मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचता वाचता वाढे.....

पुस्तकमित्र · · जनातलं, मनातलं

वाचने 232373 वाचनखूण प्रतिक्रिया 147

आतिवास Mon, 06/30/2014 - 22:21
कल्पना चांगली आहे. पण फक्त 'कादंबरी'पुरतं विश्व मर्यादित करण्याचा उद्देश समजला नाही. महिनाभरात जे काही वाचलं त्यावर लिहायचं असं ठरलं असतं तर जास्त सोपं झालं असतं लिहायला.

In reply to by आतिवास

पुस्तकमित्र Tue, 07/01/2014 - 09:44
ही फक्त सुरुवात आहे. साहित्यप्रकाराच्या विविध प्रकारांना स्पर्श करतच ही मालिका पुढे पुढे सरकत राहणार आहे. अर्थात आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेच.

सुरुवात म्हणून कादंबरीचे नाव - आनंदी गोपाळ लेखक - श्री. ज. जोशी भारताबाहेर जाऊन पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेल्या डॉ. आनंदी बाई गोपाळ जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. स्त्रियांनी शिक्षण घेणे हा सुद्धा जेव्हा गुन्हा समजला जात होता, त्या काळात नवऱ्याच्या हट्टामुळे प्राथमिक शिक्षणापासून ते पुढे वैद्यकीय पदवी मिळेपर्यंतचा प्रवास यात वाचायला मिळतो. गोपाळरावांच्या विक्षिप्तपणाचा त्यांना झालेला त्रास, तरीही जिद्दीने पूर्ण केलेले शिक्षण आणि दुर्दैवाने या सगळ्याला तोंड देताना ओढवलेला शेवट. पुस्तक वाचून आनंदी बाईंच्या प्रतीचा आदर अधिक दुणावतो. त्या काळातले स्त्रियांचे समाज जीवन, संघर्ष, गोपाळ रावांचे काळाच्या पुढचे विचार आणि तरीही अनेक बाबतीत दिसणारा दुराग्रहीपणा, सगळे काही सुन्न करून टाकते. मला आवडलेल्या पुस्तकांपैकी एक.

In reply to by पैसा

मस्त कलंदर गुरुवार, 07/03/2014 - 11:26
अगदीच काल्पनिक नसली तरी बरेचसे प्रसंग खोटे आहेत. अंजली कीर्तने यांनी त्यांच्या आनंदीबाई: काळ आणि कर्तृत्व या कादंबरीत ससंदर्भ लिहिले आहे.

In reply to by मस्त कलंदर

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 14:33
या कादंबरीविषयी माहिती नव्हती. आनंदीबाईंच्या व्यक्तिरेखेविषयी अजूनही वाचायला आवडेल. त्यामुळे कधी जमल्यास पुन्हा दोन्ही वाचेन. धन्यवाद.

शुचि Mon, 06/30/2014 - 23:23
"दॅट क्वेल रॉबर्ट" नावाचं १००-१५० पानी, छोटेखानी पण जबरदस्त पुस्तक वाचते आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पुस्तक आहे. अर्धे वाचून झाले आहे. डॉक्टर अन त्यांच्या पत्नी मिल्ड्रेड यांनी जंगलमय्/रानटी भागात घर घेतले. दोघांना पक्षी नीरीक्षणाची अतिशय आवड. एके दिवशी पहातात तो काय क्वेल मादी व क्वेल(quail) नर दोघे खुरडत खुरडत, जखमी असल्यासारखे चालले आहे. ताबडतोब त्यांच्या लक्षात आले की निसर्गातील पालकांच्या अतिव शौर्याचे उदाहरण ते पहात आहेत. आपल्या पिलांवर लक्ष जाऊ नये म्हणून हे दोघं क्वेल स्वतःकडे लक्ष वेधून घेत होते. मग डॉक्टर व मिल्ड्रेड सुरक्षित अंतरावर गेले अन क्वेल आई तिच्या १२ पिलांना घेऊन गेली. पण गंमत ही झाली की क्वेलच्या चिमुकल्या व व्यवस्थित लपवलेल्या घरट्यात त्यांना एक अंडे सापडले. ते अंडे त्यांनी दिव्याच्या ऊबेत्/प्रकाशात ठेवले असता ते ऊबले, फुटले व इवलसं ओलं बंबलबी च्या आकाराचं पिलू अंडं फोडून बाहेर आलं. १५ मिनीटात ते पटापट सुकलं अन आक्रोडाच्या आकाराचं दिसू लागलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं बॉबी व्हाईट. पण मग अजून भारदस्त नाव हवं म्हणून ते "रॉबर्ट" या नावात बदललं. मग या दांपत्याने रॉबर्ट्पाशी लहान वाटुलीत दाणा-पाणी ठेवले.आता कोणाला वाटेल की पिलाला जबरदस्तीने खायला घातलं असेल पण नाही हे पिलू ८ तासानंतर स्वतःचे स्वतः खाऊ-पीऊ लागले. फक्त एकदाच त्याला मदत लागली ती म्हणजे त्याची चोच पहील्यांदा पाण्यात बुडवायला. मग मात्र ते स्वावलंबी झाले. मग त्या पिलाचे स्वभाववैशिष्ट्य, गुणविशेष सगळे पुस्तकातून उलगडू लागतात अन एका क्वेलला किती अक्कल असते, माया असते, लळा असतो इतकेच काय आवडीनिवडी/ पसंत-नापसंत असते ते वाचून थक्क व्हायला होते. हळूहळू रॉबर्ट्ला सुंदर ठीपक्या ठीपक्यांची पिसे आली, तो वयात आला, वगैरे मोहक्/रोचक वर्णने येतात. पुस्तक अक्षरक्षः खाली ठेववत नाहीये. अ‍ॅमेझोनवर ६६ - ५ चांदण्या मिळालेले हे पुस्तक नशीबाने ग्रंथालयात "चकटफू" विभागात मिळाले. बसमध्ये, घरात, ऑफीसात लंच टाइम मध्ये वाचन सुरु आहे.

In reply to by आतिवास

एस Wed, 07/02/2014 - 19:42
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमॅझॉन दोन्हींवर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर महाग आहे. दुवे - http://www.flipkart.com/that-quail-robert/p/itmczyn6bphxd6xu?pid=9780060812461&otracker=from-search&srno=t_1&query=that+quail+robert&ref=ce523a93-e6e0-440c-bf35-4fa5130ff2cb http://www.amazon.in/That-Quail-Robert-Margaret-Stanger/dp/006081246X/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1404310224&sr=8-1&keywords=that+quail+robert

