मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

विकास · · जनातलं, मनातलं
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही. थोडक्यात जर काही काम करायचे असेल तर सकारात्मक वृत्ती ठेवायचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी ज्याने स्फुर्ती येईल असे वाचावे असा याचा अर्थ होता... आज हे नमनाला घडाभर तेल वापरायचे कारण अशाच प्रसिद्धी माध्यमातून आलेली एक अपवादात्मक पण अशा पल्लवीत करणारी बातमी: 26/11 'hero' cop's daughter returns aid ज्या एका पोलीसाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता नराधम कसाबची बंदूक पकडून स्वतःचा प्राण गमावला पण ज्यामुळे कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत हातात आला(आणि तसे पकडणे हे खूप महत्वाचे होते), त्या हुतात्मा तुकाराम ओंबळ्यांच्या कन्येस वैशाली ओंबळेस, सर जमशेदजी जिजीभॉय पार्सी बेनोव्हेलंट इन्स्टीट्यूशन ने त्यांच्या वार्षिक दिनाला बोलावले आणि तेथील विद्यार्थ्यांनी गोळा केलेला रू. तीन लाखाचा धनादेश तीला देऊ केला. मात्र तो स्विकारायच्या ऐवजी तीने नम्रपणे सांगितले की आईने सांगून पाठवले आहे की वडीलांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी असे पैसे घेयचे नाहीत. त्यांना लहान मुले आवडायची तेंव्हा याचा उपयोग येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसच करावा. ट्रस्टचे सेक्रेटरी महरूख खरस यांनी सांगितले की हे ऐकत असताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. मुलांना "देण्या"ची सवय लागण्यासाठी असे प्रकल्प आम्ही करतो, आज वैशालीने आपणहून तेच करून एक सक्रीय आदर्श त्यांच्या समोर ठेवला. सोलापूरच्या रयत शिक्षण संस्थेने पण अशीच देणगी देऊ केली असता, त्यात स्वतःच्या पैशाने भर घालून ती देणगी ओंबळे कुटूंबियांनी त्याच शाळेस दिली... तात्पर्य: हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि त्यांची वैशाली, तसेच वैशालीची आई यांनी दाखवलेली वृत्ती आणि कृती हे एक प्रकाशात आलेले उदाहरण आहे, प्रकाशात येण्याचे कारणही तसाच प्रसंग पाठीशी असणे आहे. वरकरणी कुठलाही देश/समाज हा जरी त्यातील शासक, राजकारणी आणि उद्योगांवर "चालत" असला तरी त्याचे "टिकणे", हे आपत्काल असो अथवा नसो, स्वतःच्या परीघाबाहेर बघणार्‍या वृत्ती, कृती आणि त्यातून घडणार्‍या संस्कृतीवर अवलंबून असते असे वाटते. त्यात माझा-तुमचा पण हातभार लागत राहोत हीच सदीच्छा... -------------

वाचने 13655 वाचनखूण प्रतिक्रिया 30

In reply to by धनंजय

असेच म्हणतो. एक मन म्हणतं शासन किंवा अन्य कोणाची मदत स्वीकारली पाहिजे. कारण काही दिवसानंतर आपण सर्वांना या गोष्टींचा विसर पडेल. -दिलीप बिरुटे

अनामिक Fri, 12/04/2009 - 23:29
हुतात्मा ओंबळेंच्या आत्म्याला खरोखर शांती मिळाली असणार! त्यांच्या कुटूंबासमोर नतमस्तक!! -अनामिक

रेवती Sat, 12/05/2009 - 00:07
ग्रेटच आहेत हे लोक! त्यांना श्रद्धांजली! खूपच धारिष्ट्य दाखवले ओंबळे यांनी.......प्राण चांगले लोक गमावतात....जिवंत तो मेला कसाब राहतो! रेवती

भानस Sat, 12/05/2009 - 04:13
हुतात्मा ओंबळे आणि त्यांच्या परिवाराला सादर प्रणाम! खरेच असे लोक आहेत म्हणूनच आशा टिकून आहे.

sneharani Sat, 12/05/2009 - 11:43
आजच्या युगात अशी उदाहरणे दुर्मीळच आहेत म्हणून ओंबाळें कुटूंबियांना सादर प्रणाम...!

