‘भीमथडी जत्रा’ हा बचत गटांना उभारी देणारा उपक्रम आहे यात शंकाच नाही. राज्याच्या सर्व भागातून आलेल्या बचत गटांचे स्टॉल बघून निश्चित बर वाटलं पण काही प्रश्न मात्र पडले.
बचत गटांच्या बरोबरीने मोठ्या व्यावसायिकांना स्टॉल देण्यामागचे प्रयोजन काय? विशेषतः खाद्य जत्रेमध्ये. उदा. वेन्कीज, सुहाना, कुशन चेअर, आईस्क्रीम, मिनरल वॉटर कंपन्या, हुरडा इ.
जालना, लातूर, हिंगोली, सोलापूर इ. ठिकाणच्या दुरून आलेल्या बचत गटाच्या प्रतिनिधींकडून चांगला अनुभव मिळाला आणि काही ठिकाणी छापील किमतीपेक्षाही कमी किमतीला उत्पादने मिळत होती.
पण बऱ्याच स्टॉल वर अवाजवी किमती होत्या. त्यातही असे जाणवत होते की व्यावसायिक स्टॉल वर असे प्रकार जास्त होते(उदा. एक्वा रंग मिनरल वॉटर, एस.एस. फिश, हुरडा, साठे नाचणी लाडू).
व्यावसायिकांच्या बरोबरीने जाहिरात/बॅनर लावणे बचत गटांना परवडणारे नाही. मग एकीकडे बचत गटांच्या सबलीकरणा बरोबर दुसरीकडे व्यावसायिकांची स्पर्धा का निर्माण केली जातेय? अशाने ‘बचत गटांना व्यासपीठ देणे’ ह्या उद्दिष्टाला हरताळ फासला जात नाही का?
आता याला असा प्रतिवाद होऊ शकेल की बचत गटांच्या मानाने व्यावसायिकांचे स्टॉल कमी होते. पण जर दोघांची उलाढाल बघितली तर व्यावसायिकांची उलाढाल लक्षणीय होती.
‘भीमथडी जत्रा’ - काही प्रश्न
गाभा:
प्रतिक्रिया
27 Jan 2013 - 11:23 am | तर्री
थोर समाज सेविका सुप्रियाताई सुळे हया बचत गटा मध्ये सक्रीय झाल्या आणि मी बचत गटाकडून खरेदी थांबवली.
सुप्रियाताई आपल्या थोर पित्याने मळलेल्या वाटे वरून मार्ग कर्मणा करीत आहेत आणि म्हणून त्या लवकरच दारिद्र्य निर्मुलन करतील ह्याबद्दल तिळमात्र शंका नाही.
1 Feb 2013 - 12:41 pm | अनुराधा१९८०
थोर समाज सेविका सुप्रियाताई सुळे हया बचत गटा मध्ये सक्रीय झाल्या आणि मी बचत गटाकडून खरेदी थांबवली.>> मी तर बातम्या वाचणे पण बंद केले. आपण ह्यांच्या बचत गटा कडुन खरेदी करणे म्हणजे ह्यांच्या निवडणुक फंडाला पैसे देण्या सारखे आहे
1 Feb 2013 - 6:58 pm | ५० फक्त
'आपण ह्यांच्या बचत गटा कडुन खरेदी करणे म्हणजे ह्यांच्या निवडणुक फंडाला पैसे देण्या सारखे आह'' - या मार्गानं मिळालेल्या पैशानं निवडणूकीचा फॉर्म आणि उमेदवारीची फी सुद्धा निघणार नाही, तुम्ही आम्ही जी घरं घेतो, गाड्या घेतो, हाटेलात जातो त्यातुन निवडणुकीचे पैसे गोळा होतात.
27 Jan 2013 - 1:05 pm | राही
आमची बहुतेक सर्व किरकोळ खरेदी बचतगट,आनंदवन,मूकबधिर संस्था,अंधशाला,क्रिएटिव क्राफ्ट,अशांकडूनच असते. मग त्यात बेरोझ बाच्छा,तृप्ती पाटकर,सुप्रिया सुळे असोत वा नसोत.
केवळ भीमथडीच नव्हे तर अशा अनेक स्वयंसेवी संस्था किंवा बचतगटांच्या प्रदर्शनात असे घडते.व्यावसायिक उत्पादनांच्या तुलनेत या गटांची उत्पादने ओबडधोबड,त्यांचे पॅकिंग् अनाकर्षक,स्टॉल्सची मांडणी डोळ्यांना खुपणारी अशी असते.ग्राहकांना खेचून घेईल असा दिव्यांचा लखलखाट अथवा म्यूझिकचा दणदणाटही नसतो.व्यावसायिकांच्या समोर हे लोक फिके पडतात.व्यावसायिकांचा सहभाग न टाळता येण्याजोगा असेल तर किमान त्यांना प्रवेशद्वारानजीकच्या अथवा अन्य मोक्याच्या जागा तरी दिल्या जाऊ नयेत.
