मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला." मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे. तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे. माझे वडील त्यावेळी नौसैन्यात असल्याने प्रत्येक वेळी बंदराजवळ आलेल्या लहान सहान जहाजावर अथवा बोटीवर जाण्याची मला संधी मिळायची.पश्चिमेकडून रेडीचा किनारा आणि दक्षिणेकडून गोव्याला जाण्याच्या क्षितीजाची सीमा मी बंदराजवळ असलेल्या लाईट-हाऊसमधून पहात आलो आहे. किनार्‍यावरच्या लहान लहान होड्यामधे बसून, येणार्‍या मोठ्या लाटांवर हेलकावे घेण्याचा नाद मी मनमुराद उपभोगला आहे.कधी कधी माझ्या इतर मित्रांबरोबर फेसाळलेल्या लाटांवर आरूढ होऊन किनार्‍यावर सरपटत येण्याचा खेळ मी अनेक वेळा खेळलो आहे.बरेच वेळा माझ्या त्या वयात मला भासणारी मोठाली लाट माझ्या होडी सकट मला वर ऊचलून गरगर फिरवून पाण्याच्या फेसात फेकून देताना येणारी मजा मला कधीच विसरता येणार नाही. आणि त्या फेसाळलेल्या पाण्याच्या वेगात किनार्‍याकडे जायला आतूरलेलं ते लाटेचं पाणी मला एखाद्या बंदूकीतून सुटलेल्या गोळी सारखं वाळूत फेकून द्यायचं.आज माझ्या ह्या वयावरही ते दृष्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय.मला कधी कधी वाटतं,माझ्या मनातले जेव्हा हे असले अविस्मरणीय क्षण विसरण्यात गेले तर तो एक माझ्या आयुष्यातला दुःखद टर्नींग-पॉइंट होईल. लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्‍यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला. तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो. ज्याचा त्याचा सहभाग ज्याला जसं वाटेल तसा असावा.जीवनात प्रत्येकाला निदान एकदातरी समुद्राला भेट देण्याची जरूरी आहे असं मला वाटतं. मला आठवतं माझा एक मित्र होता.आम्ही त्याला बबन म्हणायचो.तो समुद्राच्या इतका जवळ रहायचा तरीपण त्याने एकदाही समुद्रावर येऊन वाळूत चालून आणि पाण्यात पाय देऊन मजा करण्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं मला राहून राहून नवल वाटायचं.आणि एकदा त्याने प्रयत्न केला तो पहाताना मला ते दृष्य रोमांचकारी वाटलं. नेहमी प्रमाणे मी एकदा कुंद सकाळी पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात बुचकळून पुढे जाण्यासाठी तयार होतो न होतो तो मी बबनला पाहिलं.एक रंगीत शॉर्ट घालून दोन हाताची क्रॉस घडी करून हाताचे तळवे खांद्यावर टाकून फुटलेल्या लाटेचे तुषार अंगावर उडाल्यानंतर अंगावर शहारे येणार्‍या गंमतीचा तो अनुभव घेत होता.मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "आपण दोघं पोहूया,तू चल माझ्या बरोबर" गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं.आम्ही समुद्राची लाट फुटण्यापूर्वी लाटेपर्यंत पोहत जात होतो.आणि लाट फुटता फुटता तिच्यावर आमच्या पोटावर (उपडी) झोपून त्या धमाकेदार लाटेवरच्या भ्रमणाची मजा लुटीत होतो.अशा एक दोन अनेक लाटांवर आरूढ होत होतो. हंसता हंसता कधी कधी बबनची शॉर्ट त्याच्या गुडघ्यापर्यंत खाली उतरायची,आणि किनार्‍यावर पोहचल्यावर ओली वाळू काना, नाका, तोंडात आणि डोळ्यात जायची.पहिल्याच खेपेला मला आठवतं,असं झाल्यावर त्याने खार्‍या पाण्यात लघुशंकाच केली.जणू तो आपल्या जीवनातल्या वर्जित निग्रहापासून-समुद्रावर न येण्याच्या निग्रहापासून-मनमोकळा झाला होता. मला वाटतं बबनला समुद्र आता आशेचे किरण दाखवीत होता. त्यानंतर काही दिवसानी त्याचा नी माझा संपर्क तुटला.तो डॉक्टर झाला की इंजिनीयर हे मला ठाऊक नाही.फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला. श्रीकृष्ण सामंत