योगविवेक Tue, 07/01/2014 - 00:44
... वाचता वाचता वाढे... मित्रांनो, नुकतीच अंधार छाया कादंबरी वाचली.आवडली. लेखक - मिपाकरांच्या परिचयाचे. शशिकांत ओक. विषय - अर्थात ऑकल्ट सायन्सेस... ही छोटेखानी कादंबरी ईबुक म्हणून उपलब्ध. पाने फक्त ७०-७५. समर्पक मुखपृष्ठ संकल्पना... कादंबरीतील अंधार छायेला रेखाटणारी... कादंबरी सत्य घटनेवर आधारित असा लेखकाचा दावा. त्याला पूरक त्यातील पात्रे व व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कशा आहेत त्यांचे फोटो व सध्याचे जीवनयापन या बाबी कादंबरी वाचकांना नाविन्यपुर्ण आहेत. बलस्थाने- १. बोली भाषेतील घरगुती संवाद, २. आत्मकथन शैलीमुळे व्यक्तीरेखेच्या मनातील संवादातून कथानक पुढे सरकवायची लेखकाची खुबी. ३. विचित्र घटनांचे आवेग, त्यातून फुलणारे नाट्यमय प्रसंग हाताळताना निर्माण भावनांचा कल्लोळ. ४. या अकल्पित घटनांमागील कार्यकारण भाव शोधणारी दादा व्यक्तिरेखा अनेक अंगांनी पुढे येते . ५. जपसाधना करणे ही फावल्या वेळातील म्हातारपणचा विरंगुळा नसून योग्य प्रकारे केल्यास अनाकलनीय शक्तींचा यशस्वी प्रतिकार करता येतो याची प्रचीती देणारे विचार व अनुभव श्रद्धा आणि सबूरीला बळकटी देतात. ६. लेखकाचे मनोगत बरेच काही व्यक्तिगत जीवना बद्दल सांगून जाते. दुर्बल स्थान - सुरवातीला संथपणा व पात्रांची ओळख गोंधळात टाकणारी. यावर तोड म्हणून लेखकाने पात्रांची ओळख मनोगत प्रस्तावनेत करून दिली आहे. रंजक व विचार करायला लावणारी वैशिष्ट्य पूर्ण कादंबरी...

अर्धवटराव Tue, 07/01/2014 - 10:06
गिरीश कुबेरांचं "युद्ध जीवांचे"... तसं बरच काहि सांगता येईल पुस्तकाबद्दल. एका वाक्यात सांगायचं तर बारुदच्या ढिगावर बसुन मक्याची कणसं भाजत बसणार्‍या आजच्या जगाची कहाणी आहे ति. जैवीक अस्त्रांचं संशोधन, गेल्या शतकभरातला त्यांचा वापर, अगदी गल्लीबोळातल्या दादा लोकांपर्यंत त्यांचा वापर, रासायनीक युद्धं व प्रदुषण... सर्वच एकदम खतरनाक.

आतिवास Tue, 07/01/2014 - 16:31
ही छोटेखानी (फक्त ६३ पानं) कादंबरी वाचून झाली. मूळ कादंबरी "नग्न रुख" (ओ.पी. शर्मा 'सारथि') डोगरी भाषेत आहे. इंग्रजी अनुवाद श्री. शिवनाथ यांनी केला आहे. या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत (कादंबरीमधली व्यक्तिरेखा). जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन.. विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही. 'राग दरबारी' या माझ्या अत्यंत आवडत्या हिंदी कादंबरीबद्दल मी यापूर्वी इथं लिहिलं आहे. बाकी अजून सांगण्याजोगं पुष्कळ आहे - नंतर सांगते :-)

प्रचेतस Tue, 07/01/2014 - 16:41
जैत रे जैत.. गोनीदांच्या कर्नाळा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवरील ही छोटेखानी पण तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर. ठाकरांच्या जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन गोनीदांनी आपल्या चित्रदर्शी शैलीत सादर केले आहे. नाग्या, चिंधी हे कथानायक्/नायिका तर अक्षरशः मनावर गारूड करून राहतात. ह्या कादंबरीतला एक सुंदर उतारा देतो. पावसकाळातल्या कर्नाळ्याचे बदललेल्या दर्शनाचे वर्णन करत असताना गोनीदा कसे आपल्या लेखणीचेही सौंदर्य प्रकट करतात ते पहा. हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गंगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

In reply to by प्रचेतस

सागर Mon, 07/07/2014 - 00:19
अतिशय सुंदर प्रकटन वल्ली मित्रा
तितकीच प्रभावी कादंबरी. चित्रपटापेक्षा तर कितीतरी सुंदर.
याबद्दल पूर्ण सहमत. आकार छोटा असूनही कादंबरी जे चित्र वाचकांसमोर उभे करते ते खरोखर अफलातून आहे. चित्रपटही सुंदर झाला आहे, पण वाचनानंद जास्त सुंदर आहे.

In reply to by सागर

कवितानागेश Mon, 07/07/2014 - 09:22
चित्रपटात फक्त स्मिता पाटील असल्यानी तो बघवतो, असं माझं टोकाचं मत आहे. ती बरोब्बर 'चिन्धी' दिसते. बाकीचे सगळे 'शहरी' दिसतात. आपण 'ठाकरं' बघतोय असं वाटत नाही. कादंबरी सुंदरच आहे. कधीही हातात घेउन कुठूनही वाचायला सुरुवात करता येते.

Gayatri Muley Wed, 07/02/2014 - 11:10
हर्षदा भुरे यांची अबोल नात ही एक अतिशय सुंदर मनोरमा प्रकाशनाची कादांबरी. 100-150 पानी च असेल, पण मनाला भावून टाकनारी...!!!! मी तर हातात घेतली अन् 5-6 तासात संपवून टाकली होती... तुम्हाला ही मिळाली तर नक्की वाचा....

In reply to by Gayatri Muley

आतिवास Wed, 07/02/2014 - 19:33
हं! मराठीतले नवे लेखक-लेखिका फारसे माहिती नसतात आजकाल मला. त्यामुळे हे नाव नवे आहे माझ्यासाठी!

विकास Wed, 07/02/2014 - 19:50
कादंबरी विषय असल्याने गंगाधर गाडगीळांनी लिहीलेली "दुर्दम्य" ही चरीत्रात्मक लोकमान्य टिळकांवरील कादंबरी आठवली. दोन-तिनदा तरी वाचलेली आहे. प्रभावी लेखन आणि संशोधन/अभ्यासावर आधारीत आहे. दोन खंडात आधि मिळायची. मध्यंतरी अमेरीकेत येताना नव्याने एकाच पुस्तकात, ते देखील हार्डकव्हर मधे मिळाल्याने घेऊन आलो. नंतर पाहीले तर मधली काही पाने कोरी! :( दुसरी कादंबरी: "यज्ञ" - भा.द.खेर आणि शैलजा राजे यांनी एकत्रित लिहीलेली सावरकरांवरील चरीत्रात्मक कादंबरी. आठवते त्या प्रमाणे, सावरकरांच्या अखेरच्या काही वर्षांमधे त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यावर आधारीत "आत्मकथन" स्टाईल मधे लिहीलेली कादंबरी आहे. दोन्ही वास्तवाला धरून आहेत.

