मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे खाद्य-पेय जीवन-२

सन्जोप राव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत. वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही.Bon Appétit! सकाळची आन्हिकं उरकली आणि नवाच्या आधी आरशासमोर उभा राहून माणूस कमरेच्या पट्ट्याशी ओढाताण करु लागला की शरीराचा कणनकण 'खायला द्या...खायला द्या...' म्हणून कल्लोळ करु लागतो. (महिलांनाही हेच होत असावे, पण तो अनुभव मला नाही!) ही नाश्त्याची वेळ आहे. नाश्त्याचे न्याहारी, नाश्ता आणि ब्रेकफास्ट असे तीन उपप्रकार आहेत. शिळी भाकरी गरम दुधात कुस्करुन त्याबरोबर लसणीची चटणी घेतली की ती न्याहारी. 'इकॉनॉमिक टाईम्स' वाचतावाचता काटेचमच्यानी पोटात ढकलायचे बेचव अन्न म्हणजे ब्रेकफास्ट. (त्यानंतर फळाचा रस - चुकलो, फ्रूट ज्यूस- आणि ब्लडप्रेशरची किंवा मल्टिव्हिटॅमिनची गोळी नसली तरे ब्रेकफास्टच्या टायचा सामोसा नीट जमत नाही!) आणि तुम्हीआम्ही सकाळीसकाळी जे हाणतो, तो नाश्ता. नाश्ता हे तुमच्या रोजच्या जेवणातले सगळ्यात मोठे जेवण असावे, नाश्त्याला तुम्ही दिवसाभरात जेवढे खाता त्याच्या चाळीस टक्के खावे, नाश्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस आणि प्रोटीन्स घ्या, फळे घ्या.. विज्ञान असले बरेच काही सांगते. पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे 'स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे' असं वाटायला लागावं! पारंपारिक मराठी नाश्त्याचे उपमा आणि पोहे हे म्हणजे पणशीकर-घाणेकर आहेत. सदासर्वदा लोकप्रिय. उपम्याचे उपमा आणि उप्पीट असेही उपप्रकार आहेत, आणि बारीक पंडुरोगी रव्याचा उडुपी उपमा आणि सणसणीत देशी जाड गव्हाचा उपमा असेही. सपक मिरचीचे लहान तुकडे आणि कढीलिंबाच्या भरड पानांनी भरपूर असा पांढरट रंगाचा शेवेने सजवलेला उपमा हे उडुपी मंडळींनी दिलेले प्रकरण आहे. गावरान देशी उप्पीटाला असली कलाकुसर परवडत नाही. त्यातल्या भरड रव्यासोबत मजबूत देशी शेंगदाणे आणि तिखट मिरचीचे मोठेमोठे तुकडे असतात. ते तुकडे बाजूला काढून ठेवायचे नसतात. फारफारतर ते दाढेखाली आले की 'स्स..' असे म्हणून पाण्याचा एक घोट घ्यायचा असतो. अश उप्पीटात कधीकधी आमसुलही येते. अशा उप्पीटाबरोबर काही घेणे म्हणजे अशा उप्पीटाचा अपमान केल्यासारखे आहे. पण जरा बुजरी मंडळी अशा उप्पीटावर साईचे दही घेतात, तेही बरे लागते. उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. आंबोलीहून गोव्याला जाताना घाट उतरायच्या आधी कामतांचे हाटेल आहे. तिथल्या उपम्यात वेलदोडे घातलेले असतात. तीही एक वेगळीच चव लागते. पोहे बाकी अजरामर आहेत. कांदेपोहे आणि 'मुलगी पाहाणे' हा संबंध तर सर्वश्रुतच आहे. कोणत्याही गोष्टीत बटाटा घालून खाण्यार्‍या मुंबईकरांनी बटाटापोहे नावाचा एक धेडगुजरी पदार्थ बनवला. पण खरे पोहे दोनच. भरपूर ओले खोबरे आणि हिरव्या मिरच्या घालून 'वरुन लावलेले' 'आलेपाक' या अर्थहीन नावाचे विशेषेकरुन महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात खाल्ले जाणारे पातळ पोहे आणि दहीपोहे. आलेपाक हा पदार्थ बाकी नाश्यापेक्षा दुपारच्या वेळेचे खाणे म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. 