मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर

धोंडोपंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लोकहो, आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत. ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय. या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा, ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत. आज, याच विषयावर, ज्योतिषांकडे जातांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल सांगतो. साधारणपणे ज्योतिषांकडे माणूस जातो, तेव्हा त्याच्या काही समस्या असतात. जसे डॉक्टरांकडे जाणार्‍या माणसाला काही आजार सतावत असतो, तसेच ज्योतिषांकडे जाणार्‍या माणसाला जीवनाच्या विविध अंगात काही समस्या भेडसावत असतात. त्या समस्यांवर योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्याचे निराकरण व्हावे, अशी त्याची इच्छा असते. काही वेळा माणूस पेचात सापडलेला असतो. हे करू की ते करू? असे त्याला वाटत असते. अशा द्विधा मनस्थितीत त्याच्यासाठी योग्य गोष्ट कुठली हे जाणून घेण्यात त्याला स्वारस्य असतं म्हणून तो ज्योतिषाची वाट धरतो. पण अनेकदा असे होते की, त्याला त्याच्या समस्यांचे योग्य उत्तर मिळत नाही. काही वेळा काही गोष्टी विचारायच्या राहून जातात. काही वेळा काही संदर्भ त्याला उमजत नाहीत. काही वेळा ते ज्योतिर्विद अत्यंत उथळ वक्तव्य करतात असे त्याला समजते, त्यांच्या एकूणच ज्योतिषविषयक ज्ञानाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहते, असे होऊ नये, यासाठी ज्योतिषांकडे जातांना कोणत्य़ा गोष्टी पाळल्या पाहिजेत ते येथे थोडक्यात क्रमवार सांगतो म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जातांना आधी त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या माणसाला आपली पत्रिका दाखवतो आहोत, त्या माणसाकडे ज्ञान आहे का? त्याचे समाजातील स्थान काय आहे? लोकांचा त्यांच्याबद्दलचा अनुभव काय आहे? याचा विचार करूनच त्या ज्योतिषाकडे जावे. केवळ पेपरात किंवा दूरदर्शनवर जाहिराती दिल्या, म्हणजे कोणीही ज्ञानी होत नसतो. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. "बोभाटा म्हणजे कीर्ति नव्हे. " असे दादा (सुरेश भट) म्हणायचे. तुम्ही जेव्हा एखाद्या ज्योतिषांचा सल्ला घेता, तेव्हा आयुष्याच्या अनेक महत्वाच्या बाबी त्यांच्यासमोर उघड करीत असता. त्या उघड करण्याइतपत तो माणूस विश्वासार्ह आहे का? याची आधी चाचपणी करा. एकदा ही प्राथमिक चौकशी झाल्यावर, ते ज्योतिर्विद आपली पत्रिका दाखवायला "लायक" आहेत याची खात्री झाली ( आम्ही "लायक"हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे) की त्यांची रितसर भेटीची वेळ ठरवून घ्या आणि मगच त्यांना त्या वेळेत जाऊन भेटा. "आलं मनात की गेलं दुकानात" अशी भूमिका ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत चालत नाही. रितसर appointment घेतांना तुम्ही आधी स्वत:पाशी वेळेचे पर्याय निश्चित करून घ्या. तुम्ही कोणत्या वेळेस त्यांच्याकडे जाणार आहात हे groundwork तुम्ही स्वत: केले पाहिजे. ते कसे करायचे ते सांगतो. ज्योतिषांची appointment घेण्याआधी आपण स्वत: पंचांग पहावे. ज्यांना पंचांग पाहता येत नसेल त्यांनी खेद मानण्याचे कारण नाही. कारण आता मराठी कॅलेंडरवर तिथी आणि इतर माहिती तारखेच्या रकान्यात दिलेली असते. त्यासाठी स्वत:चा फार मोठा ज्योतिषविषयक अभ्यास असायला हवा, असे काही नाही. तर पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये तुम्हांला ज्या दिवशी जायचे आहे त्या दिवशी कोणती तिथी आहे ते पहा. कृष्ण चतुर्दशी, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदा या दिवशी आयुष्यात कोणालाही पत्रिका दाखवू नका. याचे कारण हे दिवस अत्यंत अशुभ समजले जातात. कृष्ण चतुर्दशीचा उत्तरार्ध, अमावास्या आणि शुद्ध प्रतिप्रदेचा पूर्वार्ध या दिवसात शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तुघ्न अशी अत्यंत वाईट करणे सुरू असतात. (करण म्हणजे काय- स्थिर आणि चर करण काय असतं, याची माहिती आम्ही इतरत्र दिलेली आहे ती वाचावी). शुद्ध प्रतिप्रदेला केवळ घटस्थापनेसारखी देवकार्येच करायची मुभा आहे. पण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ह्या भानगडीत सर्वसामान्य माणसाने न शिरता, सरळ या तीन तिथी वर्ज्य कराव्यात, म्हणजे प्रश्न मिटला. त्याचप्रमाणे हे दिवस सोडून इतर दिवशी जेव्हा विष्टि हे करण असेल तो दिवसही वर्ज करावा. विष्टि करणही अशुभ आहे. पंचांगात "भद्रा निवृत्ती" असे लिहून त्या समोर वेळ दिलेली असते ती हे विष्टी करण संपण्याची वेळ असते. त्यावरून विष्टि कधी संपते ते समजते. त्याचप्रमाणे पंचांगात जेथे करिदिन असे लिहिलेले असते तो दिवसही वर्ज करावा. ग्रहण दिवस, अयन दिवस ( म्हणजे उत्तरायन आणि दक्षिणायन सुरू होते तो दिवस) भावुका अमावास्या आणि होळी यांच्या पुढील दिवसाला करिदिन म्हणतात. तो सर्व शुभकार्यास वर्ज्य आहे. त्या दिवशी पत्रिका घेऊन कोणाकडे जावू नये. वरिल दिवस वगळता शुभ दिवस पाहून ज्योतिषांच्या भेटीची वेळ मागून घ्यावी. भेटीची वेळ मागतांनाच ज्योतिषांची दक्षिणा किती हे विनासंकोच विचारून घ्यावे. म्हणजे ती आपल्याला योग्य वाटते का नाही, हे ठरवून त्यांच्याकडे जायचे की नाही हे ठरविता येते. काही ज्योतिषी दक्षिणा किंवा मानधन आधी सांगत नाहीत. तुमच्या इच्छेप्रमाणे द्या असे मोघम उत्तर देतात. अशा वेळेस, "मला योग्य वाटेल आणि परवडेल एवढी मी दिली तर चालेल का?" असे स्पष्टपणे विचारावे. हे विचारण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. एवढे झाले की त्यांचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, इमेल इत्यादी गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. जाण्याच्या दिवशी सकाळी एकदा फोन करून आपल्या भेटीची वेळ सांगून "अमुक अमुक वाजता मी येतो आहे, तुम्ही वेळ दिली आहे", हे सांगून खात्री करावी. काही वेळा ज्योतिषी आयत्या वेळेस दुसर्‍या कामास जातात आणि आपली appointment बोंबलते. आता नवीन पिढीतले ज्योतिषी वेळेच्या बाबतीत बरेच काटेकोर झाले आहेत पण काही जुन्या लोकांना time management जमत नाही. त्यांच्यामुळे आपली खेप फुकट जायला नको, म्हणून सकाळी फोन करून खात्री करावी. भेटीची वेळ घेतल्यावर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे प्रश्न तुम्हाला भेडसावत आहेत, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवे आहे, त्या गोष्टी एका कागदावर नीट क्रमवार लिहून ठेवा. हे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे कुणीही करीत नाही. हे लिहून झाल्यावरही तुम्हाला काही विचारण्यायोग्य मुद्दे सुचण्याची शक्यता आहे. मुद्दा सुचला की तो नमूद करून ठेवा. नाहीतर होतं काय, की लोक जातात, जे तिथे सुचेल ते विचारतात आणि मग तिथून बाहेर आले की विचार करतात, "अरेच्च्या, हे विचारायला हवं होतं, ते विचारायचं राहूनच गेलं" वगैरे वगैरे. मग त्या राहून गेलेल्या गोष्टींसाठी ते ज्योतिषांना फोन करतात. ज्योतिषी एका दिवसात अनेक कुंडल्या पहात असतात. त्यामुळे तुम्ही फोन केल्यावर तुमची कुंडली त्यांच्या नजरेसमोर येईलच याची खात्री नाही. अशा वेळेस काहीतरी मोघम उत्तरे ऐकून घ्यावी लागतात. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे, तुम्ही जेव्हा या गोष्टींसाठी फोन करता, तेव्हा दुसरा कोणीतरी त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या घेऊन त्या ज्योतिषांसमोर बसलेला असतो. तुमच्या अनाठायी फोनमुळे ज्योतिषांचं लक्ष त्याच्या कुंडलीवरून विचलीत होतं. आणि त्या बिचार्‍याला उगाचच अप्रत्यक्षपणे तुमच्या फोनचा त्रास होऊ शकतो. कल्पना करा, तुम्ही ज्योतिषांसमोर तुमची पत्रिका घेऊन बसला आहात आणि आधी येऊन गेलेला माणूस तुम्ही तेथे असतांना, फोनवरून त्याच्या राहिलेल्या प्रश्नांविषयी विचारतोय. काय अवस्था होईल तुमची? असे होऊ नये म्हणून सर्व प्रश्न एका कागदावर लिहून ठेवा. एवढे केलेत म्हणजे ज्योतिषांकडे जाण्याची पूर्वतयारी झाली. ज्योतिषांकडे गेल्यावर काय करावे हे आता सांगतो. वर उल्लेख केलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर ठरलेल्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमची पत्रिका घेऊन ज्योतिषांकडे जाता, तेव्हा तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांची सूची , बरोबर काही रिकामे कागद आणि पेन इत्यादी गोष्टी अवश्य सोबत घेऊन जा. कागद आणि पेन एवढ्यासाठी की समाजातील काही जणांचे हस्ताक्षर अत्यंत खराब असते. त्यांनी लिहिलेले आपल्याला वाचताही येत नाही. ही समस्या आमच्या बाबतीत नेहमी निर्माण होते कारण, आमचे हस्ताक्षर (देवनागरी, रोमन आणि उर्दू या तीनही लिपीतील) अत्यंत सुंदर असल्यामुळे, इतरांचे हस्ताक्षर थोडे जरी खराब असले तरी त्यांचे लेखन वाचणे आम्हाला फार कंटाळवाणे वाटते. म्हणजे तो मजकूर वाचायला सुरूवात करताच आमचा मूड़च जातो. त्यामुळे आपण आपल्या सुवाच्य हस्ताक्षरात ते ज्योतिर्विद काय सांगतात हे लिहून घेणे हेच श्रेयस्कर