विकास Wed, 07/02/2014 - 20:06
गेल्या काही वर्षात वाचलेली एक कादंबरी म्हणजे, "हंगर गेम्स"! लेकीच्या आग्रह केला म्हणून वाचली. वयात येणार्‍या मुलांना थ्रिलर वाटावी अशी कहाणी ज्यावरचा चित्रपट कदाचीत तुम्ही पाहीला असेल. पण एकंदरीतच हिंसा अंमळ जास्तच आणि अतिरंजीत वाटली. पण विशेष अर्थ न काढता, कल्पनाविष्कार म्हणून चांगली आहे. विज्ञान कादंबरी मालीका म्हणून आयझॅक अ‍ॅसिमोव्हची "फाउंडेशन" पुस्तक सांगेन. सायको हिस्ट्री, रोबोटीक्स अशा संकल्पना मांडत मांडत शेवटी "आपण सगळे एक आहोत" (वसुधैव कुटुंबकम) मानणार्‍या "गया" नामक तत्वज्ञानापर्यंत जाणारी कथा वाचण्यासारखी आहे. या लेखात मिपावरच अधिक लिहीले होते. "violence is the last refuge of the incompetent" हे त्यातले एक रोचक वाक्य. (त्यावर आधारीत नंतर "intellectual violence is the last refuge of the intellectually incompetent" असे म्हणले गेले. ;) आर्थर सी क्लर्कचे २००१ ए स्पेस ओडीसी पण वाचले नसल्यास अवश्य वाचा. स्पेस एक्स्प्लोरेशनच्या आधीचे कल्पनाशक्तीवर केलेले स्पेस एक्स्प्लोरेशन, महासंगणक हॅल ("HAL") आणि शेवटी कुठेतरी जन्म - मृत्यूचे चक्र मानण्याकडे वळलेले तत्वज्ञान वाचताना एकाकीपण येते. चित्रपट पहाताना देखील असेच होते.

In reply to by आदूबाळ

विकास Wed, 07/02/2014 - 20:29
हिचहायकर्स गाईड टू द गॅलेक्सी हे अजून वाचायचे राहीले आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! :) अर्थात त्याची आणि फाउंडेशनची तुलना करू इच्छित नाही.

In reply to by एस

एस गुरुवार, 07/10/2014 - 14:11
'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्'

     अरूंधती रॉय यांची ही एकोणिसशे सत्त्याण्णव सालची मॅन बुकर पारितोषिक विजेती इंग्रजी कादंबरी.

TheGodofSmallThings     कादंबरीतील मुख्य घटना घडतात १९६९ साली. पण जेव्हा कादंबरीतील पात्रांमधील दोन जुळ्या भावंडांपैकी 'राहेल' वयाच्या एकतिसाव्या वर्षी 'अयमेनम हाउस' या तिच्या आजोळच्या घरी परत येते तेव्हा कादंबरीची सुरुवात होते. राहेल आणि तिचा अठरा मिनिटांनी मोठा असलेला जुळा भाऊ 'एस्था' यांच्याभोवती आणि त्यांच्या भावविश्वात घडत राहणार्‍या छोट्यामोठ्या गोष्टींची दोलायमान गुंफण लेखिका तिच्या वाचकांभोवती विणत राहते. त्या दोघांच्या आणि प्रामुख्याने राहेलच्या सात-वर्षे-वयाच्या संवेदनशील नजरेतून आपल्यासमोर कादंबरीचा पट उलगडत जातो.

     पण असे असले तरी या कथानकाचा कर्ता प्रथमपुरुषी नाही. लेखिका एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे फ्लॅशबॅक, लांबलेली उपकथानके, लहान मुलांना असते तेवढी समज आणि त्यातून त्यांना त्यांच्या निरागस नजरेने दिसणारे कठोर जग, त्यातून त्यांनी आपल्या परीने स्वतःच शिकलेले शहाणपण, तथाकथित मोठ्यांचा तितकाच दांभिक व्यवहारीपणा, भारताचा जातिव्यवस्थेच्या, स्पृश्यास्पृश्यतेच्या कठोर सामाजिक वास्तवाची आणि राजकीय-आर्थिक बदलांची सरमिसळ, त्यात होरपळणारे निर्दोष समाजघटक, वसाहतवादी इतिहासातून स्वातंत्र्यात येताना अ‍ॅन्ग्लोफाइल उच्चभ्रू वर्गाला भेडसावणारा त्रिशंकू सिंड्रोम, निसर्गाची मुक्त अर्थव्यवस्थेत येताना झालेली वाताहत आणि कादंबरीतील पात्रांच्या जीवनाच्या अवमूल्यनाशी याचा दिसणारा समांतरपणा या सगळ्या कथाबीजांचा, पात्रांचा, पार्श्वभूमीचा आणि लेखनतंत्राचा वापर करून काळाच्या पटलावर पुढेमागे तिच्या लेखणीचे स्वैर फटकारे मारीत राहते...

     कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत ही दोन जुळी भावंडे. त्याबरोबर कादंबरीत येणारी विविध पात्रे त्यांच्या अनावृत्त वृत्ती-प्रवृत्तींसह आणि कथानकातील घटनांच्या त्यांच्यावरील परिणामांसकट वाचकाला पदोपदी भेटतात. एस्था आणि राहेल यांची घटस्फोटीत तरूण आई 'अम्मू', त्यांचे रागीट आजोबा व सहनशील आजी, त्यांचा ऑक्सफर्डवरून शिकून परत आलेला आणि आजीचा व्यवसाय सांभाळणारा मामा 'चाको', त्याची पूर्वाश्रमीची इंग्लिश पत्नी 'मार्गारेट' आणि गोरीपान मुलगी 'सोफी', अविवाहित राहिलेली आणि त्यांच्याशी फणकार्याने वागणारी त्यांच्या आईची आत्या 'बेबी कोचम्मा', पोलिस निरीक्षक आणि मार्क्सिस्ट नेता अशी माणसे आणि सर्वात महत्त्वाचा या सगळ्यात त्यांच्याशी प्रेमळपणे वागणारी एकमेव व्यक्ती अस्पृश्य कामगार 'वेलुथा'.

     दारुड्या नवर्‍याला सोडून परत आलेली अम्मू आपल्या दोन मुलांसकट तिच्या माहेरी रहायला येते. तिच्या रागीट बापाला आणि आत्याला ते आवडलेले नसते. याचा परिणाम म्हणून त्यांचे अयमेनम हाउसमधील स्थान नेहमीच दुय्यम राहणार असते. अम्मूची अविवाहित आत्या बेबी कोचम्मा हिने कधी काळी 'नन' बनण्याचा प्रयत्न केलेला, पण त्या निर्णयामागे देवाची भक्ती नसून तिला तेव्हा भेटलेला कुणी फादर मुलिगन आणि तरूण नवोमीचे त्याच्याकडे आकर्षित होणे असते. हा प्रेमभंग नंतर तिचे कठोर व्यक्तिमत्त्व बनण्यास आणि अम्मूच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणार असतो का? की त्यांचा मामा चाको आणि त्याचा विक्षिप्त गर्विष्ठपणा? चाको ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकतानाच एका इंग्लिश वेट्रेसच्या, मार्गारेटच्या प्रेमात पडलेला असतो. पण मार्गारेटच्या पालकांना तिने एका काळ्याशी, भारतीयाशी लग्न करावे हे आवडलेले नसते. पण हे लग्नही जास्त टिकत नाही. चाको आणि मार्गारेटच्या मुलीच्या - सोफीचा जन्मानंतर ते विभक्त होतात. मार्गारेट गरोदर असतानाच दुसर्‍याच्या प्रेमात पडलेली असते. वैवाहिक आणि शैक्षणिक अपयश पदरात घेऊन चाको भारतात परततो ते घरचा लोणची बनवण्याचा व्यवसाय सांभाळायला. आता तो एक श्रीमंत उद्योजक म्हणून आपल्याला भेटतो. इकडे इपे कुटुंबाचा परंपरागत वृद्ध नोकर वेल्ल्या पापेन आणि त्याचा तरूण मुलगा वेलुथा हे त्यांना जातिव्यवस्थेने मिळालेली अस्पृश्यता आणि सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील खालचे स्थान सांभाळत जगत असतात. वेलुथा काहीसा बंडखोर आहे. तो मार्क्सवादी असल्याचा बेबी कोचम्माला आणि इन्स्पेक्टरला संशय आहे. त्यामुळे बेबी कोचम्माला वेलुथाबद्दल अनामिक भीती वाटतेय. तीच भीती जी सामर्थ्यवान घटकाला दुर्बल घटकांबद्दल सतत वाटत राहते, दुर्बल पुढेमागे सबल होऊन त्यांची सत्ता उलटून देतील अशी भीती. हीच भीती पुढे वेलुथाला आणि तो प्रेम करत असलेल्या जुळ्या भावंडांना व त्यांच्या तरूण आईला उद्ध्वस्त करणार असते का?