'दडपे पोहे' हे याचे शहरी नाव. फोडणी घातल्यावर काही वेळ हे दडपून ठेवायचे असतात आणि मग कपबशीतल्या बशीतून वाढायचे असतात. किंवा चक्क वर्तमानपत्राच्या कागदावर. वाढताना बाकी वर पुन्हा खोबर्‍याची पेरणी पाहिजे. लिंबू आणि कोथिंबीर हे या पोह्यांचे प्राण. 'है इसीमे प्यारकी आबरु, वो जफा करे, मै वफा करुं' असे गुणगुणत हे पोहे सवडीने, रेंगाळत रेंगाळत खावे, अर्धा कप चहा घ्यावा, आणि 'इट्टला, पांडुरंगा' म्हणत हात झाडत उठावे. आलेपाक हा हातानेच खायचा असतो. चमच्याने आलेपाक खाणार्‍याला जो कोणी आदिबल्लवाचार्य असेल, त्याचा भीषण शाप लागतो म्हणे! दहीपोहे हे पोहेमंडळीतले दुर्लक्षित धाकटे भावंड आहे. अगदी गुणी, पण थोरल्या भावांच्या कर्तबगारीने झाकोळून गेलेले. त्यामुळे दहीपोह्याचे काही नखरे नाहीत. दहीपोहे कसेही खावेत. फक्त ते चांगले भिजलेले असावेत. प्रेमभंगासारखेच दहीपोहे जितके मुरतील तितके अधिक स्वादिष्ट होत जातात. भिजवलेले पोहे, दूध, दही आणि मीठ ही बेसिक एडीशन. त्यावर मेतकूट, तळलेल्या मिरच्यांची फोडणी, लिंबाचे तिखट लोणचे किंवा चक्क लालभडक मसाल्याचे तिखट - हे सगळे 'अ‍ॅड ऑन'स. फोडणीच्या दहीपोह्यात चिमूटभर साखर पाहिजे. आणि बरोबर मुरलेले माईनमुळ्याचे लोणचे असले तर क्या बात है! नरकचतुर्थीला आजही असले दहीपोहे सकाळी सात वाजता पानात येतात आणि फराळाचे सार्थक होते! पोहे -उपम्याच्या जोडीला साबुदाण्याची खिचडी , मिसळ, दोसे-उत्ताप्पे आणि थालीपीठ ही मंडळी म्हणजे भट, दुभाषी, लागू, गोखले या लायनीतली. दर्जाने उत्तम, पण ते रोजचे काम नव्हे. खिचडी आणि मिसळ यावर सगळे बोलून लिहून झाले आहे. ईश्वराचा शोध जसा कुणाला कुठे लागेल याचा नेम नाही, तशी आपल्या चवीची मिसळ कुणाला कुठे मिळेल हेही सांगता येत नाही. 'कोल्हापुरात कुठेही जा, मिसळ चांगलीच मिळणार' असा अभिमान बाळगणारा मी, खुद्द कोल्हापुरात एकदोन ठिकाणी जाड फरसाण, मृतावस्थेतले पोहे, जाड कापलेला कांदा आणि कावीळ झालेला 'कट' याचा फुळकावणी लगदा अर्धवट टाकून उठलो आहे. आणि अगदी अपेक्षा नसताना इंदौरात तीनतीनदा रस्सा मागून घेतलेला आहे. मिसळीचे बाकी एक आहे. अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त 'कर्टन कॉल' करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा. फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी 'उठाव लुंगी-बजाव पुंगी' म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा. दोश्याच्या रंगावरुन आणि त्याच्या कडकपणावरुन त्याचे घराणे कळते. चेंबूरच्या एका हाटेलात (मला वाटते 'गीता भवन' ) राजकपूरला असा कुरकुरीत मसाला दोसा हाताने तोडून खाताना पाहिले आणि 'दिलका हाल सुने दिलवाला' हे पटून गेले! रवा दोसा हाही जितका कुरकुरीत आणि जाळीदार तितका अधिक चविष्ट. रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. उत्तप्पावरील कांदाही असाच खरपूस कडक झाला असला पाहिजे. 