ठरते. एकदा ठरलेल्या वेळी त्यांच्या स्थळी पोहोचल्यावर, सुरूवातीस परिचय, नमस्कार वगैरे सोपस्कार दोन तीन मिनीटात पूर्ण होतात. त्यावेळेस तेथे गर्दी नाही याची खात्री करा. फार लोकांच्या कोलाहलात पत्रिका दाखवणे हे जातकाला जड जाते. नाहीतर असेही ज्योतिषी आहेत की, आठदहा जण एकाच वेळी तेथे बसलेले असतात आणि त्यासर्वांना ते एकाच वेळी attend करत असतात. असे जर कोणी तिथे असेल तर त्यांना सांगा की, माझे वैयक्तिक विषय मला इतरांसमोर उघड करायचे नाहीत. एक तर त्यांना नंतर बोलवा किंवा मी थोडा वेळ थांबतो. पण हा वेळ केवळ माझ्यासाठी तुम्ही दिलेला आहे. त्यामुळे इथे इतर लोक असणे प्रशस्त नाही" हे प्रकार सर्वांकडे होतात असे नाही. उत्कृष्ट time management ज्याला जमतं तो माणूस कोणाला कधी बोलवायचे याची योग्य आखणी करू शकतो. आम्ही जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा जर एखाद्या व्यक्तिला सायंकाळी ४ ते ५ ही वेळ दिलेली असेल तर त्यावेळेस अन्य कोणालाही बोलावत नाही. आगंतुकासारखे कोणी आल्यास त्यांना योग्य त्या शब्दात या गोष्टीची आम्ही जाणीव करून देतो. त्यांना भेटीची दुसरी वेळ देतो. पण ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त आम्ही कोणालाही बोलवत नाही आणि इतरांना त्याच्या वेळेवर अतिक्रमणही करून देत नाही. परिचय झाल्यावर, तुम्ही तुमच्या समस्या नेमक्या शब्दांत ज्योतिषांना सांगणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडे गेल्यावर आपण आपले symptoms त्यांना सांगतो. तसे निश्चित काय स्वरूपाच्या समस्या आहेत या कुंडली पाहण्याआगोदर ज्योतिषांना सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांची line of thinking ही अधिक अचूक ठरते. कोणत्या स्थानाशी, कोणत्या ग्रहाशी समस्या निगडित आहे हे समजल्यावर त्या स्थानाकडे पाहण्याची सूक्ष्मता वाढलेली असते. समजा एखाद्या व्यक्तिला व्यवसायात काही समस्या आहेत, हे एकदा ज्योतिषांना सांगितले की सहाजिकच त्यांचे बारिक लक्ष द्वितीय षष्ठ आणि दशम स्थानावर असते. डॉक्टरना आपण अमूक ठिकाणी वेदना आहे हे सांगितल्यावर तो भाग ते जास्त काळजीपूर्वक तपासतात. असं कोणी डॉक्टरांना म्हणत नाही की, मी तुमच्यासमोर उभा आहे. आता तुम्हीच शोधून काढा मला काय होताय ते आणि त्याचा इलाज करा. नेमकेपणाने आपली समस्या सांगितली की त्यांच्या विचारांना दिशा मिळते. त्यांच्या उर्जेचा प्रवाह त्यावर केंद्रित होतो. तसेच पत्रिका पाहण्यापूर्वी आपल्या समस्या ज्योतिषांना सांगितल्या की त्यांची सूक्ष्मदृष्टी संबंधीत बाबींवर केंद्रित होते. हे झाल्यावर तुम्ही तुमची कुंडली ज्योतिषांना द्या. आम्ही स्वत: इतर कुंडल्यांवर विसंबून रहात नाही. तर त्या व्यक्तिच्या जन्मवेळेचा तपशील सॉफ्टवेअरवर टाकून त्याची कुंडली आमच्या संगणकावर बनवतो. कारण सॉफ्टवेअरवर बनविलेल्या कुंडल्या अधिक अचूक असतात. त्या अधिक सूक्ष्मही असतात. त्यामुळे भाकितातील अचूकता वाढते. त्याचप्रमाणे ज्योतिषांनी त्याच्या संगणकावर तुमची कुंडली ठेवल्यामुळे, पुढे कधीही काही समस्या असल्यास, मार्गदर्शन हवे असल्यास फोनवरून सर्व सल्ला देता येतो. फोनवर कुंडलीतील घरे त्यांच्या राशी त्यांच्यातील ग्रह हे सांगत बसणे वेगळे आणि मी अमुक अमुक जरा माझी कुंडली पहा हे सांगणे वेगळे. दुसरी गोष्ट म्हणजे जो ज्योतिषी संगणकासारख्या साधनांचा उपयोग करतो तो जास्त organised असतो. त्याची या शास्त्रावरील श्रद्धा, बांधिलकी आणि उत्तरदायित्व अधिक असतं. म्हणूनच तो त्याच्या क्षेत्रात अधिकाधिक उत्तम गोष्टी आणण्याचा प्रयत्न करीत असतो. अचूकतेची कास धरल्यामुळे भाकितात फरक येतो. हाताने बनविलेल्या अनेक कुंडल्या चुकीच्या असल्याचे आम्ही पाहिलेले आहे. विशेषत: चंद्र २७ अंशाच्या पुढे एखाद्या राशीत असतांना अनेकदा रास चुकलेल्या पत्रिका आमच्या समोर आलेल्या आहेत. एवढेच काय आमची स्वत:ची रास आमच्या एका विद्वान नातेवाईक ज्योतिषांनी बनविलेल्या कुंडलीत सिंह दिली आहे, जी खरेतर कर्क आहे. आम्ही त्यांनाही दोष देत नाही कारण टिळक आणि इतर पंचांगात अश्विन्यारंभ बिंदूवरूनच मतभेद आहेत. असो.ते जाऊ द्या. सांगण्याचा मुद्दा हा की, शक्यतो संगणकावर बनविलेली कुंडली आपण घेऊन जावी किंवा त्या ज्योतिषांना जन्मवेळेचा तपशील देऊन त्यांच्या संगणकावर आपली कुंडली बनविण्यास सांगावे. पण कित्येकांच्याकडे संगणक असेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे जातांना आपण आपली संगणकावर तयार केलेली कुंडली सोबत घेऊन जाणे इष्ट. हल्ली दोनशे रुपयात संगणकावर "सखोल" कुंडली बनवून मिळते. साधी कुंडली पन्नास/साठ रुपयात करून मिळते. पण त्यात फक्त लग्नकुंडली, राशीकुंडली आणि ग्रहदशा एवढीच माहिती असते. तशी न बनवता अधिक पैसे देऊन एकदाच सखोल कुंडली बनवून घ्यावी ज्यात वरील गोष्टींसोबत इतर विविध कुंडल्या म्हणजे नवमांश, त्रिशांश, होरा, द्रेष्काण, विदशा, ग्रहयोग, षडवर्गबल यांची इत्यंभूत माहिती असते. ही कुंडली एकदा त्यांच्यासमोर ठेवली की आपण गप्प बसावे. त्यांना ती बारकाईने अभ्यासण्यासाठी संधी द्यावी. यावेळेस वायफळ बडबड करून त्यांचे लक्ष विचलित करू नये. कारण इथे तुमच्या कुंडलीचा खरा अभ्यास सुरू झालेला असतो. तुमचे लग्न आणि तुमची रास यावरून तुमच्याबद्दल काही गोष्टी ते ज्योतिषी ठरवत असतात. मधूनच ते तुमच्याकडे पाहतात. तुमच्या लग्नस्थानात असलेल्या ग्रहाची खूण तुमच्या चेहर्‍यावर आहे का याची खात्री करतात. कोणत्या लग्नाला कोणते ग्रह तारक आहेत कोणते ग्रह मारक आहेत त्याचे आडाखे ते मनात बांधतात. पत्रिकेत कोणता ग्रह कोणत्या राशीत, कोणत्या नक्षत्रात आहे हे ते पाहतात. त्यानंतर स्थाने पहायची असतात. प्रत्येक भाव तपासायचा असतो. तो भाव, त्याचा कारक ग्रह कोणता, तो कुठे आहे, त्याची कुंडलीतील स्थिती काय आहे, त्या भावात कोणती रास आहे, त्या भावाचा भावेश कुठे आहे, तो कोणत्या नक्षत्रात आहे, त्याच्या सोबत कोणते ग्रह आहेत, तो मित्रराशीत आहे की शत्रूराशीत, त्याच्यावर कोणते योग आहेत, त्याचा कोणाशी परिवर्तन योग आहे, कुंडलीतील प्रत्येक ग्रहाचे इतरांशी योग कोणते आहेत, युती कोणाची, लाभयोग कोणात आहे, केंद्रयोग कोणात आहे, प्रतियुती कोणाची आहे, षडाष्टक कोणाचे आहे, जन्मनक्षत्र कोणते, जन्मत: महादशा कोणाची होती, त्यातील भुक्त किती, भोग्य किती, एक ना अनेक गोष्टी बघायच्या असतात. या सर्व गोष्टी नीट पाहण्यासाठी किमान वीस मिनीटे लागतात. त्याकाळात ते काही प्रश्न विचारतात. त्यांची नेमकी उत्तरे आपण द्यायची असतात. त्यावरून त्यांना विचारांची दिशा गवसत असते. कुंडलीचा दर्जा समजत असतो. अशा वेळेस फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे यापलिकडे आपण काहीही करू नये. आपण अनावश्यक बाबी बोलून त्यांच्या विचारप्रक्रियेत अडथळे आणत असतो याची जाणीव अनेकांना नसते. गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना ते आम्हाला श्री. नारायण राणे यांनी केलेल्या विधानांबद्दल सांगत होते. एकदा झालं दोनदा झालं, तिसर्‍यांदा जेव्हा ते म्हणाले की, "पंत, नारायण राणे मुख्यमंत्री होतील का?" तेव्हा आम्ही त्यांना सांगितले " अहो, तुम्हाला आम्ही तुमच्या कुंडलीबाबत सल्ला द्यावा की श्री. राणे यांच्या कुंडलीबाबत? त्यांना जे काही करायचे आहे, ते करायला ते समर्थ आहेत. तुम्ही कशाला ते प्रश्न इथे उपस्थित करता आहात? तुम्ही तुमची कुंडली घेऊन आमच्याकडे आला आहात, तर तिचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला आवश्यक तेवढी एकाग्रता साधू द्या की". तर असे होते. एकदा ज्योतिषांनी कुंडलीचा संपूर्ण अभ्यास केला की ते तुम्हाला सांगतात की, "विचारा आता". तेव्हा तुमची प्रश्नांची यादी काढून एक एक प्रश्न त्यांना विचारावा. प्रश्न विचारल्यावर ते काय सांगत आहेत ते नीट समजून घ्यावे. न समजल्यास पुन्हा पुन्हा विचारावे. महत्वाचे मुद्दे आपल्या अक्षरात लिहून घ्यावेत. एका एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले की पुढील प्रश्नाकडे जावे. अशा रितीने आपले सर्व प्रश्न त्यांना विचारून आपले संपूर्ण शंकासमाधान करून घ्यावे. पुन्हा पुन्हा त्यांना फोन करावा लागणार नाही याची काळजी घ्यावी. शेवटी आपण काय काय करायला हवे ते विचारावे. ते जे काही थोडक्यात सांगतील ते नमूद करून ठेवावे. त्यांनी अमुक अमुक तारखेपर्यंत अमुक अमुक गोष्ट करू नका असे सांगितले असेल तर त्या तारखा आपण नीट नमूद केल्या आहेत याची खात्री करून घ्यावी. सर्व शंकांचे समाधान झाल्यावर त्यांची ठरलेली दक्षिणा म्हणा वा मानधन देऊन त्यांचा निरोप घ्यावा. सांगितलेल्या गोष्टींचा पडताळा येईल तेव्हा त्यांना अवश्य फोन करून कळवावे. त्यामुळे ज्योतिषी आणि जातक यांच्यातील स्नेह वाढीस लागतो. वरील गोष्टींबरोबर, आपल्या कुलदैवताचे आणि कुलस्वामिनीचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे. त्यांच्या नावाने घरात पूजापाठ करावा. सदगुरूंकडून जर मंत्र घेतला असेल तर त्याची साधना करावी. या सर्व शक्ति अडचणीच्या वेळेस आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. आपला, (साधक) धोंडोपंत