     त्या रात्री काय घडले? घुसमट आणि अन्याय यांपासून कुठले जीव पळू पाहत होते? कोणाच्या डोळ्यांनी अशी स्वप्ने पाहिण्याचे धाडस केले ज्या स्वप्नांना इतिहासाच्या नियमचौकटींची मान्यता नव्हती? कुठले चिमुकले हात त्या रात्री बोट उलटल्यावर अनोळखी पाण्यावर परत आले नव्हते? त्या अंधार्‍या झाडीत कोणाच्या डोळ्यांनी एक गुन्हा पाहिला होता ज्या गुन्ह्याचे साक्षीदार होण्याचे अपील परिस्थितीच्या न्यायव्यवस्थेने त्यांना झिडकारले होते? लहानग्या, शहाण्या एस्थाने उरलेल्या आयुष्यभर अबोलपणे वावरावे असे त्याला काय बोलायला लावले गेले साक्षीदाराच्या कठड्यात?

     गुन्हा काय होता? कोणी केला होता? कोणाला शिक्षा झाली आणि कोण मेले त्या रात्री?

 

     रॉय यांची लेखणी परंपरेने चालत आलेली लेखनाची चौकट नाकारते, उलटून लावते. त्यांची भाषा कधी अल्लड निरागसतेने कर्मठ वाचकांना त्रास देत व्याकरणाचे-शुद्धलेखनाचे नियम तोडते, तर कधी स्थितप्रज्ञाच्या गांभीर्याने इतिहासातून उतरलेले धागे विणत मानवी आयुष्याचा त्यासमोरचा क्षुद्रपणा दाखवत या नाट्यावर भाष्य करते. कादंबरीची पानेही पारंपारिक एकमार्गीपणा नाकारतात. यातील प्रत्येक भाग आणि प्रत्येक प्रसंग कालाच्या पटलावर एकसुरीपणे आपापली जागा घेत असला तरी कादंबरीत मात्र सर्व सोबतच येत राहते. मग तो त्र्याण्णव सालचा राहेल परत आल्यावर तिला दिसलेला अबोल एस्था असो वा एकोणसत्तरचा विमानतळावर सोफीमोल आणि मार्गारेटला आणायला जाणारा 'घरातील पुरुष' मुलगा एस्था असो. अभिलाष टॉकीजमध्ये साउंड ऑफ म्युजिक पाहताना ऑरेंजमॅन-लेमनमॅनकडून एस्थाचे होणारे लैंगिक शोषण किंवा वेलुथाला काहीही अपराध नसताना लाथाबुक्क्यांनी होणारी कोठडीतील मारहाण असो. या घटना आणि त्यानंतर येणारी मानवी आयुष्यांची वाताहत, उद्ध्वस्तता रॉय फ्लॅशबॅकमधून मागेपुढे रेखत जातात. त्यांच्या लेखणीत परिणाम आधी येतो आणि मग कारण. आणि जणू काही त्यांचा परस्परसंबंध अधोरेखित करत उरणारी अपरिहार्यता वाचकांच्या मनात सांडत जाते - लाइक टी फ्रॉम टीबॅग.

     अनेकांना हे पुस्तक आवडले नाही. कित्येकांना झेपलेही नाही. मलाही बर्‍याचदा वाचल्यानंतर आणि इतकी वर्षे डोक्यात घोळवल्यावर त्यावर चार शब्द लिहिता आलेत. अरूंधती रॉय यांची इतर मते व त्यांची वादग्रस्तता हा वेगळा विषय आहे. पण माझ्यापुरता माझ्या मनावर विलक्षण परिणाम करणारी ही मला सर्वात जास्त आवडणारी कादंबरी आहे.

In reply to by मितान

एस Fri, 07/11/2014 - 12:21
जितकं मनात होतं त्याच्या एक टक्काही नीट लिहिता आलं नाही! पण इतर कशासाठी नाही तर किमान यातील भाषेसाठीतरी 'द गॉड ऑफ् स्मॉल थिंग्ज्' नक्की वाचा.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 17:55
"द रिडल ऑफ लेबिरिंथ" नामक मार्गालिट फॉक्स या लेखिकेचे पुस्तक वाचले. लिनिअर बी या लिपीचा उलगडा करणार्‍या संशोधकांपैकी जॉन चॅडविकचे पुस्तक अगोदर वाचले होते, त्यानंतर त्याच विषयावरचे हे पुस्तक वाचले. बेशिक तेच तेच असले तरी अ‍ॅलिस कोबेर या भाषाशास्रज्ञ बाईंबद्दल पहिल्यांदा डीटेल माहिती यात मिळते. महायुद्धाच्या काळात कागद मिळेना म्हणताना लायब्ररीतील पुस्तकांच्या नेआणवाल्या स्लिपा, सिगरेटची पाकिटे, ग्रीटिंग कार्ड आणि वह्यांचे पुठ्ठे, इ.इ. जे काय मिळेल ते वापरून तिने जवळपास १,८०,००० छोटी नोंदकार्डे बनवली आणि लिनिअर बीचा जवळपास फडशाच पाडला. पण जॉन मायर्सची किरकीर, तसेच कॉलेजचा शिकवण्याचा लोड, इ.इ. लडतरींमुळे बिचारीला काही पुढं जाता आलं नाही. पण जे केलं त्याचा मायकेल व्हेंट्रिसला पुढं लै उपयोग झाला. अ‍ॅलिस कोबेरची नव्याने ओळख झाल्याचा लैच मोठा फायदा झाला या पुस्तकामुळे. आता नेक्ष्ट टार्गेट 'द मायसीनिअन वर्ल्ड' बाय जॉन चॅडविक. लिनिअर बीच्या जवळपास ६००० मृत्तिकालेखांतून आपल्याला काय काय माहिती मिळते त्याचा आढावा घेणारं पुस्तक आहे. अपोलो, पोसायडन, इ. देवांची नावे, ट्रॉयहून आणलेल्या गुलाम स्त्रिया, गुलामांना दिलेली अपमानजनक नावे, झालंच तर अकिलीसचे नाव कोरलेले मिळणे, इ.इ. बर्‍याच गंमतीजमती आहेत.