'ओनियन टमाटो उत्तप्पा' हा बाकी खरपूसपणाला मारकच प्रकार. एकतर त्या बियाळ टमाटोच्या चकत्या नीट शिजत नाहीत, आणि दुसरे त्या ओलसर टमाटोने त्या खरपूस उत्तप्प्याचाच लगदा होऊन जातो. आमच्या कराडचा शेट्टी त्या उत्तप्पावर तो तव्यावर असतानाच शेंगदाण्याची तिखट चटणी पेरायचा. ते गणितही झकास जमून जायचे. पण दोसा उत्तपा हे स्वयंप्रकाशित जीव. चटणी-सांबार असल्यास उत्तम, नसल्यास एकेकटेही तबीयत खुश करुन जाणारे. इडलीचे तसे नाही. इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हल्ली उडप्याकडे 'सांबार मिक्स या सेबरेट?' असा एक अपमानजनक प्रश्न विचारला जातो . इडली वेगळी आणि सांबार वेगळे म्हणजे एखाद्या सुंदर बाईने खालच्या आणि वरच्या ओठाला वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक लावण्यासारखे आहे.इडली ही सांबाराने न्हालेली नव्हे तर सांबारात बुडालेली पाहिजे. एकेक तुकडा इडली सांबाराच्या चमच्याबरोबर खाणे हे नवख्याचे काम. जाणकार कोण काय म्हणेल याची पर्वा न करता इडली आणि सांबार यांची आधी जिवाशिवाचे ऐक्य करुन घेतो. हे झाले की आणखी एक प्लेट सांबार मागवावे आणि मग जीभ रतिक्लांत होईस्तोवर हे मिश्रण हाणावे. मधून चटणी घेणे वगैरे ऐच्छिक बाबी. पुण्यातल्या 'स्वीट होम'ने इडली सांबारात बारीक शेव घालून वेगळेपणा आणला, पण तेही तसे दुय्यमच. एरवी कळकट शेट्टीच्या हातची वाफाळती इडली आणि सुक्या मिरचीचे तुकडे घातलेले सांबार याला तोड नाही. सांबारातले भोपळ्याचे, वांग्याचे अगदी वेळीप्रसंगी दोडक्याचे तुकडेही खाता येतात, पण सांबारातल्या शेवग्याच्या शेंगाच्या तुकड्यांचे काय करायचे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 'जादा चटणी- सांबारला एक्स्ट्रा चार्ज पडेल' या मेनूवरील ओळीच्या निषेधार्थ तर मनसेला सुपारी दिली पाहिजे. मटणथाळीतला पांढरा आणि तांबडा रस्सा जसा मागायला लागू नये, आणि कांदा-लिंबू तर कायम वाढता असावा, तसे इडली-मिसळीतले सांबार हे न मागता पानात आले पाहिजे. काय जादा पैसे घ्यायचे, ते नंतर घ्या ना लेको! थालीपीठ हा समस्त शहरी समाजाची कीव करावी असा विषय आहे. पुणे -कोल्हापूर रस्त्यावरच्या भुईंजजवळच्या 'विरंगुळा' हाटेलातल्या थालिपिठाचे तर 'सारेगामा' तल्या अल्पजीवी तार्‍यांइतके अवास्तव कौतुक झाले आहे. तेलाने थबथबलेली ती कडक पिठाची तबकडी म्हणजे थालीपीठ नव्हे. खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. थालीपिठातला कांदा बाकी पांढरा पाहिजे, कोथिंबीर कोवळी आणि नुक्ती तोडलेली पाहिजे आणि लसूण-मिरची गावरान पाहिजे. असे थालिपीठ करताना त्यात तव्यावरच मधेमधे भोके पाडून त्यात तेलाची थेंब सोडला पाहिजे. आणि सोबतीला लोणी किंवा दही तर पाहिजेच पाहिजे. असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत. या बिनीच्या शिलेदारांबरोबर शेवयाचा उपमा, मक्याच्या कणसांचा उपमा, लाह्याच्या पिठांचा उपमा, धिरडी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी, कसलेकसले वडे आणि अगदीच आयत्या वेळचे म्हणून आम्लेट-ब्रेड असे नाश्त्याचे इतरही प्रकार आहेत. पण नाश्ता कोणताही असो, त्याने 'अन्नादाता सुखी भवः' असे म्हणावेसे वाटले पाहिजे. सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची! (क्रमशः)

वाचने 30726 वाचनखूण प्रतिक्रिया 80

घाटावरचे भट Fri, 10/30/2009 - 07:51
झकास!! >>इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे. सांबारस्वरुपी नवरा कायम संतापी, पण त्याच्याशिवाय इडलीला अस्तित्व नाही. हे विशेष आवडले.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

एकलव्य Sat, 10/31/2009 - 07:12
लै भारी लेख! म्हणुनच आम्हीही म्हणतो की संजोपरावसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही!

मदनबाण Fri, 10/30/2009 - 08:13
हा ही भाग मस्त... :) सकाळी सकाळी एव्हढ सर्व खाद्यमय वाचुन आता खरचं भुक लागली... (१ नंबरी खादाड) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

प्राजु Fri, 10/30/2009 - 08:18
क्या बात है!! हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे. बर्‍याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे. :) पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अनिल हटेला Fri, 10/30/2009 - 22:15
क्या बात है... वाकई क्या बात है.... हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे. अगदी सहमत ....:-) बर्‍याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे. बिल्कूल..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आम्हीही........पू भा प्र....... :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)

छान लेख. मिसळीचे खरे यश मात्र शँपल मधेच आहे असे मी मानतो. शँपल छप्परतोड असेल सेंपलखाली पोहे, बटाटे, चिवडा काहीही चालून जाते. रावांचा लेख अपेक्षेप्रमाणे खुसखुशीत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

Nile Fri, 10/30/2009 - 09:04
रावसाहेब, दिल खुश केलंत! वाचताना सगळी नेहमीची ठिकाणं आठवली अन वाटलं, लेका दे सोडुन हे सारं अन जा परत कर मजा! जाउद्या शब्दात का सांगता येणार हे. येउद्या राव, सगळ्याची तहान वाचुन भागवावी लागणार.

In reply to by अमोल नागपूरकर

विष्णुसूत Sun, 11/01/2009 - 06:31
सांज्या चा ओझरता का होईना पण उल्लेख हवा होता असे वाटले. त्या शिवाय उपमा हि 'जात' पुर्ण वाटत नाहि. असो. पुर्वी सांजा हा प्रकार एखाद्या लग्नात पहाटे /सकाळी अगदि हमखास असायचा. त्यावरुन लग्नातल्या आचारी लोकांचा अंदाज येयचा. हमखास हा सांजा लवकर संपायचा. आता बहुदा अशी लग्न होत नसावीत ! जुन्या लोकांना अशा लग्नांची आठवण जरुर असेल.

विजुभाऊ Fri, 10/30/2009 - 10:55
मिसळीत सांबार ? #:S :O ऑ ! मिसळीवर झणझणीत रस्सा असतो. श्री ची मिसळ खाल्ली नाही वाटते कधी बापरे उद्या रसगुल्ल्यावर चहा ओतून प्याल :SS पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

मिसळीत सांबर म्हणाले, नशिब आपलं ! गरमागरम भोकं पाडलेले थालपीठ चहात बूडून खाण्याच्या आनंदाचे वर्णन नाही आले, आले तरी म्हणायचं, क्या बात है ! तसेही अजून ठरावीक पट्टीतले लेखन आले नाही. जसे, हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी. आपल्याच परसातल्या जाईच्या फुलांचा सुगंध दरवळलेला असावा. वाफाळत्या उपम्याची प्लेट हातात घेऊन घरभर फिरण्याचा मूड व्हावा. खय्याम साहेबांनी बांधलेली चाल आणि आशाताईंचा थेट हृदयाला भिडणा-या 'दिल चीझ क्या है...च्या आलापात सकाळ मोहरुन जावी. बायडीनं लाडात येऊन उपम्यावर खोबरं पेरावं. नाजूक हातातल्या बांगड्यांच्या किणकिणण्याचा आवाज मनभर गुंजत राहावा. आता पुरे, आता पुरे, असे म्हणत असतांना हात तसाच गळून पडावा......इ.इ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे Sun, 11/01/2009 - 07:54
हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी यावरून आठवले. संक्रांतीच्या आधी धनुर्मास येत असे. त्या दिवसात निदान भोगीच्या सकाळी तरी गरमागरम आनि नरम मुगाची खिचडी, त्यावर खोवलेले खोबरे, बाजरीच्या भाकरीवर लोण्याचा गोळा, सोबतीला भरली वांगी असा मस्त बेत असायचा. डॉक्टरसाहेबांनी सुचवलेल्या इतर गोष्टी माझ्या लहानपणी एकत्र कुटुंबात शक्य नव्हत्या, आता त्या जोडायला हरकत नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

शिप्रा Fri, 10/30/2009 - 10:55
>>पण नाश्ता कोणताही असो, त्याने 'अन्नादाता सुखी भवः' असे म्हणावेसे वाटले पाहिजे. एकदम पटले ..एकुणच लेख चमचमीत झाला आहे :)

चेतन Fri, 10/30/2009 - 11:15
रावसाहेब मस्त लेख झालाय. चेतन अवांतरः हे नक्की बल्लवाचार्य आहेत कि खवय्ये ( की नुसतेच कवी जे न देखे रवी)