27 Jan 2013 - 2:01 pm | पैसा
तयार खाद्यपदार्थ बचत गटांच्या स्टॉल्सवर स्वस्त आणि चांगले असतात असा अनुभव आहे. काही साधी कपडे मसाले वगैरे तसेच स्वस्त मिळतात. पण शोभेच्या वस्तू वगैरे महाग वाटणार्या असतात. हे गट आईस्क्रीम्स, पॅकेज्ड पाणी तयार करून विकत नाहीत म्हणून जत्रेमधे मोठ्या कंपन्यांचे स्टोल्स लावत असावेत. अर्थात ते मोक्याच्या जागा बळकावतात आणि इतर वस्तू विकून बचत गटांना बाजूला टाकतात यात काही नवल नाही.
27 Jan 2013 - 3:20 pm | आदूबाळ
बहुदा त्यामागे अर्थकारण असावे. मोठ्या कंपन्यांच्या स्टॉलमधून प्रदर्शनाचा खर्च काढायचा आणि बचत गटांना कमी पैशात सहभागी होऊ द्यायचे अशी काहीतरी ऐड्या असावी. ('रॉबिन हूड' पद्धत - श्रीमंतांकडून घ्या आणि गरीबांना वाटा)
अजून एक शक्यता आहे - पोझिशनिंग (मराठी शब्द?). बर्याच लोकांना भीमथडीतल्या वस्तूंच्या प्रतीविषयी शंका असते. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे स्टॉल पाहून थोडा मानसिक दिलासा मिळत असावा.
दुसरी शक्यता थोडी अशक्य कोटीतली वाटेल (counter-intuitive and far fetched). एक प्रसंग सांगतो. अनेक वर्षं परदेशात राहिलेली माझी चुलतबहीण पुण्यात आली तेव्हा तिला घेऊन आम्ही जेजुरीला गेलो होतो (कुलदैवत). जेजुरीला आठवडी बाजार लागला होता. बहिणीला अंजिरं घ्यायची इच्छा झाली. सासवड-जेजुरी भागात अंजिरं खूप होतात. जेजुरी बाजारातली अंजिरं मस्त रसरशीत होती. पण बाजाराचं एकंदर चित्र पाहून बहिणीला काही तिथून अंजिरं घ्यावीशी वाटेनात. तिला सांगून पाहिलं पण पटेना.
पुण्यात आलो, कोथरूड भागातून जात होतो. तिथे तिने "रिलायन्स फ्रेश" समोर गाडी थांबवायला लावली, आत गेली. मला वाटलं आता अंजिरं घेऊनच येणार. पण तिथून ती मोकळ्या हाताने बाहेर पडली, थोडी पुढे गेली आणि रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून अंजिरं घेतली. माझ्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तिने सांगितलं की रिलायन्स फ्रेशपेक्षा बाहेरच्या गाड्यांवरची अंजिरं चांगली आहेत. मग मी विचारलं, माझे आई, जेजुरी बाजारातून का नाही घेतली? ती म्हणाली, तेव्हा रिलायन्स फ्रेशमधली कुठे पाहिली होती!
27 Jan 2013 - 3:50 pm | दादा कोंडके
पण माझा अनुभव (एसपेशिअली बंगळुरूत, इतर ठिकाणी कमी) एकदम उलटा आहे. बाहेरचे गाडीवाले उद्दाम असतात. तुम्ही कुठलही फळ मागितलं की कसली तरी घाई असल्यासारखी इकडची तिकडची फळ पिशवीत कोंबून देतात. तुम्ही कितीही ओरडून तुम्ही निवडलेली एकेक फळं पिशवीत टाकण्याचा आग्रह केलात तरी निर्लज्यपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मी मॉल मधूनच फळं घेतो.
बाकी सकाळमध्ये अलिकडे सुप्रियाचा उदो-उदो चाललेला असतो.
28 Jan 2013 - 5:10 am | काळा पहाड
परूळेकरांकडून जनतेच्या पैशाने ढापलेला पेपर आहे तो. किसका फाटे, किसका तुटे असा एकूण प्रकार आहे. एकेकाळी सकाळची काय शान होती. त्याचा अग्रलेख तर आदर्श पत्रकारितेचा नमुना होता. आता काय, आनंद आहे एकूण.