वाचने 67342 वाचनखूण प्रतिक्रिया 137

धोंडोपंत गुरुवार, 01/03/2008 - 14:16
ह्या लेखाची लिंक येथे वेगळा विषय म्हणून दिली असती, तर जास्त संयुक्तिक झाले असते. मूळ लेखाशी विसंगत विचारांची लिंक देणे हे फारसे प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. प्रत्येकाने आपले विचार बाळगावेत आणि त्यानुसार जगावे. पण इतरांच्या विचारात अनाठायी हस्तक्षेप करून आपण म्हणतो तेच खरे ही वृत्ती असमर्थनीय ठरते. अशा पद्धतीचा उसना विवेक (borrowed wisdom) फारसा प्रकाश पाडू शकत नाही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे गुरुवार, 01/03/2008 - 14:48
पंतांच्या मताशी मी सहमत आहे. विकी नावाच्या ज्ञानकोशाबद्दल माहित होते,पण अज्ञानकोशाची आज पहिल्यांदाच माहिती मिळाली,याबद्दल आपले आभार्. आपल्या अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करू नये ही विनंती.

विकि गुरुवार, 01/03/2008 - 15:30
विसंगत लेख कसा . जसा तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार तसा आम्हाला पण आहे. हा विनायक कोण मला अज्ञानी म्हणणारा. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे गुरुवार, 01/03/2008 - 16:20
आम्ही कोण म्हणूनी काय पूसता.... तुझी चूक तुला दाखवण्यासाठी केलेला एक छोटासा खटाटोप. तुला मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे,पण दुसर्‍याचे मत खोडून स्वतःचे मत मांडण्याचा मात्र नाही.

In reply to by इनोबा म्हणे

विकि गुरुवार, 01/03/2008 - 16:27
पण मी तुझे मत थोडी खोडून काढले. मी फक्त त्या लेखावर दै. लोकसत्ताची लींक जोडली. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

धोंडोपंत गुरुवार, 01/03/2008 - 18:11
विकि महाशय, मत मांडण्याचा अधिकार तुम्हालाही आहेच. त्याबद्दल दुमत नाहीच. फक्त तुम्ही एक वेगळा विषय म्हणून तो मांडला असतात तर चांगले झाले असते. मूळ लेखाच्या विषयाच्या विरुद्ध तत्वाचे प्रतिपादन करणारे लेखन स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावेत असा आंतरजालावरील संकेत आहे. त्यात तुम्ही " त्या ऐवजी हे वाचा' असे शीर्षकात लिहिले आहे, हे लोकशाही मूल्यात बसत नाही. कारण लोकांनी काय वाचावे हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यासाठी तुम्ही स्वतंत्र लेखन करून तुमचे विचार मांडा. ज्यांना ते पटतील ते प्रतिसाद देतील. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर गुरुवार, 01/03/2008 - 15:50
वा पंत... आपण अतिशय मुद्देसूद लेख लिहिला आहे. एकंदरीतच या विषयाबद्दल लोकांचे निरनिराळे सम-गैरसमज फार पूर्वापार आहेत. आपल्या अश्या लेखांमुळे हे चित्र बरेच स्पष्ट होईल याची खात्री वाटते! असो.. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हे वाक्य फार आवडले, फार गहन अर्थ या वाक्यात दडलेला आहे असे आम्हाला वाटते! आपला, (ग्रहतार्‍यांतला) तात्या.