सनविवि Fri, 10/30/2009 - 11:16
आहाहा! तोंडाला पाणी आणलंत! इथे बेंगळूरात रोज इडली-डोसा खाऊन कंटाळा आलाय! पोहे हा प्रकार इथे अस्तित्वातच नाही हे कळल्यावर कीव वाटली इथल्या पामरांची! // उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. // याची मात्र काही गरज नव्हती! ;)

In reply to by सनविवि

चिरोटा Sat, 10/31/2009 - 20:02
पोहे अस्तिवात आहेत साहेब इकडे.पोहे पाहिजे असतील तर 'अवलक्की भात' म्हणून सांगा.पोह्यांत शेंगदाणे घालतात.बटाटे घालत नाहीत.कुठच्याही शांतिसागरमध्ये मिळतील. लेख मस्तच. क्ष्^न + य्^न = झ्^न

विसुनाना Fri, 10/30/2009 - 11:24
फर्मास! येऊ द्या.
पणशीकर-घाणेकर ,भट, दुभाषी, लागू, गोखले
-हा,हा. रंगमंच म्हणजे एक थाळी आहे. आम्ही "एक पणशीकर घे रे","दोन लागू पाठव जरा" ऑर्डर सोडतो आहोत. काऊंटरचा टकल्या शेट्टी "साहेब, भक्ती बर्वे एकदम गरमागरम आहे बघा."असा आग्रह करतो आहे. पोर्‍या काऊंटरला "तीन नंबर टेबल... दोन भट, तीन तोरडमल,दोन आगाशे" असे बिल ओरडून सांगतो आहे. असे दृश्य दिसले.
पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे.
-आम्ही तर बुवा पोटातलेही जंतू मारण्यासाठी घेतो. तुम्ही कशासाठी घेता? ;)

सुनील Fri, 10/30/2009 - 11:27
लेख चांगला, खमंग झाला आहे. पण खरे पोहे दोनच असहमत! तुम्ही कोळाचे पोहे चाखले नाहीत, हे उघड आहे! बाकी इडली-सांबार जोडी ही तात्या-अनुष्का जोडीसारखीच अविलगनीय! पण इडलीचा चुरा करून, त्यावर आले-हिरवी मिरची-मीठ यांचे मिश्रण कुस्करून खाण्याची मजा काही औरच! सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची! १०१% सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमोल केळकर Fri, 10/30/2009 - 11:27
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी 'उठाव लुंगी-बजाव पुंगी' म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्‍यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा =D> =D> रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. =D> =D> =D> (डोसा प्रिय ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ज्ञानेश... Fri, 10/30/2009 - 11:28
सुंदर लेख. =D> 'नाश्ता' या नावाखाली कालच्या भाताला तेल्-तिखटाची फोडणी देऊन नुसता खाण्यात किंवा शिळ्या चपात्यांचा काला मोडून त्यात तिखट- कांदे-शेंगदाणे घालून गरम तेलाची फोडणी देऊन खाण्यातली मजा.. हा पण एक वेगळाच अनुभव असतो. या 'डिशेस' सुट्टीच्या दिवशी उशीरा उठून खाल्ल्या तर अधिक चवदार लागतात, हा स्वानुभव आहे! ;) "Great Power Comes With Great Responsibilities"

राधा१ Fri, 10/30/2009 - 11:29
लेख खुपच छान आहे...काही वाक्य तर एकदम झक्कासच...जसे :-)) उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. हे खासच...स्पेशल टाळ्या =D> या वाक्यासाठी... :-) :P 8-}

श्रावण मोडक Fri, 10/30/2009 - 11:44
ओsssssब!!! यापलीकडे ढेकरीचा उच्चार लिहिता येत नाही... जिज्ञासूंनी दुर्लक्ष करावे. या लेखात 'पु.ल. प्रभाव' अधिक जाणवला.

दत्ता काळे Fri, 10/30/2009 - 11:48
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. - हे खरं असावं. पण खमंग आणि खुशखशीत (कि खुटखुटकीत ?)ओरिजिनल थालिपीठ हा त्यांचाच शोध, नाहीतर कोकणात एवढं तेल कुठुन मिळायला ?

sneharani Fri, 10/30/2009 - 11:57
छान आवडला लेख... सुट्टीच्या दिवशी शिळ्या भाताला फोडणी देऊन समोर येणारी "फोडणीच्या भाताची प्लेट " आठवली.

महेश हतोळकर Fri, 10/30/2009 - 12:00
वाक्या वाक्याला दाद द्यावी असा सुरेख लेख. मजा आली. हावरटपणा: चहा झाला, नाष्टा झाला. जेवणाची वाट पहातो आहे.

Dhananjay Borgaonkar Fri, 10/30/2009 - 12:35
हापिसात आलो तेव्हा ब्रेकफास्ट करुन आलेलो. लेख वाचला आणी क्यांटीन मधे नाश्ता करायला गेलो. एक नंबर मिसळ जमली आहे. अजुन येउद्यात तर्री....

टारझन Fri, 10/30/2009 - 13:01
__/\__ भन्नाट लेखण शैली. !! -- खाद्योप राव बकासुरांच्या ताटातलं आपल्या कर्तुत्वाने स्वत: खाणारा भिम हा आमचा नवीन आदर्श आहे!

ऋषिकेश Fri, 10/30/2009 - 13:44
मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!
सोळा आणे पटलं हा लेख वाचून तृप्तीचा (कि ची?) ढेकर देत आहोत.. चहा झाला, नाश्ता झाला. आता मुख्य जेवणाकडे वळाल त्याची वाट पाहतोय (खवय्या)ऋषिकेश

दिपक Fri, 10/30/2009 - 14:00
वा! शिंगणापुरला खाल्लेल्या मिसळीची आठवण झाली. चेंबूरच्या गीताभवनची उगाच आठवण काढलीत आता परत तिकडं जाऊन डोसा हाणावा लागल. एकुण फर्मास लेख.

प्रभो Fri, 10/30/2009 - 14:21
मस्त!!! मजा आली... :) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विसोबा खेचर Fri, 10/30/2009 - 14:44
आयला! आमचा संजोप हल्ली फुल्ल फॉर्मात आहे.. :) खाद्ययात्रा झकासच चालली आहे. भाईकाकांच्या माझे खाद्यजीवनची आठवण झाली...:) संजोप, डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊ! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन Fri, 10/30/2009 - 15:03
डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊ
आणखी काही सुविधा असतील का तात्या ? :) :) :) आवडीनुसार ? आपला, टारझन_पार्टीत_दंगा

In reply to by टारझन

विसोबा खेचर Fri, 10/30/2009 - 16:28
पिरंगुटला मिपाकरांचा फक्त खाण्यापिण्याचा, गाणी गोष्टी गप्पांचा कट्टा होईल..
आणखी काही सुविधा असतील का तात्या ? आवडीनुसार ?
नाही! त्या दिवशी स्त्री पासून दूर रहावे लागेल. कारण बंगला संजोपचा नसून त्याच्या बहिणीचा आहे. तिथे काही अन्य चाळे केल्यास तुला मला तर हाकलून दिले जाईलच, शिवाय संजोपकरताही त्या बंगल्याची दारे कयमची बंद होतील! आपला, (सावध) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अवलिया Fri, 10/30/2009 - 18:59
खुलाशाबद्दल धन्यवाद तात्या. चला, अशा काही जागा आहेत जिथे तात्या सज्जन आहे असे समजले जाते. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

नान्या अजून एक.. चंची एक्सचेंजसाठी चंची घेऊन येणे. आगाऊ खुलाशासाठी स्वतःलाच धन्यवाद. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

नंदन Fri, 10/30/2009 - 16:25
वाचतो आहे. साबुदाण्याच्या खिचडीवर अजून लिहायला हवे होते. बाकी कोळाचे पोहे आणि खापरोळ्या हा अस्सल तळकोकणी नाश्तासुद्धा 'ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' प्रकारातला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आंबोळी Fri, 10/30/2009 - 16:49
लेख अगदी फर्मास झालाय... वाचुन झाल्यावर नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी ७ वाजता दही पोहे हाणल्यासारखे वाटले. आंबोळी

नंदू Fri, 10/30/2009 - 17:50
अप्रतिम लेख. अलिकडे मझ्या वाचनात आलेला एक सर्वोत्तम लेख. अजुन येउद्या. नंदू

प्रदीप Fri, 10/30/2009 - 18:28
लेखात व्यक्त केलेली काही मते पटली नाहीत, पण ते जाऊ दे. एकंदरीत झक्कास लेख. तुमची इमेजरी इतकी फॅब्युलस आहे की कुणालातरी तातू सामंताचे डोके उघडून आत काय आहे असे बघावेसे वाटले होते, तसे आता मला तुमच्याबद्दद्ल वाटत आहे. अजून येऊ दे.