बॅटमॅन गुरुवार, 07/03/2014 - 18:01
"प्रिन्सेस-अ ट्रू स्टोरी बिहाईंड द व्हेल इन सौदी अरेबिया" हे जीन सॅसनचे पुस्तक मध्ये वाचले. सौदी राजघराण्यातल्या एका सुलताना नामक राजकन्येचे (नाव बदलून पण खर्रेखुर्रे) आत्मवृत्त आहे. काळ १९७० पासून पुढचा. नॉट विदौट माय डॉटर, सोन्याच्या धुराचे ठसके, मयादा, इ. पुस्तके वाचलेल्यांना काही नवीन नाही. पण राजघराण्यातील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तिथल्या स्त्रियांच्या पशुवत् स्थितीचे वर्णन कधी वाचले नव्हते ते या निमित्ताने वाचायला मिळाले. वर्णनशैली 'व्हिव्हिड" (मराठी?) आहे, खिळवून ठेवणारी आहे. बर्‍याच गोष्टींबद्दल आधी कुठेसे वाचले असले तरी इथे त्या एकदम अंगावर येतात. सौदी राजघराण्याची अगणित संपत्ती आणि शिवाय स्त्रियांवरच्या बंधनांमुळे येणार्‍या कंटाळ्याचे, रितेपणाचे वर्णन यथार्थ आहे. अशी वर्णने कैकदा डिसमिसिवली जातात, सुख टोचतंय इ.इ. म्हणून. पण त्यामुळे त्यांची सत्यता कमी होते असे मला तरी वाटत नाही. असो. सौदीमध्ये अलीकडे झालेले काही बदल त्या तुलनेने बरेच स्वागतार्ह आहेत. बाकी, जीन सॅसनबद्दल फ्रॉडचे आरोपही झालेत, तेव्हा किती खरेखोटे ते तो एक अल्लाच जाणे. पण पुस्तक रोचक आहे हे नक्की.

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/03/2014 - 18:36
कदाचित अनेकांनी वाचली असेल तरीही अमृतवेल - वि. स. खांडेकर सगळ्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडली होती पण समजण्या एवढी कुवत नव्हती. पण तेव्हा आवडलेल्या ओळी, परिच्छेद हे एका वहीत किंवा डायरीत लिहून ठेवले जायचे. परत कधीतरी वहीतून हे संग्रहित साहित्य वाचून आनंद मिळायचा. अशीच एक वही वाचताना ही कादंबरी पुन्हा वाचावीशी वाटली. पुन्हा शोध घेऊन वाचली. तेव्हा ती अधिक समजली. आधी ज्या ओळी केवळ पुस्तकी किंवा आलंकारिक म्हणून जास्त आवडल्या होत्या, त्या नंतर वाचताना अधिक उमगल्या. वयानुसार आणि काळानुसार वेगळ्या दृष्टीने वाचली गेली. अनेक व्याख्या बदलल्या होत्या. पण तरीही आवडीच्या यादीत अजूनच फिट्ट बसली. त्यापैकीच काही निवडक देतेय…(आता ती वही राहिली नाही, ती लिहून ठेवायची सवयही नाही, तेव्हा आंतरजालावरून साभार) "भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळ दंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचे वरदानही लाभले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरावे म्हणून धडपडणे, त्या धडपडीतला आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळ लेल्या पायानी दुसर्या स्वप्नामागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो त्यामुळे." वि.स.

In reply to by मधुरा देशपांडे

सौंदाळा गुरुवार, 07/03/2014 - 18:45
अमृतवेल मधे तुम्ही वर दिल्याप्रमाणे अनेक सुंदर ओळी आहेत पण एक कथानक म्हणुन ती मला अगदीच सामान्य वाटली.

In reply to by मधुरा देशपांडे

यशोधरा गुरुवार, 07/03/2014 - 18:48
लहानपणी वाचली होती तेह्वा मलाही खूप आवडली होती अमृतवेल. आता कथानक वाचूही शकत नाही. पण त्यातील संवाद, भाषा सुरेख होती हे मात्र खरेच. आता अमृतवेल कथानकासाठी वाचवत नाही पण भाषेसाठी संग्रही ठेवली आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

विकास गुरुवार, 07/03/2014 - 19:51
खांडेकर म्हणल्यावर दोन पुस्तके आठवली. एक म्हणजे "ययाती" - लहानपणी वाचले तेंव्हा खूप आवडले. जसे होते तसे एक कादंबरी म्हणून समजून घेतले. नंतर दुर्गाबाई भागवतांची त्यावरील टिका वाचली आणि त्यातील चुका समजल्या. दुसरे पुस्तक म्हणजे, "सोनेरी स्वप्न भंगलेली" - नीट आठवत नाही. पण गांधीवादी पिढीला आलेले स्वातंत्र्योत्तर नैराश्य (फोलपणा) ह्यावर आधारीत कथानक होते.

In reply to by प्रचेतस

विकास गुरुवार, 07/03/2014 - 21:20
मला आठवावे लागेल. मी नंतर पुस्तक शोधून अधिक संदर्भ देण्याचा प्रयत्न करेन. पण त्यांचा मुद्दा असा होता की पुराणातल्या कथेवर कथानक बसवताना खांडेकरांनी संस्कृतीचे मिश्रण केले होते. काही वेळेस त्यातले काही प्रसंग होते ते तर वास्तवीक ख्रिस्ती परंपरेतले होते, असेच अजूनही काही होते. येथे एक लक्षात ठेवावे बाईंच आक्षेप ख्रिस्ती धर्म वगैरे नव्हता तर सरमिसळ करत योग्य चित्र न उभारण्यात होता.