आजच्या काळातले आदर्श ... पुढच्या पिढीला यांची गोष्ट सांगावीशी वाटेल असं संपूर्ण कुटुंब. ओंबाळे कुटुंबियांसमोर नतमस्तक. अदिती

प्रभो Sat, 12/05/2009 - 14:21
रोल मॉडेल..... धन्य ते सर्व ओंबळे कुटुंबिय...नतमस्तक त्यांच्यासमोर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शहिद तुकाराम ओंबाळे आणी २६ नोव्हेबरच्या हल्यात बळी पडलेल्या सर्वांना मानाचा मुजरा खरच नेहमी घ्यायची सवय लागलेल्यांना हा आदर्श घालुन दिला आहे त्यांच्या कुटंबियांनी तस पाहायला गेल तर शहिदांच्या कुटंबियाच झालेल नुकसान कधिच भरुन न येण्याजोग आहे (नतमस्तक) घाशीराम ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय

उत्तम आदर्श. अशी पोलिस कुटुंबे असल्याचे ऐकुन समाधान वाटले. काही प्रसिद्धीलोलुप माणसे मात्र बक्षिसे देण्याचा व बक्षिसे नाकारण्याचा पुर्वनियोजित प्रकार करतात. यामुळे देणारा व नाकारणारा दोघेही मोठे होतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुधीर काळे Sun, 12/06/2009 - 05:00
ओंबळे यांच्या स्मृतीस अभिवादन व त्यांच्या पत्नीस व कन्येस मानाचा मुजरा! मी काल-परवाच "To the last bullet" हे विनीता कामटे यांनी विनीता देशमुख यांच्या मदतीने लिहिलेले पुस्तक वाचले. अतीशय वाचनीय असे हे पुस्तक आहे. शहीद अशोक कामटे हे एक "पुरुषोत्तम" होते. शहीद ओंबळेही असेच नररत्न होते व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय सर्वांना व्हावा असे मला वाटते. म्हणून असेच पुस्तक विनीता देशमुख यांनी ओंबळेंच्या पत्नी व कन्येशी बोलून लिहावे असे मला मनापासून वाटते. "To the last bullet" बद्दल मी मिपावर पुढील एक-दोन दिवसात लिहिणार आहे. मी मिपावरील सर्व सभासदांना आवाहन करतो कीं त्यांनी हे पुस्तक वाचनालयातून आणून न वाचता विकत घेऊन वाचावे. विकासजींना हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद..... ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

आशिष सुर्वे Sun, 12/06/2009 - 11:26
संस्कार आणि धैर्य यांचे एक अप्रतिम उदाहरण घालून दिलेय 'ओंबळे' कुटुंबाने.. दंडवत! स्विस बॅंकेत खाते फुगवित जीवन घालवणार्‍या काही राजकारण्यांनी ह्या कुटुंबियांचे पाय धुवून त्याचे पाणी प्राशन करावे! - कोकणी फणस

अजय भागवत Sun, 12/06/2009 - 11:53
कै. श्री. ओंबाळे ह्यांच्या स्मृतीला अभिवादन. दोनच दिवसांपूर्वी काही कारणाने, कसाबला पकडतांना कै. श्री. ओंबाळे ह्यांनी दाखवलेल्या विलक्षण धैर्य आणि त्यागाबद्दल आमची चर्चा झाली होती. योगायोगाने आज त्याबद्दल आण्खी वाचयला मिळून पुन्हा तो सर्व प्रसंग कसा घडला असेल ह्याची मनोमन उजळणी झाली व पुन्हा एकदा कै. श्री. ओंबाळे ह्यांच्या बद्दल खूप आदराची भावना तयार झाली- त्यांनी एक खूप वारसा मागे ठेवला आहे म्हणून. खर्‍या अर्थाने ते "मरावे पण कीर्तिरुपे (आदर्शरुपे) उरावे" ह्या म्हणीला जागले.

In reply to by अजय भागवत

अजय भागवत Sun, 12/06/2009 - 12:02
ज्या संस्थांना कै. श्री. ओंबाळे ह्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव आहे व उत्स्फुर्तपणे त्यांनी मदतीचा हात पुढे केला हे ही एका सजग समाजाचे लक्षण आहे. [ह्याचवेळी इतर शहीदांच्या कुटूंबीयांनी अशा व इतर स्वरुपाची मदत स्वीकारली असेल तर ते छोटे होत नाहीत असेही वाटते.]

In reply to by अजय भागवत

विकास Sun, 12/06/2009 - 16:05
आपल्या वरील दोन्ही वाक्यांशी पूर्ण सहमत. वरील उदाहरणातील पार्सी शाळेचे अजून कौतूक वाटायचे कारण असे की, मुलांना "देण्याची" सवय लागण्यासाठी ते असे प्रकल्प नेहमी करतात. हा कित्ता इतरत्रही गिरवण्यासारखा आहे असे वाटले. गरजूंनी मदत स्विकारली तर त्यात काही गैर नाही आणि त्यांना नक्कीच कमी लेखू नये/अथवा अशा उदाहरणांशी त्यांची तुलना देखील करू नये. वर घाटपांडेसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे कधी कधी नाटके देखील होत असतात (तू दिल्यासारखे कर, मी नाकारल्यासाराखे करतो), पण असले खडे निवडून फेकून द्यावेत. गरजूंना मदत होऊ शकली तर समाधान मानावे आणि त्यातील एखादा तत्वाने आदर्श ठरला तर त्यासंदर्भात त्या व्यक्तीच्या वर्तनाची जाणीव ठेवणे (acknowledge) महत्वाचे असे वाटते.