संदीप चित्रे Fri, 10/30/2009 - 19:42
व्हिस्कीचे वाक्य, इडली म्हणजे कोण आणि दोन ओठ वेगवेगळ्या रंगांनी ... ही वाक्यं खूपच आवडली :) रतिक्लांतवरून आठवलं आमचा एक मित्र एखादा पदार्थ अगदी मनापासून आवडला की दाद देण्यासाठी इंग्रजीतून हाच शब्द वापरतो :)

In reply to by संदीप चित्रे

श्री चित्रे, मित्राचा अभिप्राय रोचक वाटतो. एका 'खोल गळा' (शब्दशः मराठी भाषांतर. जिज्ञासूंनी आंतरजालावर स्वतः शोध घ्यावा. हापिसात असाल तर स्वतःच्या जोखमीने शोध घ्यावा.) नावाच्या चित्रपटात असाच काहीसा गोंधळ आहे, हे पाहील्याचे नाही पण ऐकल्याचे आठवते. ....................................... "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971

श्री राव चांगला प्रयत्न. काही न पटलेले मुद्दे: १. उपमांचा (उपम्यांचा नाही) भरमसाठ वापर २. 'खाण्यार्‍या' हे खाणार्‍या असे हवे होते. ३. "इडली ही बिचारी कोपिष्ट नवर्‍याची सहनशील बायको आहे." इडली-चटणी असे आवडणार्‍या लोकांनी काय करावे? ४. 'बिझनेस स्टँडर्ड' सोडून 'इकॉनॉमिक टाइम्स' सारखे घाणेरडे पीतपत्र वाचणे. ५. नाश्त्यात अंड्यांची अनुपस्थिती ६. 'टायचा सामोसा' काय हे? ....................................... "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

सन्जोप राव Sat, 10/31/2009 - 08:31
पहिल्या आणि दुसर्‍या भागाला प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे आभार मानतो. सन्जोप राव Hemorrhoid is best irritated through neglect ....... Sabjop Raav 2009

In reply to by सन्जोप राव

मिसळभोक्ता Sat, 10/31/2009 - 08:50
Hemorrhoid is best irritated through neglect ....... रावसाहेब, दंडवत स्वीकारा.... (फक्त, इरिटेटेड च्या ऐवजी इरिगेटेड हवे. नीट धुतले की मोठे होते गळू. नाही का ? त्यापेक्षा धुवायलाच नको ! सडेल, आणि गळून पडेल.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मिसळभोक्ता Fri, 10/30/2009 - 21:46
रावसाहेब ! मस्तच ! अस्सल कुलीन गायकाला जशी तानेगणिक दाद पाहिजे असते आणि मैफिलभर शांतता पाळून शेवटी फक्त 'कर्टन कॉल' करण्याने त्याचे समाधान होत नाही, तसे मिसळीला दाद घासागणिक आणि घसागणिक गेली पाहिजे. मिसळीच्या पहिल्या घासात पंचेद्रिये जागृत होत नसतील, तर त्यापेक्षा उकडलेला बटाटा खावा. असेच म्हणतो. (पूर्वाश्रमीचा "उकडलेला बटाटा" प्रेमी, आता केवळ मिसळभोक्ता.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

आनंद घारे Fri, 10/30/2009 - 22:07
याचे भाषांतर करून कोणीतरी त्या किंग्स्ली अमिसला वाचून दाखवला पाहिजे. म्हणे, "If you can't annoy somebody with what you write, I think there's little point in writing." Kingsley Amis, British novelist, 1971 कोणालाही न डिवचता किती छान लिहिता येते हे आमच्या संजोपरावांकडून शिकून घे म्हणावं. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

श्री घारे, किंग्स्ली अमिस नाहीत. तुम्ही ईहलोकातील सत्यावरच विश्वास ठेवत असल्याने पलिकडच्या जगात गेले असे म्हणत नाही. त्यांचे पुत्र 'मार्टीन अमिस' हे अत्यंत आवडते लेखक आहेत. जमल्यास त्यांना श्री राव यांचा लेख पाठवता येईल.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

आनंद घारे Sat, 10/31/2009 - 08:33
दिवंगत किंग्स्ली यांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे त्याला शांती लाभो. मी प्रतिसादात दिलेले वाक्य तुमच्याच प्रतिसादातून उचलले होते. नाहीतर माझ्यासारख्या मिसळपाव, सामोसा आणि इडलीदोसा खाणार्‍याला हे पितापुत्र कुठून ठाऊक असणार? पण कशी कुणास ठाऊक, टायची गाठ मारतांना सामोसा बनवायला मात्र जमतो, त्यामुळे लग्नाला उभा राहणार्‍या नवरदेवाला सजवतांना मला बोलावले जाते! आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