28 Jan 2013 - 2:14 pm | राही
परुळेकर गेल्यानंतर सकाळ डबघाईला आले होते.मालक आणि कामगारांमधला वाद चिघळत होता.तेव्हा शरद पवारांनी विनंतीवरून मध्यस्थी केली होती.सकाळ बंद पडू नये यासाठी अर्थसाहाय्याचीही गरज होती.कामगारवर्ग त्याकडे डोळे लावुन बसला होता.दुसरा एक बडा गट यावर नजर ठेवून होता.सकाळ पवारांनी घेतले हे चांगलेच केले.नाहीतर ते एखाद्या विस्तारवादी भांडवलशाही अमराठी किंवा नावापुरत्या मराठी समूहाच्या ताब्यात गेले असते.
28 Jan 2013 - 4:16 pm | दादा कोंडके
अर्थात पवारांचा पेपर आहे म्हणजे पवार कुटुंबियांनी केलेल्या कामांचं श्रेय देण्यासाठी त्याचा वापर होणारच. पण अलिकडे इतक्या पद्धतशीर पणे सुप्रियाचं नाव लोकांच्या डोळ्यासमोर ठेवण्याचं काम चालू आहे. त्यात मथळे सुद्धा 'सुप्रियामुळे फलाण्या गावच्या पाण्याची समस्या दूर झाली' वगैरे असल्यामुळे हसू येतं. कुठल्याश्या मिटींग मध्ये चहा द्यायल्या आलेल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारून, 'याच्या शिक्षणाचं बघा' म्हणून कुणाला तरी सांगणं याची सुद्धा बातमी होते.
28 Jan 2013 - 4:25 pm | तर्री
ते एखाद्या विस्तारवादी भांडवलशाही अमराठी किंवा नावापुरत्या मराठी समूहाच्या ताब्यात गेले असते.
हया कशाचेही साहेबांना वावडे नाही. सत्ता आणि खुर्ची असेल तर काहीही चालतय.
28 Jan 2013 - 4:39 pm | काळा पहाड
आणि विस्तारवादी भांडवलवाद चुकीचा का आहे? एखादे वृत्तपत्र पवारांनी घेण्या पेक्शा ते गोयंकांनी (उदा.) घेतले असते तर काय वाईट झाले असते? वृत्तपत्र हे प्रोफेशनल मिडीया हाऊसनेच चालवायला नको का? सकाळ ला सामना च्या लेव्हल ला आणून काय साधले? आणि यात मराठी अमराठी वाद येतो कुठे? की अमराठी माणसांनी घेतले असते तर ते पेपर हिंदी मध्ये छापायला लागले असते? सकाळ ने मराठी अमराठी वादात अमराठींच्या विरूद्ध प्रखर भूमिका घेतल्याचे काही ऐकीवात नाही. मग पवारांनी सकाळ घेतल्याचा मराठी जनतेला कसा लाभ झाला? बरं मग बाकिच्या ठिकाणी पवार प्रो-मराठी आहेत का? त्यांचे ज्यांच्या ज्यांच्या बरोबर बिझनेस डिल्स आहेत, शाहीद बलवा पासून अजित गुलाबचंद पर्यंत; ते मराठी आहेत का?
1 Feb 2013 - 12:45 pm | अनुराधा१९८०
तुम्ही खुप भाबड्या आहात राही ताई. आधी वाद निर्माण करायचा आणि मग तो सोडवायला जायच्या निमीत्ताने कब्जा करायचा. जर वाद निर्माण नसता केला तर इतक्या स्वस्तात मिळाला असता का सकाळ? वाद आहे म्हणुन दुसर्या कोणी पण रस दाखवला नसेल. त्यात पवारांशी वाकडे कोण घेणार?
27 Jan 2013 - 5:48 pm | श्रिया
"भीमथडी जत्रा' हा महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ देणारा एक चांगला उपक्रम म्हणून ओळअला जातो.
त्यामुळे ह्या जत्रेला भेट देणार्या बहुतेकांचा हेतू हा बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी हाच असतो असं निरीक्षण आहे. त्यामुळे अजुन तरी "बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू" हाच ह्या उपक्रमाचा "यू. एस. पी." (युनिक सेलिंग पॉइण्ट) आहे.
ह्या जत्रेचे एक मुख्य आकर्षण म्हणजे अस्सल ग्रामीण चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ! चुलीवरील भाकरी,वांग्याचे भरीत,गव्हाची खीर,लापशी,पेढ्याची पोळी,खानदेशी मांडे,मावळी मटण हे खाद्यपदार्थ उपलब्ध असणार्या स्टॉलवरही खवय्यांची झुंबड पहिली आहे.
