिसत आहे. जे सदासर्वकाळ तसे असेलच असे नव्हे. सगळा इतिहास पाहिला तर अतिप्रचंड बदल हळूहळू घडत आलेले दिसतात. ज्याला समाजाला बदलायचे आहे, तो वेळप्रसंगी माघार घेऊन किंवा वरकरणी आपण इतर ९९ लोकांचे ऐकतो आहोत असे दाखवून जास्तीत जास्त लोकांना बरोबर कसे घेता येईल याचा विचार करतो. आमच्यासारखे काही लोक समाजाला बदलणे हे महाकर्मकठीण आहे, आपण स्वतःपुरता विचार करावा असे म्हणतात. असे लोक कोणत्या क्याटेगरीत बसतात? बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे. सहसा लोक बदल फार सावधपणे स्वीकारतात. आहे ती स्थिती बदलायची फार कमी लोकांची तयारी असते. साध मांजर किंवा कुत्रे सुद्धा जागेवरून उठवलं तर गुरगुरतं. मग माणूस तर थोडा तरी विरोध करणारच! त्या विरोधाचे रूपांतर स्वीकारात कसे करावे याचा या विचार जो समाजाला बदलू पहातो त्याने केला पाहिजे. विरोधाला पुन्हा विरोध केला, त्यांना शिव्याशाप दिले तर ज्या सामान्यांचा समाज बनलेला आहे ते "मर तिकडे!" म्हणणारच. ही अगदी सर्वसामान्य प्रवृती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमती!

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 14:41 नवीन
बरे एखादा माणूस एका बाबतीत पुरोगामी आणि एका बाबतीत प्रतिगामी असू शकतो. तिथे दर वेळी काळेपांढरे वेगळे करता येईल असे नव्हे.
अतिशय म्हणजे अतिशयच सहमत आहे. नेमक्या याच कारणासाठी व्यक्तीवर हा काय स्युडोयंव, हा काय विचारजंत, हा काय अमुक असे शिक्के न मारता मत ग्राह्य ठरवावे. ती व्यक्ती एरवी जी कृती करते ती योग्य की अयोग्य आहे याचा प्रभाव मत जोखताना करू नये. त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्या व्यक्तीच्या वागण्यात

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 16:42 नवीन
त्या व्यक्तीच्या वागण्यात विरोधाभास असेल तर तो दाखवून द्यावा, त्यावर गरज असल्यास टिका करावी मात्र त्या व्यक्तीस साईट ऑफ केल्याने त्या व्यक्तीशी संवादाचा मार्ग बंद होतो. अशी व्यक्तीगत हेटाळणी करून वेगवेगळे विचार व्यक्त करणार्‍यांशी संवादाचे मार्ग बुजवण्याने समाजाचा फायदा होत नाही हे तुम्हाला मान्य असेलच!
विरोधाभासावर टीका केली की व्यक्तिगत व्यक्तिगत म्हणत क्यँव क्यँव करत चर्चा बंद करणारेही हेच लोक असतात. अशा लोकांचे तोंड बंद करण्यात समाजाचा प्रचंड फायदा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

(जसे वरती क्लिंटन यांनी

प्रसाद१९७१
Mon, 09/01/2014 - 16:33 नवीन
(जसे वरती क्लिंटन यांनी अरुंधती रॉय यांचे उदा दिले आहे. तीच असे नव्हे कोणतीही व्यक्ती) कितीही व काहीही मत मांडत असेल तर त्याचा प्रतिवाद करावा किंवा तितक्याही लायकीची आर्ग्युमेंट वाटली नाही तर सरळ दुर्लक्ष करावे. >>>>>> दुर्लक्ष करावे हे बरोबरच आहे, पण तुम्ही हे ही लक्षात घेतले पाहीजे की ह्या अश्या ( अरुंधतीं, अनंतमुर्ती वगैरे ) थोथांड पुरोगामी आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या आड येणार्‍या लोकांचा मिडीया वर ताबा असतो. ही मंडळी प्रचंड vocal असतात आणि सगळीकडे छापुन आणतात आणि दिसतात. त्यामुळे समाजाचे मतही त्यांच्या सारखे आहे असे वाटायला लागते. सरदेसाई आणि कंपू ने जसे गुजरात दंगली बद्दल वाट्टेल तसे वार्तांकन केले पण कधी तोंड उघडुन गोध्र्याच्या रेल्वे जाळण्याबद्दल काही बोलले नाहीत. एक मुलगी अतिरेक्याबरोबर फिरते आणि एन्काउंटर मधे मारली जाते तर ती अतिरेक्याबरोबर काय करत होती हे बोलत नाहीत पण सारखी मारली गेली मारली गेली म्ह्णुन बोंबलत असतात. ह्यांचे फंडीग सगळे मध्यपूर्वेतुन होत असते ( Via Europe, US )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा

प्रसाद१९७१
Mon, 09/01/2014 - 16:36 नवीन
मत मांडण्याचे धैर्य आणि इच्छा जागृत राहिल असे वातावरण आपण ठेवलेच पाहिजे. >>>>> टीव्हीवर चर्चा पहा. ही चोर लोक दुसर्‍या कोणाला बोलून तरी देतात का ते? नुस्ते भुंकत असतात. ह्या पुरोगाम्यांना मत स्वातंत्र्य पाहीजे म्हणजे जर ते मत "त्यांचे" असेल तर चालेल नाहीतर आवाज बंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अरुंधती रॉय

होकाका
Fri, 09/05/2014 - 19:05 नवीन
अरुंधती रॉय खोटारडी असे माझे "पुरोगामी" मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

त्या व्यक्तीच्या विचारांचा

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 12:45 नवीन
त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी करण्याची धमक नसलेले विचारषंढ लोक मग त्या व्यक्तीलाच झाडून टाकायला हा 'स्युडोमार्ग' अवलंबतात.
आचारषंढ असण्यापेक्षा विचारषंढ असलेले कधीही बरे!!
  • Log in or register to post comments

अजून एक राहिले

ऋषिकेश
Mon, 09/01/2014 - 14:11 नवीन
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का? मात्र हा विरोधाभास असूनही, माझ्या मते त्यांचे त्या त्या क्षेत्रात कृती न करता निव्वळ विचार व्यक्त करणे बरोबरच आहे, नव्हे त्यासाठीच पोषक वातावरण हवे. दारूड्याने दिलेले दारुबंदीवरील विचार तो केवळ दारुडा आहे म्हणून ऐकूनच न घेता स्वतःचे नुकसान मी का करून घ्यावे? त्याला स्वतःला नसेल जमत प्रमाणाबाहेर दारू पिणे थांबवणे पण म्हणून प्रमाणाबाहेर दारू पिणे वाईट हे मत मी का अग्राह्य ठरवावे?
  • Log in or register to post comments

प्रत्येक विचाराला कृतीची जोड

बॅटमॅन
Mon, 09/01/2014 - 16:20 नवीन
प्रत्येक विचाराला कृतीची जोड हवी तरच तो विचार ग्राह्य समजणारे, स्वतः मात्र कित्येक विषयांवर त्या त्या क्षेत्रात अजिबात कृतीची जोड नसताना आपापली मते देत असतात / विचार मांडत असताना दिसतात हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?
"समाजात यँव पायजे नि त्यँव पायजे" छाप विचारांना हे विशेषेकरून लागू आहे इतके सांगतो. बाकी चालू द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे

अन्या दातार
Mon, 09/01/2014 - 15:05 नवीन
इथे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पुरोगाम्यांची भलामण करणे मंडळींना खपत नाहीये.
तुमच्या 'विचारांना विरोध करणारे ते प्रतिगामी का? का अश्या प्रतिगाम्यांना (पुरोगाम्यांना विरोध करणारे ते प्रतिगामी या अर्थाने) 'त्यांचे विचार' मांडायची मुभा नाही? वर पैसातै म्हणतात त्याप्रमाणे नवीन विचारांना विरोध हा होणारच. बदल हा हळूहळू असावा. १०० जणांमध्ये एकाने नवा विचार मांडला तर ९९ लोक विरोध करणार हे ओघानेच आले. या ९९ लोकांपुढे तुमचे मत मांडायची क्षमता 'फक्त विचारांपेक्षा' कृतीतून जास्त येते हेच मत इथे प्रतिसाद देणार्‍या लोकांचे असावे असा अंदाज आहे. जर विचारांची प्रॅक्टीकॅलिटी लोकांपर्यंत पोहचली नाही, तर लोकांनी बदल का स्वीकारावा? अन ही प्रॅक्टिकॅलिटी आचारातून प्रतीत होणार नाही असं धागाकर्त्यास वाटते का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा