"शत्रुघ्न"च्या निमित्ताने
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता. हा लेख लिहण्यामागे तो उद्देशही नाही. असा फरक कां पडतो हे जरा खुलासेवार लिहण्याकरिता हा लेखप्रपंच.
रामायण-महाभारत ही महाकाव्ये वाल्मिकी-व्यासांनी लिहली असली तरी आतां ती केवळ त्यांचीच उरलेली नाहीत. त्यांवर माझा, तुमचा, आसेतुहिमालय भारतातील प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. नाही कसा ? माझी वाचनाची आवड या ग्रंथांनीच वाढवली; मी घरांत आई-वडीलांशी, बाहेर ओळखी-अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे हे हे ग्रंथच (कळत-नकळत) ठरवतात; काही चुकले तर त्याची बोचणी यांच्यामुळेच लागते; थोडक्यात सीता, राम, कृष्ण, कर्ण, अर्जून, रावण आणि कंस हे ही... या ग्रंथातील व्यक्तिचित्रे रहात नाहीत, ती माझ्या अवतीभवती वावरणारी माणसेच असतात. आणि गंमत म्हणजे गेली शेकडो वर्षे हा पगडा भारतातील सर्व व्यक्तींवर पडला, विद्वान व अडाणी दोहोंवर. अडाण्यांचे सोडा, त्यामुळे झाले तर भलेच होते पण विद्वानांनी एक नवीनच भानगड निर्माण केली.
पूर्वी ग्रंथ हाताने लिहून घ्यावे लागत. त्यांत लिहतांना चुका होत. तेही फारसे महत्वाचे नव्हते. पण लेखक जरासा विद्वान व थोडासा प्रतिभाशाली असेल तर तो त्याला योग्य वाटेल ते घुसडवून देऊं लागला. तेही स्थल-कालबाधित. म्हणजे पाचव्या शतकातील मल्याळी लेखक द्रौपदीस्वयंवरातील लग्नात पगती उठवू लागला ते केरळातील त्या काळच्या पंगतींना अनुसरून. मग त्याचा मेळ काश्मीरमधील लेखकाच्या वर्णनाशी कसा जुळणार ? झाले असे कीं महाराष्ट्रात महाभारताची "निलकंठ" प्रत प्रचलित आहे तर बंगालमध्यें "कलकत्ता" प्रत. दोहोंत भरपूर फरक. भांडारकर संस्थेतील विद्वानांना या समस्येला तोंड देतांना काही दशके झगडावे लागले. लॉ कॉलेज रस्त्याने जातांना अजूनही मान खाली झुकते, आपोआप.
यात आणखी भर दोघांची. पहिली स्थानिक लेखकांची. मराठी "जांभुळाख्यान" हे एक उदाहारण. व्यासांच्या महाभारताशी काही संबंध नसलेले. किंबहुना त्यातील द्रौपदीच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. पण त्यावरही विश्वास ठएवणारे भेटतातच. दुसरी भर पाश्चिमात्य भाषांतरकारांची. त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाबद्दल मला काही बोलावयाचे नाही.थोर माणसे.पण एक मोठा फरक पडतो तो येथील समाजातील चालीरितींमुळे व भाषेतील संकेतांमुळे. तुमच्या आमच्या बाबतीत हे नैसर्गिकपणे उपजत होतात; बाहेरच्यांना लक्षात येणे दुरापास्तच,.या विषयातील ज्ञान मिळवणे फार अवघड आहे. त्यामुळे जर तुम्ही रामायण-महाभारताचे इन्ग्रजी भाषांतर वाचत असाल तर काही त्रुटी अनिवार्य आहेत. उदा. म्हणून " आज दारावरून वरात गेली " याचे इंग्रजीत भाषांतर करून बघा. बहुदा श्री. मृत्युंजय यांच्या लेखातील तपशीलातील फरक यामुळे असावा.
अवांतर:
( मला असे वाटते की कर्णावरील एखाद्या कादंबरीवरून "कर्ण अर्जुनाहून धनुर्विद्येत जास्त प्रवीण होता" किंवा रामाने शूर्पणखेवर (किंवा सीतेवरही !) अन्याय केला असे ठरवावयाच्या आधी वाल्मिकी रामायण - व्यासकृत महाभारत वाचा. म्हणजे संस्कृत वाचा असे नाही. पण पं. सातवळेकर यांचे रामायण ( संस्कृत-मराठी दोन्हीही एकेठिकाणी) व सर्वश्री दातार-द्रविड-फफे यांनी भाषांतर केलेले व श्री. उपासनी यांनी तपासलेले (१९१०) महाभारत तुम्हाला जास्त बरोबर माहिती देईल. (हीच कां? मी गेली साठ वर्षे हीच वाचत आहे म्हणून !) व मगच कुणावर अन्याय झाला हे ठरवा. सीतेवर अन्याय झाला तसा रामावरही झाला. पण हे दोघेही तक्रार करतांना दिसत नाहीत. आणि शत्रुघ्नावर अन्याय झाला म्हणजे काय झाले ? त्याला अयोध्येचे राज्य मिळणार नव्हतेच. खरे म्हणजे कुठलेच. मिळणार नव्हते. रामाने मथुरेचा राजा म्हणून अभिषेक करतो असे म्हटल्यावर तो अचंबित होऊन म्हणतो " हे कसे शक्य आहे ? मोठा भाऊ असतांना धाकटा राजा कसा होईल ? तो राजा झाला पण तो अपवाद होता. त्यानंतर मात्र सर्वांना, लहानमोठ्यांना राज्ये मिळाली.)
शरद
प्रतिक्रिया
हं. अन्याय केला असे
नानबा
उत्तम , माहितीपूर्ण लेख
अतिशय नेमका अन मार्मिक लेख.
पं. सातवळेकर यांचे रामायण (
पुण्यात येथे
सुमारे पन्नस-साठ वर्षांपूर्वी
उत्तम लेख
>>>> पं. सातवळेकर यांचे
उत्तम विवेचन सर.
शब्द न शब्द सहमत!
अरेरे. शत्रुघ्नाचा धागा
बहुधा मी शत्रुघ्न
रामायणात फार उल्लेख नाहि तो
तुमची खंत रोचक आहे.
आयला आपल्या नावाचे मिपावरचे
कारण काय धागा वाचन मात्र
+१२७५८८०.११ (आकडा फार गणीतं करुन आलाय)
वाल्मिकींनी स्वत: लिहिलेल्या
++१
हा विनोद आहे कां ?