असे उपक्रम राबवताना मोठं आव्हान असतं ते आर्थिक पाठबळ मिळवण्याचे, त्यासाठी वेन्कीज सारखे काही प्रायोजक मिळवावे लागतात, त्यामागे बचत गटांच्या स्टॉलधारकांकडून शुल्क अल्पप्रमाणात आकारता यावं हा उद्देश असु शकतो. त्यामुळे बचत गटांच्या स्टॉल बरोबर प्रयोजकांचे स्टॉल (मोक्याच्या जागी) असणं अपरिहार्य वाटतं.
त्यासाठी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या "ब्रँडींग" कडे, तसेच वस्तुच्या मांडणीला हि खूप महत्त्व असल्याने "पॅकेजिंग'कडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून ग्राहकांच्या मनात उत्पादनाच्या दर्जाविषयी विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होईल.
28 Jan 2013 - 12:39 pm | मालोजीराव
सुप्रिया सुळे यांचे बचत गटाचे काम कौतुकास्पद आहे !
29 Jan 2013 - 3:16 pm | लई भारी
आपल्या मताशी सहमत आहे पण मला खटकलेल्या काही गोष्टी सोदाहरण मांडतो. कदाचित अर्थकारणासंबंधी काही गोष्टी माझ्या आकलना पलीकडे असतील.
वरती लिहिलच आहे, की असे प्रकार व्यावसायिक स्टॉलवर जास्त होते. बचत गटांच्या स्टॉलवर चांगला अनुभव होता, तो नाकारत नाहीच, उलट चांगले वाटले.
ता.क. खाली एवढे रणकंदन माजेल असे वाटले नव्हते! २ दिवसांनी पहिले आणि चाट पडलो :) आमच्या आडनाव बंधूंच्या विरोधातील मोहिमेत सहभागी व्हायची इच्छा असली तरी धागाकर्ता असल्यामुळे गप्प बसावे हेच बरे ;-)
27 Jan 2013 - 5:54 pm | बाबा पाटील
श्रियाताई तुमच्याशी पुर्णतः सहमत् , आज उठसुठ पवारांच्यावर टिका केल्याशिवाय काही लोकांना अन्नपचन होत नाही,सुप्रिया सुळे जे काही चांगलकाम करत आहेत त्याला शाबासकी जाउ द्या पन सकस टिका करण्याच तरी सौजन्य दाखवत जा.प्रत्येकवेळी गरळ ओकलच पाहिजे का ?
28 Jan 2013 - 5:01 am | काळा पहाड
छ्या! बिलकूल नाही. मराठा मराठा म्हणून त्यांना मतं द्या आणि नंतर आत्महत्या करा, उसाला पाणी सोडून दिल्यावर जळफळ व्यक्त करा, शहरं पाणी जास्त वापरतायत म्हणून बोंब मारा, त्यांचे आणि त्यांच्या बगलबच्यांचे जमीन हडपण्याचे प्रकार आल्यावर डोकं आपटून घ्या, शेतकर्यांना गोळ्या घालून मारल्यावर आणि पुण्याचं पाणी लवासाला वळवल्यावर निखिल वागळेच्या बनावट शो मधे एसेमेस पाठवा, गणेशोत्सव आणि तत्सम मिरवणुका मधली यांची टगेगिरी सहन करा, त्यांच्या कार्यकर्त्यांनी खुनाखुनी केल्यावर चर्चा करून हळहळ व्यक्त करा, हिंजवडी आणि युनिव्हर्सिटी जवळचा फ्लायओव्हर चुकल्यावर यांच्या चुका पदरात घाला, सगळीकडचे रस्ते पाच पाच वर्ष खोदून ठेवल्याबद्दल प्रत्येक दिवशी ट्रॅफीक जॅम सहन करा, यांच्या "कर्तबगार" मंत्र्यांचे प्रताप आणि मुक्ताफळं शांतपणे ऐका, एका चारित्र्यवान मुख्यमंत्र्यांवर यांनी फायली क्लियर करण्यासाठी आणलेला दबाव मूकपणे पहा, यांच्या राजिनामा नाट्याकडे कौतूकाने पहा, मग त्यांनी दिलेल्या एक्स्प्लेनेशन वर मान डोलवा, यांची भ्रस्टाचाराची प्रकरणे (सर्वांना माहीत असताना) यांचे वार्षिक उत्पन्न व एकूण मालमत्ता फक्त काही लाख आहे या वर विश्बास ठेवा, ते कुठल्या कंपनीत शेअर होते ते सांगितलेच नाही एलेक्शन कमिशन ला ते पण विसरून जा, मराठा आरक्शणाचे राजकारण (ते कधीही शक्य नाही आणि सुप्रीम कोर्ट ते कधीही मान्य करणार नाही हे माहीत असताना त्यांची मते राखण्यासाठी जो लाळघोटेपणा चाललेला आहे तो) निमुट्पणे पहात बसा; पाटिलसाहेब, या सगळ्या प्रकारा नंतरच जनतेला अन्नपचन होतं. ३२ रुपायाचं जे धान्य जनतेला परवडतं, त्याचं अन्नपचन होतं. बरोबर आहे, गरळ ओकायलाच पाहिजे असं नाही. त्यासाठी पवारांचे बगलबच्चे, संभाजी ब्रिगेड, टग्या, लाडकी बेटी, आबा हे सगळे आहेतच.