In reply to by विकास

प्रचेतस गुरुवार, 07/03/2014 - 21:49
धन्यवाद. 'ययाती' वाचण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला होता पण वाचवले गेले नव्हता. महाभारतातील मूळ यायातीचे उपाख्यान कितीतरी सरस आहे त्यापेक्षा. तसेही ऐतिहासिक अथवा पौराणिक कथानकांवर कादंबरी लिहिताना बरेचसे लेखक (मूळ कथानकच नाट्यमय असतानाही) प्रमाणाबाहेर लेखनस्वातंत्र्य घेतात आणि कादंबरीची अक्षरश: वाट लावतात. यात रणजीत देसाई, शिवाजी सावंत आदि मान्यवरही आले.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश गुरुवार, 07/03/2014 - 22:19
ययाति केवळ कादंबरी म्हणून वाचताना खूपच सुंदर आहे. अर्थात मूळ कथेपेक्षा अधिक गोष्टी त्यात घातलेल्या आहेत हे लक्षात येतं, तरीही मला तरी ती हातातून ठेववत नव्हती. पण सरमिसळ केली तरीही मूळ कथेच्या गाभ्याला धक्का लावलाय असं वाटलं नाही. इतर कादंबर्‍यांबाबत सहमत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/03/2014 - 20:01
आमच्या घरात वाचनाची आवड आई आणि वडील दोघांनाही. आईला रोजच्या वर्तमानपत्रापलीकडे जास्त कांही वाचताना पाहिलं नाही. तिला तेवढा मोकळावेळही नसायचा. वडील कथा कादंबर्‍या वाचायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या बाबतीत आईचा आग्रह असायचा की, 'बाहेर उडाणटप्पूपणा करण्यापेक्षा घरात बसून पुस्तकं वाच.' आमच्या गल्लीत आमचे समाजसेवी फॅमिली डॉक्टर (डॉ. भांडारकर) ह्यांनी एक मोफत वाचनालय चालविले होते. स्वतः पदरमोड करून ते वाचनालय चालवायचे. तिथे लहानपणी परोपकारी गोपाळ, गोट्या, फास्टर फेणे, कर्‍हेचे पाणी वगैरे पुस्तके आणि विज्ञानयुग, अमृत, फुलबाग, विचित्रविश्व वगैरे नियतकालीकं फुकट वाचायला मिळायची. ती तिथेच बसून अट असायची. पुस्तक घरी न्यायचे असेल तर एकदाच ५ रुपये अनामत रक्कम ठेवावी लागे. आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या नांवे तशी रक्कम भरून पुस्तके घरी आणून वाचायची सुविधा आम्हाला पुरविली. पुढे गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा उघडली आणि अवघे साहित्यिक विश्व आमच्या दारी आले. तिथेही अनेक पुस्तके वाचली. पुढे नोकरीला लागल्यावर पुस्तके विकत घेऊन वाचायचे 'व्यसन' लागले. शाळेतून पुलंची ओळख होतीच. 'खोगीरभरती'तला धडा होता. मासिकांमधून वपुंची ओळख झाली. कॉलेजात 'गारंबीचा बापू' मुळे श्रीनांनी वेड लावले, नाटकांच्या आवडीतून 'गुतता हृदय' मुळे शन्ना आपलेसे वाटू लागले. आयुष्याच्या वाटेवर लहान आणि तरूणपणी अशा अनेक लेखक/लेखिका मला बोट धरून चालवलं. घरी आईवडील, शाळेत शिक्षक आणि पुस्तकरुपाने ह्या सर्व साहित्यिकांनी अनेक चांगले संस्कार घडविले. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही. ह्या साहित्य आकर्षणाच्या वटवृक्षाचं मूळ रोपटं आईने लावलं, आपल्या नजरेखाली वाढविलं. रोजची वर्तमानपत्र, दिवाळी अंक (तोही लोकसत्ता), आणि पुढे पुढे कालनिर्णयची पाठीमागची बाजू ह्याच्या बळावर वाचनाचं महत्त्व जाणून तिने आम्हाला (मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला) वाचनाचं वेड लावलं. ह्या धाग्यावर माझ्याकडून एखाद्या (कदाचित जास्तच) पुस्तकाबद्दल लिहीण्याआधी, ही आवड जिने लावली त्या आईबद्दल आधी लिहीणं मला जास्त उचित वाटलं म्हणून लिहीलं. धाग्याच्या विषयाला सोडून आहे. पण एवढे खपवून घ्या. लवकरच माझ्या वाचनवेडा विषयी लिहीन.

सस्नेह गुरुवार, 07/03/2014 - 22:07
ले. शशी भागवत. कळत्या वयात या कादंबरीने वेड लावले होते अन अजुनी वाचताना मोहवते. प्राचीन काळातील वैभवशाली चित्रण, रहस्य, व्यक्तिवैचिध्य अन नर्म शृंगार यांची चित्तवेधक गुंफण म्हणजे मर्मभेद. शशी भागवतांच्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच कादंबर्‍या आहेत. त्यात सर्वात सरस मर्मभेद. अवश्य वाचा.

In reply to by सस्नेह

प्रसाद१९७१ Fri, 07/04/2014 - 10:47
मर्मभेद वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे किशोर वयात वाचण्यासारखे आहे. चंद्रलेखा ला जशी प्रसिद्धी मिळाली तशी मर्मभेद ला मिळायला हवी होती.

In reply to by सस्नेह

कपिलमुनी Fri, 07/04/2014 - 20:41
मर्मभेद पेक्षा रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा जास्त आवडल्या.. अजून एक कादंबरी अप्रकाशित आहे असे एकून आहे

अजया गुरुवार, 07/03/2014 - 22:12
प्रकाश नारायण संत माझे अत्यंत आवडते लेखक.त्यांची वनवास्,शारदासंगीत पंखा आणि झुंबर अशी चार(च) पुस्तकं आहेत.या चारही पुस्तकातून आपल्याला कथानायक लंपन भेटतो,आई वडिलांपासून दूर आजी आजोबांकडे राहाणारा.पौगंडावस्थेतले अवघड वय्,अतिशय संवेदनाशील स्वभाव असणारा.सुंदर पेटी वाजवणारा,सुमीकडे चोरुन बघणारा! सर्वच पुस्तकांमध्यली भाषा बेळ्गावी मराठी.ती वाचताना अगदी गोड वाटते.लंप्याचे मित्र त्याला काय करायलय लंप्या!असं बोलणारे.त्यांची नावही मस्तच! कणबर्गी गंग्या,सोंडृया,परळ्या,टुकण्या! मी माझ्या मुलाच्या मित्रांना ही नावं बहाल केली आहेत! या सर्वच कथांमध्ये लंपन बरोबरच तो परिसर ,ती भाषा,गुंडीमठ रस्ता,शारदासंगीत विद्यालय्,सुमीची सोनसाखळी,लंप्याचे मित्र्,त्यांची टारझनगीरी! अगदी नकादुचेण्या कपासके(केस कापण्याचे दुकान!!) असे सगळं मिळून या अनोख्या कथा जमून आल्या आहेत. लंपनच्या भाषेत अठ्ठाविसशे तीस वेळा जरी ही पुस्तकं वाचली तरी ताजंतवानं वाटतं हे खरं! या लंपनशी माझं एक छानसं नातं आहे. माझ्या प्रेग्नंन्सीच्या दिवसात वनवास माझ्या हातात पडलं.हे पुस्तक इतकं आवडलं की त्याची पारायणं झाली. त्यातल्या लंपनचेच गर्भसंस्कार झाल्यासरखा माझा मुलगाही तसाच शांत्,डोक्यात चक्र असणारा ,संवेदनशील आहे. इतका या पुस्तकाचा परिणाम!

In reply to by नंदन

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:05
+२८३० एक्दम मॅड पुस्तकं! हुंब माणूस पण प्रेमात पडेल अशी.