रामदास Fri, 10/30/2009 - 23:43
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्‍या देशस्थांचा खास शोध आहे. झालं.एका नविन दंगलीची सुरुवात करणार वाट्टे तुम्ही. पोहे रतलामच्या पुढे सकाळी रस्त्याकडेला असणार्‍या अड्ड्यावर समोसे आणि कचोरी खाऊन झाल्यावर ,अचानक भूक लागली तर पंचाईत नको व्हायला असे म्हणत खाऊन घ्यावे. पोह्यातले शेंगदाणे कच्चे असावेत की भाजलेले हा फार मोठा प्रश्न आहे बॉ. थोडं दक्षीणेकडे कुरमुरे भिजवून सुसला करतात तोही अधूनमधून खावा. पोह्यावर डाळींबाचे दाणे टाकणार्‍यांचा निषेध असो. मांजर(बोका) जसं प्रत्येक उघड्या खिडकून डोकावून बघतं तसा मी प्रत्येक शहराची न्याहारी खाल्ली आहे. पण आताशा रोजचा नाश्ता पोळीभाजीचा बरा वाटतो. सगळे प्रकार करून झाल्यावर मिशनरी हेच खरे सोयीचे सुख.

In reply to by रामदास

सन्जोप राव Sat, 10/31/2009 - 06:51
सगळे प्रकार करून झाल्यावर मिशनरी हेच खरे सोयीचे सुख. व्वा! याला म्हणावी सांकेतिकता! हिंदी चित्रपटसृष्टीत लैंगिक विषयांवरचे सिनेमे का निघत नाहीत या प्रश्नाला कुणीतरी 'इषारा' काफी है असे उत्तर दिले होते, ते आठवले.... सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

In reply to by रामदास

आनंद घारे Sat, 10/31/2009 - 08:13
मी प्रत्येक शहराची न्याहारी खाल्ली आहे. अहमदाबादच्या रस्त्यांरस्त्यावर हातगाडीवर सकाळी मिळणार्‍या फाफडीच्या तलवारी मोडून चाखल्या असतीलच. मला तर त्यांना पाहूनच चाखल्याशिवाय राहवले गेले नाही. उत्तरेकडे जिलबी हे (ल्ग्नाच्या) जेवणातले पक्वान्न नसते, सकाळी सकाळी नाश्त्याला दूध जलेबीवर ताव मारायचा असतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

प्रदीप Sat, 10/31/2009 - 17:42
अहमदाबादेत रहात असतांना जवळच्या वस्तीत एक नवे हलवायाचे दुकान उघडले. त्यावरील 'फाफडानो दर्यो' हा ठळक बोर्ड अजून आठवतो! दर्या कशाकशाचा असू शकतो!

स्वप्निल.. Sat, 10/31/2009 - 00:12
सुरुवात मस्त झालीय :) >>खरे थालीपीठ ज्याचे होते ती नुसती भाजणी तशीच खावी इतकी खमंग असते. ......... असे एकच थालीपीठ खावे आणि त्याच्या आठवणीवर सहा महिने काढावेत. काय आठवण .. मी याच आठवणीवर गेले २ वर्ष काढतोय :( स्वप्निल

भडकमकर मास्तर Sat, 10/31/2009 - 00:14
उत्तम लेख मजा आली _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अमोल नागपूरकर Sat, 10/31/2009 - 09:43
नागपूरला भाजलेल्या गव्हाच्या कणकेची उकडपेन्ढी करतात. तीही मस्त असते. किंवा उन्हाळ्यात सातूचे पीठ तेल तिखत मीठ लावऊन खाल्ल्या जाते.

नाखु Sat, 10/31/2009 - 10:05
खुप आवडला.. आणि हे वाक्य विशेष.. उत्साही सकाळची उदात्त परीपूर्ती म्हणजे नाश्ता. नाश्ता असा असावा, की जो करुन झाला की त्या इंग्रजी कवीप्रमाणे 'स्वर्गात देव आहेत, आणि एकंदरीत जगाचं बरं चाललं आहे' असं वाटायला लागावं! आपल्या लेखा मुळे वाचकांच्या "खाद्य स्मृती" नक्की जागवल्या आहेत. लेखामध्ये या खाद्य तीर्थक्षेत्राची (जवळील खुणेसह) नावे द्यावीत हि विनंती.. "विरंगुळा" बाबत आपले निरिक्षण १०००% बरोबर... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

शुचि Sat, 02/09/2013 - 06:27
परत वाचला. फार मजा आली.अप्रतिम लेखनशैली.