28 Jan 2013 - 9:20 am | राही
भ्रष्टाचाराचे हे सर्व प्रकार सर्वत्रच चाललेले आहेत. मुंबईतले स्काय वॉक्स्,उत्तरप्रदेशातले पुतळे अशी अनेक निरर्थक पैसेकाढू कामे झालेली आहेत,होत आहेत.उर्मटपणा म्हणाल तर तो कर्नाटक-तमीळ्नाडु-केरळात जास्त दिसतो.(कदाचित परक्या भाषेमुळे तसे वाटत असेल). त्यामुळे पवारांचे महत्त्व कमी होण्याचे कारण नाही. हिंजवडी,मगरपट्टा सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टाउनशिप्स पवारांमुळेच झालेल्या आहेत.पुण्यातले लोक आय्टीची ऐट मिरवू शकतात ते पवारांमुळेच.लवासा ही एक उत्तम संकल्पना होती.ती वेळेवर सुरळीतपणे अंमलात आणता आली असती तर महाबळेश्वरसारखेच पण स्वयंपूर्ण आणि रोजगारनिर्मितीक्षम असे एक सुंदर ठिकाण महाराष्ट्राला मिळाले असते.विकास एकलपणाने येत नसतो.तो स्वतःसोबत काही समस्याही घेऊन येतो आणि त्याची किंमत चुकवावीच लागते.पाण्याचे म्हणाल तर तमीळ्नाडुत पाण्याची समस्या उग्र आहे. पूर्ववाहिनी नद्यांचे सर्व पाणी घाटप्रदेशातच अडवले गेल्याने तमीळ्नाडुपर्यंत पोचतच नाही.पेरियारचे अधिक पाणी वैगैत सोडावे असा चेन्नैकरांचा आग्रह असतो.अक्कलकोट ओलांडून कर्णाटकात शिरले की रस्ते सुधारलेले दिसले तरी सोलापूरच्या हिरव्यागार शेतांसमोर कर्णाटकातला रखरखाट जाणवण्याइतपत असतो. असो.महाराष्ट्राने एक विनोबाजी आणि दुसरे शरद पवार यांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले महत्त्व कधी जाणलेच नाही असे वैयक्तिक मत आहे.
28 Jan 2013 - 12:53 pm | मैत्र
विकासाची किंमत ? -- लोकांकडून बंदूकीच्या धाकाने सह्या घेणे जमिन व्यवहारावर ही किंमत?
केंद्रिय पर्यावरण खात्याची प्रकल्पालाच परवानगी नसताना थेट जमिन घेऊन बांधकाम करणं हे योग्य ?
घड्याळ मागे लावलं तर कोणतीही गाडी कुठल्याही महामार्गावर काहीही गुंडगिरी करू शकते आणि काहीही कारवाई होत नाही हे पाहिलंय का तुम्ही? एकदा पावसात ताम्हिणीत / मावळ - मुळशीत जाऊन पहा.
हिंजवडी ही टाउनशिप नव्हे. आयटी पार्क आहे. १४ वर्ष होऊन सुद्धा रस्त्यांची बोंब आहे. संध्याकाळी ६-७ वाजता फेज २/३ पासून बाय पास पर्यंत येणं हे काय दिव्य आहे याची कल्पना असावी.
मगरपट्टा अप्रतिम आहे. तिथल्या इतक्या मोठ्या जमिनी कुठून आल्या?
९ सदाशिव - इतके सगळे वाडे आणि सर्व लोक/ इतकं जुनं शिवाजी मंदिर आणि सन्मित्र संघाची क्रीडांगणाची जागा विनासायास कशी मिळाली?
जंगली महाराज रस्त्यावरच्या मोक्याच्या जागा कशा एकाच व्यक्तीला मिळाल्या?
राष्ट्रवादीचे पिल्लू मराठा महासंघ आणि त्यांचे पिल्लू ब्रिगेड अशी थेट रचना असताना श्री. पवार त्यांच्या अतिशय गलिच्छ वागणूकीला / लिखाणाला कसलाही लगाम घालत नाहीत? त्यांच्या कुठल्याही पुस्तकांवर बंदी येत नाही.
आणि पवार मुद्दामून कोणतेही विधानच करत नाहीत.