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 01:53
शालेय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं चिमुकलं मन केंव्हाच व्यापून टाकलं होतं. पुढे एका शिवजयंती कार्यक्रमात श्री. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचं अफजलखान वधाचं आख्यान ऐकलं आणि तरूण मनावर रोमांच उभं राहिलं बाबासाहेबांची ओघवती भाषा, आवेश, आवाजातील चढ उतार आणि संपूर्ण प्रसंग जस्साच्यातस्सा डोळ्यासमोर उभा करण्याची बाबासाहेबांची हातोटी ह्या सर्वाचा माझ्या तरूण मराठी मनावर सकारात्मक परिणाम झाला. त्या नंतर आले बाबासाहेबांनी लिहीलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. माझ्या एका मित्राच्या बायकोने ते मला वाचायला दिले. ते दोन दिवसात बाचून संपविले पण शिवचरीत्राने आलेले भारावलेपण संपता संपेना. पुन्हा एकदा बाबासाहेबांची भाषा, ते तारीखवार तपशिल, मराठी तिथी-तारखा आणि प्रसंगातले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. ह्या पुस्तकातील प्रसंगानुरुप काढलेली चित्रं अतिशय नेमकी आहेत. प्रत्येक प्रसंगात आपण स्वतः तिथे उपस्थित आहोत असाच भास होतो. मन पूर्णपणे इतिहासात रममाण होते. मोघलांविरुद्ध लढायांचे वर्णन वाचताना आपल्याही चेव येतो आणि मावळ्यांची स्वामीभक्ती पाहून आपल्याही मनांत शिवाजी महाराजांबद्दल आदरभावना निर्माण होते. पावनखिंड प्रसंग अंगावर काटा आणतो. नंतर प्रत्यक्ष पावनखिंडीला भेट दिली तेंव्हा राजा शिवछत्रपती कादंबरीतील बाजीप्रभू देशपांडे ह्याची एकाकी लढत आठवली आणि आदराने नतमस्तक झालो. सर्वच दृष्टीने पुस्तक वाचनिय आणि संग्रहणिय आहे. पुन्हा पुन्हा राजा शिवछत्रपती कादंबरीची अनेक पारायणं होतात. दरवेळी तोच आणि तेव्हढाच आनंद होतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सखी Fri, 07/04/2014 - 03:05
पेठकर काका मलाही हीच पहिली कादंबरी आठवली जी शालेय जीवनात वाचुनही अजुनही भारावुन टाकते. जाणता राजा बघणं हाही एक आनंददायी सोहळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच शिवचरीत कथन जालावर आहे.

In reply to by सखी

प्रभाकर पेठकर Fri, 07/04/2014 - 10:27
'जाणता राजा' एक विस्मयकारक कलाकृती आहे. रंगमंचाची भव्यता, २००+ कलाकारांचा उत्साह, प्रकाश योजना, वेशभूषा, आतिशबाजी, घोडेस्वार, बैलगाडी सर्व सर्व अगदी नजरेचे पारणे फेडणारे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण नाटक ध्वनीमुद्रित आहे आणि प्रत्यक्ष बोललेले संवाद नाहीत. त्यामुळे संवाद विसरण्याची, नाटक रेंगाळण्याची शक्यता उरत नाही. शिवचरीत्राचे चित्ररुप धावते आणि अद्भूत समालोचन म्हणता येईल. जाणता राजाच्या कार्यक्रमात, मध्यंतरात, रंगमंचाच्या मागे, बाबासाहेबांना भेटण्याचा प्रसंग आला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात लंडन मध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळा आणि ५ दिवस लंडन दर्शन कार्यक्रमात बाबासाहेबांचा सहवास लाभला. ब्यांण्णव्यावर्षीही बाबासाहेबांची स्मरणशक्ती आणि वाचा कणखर आहे. आज दुर्दैवाने ते व्हिल चेअरवर असले तरीही उत्साह पन्नाशीतला आहे. अजूनही ते व्याख्यानाला तयार आहेत. मस्कतला त्यांना बोलावण्याचे घाटत आहे. निदान १ दिवस तरी हल्लीच्या पिढीला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून शिवचरीत्र ऐकवावे ह्या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्यांना आमच्याकडून....मानाचा मुजरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

एसमाळी Fri, 07/04/2014 - 17:09
राजा शिवछत्रपती मध्ये काही चुका आहेत.ज्या आजतागायत सुधारल्या गेल्या नाहित.पुस्तक एकदा वाचल्यावर पुन्हा वाचावे असे नाही वाटले.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Fri, 07/04/2014 - 17:44
प्रत्यक्ष शिवकालासंबंधी फॅक्च्युअल चुका नसाव्यात असे वाटते, मात्र देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने केलेली स्वारी, त्यानंतरची तथाकथित लूट, इ.इ. अतिरंजित वर्णने जुन्या तवारिखांतून आहेत तश्शीच्या तश्शी उचलली आहेत. प्रसिद्ध इतिहास संशोधक कै. ब्रह्मानंद देशपांडे यांनी 'देवगिरीचे यादव' नामक पुस्तक लिहिले आहे त्यात त्या वर्णनांतील अतिरंजितपणा सोदाहरण स्पष्ट केलेला आहे.

धन्या Fri, 07/04/2014 - 11:00
डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेलं हे एक नितांत सुंदर पुस्तक आहे.
एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ग. दि. माडगूळकरांचा हा संदेश वेगवेगळ्या ढंगाने लेखिकेने या पुस्तकात फुलवला आहे. आजचं जीवन धकाधकीचं बनलेलं आहे. अनेक समस्या, संघर्ष आणि ताणांनी माणसाचं आयुष्य व्यापून गेलं आहे. आणि म्हणूनच तो सुखाला पारखा झाला आहे असे त्याला वाटते, परंतु सुख ही एक मानसिक सवय आहे. माणसाचं जीवन अनुभवणं यातच खरं सुख आहे. हे जीवन अनुभवताना भावनांचे, विचारांचे वेगवेगळे पैलू दृसि पडतात. या पैलूतून सुखाचे वेगवेगळे रगं नजरेस पडतात. अनुभवायला मिळतात. फक्त हे रंग पाहण्याची दृष्टी, तसा चष्मा आपणास असला पाहिजे व अशी 'दृष्टी’ देण्याचे मार्गदर्शन या पुस्तकातून रमा मराठे यांनी केले आहे. नेहमीच आनंदी राहण्याचे मर्म सांगणारे सुखाच्या प्राप्तीचे मार्ग सांगणारे पुस्तक.
- रंग सुखाचे पुस्तकाची बुकगंगा डॉट कॉम वर दिलेली माहिती.

स्नेहल महेश Fri, 07/04/2014 - 11:52
मला वाचनाची आवड लहानपणापासून आहे आणि तशी बरीच पुस्तक वाचली आहेत पण मला सुधा मूर्ती या लेखिकेची पुस्तके खूप आवडतात मी वाचलेली काही पुस्तके Dollar Bahu Gently Falls the Bakula Wise & Otherwise THE DAY I STOPPED DRINKING MILK काही इतर पुस्तके (लेखक -आमिष त्रिपाठी ) मेलुहा चे मृतुंजय नागाचे रहस्य शपथ वयुपुत्राची