वाचने 3247 वाचनखूण प्रतिक्रिया 11

दशानन Mon, 10/05/2009 - 09:11
>>गावातल्या विहीरीत पोहायची संवय असल्याने बबनला समुद्रात पोहायला तितकसं कठीण जात नव्हतं हे जरा पटलं नाही, ज्याला विहीरीतील पाण्यात पोहणे जमते त्याचा हाल नदीच्या वाहत्या पाण्यात जरा खराब होतोच व ज्याला नदीच्या वाहत्या पाण्यात पोहणे जमते त्याला समुद्रामध्ये पोहायला जमणे अवघड राव, फार फार तर तो तरंगत हातपाय मारत किना-याकडे आरामात पोहचू शकतो पण ज्याला मनसोक्त पोहणे म्हणतात ते पहिल्या काही दिवसात जमणे जवळ जवळ अशक्य. हे माझे मत आहे. (विहिर, नदी व समुद्र तिन्ही जागी चांगलेच हात दाखवलेला) राजे ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

विसोबा खेचर Mon, 10/05/2009 - 09:36
लहानपणी माझ्या पायावर आलेल्या एक्झीम्याला समुद्राचं खारंट पाणी आणि किनार्‍यावरचा भरपूर सूर्यप्रकाश बरं करण्यात उपयुक्त ठरला.
खरं आहे. दर्याचं पाणी खूपच औषधी! कातळानं पाय कापला तरी लगेच बरा होतो..
तुम्ही जर समुद्राला भेट दिलीत तर कदाचीत समुद्र तुमचे गुढघे कधीच ओले करणार नाही.वाळुतून चालणं आणि पाऊलभर फेसाळलेल्या पाण्यातून पाणी उडवत चालणं ह्यातच तुमचा सहभाग मजेशीर होऊ शकतो.
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्‍या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्‍यावरच्या, डोंगरदर्‍यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!) असो.. सुंदर लेख रे म्हातार्‍या, खूप आवडला. तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Mon, 10/05/2009 - 15:13
कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्‍यावरच्या, डोंगरदर्‍यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!
:) क्या बात है, मस्तच आहे की. मस्तपैकी एक लेख येउद्यात त्यावर, वाट पहातो आहे. बाकी सामंतकाकांचा लेख नेहमीप्रमाणे सुंदर. चालु द्यात ... ------ - (लफडाप्रेमी ) डॉनोबा लव्हर ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

In reply to by विसोबा खेचर

अवलिया Mon, 10/05/2009 - 15:19
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्‍या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्‍यावरच्या, डोंगरदर्‍यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!) मग ? पुढे काय झाले ? लेख येवु द्या मस्तपैकी !!! राजेस्टाईल प्रेमभंग कथा टाका... वाटल्यास क्रमशः लिहा.. पण लिहा. सामंत काका, सुरेख लेखन ! जियो !! आपण सामंतकाकांच्या लेखाचे फ्यान आहोत.. जियो !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

प्रभो Mon, 10/05/2009 - 15:58
क्या बात है! सालस आठवली रे म्हातार्‍या! (कधी कोणे एकेकाळी या तात्याने त्याच्या कॉलेज जीवनात अगदी रीतसर पटवापटवी करून एक सुंदर पोरगी पटवली होती बर्र का! दर्याकिनार्‍यावरच्या, डोंगरदर्‍यातल्या खूप सुंदर, आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी आहेत तिच्यासोबतच्या!) मग ? पुढे काय झाले ? लेख येवु द्या मस्तपैकी !!! राजेस्टाईल प्रेमभंग कथा टाका... वाटल्यास क्रमशः लिहा.. पण लिहा. सामंत काका, सुरेख लेखन ! जियो !! आपण सामंतकाकांच्या लेखाचे फ्यान आहोत.. जियो !!! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सुनील Mon, 10/05/2009 - 15:17
माझा जन्म चौपाटीचा (डॉ पुरंदरे यांचे इस्पितळ). त्यातून माझ्या जन्माच्या वेळी माझ्या आईला जो बेड मिळाला होता तोदेखिल खिडकीजवळचा. त्यामुळे खारा वारा आणि समुद्राचे दर्शन मी पहिल्याच दिवशी (नकळत का होईना) उपभोगले, असे म्हणायला हरकत नसावी! सुनील (डोलकर!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे Mon, 10/05/2009 - 21:02
समुद्रावर एकदा गेल्यावर चटकच लागते. अथांग सागरात डुंबणं असो किंवा किनार्‍यावर बसून नजरेने पाणी प्यायचा प्रयत्न करणं असो... समुद्र तो समुद्रच