सगळ्या प्रकारच्या धान्य / साखर / कापूस / तेलं/ इ. भाववाढीच्या सकाळ मध्ये आधिच बातम्या कशा येतात ?
सकाळ वृत्तसेवाच्या नावाखाली बातम्या वाटेल तशा फिरवल्या जातात. एकाच बातमीचा मथळा सकाळ मध्ये अगदी वेगळा असतो.
आत्ता संमेलनात जाऊन भाषणबाजी केली. मग म'श्वर च्या वेळी जो गोंधळ घातला गेला तेव्हा कुठे दडून बसले होते?
राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतला इतक्या गोष्टिवर सी लिंकला ऐन वेळी त्यांचं नाव देणारे हे "मराठी" नेते?
आधि समाजवादी काँग्रेस आणि नंतर आत्ताची या दोन्ही वेळी संधिसाधू राजकारण करून परत मूळ पक्षाशी सर्व धोरणे सोडून हातमिळवणी.
लिहावे तेवढे मुद्दे थोडे.
इतर राज्ये आणि तिथले नेते काही स्वच्छ आहेत असं अजिबात नाही. दक्षिणेत एक एक अजब लोक आहेत. पण म्हणून जे गैर आहे त्याला गैर म्हणायचं नाही हा कुठला न्याय ?
28 Jan 2013 - 2:01 pm | राही
अलीकडे कुठल्याही धाग्याचे कश्मीर न होता त्याची बारामती होते किंवा पवार होतात. हे पवार प्रकरण या धाग्यावर अधिक चिघळले/चघळले/चिवडले जाऊ नये म्हणून माझ्याकडून हा शेवटचा प्रतिसाद.संधिसाधू राजकारण ही द्विरुक्ती आहे.राजकारणात साधनशुचिता फारशी कोणी बाळगलेली नाहीय्.ज्यांनी बाळगली ते निवडणुकांत जमीनदोस्त झालेयत्. शिवसेना आणि मुस्लिम लीग या फक्त दोघांच्या संयुक्त मोर्च्यात बाळासाहेब आणि बनातवाला यांना रांगेच्या अग्रभागी खांद्याला जमिनीच्या बाबतीत दक्षिण मुंबईतलावून चालताना हजारो मुंबईकरांनी पाहिले आहे.जमिनीच्या संदर्भात बोलायचे तर दक्षिण मुंबईत भाजपच्या एका बड्या बिल्डर्-आमदाराला 'विचारल्याशिवाय'कोणतेही बांधकाम हाती घेतले जाऊ शकत नाही. नव्या मुंबईत विमानतळ होणार हे विकासआराखड्यात येण्याआधीच तिथल्या जमिनी त्यावेळच्या एका मुख्यमंत्र्याच्या आराखड्यात गेल्या होत्या.तेथेही धाक चॉकलेटच्या गोळ्यांचा नव्हता.नव्या मुंबईतल्या एका बड्या नेत्याचा उदय आणि भरभराट याच काळातली.पुढे त्यांनी रिवाजाप्रमाणे पक्ष बदलला.पवार विधान करीत नाहीत हा त्यांचा प्लस्-पॉइन्ट आणि स्ट्रेन्ग्थ आहे.कुठल्याही साहित्य/कलाकृतीवर बंदी असू नये (देशद्रोहास उद्युक्त करणारे किंवा देशद्रोहात्मक लिखाण हा अपवाद)असे माझे मत आहे.सेटनिक वर्सेस्,घाशीराम,नथुराम,हुसैन्,डा विन्ची कोड्,विश्वरूपम कुठलीच बंदी जस्टिफायेबल नाही.पण अशा बंद्या आणणे ही एक कम्पल्शन असावी.गुंडगिरी पवारांमुळे होतेय हे म्हणणे हास्यास्पद आहे. सध्या मराठा समाजामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात पवारांइतका सौम्य प्रकृतीचा आणि प्रागतिक विचारांचा नेता दुसरा नाही.शिवाय पवारांच्या उदयाच्या आधीपासून निदान मुंबईकरांनी तरी दहशत आणि गुंडगिरी अनुभवलेली आहे.सातारा-कर्हाड,धुळे-जळगाव,नाशिक,कणकवली,गडचिरोली येथे वेगवेगळ्या संदर्भात इतरांनीही अनुभवली असेल.ते एक राष्ट्रीय फेनॉमिनन आहे,पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही;कितीही तिरस्करणीय असले तरी. असो. लिहावे तेव्हढे मुद्दे थोडे,पूर्णविराम
28 Jan 2013 - 2:03 pm | राही
पाहिजे! पाहिजे! स्वसंपादन, स्वसंपादन!