In reply to by डेंजर डॉन

छोटा डॉन Fri, 01/04/2008 - 08:30
च्यायला आमचंच भविष्य अवघड दिसाय लागलय !!! दिवसेंदिवस आमच्या प्रतिस्पर्धी गँग वाढतच चालल्या आहेत.... धोंडोपंत दादा, बधा आमच्यावर शनी वक्री आहे का? असेल तर लगेच शांती करून टाकू.... कसे???? छोटा डॉन [आमची कोठेही शखा नाही ]

In reply to by छोटा डॉन

धोंडोपंत Fri, 01/04/2008 - 14:01
छोटे डॉन महाशय, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे तशी तुमच्या क्षेत्रातही वाढतेय. स्पर्धेला सामोरे जा. शनीची काळजी करू नका. काळजी मंगळाची करा, तो तुमच्या मारामार्‍या आणि घातपाताच्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि सध्या मिथुनेत वक्री आहे. ३१ जानेवारीपर्यंत सामंजस्याने घ्या. मांडवली करण्याकडे कल ठेवा. आपला, (सल्लागार) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनीष पाठक गुरुवार, 01/03/2008 - 17:15
पंतकाका, खरच छान लेख. पुढे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जाताना तुम्ही नमुद केलेल्या गोष्टी जरुर लक्षात ठेवेल. (ज्योतिष प्रेमी ) मनीष पाठक

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/03/2008 - 18:04
धोंडोपंतांचे आणि आमचे ग्रह जुळतात बरं का? जरी ज्योतिष विषयक विचारांत मतभिन्नता असली तरी . आमचे पुस्तक "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " हे http://mr.upakram.org/tracker/582 या ठिकाणी लेखमाला या स्वरुपात चालू आहे. मला जेष्ठ ज्योतिषी श्री .श्री. भटांचे " ज्योतिषांपासून सावधान " या ग्रहांकित मधल्या जुन्या लेखाची आठवण झाली. काही ज्योतिषातील अपप्रवृत्तींमुळे ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे. ज्योतिषि व जातक यांच्यातील संबंधाबाबत आमचे मनोगत http://mr.upakram.org/node/777 येथे वाचा. धोंडोपंत चालू द्यात. आम्ही आपले वाचक तर आहोतच. व्यक्ती म्हणुन आपली सामाजिक संवेदनाशिलता आम्हि जाणुन आहोत. ( मूलत: ज्योतिषप्रेमी व धोंडोपंतांचा मित्र) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना गुरुवार, 01/03/2008 - 19:02
घाटपांडेसाहेबांची प्रतिक्रिया वाचून मजा वाटली. अशासाठी की मूलतः ज्योतिष नाकारणारे धोंडोपंत आता ज्योतिर्विद झाले आणि मूलतः ज्योतिषविद्येत पारंगत असलेले घाटपांडे ज्योतिषचिकित्सक आणि विरोधक बनले. दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :)

In reply to by विसुनाना

दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :) धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता धोंडोपंत, एखादी कविता टाका, दोन ध्रुवावर दोघे आपण .... अशी काहीतरी (धोंडोपंतांच्या ब्लॉगचे सौंदर्य आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Fri, 01/04/2008 - 14:04
धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता प्रकाशराव, आपल्याशी शंभर टक्के सहमत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/03/2008 - 21:10
पंत, ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर हा लेख आवडला !! आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. पण, आपण ज्या पद्धतीने या विषयाची चिकित्सका करता ते आम्हाला आवडते, अजून याविषयीचे असेच मार्गदर्शनात्मक लेख येऊ द्या !!! बाकी ज्योतिषाकडे गेल्यावर बरेच विचारायचे विसरुन जाणे. तिथे गेल्यावर दुसरेच प्रश्न विचारणे. कोणाचा तरी अनुभव ऐकत बसणे. सही !!!! आपला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (धोंडोपंताचा स्नेही )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत Fri, 01/04/2008 - 14:42
आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. प्राध्यापक साहेब, आपले म्हणणे खरे आहे. यात शास्त्राची चूक नसून ते वापरणार्‍यांची आहे. कुठलीतरी दोन चार पुस्तके वाचून स्वतःला ज्योतिषी म्हणवणार्‍यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे केवळ परंपरेनुसार घराण्यात चालत आले आहे, म्हणून या विषयात असलेले लोकही अनेक आहेत. खरे म्हणजे कोणतेही शास्त्र सखोलपणे अभ्यासायचे असेल तरच त्यात उतरावे. उगीच वरवर काहीतरी वाचून लोकांच्या आयुष्यावर भाष्य करू नये. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते आणि लोकांचा शास्त्रावरील विश्वासही उडतो. ह्या (अप)प्रवृत्तींपासून लोकांना वाचवून "हे दूध... हे पाणी" दाखवून देण्याची नीरक्षीरविवेकी भूमिका आम्ही स्विकारली आहे. आणि त्यास "फळे रसाळ गोमटी" आल्याचे आम्ही पहातो आहोत. अनेकदा आम्ही केलेल्या लेखनामुळे आम्हांला काही जणांचा रोष स्विकारावा लागतो. कारण आमच्या लेखनातून अनेकांच्या व्यावसायिक हितसंबंधाना धक्का बसतो. पण समाजाने अधिक चौकसपणे ह्या विषयाकडे पाहावे, यासाठी काही आहुती आम्हांला देणे भाग आहे. आम्ही एका अत्यंत विख्यात ज्योतिषांकडे गेलो असतांना तेथे आलेल्या एका ताईंच्या हातावर त्या ज्योतिषांनी संरक्षक(?) गंडा बांधला आणि त्यांच्याकडून अडीचशे रूपये घेतले. आलेल्या जातकाला ज्योतिषाने गंडा बांधावा, असे शास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. पण इतका मोठा नावाजलेला माणूस हे करतो, याचा समाजावर परिणाम असा होतो की, हेच शास्त्र असले पाहिजे असे लोकांना वाटते आणि त्यामुळेच शास्त्र बदनाम होते. जसे लघुशंकेला बसल्यावर लोक कानाला जानवे लावतात. या गोष्टीला शास्त्रीय आधार काहीही नाही. पूर्वीच्या काळी पुरूषदेखील बसून लघवी करायचे. असे म्हणतात की, काशीला एका मठाचे प्रमुख लघुशंकेसाठी बसले असतांना तिथे त्यांचे जानवे मुताने भिजले. तेव्हापासून ते जानवे भिजू नये म्हणून ते कानाला लावायला लागले. हे जेव्हा इतर लोकांनी पाहिले तेव्हा ते ही यांचे अनुकरण करायला लागले. काशी हे त्याकाळी विश्वविद्यापीठ समजलं जायचं. काशीतले ब्राह्मण जे करतात, ते खरे शास्त्र असा समज सर्वत्र असल्यामुळे पुढे "लघुशंकेला बसतांना जानवे कानाला अडकवायचे असते" ही गोष्ट शास्त्र म्हणून स्विकारली गेली. त्याची चिकित्सा झाली नाही. आणि आता मुंबईच्या बॉम्बे हाऊस या टाटांच्या कार्यालयीन इमारतीत आम्ही काही कामासाठी गेलो असतांना, तिथे मुतारीत उभे राहून लघुशंका करतांनाही कानाला जानवे अडकवणारे लोक आम्ही पाहिले . हे टाळण्यासाठी खरे काय आणि खोटे काय याचा शोध घेत राहिले पाहिजे. त्याच दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. आपला, (सत्यशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 19:45
जानव्याची अडचन होते तर मग जानवे घालावेच कशाला? जानवे मुंज वगैरेंसारख्या निरुपयोगी कालबाह्य प्रथा आपण कशाला जपतो अजूनही?

In reply to by विजुभाऊ

नेहेमी प्रमाणेच , प्रश्नांची उत्तरे आहे ... पण सांगितल्यावर अ‍ॅप्लाय करणार असाल तर सांगतो ... इथे चर्चा ज्योतिष विषयावर चालली आहे , ज्योतिष ही काही ब्राह्मण समाजाची प्रॉपर्टी नाही ...माझ्या ओळखीतले कित्येक ज्योतिषी अब्राह्मण आहेत ... तेव्हा ज्योतिष विषयावर चाललेली इतकी छान चाललीली चर्चा भट्कवु नये ही नम्र विनंती :)

व्यंकट गुरुवार, 01/03/2008 - 21:47
धोंडोपंतांचे ब्लॉग्ज आणि लेख मॅग्नेट आहेत, ते केवळ मार्गदर्शनच करित नाहीत तर एक कुतुहल आणि आकर्षण निर्माण करतात. अश्या कुतुहलात्मक ओढीतून झालेला अभ्यास फारा फलादायी असतो असा आमुचा अनुभव आहे. (धोंडोपंताचा दूरचा) -एकलव्य

विजय.पाटील Fri, 01/04/2008 - 06:09
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अर्थात जाहिरात करणे ह्यात अयोग्य काहीच नाही खरं तर मराठी माणूस त्यातच कमी पडतो. त्यामूळे लेख उत्तम जमला आहे हे नक्की. पुढील कारकिर्दीस शुभेच्छा!

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर Fri, 01/04/2008 - 06:19
पंतांच्या लेखात वेळ पाळणे, आधुनिक उपकरणे वापरणे हे उल्लेख जरूर आलेले आहेत, परंतु ते लेखाच्या ओघात आलेले आहेत आणि लेखाच्या दृष्टीने ते मुद्दे महत्वाचे असावेत म्हणूनच आलेले आहेत/असावेत. आम्ही पंतांना खूप जवळून ओळखतो आणि त्यामुळेच सदर लेखन पंतांनी कुठलीही जाहिरातबाजी करण्याकरता निश्चितच केलेले नाही असे खात्रीलायक म्हणू शकतो! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विजय.पाटील Fri, 01/04/2008 - 06:32
बरोबर आहे तात्या. 'टाईम मॅनेजमेंट','आधुनिक तंत्रज्ञान' वगैरे उल्लेख जरूरी आहेत पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक...' म्हणूनच म्हणतो जाहिरात करणे ह्यात चूक काहीच नाही. त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. त्यामूळेच आमच्या पोष्टचा शेवट देखिल आम्ही 'लेख उत्तम जमला आहे हे नक्की'. असाच केला आहे. त्याकडे आवर्जून लक्ष द्यावे.