मनिष Fri, 07/04/2014 - 12:33
सध्या फारशा कादंबर्‍या किंवा फिक्शन वाचत नाही पण जवळपास २० वर्षे आधी वाचलेली रारंग ढांग आजही आवडते. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विस्वनाथची ही कथा. त्याचे ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडिला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या 'जिंदादिल' ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे 'जिंदादिल' अजुनही मिळाले नाहीच. :( ह्याबद्दल अजून काय, काय लिहावं? मलाही अतिशय आवडणारी कादंबरी. मुळात पेंढारकर सिनेमावाले...त्यामुळे ही कादंबरी एखाद्या पटकथेसारखी चित्रदर्शी आणि रोचक. ऊंट मरणे वगैरे प्रसंग एकदम दिग्दर्शकाने घेतल्यासारखे सूचक. अशीच गुंतवून ठेवणारी शैली त्यांच्या "अरे संसार, संसार.." आणि "चक्रीवादळ" ह्या कादंबार्‍यातही दिसते. पण 'रारंग ढांग' ते रारंग ढांगच!!! ह्या इतक्या सुंदर कथेवर चित्रपट का नाही बनला हे खूप बर्षे माझ्यासाठी कोडेच होते. सुमित्रा भावे आणी सुनील सुकथनकर ह्यांच्याबरोबर एका "स्क्रिप्ट रायटींग' च्या कर्यशाळेत ह्याच्यावर उत्तर सापडले. सेन्सॉरने म्हणे (अमोल पालेकरांना) परवानगी नाकारली कारण पुस्तकामुळे संरक्षण दलांबद्दल फारच निगेटीव्ह प्रतिमा होते. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते.... पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच 'रारंग ढांग' हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न "तुला अपेक्षित्/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?" ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, "तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?" हा प्रशन वेगवेगळ्या रुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी 'रारंग ढांग' मनात घुटमळता राहिले... इथेच कुठेतरी विश्वनाथने 'ते' स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! :) नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात...कधी बोलतांना संदर्भ म्हणून (आणी समोरच्याने ते पुस्तकच वाचले नसेल तर मग एक अशक्य तगमग होते...) तर कधी एखाद्या ब्लॉग-पोस्टमधे माझीच अस्वस्थता व्यक्त करतांना. 'रारंग ढांग' मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे...आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत 'रारंग ढांग' चे स्थान खूपच वर आहे!
रारंग ढांग विषयी पुस्तकविश्व्वरील श्रावण मोडक यांचा लेख इथे वाचता येईल - http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6-%E0%A5%A7

In reply to by मनिष

एस Fri, 07/04/2014 - 15:39
रारंग ढांगने झपाटून टाकले होते. तेव्हा काय वाटत होते हे तुम्ही आणि श्रामोंच्या पुस्तकविश्वाच्या लेखात त्यांनी छान सांगितले आहे.

In reply to by मनिष

सखी गुरुवार, 07/10/2014 - 15:25
मनिष हा प्रतिसाद रारंगढांगवरचा अतिशय आवडला, श्रामोंचा लेख वाचण्यात आला नव्हता, तोही खूप आवडला, इथे दुवा दिल्याबद्द्ल आभार. तसेच तुमचा व्लॉगवरचा लेखही निरुत्तर करणारा. मिपावरच डॉ. दाढेंचा हालेखही सापडला. यावरती येणारं सिनेमा, नाटक गुलदस्त्यातच राहीलं तरी अभिवाचन स्नॉवेलवर आलयं असं वाटतं. 'पुन्हा रारंग ढांग' कुणी वाचलय का? यावर दिवाळी अंकात कोणीतरी आव्हान दिल्याचे आठवते दुवा सापडला तर टाकते परत येऊन.

In reply to by सखी

सखी Sun, 07/13/2014 - 08:22
पुस्तकाचं नाव 'पुन्हा रारंग ढांग' नाही तर 'रारंग ढांग नंतर … ' असे आहे. श्रीकृष्ण सवदी यांनी लिहलेलं आहे. चंद्रकांत मासिकानं दिलेले हे आव्हान त्यांनी पेललं, असं पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलं आहे, दुवा.

मनिष Fri, 07/04/2014 - 12:36
अरे हो! सांगायचे राहिलेच. उपक्रम खूप आवडला. कादंबरी सोडून नुसत्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहायला सांगितले तर मग माझ्यासाठीच एक नवीन विभाग सुरू करावा लागेल, आणि अर्थातच कोणालातरी माझ्या पोटापाण्याची सोयही करावी लागेल. :P

स्पा Fri, 07/04/2014 - 13:07
मुळ लेखक : कॉरम्याक मकार्थी अनुवाद : अनिल किणीकर एक अचाट पुस्तक , वेगळाच प्लॉट . बेचिराख झालेले जग , कशाने, का माहित नाही कथानकाला भूतकाळ नाही , भविष्य नाही फक्त वर्तमान बेचिराख झालेल्या अमेरिकेतून जगण्याची धडपड करत वाट काढत दक्षिणेकडे समुद्र किनार्यावर जाणारा एक अनामिक बाप आणि त्याचा लहानसा मुलगा. जग बेचिराख झालेले , प्रचंड मनुष्यसंहार झालेला , निसर्गाची अवकृपा कि मानवी युद्ध माहित नाही , जगण्यासाठी उरलेल्या मानव प्राण्याची एकमेकात चालेलेली चढा ओढ . खायला प्यायला काही नाही, मरण निश्चित, फक्त ते किती लांबवता येतंय यावर सगळा खेळ. जवळ सामान म्हणजे स्वरक्षणासाठी असलेले एक छोटे पिस्तोल. अंगावरचे कपडे , इकडून तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक ढकलगाडी , एकमेकांशिवाय कोणी नाही . कादंबरीचा कालखंड , पात्रांची नवे शिवाय इतर विशेष पार्श्वभूमी न कळताहि हे पुस्तक पहिल्या पानापासून खिळवून ठेवते , बाप लेकातले नातेही सुंदर . शेवटी त्याच्न्या प्रवासाचे काय होते , तो कुठे संपतो यासाठी पुस्तक वाचणे आले २००७ सालातला पुलित्झर पुरस्कार या कादंबरीला मिळाला. २००९ साली यावर "द रोड" नावाने चित्रपट सुद्धा आलाय

स्पा Fri, 07/04/2014 - 13:08
भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड. पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे. कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात. कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !! एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य . शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

In reply to by स्पा

Gayatri Muley Fri, 07/04/2014 - 14:37
महाभारत म्हणल कि फक्त शिवाजी सावंत चे तर्क खरे वाटतात मला... (अर्थातच ते चुकिचे आहे, पण लहानपणीच वाचलेले मृत्युंजय अन् युगांधर मनातून जातच नाहीत..) त्यातून पांडव अन् कौरव यांची बाजू कळली आता "तिसरी" बाजू कळण्यासाठी "पर्व" नक्की वाचेल...

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:37
प्रदीप लोखंडे, पुणे १३- छान पुस्तक आहे. ओसामा बिन लादेन वर एक पुस्तक वाचले होते. एका अमेरीकन लेखिकेने ओसामाच्या मुलाचे आणि पत्नीचे आत्मकथन एकत्र करून पुस्तक लिहीले होते. त्याचा मराठी अनुवाद पण आहे. पण नाव आठवत नाही. पुस्तक मात्र जबर्दस्त आहे.

बबन ताम्बे Fri, 07/04/2014 - 15:41
शिकवीले ज्यांनी - लेखक अनिल अवचट खूप सुंदर पुस्तक आहे. पुण्यातील काही ज्ञानी व्यक्तींचे अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण व्यक्तिचित्रण अनिल अवचटांनी केले आहे.