29 Jan 2013 - 10:56 am | मैत्र
माझा मुद्द्याला विरोध असला तरी तुमचा हा प्रतिसाद आवडला.
29 Jan 2013 - 12:52 pm | शैलेन्द्र
तुमचे सगळेच मुद्दे पटत नसले तरी प्रतिसाद आवडला
29 Jan 2013 - 2:22 pm | राही
पूर्णविराम जाहीर केल्यानंतर पुन्हा लिहिणे उचित नाही. पण मैत्र आणि शैलेन्द्र, आपण दाखवलेल्या दिलदारपणाने लिहिण्यास उद्युक्त केले आहे. मनापासून धन्यवाद.
आता लिहिलेच आहे तर एक मुद्दा समोर आणावासा वाटतो. महाराष्ट्रात मराठा बहुसंख्य असल्याने सध्यातरी (जोपर्यंत जातिनिरपेक्ष विचार करण्याची क्षमता लोकांमध्ये येत नाही तोपर्यंत)कुठल्याही पक्षाच्या सरकारवर प्रभाव आणि अंकुश मराठ्यांचाच रहाणार हे वास्तव आहे. या समाजगटाचा नेता (अथवा अनेक नेते,जर निर्माण झाले तर,) समंजस,पुरोगामी असणे हे इतर ब्राह्मण,ओबीसी,दलित यांच्या हिताचे आहे.मराठा समाजात अजूनही सरंजामशाही आहे.त्यातून त्याला बाहेर काढणे,ज्ञानलालसा निर्माण करणे,शेतीवरचे अवलंबित्व कमी करणे हे कार्य करू शकणारा, किमान त्याचे महत्त्व ओळखलेला राजकीय नेता आज पवारांशिवाय दुसरा नाही. ते मराठ्यांमधल्या अतिजहाल गटांना खतपाणी घालतात असे म्हटले जाते. पण माझ्या मते पवारांमुळेच या लोकांची आक्रमकता आटोक्यात आहे. कधी ढील देऊन तर कधी खींच देऊन त्यांनी ब्रिगेडी पतंगाचे आकाशात स्वैर भरकटणे काबूत ठेवले आहे.लोकशाहीमध्ये स्वजनांशी फटकून वागून चालत नसते. नाही तर चाकूरकर पाटलांसारखी गत होते. गोडीगुलाबीने वागून विधायक कार्यभाग साधणे हीच उत्तम नेतृत्वाची कसोटी असते. पवार या कसोटीस (साधारणपणे) उतरतात असे (साधारणपणे) मानता येईल.
29 Jan 2013 - 2:30 pm | शैलेन्द्र
या प्रतिसादाशी पुर्ण सहमत.
पवारांच्या जवळच्या वर्तुळातील लोक पाहिल्यास, म्हणजे त्यांच्या शिक्षणसंस्था मधील अधिकारी वर्ग, त्यांच्याशी संलग्न व्यवसायातील लोक वगैरे, तर त्यात त्यांनी कुणालाच झुकते माप दिल्याचे आढळत नाही. व्यवसायिक द्रुष्ट्या पवार पुर्ण पुरोगामी आहेत..
पवारांच्या क्षमतेबद्दल कधीच वाद नाही, पण त्यांच्या उद्दिइष्टांबद्दल किंवा मार्गाबद्दल आहे.. आणि तो कुणालाच टळला नाही.
1 Feb 2013 - 1:43 pm | श्रीगुरुजी
"लोकशाहीमध्ये स्वजनांशी फटकून वागून चालत नसते. नाही तर चाकूरकर पाटलांसारखी गत होते. "
शिवराज पाटिल चाकूरकर हे मराठा नसून लिंगायत आहेत.
28 Jan 2013 - 2:59 pm | श्रीगुरुजी
हिंजवडी ची आयटी पार्क ही युती काळात मनोहर जोशींनी एमआयडीसीच्या सहाय्याने भराभर मंजुर्या देऊन मार्गी लावली. त्याआधी जवळपास १५ वर्षे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले होते. पण १९९७-९८ मध्ये युती शासनाने सुरवातीला तिथली ३०० एकर जमीन ताब्यात घेऊन फेज १ च्या कामाला मंजुरी दिली. १९९८ च्या सुरवातीला सर्वप्रथम इन्फोसिसने तिथे २५ एकर जागा घेऊन भूमीपूजन केले व १९९९ पासून तिथे प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. नंतर इतर कंपन्या आल्या व तिथली जागा संपल्यावर पुढे फेज २ व ३ चे काम सुरू झाले.
हिंजवडी आयटी पार्क सुरू करण्याचे श्रेय युती शासनाला आहे, पवारांना नाही. पवार त्यावेळी महाराष्ट्रात किंवा दिल्लीत सत्तेवर नव्हते.