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर Fri, 01/04/2008 - 07:00
पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. का बरं अनावश्यक आहे? 'आधी केले मग सांगितले' यात गैर ते काय?? जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक... असहमत आहे! उदा, मी जेव्हा समभाग बाजारावर एखादा लेख लिहितो तेव्हा समभाग खरेदीविक्री संदर्भात मी स्वत: कुठली पद्धत अवलंबतो, कसे निर्णय घेतो, इत्यादी गोष्टी लिहिल्यास ते जाहिरातपर किंवा आत्मस्तुतीपर लेखन ठरत नसून, उलटपक्षी याच गोष्टी माझा लेख अधिक परिपूर्ण बनवतात! त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. मी पाहात नाहीच आहे परंतु आपल्याच प्रतिसादातून तशी तुच्छता जाणवते आहे, तसेच 'जाहिरात', 'आत्मस्तुती' वगैरे शब्दच्छलही दिसतो आहे!! असो.. प्रत्येकाने कुठला चष्मा लावून या लेखनाकडे पाहायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तसाच तो आपलाही आहे! मला या विषयासंदर्भात पुढे काहीच लिहायचे नाही.... तात्या.

In reply to by विजय.पाटील

धोंडोपंत Fri, 01/04/2008 - 15:06
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अभिप्रायाबद्दल धन्यवाद, आपल्याला यात जाहिरात वाटली हे आमचे दुर्दैव. खरे तर आम्ही आमची कार्यशैली सांगितली आहे. स्वतःच्या कार्यप्रणालीबद्दल बोलणे ही जाहिरात नसते, असे आम्हाला वाटते. आणि जाहिरात करण्याची आवश्यकता आम्हाला कधी भासली नाही. जाहिरात अशा लोकांना करावी लागते ज्यांच्याकडे काम नसते. आज परिस्थिती अशी आहे की, आम्हांला अनेकांच्या पत्रिका बघणेही शक्य होत नाही. केवळ भेटीच्या माध्यमातून नव्हे तर आमचे ई विश्वातील ब्लॉगवाचक, विविध समुदायांवर आम्हाला ओळखणारे लोक, ऑर्कूट, याहू सारख्या व्यासपीठांवर झालेल्या मित्रमैत्रीणीं, त्यांचे नातेवाईक अशा अनेकांच्या कुंडल्या, इमेलच्या आणि गुगलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यातून आमच्या मेलबॉक्समध्ये रोज येत असतात . या मिसळपाववरही असे लोक आहेत की ज्यांना आमचे मार्गदर्शन हवे आहे पण वेळेअभावी अजून ते शक्य झालेले नाही. जसजसे जमेल तसतसे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही जरूर देतोच पण पृच्छकांची संख्या आणि आमच्याकडे उपलब्ध असलेला वेळ यांचे गणित काही केल्या जमत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे जाहिराती करण्याची आम्हांला आवश्यकता नाही हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर "नाही घाटावे लागतं, एक शित कळे भात" धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Fri, 01/04/2008 - 14:06
लेखावर अभिप्राय देणार्‍या सर्वांना मनापासून धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर Wed, 01/16/2008 - 01:48
छान लेख्....विशेषत: डोक्टर आणि पेशण्ट असे साम्य दाखवल्यामुळे विषय लवकर मनात पोचतो......भविष्यात या माहितीचा वेळ पडल्यास खूप उपयोग होईल्.....धन्यवाद....

आप्पा Fri, 10/04/2013 - 15:03
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

आप्पा Fri, 10/04/2013 - 15:04
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

In reply to by आप्पा

आदूबाळ Sat, 10/05/2013 - 12:05
असं मलाही वाटतं. पण तो एक इतिहास आहे आणि धोंडोपंत परत लिहिण्याची शक्यता धूसर आहे. www.dhondopant.blogspot.com इथे त्यांचं लेखन वाचायला मिळेल...

विजुभाऊ Sat, 10/05/2013 - 11:26
गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना
बहुतेक वेळेस या लेखक महाशयानी स्वतःचा उल्लेख "आम्ही" असा केलेला आहे . हा स्वतःविषयीचा अती आदर आहे की अनेक वचन आहे हे स्पष्ट होत नाहिय्ये

In reply to by अनिरुद्ध प

उपाशी बोका Sun, 10/06/2013 - 21:53
राजा, संपादक आणि वेडा हे लोक 'आम्ही' हा शब्द अधिकाराने वापरू शकतात, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. कदाचित संपादक या नात्याने धोंडोपंत असे लिहित असतील.

चित्रगुप्त Mon, 10/07/2013 - 01:37
स्वतःसाठी 'आम्ही' हा शब्द वापरणे हे त्या काळातील बोलण्याच्या पद्धतीचा अवशेष असावा, जेंव्हा एकंदरीतच आदरार्थी संबोधने फार वापरली जात. उदा. पत्नीस 'अहो' म्हणणे, पतीस 'इकडली स्वारी' म्हणणे, स्वतःच्या मुलांचा उल्लेखही 'बाळासाहेब' अक्कासाहेब' असा करणे, अन्य लोकांचा उल्लेख धोंडोपंत, शंकरराव, जोशीसाहेब, घारूअण्णा, बंडूतात्या, वसंतअप्पा इ. करणे. लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) ज्योतिषविद्येबद्दल 'विद्या' हा अतिशय चपखल आणि समर्पक शब्द असताना ज्योतिष हे 'शास्त्र' आहे की नाही, (काहींच्या मते अमेरिकेतील अमूक जर्नलाने जर 'शास्त्र' म्हणून मान्यता दिली, तरच तो विषय शास्त्र या संज्ञेस पात्र होतो वगैरे) अश्या प्रकारची चर्चा बरीच वाचायला मिळते, परंतु समतोल दृष्टीकोणातून केलेले विवेचन क्वचितच आढळते. या लेखमालेतून असे समतोल लेखन वाचायला मिळेल, ही आशा. आम्ही (वा कुणीतरी) आमच्या गतजीवनातील पाच-दहा अगदी ठळक घटना केंव्हा घडून आल्या होत्या, तसेच अन्य काही प्रश्न आमची पत्रिका तपासून सांगावे, अशी विनंती जर प्रस्तुत धागालेखकास केली, आणि त्यांनी तसे करून सांगितलेली माहिती अगदी बरोबर निघाली, तर खरोखर वाचकांचे समाधान होईल, असे वाटते. ... याविषयी धागाकर्त्याचे काय मत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) असे आमचेही मत आहे ;)

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ Tue, 10/08/2013 - 16:05
बर्रूब्बर . ला रीव्हे गाउचे म्हणजे नदीचा डावा किनारा ( कोणीकडून डावा हे विचारू नये) पॅरीसच्या या भागात चित्रकार, सम्गीतकार रहायचे. जगप्रसिद्ध हस्तसामुद्रीक "किरो " हा सुद्धा फ्रेन्चच होता. पॅलेस्टाईन फेम गाझा पट्टी देखील लेफ्ट बॅन्क मधेच येते. पॅलेस्टाईन वर हल्ला करताना इस्राईल ने कधीच ज्योतिषाचा सल्ला घेतला नाही. त्यामुळेच की काय त्याना स्वतःचे आस्तित्व टिकवून नवे राष्ट्र बळकट करण्यात यश आले आहे. राष्ट बळकट असले की वाट्टेल त्याला हात दाखवता येतो. म्हणून्च हा हा हा "ला उगाच:

दादा कोंडके Tue, 10/08/2013 - 10:32
ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर
ज्योतिषांकडे जाताना जोडे घेउन जावेत. आणि ज्योतिषांकडे गेल्यावर.. हॅ हॅ हॅ... :D

समोरच्याला, सध्या काय वाट्टेल ती परिस्थिती असो "तुमचा भविष्यकाळ सुखाचा आहे" हे पटवून देतात! आणि स्वतःचा हेतू साध्य करतात.

सुहासदवन Tue, 10/08/2013 - 13:33
ज्योतिषांकडे जातांना
मुळात ज्योतिषाकडे जावेच कशाला? स्वतःचा लहानपणीचा काळ आपल्यालाच धड आठवत नाही तर मग ज्योतिष्याला काय आपला मागचा जन्म आणि प्रारब्ध आठवणार? स्वतः ह्या जन्मात केलेली चांगली वाईट कर्मे ओळखा आणि त्याची जी काय फळे मिळणार आहेत ती स्वतः भोगायला तयार राहा.
ज्योतिषांकडे गेल्यावर
- गप्प राहावे. ज्योतिषी आणि पत्रिका ह्या दोघांनाच बोलू द्यावे. मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे. जर खरच माझ्या पत्रिकेत त्याला माझे आयुष्य दिसत असते तर निदान एकदा तरी मला सांगायला हवे होते ठामपणे की तुम्ही जे बोलत आहात त्यावर माझा विश्वास बसत नाही. डॉक्टरची, कोर्टाची आणि ज्योतिष्याची पायरी चढू नये.

In reply to by सुहासदवन

अत्रन्गि पाउस Wed, 10/09/2013 - 10:26
मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे." मी पण एका डॉक्टर कडे गेलो आणि मला होत नसलेले त्रास त्याला आई हुई करत सांगितले..त्याने पण मी सांगत असलेल्या लक्षणांवरून काही उपाय सांगितले...औषध दिले ...मी काहीच औषध उपाय नं करता बर झालो... पण त्या तज्ञ डॉक्टरला हे कळलेच नही कि मला मुळातच काही होत नाहीये... सुज्ञास सांगणे नलगे..

टिंगल करता काय ज्योतिषाची? आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल. जेव्हा सगळ काही सुरळीत असत तेव्हा ही असली थेर सुचतात.इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी! बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,, (जिज्ञासूंनी अजून भर घालावी)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुहासदवन Wed, 10/09/2013 - 09:38
आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल.
अजिबात नाही. एखादा झटका बसला तर हजारो इतर उपाय आहेत ना करायला, ज्योतिष आणि देव देव करायचे सोडून. आम्ही स्वतः समर्थ (गैरसमज नसावा) आहोत आमच्या समस्यांची काळजी वाहायला. उगाच देवाला कशाला त्रास? त्याला राहू दे न मस्तपैकी.
इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी!
हे मात्र बरोबर. कधी कधी जेव्हा एखादा शनिवार रविवार काहीच मनोरंजनाचे साधन नसते तेव्हा एखाद्या मित्राला घेऊन जोतीष्याकडे जायचे आणि मग धमाल फुल टू टाईमपास.
बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,,
त्या पेक्षा तुम्हीच आजच्या सुधारलेल्या जोतिष्यांना सांगा ना आमच्या विज्ञानाने निर्माण केलेले संगणक आणि इतर प्रणाली वापरू नका म्हणून. बघूया काय होतंय ते. चमत्कार आणि साक्षात्कार हे फक्त टीवी आणि पुस्तकातच होतात प्रत्यक्षात नाही ह्यावर ठाम विश्वास असणारा

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे Wed, 10/09/2013 - 09:46
हे मात्र पटले नाही घाटपांडे साहेब , मी स्वतः आयुष्यात बर्याच उतार चढावातून गेलो आहे (आपल्या भाषेत झटका) ज्यात करियर पासून जीव(रोगामुळे) हे दावणीवर लावलेले होते तरीही कधी ज्योतिषाकडे जावे असे मला वाटले नाही किंवा मी कोणत्याही देवाला पाण्यात ठेवणे अथवा नवस बोलणे असे केले नाही . त्यात ज्योतिषाचा किंवा विज्ञानाचा भाग नाही. हा केवळ मानसिकतेचा भाग आहे. ज्यावेळी माणूस एखाद्या संकटातून जात असतो तेंव्हा त्याला मानसिक आधाराची गरज असते. यावेळेस जो कोणी मानसिक आधार देईल तो माणूस त्यावेळी महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने माझ्या अशा संकटांच्या वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मला अशा वेळेस सुद्धा ज्योतिषांकडे जावे असे वाटले नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"हे श्री स्वामी समर्थांचे वाक्य त्यांच्या शिष्यांना असेच आत्मिक बल देत असतात असे ऐकले आहे. आपण संकटाच्या वेळेस आपल्या मुलांच्या मागे असे खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांना दुसर्या आधाराची गरज वाटणार नाही. माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे परंतु मला अजूनही ज्योतिषांकडे जावेसे वाटत नाही. एवढेच आहे कि मी स्वतः ज्योतिष हि विद्या आहे हे मानतो पण अजून ते विज्ञान आहे असे मानण्यास तयार नाही. बाकी लोकानी आपला विचार आपण करावा

In reply to by सुबोध खरे

सुहासदवन Wed, 10/09/2013 - 10:14
मला प्रत्यक्ष कोणतीही व्यक्ती आणि जोतिष ह्याबद्दल वैयक्तिक आकस नाही. पण ज्योतिष हा निव्वळ ठोकताळा आहे हे वारंवार माहीत होऊन देखील आपल्या समाजातील लोकांचा त्यावर असणारा विश्वास कमी होत नाही ह्याबद्दल खरंच खेद वाटतो.
माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे.
माफ करा, राग मानू नका पण अशी टक्केवारीतील खरी होणारी भविष्ये प्रत्येकाच्या पत्रिकेत असतात आणि ती खरी होतात देखील कारण ती जेनेरिक वाक्ये असतात स्पेसीफिक नव्हे. माझ्याही पत्रिकेतील बहुतेक वाक्ये खरी आहेत पण तीच वाक्ये थोडी बहुत करून इतर दुसऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेत देखील आहेत. वाटल्यास तपासून पहा.

In reply to by सुहासदवन

दादा कोंडके Wed, 10/09/2013 - 11:15
सहमत. उच्चशिक्षीत लोकं जेंव्हा असं म्हणतात तेंव्हा विषाद वाटतो. ज्योतिषावर किंवा देव-देवादीकांवर विश्वास असंण्यामागचं कारण, संस्कार असतात. लहानपणी वातावरण, आई-वडील आणि इतर जेष्ठ मंडळींमुळे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्यांना काही अनुभव-अनुभुती आलेले असतात, नंतर थोडं कळायलागल्यावर आणि विवेक आल्यावरदेखिल त्यांच्यावरील प्रेम-आपुलकीमुळे ही डोक्यावर बसलेली भुतं सहजासहजी उतरत नाहीत.

In reply to by सुहासदवन

अनिरुद्ध प Wed, 10/09/2013 - 13:08
तपासुन पाहिल्यावर असे आढळले कि जे काही जेनेरिक म्हणुन लिहिले गेले आहे ते माझ्या बाबतित तरी २०% सुद्धा बरोबर नाही आले आहे,म्हणजेच आपला ९०% चा दावा माझ्या बाबतित तरी खोटा ठरला आहे,आता तुम्ही म्हणाल अपवाद आहे,कारण वैज्ञानिक भाषेत सुद्धा अपवादा शिवाय नियम सिद्ध होत नाही असे म्हणतात.

बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 12:44
सर्वश्री सुबोध खरेजी, सुहासवदनजी आणि दादा कोंडकेजी: घाटपांडेकाकांचा प्रतिसाद उपरोधिक होता. टोनवरून अन त्यांच्या आधीच्या लेखांवरूनच समजतंय की ते.

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 13:05
खरे आहे घाटपांडे काका. आम्ही जे सांगतो ती गोष्ट खरी. आम्ही काही वेळा ज्याम्च्या थेट सम्बन्ध नाही त्याला समजू नये मात्र समजणाराना इशारा मिळावा अशा भाषेत सांगतो हे असे करायला ऋषी मुनीनी वैदीकानी सांगितले आहे. अगदी पाश्चात्य दाखले घ्यायचे तरी घ्या . ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) यानी देखील असेच सांगितले आहे्एच बघाना एकविसाव्या शतकातील युद्धा बद्दल त्यानी लिहून ठेवले आहे पाण्याखालून आग ओकली जाईल. हवेतून झेप घेईल विजयी होईल तो जेंव्हा कणाना संदेश मिळेल. सूर्य जमिनीवर येईल किती स्पष्ट शब्दात ऋषी निरुत्तर दमनस यानी अणू युद्ध आणि अणू पाणबुडीबद्दल सांगितलेले आहे इतके स्पष्ट सांगुनेही ज्यांच्या ताच्याशी थेट संबन्ध नाही अशा इतरेजनाना यातून बोध मिळणार नाही मात्र समजणाराला इशारा मिळेल. जगाचा अंत कसा होईल यावर ऋषी निरुत्तर दमनस म्हणतात. आकाशातून वर्षाव होईल. ढग फुटून जातील तप्त धरती शुक्र मंगळाची युति लांडगा अस्वलाला मारेल. उंट जिराफा च्या घरी जाईल वायू तापेल पाण्याखाली. मासे उडून जातील. आम्ही याचे विष्लेषण केले आहे. मात्र तेदेखील अस्पष्ट ठेव असे द्रष्ट्याने सांगितले आहे. म्हणून त्याच्याच भाषेत म्हणजे ज्याचा संबन्ध नाही त्याला कळणार नाही असे ठेवले आहे. आम्ही जे साम्गतो तेंव्हा असेच साम्गतो

मदनबाण Wed, 10/09/2013 - 13:52
ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) ह्म्म... मला स्मरते आहे की ट्वीन टॉवरवर विमान कोसळण्याच्या बरेच वर्ष आधी मी नॉस्ट्रेडेमस वर आधारीत एक चित्रपट बघीतला होता, मला वाटत त्यात ट्वीन टॉवर सारखे टॉवर पडताना दाखवले होते. ज्या वेळी ९/११ झाले तेव्हा तो चित्रपट मला आठवला होता. बहुतेक चित्रपटाचे नाव होते :- The Man Who Saw Tomorrow जाता जाता :-आता सहज म्हणुन जालावर या बाबत शोधाशोध केली तर जसे मला वाटले होते,तसेन ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट ही घटना घडण्याच्या बर्‍याच आधी काळ पाहिला होता त्यांच्या मनात सुद्धा ही घटना घडल्यावर हाच चित्रपट आला{नॉस्ट्रेडेम}) आला.