28 Jan 2013 - 4:08 pm | तर्री
महाराष्ट्राने एक विनोबाजी आणि दुसरे शरद पवार यांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले महत्त्व कधी जाणलेच नाही
काय पण हिरे -माणके शोधली आहेत.
विनोबाजी - आणीबाणी लागू असताना हया महात्य्माचे रूप साऱ्या महाराष्ट्राला दिसले आणि मी तरी दिपून गेलो.
शरदरावजी - बुद्धिमान , कार्यकुशल , विचारवंत , संवाद साधक हे सगळे गुण आहेत. स्वार्थ आणि दगाबाजी हे दोन गुण नसते राजीब गांधी नंतर चे रिक्त पद नरसिंहराव यांचेकडे न जाता साहेबांकडे आले असते.
आज १५ /२० वर्षे देशाचे प्रधानमंत्री टिकून - असते.
1 Feb 2013 - 12:50 pm | अनुराधा१९८०
कधी कधी वाईटातून चांगले होते ते असे, ह्या दोन हीर्यातला एक हीरा प्रधानमंत्री न होता नरसिंह राव झाले हे तुमचे आमचे नशीब च समजा.
28 Jan 2013 - 11:40 am | बाबा पाटील
राही एकदम सहमत...
28 Jan 2013 - 1:06 pm | पिंपातला उंदीर
पवार हे महाराष्ट्रातील लोकांचे 'Punching bag' बनले आहेत. त्याला काही अंशी ते स्वताहा कारणीभूत असले तरी त्यांचे चांगले काम पण लक्षात घ्यायला हवीत. नाण्याच्या दोन्हीही बाजू बघायला हव्यात.
1 Feb 2013 - 12:53 pm | अनुराधा१९८०
त्याला काही अंशी ते स्वताहा कारणीभूत असले >> सार्वजनिक माणसाला काळी बाजू असताच कामा नये. फक्त चांगली बाजू असली पाहीजे. हे आपले दुर्दैव आहे की आपल्याला दोन चोरांमधुन एक थोडा कमी चोर निवडावा लागतो.
तुमच्या अपेक्षा वाढवा.
1 Feb 2013 - 12:54 pm | बॅटमॅन
तद्दन भाबडी अपेक्षा. किमान पृथ्वीवरच्या तरी कुठल्याही देशात असं नसतं, बाकी उरलेल्या गॅलक्सीबद्दल माहिती नाही.
1 Feb 2013 - 12:57 pm | अनुराधा१९८०
मी म्हणले होते कमीतकमी अपेक्षा तरी ठेवा. तेंव्हा ५०% तरी पूर्ण होतील. तुम्ही मनापासुन accept च केलेत की हे चोर असणार तर तुम्हाला डा़कू आणि बलात्कारीच मिळणार.
1 Feb 2013 - 1:01 pm | बॅटमॅन
ब्वॉर्र्र्र... :| :|
1 Feb 2013 - 3:37 pm | पिंपातला उंदीर
कमीत कमी अपेक्षा ठेवल्यातर ५०% पूर्ण होतात हे वैश्विक सत्य नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद
1 Feb 2013 - 7:02 pm | ५० फक्त
पन ओम शांती ओमात आम्चा शारुक कायतर एगळंच म्हनला होता, म्हनला की तुमाला काय पायजेल ते फिस्क झालं की समदी दुनिया बलामत त्ये तुमाला मिळासाटी तुमच्या मागं ग्वळा होते, आईच्यान मला इतं सदस्य पद असंच मिळावंल.
28 Jan 2013 - 2:22 pm | मालोजीराव
संपादकानु ...वरल्या समद्या परतीक्रिया सायबांचा sub धागा काडून तेच्यावर हलवता येतीन क्काय ???
म्हंजी बचत गट आन भीमथडी वर लिवायला जागा घावन ;)
29 Jan 2013 - 5:28 pm | काळा पहाड
हो ना? मग लिंगायतांबद्दल पवार काय बोलले परवा परवा? राजू शेट्टींच्या बद्दल? 'त्यांचे' कारखाने! 'आमचे' कारखाने! आणि हा फक्त एकच इन्सिडंट नाही. तुम्ही ब्राह्मणांना मुख्यमंत्री बनवणार का पुन्हा (मनोहर जोशींच्या रोखाने) असे एका सभेत म्हटल्याचे मी माझ्ह्या कानाने ऐकले आहे. हा माणूस अतिशय जातियवादी आहे. आणि संधीसाधू देखील.
1 Feb 2013 - 2:17 pm | अधिराज
बघा आता. धाग्याचा विशय काये तर "भीमथडी जत्रा", आन खाली मात्र वेगळीच "बिनताडी" जत्रा जमलीये.