सुबोध खरे Wed, 10/09/2013 - 13:55
साहेब, माझ्या जन्माच्या वेळेस त्या ज्योतीषानी लिहून ठेवलेले आहे कि मेडिकल मध्ये करियर मिळेल. मुलगा लष्करात जाईल आणि मोठ्या हुद्द्यावर चढेल पण हे सर्व सोडून येईल.मी लष्करात देशभक्ती साठी गेलो नाही. माझा मुंबईच्या मेडिकल कॉलेजचा प्रवेश केवळ २ गुणांनी हुकला आणि प्रवेश परीक्षेतून केवळ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. यानंतर मी नौदलात कमांडर या हुद्द्यापर्यंत( जोईंट कमिशनरची पातळी) चढलो आणि काही कारणास्तव मी ते सर्व सोडून दिले. आता हे इतके सर्व जर "लिहिले" आहे तर त्याला ठोकताळा कसे म्हणावे.जमले तर माझी जुनी पत्रिका अपलोड करायची तयारी आहे. यात मुलगा भरपूर शकेल भरपूर पैसे मिळवेल डोक्याला मार लागेल किंवा पचनाची तक्रार असेल अशी गोल गोल वाक्यरचना आहे असे नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.(मी शुद्ध मराठी बोलत होतो म्हणून लष्कराबद्दल बोलायला ते चाचरत असावेत) या ज्योतिषाकडे मी मित्राच्या बरोबर गेलो होतो आणि माझे पैसे सुद्धा त्यानेच भरले. ( माझा तेंव्हा सुद्धा ज्योतिष हे शास्त्र आहे यावर विश्वास नव्हता आणि आजही नाही). मी त्याच्या बरोबर गेलो होतो ते केवळ त्याला मराठी येत नव्हते म्हणून. एखाद्या ज्योतिषाला असे खरच आहे काय हे तपासायचे असेल तर मी माझी जन्मतारीख वेळ आणि स्थळ सांगण्यास तयार आहे. मला त्यांच्या भविष्यात रस नाही. फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.

In reply to by सुबोध खरे

गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.
एक शंका आहे कि फक्त जन्मतारीख सांगून पत्रिका तयार होत नाही. त्या ज्योतिषाने सरकारी नोकरी पत्रिकेत लिजिलेली आहे असे सांगितले. मग त्याने कशाच्या आधारे हे सांगितले? सांगितलेले भाकित खरे आले याबद्दल दुमत नाही. मला असे वाटते की त्याने हे अंतंस्फुर्तीने सांगितले असावे. ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे. खर येणे हा योगायोगाचा भाग असू शकतो.
फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.
या मताचा आदर आहे.मला आपली भूमिका मान्य आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त Sun, 10/20/2013 - 20:19
ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे.
या 'अंतस्फुर्ती' लाच पतंजली 'प्रत्यक्ष ज्ञान' म्हणतात, असे वाटते. यालाच 'इंद्रियातीत बोध' असेही म्हणू शकतो. भविष्य जाणून घेणे हे या बोधातून शक्य आहेसे दिसते. 'चित्तवृत्तीं'चा लोप झाल्यावर हा बोध निखळपणे प्रकटतो, वगैरे पतंजलींच्या योगसूत्रातून सांगितलेले आहे. मी काही काळ केलेल्या लंबकाच्या प्रयोगातून सहजपणे भविष्य जाणू शकलो होतो, परंतु त्यामागचे नेमके कार्यकारण कळले नाही. तेवढी लायकी वा साधना नाही असेच म्हटले पाहिजे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे Mon, 10/21/2013 - 11:01
फक्त जन्म तारीख नव्हे तर बरोबर जन्म वेळ आणि जन्म् ठिकाण सांगितले होते.वडिलांच्या मित्राच्या रुग्णालयात जन्म झाल्याने वेळ पण अचूक ठाऊक आहे तपशील कमी टंकल्याबद्दल माफ करा. (दोन्ही ज्योतिषानि जवळ जवळ त्याच गोष्टी सांगितल्या. का आणि कसे ते माहित नाही. तरीही आजही मी ज्योतिष शास्त्राकडे आणि ज्योतिषांकडे संशयानेच पाहतो.कारण ते शास्त्र आहे असे शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होत नाही तोवर असेल. कदाचित आधुनिक(?) शिक्षणाचा प्रभाव असावा.

१)पुणे विद्यापीठाने केलेल्या डबल ब्लाईड टेस्ट मधे असे निदर्शनास आले आहे की ज्योतिषाला शास्त्र म्हणता येईल असा स्टाँग स्टॅतिस्तिकल इव्हिडन्स ( भक्कम सांखिकीय पुरावा ) नाही . त्यामुळे सायंटीफिकली हा विषय संपलेला आहे . २) आता लॉजिकली , समजा ज्योतिष खरे आहे असे मानले , क्ष माणसाचे कोनत्या एका विषिष्ठ घटने बाबत , भ०(क्ष) हे भविष्य प्रेडिक्ट केले तर क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ१(क्ष) असे असेल , पण परत क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ२(क्ष) .... मग भ३(क्ष) ...भ४(क्ष)... भ५(क्ष) असे हे इन्फायनाईट रेग्रेस होईल जस्ट लाईक Turtles All the Way Down. सो लॉजिकली ही जोतिष शास्त्र असु शकत नाही .( इथे मनुष्य , कर्तृत्वाने भविष्यात बदल घडवु शकतो , हे गृहीत धरले आहे which requires proof ... but lets lets discuss it some other time ) ३) सायकॉलॉगिकली , ज्योतिष हे एक प्रकारचे "कंडिशनिंग" असावे (क्लासिकल कंडिशनिंग सारखे) सोप्या शब्दात ... क्ष ग्रह य स्थानात असला की झ परिणाम होतात हे कोणी तरी आधी सांगुन ठेवल्या मुळे माणुस त्यासाठी कंडीशन्ड होतो पुर्वी एका ऋषींनी मांजर पाळली होती , ती यज्ञात सारखी मधे मधे करायची लोकांचे चित्त विचलीत व्ह्यायचे , मग गुरुजींनी यज्ञा आधी ती मांजर एका खांबाला बांधायला सुरुवात केली मग यज्ञ व्यवस्थित पार पडु लागले ... पण मांजर खांबाला बांधल्याने यज्ञ व्यवस्थित पार पडतो असे कंदीशनिंग झाल्याने ती मांजर मेल्यावर शिष्य लोक दुसर्‍या कडची मांजर आणुन यज्ञा आधी आवर्जुन त्या खांबाला बांधु लागले ज्योतिषही असाच काहीसा प्रकार असावा ...ह्यावर एकदा अभ्यास केला पाहिजे ...मस्त पी एच डी विषय होवु शकतो हा :) अवांतर : पंत , जरा सांगता काहो आमच्या पत्रिकेत ज्योतिष शिकण्याचा योग कधी आहे ते ? ...हा घ्या आकडा ७३ !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 14:42
भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच!!!! पण वर मजा अशी, की कुणीही वर्तवलेले भविष्य गंडल्यास शास्त्र गंडलंय असं कोणीही सांगत नाही...फक्त तो विशिष्ट ज्योतिषी गंडला असे सांगतात आणि वर तार्किकतेचा दावा करतात. तथाकथित शास्त्रवाद्यांचे हे मोठेच तार्किक वर्तन बरे!!!!

In reply to by बॅटमॅन

अगदी सेम सेम अर्ग्युमेंट !! जेव्हा श्रीमदाद्यशंकराचार्य विविध वादविवादांमध्ये बौध्द मताचे खंडन करायचे तेव्हा बौध्द भिक्कु हेच लॉजिक वापरायचे "मति दौर्बल्यंमेतत , न मत दौर्बल्यं ||" पण आचार्यांनी ह्या विधानाचे ही तार्किक दृष्या खंडन केले आहे ... (line of arguments आत्ता आठवत नाहीये , घरी आलो की बघुन पेस्ट करतो ) आपण हीच तार्किक विधाने देवुन ह्या दाव्याचे खंडन करु शकतो !!

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके Wed, 10/09/2013 - 16:01
वर इथं म्हटल्याप्रमाणे,
प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा
म्हणजे बोलतीच बंद. दुसरा नियम असाही करावा की भविष्य खरं ठरलं नाहितर स्वतःचच नशीब खोटं आणि भविष्यकळून घ्यायचाच योग नसल्याचं मान्य करायला हवं.

क्रेझी Wed, 10/09/2013 - 15:16
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?

In reply to by क्रेझी

विजुभाऊ Wed, 10/09/2013 - 19:23
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?
अर्रर्रर्र्र.......... तुम्ही आणखी एक नवी सबब शोधून दिलीत की. खोटे ठरले तर दोष प्रोग्रामर चा. खरे ठरले तर श्रेय ज्योतिषाला

In reply to by क्रेझी

अनिरुद्ध प गुरुवार, 10/10/2013 - 11:49
ती असलीच तरिही ज्याचा विद्येचा सखोल अभ्यास असेल तो ती पत्रिका स्वता नव्याने बनवुन ताडु शकतो,काही जण असेही ऐकलेले आहेत जर आपण एखद्या व्यक्तिचे प्रकाशचित्र आणि कुन्डली दिलीत तर ते प्रकाशचित्र पाहुन सान्गतात कि ती कुन्डली त्या व्यक्तीची आहे किवा नाही.

विटेकर Wed, 10/09/2013 - 15:31
भविष्य पहाणे हा मानसिकतेचाच भाग आहे. ज्यामुळे संकट काळात मनाला उभारी येते ते करायला काय हरकत आहे? प्रत्यक्ष संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने मनुष्य अर्धमेला होतो. आणि संकट आल्या वाटेने निघून ही जाते पण त्याकाळात जी मानसिक हानी होते त्यावर भविष्याचा सल्ला उपयोगी पडू शकतो. अमूक काळानंतर संकट संपणार आहे हा दिलासा फार मोठा असतो ! आणि सल्लाच तो , तो काय डॉक्टरांचा चुकत नाही काय ? ज्योतिषाकडे जाताना आपण एका सल्लागाराकडे जात आहोत एव्ढेच ध्यानात ठेवावे. आपल्या संचितामुळे आपल्या वाट्याला भाग्य येत असते त्यात ब्र्ह्मदेवाचा बाप देखील बदल करु शकत नाही. फक्त ते भोगताना कमी त्रास व्हावा , भोगून संपून जावे अशांसाठीच उपाय योजना करता येऊ शकते, भाग्य बदलता येऊ शकत नाही यांवर माझा ठाम विष्वास आहे. आणि मग जे बदलता येत नाही ते जाणून घ्यावे का ? हा ज्याच्या त्याच्या मान्सिकतेचा प्रश्न आहे.

In reply to by विटेकर

बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 15:46
ज्योतिषी भाग्य बदलू शकतो असा बहुतांश ज्योतिषांचाही दावा असतो किंवा कसे याबद्दल साशंक आहे. तूर्तास मुख्य वाद हा कुंडलीत बघून खरे भविष्य कळते की नाही हाच आहे.

In reply to by बॅटमॅन

विटेकर Wed, 10/09/2013 - 16:26
नसेना का खरे भविष्य ! डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? आणि सेकंड ओपिनियन घ्या ना ! प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत. वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना ? मग ज्योतिषानेच परिपूर्ण असावे असा आपला आग्रह का ?

In reply to by विटेकर

बॅटमॅन Wed, 10/09/2013 - 16:46
अतिशय हास्यास्पद तुलना. डॉक्टरकी आणि वैमानिक शास्त्र (प्राचीन नव्हे आणि अर्वाचीन) यांतही चुका होतात. पण शास्त्राचा बेस पक्का आहे. जे ठोकताळे आहेत ते निव्वळ प्युअर चान्सपेक्षा जास्त आहेत किंवा नाहीत यांच्या अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. एखादे नवीन औषध बाजारात आणायचे तर प्रयोग केले जातात, विमानाचा पार्ट डिझाईन करताना कितीतरी चाचण्या घेऊन मगच तो योग्य तिथे जोडला जातो. एक लक्षात घ्या, शास्त्र म्हंजे १००% अ‍ॅक्युरसी असे नसते. पण चुका झाल्या तरी बेस पक्का ही ग्यारंटी सततच्या प्रयोगांतूनच मिळते. सातत्याने प्रयोग करून, एखाददुसरे प्रचल बदलून काय निष्कर्ष होतात त्यांच्या आधारे हे सगळे ठरवले जाते. ज्योतिषात असे काय आहे? पुणे विद्यापीठाने अशी चाचणी घेतली तेव्हा संख्याशास्त्राच्या आधारे ज्योतिषांचे दावे फोल ठरले. नियमाला अपवाद सापडल्यामुळे नियम रद्दबातल होतोच असे नाही, परंतु त्यासाठी अनेकविध संख्याशास्त्रीय चाचण्या आहेत, काय-स्क्वेअर टेस्ट, टी-टेस्ट, झेड-टेस्ट, फिशर्स कोरिलेशन टेस्ट, इ.इ. यांपैकी कुठल्या चाचणीत ज्योतिषाला आजपर्यंत बसवले गेले आहे? चार टाळकी जुन्या काळापासून सांगत आलीत म्हणून दावा करणे यापलीकडे ज्योतिषात काय रिगरस पार्ट आहे हे सांगता आले तर बरे. कुणाला इच्छा आहे त्याने अवश्य ह्या फ्रॉडच्या मागे लागावे. मुद्दा इतकाच आहे, की या लोकांचे दावे धडपणी पडताळायला हे लोकच तयार नसतात-पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे. आणि जिथे दावा पडताळायचा चान्स मिळतो, तिथे पितळ झक्कत उघडे पडतेच!!! जरा शोधले तर रामदास वैग्रे संतांनीही या पाखंडाला शिव्याच घातलेल्या दिसून येतील.

पिलीयन रायडर Wed, 10/09/2013 - 17:12
माझा ह्या विषयावर पुष्कळ गोंधळ झालेला आहेच.. त्यामुळे मी ज्योतिष खरे की खोटे ह्या फंदात पडत नाही..पण.. धोंडोपंतांच्या ब्लॉग वर अनेकदा असे लेख असतात ज्यात ते नेमकी तारीख/ ठिकाण सांगतात. इथे "घरात तुम्ही सगळ्यांच कराल पण कुण्णी कुण्णी तुमचा विचार करत नाही" टाईप भविष्य नाहीये. कधी परदेशात जाईन - अमुक तारीख इतकं ठोस सांगितल्याच दिसतं.. हे कसं काय?

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे Wed, 10/09/2013 - 17:30
इतकं ठोस सांगितल्याच दिसत असेल तर त्यांनी पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज स्वीकारायला हव होतं असं नाही का वाटत? असे बरेच दावे घटना घडून गेल्यावर हमखास ऐकु येतात.. तसेच चुकलेल्या भविष्याविषयीमात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले जाते..

In reply to by बाळ सप्रे

पिलीयन रायडर Wed, 10/09/2013 - 17:42
त्या बद्दल काही माहित नाही... माझा प्रश्न इतकाच आहे की ढोबळ भविष्य सांगणारे पाहीले आहेत. पण पंतांच्या ब्लॉगवर तर प्रश्नाचे एकच एक उत्तर (जसे की अमुक तारीख) आणि त्या उत्तरापर्यंत ते कसे पोहोचले ह्याचे विवेचन असते. ज्यांना पत्रिका कळते ते लोक वाचुन सांगतिल की ते विवेचन कितपत बरोबर असते. पण जर कुणी गणित सोडवल्या सारखं भविष्य सांगत असेल आणि जेनरिक उत्तरा ऐवजी स्पेसिफिक उत्तर देत असेल तर त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल का? तुम्ही एकदा ब्लॉग पहा.. विवेचन जे मी म्हणत आहे ते असे करतात ते.. नमुन्या दाखलः- http://dhondopant.blogspot.in/2013/09/blog-post.html

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे Wed, 10/09/2013 - 19:33
ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन गेल्यावरचा दावा आहे.. पुढे.. स्पेसिफिक उत्तर आणि विवेचन असले तरी विवेचनाच्या मूळाशी गेल्यास "रवि आश्लेषात गेल्यावर २-३ दिवसात घटना घडेल" अशी कार्यकारणभावरहीत विधानेच आहेत.. वरच्या शब्द्दांच्या बुडबुड्यांना भुलून लोकांना वाटतं "वा ! काय विवेचन आहे!!" पण त्या वैभवच्या परदेशी जाण्याचा आणि सूर्याच्या त्या नक्शत्रात जाण्याचा काय संबंय?? याचं विवेचन कुठाय?? एखादा सॉफ्टवेअर मध्ये काम करणारा , व्हिसा असणारा माणूस जो बरेच दिवस परदेशी जायला "ड्यू" आहे.. त्याला "लवकरच जाशील" असे सांगितल्यास उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त हे समजण्यासाठी ज्योतिष जाणण्याची (??) गरज नसून फक्त कॉमन सेन्स असला तरी पुरतो ..

In reply to by बाळ सप्रे

पिलीयन रायडर गुरुवार, 10/10/2013 - 11:17
बरोबर.. साधारण अंदाज बघुन.. परिस्थिती पाहुन ज्योतीष सांगता येईल असं मलाही वाटतं.. मला कुतुहल फक्त "४-५ ऑगस्ट ला जाशील" हे सांगुन मग तो वैभव खरच ५ ऑगस्टला गेला ह्या गोष्टीचं वाटतं.. आणि अशा बर्‍याच घटना ते लिहीतात. म्हणुन ज्यांना इथे पत्रिका कळते त्या व्यक्तीने सांगावे की इतके अचुक काही सांगणे कसे शक्य आहे? मुळात ज्योतीषाच्या विरोधात सगळेच लिहीत आहे. इथे कुणी शास्त्रशुद्ध आणि संयमित भाषेत पत्रिकेमधल्या ह्या गणितांविषयी सांगेल काय? धोंडोपंत लिहीतील अशी मला मुळीच आशा नाही..

In reply to by पिलीयन रायडर

सुहासदवन गुरुवार, 10/10/2013 - 11:24
जातकाने त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अशी एखादी हिंट दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच नकळत देत असतो हीच तर खरी ट्रिक असते प्रश्नांची.